Skip to main content

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 20/08/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 231146
प्रतिक्रिया 589

प्रतिक्रिया

हेलसिंकी ते मुंबई नवी मालगाडी ( ब्लॉक ट्रेन) 21 जून रोजी ही ट्रेन हेलसिंकी (फिनलंड) येथून सुटली आहे. सध्या ती रशियातून धावत आहे. पुढे ती इराण पर्यंत येईल. मग तिथल्या बंदरातून ट्रेन मधील माल समुद्रमार्गे मुंबईला पोहोचवला जाईल. मस्तच !

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, छान बातमी! अमेरिकेची जाम जाळणार आता. सुवेझला बगल दिली म्हणजे काय ! बलुचिस्थान वेगळा झाला तर बंदर अब्बासवरनं नौकेत माल चढवायची गरज नाही. मालगाडी सरळ भारतात आणता येईल. आ.न., -गा.पै.

सोलापूर स्थानकात २ नव्या stabling lines होणार. प्रवास थांबलेल्या गाड्या यांच्यावर घेतल्या की २ फलाट इतर धावत्या गाड्यांसाठी मोकळे राहतात. https://youtu.be/WSHt6EOLz2k

शौचालयातील मैला प्रक्रियेसाठी आंध्र मधील एका वैज्ञानिकांनी तयार केलेली ही स्वयंचलित यंत्रणा. ही सध्याच्या जैविक विघटन यंत्रणेपेक्षा सातपट स्वस्त आहे. सध्या याचे प्रयोग चालू आहेत

In reply to by हेमंतकुमार

हा नवीन मार्ग हनोईतील येन व्हिएन रेल्वे स्थानक आणि बेल्जियमच्या लीज दरम्यान चालेल. तथापि हा मार्ग चीनच्या झेंगझो मार्गानेच जाणार आहे. ही गाडी रशिया आणि मध्य आशियाई देशांद्वारे बेल्जियमला ​​जाणार्‍या आशिया-युरोप मार्गाला जोडली जाईल. म्हणजे ही बातमी खरी तर चीन आणि व्हियेतनाम दरम्यान रेल्वे धावणार अशी आहे.

In reply to by निनाद

भारत आणि थायलंड दरम्यान रेल्वे व्हावी असा प्रयत्न थायलंड गेली अनेक वर्षे करतो आहे. त्यांना ब्रॉड गेज मार्ग हवा आहे. भारतीय रेल्वे कंत्रटदारांना यात रस का नसावा हे कळत नाही...

In reply to by निनाद

निनाद, भारताचं २०१४ पर्यंतचं परराष्ट्रधोरण हा प्रमुख अडसर होता. ते आता बदलू लागलं आहे. ब्रह्मदेशी आतंकवादी वगैरेही समस्या आहेत. पण रेलवेच्या समृद्धीचं गाजर दाखवून त्या सोडवता याव्यात. आ.न., -गा.पै.

भारत-बांग्लादेश दरम्यान असलेले रेल्वे प्रस्ताव
  • बांग्लादेश - बिरोल-राधिकापूर आणि रोहनपूर-सिंघाबाद रेल्वे-इंटरचेंजेसला विराटनगर-जोगमणिशी रेल्वे जोडली गेली तर बांगलादेशमधून नेपाळपर्यंत रेल्वेने अंतर कमी होण्यास आणि वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होईल.
  • भूतानबरोबर रेल्वे कनेक्टिव्हिटी सुलभ करण्यासाठी नव्याने उद्घाटन झालेल्या चिल्लाहाटी-हल्दीबारी मार्गावरुन भूतानशी रेल्वे संपर्क जोडण्याची मागणी गुवाहाटी आणि चट्टोग्राम आणि मेघालयातील महेंद्रगंज ते पश्चिम बंगालमधील हिलि पर्यंत संपर्क व्यवस्था स्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती भारताने बांगलादेशला केली.
एकुण यामुळे रेल्वेचे जाळे येत्या दहा वर्षात वेगळे दिसेल असे दिसते.

Indian Pacific असे नाव असलेली ऑस्ट्रेल्या च्या पश्चिम किनाऱ्या ( पर्थ ) पासून ते पूर्व किनाऱ्या पर्यंत ( सिडनी) जाणारी हि रेल्वे एकूण 4,352 किलोमीटर ची आहे तयातील "जगातील सर्वात एक रेषेत वळणे ना घेणार " भाग म्हणजे नालरबोर पठारवरून जाणारा ४८७ किलोमीटर एवढया सलग लांबीचा आहे

सर्वांची माहिती रोचक आहे ! ढाका ते लंडन रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण वीस वर्षांपूर्वी झाले होते. त्यानंतरच्या बातम्या मात्र काही फारशा वाचण्यात आल्या नाहीत.

मुख्य रेल्वे नेटवर्कवर खासगी प्रवासी सेवा चालविण्याची भारतीय रेल्वेची सार्वजनिक-खाजगी भागीदारी पद्धतीनुसार योजना पुढे जाण्यात अडचणी आल्या आहेत. कारण निविदा काढल्यानंतर प्रकल्पात रस दाखविलेल्या लार्सन अँड टुब्रो, जीएमआर, गेटवे रेल, क्यूब हायवे, बीएचईएल, सीएएफ, वेलस्पन आणि पीएनसी इन्फ्रा या कंपन्यांनी भाग घेतला नाही. मेघा या एकाच कंपनीने यात भाग घेतला आहे. त्यामुळे ही भागीदारी बहुदा पुढे जाणार नाही.

हायड्रोजन इंधन वापरून भारतात रेल्वे चालवली जाणे शक्य आहे का? जर कार चालू शकते तर रेल्वे का चालू शकत नाही?

In reply to by हेमंतकुमार

कोराडिया आयलिंट ही अल्स्तॉम ने बनवलेली हायड्रोजन इंधनावर चालविणारी जगातील पहिली प्रवासी रेल्वे आहे. शून्य-उत्सर्जन करणारी कमी आवाजात चालणारी आणि एक्झॉस्टमध्ये फक्त वाफ आणि घनरूप पाणी असलेली. पण ही सध्या कुठे चालते हे माहित नाही. https://www.alstom.com/solutions/rolling-stock/coradia-ilinttm-worlds-1… येथे काही माहिती मिळाली.

In reply to by निनाद

भारतीय रेल्वेने पण हायड्रोजन वर चालणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रस्ताव कंपन्यांकडून मागवले आहेत.

In reply to by हेमंतकुमार

बातमीबद्दल धन्यवाद कुमारेक ! ही प्रशंसनीय कामगिरी वाटते आहे. आ.न., -गा.पै.

पुणे मेट्रोसाठी पहिली गाडी इटलीहून दाखल ok बातमी

In reply to by हेमंतकुमार

गाडी इटलीहून दाखल झाली? अरेरे! भारतात या रेल्वे बनतात. खरे तर चांगल्या दर्ज्याच्या बनतात. त्या ऑस्ट्रेलिया निर्यात पण होतात. मग गाडी इटलीहून कशाला मागवायची? चुकीचा निर्णय आहे आहे कारण इटलीहून येणारे लोखंड खराब असते व लवकर गंजते हे जागतिक ज्ञान आहे.

In reply to by निनाद

तशा एकूण 34 गाड्या तयार करायच्या आहेत. त्यापैकी फक्त पहिल्या तीन इटलीहून येत आहेत. उरलेल्या सर्व 31 भारतात तयार होणार आहेत.

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, बहुतेक पहिल्या ३ गाड्या प्रारूप म्हणून वापरण्यात येणार असाव्यात. एकदा का संरचना आत्मसात झाली की उरलेल्या भारतातच बनवायचं नियोजन दिसतंय. आ.न., -गा.पै.

किसान रेल्वेने शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. किसान रेल्वेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू झाल्यापासून दूध, मांस आणि मासे यासह नाशवंत आणि कृषी उत्पादनांची वाहतूक करणाऱ्या ४००० फेर्‍या केल्या आहेत. देशभरातील ७० पेक्षा जास्त मार्गांवर किसान रेल्वेच्या १०००हून अधिक फेर्‍यांमध्ये नाशवंत शेत उत्पादन वाहतूक केली गेली. किसान रेल्वे सेवेमुळे देशभरातील अनेक शेतकर्‍यांना उत्पन्नात वाढ होऊन, उपजीविकेला चालना मिळण्यास मदत झाली आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळण्यास मदत होते आहे. भारतातली पहिली किसान रेल्वे ही साप्ताहिक सेवा नाशिक जवळील देवळाली स्थानकापासून ते बिहार येथील दानापूर पर्यंत धावली आणि आजही चालू आहे. नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, माणिकपूर, प्रयागराज, पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शन आणि बक्सर येथे थांबते.

In reply to by निनाद

भारी प्रकार दिसतोय हा. पुढे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स वाढली की त्याचाही फायदा होईल याला.

रेल्वे मंत्रालयाने ईएमयू आणि प्रवासी गाड्यांसह सर्व रेल्वे डब्यांमध्ये क्लोज्ड सर्किट टेलिव्हिजन (सीसीटीव्ही) कॅमेरे बसवण्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. रेल्वेच्या अनेक डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे या आधीही देण्यात आले आहेत. पण या निर्णयाने सर्वत्र सीसीटीव्ही सुरक्षा रेल्वे प्रवाशांना दिली जाईल. या शिवाय अजून ८०० स्थानकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत.

निनाद, छान उपक्रम. ........................................ भारतीय रेल्वेमध्ये आता नव्या प्रकारचे डबे आणि वर्ग निर्माण झाल्यामुळे डब्यांच्या नव्या प्रकारासाठी काही नवीन संकेताक्षरे(codes) निर्माण झाली आहेत त्यांची माहिती : V.S. = Vistadome Non AC….. (D.V) 3E = AC Three Tier Economy.. (M) E.A = Anubhuthi Class......(K) F.C First Class….. ( F) E.V. = Vistadome AC…. ( E.V)

ऐतिहासिक वारसास्थळे असलेल्या 4 रेल्वे स्थानकांचा जीर्णोद्धार आता सुरू आहे. ok बातमी

एक्सप्रेस गाड्यांचा वेग ताशी 160 किमी होण्यासाठी विशिष्ट प्रकारची रुळांची यंत्रणा (canted jointless turnout) तयार करायची आहे. त्याचे काम भारतीय रेल्वेच्या काही विभागांमध्ये चालू झालेले आहे

In reply to by हेमंतकुमार

सध्या गतिमान एक्सप्रेस या वेगाने धावते आहे. पण सर्वत्र ही व्यवस्था नाही. १६० किमीचा वेग जमवण्यासाठी सिग्नलिंग सिस्टीम, वळणे यात मोठ्या सुधारणांसह अनेक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. रेल्वे लाईनच्या विद्युतीकरणामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि उपकरणांमध्ये मोठी सुधारणा होते. पायाभूत सुविधांच्या बाजूने, ट्रॅकच्या वर कॅटेनरी लाईन्स तयार करणे आवश्यक असते. राजस्थानात हे कार्य जोरात चालले आहे. पॉवर प्लांटमधून वीज वाहून नेण्यासाठी नवीन ट्रान्समिशन लाईन्सची उभारल्या जात आहेत. व्होल्टेज नुकसान कमी करण्यासाठी प्रत्येक ६४ किमी वर सबस्टेशन बनवले आहेत. तेथिल बहुतेक सर्व डिझेल इंजिने बंद केली जात आहेत. असे विद्युतीकरण पुर्ण नव्या मार्गापेक्षा स्वस्त पडते. असे सुधारणा वाढवत वेग १९० किमी प्रतितासापेक्षा जास्त जाऊ शकतो.

मध्य रेल्वेने २०२०-२१ या वर्षात भंगार विक्रीतून ३९१ कोटी ४३ लाख रुपये कमावले आहेत. १५ वर्षांत भंगार विक्रीतून झालेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कमाई आहे.

हा धागा ५ व्या वर्षात पदार्पण करतो आहे. सर्व रेल्वेप्रेमींना हार्दिक शुभेच्छा !

In reply to by हेमंतकुमार

धागा जिवंत ठेवल्याबद्दल धन्यवाद! :-) -गा.पै.

Platform Tickets चे फायदे, तिकिटाशिवायही करता येतो प्रवास, काय आहेत नियम आणि कायदे? https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/… हे माहीत नव्हते. कुणाला हा अनुभव ?

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, मला याचा अनुभव नाही. पण आमच्या ओळखीच्या एकांचा अनुभव आहे. त्या जोडप्याला अचानक गाडी पकडावी लागली. कोणाचीतरी प्रकृती गंभीर झाल्याने अचानक निघावं लागलं. त्यामुळे तिकीट वगैरे काढायला वेळ मिळाला नाही. गाडी फलाटावर लागली होती. त्यांनी गार्डकडे जाऊन त्याच्याकडून परवानगी घेतली. अपवादात्मक प्रसंगी गार्डकडून विनातिकीट प्रवासाची अनुमती घ्यायची सोय असते. नंतर तिकीट तपासनीसाने रीतसर तिकीट काढून दिलं. दंड वगैरे काही न आकारता यथोचित भाडं घेतलं. माझ्या मते गार्ड त्याच्या गाडीत कोणालाही घेऊ शकतो. अगदी विनातिकीट प्रवासी असला तरी. मात्र तो प्रवाशास तिकीट काढायला भाग पाडू शकतो. आ.न., -गा.पै.

In reply to by हेमंतकुमार

त्या प्रवाशाची कहाणी पटल्याने तिकिट दिले असेल. ------------ करोना नसताना साधे सेकंड क्लासचे तिकिट काढून आम्ही दुपारच्या हैदराबाद एक्सप्रेसच्या स्लिपरमध्ये ( S6 bogie )पुण्याला जाण्यासाठी बसलो होतो. ( ही बोगी मुंबई ते पुणेसाठी अनरिझव ठेवलेली असते. तिकिट तपासनीस तिकिट देतो.) बाकी platform ticket आताही देतात. ( कोणाला सोडायला / घेण्यासाठी विचारल्यावर त्यांनी खरी कहाणी ऐकवल्याने तिकिट मिळाले.) बाकी पुढे तिकिट चेकरची मर्जी.

In reply to by कंजूस

मी असंख्य वेळेस मुंबई पुणे प्रवास महालक्ष्मी एक्सप्रेस च्या S ६ किंवा चेन्नई एक्स्प्रेसच्या S ५ मधून केलेला आहे. जेंव्हा शक्य होते तेंव्हा मी आरक्षण करत असे. अन्यथा दुसऱ्या वर्गाचे तिकीट काढून या डब्यात चढत असे आणि तेथे टी सी कडून वरचे पैसे भरून रीतसर तिकीट घेत असे. हे डबे पुणे कोल्हापूर / पुणे चेन्नई प्रवाशांसाठी राखीव असतात आणि ते मुंबई ते पुणे रिकामे जातात, येथे आपल्याला अगदी आदल्या दिवशी हमखास तिकीट मिळतंच. मी त्या स्लीपर वर झोपून जात असे. आणि पुण्याला चढणारे प्रवासी हा कोण आपल्या बर्थवर झोपला आहे हे टेन्शन घेऊन मला उठवत असत. मला नेहमी हसू येत असे. कारण मी काही बोलण्याच्या अगोदरच ते आपले आरक्षणाचे तिकीट दाखवून जागेवर हक्क प्रस्थापित करण्याच्या मागे असत. छान तीन तास झोप घेऊन रात्री १२ वाजता पुण्याला पोचून मी आपल्या मेस मध्ये जाऊन परत झोपत असे.

In reply to by सुबोध खरे

मी त्या स्लीपर वर झोपून जात असे. आणि पुण्याला चढणारे प्रवासी हा कोण आपल्या बर्थवर झोपला आहे हे टेन्शन घेऊन मला उठवत असत. मला नेहमी हसू येत असे. कारण मी काही बोलण्याच्या अगोदरच ते आपले आरक्षणाचे तिकीट दाखवून जागेवर हक्क प्रस्थापित करण्याच्या मागे असत.
वा… मि अनेकदा पुण्याहुन एस५ अथवा सहाने मुंबै गाठतो. आपल्याकडे तिकिट असेल अन वरुन टिसिला विस रुपये दिले कि विषय मिटला जास्त बोलत बसायचे नाही अन्यथा पावती फाटणार हे नक्कि. तरीही काही मुली मला विचारत माझे रिजर्वेशन आहे का बिंधास्त हो म्हणायचे नाही म्हटले की आमचं आहे तुम्हि दुसरीकडे जा असं हटकुन बोलायच्या… ज्यांच रिजर्वेशन आहे ते तुमच रिजर्वेशन आहे का विचारायच्या फंदात आजिबात पडत नाहीत सरळ आमचा बर्थ आहे सांगुन मोकळे होतात

अपवादात्मक प्रसंगी गार्डकडून विनातिकीट प्रवासाची अनुमती घ्यायची सोय असते.
उपयुक्त माहिती, आभार !

नवीन 3AC इकॉनॉमी वर्गाचे भाडे निराशाजनक. ३०० किमी पर्यंत 3AC पेक्षा काहीच फरक नाही. https://www-railpost-in.cdn.ampproject.org/v/s/www.railpost.in/indian-r… 3AC चे भाडे = स्लीपर X २.६ 3AC इकॉनॉमी = स्लीपर X २.४. किरकोळ सवलत . स्लीपरचा प्रवासी इकडे आकर्षित होणे अवघड दिसते.

भारतीय रेल्वे मध्ये नवप्रज्ञेचा (AI) वाढता वापर होणार आहे. त्यादृष्टीने काही अधिकाऱ्यांना आय आय टी, आय आय एम , आयएसबी इत्यादी संस्थांमधून प्रशिक्षण दिले जाणार आहे. https://www.analyticsinsight.net/how-does-indian-railways-leverage-arti…

पंतप्रधान मोदींनी पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या नवीन भाऊपूर-नवीन खुर्जा या ३५१ किलोमीटरच्या मार्गाचे उद्घाटन केले. हा मार्ग पंजाबच्या लुधियानाला पश्चिम बंगालमधील डानकुनीशी जोडतो याला ईस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर असे नाव आहे. हा १८७५ किलोमीटरचा भव्य मार्ग विस्तार आहे. समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर विकसित करण्याची योजनेचे कार्य २०१४ नंतर सुरू झाले त्यानंतर मोदी सरकारने ११०० किलोमीटर मार्ग बांधला गेला आहे. हे कार्य अजूनही वेगाने चालले आहे. सध्या मालगाड्यांना प्रवासी गाड्यांपेक्षा प्राधान्य मिळत नाही. त्यामुळे जास्त गाड्या चालवण्यावर बंधने आहेत. माल वाहतुकीवर याचा परिणाम होतो. समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर एकदा पूर्ण झाल्यावर, मालवाहतुकीच्या किमान ७० टक्के गाड्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नेटवर्कवर हस्तांतरित केल्या जातील. या सर्व मार्गांचे विद्युतीकरण चालले आहे. विद्युतीकृत रेल्वे मार्ग मालवाहू गाड्यांना जास्त भार ओढताना वेग तीन पटीने वाढू शकतो.

In reply to by निनाद

जबरी महाकाय प्रोजेक्ट आहे हा! याची एक क्लिप काही महिन्यांपूर्वी पाहिल्यापासून प्रचंड इण्टरेस्ट आहे याबद्दलच्या माहिती मधे. यात अजून महत्त्वाचे म्हणजे, मालवाहतुकीबद्दल नेमकेपणा येइल लागणारा वेळ, माल कधी पोहोचू शकेल याबद्दल. मी वाचले त्याप्रमाणे जेव्हा खात्रीशीर व वक्तशीर डिलीव्हरी हवी असते तेव्हा रेल्वेचा वापर सध्या तितकासा होत नाही. या कॉरिडॉर मुळे रेल्वेची मालवाहतूक तर वाढेलच पण भारतीय उद्योगधंद्यांनाही त्याचा प्रचंड फायदा होईल.

In reply to by फारएन्ड

मालगाड्यांचा वेग स्वतंत्र भारतात जास्तीत जास्त ताशी २५(!) राहिला आहे. गेल्या साठ वर्षात मालवाहतुकीत प्रवासी वाहतुकीच्या मानाने सुमारे ८५% घसरण झाली आहे. ही भरून काढण्यासाठी हे प्रयत्न चालले आहेत. कॉरिडॉर मुळे वेग ७५ तरी करण्याचा प्रयत्न आहे.

In reply to by निनाद

मुबई वाडी बंदर ते शालिमार कलकत्ता किंवा मद्रास सॉल्ट कोटुर येथे सुपर एक्सप्रेस गुड्स ट्रेन्स चालत असत. त्या ४ दिवसात खात्रीशीर गंतव्य स्थानी माल पोचवत असत. मुंबई कलकत्ता १९६८ किमी मुंबई मद्रास १२५० किमी. म्हणजे २० किमी किंवा साडे बारा किमी सरासरी वेग. बाकी मालगाड्या कितीही दिवस घेत. मुंबई चेन्नई मार्ग अजूनही पूर्ण दुहेरी झालेला नाही आणि त्याचे विद्युतीकरणही अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे मधल्या विभागात गाडीला इलेक्ट्रिक इंजिनाच्या पुढे डिझेलचे इंजिन लावावे लागते. ७० वर्षात दक्षिण भारताकडे रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. रेल्वे हे रेल्वे मंत्रालयाचे खाजगी संस्थान असल्यासारखे चालवले जात होते त्याचा हा परिपाक होता.

In reply to by सुबोध खरे

दक्षिण भारताकडे रेल्वेचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे.> विशेषता केरळमध्ये तर अधिकच दुर्लक्ष

In reply to by हेमंतकुमार

केरळचा प्रश्न अगदी वेगळा आहे. तेथे लोकसंख्येची घनता फार जास्त असून कम्युनिस्ट विचार सरणीमुळे जमीन संपादन करणे भयंकर कटकटीचे आहे त्याशिवाय घरं खेडी आणि पाणथळ भाग टाळून रेल्वे मार्ग काढावा लागत असल्याने तो फार जास्त वळणावळणांचा झाल्यामुळे तेथे रेल्वेचा वेग फारसा वाढवता येत नाही. अगदी तिरुवनंतपूरम राजधानी एक्स्प्रेस सुद्धा केरळ मध्ये सरासरी ५०-५५ वेगाने धावते.

भारतीय रेल्वेने रशियन बनावटीच्या Ntechlab या प्रकारच्या कॅमेरा सुरक्षा यंत्रणा गुजरात व महाराष्ट्रात काही ठिकाणी बसवल्या आहेत. यामध्ये प्रवाशांचे चेहरे ओळखण्याची सोय आहे. या यंत्रणांचा उपयोग खालील कामांसाठी होणार आहे : प्रवाशांची मोजणी वाहतूक नियंत्रण हरवलेल्या व्यक्ती आणि गुन्हेगारांचा शोध https://eurasiantimes-com.cdn.ampproject.org/v/s/eurasiantimes.com/indi…

In reply to by हेमंतकुमार

सुवर्ण रथ रेल्वे कर्नाटकचे ६ नाईट प्राइड, दख्खनच्या ५ नाइट ज्वेल आणि ३ रात्री कर्नाटकची झलक अशा सहली नेते. पुढील सहल ऑक्टोबर मध्ये दिसते आहे.

वंदे भारत ट्रेन्सचे उत्पादन वाढत आहे. काही रोचक माहिती इथे https://m.timesofindia.com/business/india-business/vande-bharat-express… या ट्रेन्स ना ट्रेन 18( 2018साली तयार झाल्या म्हणून) असेही म्हणतात. त्यांचे आधीचे नाव शताब्दी किलर्स असे ठरले होते !

In reply to by कंजूस

दोन्ही चित्रफिती छान आहेत.

रेल्वे नियोजित वेळेपेक्षा चार तास उशीरा पोहोचल्यामुळे त्यातील एका प्रवाशाचे पुढील विमान चुकले. त्यावर त्याने दावा दाखल केला होता. अखेर तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. न्यायालयाच्या निर्णयानुसार या व्यक्तीला रेल्वेने तीस हजार रुपये नऊ टक्के व्याजासह भरपाई द्यायची आहे. असा हा महत्त्वपूर्ण निर्णय ! https://www.moneycontrol.com/news/india/train-delay-railways-to-pay-rs-…