Skip to main content

कौशल्यमापन कसे करावे?

लेखक उपयोजक यांनी शनिवार, 27/03/2021 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा श्रीमंतीचे नियम या धाग्याला पुरक असा आहे. चांगला बाजारभाव असणारे एखादे कौशल्य स्वत:मधे निर्माण करणे, असलेले अद्यतन करणे हा आर्थिक समृद्धी खात्रीने वाढवण्याचा मार्ग आहे.पण हे करताना आपल्या कौशल्याचा स्तर कोणता आहे हे मोजता आले तर? म्हणजे समजा क्ष नावाची व्यक्ती आहे. ती संगीताच्या क्षेत्रात गाण्यांना चाली लावण्याचे काम करते त्याशिवाय तीच व्यक्ती चित्रकारही आहे, तीच व्यक्ती गायकही आहे असे समजू. आता गाण्यांना चाली लावतो म्हणजे तो संगीतकार आहे. पण त्याची लेवल किंवा स्तर किती आहे याचे नेमके मापन कसे करणार? म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे? हे कसे मोजणार? चित्रकार अाहे तर कोट्यावधी रुपयांना विकले जाईल अशी चित्रे काढतो किंवा जहांगीरमधे प्रदर्शन भरवण्याइतका दर्जेदार आहे की २-५ हजार रुपयाला म्हणेल ते पेंटींग बनवून देणारा छोटासा चित्रकार आहे? गायक आहे तर बॉलीवूडच्या सिनेमांसाठी गाईल इतका चांगला आहे की भजनी मंडळापुरताच मर्यादित आहे? हे केवळ कलाक्षेत्रापुरतेच मर्यादित नाही तर तांत्रिक किंवा वाणिज्य अशा कोणत्याही क्षेत्रात असे असू शकते. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की तांत्रिक किंवा वाणिज्य क्षेत्रातील शिक्षणाच्या विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल मिळालेल्या प्रमाणपत्राचा आणि प्रत्यक्षात त्या क्षेत्रातल्या ज्ञानाचा संबंध असेलच असे नाही. तसा संबंध नसल्यानेच आपल्याला अनेकदा जिथे बीकॉम झालेला उमेदवार पुरेसा आहे तिथे कॉमर्सच्या थोड्याशा प्रशिक्षणाने प्रशिक्षित केलेला पदवीधर अभियंता काम करत असलेला दिसू शकतो. याचाच अर्थ त्या पदवीधर अभियंत्याला बीकॉम झालेल्या उमेदवाराइतकेच ज्ञान आहे.तितपतच त्याची कुवत असू शकते. अशाचप्रकारे एखादी १२वी MCVC झालेली व्यक्ती निव्वळ जिज्ञासेतून त्याच्या शाखेतल्या तज्ञ डिप्लोमा किंवा पदवीधर अभियंत्याइतके ज्ञान असणारी असू शकते. नोकरी शोधताना 'उमेदवाराला काय येतंय? किंवा त्याच्या ज्ञानाचा स्तर' हीच गोष्ट नोकरी देणार्‍यासाठी महत्वाची असते/असायला हवी. नोकरीच्या ठिकाणी मुलाखत घेणारा उमेदवार ज्या पदासाठी मुलाखत द्यायला आलाय त्याच पदाचा/कामाचा चांगला अनुभव असणारा असेल तरच त्या उमेदवारासोबत योग्य न्याय होईल. अन्यथा नोकरी देणारा आणि तो उमेदवार दोघांचही नुकसान होऊ शकतं. काही ठिकाणी एचआरवाले किंवा सेल्सवाले टेक्निकल कामासाठी नेमून घ्यायच्या उमेदवाराची मुलाखत घेत असतात. किंवा टेक्निकल पर्सन वाणिज्य कामासाठी घ्यायच्या उमेदवाराची मुलाखत घेत असतात. लहान कंपन्यांमधे हा प्रकार सहज घडू शकतो. अशाप्रकारे शैक्षणिक प्रमाणपत्रावर उल्लेखित पात्रतेपेक्षा प्रत्यक्षातलं ज्ञान जास्त असेल किंवा कमी असेल तर ते मोजणार कसं? सारांशाने आपल्याकडे कोणत्या क्षेत्रातलं ज्ञान हे सर्वाधिक आहे किंवा आपला कल हा सर्वाधिक कोणत्या क्षेत्रात आहे हे मल्टीटॅलेंटेड व्यक्ती स्वत: कसे तपासू शकते?

वाचने 11001
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

म्हणजे तो ए.आर. रहमानच्या तोडीचा संगीतकार आहे की अनु मलिकसारखा बाजारात मागणी ते पुरवू वाला संगीतकार आहे?
इथे कोण कसा हे ठरवुन प्रश्न विचारला आहे . इथे कोणता मापदंड वापरला ?

In reply to by मराठी_माणूस

ए. आर.रहमान = आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेला संगीतकार अनु मलिक = फारशी प्रतिभा नसतानाही कॉप्या करणारा

In reply to by उपयोजक

असे लौकीक अर्थाने यशस्वी ते चांगले असे मापन करता येणार नाही. ए. आर.रहमान चे संगीत अजिबात न आवडणारे खुप जण आहेत.

पु ल देशपांडे हे एक मल्टी टॅलेंटेड व्यक्ति होते. यात दुमत नसावे. त्यांना विचारले यात तुमचे सर्वात जास्त प्रेम कशावर " ते म्हणाले " संगीतावर ! " प्रत्यक्षात ते आपल्याला विनोदकार ,नाटककार म्हणून अधिक यशस्वी झालेले दिसतात. १५ वर्षे इ एन टी ची प्रॅक्टीस केल्यावर डॉ लागू यांनी नाटकाकडे मोर्चा वळवला . बी जे मध्ये असताना ते तसे नाटकात भाग घेत असत पण त्यात झपाटलेपण असे काही नव्हते. आता मी माझे सांगतो .मी आर्किटेक व्हावे म्हणून कॉलेज मध्ये प्रवेश घेतला . पण दोन वर्षे झाल्यावर मला कळले की या क्षेत्रात जाण्यासाठी आंपण ब्राह्मण असणे ही एक डिस्क्वॅलिफिकेशन ठरू शकते. (यात महाराष्ट्रात प्रॅक्टीस करणार हे गृहीत धरले होते ). बरोबर या करियर मध्ये आवश्यक असलेले रेखन करायचे तर खूप मेहनत घ्यावी लागते .ती क्षमता माझ्यात नव्हती. सबब आवड असून मी कोर्स सोडला . आजही ब्राह्मण असलेले माझे मित्र त्या क्षेत्रात फार मोठी उंची गाठू शकले आहेत असे दिसत नाही . टेंडर भलत्यालाच मिळते .डिझाइनचे बक्षीस घ्या हवेतर असा खाक्या असतो. मी कॉमर्स डिग्री चार ही वर्षे बाहेरून करून केली. कोणत्याही क्लास ला न जाता . पण या लाईन मध्ये नवनिर्मिती शून्य . सी ए सारखे मोठे करियर ( आज ते खरेच मोठे करियर आहे का हा वादाचा मुद्दा आहे) करायला अनेकांचे कष्ट फलदायी झालेले नाहीत. )( निकाल दोन नी तीन टक्के ) १९८६ साली मी आजच्या भाषेत सांगायचे झाले तर " आय टी वाला " माणूस होतो. पण ही लाईन पैसा व अप्लिकेशन या बाबत इतकी विकसित होईल याचा अंदाज ज्यांना त्यावेळी आला ते भारत सोडून मिडल ईस्ट मध्ये बड्या वेतनावर लागले. कम्फर्ट झोनचा स्वीकार ज्यांनी केला ते माझ्यासारखे मागे राहिले. हे पुराण सांगण्याचे कारण की आज ज्या वेगाने माणूस नवनवीन गोष्टी शिकत आहे त्यापेक्षाही वेगाने नवी तंत्रे येत आहेत. असे औधोगिक क्रान्ती ४.० चे अभ्यासक सांगत आहेत ! यावर अनेक लोकांच्या काही हरकती आहेत. आतापावेतो कुठे काय बिघडले तर आता बिघडेल असे सांगणार तज्ज्ञ ही आहेत. ( ३८ व्या वर्षी मला चाळीशीचा चषमा बिलाकुल लागणार नाही अशी पैज मी माझ्या एका चषमा विकणार्या मित्राबरोबर लावली होती. ) पुन्हा माझेच उदाहरण घेऊ. मी संवादाची देवाण घेवाण करण्याची आवड व क्षमता असलेला माणूस आहे मग मी मार्केटिंग( फक्त सेलिंग ) मध्ये यशस्वी ठरेन का तर नाही कारण मला माल कुणीतरी घ्यावा म्हणून आर्जवे करण्याचे कसब नाही व आवडही नाही. ( सदाशिव पेठी दुकानदार असा असतो )

In reply to by चौकटराजा

नेमका प्रतिसाद! आवडला. रोचक प्रवास. वेळोवेळी स्वत:ला तपासत गेलात. फारच छान. प्रेरणादायी.

In reply to by चौकटराजा

एखादा व्यवसाय आणि जात हे समिकरण पटले नाही. दुसरे १९८६ च्या ही आधी पासुन संगणक क्षेत्रात असणारे आणि इथेच रहाणारे , त्यांनी सुध्दा खुप चांगले करीअर केले आहे.

In reply to by मराठी_माणूस

समीकरण पटले नाही तर राहू द्या ! आज एक मित्र नासिक मधे वास्तुविद म्हणून काम करीत आहे त्याने हे अनुभवले आहे ! १९८६ नन्तर कम्फर्ट झोन हा शब्द त्यासाठीच वापरला आहे. नुसत्या देशात रहाणे म्हणजे कम्फर्ट झोन पकडला असे नवे तर एखादी कम्पनीच न सोडणे ,एखादे गाव न सोडणे या प्रव्रुती देखील कम्फर्ट झोन मधे येतात. बँकेतील कारकुनाची नोकरी करणार्याची पत्नी देखील नोकरी करणारी असेल तर तो ऑफिसरच्या परिक्षेचा प्रयत्न करीत नाही .त्याला पक्के माहीत असते की प्रमोशन म्हणजे बदली . हा देखील एक कम्फर्ट झोनचाच प्रकार आहे !

In reply to by चौकटराजा

बँकेतील कारकुनाची नोकरी करणार्याची पत्नी देखील नोकरी करणारी असेल तर तो ऑफिसरच्या परिक्षेचा प्रयत्न करीत नाही .त्याला पक्के माहीत असते की प्रमोशन म्हणजे बदली . हा देखील एक कम्फर्ट झोनचाच प्रकार आहे !
१०० % सहमत. असे उदाहरण अगदी जवळून पाहीले आहे.

स्वतःच सोनार व्हा ... (स्वतःचेच कान, स्वतः टोचले तर, दुखत नाही...) एक साधा उपाय आहे, रोज रात्री झोपण्यापुर्वी, स्वतःसाठी फक्त 10 मिनिटे वेळ काढायचा आणि 3 प्रश्र्न स्वतःलाच विचारायचे .... 1. आज मी काय वाचले? 2. कालच्या पेक्षा, आज ज्ञानांत काही सकारात्मक वृद्धी झाली का? 3. उद्या काय वाचायचे आहे? आपल्याला काही, घराणेशाहीची कवचकुंडले मिळालेली नाहीत, त्यामुळे आपणच आपला मार्ग शोधत रहायचा...

In reply to by मुक्त विहारि

माझ्या बेड च्या वरती सिलिंग ला एक झेरॉक्स चिकटवली होती " आजचा दिवस पण असाच गेला " पाठ टेकवली कि ते दिसायचं , त्यानेही बराच फरक पडला

तसेच प्रतेक व्यक्ती हा वेगळा असता .प्रतेक व्यक्ती मध्ये वेगळी कौशल्य असतात आणि युनिक असतात. एका व्यक्तीत असलेली उच्च कौशल्य दुसऱ्या व्यक्ती मध्ये असू शकत नाहीत.

In reply to by Rajesh188

बटाट्या पासून सोने बनवणारे मशीन आणणारे आणि त्या मशीनची वाट बघणारे, एका साईडला आणि स्वउन्नतीसाठी प्रयत्न करणारे, एका साईडला...

धाग्याचा हेतू कौशल्यवर्धन कसे करावे असा असायला हवा का, अशी शंका येऊन गेली! आवड, काम, कौशल्य आणि या सर्वांच्या तुलनेत पैसा. या सोबत आणिक एक गोष्ट असायला हवी - भाग्य. पण ते काही आपल्या हातात नाही. - उपजीविकेच्या गरजेनुसार आणि परिस्थितीनुसार कार्य निवडणं आणि त्यातलं कौशल्य आत्मसात करणं, ही झाली उपजीविकेसाठीची तडजोड. - आपली आवड कोणती ते जाणणं आणि त्यातलं कौशल्य आत्मसात करणं, याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या आवडीला जोपासण्यासाठी काहीही करून वेळ काढणं, ही झाली आवडीसाठीची तडजोड. उपजीविकेत पैसा प्राथमिक महत्त्वाचा आहे आणि आवडीत समाधान प्राथमिक महत्त्वाचं आहे. या दोघांचा समतोल साधला तर आपण आपली वृत्ती सांभाळू शकतो. काही मूलभूत प्रश्नः . कोणताही विषय आपल्याला आवडू शकतो काय? . आवड असलेल्या प्रत्येक विषयात आपण निष्णात होऊ शकतो काय? . अशा कोणत्याही एक किंवा प्रत्येक विषयातील कौशल्यातून आपण पैसा मिळवू शकतो काय? हे प्रश्न सांकेतिक आहेत. त्यांची उत्तरं आपली स्वतःची मानसिकता दर्शवितात. त्यावरून आपण काय करू शकतो ते आपले आपण ठरवायचे. कौशल्य आत्मसात करण्यासाठी आवड लागते तशीच त्यासाठीची प्रामाणिक मेहनत देखील लागते. पण नसलेली आवड निर्माण करण्यासाठी जास्त मेहनत लागते, हा स्वानुभव आहे! :-)

In reply to by राघव

असा असायला हवा का, अशी शंका येऊन गेली. आपल्याकडील एकूण कौशल्यांपैकी कोणते कौशल्य कोणते स्तरावर आहे ते नीट माहित असेल तर मग त्याचे वर्धन करणे सोपे जाईल. उपस्थित केलेले प्रश्न उपयुक्त आहेत. पण नसलेली आवड निर्माण करण्यासाठी जास्त मेहनत लागते, +११११११११११११११११११११११

फार वर्षांपूर्वी आताची प्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र चे आई वडील मी माझी पत्नी ई आमच्या घरात एकत्र जेवत होतो .जेवता जेवता विषय निघाला म्हणून सावनीचे वडील डॉ . रवींद्र म्हणाले माणूस देवदत्त ( दैववशात )देणगी ,मेहनत व नशीब यांनी घडतो . ते स्वतः: बजाज आटो कंपनीत ग्राइंडर म्हणून कामाला लागले . बाहेरून ए एम आय ई ची पदवी घेऊन इंजिनिअर झाले. तिथे सेक्शन मॅनेजर ( फार मोठे पद नाही ) पर्यंत गेले. दरम्यान अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या एम ए या पदव्यत्तर परिक्षेत भारत देशात पहिले आले मग संगीतातच पी एच डी केली . मी त्यांच्या या " नियमाला " ला आधार धरून काही यशःस्वी व अयशस्वी ( पैसा हा निकष नाही ! ) गायक ,क्रिकेटर,,राजकारणी ई चा मागोवा घेतला व मला चौथे तत्व असे आढळले की परिसर देखील याला कारणीभूत असतो. सचिन भारतरत्न पर्यंत पोचला पण त्याच परिसरात राहणारे अजीत तेंडुलकर व नितीन तेंडुलकर कुठे रणजी देखील खेळलेले नाहीत. मोहिंदर अमरनाथ पुढे गेला ,पण सुरेंदर व राजिंदर अमरनाथ चे काय झाले ? राधा मंगेशकर कडे किती गाणी आली ? सुरेश वाडकर जरासा चमकला पण त्याला रफीचे स्थान रफीच्या जमान्यात मिळाले असते का ? १९६९ पर्यंत किशोर कुमार फक्त स्वत; भूमिका केलेल्या गाण्यानाच योग्य आहे असे संगीतकारांना का वाटत होते.? मग त्याने रफी साहेबाना देखील १९७० ते १९८० या काळात कसे मागे टाकले ? रवी शास्त्रीने मैदानापेक्षा मैदानाबाहेरच्या कौशल्याने कसा पैसा कमविला.? मोटीव्हेशन चा " धंदा " करणारे लोक स्वतः: किती उद्योग करतात ? मोटिव्हेशन वाले डी एस के हे आज तुरुंगात का आहेत ? या सर्वाची उत्तरे दैववशात देणगी परिसर मेहनत नशीब यात मिळतील ! आजचे कौशल्य उद्या कौशल्य असेलच असे नाही !असले तरी ते अनेकांत असेल ! आजच्या एम बी ए कोर्सची अशीच दैन्यावस्था झाली आहे !

In reply to by चौकटराजा

हा महत्त्वाचा घटक आहे आणि तो स्वकष्टाने मिळवता येत नाही. निसर्ग देईल तेच घ्यावे लागते. जे कमनशीबी असतील त्यांनी काय करावे? :(

In reply to by उपयोजक

माझी एम ८० ही दुचाकी एकदा आचके देत देत चालते असा मला अनुभव आला . सबब मी ती मेकॅनिक कडे नेली . मालक बाहेर गेला होता . मी तिथे असलेलया मुलांना पेट्रोल टाकी आउटलेट ,टाकीवरचे झाकणाचे भोक, टाकी कडून कार्ब्युरेटर कडे जाणारा पाईप .तिथून इंजिन मध्ये जाणारा पाईप , एअर फिल्टर ई चेक करायला सांगितले ! त्याने सुचविल्याप्रमाणे मी गाडी तिथेच सोडून तासाने गेलो. विचारले सांगितलेले सर्व चेक केले का ? तो मुलगा म्हणाला " नाही फक्त " इग्नेशन स्वीच बदलला " ! मी तुम्ही सांगितलेलं काहीच चेक केले नाही ! गाडी स्टार्ट केल्यावर मला आपोआप कळले काय मिष्टेक आहे ! " त्यावेळी या मुलाचे वय फक्त १३ वर्षे होते. त्याने बटण बदलले असे सांगेतले " इग्नीशन स्वीच " माझा शब्द !

शाळा ,कॉलेज मध्ये असताना पूर्ण अभ्यासक्रम कडे पाठ फिरवून फक्त परीक्षेला जे येण्याची शक्यता आहे तेवढाच अभ्यास करणे. परिणाम. विषयांचा सखोल अभ्यास असणारे शिक्षित लोक नसणे . मग अशा विद्यार्थ्यांना आपण शिक्षणात कौशल्य निर्माण केले आहे असं म्हणू शकतो का. 1) गाडी चालवण्यासाठी जे गरजेचे आहे तेच फक्त शिकून घेणे बाकी गोष्टी कडे दुर्लक्ष करणे. परिणाम. गाडी च्या बदलेल्या आवजाचा अर्थ न समजणे. गाडी विषयी बेसिक माहिती सुद्धा नसणे. गाडी मध्ये असलेल्या विविध system कशा वापरायच्या ह्याची माहिती नसणे. मग अशा ड्रायव्हर ल आपण त्याने ड्रायव्हिंग चे कौशल्य निर्माण केले आहे असे म्हणू शक्ती का? ३) पोलिस मध्ये नोकरी करत आहे. पण स्वतःचे रक्षण करण्यासाठी सशक्त शरीर नाही . सेल्फ डिफेन्स साठी आवश्यक असणाऱ्या कला .karate, ज्युडो येत नाही.. हत्यार चालवण्यात तरबेज नाही. कायदे माहीत नाहीत. मग अशा व्यक्ती नी पोलिस मध्ये नोकरी करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त केले आहे असे म्हणू शकतो का? वरील तिनी उदाहरणात हेच सांगायचं प्रयत्न केला आहे एकदया क्षेत्रात सखोल अभ्यास नसेल पण त्या क्षेत्रात काम करू शकतो इतपत च स्किल प्राप्त असेल तरी त्याला कौशल्य प्राप्त आहे असे म्हणता येईल का.. माझ्या मते कौशल्य ह्या शब्दाचा अर्थ सखोल न्यान (असाच शब्द टाईप करता आला) असा आहे. मग आता तुम्ही सांगा कौशल्य प्राप्त असलेल्या लोकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या किती टक्के असेल.

मी वरच म्हटले आहे की आर्कीटेक्चरला जी रेखने करावी लागतात .त्यासाठी रात्र रात्र जागावे लागते . सिविल इंजिनियर च्या मानाने चौपट काम करावे लागते कॉलेजमध्येच असताना ! म्हणजे सर्व येते पण ही क्षमता नाही असा माणूस हा अशक्त पोलीस या कल्पनेसारखा आहे ! आता आर्किटेक्चरचा निकाल त्यावेळेसारखा पाच दहा टक्के लागत नाहीच व रेखने ऑटोकॅड ने करता येतात . एक फरक सामाजिक आहे तर दुसरा तांत्रिक ! आता तो कोर्स सोपा झाला आहे ! पण या कारियरचे भवितव्य किचकट कायदे ई मुळे त्रासदायक होणार आहे असे माझे अजूनही प्रॅक्टीस करीत असलेले मित्र सांगतात !

प्रतेक व्यक्ती ही युनिक असतो. एका व्यक्ती सारखा दुसरा व्यक्ती असूच शकत नाहीत Dr जगात लाखो असतील त्यांची डिग्री पण समान असेल पण त्यांचा दर्जा कधीच समान नसतो लहानपणी च मुलांचे गुण दिसतात दहा वर्षाच्या आतील मुलांचे निरीक्षण करून त्यांचे गुण कौशल्य ओळखा आणि तेच शिक्षण त्या मुलांना ध्या. खूप चांगले खेळाडू,संशोधक ,शिक्षक,कारागीर,हमाल,कारकून इत्यादी जगाला मिळतील आता md असणारा dr एकच दर्जा चा असतो असे समजले जाते पण ते साफ चुकीचे असते.

In reply to by Rajesh188

बरोबर आहे. खूप चांगले खेळाडू,संशोधक ,शिक्षक,कारागीर,हमाल,कारकून इत्यादी जगाला मिळतील ज्या मुलांमध्ये चांगली हमाली करण्याचे पोटेनशियल असेल त्यांना कुली, कुली नं १, हमाल दे धमाल हे पिक्चर दाखवले पाहिजेत. त्यांना हमालीची लाज वाटणार नाही तर ते काम ग्लामरस वाटेल :)

In reply to by Rajesh188

तोच इंजिनीयर, गवंड्याकडून घरकाम करून घेण्या इतपत, आर्थिक बळ कमावतो.... आपण लिहीत रहा, तुमच्यामुळे, आमचे मुलभूत ज्ञान अधिक परिपक्व होत जाते....

महत्वपुर्ण लेख आणी त्यावरील उपयुक्त प्रतीसाद वाचुन असे जाणवते की कौशल्यमापन करणे आणी त्याचबरोबर आपल्या कौशल्याची व्यवहारीक जगाशी सांगड घालणे या दोनही गोष्टी महत्वाच्या आहेत . कौशल्य मापन कसे करावे -- कौशल्य मापन कसे करावे याबद्दल अनेकांनी उपयुक्त प्रतीसाद दिलेच आहेत . एका समुपदेशकाच्या लेखामधे याबाबत एक सर्वसाधारण उपाय वाचला आहे तो असा - आपली १०वी किंवा १२वीची मार्कलिस्ट बघावी . त्यामधे इतर विषयांच्या तुलनेत ज्या तीन विषयांमधे त्यातल्या त्यात जास्त गुण मिळाले आहेत ते विषय साधारणपणे आपला कल आणी कौशल्य दर्शवतात . आपल्या कौशल्याची व्यवहारीक जगाशी सांगड घालणे -- आपला कल आणी कौशल्य दर्शवणारे हे जे तीन विषय / कौशल्य क्षेत्र आहेत , त्याबद्दल त्या त्या क्षेत्रांतील व्यवहारीक पातळीवर यशस्वी असलेल्या व्यक्तींना भेटुन / चर्चा , निरिक्षण करुन त्या क्षेत्रामधे असलेल्या पुढील संधींची माहिती घ्यावी . त्यामधील योग्य कौशल्य क्षेत्र निवडावे . निवडलेल्या कौशल्याच्या विकसनास उपयुक्त ठरेल असे शिक्षण घेउन , अनुभव मिळवुन आपले कौशल्य विकसीत करावे ज्यामुळे व्यावहारीक जगातही आपले कौशल्या महत्वपुर्ण ठरेल . उदाहरणार्थ - ए आर रहमानने सुरुवातीच्या काळात इलायराजा व दक्षिणेतील इतर अनेक जेष्ठ संगीतकारांकडे मदतनीस संगीतकार , वादक , संगीत संयोजक अशी कामे केली . आपले संगीत कौशल्य विकसीत केले . अनेक जिंगल्सना संगीत दिले . या अनुभवाचा त्याला पुढे स्वतंत्र संगीतकार म्हणुन काम करताना फायदा झाला .