Skip to main content

पुस्तक परिचय: "ही वाट एकटीची" -- व. पु. काळे

लेखक सुजित जाधव यांनी रविवार, 15/05/2022 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असल्यापासून मासिकांत, वर्तमानपत्रांमध्ये, सामाजिक माध्यमांवर (Social Media) वपुंचे विचार वाचत आलोय. आजकाल व्हाट्सअँप, फेसबुक वर त्यांचे सुविचार (Quotes) नेहमीच फॉरवर्ड होत असतात. त्यांचे विचार जीवनातील तत्वज्ञान शिकवतात, कधीकधी ते कटू सत्य सांगतात. ते वाचकांना प्रेरणा देत असतात. ही वाट एकटीची ही वपु काळे यांची अगदी पहिलीच कादंबरी. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. ff ही वाट एकटीची या कादंबरीची नायिका आहे विद्युलता उर्फ बाबी. बाबी एक स्वातंत्र्य विचारांची तेजस्वी, निर्भीड व करारी मुलगी आहे. ती तत्वनिष्ठ आहे, हट्टी आहे. ती कुणालाही न घाबरता स्वतःचे विचार परखडपणे मांडते. तिचं तिच्या वडिलांच्या कारखान्याचे मालक असलेल्या दाजीसाहेब जोगळेकर यांच्या मुलावर प्रेम जडत. त्याच नाव शेखर. त्या दोघांकडून काही मर्यादा ओलांडल्या जातात आणि बाबी लग्नाआधीच गरोदर राहते. मुलाच्या जन्माआधीच शेखरला काही कामानिमित परदेशात जाव लागत. बाबी त्या मुलाला जन्म द्यायचा धाडसी निर्णय घेते. मध्यमवर्गीय असलेले तिचे वडील समाजाच्या भीतीने तिच्या या निर्णयाला विरोध करतात. घरच्या विरोधानंतर बाबी स्वतःची वेगळी वाट निवडते व स्वतंत्र खोली घेऊन राहू लागते. मुलाला जन्म देते. शेखर परदेशातून आल्यानंतर लग्नाला तयार होतो पण मुलाला स्वीकारण्यास नकार देतो. कारण तो लग्नाआधी झालेला मुलगा असतो आणि त्याला त्या मुलापेक्षा स्वतःची समाजातील प्रतिष्ठा जास्त महत्वाची वाटते. बाबी स्वतःच्या भविष्याचा विचार न करता त्या लग्नाला स्पष्टपणे नकार देते आणि आयुष्यभर एकाकी राहून मुलाला सांभाळण्याचा निर्णय घेते. ती आयुष्यभर प्रामाणिक राहून काटेकुट्यांनी भरलेल्या वाटेवर चालत राहते. या प्रवासात तिला तिच्या विचारांचे आणि सत्याची कास न सोडणारे काही लोक तिला पाठिंबा देतात. या एकाकी प्रवासात तिला समाजाकडून व आप्तस्वकियांकडून खूप त्रास सहन करावा लागतो, टोमणे खावे लागतात. पण निर्भीड व स्वाभिमानी बाबी डगमगत नाही. सगळ्या प्रसंगांना ती धैर्याने सामोरी जाते. तीच व तिच्या मुलाच भविष्य काय? शेवटी या प्रवासात तिला काय गवसत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे वपुंनी त्यांच्या खास लेखनशैलीद्वारे उलगडली आहेत. ती उत्तरे मिळवण्यासाठी आणि वपुंच्या या एका आगळ्यावेगळ्या कथेचा आस्वाद घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचा. ही कादंबरी वाचत असता जीवनाविषयी, समाजाविषयी, आपल्या नात्यातील माणसांविषयी अनेक विचार मनात येतात. ही कथा वाचकाला जीवनाकडे पाहायची एक नवी दृष्टी देते. बाबीचा संघर्ष, निर्भीड स्वभाव, स्पष्ट विचार आपल्याला जीवनातील संकटांशी लढण्याची प्रेरणा देतात. तुम्ही अजूनपर्यंत ही कादंबरी वाचली नसेल तर नक्की वाचा. आणि हा लेख जास्तीत जास्त वाचनप्रेमी पर्यंत पोहचवा. धन्यवाद!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6037
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

परिचय. पूर्वी वाचली होती

शेवट बाबीचा संघर्ष पाहता योग्य असला तरी मला वास्तववादी नाही वाटला. वपुंचे सगळेच साहित्य आवडले.

सुंदर लेख. सुटसुटीत आणि छान परिचय. अ‍ॅब्स्ट्रॅक्ट स्टाईलच्या कव्हरपेजचा मोठा ब्लोअप तितिकाच समर्पक. वपु म्हटलं की काळजाला हात घालणारं इन्टेन्स लेखन. आजच्या तरूणाईला देखील भुरळ घालणारं ! आणि त्यामुळेच त्यांच्या कथांचे जास्तीतजास्त ऑडिओबुक्स युट्युब वर आहेत आणि त्यांना मोठा प्रतिसाद मिळतोय !

In reply to by चौथा कोनाडा

मनपासून धन्यवाद.... युट्यूबवर वपु आणि पुलंचे कथाकथन मी नेहमी ऐकत असतो. वपु आणि पुलंचे कथाकथन प्रत्यक्ष सभागृहात ऐकणारे रसिक प्रेक्षक खरच खूप नशीबवान होते. मला नेहमी त्यांचा हेवा वाटतो.