Skip to main content

प्रवास माझ्या प्रेयसी (अर्थात ट्रेन ) संगे !

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 20/08/2017 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हातात सामान घेऊन मी रेल्वे स्टेशनच्या एका फलाटावर उभा आहे. माझी गाडी थोड्याच वेळांत येथे येत असल्याची घोषणा झाली आहे. माझ्याकडे प्रवासाचे आरक्षित तिकीट आहे. त्यामुळे माझा बसायचा डबा जिथे थांबणार आहे तिथे मी थांबलेलो आहे. गाडीला नेहेमीप्रमाणेच खूप गर्दी आहे. माझा डबा हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षित गटातील असल्याने त्यात फक्त आरक्षित तिकीटधारकांनीच चढावे अशी माझी अपेक्षा आहे ! खरे तर तसा नियमही आहे. पण वास्तव मात्र तसे नाही. माझ्या डब्याच्या जागेवर बिगरआरक्षित प्रवाशांची अधिक झुंबड आहे. खरे तर या मंडळींनी ‘जनरल ‘ डब्यात जायला हवे आहे. परंतु, सामान्य तिकीट काढूनही आरक्षित डब्यात घुसणे हा त्यांचा शिरस्ता आहे ( नियम बियम कोणाला सांगता राव ?). ok आता गाडी फलाटाला लागते. अनारक्षित तिकीटवाले (व बिगर तिकीटवालेही) झुंडीने डब्यात घुसू लागतात. आम्ही आरक्षित तिकीटवाले बापडे मात्र शहाण्यासारखे दम धरून त्यांना आधी चढू देतो. शेवटी घामाघूम झालेल्या अवस्थेत मला एकदाचा डब्यात प्रवेश मिळतो. माझ्या आरक्षित आसनावर आक्रमण केलेल्या घुसखोराला मी उठवतो व माझे बूड टेकतो. हुश्श ! कामानिमित्त मी नियमित रेल्वे प्रवास करतो. डब्यात शिरतानाचा हा अनुभव नेहेमीचाच. बस, रेल्वे व विमान या तीनही प्रवासांमध्ये माझे रेल्वेवर आत्यंतिक प्रेम आहे. जेव्हा एखाद्या प्रवासासाठी रेल्वेचा पर्याय उपलब्ध असतो तेव्हा मी इतर पर्यायांचा विचारही करत नाही. आतापर्यंत केलेल्या भरपूर रेल्वे प्रवासामुळे ट्रेन ही माझी प्रेयसीच झाली आहे – जणू माझी सफर-सखीच. या प्रवासांचे अनेक भलेबुरे अनुभव माझ्या गाठीशी आहेत. .... माझा आजचा प्रवास सुरू झालाय. गाडीने आता वेग घेतलाय. काही तास आता मी ट्रेनमध्ये असणार आहे. आज मला तीव्रतेने वाटतंय की माझी प्रवासातील सुख दुख्खे माझ्या या सखीलाच सांगावित. तर एक सखे, तुझ्या नि माझ्या सहवासाचे काही किस्से ...... लहानपणी तुझ्यातून प्रवासाची खूपच मज्जा वाटायची. त्या काळचे तुझ्या प्रवासाचे तिकीट अजून आठवते. ते पुठ्याच्या कागदाचे छोटेसे आयताकृती तिकीट होते. ते तिकीट-खिडकीवरून घेताना आतली व्यक्ती ते एका यंत्रावर दाबून त्यावर तारीख व वेळ उमटवत असे. आम्ही मुले ती तिकीटे कौतुकाने जमवून जपून ठेवत असू. तिकीट घेऊन फलाटावर गेल्यावर तुझी इंजिन्स कर्कश शिट्या करीत उभी असायची. त्या आवाजाची तर अगदी भीती वाटायची. सखे, तेव्हा तू खरोखरीच झुकझुक गाडी होतीस. तुझ्या काही मार्गांवर तू खूपदा बोगद्यातून जायचीस त्याचे तर आम्हाला कोण कौतुक. तुझ्या काही स्थानकांवरचे बटाटेवडे तर अगदी नावाजलेले. ते खाण्यासाठी लहानमोठे सगळेच आतुर असत. एकून काय, तर तुझ्या बरोबरचा प्रवास म्हणजे मुलांसाठी खाणेपिणे व धमाल करणे यासाठीच असायचा. उपनगरी रेल्वे हा तुझा एक महानगरी अवतार आहे. लहानपणी मी माझ्या आजोबांबरोबर मुंबईच्या लोकल्सने प्रवास करी. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या डब्यांमध्ये शिरणे व त्यातून उतरणे हे एक अग्निदिव्यच. असेच एकदा आम्ही फलाटावर गाडीची वाट पाहत होतो. गाडी आली. आमच्या समोरच्या डब्यात गर्दीचा महापूर होता. परंतु, त्याला लागूनच्या डब्यात बऱ्याच रिकाम्या जागा होत्या (हे वर्णन १९७५ मधले !). माझे आजोबा गर्दीच्या डब्याकडे बघत हताशपणे म्हणाले की त्यात शिरणे अवघड आहे, तेव्हा आपण ही गाडी सोडून देऊ. त्यावर मी त्यांना कुतूहलाने म्हणालो की आपण त्या शेजारच्या बऱ्यापैकी रिकाम्या डब्यात चढूयाकी. त्यावर ते किंचितसे हसले व मला म्हणाले, “ अरे, तो पहिल्या वर्गाचा डबा आहे.’’ मी ते ऐकले मात्र अन मला जणू ४४० व्होल्टचा विजेचा झटका बसला ! म्हणजे या डब्यांमध्ये अशी वर्गवारी असते तर.( खरं तर माणसांमधली वर्गवारी सुद्धा कळायचे माझे वय नव्हते ते ). मग मला आजोबांनी या दोन्ही वर्गांच्या भाड्यातील लक्षणीय फरक सांगितला. मला झालेला तो एक साक्षात्कारच होता. त्यानंतर बरीच वर्षे पहिल्या वर्गाचा डबा हा माझ्यासाठी फक्त ‘लांबून बघण्याचा’ डबा होता. तेव्हा निमूटपणे दुसऱ्या वर्गाच्या डब्यात घुसण्याला पर्याय नव्हता. मोठेपणी मी कमावता झाल्यावर तुझ्या सर्व वरच्या वर्गाच्या प्रवासांचा पुरेपूर अनुभव घेतला. पण एक सांगू ? मला तुझ्या त्या वातानुकुलीत वर्गाचा प्रवास मनापासून आवडत नाही. त्यातला थंडपणा मला सोसत नाही. तसेच तिथल्या बंद खिडक्या, आतमध्ये झालेली झुरळे आणि कुंद वातावरण नकोसे वाटते. त्यातून तिथले प्रवासी पण कसे बघ. फारसे कोणीच कोणाशी बोलत नाही. बहुतेक सगळे एकतर मोबाईलवर चढ्या गप्पा मारण्यात मग्न किंवा कानात इअरफोन्स खुपसून हातातल्या स्मार्टफोन्स मध्ये गुंगून गेलेले. या सगळ्यांमुळे मी तिथे अक्षरशः गुदमरून जातो. त्यामुळे मी एकटा प्रवास करताना शक्यतो तुझ्या दुसऱ्या वर्गाने जाणे पसंत करतो. तिथल्या उघड्या खिडक्या, सुसाट वारा, तुझ्या वेगाची होणारी जाणीव आणि एकूणच त्या डब्यातले मोकळेढाकळे वातावरण मला बेहोष करते. मला चांगले आठवतंय की मी काही प्रवास पूर्वीच्या तुझ्या बिगरवातानुकुलीत पहिल्या वर्गातून केले होते. खरं म्हणजे माझा सर्वात मनपसंत वर्ग तोच होता. जेव्हापासून तो साधा पहिला वर्गच रद्द झाला तेव्हापासून मी मनोमन खट्टू आहे. अलीकडच्या काही वर्षात तुझ्या दुसऱ्या वर्गाच्या प्रवाशांना अजून एक त्रास सुरू झालाय. तू धावत असताना डब्याच्या उघड्या खिडक्यांतून हलते निसर्गसौंदर्य मनसोक्त पाहणे हे खरे तर या प्रवाशांचे हक्काचे सुख. पण, तुझ्या काही मार्गांवर या मूलभूत सुखावरच घाला घातला गेला आहे. या मार्गांवरून तू जात असताना बाहेरील काही दुष्ट मंडळी गाडीवर जोरात दगड मारतात. बहुदा असे लोक याप्रकारे त्यांच्यातील असंतोष व नैराश्य बाहेर काढत असावेत. पण त्यामुळे प्रवाशांनी मात्र जीव मुठीत धरून प्रवास करायचा. मग यावर उपाय म्हणून पोलीस प्रत्येक डब्यात येऊन प्रवाशांना खिडक्यांचे लोखंडी शटर्स सक्तीने लाऊन घ्यायला लावतात. मग अशा बंदिस्त डब्यातून प्रवाशांनी जिवाची घालमेल सहन करत आणि एकमेकांकडे कंटाळा येईस्तोवर बघत बसायचे. बाकी प्रचंड गर्दीच्या वेळी तुझ्या दारात उभे राहून जाणाऱ्यांना तर कायमच धोका. अधेमध्ये असा जोराचा दगड लागून एखादा प्रवासी गंभीर जखमी झालाय वा मरणही पावलाय. किती चटका लावून जाते अशी घटना. तुझ्यातून प्रवास करणे ही माझ्यासाठी आयुष्यभराची करमणूक आहे प्रवास सुखकर व्हावा म्हणून माझ्यासारखे अनेक जण तिकिटाचे व्यवस्थित आरक्षण करूनच प्रवास करतात.पण, आम्हा दुसऱ्या वर्गाच्या आरक्षितांचे एक कायमचे दुखः आहे.ते म्हणजे आरक्षित डब्यांत होणारी बिगरआरक्षित मंडळींची त्रासदायक व संतापजनक घुसखोरी. या घुसखोरांमध्ये सामान्य तिकीटवाले, प्रतीक्षा यादीवाले, तृतीयपंथी आणि भिकारी असे विविधरंगी लोक असतात. या सर्वांचा असा ठाम समज असतो की कोणीही कुठल्याही डब्यात बसले तरी चालते. म्हणजे वेड घेऊन पेडगावला जाण्यातला हा प्रकार. ही मंडळी एकदा का आरक्षित डब्यात घुसली की इतकी शिरजोर होतात की आम्हालाच विस्थापितासारखे वाटू लागते.एकंदरीत काय तर दुसऱ्या वर्गाचे आरक्षित डबे हे ‘’आओ जाओ घर तुम्हारा’’ असे झालेले आहेत. यातील प्रवाशांच्या सुखसोयीबाबत रेल्वे प्रशासनही बेफिकीर आहे. प्रवाशांच्या तक्रारींना तर काडीचीही किमंत दिली जात नाही. दुसऱ्या वर्गाचे आरक्षण केलेल्या प्रवाशाला डब्यात मोकळा श्वास घेता येईल, त्याला त्याचे सामान त्याच्या आसपास हक्काने ठेवता येईल, डब्यातली मधली मार्गिका ही चालण्यासाठी मोकळी असेल आणि गरज लागेल तेव्हा त्याला स्वच्छतागृहात विनासंकोच जाता येईल अशा मूलभूत अपेक्षा हा ‘बिचारा प्रवासी’ ठेऊन आहे. मध्यंतरी मी एकदा तुझ्या डब्याचे बाहेरून बारकाईने निरीक्षण केले. तुझ्या प्रत्येक डब्याला दोन दरवाजे आहेत. त्यातील एकावर ‘प्रवाशांनी चढण्यासाठी’ व दुसऱ्यावर ‘उतरण्यासाठी’ असे व्यवस्थित लिहेलेले आहे. मनात आले की खरोखरच जर याप्रमाणे आपली जनता वागली तर ! पण वास्तव मात्र भीषण आहे.उतरणाऱ्याना उतरू देण्यापूर्वीच चढणारे घुसखोर नकोनकोसे करून टाकतात. काही निर्लज्ज तर आधीच रुळांवर उतरून फलाटाच्या विरुद्ध बाजूच्या दाराने आत घुसतात. हे पाहून तिडीक येते व शिस्तीबाबतच्या आपल्या मागासपणाची अगदी लाज वाटते. एका दारातून प्रवासी उतरताहेत व जसा डबा रिकामा होतोय तसे शिस्तीत दुसऱ्या दारातून नवे प्रवासी चढताहेत असे ‘रम्य’ दृश्य बघायला एखाद्या सम्रुद्ध परदेशातच जावे लागेल ! तुझ्यामधून नियमित प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या अनेकांच्या जीवनाचा तू अविभाज्य भाग झाली आहेस. तुझ्या संगतीत मला जीवनातले आनंद व चैतन्यदायी प्रसंग अनुभवायला मिळाले आहेत. माझ्या बरोबरचे काही सहप्रवासी आता माझे जिवलग मित्र झाले आहेत. तू जेव्हा वेगाने धावत असतेस तेव्हा खिडकीतून बाहेर बघताना माझे विचारचक्रही वेगाने फिरत राहते. मग त्यातूनच काही भन्नाट कल्पनांचा जन्म होतो. माझ्या लेखनाचे कित्येक विषय मला अशा प्रवासांमध्ये सुचले आहेत. अनेक विषयांचे सखोल चिंतन मी तुझ्या बरोबरच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात करू शकलो आहे. माझा जास्त प्रवास हा तुझ्या ‘एक्स्प्रेस’ व ‘लोकल’ या प्रकारांतून होतो. पण, अधूनमधून मी तुझ्या ’passenger’ या अवताराचाही अनुभव घेतलाय. त्या प्रवासामुळे मला स्वतःभोवतीच्या सुरक्षित कोशातून बाहेर पडता आले. तसेच ‘महासत्ता’ वगैरे गप्पा मारणारा भारत वास्तवात काय आहे याचे भान आले. तुझ्या प्रवासादरम्यान कधीकधी होणारे गैरप्रकार आणि काही दुखःद प्रसंग मात्र अस्वस्थ करून जातात. कधी तुझ्यावर दरोडा पडतो अन प्रवाशांची लूटमार होते. कधी तुझ्या यंत्रणेत गडबडघोटाळा होतो अन छोटेमोठे अपघात होतात. काही देशद्रोही तुला घातपात करण्यात मग्न असतात. आयूष्यात प्रचंड नैराश्य आलेले काही जीव आत्महत्या करण्यासाठी तुझ्यापुढे उडी मारतात. तर कधीतरी काही भडक डोक्याचे प्रवासी आपापसातील भांडणातून एखाद्या प्रवाशाला गाडीतून बाहेर फेकतात. अशा हृदयद्रावक घटना कधीही न घडोत अशी माझी मनोमन प्रार्थना आहे. तुला आपल्या देशात रूळांवरून धावायला लागून आता दीडशेहून अधिक वर्षे होऊन गेलीत. तुझ्यावर पूर्णपणे सरकारी मालकी आहे. तेव्हा सरकारी यंत्रणांमध्ये आढळणारे सगळे फायदे-तोटेही तुझ्या ठायी आढळतात. तुझ्या गलथानपणाबाबत आपण सतत ऐकताच असतो. पण, मध्यंतरी मला तुझा एक सुखद अनुभव आला. तुझ्या एका मूळ स्थानकावर मी तुझ्यात बसलो होतो. तुला सुटायला अजून अवकाश होता.डब्यात तुरळक प्रवासी होते. मी खिडकीतून बाहेर बघत होतो.तेवढ्यात एक गणवेषधारी माणूस माझ्याजवळ आला. तो सफाई कामगारांवरचा पर्यवेक्षक होता. त्याने मला सांगितले की तुमच्या डब्यांची व स्वच्छतागृहांची साफसफाई कामगारांनी केली आहे. ती कशी झाली आहे यावर त्याला माझे लेखी मत हवे होते. त्याने मला अधिकृत नमुन्यातील कागद भरण्यास दिला.मग मलाही हुरूप आला व मी प्रत्यक्ष जाऊन सगळे बघून आलो. सर्व स्वच्छता चांगली केलेली होती व तसे मी त्याला लिहून दिले. त्या कागदात शेवटी प्रतिसादकाचे नाव, आसन क्रमांक व फोन नं. इ. सर्व लिहायचे होते. हा अनपेक्षित प्रकार बघूनच मी सुखावलो व मनात म्हणालो, ‘’ चला आता भारतीय रेल्वेला ‘corporate look’ येतोय तर !” अर्थात हा अपवादात्मक अनुभव आहे. तो वरचेवर येवो ही अपेक्षा !! तसेच भविष्यात तुझी श्रीमंती व अतिवेगवान रूपे विकसित होण्यापूर्वी सध्याच्या तुझ्यातील मूलभूत सोयी सर्व वर्गाच्या प्रवाशांना व्यवस्थित मिळोत ही इच्छा. ... माझा या प्रेयसी बरोबरचा संवाद हा न संपणारा आहे. पण, आताच्या प्रवासाचे चार तास मात्र आता संपत आले आहेत. आता गाडी स्थानकाच्या जवळ आल्याने हळू झाली आहे. काही प्रवासी त्यांच्या सामानासह दाराजवळ गर्दी करत आहेत. स्थानकात शिरून फलाटाला लागेपर्यंत गाडी खूप हळू जाते व थांबायला भरपूर वेळ घेते. म्हणून मी अजून शांतपणे माझ्या आसनावर बसून आहे. अहो, आता सखीच्या विरहाची वेळ आल्याने खरे तर उठवत नाहीये ! अखेर गाडी थांबते. लगेचच गाडीत चढू पाहणाऱ्या अति उतावीळ प्रवाशांना मोठ्या कष्टाने रोखत आम्ही खाली उतरतो. मी फलाटावरून चालत असतानाच एकीकडे ध्वनिवर्धकातून घोषणा होत असते, ‘’हे मध्य रेल्वेचे XXXX स्थानक आहे. इंटरसिटी एक्स्प्रेसने आलेल्या प्रवाशांचे आम्ही स्वागत करतो.’’ आम्हा हजारभर प्रवाशांचे होत असलेले हे स्वागत ऐकून मी भारावतो. माझ्या ‘प्रवास-सखी’ कडे निरोपादाखल एक प्रेमभरी नजर टाकतो आणि हातातले सामान सावरत मार्गस्थ होतो. ********************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 231485
प्रतिक्रिया 589

प्रतिक्रिया

In reply to by अनन्त्_यात्री

हे घ्या : T / P = termination of speed restriction for passenger trains. T / G = termination of speed restriction for goods trains W/L = Whistle for Level Crossing (बिन पहारेकरीवाले फाटक पुढे असल्यास).

In reply to by हेमंतकुमार

धन्यवाद. बरेच दिवस सस्पेन्स होता. पूर्वी आम्ही लांब पल्ल्याच्या गाड्या, मुंबई-पुणे गाड्या ई च्या डब्यांचा पॅटर्न बघून ओळखायचा प्रयत्न करत असायचो. डब्यांच्या बाजूला उजवीकडे त्यांचे कोड्स असतात त्यावरून समजा एक उद्यान एक्सप्रेस धरली तर इंजिनापासून ते गार्डच्या डब्यापर्यंत एसी २ टियर, २ टियर, स्लीपर, जनरल वगैरे कोचेस चा एक सहसा कॉमन पॅटर्न असतो. तो चेक करायचा उद्योग असे. त्यामुळे नुसती स्टेशनवरून जाणारी गाडी सुद्धा लक्षपूर्वक बघायचो. बाय द वे, कुमार१ हे एकदा नजरेखालून घाला. आवडेल तुम्हाला. https://www.misalpav.com/node/41372

रेल्वे चे अनेक प्रकारची रूळ जोडणी असते त्यातील एक डायमंड क्रॉस ही रचना आहे . त्याचा फटू आंजावर पाहायला मिळेल. पण मनमाडजवळ अंकाई टंकाई नावाचे दोन जोडकिलले आहेत. तिथे एक मजा जर योगायोग्य असेल तर पाहावयास मिळते. मनमाड ते दौंड मार्ग तसा जुना आहे . पण त्यानंतर मनमाड नांदेड असा मार्ग मनमाड रेल्वे स्थानकातून बरोबर उलट्या दिशेने काढून त्याला वळवून नांदेड ला नेण्यात आले आहे ज्या योगे मनमाड दौंड मार्गाशी तो क्रॉस होऊ नये . पण अंकाई किल्याच्या पायथ्याशी हे दोनाही मार्ग समांतर येतात. काही वेळा योगायोगाने मनमाड नांदेड व मनमाड दौंड अशा दोन गाड्या मनमाडाच्या दिशेने आलया तर अप व डाऊन दोन्ही रूळावर एकाच दिशेने गाड्या धावत आहेत असे दृश्य दिसते. वास्तविक दोन्ही मार्ग एकेरी व भिन्न दिशेला जाणारे आहेत पण काही अंतर हे समांतर असल्याने असा विचित्र प्रकार आपलयाला दिसतो.

काही वेळा घाटाचा डोंगर चढण्यासाठी पुरेसा पसरलेला डोंगर मिळाला नाही तर पायरी पद्धत वापरतात. मायनामारला आहे. १८८५.

* अप व डाऊन दोन्ही रूळावर एकाच दिशेने गाड्या धावत आहेत असे दृश्य >>>> रोचक . संधी मिळाल्यास जरूर पाहणार .

आता कल्याण / बोरीवली इकडे सहा रूळ झाल्याने एकाच वेळी तीन जाणाऱ्या ,दोन येणाऱ्या बाजुबाजूला दिसतात. पण मनमाडला गम्मतच.

वरील सर्व दुवे छान ! ट्रेन बदलून जो जोडप्रवास असतो, त्याच्या इ- तिकिटाचा अनुभव लिहितो. मागच्या वर्षी याबाबत नियमात एक चांगली सुधारणा झाली. समजा आपण अशी 2 तिकिटे काढली आहेत. जर का पहिली ट्रेन उशीरा पोचल्याने आपली पुढची चुकली, तर पुढच्या तिकिटाचे पैसे आपल्याला रेल्वे परत करते. पण….. यासाठी दुसरे तिकीट विशिष्ट प्रकारे काढावे लागते. त्याची सोय रेल्वे-app वर 'plan connecting journey' अशी आहे. तिथे आपण आपल्या पहिल्या तिकिटाचा PNR टाकायचा असतो. मग आपली सर्व माहिती पुढच्या तिकीटात आपोआप भरली जाते. …… ही यंत्रणा छान केली आहे, पण….. ते app बऱ्याच वेळा गंडलेले असते ! त्याचा खूप त्रास होतो. शेवटी वैतागून आपण दुसरे तिकीट स्वतंत्रपणे काढतो. म्हणजेच जर पहिल्या ट्रेनला उशीर झाला तर आपले पुढचे नुकसान होणार. …. ते app कार्यक्षम व्हायची गरज आहे .

चौकटराजा, विल्यम व ग्रेट लूप्स रंजक आहेत. एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे त्यांच्या उंच्या जास्त वाटंत नाहीत. बहुतेक अतिशय अवजड मालगाड्या ओढून नेता याव्यात म्हणून कमी चढावाची अतिसर्पिल वळणे निर्माण केली आहेत. अर्थात, त्यामुळेच तर ती प्रेक्षणीय ठरलीत. मात्र हलक्या प्रवासी गाड्यांना इतक्या नागमोडी वळणांची गरज नसावी, असा अंदाज. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

लूप हा 2 डिग्री ग्रेडियंट मेंटेन करण्यासाठीच करायची आयडियेची कल्पना आहे !

In reply to by चौकटराजा

चौकटराजा, दोन अंश चढाव जरा जास्त वाटतोय का? पळसदरी ते खंडाळा हा बोरघाट तीव्र चढावाचा मानला जातो. किंमत काढली तर १.३३ अंश आली. अमेरिकी सर्पिलांचे चढाव शोधणे रंजक ठरावे. आ.न., -गा.पै.

मला अजून 'सर्क्युलर जर्नी' तिकिट काढणे जमले नाही. माझा मार्ग त्यांनी दिलेल्या नियमांत बसवता येतो किंवा बसतो तरीही मी तशी तिकिटं न काढता वेगवेगळीच काढली आहेत. आमच्या इमारतीतील शेजारी त्यांच्या धार्मिक यात्रा करणाऱ्या गटातून जातो. त्याने मला फॉर्मही दिला आणि कसं करायचं सांगितलं परंतू केलं नाही.

भारतीय रेल्वे भविष्यात नव्या इंधनावर धावू शकेल. या तंत्राला hydrogen-powered fuel cell-based train. असे म्हणतात. अशा इंजिनाचे कार्बन उत्सर्जन शून्य मानले जाते. नुकतेच हे संशोधन आंध्र च्या अमरावती येथील विद्यापीठात सुरू करण्याचे सूतोवाच झाले. या संशोधनास शुभेच्छा !

करोना उपचार आणि रेल्वेचे योगदान भारतीय रेल्वेनं करून दाखवलं! https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2120762/coronavirus-in-i… ही चित्रमाला जरूर पाहा. हार्दिक अभिनंदन !

काही वर्षांपूर्वीची घटना. तीन जणांनी ट्रेनच्या 2S डब्यातून प्रवासाची आरक्षित तिकिटे काढली होती. पूर्ण बसूनचा प्रवास होता. आयत्या वेळेस त्यांतील एक जण गळाला. ते तिकीट रद्द करायची वेळ टळून गेली होती. मग उरलेल्या दोघांनी ठरवले की तिघांच्या जागेत ऐसपैस बसून मधली जागा कुणाला द्यायची नाही. आता या डब्यात कायमच गर्दी आणि बिगरआरक्षितवालेही भरपूर. गाडी सुरु होताच अशांतील एकाने त्या रिकाम्या जागेची मागणी केली. या दोघांनी अशी भूमिका घेतली की आम्ही ३ जागांचे पैसे भरले आहेत. त्यामुळे त्या जागेवर आमचाच हक्क आहे. या डब्याच्या रचनेत ३ जणाना तसे खेटूनच बसावे लागते. मग डब्यातील उभे लोक त्यांच्याशी वादावादी करू लागले. त्यांनी माणुसकीचा मुद्दा काढला. नेमके तेव्हा पूर्ण प्रवासात तपासनीस आलेच नाहीत. त्या दोघांचा प्रवास इतरांशी धुसफूस करीतच झाला. यासंदर्भात नियम काय आहे याचा निवाडा काही झाला नाही. ........ हा प्रसंग आता मुद्दाम लिहीत आहे. सध्याच्या ‘सामाजिक अंतराच्या’ वातावरणात मला याबद्दल कुतूहल आहे. १. वरीलप्रमाणे ट्रेनमध्ये एखाद्या रिकाम्या जागेचे पूर्ण पैसे भरून ती आपण घेऊ शकतो का? अनोळखी व्यक्ती आपल्या जवळ येऊ नये म्हणून? २. की आरक्षित रिकामी जागा दुसऱ्याला द्यायचा तपासनिसांना अधिकार असतोच? ३. माणुसकी हा मुद्दा बरोबरच आहे, पण मला नियमाची उत्सुकता आहे. कोणाला माहिती आहे ?

रेल्वेचे माहिती नाही परंतु अत्यवस्थ रुग्णाला विमानातून न्यायचे असले तर तीन सीट बुक करतात आणि शेवटचा तीन जागा असलेला बाक काढून टाकतात आणि तेथें रुग्णाला झोपवले जाते. बाकी रेल्वेने द्वितीय वर्गाच्या 3 x 2 अशी संरचना काढून 3 x 3 अशी केल्यावर जागा खरंच अपुरी पडते. माझ्या सारख्या बारीक माणसाला अपुरी पडते तर शेजारी एखादी लठ्ठ बाई आली तर प्रवास फारच त्रासदायक होतो. कारण बऱ्याच वेळेस आशा बायका अंग सैल सोडून बसतात आणि मग "हगत्याला लाज की बघत्याला" या उक्तीप्रमाणे बाजूला बसलेल्या पुरुषाला "अंग चोरूनच" बसावे लागते. अर्थात लठ्ठ माणूस बसलेला असेल तर शेजारच्या स्त्रीला सुद्धा तसाच त्रास होतोच

सुबोध, माहितीसाठी धन्यवाद. खरंय, 2S डब्यातील तिघांची जागा ही खरे तर अडीच माणसांना पुरेल एवढीच आहे. त्यामुळे तिघात एक जरी जाड व्यक्ती आली की बाजूच्या माणसाची एकच मांडी आसनावर मावते ! तर खिडकीजवळच्याला अगदी दाबून बसावे लागते.

In reply to by हेमंतकुमार

सेकंड क्लास स्लीपर मधे ज्या 3 सीट्स असतात त्या तीन जणाना नीट पुरतात. समस्या अशी आहे की 72 सीटस ड्बयात आणखी 72 वेटिग लिस्ट वाले घुसतात त्यामुळे 3 च्या जागी निदान सीझन मधे सरसकट 4 सीटस असतातच . एरवी रेल्वे तुम्ही चुकलात तर दंड वसूल करते पण 72 च्या जागी फक्त 72 नाच परवानगी हे भारत देशात कदापिही शक्य नाही !

रेल्वेचा १६७ वा वाढदिवस ‘ऑनलाइन’ साजरा (https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/celebrate-railway-…) सर्व रेलप्रेमींना शुभेछा !

चौरा,
पण 72 च्या जागी फक्त 72 नाच परवानगी हे भारत देशात कदापिही शक्य नाही !
>> अगदी अगदी. निदान आपल्या हयातीत तरी. आता पुढचे १-२ महिने मात्र वेगळे चित्र दिसू शकेल. ७२च्या जागी ३६ वा ५४ ! कोविद निवळेपर्यंत बसायचे अंतर ठेवून तिकीटे देतील, असे जाहीर झाले होते. तसेच बिगर-आरक्षणवालेही नसतील. बघूया काय होतंय.

सध्याच्या ट्रेनचे प्रमुख इंजिन असलेले हे डब्ल्यू ए पी ७ या प्रकारचे इंजिन. नुकतीच त्याने आपल्या सेवेची 20 वर्षे पूर्ण केली. या इंजिना मुळेच लांब पल्ल्याच्या गाड्यांना 24 डबे लावता आले आणि गाडीचा वेगही वाढवता आला. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! ok

The frontline passenger locomotive, WAP7, a thousand of which haul important passenger trains today, completed 20 years in service on 10 May. But there was a time in 2002 when this fleet was on the verge of being scrapped. This is the story of how it was saved. https://swarajyamag.com/infrastructure/20-years-of-the-wap7-how-this-st… रेल्वे प्रेमींसाठी अतिशय रोमहर्षक कहाणी

In reply to by सुबोध खरे

धन्यवाद, ही कहाणी माहीत नव्हती. कधीकधी या ब्लॉगवर रेल्वे बद्दल चांगल्या सुधारणा/इतिहास वाचायला मिळतो. https://24coaches.com/

अजून एक दिमाखदार व शक्तिशाली इंजिन आपल्या मालवाहू सेवेत दाखल. ok वैशिष्ट्ये : १. 12000 HP ची ताकद २. पर्यावरणपूरक ३. भारतातील उष्णता पेलण्याची चांगली ताकद ४. उर्जाबचत अभिनंदन !

In reply to by हेमंतकुमार

गार्ड आणि लोकोमोटिव्ह ऑपरेटरचे काम कंटाळवाणे वगैरे असते का..? एकवेळ लो.ऑ.ला समोर बघून वेगवेगळी उपकरणे हाताळणे आणि वेग कमीजास्त करणे हे काम असेल पण गार्डचे काय..? एक स्टेशन सोडल्यानंतर दुसरे स्टेशन येईपर्यंत कांही काम असते का..?

गार्डबद्दल कल्पना नाही. पण लोको पायलटचे काम कंटाळवाणे असू शकत नाही. ते अत्यंत जबाबदारीचे आणि तणावाचे आहे. भारतात लोक व जनावरे रूळ ओलांडत असल्याने तर फारच ताण असतो. वर एका प्रतिसादात मी गणेश ल कुलकर्णी या पायलटांचा अनुभव लिहीला आहे.

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, हे मुंबईचं बॅलार्ड पियर मोल नामक स्थानक आहे का? गोलाकार नळकांड्याच्या छपरावरून ते तसं वाटतंय तरी. आ.न., -गा.पै.

दुमजली मालगाडी जाऊ शकेल असा पूर्ण विद्युतीकरण असलेल्या बोगद्याचे बांधकाम हरियानात चालू झाले. अशा प्रकारचा हा जगातला पहिला बोगदा असेल. ok अभिनंदन ! (https://www.livemint.com/news/india/indian-railways-constructing-world-…)

In reply to by हेमंतकुमार

लॅडीस बंद झाले काय आता? सुरुवातीला पोर्टर्स ढकलयाचे आणि नंतर छोटे डिझेल इंजिन असलेले लॅडीस असायचे ते नाहीत का?

In reply to by अभ्या..

आहेत. पुश ट्रॉली आणि मोटर ट्रॉली. पुश ट्रॉली सहसा इन्सपेक्टर दर्जाची माणसे वापरतात. मोटर ट्रॉली त्याहुन अधिक महत्वाच्या माणसां / कामांकरता. मोटर ट्रॉली चालवण्यासाठी सिग्नल द्यावा लागतो (इतर रेल्वेगाड्यांप्रमाणे)

In reply to by हेमंतकुमार

या आणि अशा वाहनांमुळे दोन रुळांमध्ये शॉर्ट सर्किट होते आणि सिग्नल यंत्रणेत अडथळा निर्माण होतो. भारतीय रेल्वेने असल्या जुगाडांना प्रोत्साहन देउ नये व योग्य सुरक्षित वाहने आपल्या कर्मचार्यांना द्यावित.

In reply to by हेमंतकुमार

रेल्वे काही आमचं ऐकत नाही ! :-) रेल्वेमंत्र्यांनीच ट्वीट करून माहिती दिलियं https://twitter.com/PiyushGoyal/status/1288487603864342528

In reply to by बोका

या आणि अशा वाहनांमुळे दोन रुळांमध्ये शॉर्ट सर्किट होते आणि सिग्नल यंत्रणेत अडथळा निर्माण होतो. भारतीय रेल्वेने असल्या जुगाडांना प्रोत्साहन देउ नये व योग्य सुरक्षित वाहने आपल्या कर्मचार्यांना द्यावित.
खुप मोठे वैग्युण्य नाही. एका बाजुचे चाक विद्युतप्रवाह रोधक धातुसंयुगाचे किंवा तत्सम मालाचे बनवले की अडचण सहज सुटेल.

मला वाटते की देखभालीचा एक माणूस पटकन कुठेही पोचण्यासाठी हे केले असावे. त्यात +/- आहेच. सुरक्षिततेचा मुद्दा आहे. बातमी इथे :

महाराष्ट्र-कर्नाटक जोडणाऱ्या टप्प्यातील भीमेवरच्या या पुलाचे काम प्रगतीपथावर आहे. ok (सौजन्य : मेट्रो रेल बातम्या).

“राज्यांतर्गत रेल्वे प्रवास सुरू होणार”, अशी बातमी एक सप्टेंबरपासून सगळीकडे झळकत आहे. म्हणून मी irctc संस्थळ आणि ॲप दोन्हीवर जाऊन पाहिले. तर तिथे मात्र गेल्या तीन महिन्यातील विशेष गाड्या सोडून अन्य काहीही दाखवले जात नाहीये. मला महाराष्ट्र राज्यामध्येच एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचे आहे, तर नेहमीच्या गाड्या दाखवतच नाहीत तिथे. मग राज्यांतर्गत प्रवास म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ?

रेल्वेचा खुलासा आलाय : देशभरात २०० विशेष रेल्वेगाडय़ा धावत आहेत. यातील मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात जाणाऱ्या १६ व येणाऱ्या १६ गाडय़ांचा समावेश आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी या विशेष गाडय़ांनाच महाराष्ट्रातील स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. याच गाडय़ांतून प्रवास होणार असून नियमित गाडय़ा मात्र सुरू के लेल्या नाहीत. https://www.loksatta.com/mumbai-news/8-thousand-501-tickets-reserved-fo…

92 वर्षे जुन्या असलेल्या मुंबई अमृतसर ट्रेन चे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले. या ट्रेनला बरेच ऐतिहासिक महत्त्व आहे भारताच्या फाळणीपूर्वी ही गाडी पेशावरपर्यंत धावत असे. ok

In reply to by हेमंतकुमार

स्वागतार्ह नुतनीकरण 👍 तेजसच्या बाबतीत घडलेला प्रकार स्मरणात असल्याने असेच नुतनीकरण/बदल गाडीच्या वापरकर्त्यांच्या मानसिकतेत देखील होवो अशी सदिच्छा!

In reply to by हेमंतकुमार

हो हीच ती जुनी फ्रण्टियर मेल! सुवर्ण मंदिर मेल नावावरून काही क्लिक होत नव्हते मग सर्च केले. नूतनीकरण म्हणजे एलएचबी चे डबे लावलेले दिसत आहेत. अजून काही केले आहे का? बाय द वे, डेक्कन क्वीनला ही नवीन डबे येणार आहेत, नवीन "लायव्हरी" - डब्यांवरचे ते विशिष्ठ रंग लावणार, व तिचा एकूणच प्रवासाचा वेळही कमी करायचे प्रयत्न सुरू आहेत असे वाचले. अगदी सुरूवातीला म्हणजे अडीच की पावणेतीन तासात ती पोहोचत असे. तेव्हा ८ डबे होते आणि बहुधा १७ आहेत. खरोखरच तितक्या वेळात आता जाउ शकली तर लोकांना कसार्‍यावरून मुंबईत येण्यापेक्षा पुण्याहून येणे जास्त सोयीचे होईल :) आणखी एक चांगली बातमी वाचली - पुणे ते नाशिक थेट मार्गाच्या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे व बहुधा जमीन संपादन आता सुरू होईल.

In reply to by हेमंतकुमार

फक्त याच गाडीचे नाही. उप्रकडे धावणाऱ्या बऱ्याच गाड्या नवीन डब्यांच्या आहेत. खिडक्या थोड्या लहान केल्यात, काचेचं शटर वर हलवायचं बदललं आहे आणि वरच्या स्लीपरवाल्यांसाठी आणखी एक मोबाइल चार्जींग पॉइंट बनवला आहे.

रेल्वे मध्ये खाजगी गुंतवणुकीला परवानगी मिळाली आहे असे कळते, हे खरे आहे काय? म्हणजे रेल्वे खाजगी कंपनीची असेल आणि ती रेल्वेचे नेटवर्क वापरून पळवण्यात येईल. त्यामुळे स्वछता, कमी गर्दी आणि चांगली सेवा मिळेल काय?

In reply to by चामुंडराय

यापेक्षा रेल्वे भाड्याने देण्याचा विचार आहे. म्हणजे एखादी फेरी विकत घ्यायची प्रवासी कंपनीने आणि रेल्वेला एकरकमी पैसे द्यायचे. त्यात कुणाला कितीला तिकिट लावायचे हे प्रवासी कंपनीला स्वातंत्र्य. तशी एक चालू होती.

होय, बरेच महिने झाले तसे होऊन. मध्ये तर अशी एक ‘खाजगी’ गाडी काही तास उशीरा पोचल्याने प्रवाशांना आर्थिक भरपाई देखील मिळाली होती. ऑक्टोबर २०१९ मधील बातमी : (आयआरसीटीसीनुसार, तेजस एक्स्प्रेसला एक तासांहून थोडाफार उशीर झाल्यास प्रवाशांना 100 रुपये भरपाई आणि दोन तासांहून अधिक उशीर झाल्यास 250 रुपये भरपाई मिळेल. देशात पहिल्यांदाच एखाद्या ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना भरपाई मिळणार आहे.)

यात सुधारणा हवी आहे. म्हणजे बसच्या सीट्स बेकार आहेत. खाली सामान राहात नाही.सीटखाली ठेवलेल्या छोट्या ब्यागेवर मागचा प्रवाशी पाय ठेवतो. वरच्या ऱ्याकवर सामान ठेवण्यावरून भांडणे होतात. इतर एक्सप्रेस ट्रेनसमध्येही असले डबे अनरिझवसाठी टाकले आहेत. जुने टु टिअर स्लीपर फार चांगले होते. गर्दीच्यावेळी २२ प्रवासी बसू शकत आरामात. खिडकीकडच्या प्रवाशास बाजुच्या दोघांना हलवल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. जुनीच अमोरासमोर बसण्याची पद्धत बरी होती.

पुणे ते नाशिक थेट मार्गाच्या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे व
>>> अरे वा, छान बातमी !
जुनीच अमोरासमोर बसण्याची पद्धत बरी होती
.>>> बरोबर.

अरे वा ! आता रेल्वे पर्यावरण पूरक होत जाणार. हे पहा बॅटरीवर चालणारे एक शंटिंग इंजिन दक्षिण रेल्वेच्या ताफ्यात दाखल ok

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, भारिका ( = ब्याटरी ) पर्यावरणपूरक कशी? जरा उलगडून सांगावं ही विनंती. आ.न., -गा.पै.

भारिका ( = ब्याटरी ) पर्यावरणपूरक कशी
>>> डीझेलचा वापर दोन प्रकारे प्रदूषण करतो : १. प्रत्यक्ष इंधन उत्पादन करताना २. त्यावरील वाहन चालवताना. भारिका वापर करताना वरील २ चा मुद्दा थांबतो. बाकी..... १००% पर्यावरणपूरक (इंधन) जगात काहीही नाही याची नोंद घ्यावी. तुलनात्मक बघायचे असते.

In reply to by हेमंतकुमार

कुमारेक, जोऱ्याच्या वर विजेच्या तारा दिसताहेत. मग भारिकाभूत जोऱ्याचं ( = इंजिनाचं ) प्रयोजन काय, असा प्रश्न पडतो. आ.न., -गा.पै.