मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक गंमतीशीर भयानक अनुभव

राजेंद्र मेहेंदळे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी!! शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय. b बँगलोरहुन परत येण्यासाठी काल सकाळचे ५.३० चे विमानाचे तिकीट काढले होते. मी आणि बायको , शिवाय बरोबर थोडेफार सामान. तसे सुटसुटीतच होते म्हणा. आदल्या दिवशी मित्राकडे जेवायला गेलो असताना गप्पांमध्ये त्याने आग्रहाने सांगितले की एक तास आधी नक्की चेक इन कराच. थोडा जरी उशीर झाला तरी बोर्डिंग बंद होईल आणि मनस्ताप होईल शिवाय अधिक पैसे देउन नवीन तिकिटे घ्यावी लागतील. सध्या पोस्ट कोविड जास्त विमानप्रवास होत नसल्याने आम्ही त्याचे म्हणणे मनावर घेतले आणि रात्री झोपतानाच ३.३० ची ओला बूक करुन टाकली. का कोणास ठाउक, लवकर उठायच्या टेन्शन मुळे धड झोप लागली नाही आणि आम्ही ३.१५ लाच उठुन बसलो. पटकन आवरले आणि सामान घेउन हॉटेल मधुन चेक आउट करुन खाली आलो. तोवर ओला अ‍ॅप वर ड्रायव्हरचा नंबर, गाडी नंबर वगैरे आले होतेच. त्यामुळे ५ मिनिटे आधीच त्याला फोन केला. ड्रायव्हरने फोन उचलला आणि अर्धवट हिंदी /कन्नड मध्ये काहीतरी बरळला. साहेब झोपेत होते की नशेत समजेना. अ‍ॅप मध्ये कॅब एकाच जागी उभी दिसत होती. ५ मिनिटे थांबुन पुन्हा फोन केला, पण नंतरचा एकही फोन त्याने घेतला नाही. वैतागुन बायकोच्या फोनवरुन दुसरी कॅब बूक केली आणि ही रद्द केली. तोवर समोर २ के आय ए-८ आणि ९ बस निघुन गेल्या होत्या. ह्या बस सरळ विमानतळावर नेउन सोडतात. बरेच वर्षांपुर्वी मी सतत बँगलोरला कामानिमित्त जात असे तेव्हा ईलेक्ट्रॉनिक सिटी ते विमानतळ याच बसने जात असे. पण आत्ता दुसरी कॅब येत असल्याने डोके चालले नाही. १० मिनिटे गेली . अ‍ॅपवर कॅब पुढे सरकताना दिसेना.पुन्हा कॅबवाल्याला फोन केला. पुढचा एकही फोन भाईने घेतला नाही. आता मात्र घड्याळाकडे बघुन माझा धीर सुटत चालला होता. जवळपास २० मिनिटे गेली होती. काय करावे सुचेना. ईतक्यात समोरुन एक रिक्षा आली. त्याला घाईघाईने हात करुन बोलावले. तोही लगेच आला. विमानतळावर सोडणार का? विचारले तर हा ही अर्धेमुर्धे कन्नड्/हिंदी मध्ये काहीतरी बोलला.७०० रुपये घेइन म्हणाला. पुढे त्याच्या म्हणण्याचा मला समजलेला अर्थ असा की मला एअरपोर्ट ला पिक अप आहे, पण मी तुम्हाला माझ्या भावाकडे सोपवीन, तो तुम्हाला ड्रॉप करेल असे काहीतरी. पण आम्ही सध्या फार विचार करण्याच्या मनस्थितीत नव्हतो त्यामुळे पटकन सामान रिक्षात टाकले आणि बसलो. रिक्षा सुरु झाली आणि हायवेने सुसाट निघली. १० मिनिटे झाली असतील, अचानक त्याने हायवे सोडला आणि डावीकडे यु टर्न मारला. समोर २ माणसे थांबली होती. माझे डोके एकदम सतर्क झाले, पेपरमध्ये आपण काय काय बातम्या वाचतो त्या आठवु लागल्या. पण सुदैवाने त्यातल्या कोणाला त्याने रिक्षात घेतले नाही. रिक्षा सर्विस रोडने पुढे निघाली. म्युनिसिपालिटीचे दिवे अर्धवट अंधार अर्धवट उजेड देत होते. पुढे एक बस चालली होती त्यामुळे निदान रस्ता वापरातील आहे हे समजत होते, पण लवकरच तीही कुठेतरी वळुन दिसेनाशी झाली. आता रस्ता जास्तच सुनसान वाटु लागला. मी आपला अधेमधे मोडके तोडके हिंदी वापरुन रिक्षावाल्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. त्यातुन मला समजले की मधला टोल वाचवण्यासाठी त्याने रिक्षा या रस्त्याला घातली होती. मी कपाळावर हात मारला. अरे भावा, ७०० रुपये दिले तसा अजुन २०० रुपये टोलही भरला असता की मी. कशाला ईथे रानात घातलीस रिक्षा? असे मनातच म्हणालो. रिक्षा आपली खड्डे चुकवत धावत होती. अंधार किर्र् होत चालला होता. मधुनच एखादवेळी लॉज टाईप हॉटेल्स लागत होती तेव्हढाच काय तो उजेड दिसत होता. आमचा रिक्षावाला कोणाकोणाशी फोन करुन बोलत होता. अर्थातच ते मला समजत नव्हते, पण एयरपोर्ट, लेडिज असे काही काही शब्द समजत होते. हा भल्या पहाटे ४.३० वाजता नक्की कोणाशी ईतका वेळ बोलतोय ते समजेना. गूगल मॅप मात्र आम्ही एअर पोर्ट्च्या दिशेने चालल्याचे दाखवत होता. तरीही मला खात्री वाटत नव्हती. एखादा अवघड प्रसंग आला तर हाताशी काठीही नव्हती. मी आपला रस्त्याच्या कडेकडेने विटा, दगड वगैरे पडले आहेत का ते बघत चाललो होतो. वेळेला निदान कामाला आले असते. दु:खात सुख म्हणजे दर २ मिनिटाला एखादी गाडी जवळुन पास होत होती, त्याच्या दिव्यांमुळे जरा धीर येत होता. अशीच १०-१५ मिनिटे अस्वस्थ गेली आणि एक गाव लागले. रस्त्यावर कोणी माणुस नव्हते, पण निदान वस्ती होती. अजुन ५ मिनिटे गेली आणि रिक्षाने एक वळण घेतले. आणि चित्र एकदम बदलले. एक मोठा पेट्रोल पंप लागला. त्याच्या आसपास विमानतळावर येजा करणार्‍या अनेक कॅब दिसत होत्या आणि समोर रस्त्यावर चक्क केम्पेगौडा इंटरनॅशनल एअर पोर्ट ४ कि.मी. अशी पाटी होती. कपाळावरचा घाम पुसला. पण स्टोरी अजुन बाकी होती. आमच्या रिक्षावाल्याने एका ठिकाणी रिक्षा थांबवली आणि यापुढे रिक्षा जात नाही असे सांगितले. ईथुनही विमानतळ किमान १ कि.मी. होता. मी वैतगलो. पण आमच्या चेहर्‍यावरील प्रश्न चिन्ह बघुन तो खाली उतरला आणि येणार्‍या एका कॅबला हात करुन थांबवले. त्याच्याशी काहीतरी बोलला आणि १०० रुपयात आम्हाला तो विमानतळावर सोडेल असे सांगुन त्या कॅबमध्ये बसवले. रिक्षाचे पैसे चुकते करुन कॅबमध्ये बसलो. त्यानेही ईमाने ईतबारे आम्हाला विमानतळावर सोडले. घड्याळात ४.३० वाजले होते. आम्ही चेक ईन करण्यासाठी धावतच सुटलो. आमची लगबग पाहुन विमान कंपनीचे कर्मचारीही मदतीला धावले. पटापट ईंडिगो च्या देस्कवर पोचलो, पण तोवर ४.४० झाले होते. त्यांची सिस्टीम लॉक झाली होती आणि नवे चेक ईन घेत नव्हती, पण आमच्या विनंतीवरुन डेस्क वरील मुलीने कोणालातरी फोन केला आणि सिस्टीम ओपन करुन आमचे बोर्डींग पास प्रिंट करुन सामान घेतले. सामानाच्या टॅगवर आम्हाला सही करावी लागली(आयुष्यात प्रथमच असे काहीतरी केले, बहुतेक काहीतरी नवीन प्रोसेस असावी). अखेर सगळे सव्यापसव्य करुन अखेर आम्ही गेटवर पोचलो आणि एकदाचे विमानात बसलो. हुश्श!!! b

वाचने 10730 वाचनखूण प्रतिक्रिया 35

गवि गुरुवार, 07/27/2023 - 13:52
हा हा हा.. छान वर्णन आहे त्या प्रसंगाचे. टेन्शनच आले असणार. एक तर निर्जन जागी रिक्षा फिरणे, चेक इन करायला उशीर. अनेक एरलाईन्सना निमित्त हवेच असते नो शो करून तिकीट ऐनवेळी इतर कोणाला इश्यू करण्यात. हे विशेषत: हाय डिमांड रुटसवर जिथे ओव्हर बुकिंग सामान्य असते तिथे. हल्ली यावर काही अंकुश आला असेल तर माहीत नाही. बाय द वे, निर्जन रस्त्यावरून आठवले. जुन्या हिंदी सिनेमात भर मुंबईत सर्व लोक राहत असताना देखील घर ते कोर्ट (साक्ष द्यायला जाताना) हा रस्ता मात्र निर्जन जंगल आणि घाटातून जात असे. वाटेत एकही इतर वाहन नसे. खलनायक गँगला वाटेत बॅरल, दगड धोंडे रचून रस्ता अडवून डायलॉगबाजी सहित साक्षीदाराला किडन्याप करण्यासाठी फुल वाव उपलब्ध असे. पूर्वीची शहरे राहिली नाहीत...

In reply to by गवि

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/27/2023 - 14:07
मुंबईत निर्जन जागा शोधणार तरी कुठी हो? ते सगळे सीन बोर्रीवली नॅशनल पार्क किवा आरे कॉलनीत शूट झालेले असायचे. अगदी कालपरवा ओटीटीवर आलेली सॅक्रेड गेम्स मधील एक टिपिकल सीनही तिथलाच( वर्‍हाड लग्नाला निघालेय आणि वाटेत गाड्या अड्वुन खुनाखुनी होते)

कंजूस गुरुवार, 07/27/2023 - 14:19
गोंधळ आणि चिंताच. नशीब विमान मिळाले. सकाळी किंवा संध्याकाळी शहरांत कोणत्यातरी एका दिशेने भयानक ट्राफिक असते. ते विचारून घ्यावे लागते.

चित्रगुप्त गुरुवार, 07/27/2023 - 14:51
वेळ, पैसा, दगदग, अनिश्चितता, विमान चुकणे या सर्वांपेक्षा आपण सुरक्षित रहाणे हे महत्वाचे. दिल्ली विमानतळावर अगदी पहाटे वा रात्री पहुचण्याचे खूप प्रसंग यायचे (फरीदाबाद ते विमानतळाचा रस्ता -सुमारे ४० कि.मी.- अगदी निर्मनुष्य माळरानावरून जायचा) अगदी ओळखीच्या गाडीवाल्याची गाडी दोन दिवस आधीपासून बुक करायचो. ड्रायव्हर वगैरेची काही अडचण असल्यास मालक स्वतः गाडी चालवायचा. अलिकडे ओला ऊबर वगैरे सोय झाल्यापासून ते स्वस्त पडत असूनही जुन्याकडूनच मागवायचो.

In reply to by चित्रगुप्त

राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/27/2023 - 15:34
मी बायकोला तेच म्हणालो--बँगलोर आहे म्हणुन ही रिस्क घेउ शकलो, गुरगाव किवा नॉयडामध्ये असा वेडेपणा केलाच नसता, भले फ्लाईट चुकली तरी चालेल.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

विवेकपटाईत Fri, 07/28/2023 - 13:17
गुरुग्राम आणि नोएडा येथून हजारो लोक रात्री फ्लाईट पकडायला जातात. गुरुग्राम ते एअरपोर्टच्या रस्रात्याt रात्रीच्या वेळी भयंकर ट्राफिक असल्याने १०० टक्के सुरक्षित. जवळपास तीच परिस्थिती नोएडा ते एअरपोर्ट रस्त्याची आहे. पोलिस ही असते. बाकी ncr hi तेवढेच सुरक्षित आहे जेवढी मुंबई.

In reply to by विवेकपटाईत

काका तुम्ही दिल्लीकर आहात म्हणुन मी तुमच्या भावना समजु शकतो, पण एन सी आर मुंबई ईतकेच सुरक्षित आहे या वाक्यावर शाळकरी पोरसुद्धा सहमत होणार नाही. मी रात्री १-२ वाजता उद्योग विहारच्या ऑफिसातुन गोल्फ कोर्स रोड वरच्या गेस्ट हाऊस वर यायचो तेव्हा माझे टीम मेंबर मला आय टी पार्कच्या गेटपर्यंत सोडायला यायचे आणि मला कॅबमध्ये बसलेले बघुन मगच परत जायचे. हे एक उदाहरण एका टीम मेंबरने रात्री ऑफिसाबाहेर हात दाखवुन एक कॅब थांबवली, त्यात नंतर अजुन २-३ जण बसले. मग त्यांनी सर्वांनी मिळुन त्याला चाकु वगैरे दाखवुन धमकावायला सुरुवात केली, बरेच ठिकाणी फिरवले, ए टी एम मधुन पैसे काढायला लावले आणि याउपर त्याला जिवंत ठेवावे की मारुन टाकावे यावर त्यांची चर्चा चालु होती. शेवटी खूपच गयावया केल्यावर कोणालातरी त्याचे दया आली आणि त्याला एका निर्जन जागी सोडुन ते पसार झाले. पोलिसात तक्रार केलीच पण पत्ता लागला नाही. ही गोष्ट कोणत्याही ठिकाणी घडु शकते हे मान्यच आहे, पण तरीही मुद्दा एन सी आर असुरक्षितच आहे.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

प्रचेतस Sat, 07/29/2023 - 05:33
दिल्ली अजिबात सुरक्षित वाटत नाही, सहा सात वर्षांपूर्वी रोहिणीला काही कामानिमित्त गेलो होतो, संध्याकाळी साडेसहा सात नंतर एकदम सुनसान झाले, मेट्रो स्टेशनवर जायला एकही बस रिक्षा मिळेना, मग एक सायकल रिक्षावाला भेटला त्याने स्टेशनवर सोडले व करोलबागला मुक्कामाला परत आलो.

In reply to by प्रचेतस

तुषार काळभोर Sat, 07/29/2023 - 10:30
एका पोलिसाचा अनुभव मागच्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला नळ स्टॉप चौकात वाहतूक पोलिसाने अडवले. निगोशिएशन्स चालू असताना त्यांनी सांगितलं की पोलिसांमुळे पुणे सुरक्षित आहे. तो स्वतः काही प्रशिक्षणासाठी दिल्लीमध्ये होता (२०२२ च्या उन्हाळ्यात). तेव्हा तेथील स्थानिक पोलिसांनी या पुण्यातील पोलिसांना सांगितले होते की अंधार पडल्यावर एकटे फिरू नका. ग्रुपमध्येही जास्त दूर v जास्त उशीरपर्यंत फिरू नका. पुण्यात मी मध्यरात्रीदेखील महिलांना (बाहेरून आलेल्या सुद्धा!) एकटीने किंवा दोघींना दुचाकी आणि कार ने फिरताना पाहिलंय. रात्री बारा वाजता नवरा बायको दुचाकीवर, रिक्षाने, कॅबने सिंहगड रोड किंवा कोथरूड किंवा बाणेर किंवा हडपसर वरून पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, विमानतळ येथे जातात. गुडगाव मध्ये हे कितपत सुरक्षित आहे?

In reply to by प्रचेतस

चित्रगुप्त Sun, 07/30/2023 - 20:40
दिल्लीत प्रत्येक मेट्रो स्टेशनाबाहेर भरपूर आटोरिक्षा उभ्या असतात, परंतु ते जवळची 'सवारी' घेत नाहीत, भरपूर लांबची सवारीच त्यांना हवी असते, आणि या बाबतीत त्यांची एकजूट असते असा अनुभव बरेचदा आलेला आहे. (बाहेरगावच्या नवख्या लोकांना फसवणे हे तर सगळ्याच शहरात असते)

गोरगावलेकर गुरुवार, 07/27/2023 - 15:28
असाच भयानक प्रकार मी सुध्दा गेल्याच आठवड्यात अनुभवला. पण त्याला गंमतीशीर नाही म्हणता येणार. प्रचेतस यांच्या पाऊस २ या धाग्यातील प्रतिसादात लिहिले होते.

मित्रहो Fri, 07/28/2023 - 12:46
प्रचंड टेंशन आले असणार, छान लिहिले आहे. ओला, उबेर यांमुळे विमानतळ, रेल्वे स्टेशन वर पोहचण्यासाठीची खात्रीची सेवा आता उपलब्ध राहिली नाही. पूर्वी मेरू आणि स्काय कॅब खात्रीच्या होत्या. सर्व शहरात पहाटेच्या फ्लाइट पकडताना हि समस्या असते. मी सुद्धा बऱ्याचदा दुसरी कधी तिसरी कॅब बुक केली आहे.

टर्मीनेटर Fri, 07/28/2023 - 16:39
अय्यो रामा! आधी रिक्षा आणि दुचाकींना टोल भरावा लागत नव्हता, आता रिक्षालाही टोलपात्र केले कि काय कर्नाटकात? बाकी अनुभव गमतीशीर आहे खरा 😀

कंजूस Fri, 07/28/2023 - 16:52
पहाटेचे विमान पकडण्यासाठी रात्रीच एरपोर्टला जाऊन चटई टाकून झोपणे बरे ना? दोघे असतील तर सोपे ? (सल्ला देण्याचा हेतू नाही पण एक शंका.) सकाळची सिंहगड पकडण्यासाठी सिंहगड रोडचे लोक रात्रीच पुणे स्टेशनला ठिय्या देतात म्हणे.

In reply to by कंजूस

म्हणुनच पुणेकरांनी आता सिंहगड एक्सप्रेस सिंहगडावरुन चालु करण्याची मागणी केली आहे. म्हणजे कसे? सोपे होईल.

योगी९०० Fri, 07/28/2023 - 20:09
योग्य वेळी हा अनुभव वाचला.. उद्याच सकाळी मला बंगलोरवरून ३ वाजता टॅक्सी पकडायची आहे. हा अनुभव वाचून हॉटेलात विचारले तर त्यांनी सांगितले की शनिवारी सकाळी ओला/उबेर मिळायला त्रास होतो. म्हणून सरळ कंपनीकडून कार बुक करून घेतली. धन्यवाद.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

योगी९०० Mon, 07/31/2023 - 10:38
हो मला तरी या लेखाचा फायदा झाला. यानिमित्ताने कंपनी तर्फे मला माझ्यासाठी गाडी बुक करता येते हे ही समजले. उगाच अ‍ॅडमिन बरोबर फॉलो अप नको म्हणून बुक करायचो नाही. पण नवीन पोर्टल कंपनीने बनवले आहे त्यात फक्त १ मिनीट लागले कार रिक्वेस्ट द्यायला आणि १० मिनिटात कार बुक झाल्याचा मेसेजही आला. कधी कधी ओलावर १०-१२ मिनिटे ड्रायव्हर शोधण्यातच जातात. यापुर्वीही बंगलोरला ओला उबेरचा असा अनुभव आला असल्याने बसस्टॉपवरच उभे राहून बुक करतो. कारवाला येणार असेल तर थांबतो नाहीतर सरळ जी एअरपोर्ट बस येते त्यातून निघून जायचो. एक शंका : ५.३० च्या विमानासाठी तुम्ही ३.३० ला कसे काय निघाला? यावेळी तर तुम्ही एअरपोर्टवर पाहिजे. गेट २० मिनिटे आधी बंद होते. चेक इन व सिक्यूरीटी साठीच कधी कधी १ तास लागतो. आता त्यात नवीन प्रकार म्हणजे डिजीयात्रा हा प्रकार बंगलोरला सुरू केला आहे. बाहेरच तुमचा फोटो घेतला जातो व प्रत्येक ठिकाणी आत कॅमेरा तुमचा फोटो चेक करतो.

In reply to by योगी९००

हे मला माहीत नव्हते, तिकडे पोचल्यावर उद्घोषणा करत होते की डिजियात्रा वाल्यांनी वेगळी रांग लावावी, तेव्हा समजले. दुसरे की आंतर देशीय प्रवास असल्याने १ तास आधी चेक ईन केल्यास पुरेसे होते, आणि हॉटेल विमानतळाच्या रस्त्यावरच होते(बागलूर क्रॉस) म्हणुन २ तास आधी निघालो.

In reply to by योगी९००

कानडाऊ योगेशु Sun, 07/30/2023 - 10:16
बेंगलोरमध्ये असताना मलाही रात्री अपरात्री विमानतळावर जाण्याचा प्रंसगाला सामोरे जावे लागले होते. अश्यावेळी मी ओला उबर अश्या त्यावेळी बुक होणार्या टॅक्सी घेण्यापेक्षा एअरपोर्ट सर्विस देणार्या टॅक्सी सर्विस बुक करत असे. एकतर तेव्हा आपल्याला समोरच्याशी डायरेक्ट बोलता येते व त्याला दहा वेळा बजावुन सांगता येते कि ऐनवेळी अडचण निर्माण करु नकोस म्हणुन. थोडी महाग पडते पण कधी अडचण अथवा खोळंबा झाला नाही.

कंजूस Fri, 07/28/2023 - 20:40
आपण चांगल्या सहली झाल्या की आनंदाने सगळ्यांना सांगतो,इथे लिहितो. पण असे अनुभवही आवर्जून द्यायला हवेत. पुढील लोकांचे त्रास आणि पैसे वाचतील.

कर्नलतपस्वी Fri, 07/28/2023 - 21:55
नाताळच्या सुट्टीत कुठे ना कुठे तरी जायचे ठरलेले. त्यात आता चार चाकी आली होती. भोपाळ पुणे, पुणे लखनऊ आशी रोड ट्रीप यशस्वी पणे पुर्ण व आरामदायक झाल्यानंतर घरच्याचां विश्वास दृढ झाला. एक असाच अनुभव... नाताळच्या सुट्टीत कुठे ना कुठे तरी जायचे ठरलेले. त्यात आता चार चाकी आली होती. भोपाळ पुणे, पुणे लखनऊ आशी रोड ट्रीप यशस्वी पणे पुर्ण व आरामदायक झाल्यानंतर घरच्याचां विश्वास दृढ झाला. या वर्षी आग्रा, फतेपुर सिक्री जाऊ आसा फतवा जारी झाला.लवकर सकाळीच चार चाकीने निघालो. कानपूरच्या जवळ लोकांनी रस्त्यावर उतरून रहदारी बंद केली होती. पोलिसांच्या सल्ल्यानुसार एक आडबाजूचा रस्ता जो जी टी(शेरशहा सुरी मार्ग) रोड ला मिळत होता त्यावर गाडी टाकली. क्राॅस कंट्री रोड, नवी गाडी, कसेबसे मुख्य रस्त्यावर पोहोचलो. जी टी रोड रिकामा, गुळगुळीत पण मैलोन्मैल वस्ती,पेट्रोल पंप, ढाबे काहीच नाही. जागोजागी खांद्यावर दुनाळी टांगलेले दोघे चौघे, भका भका बिड्यांचा धुर काढत उभी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून डाकू मलखानचीच आठवण येत होती. दोन मुली आणी बायको. सर्व अस्वस्थ व्हायला सुरवात झाली. काटा शंभरवर टेकला होता. अचानक थोड्या अंतरावर एक रक्तबंबाळ, खांद्यावर चाकू रुतलेला व हातात विट घेऊन फाटक्या कपड्यात भिक्कार माणूस रस्त्यात मधोमध उभा. रस्त्यच्या कडेला टपरी व दोन चार माणसांच एक टोळकं बाजेवर बसलेलं होतं. इलाका भिंड मुरैना, नोटोरियस, परिस्थितीचा अंदाज आला.सर्व खिडक्या बंद केल्या. ड्रायव्हर साईटची थोडी उघडली, गती कमी न करता विस रुपयाची नोट व काही नाणी त्या माणसाच्या दिशेने भिरकावली आणी गाडी दामटली. आपेक्षे प्रमाणे तो माणूस नोट व नाणी घेण्यास लपकला आम्ही सुखरुप पुढे निघून गेलो. हुश्श, good sense prevailed.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस Sat, 07/29/2023 - 05:39
कारने सहलीला जाणारे आमचे काही ओळखीचे,नातेवाईक आणखी एकाला बरोबर घेतात. दोन कार आणि आपलेच लोक. थोडी अधिक आत्मनिर्भरता. एकूण ते वाहन परावलंबी आणि गैरसोयीचे (हे माझे मत). फक्त स्थानिक परिसरासाठी ठीक.

विवेकपटाईत Sat, 07/29/2023 - 09:15
दिल्ली बाबत अनेकांच्या विचित्र धारणा आहेत. बहुतेक त्याचे कारण दिल्लीत होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला राष्ट्रीय चॅनल वर महत्वपूर्ण स्थान दिले जाते. मी शेकडो वेळा कार्यालयातून घरी रात्री 11 नंतर आलो आहे. पंखा रोड होऊन आत मध्ये पाऊण किलोमीटर चालताना भीती फक्त कुत्र्यांची वाटत होती. जुन्या दिल्लीत तर रात्री तीन वाजता ही रहदारी असते.

विजुभाऊ Sat, 07/29/2023 - 15:44
या आठवड्यात मला एक असाच पण जरा वेगळा आणि भनायक अनुभव आला अहमदाबाद मधे दोन तीन दिवसांच्या कामासाठी गेलो होतो. कम्पनीने लॉज बुक केले होते. पण जी रूम मिळाली त्या रूमला एकही खिडकी नव्हती. रूम वातानुकूलीत असल्यामुळे खिडकी नसल्यामुळे काही फरक पडणार नव्हता म्हणून घेतली. सकाळी बाथरूम मधे गेलो बाथरूमला ही अर्थातच खिडकी नव्हती, व्हेंटीलेशन साठी छतावर एक एक्झॉस्ट फॅन होता. अंघोळ करून बाथरून मधून बाहेर जाण्यासाठी दार उघडायला गेलो तर लक्ष्यात आले की दाराचे लॅच लॉक झाले आहे. आणि दार उघडता येत नाहिय्ये. दाराला हँडल ऐवजी एक गोल नॉब होता त्या मुळे ओढणे शक्य होत नव्हते. त्यात ओले असल्यामुळे हात सटकत होते. परिस्थिती अशी होती की माझा मोबाईल बाहेर रूम मधे होता. आतून ओरडून कोणाला बोलायचे तर आवाज बाहेर जाणे शक्य नव्हते. दहा एक मिनीटे शांत बसलो. लॅचचा नॉब टॉवेल ने पुसून काढले. आणि दाराच्या चौकटीला पाय लावून लॅच दोन्ही हातानी दाबून जार एकाच झटक्यात जोर लावुन ओढले. दार उघडले गेले आणि जीव भांड्यात पडला. हे लिहीताना आता मनात विचार येतोय की समजता ते ओढताना जर तो दाराचा नॉब तुटला असता तर? माझी रूम आतून कडी लावून बंद केलेली होते त्यामुळे क्लीनिंग स्टाफला आत किल्ली लावूनही रूमचे दार उघडता आले नसते. बाथरूम मधे फोन नेला असता तर निदान फोन करूनतरी स्टाफला कळवता आले असते. पण तेही शक्य नव्हते.

पहाटेची ओला उबेर कधीही बूक करू नये. पहाटे रस्त्यावर ट्राफिक नसते अशावेळेस एअरपोर्ट वज्र बसेस हा सगळ्यात रिलायबल ट्रान्स्पोर्ट आहे. इतकी असंख्य लोकं आपल्या शहरांत सतत प्रवास करत असतात. तरीही आपल्या शहरांना मेट्रो, एअरपोर्ट रेल्वे वगैरे करायचे अजिबात सुचत नाही. बेंगलोर एअरपोर्ट लांब आहे तर बेंगलोरच्या सीमेपर्यंत तरी एक थेट रेल्वेलाईन टाकावी. त्या स्टेशनवर कसेतरी पोचले तरी चालेल पण त्या स्टेशनवरुन दर १० मिनिटाला थेट रेल्वे धावलीच पाहिजे. असल्या काही सिस्टीम करावे हे आपल्या लोकांच्या का ध्यानात येत नाही? काय नशीब आहे आपलं.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धर्मराजमुटके Mon, 07/31/2023 - 11:20
विमानाने प्रवास करणे म्हणजे niche category मधे येणे असा बहुतेक जणांचा समज असतो त्यामुळे विमानात बसायला जायचे तर कार / टॅक्सी ने जावे असा अलिखित नियम असावा नाहितर प्रतिष्ठा कमी होते असा बहुसंख्य जनतेचा गैरसमज असावा. सरकारही त्याला खतपाणी घालत असावे. मी तर कित्येकदा मुंबई विमानतळावर रिक्षा / बस पकडून गेलो आहे. जवळ जास्त बॅगा असतील तर अडचण होऊ शकते हा ही एक मुद्दा आहेच.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

चौकस२१२ Mon, 07/31/2023 - 13:27
पहाटेची ओला उबेर कधीही बूक करू नये. यावरील एक अनुभव पुण्यात हॉटेलात राहत होतो , डेक्कन वरील ,, पहाटे ५ ला लोहगाव विमानतलावर पोचायचे होते वारी विदेशी होती त्यामुळे चुकली असती तर फारच महाग पडले असते .. तर विचारपूस केल्यावर सगळे म्हणाले कि डेक्कन ला आहात ना मग काय चिंता करता ओला उबर पहाटे २-३ ला सहज मिळेल .. माझ्य मनात मात्र धाकधूक होती .... बर हॉटेल ची "एअरपोर्ट पोचवणे" सेवा फार महाग वाटत होती .. काय करावे ..तेवढ्यात काम झाले पूर्वी त्या हॉटेल च्या सुरवातीला मी कामासाठी म्हणून ३-४ आठवडे राहिलो होतो ते त्यांचह्य रेकार्ड वर दिसले आणि लगेच तो मॅनेजर म्हणाला अहो तुम्ही तर आमचे जुने ग्राहक .. काळजी करू नका आज रात्री हॉटेल तुम्हाला विनामूलय पोचवेल एअरपोर्ट ला जीव भांड्यात पडला दुसरा मुद्दा ,,, एअरपोर्ट वरून गावात थेट ट्रेन का नसते... या ला कारण टॅक्सी चा धंदा बुडू शकतो असे दिसते किंवा एअरपोर्ट ते गाव हि बस सेवा असते त्यांचा धंदा किंवा असे करतात कि अशी ट्रेन असली तर ती बऱ्यापैकी महाग ठेवतात त्यामुले एखाद्याला टॅक्सी पेक्षा ती परवडते पण जास्त असतील तर टॅक्सी अर्थात हे सर्व त्या त्या देशातील "टॅक्सी किती महाग स्वस्त " यावर अवलंबून आहे - फ्रांकफुर्त - ट्रेन आहे - सिडनी - ट्रेन आहे- महाग - सिंगापोर - ट्रेन नाही / बस आहे - कुआला लंपूर - ट्रेन आहे - हाँग कोन्ग - ट्रेन आहे - ब्रिस्बेन - ट्रेन आहे- महाग - मेलबॉर्न - ट्रेन नाही / बस आहे

In reply to by चौकस२१२

अदित्य सिंग Mon, 07/31/2023 - 15:39
सिंगापोर - ट्रेन नाही / बस आहे >> ट्रेन व बस दोन्ही आहे.... अन ट्रेन तिकिटात फरकही नाही दुबई - ट्रेन व बस दोन्ही आहे... ट्रेन अधिक सोयिस्कर आहे.