ओंकारनाथ ठाकूरांचं मी जे काही गाणं ऐकलं आहे ते सर्व ध्वनिफितींच्या माध्यमातूनच ऐकलं आहे.
मला त्यांचं गाणं मुळीच आवडलं नाही, मला त्यांच्या गाण्यात काहीही राम दिसला नाही हे माझं व्यक्तिगत मत मी
इथे नोंदवू इच्छितो...
तात्या.
क्षणात मंद्रात तर क्षणात तार सप्तकात चालणारं ओंकारनाथांचं गाणं कळायला जड गेलं, पण नंतर त्यांच्या शैलीमधील थोडे कानेकोपरे कळल्यावर ते पटलं. पण तरीही विनायकराव पटवर्धन, नारायणराव व्यास, कृष्णराव शंकर पंडित वगैरे (जेवढे ऐकले त्यावरून) मला जास्त जवळचे. अर्थात ओंकारनाथांचा आवाज अत्यंत गोड आणि मुलायम होता हे कोणीही मान्य करेल.
मुकुल लेख आवडला. ओंकारनाथांबद्दलची वैयक्तिक माहीती आजवर मला माहीत नव्हती. ती ही तुमच्या लेखाने मिळाली.
त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
संगीत आवडायला लागल्यापासून ज्यांच्या गायनाने माझ्यावर सर्वात पहिली मोहिनी घातली त्यातले एक म्हणजे पंडित ओंकारनाथ ठाकूर हे होत.
त्यांचा धीरगंभीर आवाज,विद्युल्लतेसारख्या चपळ ताना आणि आवाजात असलेली विलक्षण आर्तता(जोगी मत जा....एकदा ऐकून पाहा) ह्याचा इतका विलक्षण पगडा माझ्यावर बसला की आपल्याला असं गाणं यायला हवं असे मनात नेहमी यायचे.
सर्वात आधी पंडित ओंकारनाथ ठाकूर,त्यानंतर भारतरत्न , स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी हे माझे गाण्यातले आदर्श आहेत.
ओंकारनाथांसारखी एक तान जरी गळ्यातून काढता आली तरी मी हा जन्म सार्थकी लागला असे मानेन.
अवांतरः बर्याच वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातर्फे पंडीत ओंकारनाथांचे ध्वनिमुद्रित गाणे ऐकवण्याचा एक कार्यक्रम पंडीत सुहास व्यास ह्यांनी सादर केलेला होता. गाणे ऐकताना अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहात होते. गायन संपल्यावर श्रोत्यांना त्यावर आपले जाहीर मतप्रदर्शन करण्यासाठी थोडा वेळ दिला गेला होता. त्यावेळी संगीताचे एक समीक्षक उठून उभे राहिले आणि त्यांनी "ओंकारनाथ हे मुळी गायकच नव्हेत! नुसती तानांची आतषबाजी करणे म्हणजे गाणं नव्हे !" वगैरे वगैरे अकलेचे तारे त्यांनी तोडलेले होते. त्यांना आपल्या समर्थ शब्दात पंडीत सुहास व्यास ह्यांनी उत्तर दिलेच; पण शेवटी मी माझे मनोगत व्यक्त करताना जे बोललो ते सांगतो.
मी म्हणालो, " असे स्वर्गीय गाणे ऐकवल्याबद्दल संयोजकांचे मी हार्दिक आभार मानतो. गाण्यातलं काहीही न कळणारा मी एक श्रोता आहे.इथल्या विद्वतजनांच्यात काही अधिकारवाणीने बोलण्याइतपत संगीताचे ज्ञान मला नाही. सामान्य श्रोत्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी इथे मतप्रदर्शन करायला उभा आहे. पुलंच्या रावसाहेबासारख्या, ज्याला राग कळत नाहीत पण एखाद्या रागाचा काष्टा सुटल्याचे किंवा रागिणीचा पदर ढळल्याचे चटकन कळते, अशा माझ्यासारख्या सामान्य श्रोत्याला जो गायक सतत तीन तास आपली तहान भूक विसरायला लावतो त्याच्या गाण्याबद्दल अधिक काही सांगावे असे मला वाटत नाही. जाता जाता त्या समीक्षकांना पुलंच्या भाषेत एकच सांगतो की 'ओंकारनाथांसारखी एक तान घेऊन दाखवा,मुळव्याध होते की नाही ते पाहा.'
नुसती तानांची आतषबाजी करणे म्हणजे गाणं नव्हे !" वगैरे वगैरे अकलेचे तारे त्यांनी तोडलेले होते.
"नुसती तानांची आतषबाजी करणे म्हणजे गाणं नव्हे !" ही गोष्ट खरीच आहे. यात अकलेचे तारे तोडण्याचा प्रश्नच येत नाही!
त्यांना आपल्या समर्थ शब्दात पंडीत सुहास व्यास ह्यांनी उत्तर दिलेच;
सबंध हयातभर बापूरावांची भ्रष्ट नक्कल करणारा सुहास व्यास "पंडित" केव्हा झाला? :)
जाता जाता त्या समीक्षकांना पुलंच्या भाषेत एकच सांगतो की 'ओंकारनाथांसारखी एक तान घेऊन दाखवा,मुळव्याध होते की नाही ते पाहा.
प्रमोदकाका, "गाण्यातलं काहीही न कळणारा मी एक श्रोता आहे.इथल्या विद्वतजनांच्यात काही अधिकारवाणीने बोलण्याइतपत संगीताचे ज्ञान मला नाही."
असं तुम्हीच म्हटलेलं आहे,
अर्थात, गाण्यात काहीही कळत नसलं तरी प्रत्येकाची आवडनिवड असते आणि त्यानुसार एखाद्याचं गाणं आपल्याला आवडू शकतं! आणि त्याबाबत कुणाचीच हरकत असण्याचं काही कारण नाही.
"गाणं कळत नाही, परंतु आवडतं..!" वाल्या मंडळींचा काहीच प्रश्न नाही,
परंतु,
"गाणं कळतं व म्हणून ते आवडत नाही किंवा आवडतं..!" वाल्या मंडळींना,
"ओंकारनाथांच्या रागदारीत आपल्याला नक्की काय कंटेन्ट दिसला हे कळेल का?"
असा प्रश्न विचारयला मला निश्चितच आवडले असते! :)
आपला,
(बडेगुलाम, अमिरखा, केसरबाई, बापूराव, गजाननबुवा, भीमण्णा, किशोरी इत्यादी दिग्गजांचं गाणं ऐकून समृद्ध झालेला!) तात्या.
तात्या,अरे नेमकं काही सांगता येत नाही हीच तर खरी गोची आहे माझ्यासारख्यांची. पण ते गाणं नक्कीच प्रभावशाली आहे ह्याबाबत माझ्या मनात अजिबात संदेह नाही.
मीही बडेगुलाम, अमिरखा, केसरबाई, बापूराव, गजाननबुवा, भीमण्णा, किशोरी इत्यादी दिग्गजांचं गाणं ऐकून समृद्ध झालोय.
ही सर्व मंडळी वंदनीय आहेतच म्हणून ओंकारनाथ हिणकस ठरत नाहीत. कोण मोठा आणि कोण लहान ह्या वादात मी पडत नाही. पण ओंकारनाथांचे गाणे हे मुळी गाणेच नाही अशा म्हणणार्यांची मात्र मला कींव करावीशी वाटते.
प्रत्येकाच्या गाण्याचा बाज वेगळा आहे आणि त्यांचे वेगळेपण हेच वैशिष्ठ्य आहे असे मला वाटते.
ह्या आणि अशा इतर थोर कलाकारांच्या गायनाचा माझ्यावर नक्कीच प्रभाव पडलाय. पण तरीही पंडीत ओंकारनाथ आणि पंडीत भीमसेन हे माझे खास जिव्हाळ्याचे विषय आहेत.
ओंकारनाथ आवडत नाहीत असे म्हणणारे जसे मी पाहीलेत तसेच भीमसेन आवडत नाहीत असे म्हणणारेही मी पाहीलेत. पण मला ते दोघेही आवडतात त्यात सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे त्या दोघांचा घनगंभीर आवाज आणि तानबाजी,आवाजातील आर्तता हे गुण.
निलाम्बरी या रागाबद्दल कोणाला माहिती आहे का?
हा मालकंसाच्या अंगाने जाणारा राग होता म्हणे? एवधेच ऐकले आहे. बाकी महित नाही
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
आपल्या सगळ्यांचे विचार ऐकले/वाचले.... पहिल्याप्रथम सगळ्यांचे मनापासुन आभार...
मला वाटतं की ज्या माणसाला पं. पलुस्करांसारख्या गुरुचं प्रेम व तालीम मिळाली तो माणुस कोणी ऐरा गैरा नसावा. राहता राहीली एखाद्याचं गाणं आवडणं वा न आवडणं ची गोष्ट हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
पण एक गोष्ट मी नक्की नमुद करु इच्छितो..."आपल्या ह्या अभिजात संगीतामधे एक कलाकार दुसर्या कलाकाराला कधीच कमी लेखत नाही, कारण प्रत्येकाची आपली आपली एक परंपरा आहे व गायकी आहे. सगळ्यांच एकच मत आहे की ह्या संगीताने प्रेम निर्माण होतं, घृणा नाही." मला वाटत की हीच खरी गोष्ट आहे की ज्यामुळे इतकी सारी विविधता असुन सवाई ला सगळे एकत्र आलेले दिसतात नाहीतर सवाई फक्त कोणा एकाच घराणे गायकीचा गायन समारंभ ठरला असता...
परत एकदा सगळ्यांचे मनापासुन आभार..
धन्यवाद..
आपला..
मुकुल
ओंकारनाथांच्या गाण्यातल्या कंटेट विषयी कुणीच काही बोलताना दिसत नाही..! :)
मुकुलरव म्हणतात,
मला वाटत की हीच खरी गोष्ट आहे की ज्यामुळे इतकी सारी विविधता असुन सवाई ला सगळे एकत्र आलेले दिसतात नाहीतर सवाई फक्त कोणा एकाच घराणे गायकीचा गायन समारंभ ठरला असता...
ही गोष्ट मलाही ठाऊक आहे आणि मी विविध घराण्यातल्या विविध कलाकारांच्या कलेचा आनंद घेतला आहे, त्यांच्यावर वेळोवेळी लिहिले देखील आहे...!
परंतु कुठलंही गाणं, कुणाचंही गाणं म्हटलं की मुख्य प्रश्न असतो तो त्या गाण्यातल्या कंटेन्टचा! अभिजात संगीताच्या दुनियेत गायकाचा आवाज हा दुय्यम मानला जातो, अधिक महत्व असतं ते कंटेटला! त्यातून आवाजही फार उत्तम असेल तर दुधात साखर! परंतु ख्यालगायकीमध्ये कंटेन्टला अधिक महत्व आहे असं मी अण्णांकडून शिकलो, अनेकांकडून शिकलो.
आमचे जगन्नाथबुवा म्हणायचे की गाण्यात "मजकूर" हवा!
या सगळ्या पार्श्वभूमीवर मला ओंकारनाथांच्या गाण्यात, त्यांच्या ख्यालगायकीत काहीही कंटेट दिसला नाही! बोलूनचालून मी तर एक सामान्य अभ्यासक आणि श्रोता, परंतु आग्रा घराण्याचे दिग्गज उस्ताद फैय्याजखासाहेबही ओंकारनाथांचं गाणं ऐकून एकदा खाजगीत म्हणाले होते,
"ये कौनसा गाना चल रहा है? ना रंग, ना ढंग, ना अंग!"
हे माझ मत नाही, उस्ताद फैयाजखासाहेबंचं आहे! फैयाजखासाहेबांच्या कॉमेन्टवर विचार करता मलाही त्यांच्या गाण्यात ख्यालगायकीच्या दृष्टीने, कंटेन्टच्या - मजकुराच्या दृष्टीने आवर्जून ऐकावं, दाद द्यावी असं काहीही सापडलं नाही! इतर कुणाला सापडलं असल्यास चांगलंच आहे! :)
असो... प्रतेकाची मतं, प्रत्येकाच्या आवडीनिवडी! :)
तात्या.
परंतु आग्रा घराण्याचे दिग्गज उस्ताद फैय्याजखासाहेबही ओंकारनाथांचं गाणं ऐकून एकदा खाजगीत म्हणाले होते,
"ये कौनसा गाना चल रहा है? ना रंग, ना ढंग, ना अंग!"
फैयाजखाँ जर असे म्हणाले असतील तर तो नक्कीच अहंकाराचा भाग असावा. कारण त्याकाळात यच्चयावत मुसलमान गायक हिंदु गायकांपैकी केवळ एक म्हणजे भास्करबुवांनाच गायक मानायचे. बाकी बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर,त्यांचे शिष्य पंडीत विष्णु दिगंबर पलुस्कर, रामकृष्णबुवा वझे अशा दिग्गजांनाही ते गायक मानत नसत. तेव्हा फैयाजखाँ हे जरी मोठे गवई असले तरी त्यांच्या त्या मताला मी फारशी किंमत देत नाही. कारण शेवटी ही मंडळी आत्मकेंद्री आणि अहंकारी असतात असा सर्वसाधारण अनुभव आहे.
खाजगीत ह्याच फैयाजखाँना काही नामवंत गायक 'रेकणारा रेडा' असे म्हटल्याचे मी ऐकलेय. खाजगी मते आणि जाहीर मते ह्याबद्दल पुलंच्या पुणेकर,नागपुरकर आणि मुंबईकर ह्या लेखातील त्यांची टिप्पणी ऐकावी म्हणजे मग माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल.
ओंकारनाथ जर गायक नसतील किंवा जर त्यांच्या गाण्यात काही 'कंटेंट' नसेल तर मग विष्णु दिगंबरांनी त्यांना आपले शिष्योत्तम का म्हणावे? कुणा एखाद्याच्या म्हणण्याप्रमाणे जर ह्या शिष्योत्तमाच्या गाण्यात कंटेंट नसेल तर मग गुरुंचे गाणेही तसेच असले पाहिजे असा निष्कर्ष निघतो.
असो. शेवटी काय ज्याची त्याची आवड आहे हेच खरे. पण अशा तर्हेची सरसकट जाहीर विधाने टाळली गेली तर बरे कारण ह्यामुळे नवोदितांची दृष्टी उगीचच पूर्वग्रहदूषित होऊ नये हीच इच्छा!
कुणा एखाद्याच्या म्हणण्याप्रमाणे जर ह्या शिष्योत्तमाच्या गाण्यात कंटेंट नसेल तर मग गुरुंचे गाणेही तसेच असले पाहिजे असा निष्कर्ष निघतो.
असहमत आहे... आणि मी म्हणेन की एक वेळ आमच्या फैयाजखासाहेबांचं किंवा इतरांची मतं सोडा, परंतु ओंकारनाथांच्या गायकीत नक्की काय कंटेन्ट होता हे तुम्ही तरी सांगू शकाल?? नुसता आवाज आणि तानबाजी हे गुणविशेष असले म्हणजे झालं का? घराण्याच्या अंगाने, बंदिशीच्या अंगाने केल्या जाणार्या रागविस्ताराचं काय? विष्णू दिगंबरांच्या ग्वाल्हेर परंपरेतलं अष्टांगप्रधान गाणं ओंकारनाथ कितीसं गात होते हे सांगू शकाल??
आपण मिराशीबुवांचं, विनायकबुवांचं गाणं ऐकलं आहे? अंतुबुवांचं गाण ऐकलं आहे? या विष्णू दिगंबरांच्याच शिष्य परिवाराच्या अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अष्टांगप्रधान ग्वाल्हेर गायकीचे कितीसे गुण आपल्याला ओंकारनाथांच्याही गाण्यात दिसतात हे सांगू शकाल?
आणि प्रमोदकाका, मुळात मला एक सांगा की विष्णू दिगंबरांच्या परंपरेतलं गाणं ओंकारनाथांनी किती पुढे नेलं, किती गायलं? काही सांगता येईल?
आपल्याला व्यक्तिश: ओंकारनाथ आवडतात हे अगदी मान्य, आणि ती आपली आवड कुणीच नाकारू शकत नाही हेही कबूल..
असो,
आपला,
(विष्बू दिगंबरांच्या ग्वाल्हेर परंपरेशी परिचित!) तात्या.
एकंदरीत या मुद्द्यावर आपली सहमती होईल असं वाटत नाही, तेव्हा माझ्याकडून ही चर्चा मी इथेच थांबवतो...
उत्तम, घराणेदार, कसदार गाण्याचे माझे जे काही निकष आहेत त्यात ओंकारनाथ कुठेच बसत नाहीत हेच खरं! इतर कुणाच्या मते बसत असतील तर आनंदच आहे!
तात्या.
अष्टांगप्रधान म्हणजे नक्की काय बुवा? उत्तम, घराणेदार, कसदार गाण्याचे निकष कोण आणि कसे ठरवतात? घराण्याच्या अंगाने आणि बंदिशीच्या अंगाने रागविस्तार न करताही एखाद्या माणसाला एवढी प्रसिद्धी कशी मिळू शकते किंवा एवढ्या मैफिलीतून गाण्याची संधी कशी मिळू शकते?
कंटेंट म्हणजे नक्की काय हे विचारायचं राहूनच गेलं. काहीच कंटेंट नसताना स्टेजवर वर्षानुवर्षे गाण्याची संधी कशी काय मिळते बुवा???
(अनंत अज्ञानी)
रामपुरी
(मला एवढंच माहीत आहे कि मला काहीच माहीत नाही - सॉक्रेटिस )
प्रतिक्रिया
ओंकारनाथ
काहीसा सहमत
ओंकारनाथ हे माझे पहिले आदर्श!
नुसती
नेमकं काही सांगता येत नाही हीच तर गोची आहे.
निलाम्बरी
निलाम्बरी दुवा
थोडासा माझाही विचार...
ओंकारनाथा
हा झाला अहंकाराचा भाग!
कुणा
एकंदरीत या
???
अरे हो!!
भेटा