Skip to main content

फायनान्शियल गोल्स सेटिंग

फायनान्शियल गोल्स सेटिंग

Published on शुक्रवार, 10/05/2024 प्रकाशित
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करा फायनान्शियल गोल्स सेटिंग: १. रिटायरमेंट कॉर्पस. [वेगवेगळे कॅल्क्युलेटर ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यात तुम्ही तुमचे सध्याचे वय, सध्याचे इन्कम, निवृत्तीचे वय , आताचा तुमचा एकुण खर्च वगैरे गोष्टी टाकून निवृत्तीनंतर लागणारा कॉर्पस तुम्हाला काढता येतो. हा कॉर्पस काही कोटींमध्ये जातो.] आपल्या निवृत्तीच्या कॉर्पस ची तजवीज नोकरीच्या पहिल्या दिवसापासून करावी. तुमच्या कडे गुंतवणुकीसाठी साधारण ३० वर्षे असतात ज्यात तुम्ही अधिक रिस्क घेऊन अधिक परतावा मिळवू शकता. त्यानुसार फंड्स किंवा इतर गुंतवणुकीचे पर्याय निवडता येतात. एकदा लागणारा कॉर्पस काळाला की त्यासाठी किती मासिक गुंतवणूक किंवा सिप करावे लागतील हे कळते, त्यासाठी ऑनलाईन कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा. २. आपत्कालीन निधी जमा करणे : हा निधी तुमच्या मासिक खर्चाच्या ३ ते ६ पट असावा आणि तो लिक्विड फंड, सेविंग्स मध्ये ठेवावा. हा निधी फक्त आणि फक्त आपत्काळात वापरावा. ३. टर्म इन्शुरन्स : हा तुमच्या मासिक वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० ते १२ पट कव्हरेज चा घ्यावा. हा इन्शुरन्स नोकरीला लागल्या लागल्या घेणे. याचा जो प्रीमियम आहे तो वार्षिक असावा. त्या प्रीमियम ची सोय रिकरींइंग काढून करावी. म्हणजे समजा २४००० प्रीमियम आहे तर २००० रुपये दर महिना बाजूस ठेवावे. ४. मेडिक्लेम निधी: हा निधी प्रतिव्यक्ती किमान ५ लाख सुरक्षा कवच असलेला घ्यावा. शक्यतो फॅमिली फ्लोटर बारा पडतो. याचा जो प्रीमियम आहे तो वार्षिक असावा. त्या प्रीमियम ची सोय रिकरींइंग काढून करावी.मेडिकल इन्शुरन्स तुम्ही लहान असताना, आणि निरोगी असताना काढावा. अनेक कंपन्या सुद्धा मेडिक्लेम इन्शुरन्स देतात. तो जरी असला तरी स्वतःचा एक असावाच. कंपनीचा मेडिक्लेम आपल्या घरातील पालकांसाठी वापरावा आणि स्वतः काढलेला स्वतःसाठी. ५. स्वतःचा स्किल डेव्हलोप करणेसाठी चा निधी. : स्वतःत केलेली गुंतवणूक जास्त रिटर्नस देते. मी म्हणून आपला स्किल सेट दरवर्षी वाढवावा. स्किल सेट वाढला की तुमच्या पगारवाढीची शक्यता वाढते. हा निधी प्रत्येकासाठी वेगळा असू शकतो. ६. मुलं मुली यांचे शिक्षण निधी: याची सुरुवात लग्न झाल्या दिवसापासून करावी. पहिले आपले उत्पनानुसार अपत्ये जन्मास घालावीत. शिक्षण खर्च दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यामानाने आपले उत्पन्न वाढणार आहे का हे बघावे. शिवाय लोकसंख्या नियंत्रण हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. हा खाजगी विषय आहे त्यामुळे ज्याला पटेल आणि ज्याची त्याची सद्बुद्धी सांगेल तसे वागावे. हा निधी किती असावा याचे गणित महागाई कॅल्क्युलेटर ने काढता येईल. आताचा एखाद्या स्ट्रीम चा लागणारा खर्च आणि आपली मुले जेव्हा या शिक्षणाच्या वयाची होतील तेव्हाच संभावित खर्च हे ऑनलाईन महागाई गणक यंत्रे आहेत त्यांनी काढता येतो. त्यांनुसार सिप सुरु करावा. ७. मुलं मुली यांचे लग्न निधी: मुलांचे मुलींचे लग्न अजून किती वर्षाने आहे त्याचा अंदाज घेऊन हा निधी किती असावा याचे गणित महागाई कॅल्क्युलेटर ने काढता येईल. आताचा एखाद्या लग्नाचा लागणारा खर्च आणि आपली मुले जेव्हा लग्नाच्या वयाची होतील तेव्हाच संभावित खर्च हे ऑनलाईन महागाई गणक यंत्रे आहेत त्यांनी काढता येतो. त्यांनुसार सिप सुरु करावा. आपल्याकडे मुलीकडच्यांनी सगळं खर्च करायचा अशी पद्धत आहे. हा खर्च अर्धा अर्धा दोघांनी करावा. (मा. व. म.). ८. घर खरेदी: हा एक अतिशय गंभीर आणि वादाचा मुद्दा आहे. घर विकत घ्यावे का भाड्याने राहावे हे ज्याच्या त्याच्या परिस्थिती सापेक्ष आहे. ती चर्चा इथे नको. ९. वरील सगळे खर्च करण्याचे नियोजन झाले आणि तरीही पैसे उरले असतील तर फॉरेन ट्रिप , कार खरेदी, मोबाईल खरेदी अशी जीवनशैली संबंधित खर्च याचे नियोजन करावे. १०. सगळ्यात प्रथम तरलता असलेली गुंतवणूक करावी आणि मग रिजिड प्रकारची गुंतवणूक करावी. ११. आपल्या मुलांना लहानपणापासुन खर्च लिहिणे शिकवावे आणि त्यांचे बँक खाते उघडून त्यात अगदी मामुली रक्कम ठेऊन ती व्याज मिळून कशी वाढते याचे प्रात्यक्षिक दाखवावे. १२. दुसऱ्याला उधार पैसे देणे जामीन राहणे टाळावेच टाळावे. कौस्तुभ पोंक्षे

याद्या 9274
प्रतिक्रिया 39

छान माहिती. धन्यवाद. दुसऱ्याला उधार पैसे देणे जामीन राहणे टाळावेच टाळावे. ह्याची त्याची मदत करत खूप पैसे अडकलेत लोकांकडे, काहींनी तर माझा नंबरच ब्लॉक मारलाय. खूप मनस्ताप होतोय. ह्यातून कसा मार्ग काढावा समजत नाहीये.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

विसरून जायचे... आणि ह्यापुढे कुणालाही, फुकट चहा पण पाजू नका... (स्वगत... विषय, चहाचा निघाला.. आता गाडी घसरणार...)

योग्य वेळी योग्य माहिती मिळाली तर खुप फायदा होतो.

सरकरी नोकरदाराना मिलते तशी पेन्शन किवा उत्पन्न कसे सुरु करता येइल??? खाजगी नोकरी करिता . स्वता नियोजन करुनच..

In reply to by अहिरावण

एन.पी.एस हा चांगला पर्याय आहे. त्यांचे फंड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस कमी असतात. तसेच दरवर्षी ५० हजारपर्यंत रक्कम त्यात भरल्यास जुन्या करप्रणालीप्रमाणे ८०सी च्या दीड लाखांच्या वर आणखी ५० हजार पर्यंत करपात्र उत्पन्नात वजावट मिळू शकते. एन.पी.एस मध्ये जमलेल्या कॉर्पसमधून ६०% पर्यंत रक्कम वयाच्या ६० व्या वर्षी काढता येते आणि उरलेल्या कॉर्पसची अ‍ॅन्युईटी करावी लागते. ती उरलेली रक्कम आपल्याला नाही तर आपल्यापश्चात आपल्या नॉमिनीला मिळते. यावरून आठवले- बर्‍याच कंपन्या अ‍ॅन्युईटी प्रॉडक्ट विकतात. असे प्लॅन घेणे तितकेसे फायद्याचे नसेल असे वाटते. आताच सहज एच.डी.एफ.सी लाईफच्या साईटवर बघितले तर ६० वर्षे वयाच्या व्यक्तीसाठी दरवर्षी परतावा ८.६% च्या आसपास आहे. याचा अर्थ महिना ५० हजार किंवा वर्षाला ६ लाख हवे असतील तर ७०-७२ लाखच्या आसपास रक्कम भरावी लागेल. कमी वयात असे मासिक/वार्षिक उत्पन्न सुरू केल्यास परतावा कमी असतो म्हणजे वर्षाला ६ लाख हवे असतील तर आणखी पैसे भरावे लागतील. त्या प्रॉडक्टमध्ये आणखी काही प्रकार असतात. उदाहरणार्थ उत्पन्नात दरवर्षी ५% वाढ. असे असल्यास परतावा कमी देतात. अशा अ‍ॅन्युईटी प्रॉडक्टमध्ये सगळ्यात डेंजर प्रकार असतो की समजा अर्जदाराचा मृत्यू झाल्यास आधी भरलेले पैसे गेले . जर आपण भरलेले पैसे आपल्या नॉमिनीला आपल्या पश्चात परत हवे असतील तर ते प्रॉडक्ट पण उपलब्ध आहे पण त्यात परतावा आणखी कमी- ६% च्या आसपास येतो. म्हणजे कोणी असे अ‍ॅन्युईटी प्रॉडक्ट घेतले आणि त्या व्यक्तीचा पाच वर्षात मृत्यू झाला तर त्या प्रॉडक्टचा उपयोग काय? आपल्या हयातीतच ते प्रॉडक्ट परत करायचे असेल तर पहिले काही वर्षे लॉक-ईन असते पण त्यानंतर परत करायचे असेल तर फुटकळ सरेंडर व्हॅल्यू आपल्याला मिळते. तसेच या प्रॉडक्टमध्ये लिक्विडिटी नाही- म्हणजे आपण भरलेले पैसे आपल्याला मधल्या काळात वापरता येत नाहीत. हे सगळे बघितल्यावर अ‍ॅन्युईटी घेण्यापेक्षा बँकेत सरळ फिक्स्ड डिपॉझिट केल्यास ते चांगले पडेल असे वाटते. समजा आपण भरलेले पैसे परत मिळणार नसतील असा प्लॅन एखाद्या ६० वर्षाच्या व्यक्तीने घेतला तर वर म्हटल्याप्रमाणे परतावा ८.६% मिळेल. म्हणजे आपणच भरलेले पैसे परत मिळायला जवळपास १२ वर्षे लागतील. मधल्या काळात आपण भरलेले पैसे आपल्याला वापरता येणार नाहीत.आणि १२ वर्षापूर्वी वर पोचल्यास आधी भरलेले ७० लाख पण गेले. त्यापेक्षा मग ७० लाख असतील तर त्याचे फिक्स्ड डिपॉझिट का करू नये?मुद्दल तरी आपल्याच हातात राहते आणि आपल्या पश्चात ते पैसे कुठे जात नाहीत. पण बरेच लोक हा सगळा विचार करत नाहीत. इन्शुरन्स कंपनीवाले आपली टारगेट पूर्ण करायला गोड गोड बोलतात त्याला ते फसतात. असे लोक फसतात म्हणून बरीच प्रॉडक्ट या कंपन्यांना विकता येतात. नाहीतर अ‍ॅन्युईटी आणि त्यापेक्षा भिकार प्रॉडक्ट म्हणजे एनडाऊमेंट प्लॅन्स कधी आयुष्यात विकले गेले नसते. तर सांगायचा मुद्दा हा की ४०% अ‍ॅन्युईटीमध्येच घ्यायचे या सक्तीमुळे एन.पी.एस या अन्यथा चांगल्या असलेले प्रॉडक्ट तितके आकर्षक राहत नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

समजा आपण भरलेले पैसे परत मिळणार नसतील असा प्लॅन एखाद्या ६० वर्षाच्या व्यक्तीने घेतला तर वर म्हटल्याप्रमाणे परतावा ८.६% मिळेल. म्हणजे आपणच भरलेले पैसे परत मिळायला जवळपास १२ वर्षे लागतील. मधल्या काळात आपण भरलेले पैसे आपल्याला वापरता येणार नाहीत.आणि १२ वर्षापूर्वी वर पोचल्यास आधी भरलेले ७० लाख पण गेले.
जरा लिहिताना गोंधळ झाला. समजा एखाद्याने असे ७० लाख भरले तर तितका परतावा मिळायला जवळपास १२ वर्षे थांबावे लागेल. मधल्या काळात महागाई वाढलेलीच असेल म्हणजे १२ वर्षानंतर दरवर्षी मिळणार्‍या ६ लाखाची किंमत आणखी कमी झाली असेल ही गोष्ट वेगळीच. एकदा ७० लाख भरले की गेले. ते आपल्याला गरज असल्यास किंवा आपल्या पश्चात आपल्या नॉमिनीलाही मिळणार नाहीत. काय उपयोग अशा प्रॉडक्टचा?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

चंद्रसूर्यकुमार साहेब, योग्य मुद्दा आहे.. मी याआधीही लिहिल्याप्रमाणे , मुळात insurance is not an investment .. its an instrument to cover your liabilities त्यामुळे जर पुरेसे assets असतील तर इन्शुरन्सची गरज नाही

In reply to by चंद्रसूर्यकुमार

अ‍ॅन्युईटी परत पण करता येते का? माझ्या माहितीप्रमाणे अ‍ॅन्युईटी करार एकदा केला की केला. अ‍ॅन्युईटी कमी परतव्याच्या बाबतीत 'डेंजर' आहे हे खरे. मी स्वतहा सुद्धा याच कारणामूळे काही वर्शे एन.पी.एस सुरू केले नव्हते. पण एक चान्गली गोश्त म्हणजे दीर्घजीवन काळजी (Longevity risk) कमी होते. ज्यान्ना गुन्तवणुकीतील फारसे काही कळत नाही किन्वा काही कारणाने करता येणे शक्य नाही अश्यान्साठी वाईट नाही. एक कमीत कमी उत्पन्न सुरू राहते. तसेच default risk आणि reinvestment risk आपल्यावर न येता इन्शुरन्स कम्पनीला बघावी लागते. एन.पी.एस मध्ये मार्केट लिन्कड वेरिएबल अ‍ॅन्युईटी सुरु करायचा विचार आहे असे वाचले होते. अजून नाहिती बाहेर आलेली नाही. कोणाला महीती असल्यास सान्गवी.

In reply to by अनामिक सदस्य

अ‍ॅन्युईटी परत पण करता येते का? माझ्या माहितीप्रमाणे अ‍ॅन्युईटी करार एकदा केला की केला.
दोनेक वर्षांपूर्वी एच.डी.एफ.सी लाईफचा एक मनुष्य ते प्रॉडक्ट माझ्या गळ्यात मारायला म्हणून आला होता तेव्हा अ‍ॅन्युईटी प्रॉडक्टला 'गॅरंटीड सरेंडर व्हॅल्यू' आहे असे सांगितले होते. कदाचित काही प्लॅनना तो ऑप्शन ठेवला असावा. आणि तो ऑप्शन आहे म्हणून परतावा कमी करायचे कारणच त्यांना झाले.

In reply to by अनामिक सदस्य

माझ्या माहिती प्रमाणे राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेत ४० % एन्यूईटी घेतल्यावर आपला मृत्यू झाल्यास निवृत्तिवेतन आपल्या जोडीदारास तहहयात (नवऱ्याला किंवा बायकोला) मिळते. आणि आपण मूळ रकमेच्या परताव्याची नोंद असेल तर आपल्या वारसाला पूर्ण रक्कम परत मिळते.. जर एन्यूईटी घेणारी कंपनी सर्व पैसे खाणार असेल तर या योजनेत कुणीच काहीही गुंतवणार नाही

In reply to by सुबोध खरे

माझ्या माहिती प्रमाणे राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेत ४० % एन्यूईटी घेतल्यावर आपला मृत्यू झाल्यास निवृत्तिवेतन आपल्या जोडीदारास तहहयात (नवऱ्याला किंवा बायकोला) मिळते. आणि आपण मूळ रकमेच्या परताव्याची नोंद असेल तर आपल्या वारसाला पूर्ण रक्कम परत मिळते..
हो. एन.पी.एस च्या ४०% कॉर्पसवर अ‍ॅन्युईटी घेतली तर वारसांना पैसे मिळतात. त्याव्यतिरिक्त साधे अ‍ॅन्युईटी प्लॅन्स पण आहेत (एन.पी.एस शी निगडीत नसलेले). त्यात without return of purchase price असे प्लॅन्स आहेत. उदाहरणार्थ आय.सी.आय.सी.आय प्रुडेन्शिअलचे अ‍ॅन्युईटी प्लॅन्समध्ये ८ ऑप्शन्स आहेत. त्यात without return of purchase price असे ऑप्शन असलेले प्लॅन्सही आहेत. https://www.iciciprulife.com/content/dam/icicipru/brochures/ICICI_Pru_Guaranteed_Pension_Plan.pdf अशा प्लॅनचा परतावा जास्त असतो. जर मृत्यूनंतर वारसाला पैसे परत मिळावे असा ऑप्शन असेल तर परतावा कमी असतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

करबचती पुरती रक्कम टियर १ मधे गुन्तवा. बाकी रक्कम असल्यास टियर २ मधे. करबचत नाही पण अ‍ॅन्युईटी नाही, ६० वर्शापर्यन्त लोकीन नाही, आणि १००% रक्कम इक्विटी मधे गुन्तवू शकता.

भविष्याची तरतूद आणि वर्तमानातील हौस / मौज यांचा योग्य समतोल साधता आला तर मग ... लाईफ गार्डन गार्डन हो जाता है

नवीन नोकरीस लागता तेव्हा वय आणि पगार दोन्ही कमी असते. तुमच्यावर कोणी पैश्यान्साठी अवलम्बून असण्याची शक्यता पण कमी असते. तसेच लग्न आणि मूलबाळ यान्चे प्लानिन्ग नक्की असेल असेही नाही. तेव्हा लगेच घाई न करता १,२ वर्शात घेतला तरी हरकत नसावी. प्रिमियम वयानुसार वाधत असला तरी तरूणपणी फार वेगाने वाधत नाही. २२ च्या ऐवजी २४ किन्वा २५ वयात घेतला तरी. तेच जर ३० च्या ऐवजी ३२ किन्वा ३३ वयात घेतला तर जास्त वेगाने वाधतो.

In reply to by अनामिक सदस्य

प्रिमियम वयानुसार वाधत असला तरी तरूणपणी फार वेगाने वाधत नाही. २२ च्या ऐवजी २४ किन्वा २५ वयात घेतला तरी. तेच जर ३० च्या ऐवजी ३२ किन्वा ३३ वयात घेतला तर जास्त वेगाने वाधतो.
+१. आणखी एक मुद्दा हा की टर्म प्लॅन ३० पेक्षा जास्त वर्षांचा नसतो. वयाच्या पंचविशीत असताना टर्म प्लॅन घेतला तर तो ५५ व्या वर्षी संपणार. पूर्वीच्या काळी माणूस ६० वर्षाचा झाला तरी तो खूप म्हातारा झाला असे म्हटले जायचे. पण आता ६० हे तितके मोठे वय मानले जात नाही. ७५ च्या आसपास आयुर्मर्यादा आहे. तसे असेल तर ५५ व्या वर्षी टर्म प्लॅन संपून उपयोग नाही. ३० वर्षे उगीचच पैसे भरत राहावे लागतील. अर्थात तरूण वयात टर्म प्लॅन घेऊ नये असे नाही. सगळे ७५ पर्यंत राहतातच असे नाही. कोणाचेही कधीही काहीही होऊ शकते. पण अजून काही वर्षांनंतर दुसरा टर्म प्लॅन पण घ्यावा लागेल ही शक्यता पण आहे.

In reply to by अनामिक सदस्य

काही वर्शानपासून उपलब्ध आहेत.
हे माहित नव्हते. मी माझा टर्म प्लॅन घेतला त्याला १० वर्षे झाली. तेव्हा ३० वर्षांचेच टर्म प्लॅन उपलब्ध होते. आता ४० वर्षांचेही दिसत आहेत.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

काही तरी गल्लत झाली आहे. माझ्या २७ वर्षाच्या मुलासाठी मी टर्म प्लॅन पाहत होतो तो ९९ वर्षापर्यंत उपलब्ध आहे. अर्थात त्याच्या साठी हप्ता काहीच्या काही जास्त आहे

In reply to by सुबोध खरे

माझ्या २७ वर्षाच्या मुलासाठी मी टर्म प्लॅन पाहत होतो तो ९९ वर्षापर्यंत उपलब्ध आहे.
ही नवी- गेल्या काही वर्षातील घडामोड दिसत आहे. आताच बजाज अलाएंझच्या साईटवर ९९ व्या वर्षापर्यंत कव्हरेज देणारा प्लॅन बघितला. मी १० वर्षांपूर्वी टर्म प्लॅन घेतला होता तेव्हा तरी जास्तीत जास्त ३० वर्षांचा प्लॅन होता. ९९ व्या वर्षीपर्यंत कव्हरेज देणारा प्लॅन असेल तर मग त्याचा हप्ता दणकून असेल कारण ९९ व्या वर्षीपर्यंत कव्हरेज म्हणजे जवळपास सगळ्यांना कव्हरचे पैसे द्यावेच लागतील. मागे टाटा ए.आय.ए चा असा ९९ वर्षापर्यंत कव्हरेज देणारा प्लॅन होता. पण तो 'प्युअर टर्म प्लॅन' नव्हता तर दरवर्षी काही पैसे त्यातून येणार्‍यातले होते. त्याचा हप्ता पण बराच जास्त होता. मी घेतलेल्या टर्म प्लॅनमध्ये समजा विम्याची जी काही टर्म आहे तितकी वर्षे माणूस जिवंत राहिला तर कंपनी एक छदामही देत नाही. (तर काही प्लॅनमध्ये थोडा जास्त प्रिमिअम घेऊन माणूस प्लॅन संपेपर्यंत जिवंत राहिल्यास भरलेला प्रिमिअम परत देतात). मी वयाच्या तिशीत असताना ३० वर्षांसाठी घेतलेला असा एक प्लॅन आहे. कव्हरेज १ कोटीचे. त्याचा प्रिमिअम महिन्याला दीड हजारहून थोडा कमी येतो. म्हणजे तो प्लॅन जवळपास फुकट आहे. समजा मी तो प्लॅन सुरू केल्यापासून ३० वर्षे जिवंत राहिलो तर मला एक छदामही मिळणार नाही.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

टर्म प्लॅन चा अर्थच तो आहे. या वर्षी आपण मेला नाहीत तर या वर्षाचे पैसे फुकट गेले. त्यामुळे त्याचा हप्ता सर्वात कमी असतो. म्हणूनच तो केवळ कुटुंबासाठी "रिस्क कव्हर" म्हणून वापरायचा. याशिवाय आपला विमा आहे त्यामुळे आपल्यानंतर आपले कुटुंब उघड्यावर पडणार नाही या मानसिक समाधानाची किंमत किती? हे ज्याचे त्याने ठरवायचे. मी स्वतः साठी ५० लाखाचा एक विमा ६५ वर्षापर्यंत आणि दुसरा ५० लाखाचा ७० वर्षापर्यंत घेतला आहे. ६५ वर्षापर्यंत माझी मुलांच्या बाबत आर्थिक जबाबदारी संपलेली असेल आणि ७० व्य वर्षापर्यंत बायको बाबत. आणि मला जर वाटले आता विम्याची गरज नाही तर त्या वर्षांपासून हप्ता भरणे बंद.

In reply to by सुबोध खरे

मी स्वतः साठी ५० लाखाचा एक विमा ६५ वर्षापर्यंत आणि दुसरा ५० लाखाचा ७० वर्षापर्यंत घेतला आहे
आणि मला जर वाटले आता विम्याची गरज नाही तर त्या वर्षांपासून हप्ता भरणे बंद.
हे अधिक स्पष्ट केल्यास फार आभारी राहीन. दर वर्षी ठराविक रक्कम भरायची आणि ते वर्ष कवर होईल (त्या वर्षात मृत्यू झाल्यास ५० लाख मिळणे) वर्ष संपले की प्रीमियम स्वाहा. पुढील वर्षी पुन्हा एक वर्षाचा फिक्स प्रीमियम. असे सत्तराव्या वर्षापर्यंत भरणे. असे असते का? की एकरकमी?

In reply to by गवि

दर वर्षी ठराविक रक्कम भरायची आणि ते वर्ष कवर होईल (त्या वर्षात मृत्यू झाल्यास ५० लाख मिळणे) वर्ष संपले की प्रीमियम स्वाहा. पुढील वर्षी पुन्हा एक वर्षाचा फिक्स प्रीमियम. बरोबर ६५ वर्षापर्यंतच्या ५० लाखाच्या विम्यासाठी मी वर्षाला १५ हजार रुपये भरतो. वर्षाअखेरीस १५ हजार रुपये गेले ( अर्थात त्यात ४५०० रुपये आयकरातून सूट आहे). त्यामुळे १० ५०० रुपयात ५० लाखाची मानसिक सुरक्षितता मिळते आणि हेच १७ हजार रुपये हप्ता ७० वर्षापर्यंतच्या विम्यासाठी आहे. ( म्हणजेच १२ हजार रुपये कर वजावट धरून) साधारण २ हजार रुपये महिना भरून मी १ कोटी रुपयांची आर्थिक (आणि मानसिक) सुरक्षितता विकत घेतो.

विमा आणि गुंतवणूक या दोन भिन्न बाबी आहेत. दोन्हींची सरमिसळ करणे योग्य नाही.
  • जीवनविमा - कमावत्या व्यक्ती
  • आरोग्यविमा - कुटुंबातील सर्वजण
  • गृहविमा - किमान स्वतःच्या राहत्या घरासाठी
  • वाहनविमा - पूर्ण विमा, स्वतःच्या सर्व वाहनांसाठी
हे विमे कमावत्या व्यक्तीने घ्यायलाच हवेत. जीवनविमा हा आपल्या सध्याच्या उत्पन्नाच्या १५-२० पट रक्कमेचा घ्यायला हवा. उत्पन्न जसजसे वाढत जाते तसतसा ही रक्कम वाढवत न्यायला हवी. हा विमा केवळ term insurance plan याच स्वरूपातच घ्यायला हवा. "विम्याच्या मुदतीत मृत्यू झाल्यास ठरलेली रक्कम वारसांना मिळणे, मृत्यू न झाल्यास काहीही न मिळणे" हा प्रकार सर्वोत्तम आहे. कमावत्या नसलेल्या व्यक्तीने जीवनविमा काढून फारसा उपयोग नाही. --- गुंतवणुकीबद्धलची माझी मते मी याआधी इतरत्र व्यक्त केलेली आहेत.

In reply to by वामन देशमुख

गृहविमा - किमान स्वतःच्या राहत्या घरासाठी संन दिकेत रहा त असाल तर स्वतःचं संनदिकेच्या अंतरंगात असेलंया गोष्टींचा ( होम कन्टेन्ट ) आणि सोसायटी चा अख्या इमारती ( बिल्डिंग ) चा विमा असे दोन प्रकार इकडे असतात , तसेच भारतात असते का? बिल्डिंग मध्ये सोयटीचे म्हणून जे कॉमन असते बाग असेल पूल असेल आणि एकूण इमारत याचे संरक्षण असते होम कन्टेन्ट मध्ये घरातील वस्तू ती वि पासून पडदे यात अपघातून बिघाड झाला तर संरक्षण ) स्वतंत्र घर असले ( जमीन पासून आकाश इमारती शकत , सोसायटी वैगरे काही नाही ) तरीही "होम कन्टेन्ट " आणि " बिल्डिंग " असे दोन विमे इकडे असतात तसेच भारतात असते का?

In reply to by चौकस२१२

मी माझ्या घरासाठी ३ कोटी रुपयांचा २० वर्षासाठी गृह विमा घेतला आहे. यासाठी एकदाच( सिन्गल प्रीमियम) ९७ हजार रुपये भरले. यात भूकंप, पूर, आग आणि नैसर्गिक आपत्ती यासाठी विम्याचे संरक्षण आहे. दहशतवादी कारवाई यात अंतर्भूत नाही ( त्याचा हप्ता दुप्पट होतो). यात दर वर्षी विमा रकमेत १०% वाढ अंतर्भूत आहे. मी २० व्य मजल्यावर राहत असल्याने पूराचा धोका तसा नाही पण आग आणि भूकंप यापासून संरक्षण महत्त्वाचे आहे. घरातील वस्तूंचे संरक्षण मी घेतलेले नाही कारण सर्व वस्तू मिळून दोन तीन लाख पेक्षा जास्त होणार नाहीत आणि त्यासाठी हप्ता फारच जास्त होत होता. मुंबई सारख्या शहरात दहशतवादी कृत्यामुळे इमारत कोसळली तर अख्ख्या भारतात काय स्थिती असेल

In reply to by सुबोध खरे

२० व्य मजल्यावर म्हणजे फ्लॅट, पण मग डॉक्टर अख्या इमारतीचा आणि सोसीअटी ची जी सार्वजनिक जागा किंवा काय असेल त्याचा विमा नसतो का? समजा आग लागून बहुतेक इमारत राहण्या योग्यतेची राहिली नाही तर ? किंवा सार्वजनिक जागेत झाडाचं मुलांमुळे किंवा भूमिगत नाळ फुटल्याने काही गडबड झाली तर ? किंवा लिफ्ट वॉरंटी च्या नंतर एकदम अपघाताने मोडली तर

In reply to by चौकस२१२

सोसायटीचा विमा सोसायटी घेते पण तो असा २० वर्षाचा नसतो. दर वर्षी नूतनीकरण करावे लागते लिफ्ट च्या वार्षिक देखभालीचे कंत्राट ओटीस या लिफ्ट बनवणाऱ्या कंपनीस दिलेले आहे त्यात काहीही झाले तरी ती दुरुस्त करणे हि कंपनीची जबाबदारी असते. अगदी अपरात्री सुद्धा हि माणसे तासाभरात येतात. आमच्या इमारतीत २ लिफ़्ट आहेत त्यामुळे गेल्या एक वर्षात सहसा लिफ्ट उपलब्ध नाही असे झालेले नाही. (एकदाच मी २० मजले चढून गेलो) कारण तेंव्हा जनरेटर कार्यान्वित झालेला नव्हता आमच्या इमारतीत १६० KVA शक्तीचा डिझेल जनरेटर आहे जो वीज गेल्यास ४ सेकंदात लिफ्टला पूर्ण शक्ती देऊ शकतो. नळ फुटण्याचा माझ्या फ्लॅट शी थेट संबंध नाही. आग लागून बहुतेक इमारत राहण्या योग्यतेची राहिली नाही तर ? मला विमा कंपनीकडून ३ कोटी रुपये (अधिक दर वर्षी १० % वाढीव दराप्रमाणे) परतावा मिळेल. (आगीतून वाचलो तर मला नाही तर माझ्या वारसांना) म्हणजेच मी त्या पैशातून दुसरीकडे एखादा फ्लॅट घेऊ शकेन

In reply to by सुबोध खरे

इथली पद्धत सांगतो म्हणजे माझ्य प्रश्न विचारण्यामागचे कारण उलगडेल ( भारतात वास्तू घेण्यासाठी माहिती काढतोय पण हे विमा प्रकरण काही कोणी धड सांगू शकत नाहीये म्हणून ) धरून चालूयात कि रो हाऊसेस ची सोसायटी आहे ( इथे त्याला बॉडी कोर्पोरेट म्हणतात ) स्विमिंग पूल बाग आणि मधले छोटे रस्ते आहेत भारताप्रमाणेच कार्यकारणी असते , ऍडमिन फंड आणि सिंकिंग फंड असतो .. पण विमा असा काम करतो - प्रत्येक रोव हौसे किंवा फ्लॅट धारकाने त्याचं स्वताच्या वस्तू चा होम कन्टेन्ट विमा घाव्या किंवा नाही त्याची मर्जी पण - बॉडी कोर्पोरेट दरवषी विमा घेते त्यात सार्वजनिक गोष्टी धरलया जातात पण प्रत्येक घराची जी "बिडलिंग" म्हणजे घरातील नळ फुटणे पासून ते काही स्ट्रक्चरल डॅमेज असेल तर ते त्यात समाविष्ट असते ( कारण शेवटी या विम्याचा हप्ता आपण दिलेलंय ऍडमिन फ डातूनच भरलं जातो ) म्हणजे आगी मुलळे जर सगळी सोयायटी जळाली तर बॉडी कॉर्पोरेट चा बिल्डिंग इन्शुरन्स कमी येतो म्हणजे जर झाडांच्या मुळा मुळे सार्वजनिक स्विमिंग पूल चे आणि त्याला लागून असलेल्या १-२ रो हाऊसेस चे जर नुकसान झाले झाले आणि त्या मालकांचा स्वतःचा "कन्टेन्ट इन्शुरन्स" असो किंवा नसो बॉडी कॉर्पोराइट च्या बिल्डिंग इंशुरंच मध्ये संरक्षण मिळते

माझ्या कडे ऑलरेडी एक असाच १२०० रुपये महिना वाळा विमा असल्याने मी टर्मक प्लान घेतला नाहिये.

माझ वय ३१ आहे, कुणी मला स्वस्त टर्म प्लँन सांगेल का? नेटवर बरेच प्लान आहेत, माहिती भरली तर फ़ोन येणे सुरू होते, एजंट ला सांगावे तर ते घेच म्हणून मागे लागतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तुम्हाला पत्नी-मूल-बाळ आहे का? तुमच्या माघारी जर कुणी तुमच्यावर अवलंबून असेल तर (६० - ३१) = २९ वर्षांचा टर्म प्लॅन घ्या. कोणताही घेतला तरी चालेल. माझ्या मते एकदम पहिल्यांदा सगळा प्रिमियम भरता आला तर तो बराच स्वस्त पडतो. एजंटकडून घेण्याची काहीही गरज नाही. तुम्हाला थेट कोणत्याही चांगल्या कंपनीच्या वेबसाईटवरुन ई-टर्म प्लॅन घेता येतो. मी आयसीआयसीआय चा घेतला आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो. पत्नी आणी मूल आहे. एकदमच घेतो. वन टाईम. कंपनीनेही आपलक विमा काढलेलानसतो ना? तो कमी रकमेचा असतो पण ऑफड्यूटी काही झाल तर त्यात कव्हर होतो का आपण?? म्हणजे समजा मला १ कोटीचा विमा घ्यायचक असले नी कंपनीने ३० लाखाचा काढला असेल तर मी ७० लाखाचाच घेऊन पैसे वाचवू शकतो का? किंवा कसे?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंपनीनेही आपलक विमा काढलेलानसतो ना? कंपनीनेही आपला विमा काढलेला असतो ना? असे वाचावे.

गुगल वर टर्म प्लान शोधतोय तर सर्व कंपन्या माझा डेटा मागताहेत, एकदा डेटा भरला की उद्या पासून प्रचंड फ़ोन येणे सुरू होईल, मला अननोन नंबर चे फोन कंपनी कामामुळे उचलावे लागतात त्यात ही एजंट लोक फोन करू लागली तर जगणं मुश्किल होईल. कृपया ज्यांनी कुणी संशोधन करुन टर्म प्लान घेतला असेल तर कळवा.