कठीण कठीण...किती (उत्तरार्ध)
यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis) : उत्तरार्ध
पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45731#new
...................
मागील भागात आपण या आजाराची कारणमीमांसा पाहिली. बऱ्याच रुग्णांत हा आजार दीर्घकालीन होतो. आता एक मुद्दा ध्यानात घ्यावा. शरीरातील बरीच महत्वाची प्रथिने यकृतात तयार होतात. त्यामुळे या आजारात त्या प्रथिनांचे उत्पादन खूप कमी होते. यापैकी दोन महत्वाची प्रथिने ही आहेत:
१. अल्बुमिन : हे आपल्या रक्तात संचार करत असते आणि त्यातल्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते.
२. रक्त गोठण्यासाठीची प्रथिने : जेव्हा आपल्याला जखम होऊन रक्तस्त्राव होतो तेव्हा ही प्रथिने रक्त गोठवून रक्तस्त्राव थांबवतात.
या दीर्घकालीन आजारात प्रथिनांचे घटलेले उत्पादन, चयापचयातील बिघाड अशांमुळे शरीरात व्यापक बिघाड सुरु होतात. रक्तात सोडियमचे प्रमाण वाढते, पाण्याचे उत्सर्जन कमी होते आणि रक्तात ते प्रमाणाबाहेर वाढते. त्यातून आजाराची गुंतागुंत होते. आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील घटना घडू शकतात:
१. जलोदर : आपल्या पोटातील सर्व इंद्रियांच्या बाजूने एक उदरवेष्टण (peritoneum) असते. त्याच्या दोन थरांमध्ये जेव्हा खूप पाणी जमा होते त्याला जलोदर असे म्हणतात. काही रुग्णांत या साठलेल्या द्रवात जंतूसंसर्ग होतो. जलोदर मोठ्या प्रमाणात झाल्यास रुग्णास हर्नियाची व्याधी होऊ शकते.
२. मूत्रपिंडावर परिणाम : यकृताचे ढासळते कार्य, जलोदर आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड झाल्याने आता त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होतो. आता उत्सर्जन प्रक्रिया अजून मंदावते.
३. मेंदूकार्यातील बिघाड : हा परिणाम गंभीर असतो. त्याची पूर्वपिठिका समजून घेऊ.
आपल्या शरीरात चयापचयातून अनेक घातक रसायने तयार होतात. प्रथिनांपासून तयर होणारा अमोनिया हे त्यातले एक ठळक उदाहरण. निरोगी यकृतात या अमोनियाचे रुपांतर युरिआत केले जाते. त्यामुळे रक्तात अमोनियाचे प्रमाण अत्यल्प राहते. दीर्घकालीन यकृत आजारात ही महत्वाची प्रक्रिया खूप मंदावते. त्यामुळे रक्तात अमोनियादि बऱ्याच रसायनांचे प्रमाण खूप वाढते. मग ही रसायने रक्तातून मेंदूत सहज पोचतात. तिथे ती चेतातन्तूंच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. सोप्या शदांत सांगायचे तर ती मेंदूतील ‘सिग्नल’ यंत्रणा पार बिघडवून टाकतात. परिणामी रुग्णाची बौद्धिक आणि आकलनक्षमता कमी होते. तो असंबद्ध बोलू लागतो. नंतर झापड आणि गुंगी येते. बिघाड तीव्र झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो.
४. रक्तवाहिन्यांवरील परिणाम : यकृतातील अंतर्गत बिघाडामुळे पचनसंस्थेशी संबंधित रक्तवाहिन्यांतील (portal) दाब वाढतो. त्यातून बऱ्याच रक्तवाहिन्या फुगतात. अन्ननलीकेच्या, हिरड्यांतील तसेच नाकातील वाहिन्या ही काही उदाहरणे. कालांतराने त्या वाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.
५. हॉर्मोन्सचे बिघाड : चयापचयातील बिघाडाने लैंगिक हॉर्मोन्सचे असंतुलन होते. पुरुषांतील हॉर्मोनचे वाढत्या प्रमाणात स्त्री-हॉर्मोनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे अशा पुरुषात स्तनवृद्धी, नपुसकत्व ही लक्षणे दिसू शकतात.
६.अन्य परिणाम : काही रुग्णांना कावीळ होते. याव्यतिरिक्त त्वचेखाली लाल पुटकुळ्या किंवा चट्टे, त्वचा खाजणे, स्नायूंची झीज, वजन कमी होणे, रक्तन्यूनता इत्यादी लक्षणे दिसू शकतात.
७. दीर्घकालीन धोके: हा आजार दीर्घकाळ राहिल्यास काही रुग्णांना यकृताचा कर्करोग होऊ शकतो. तर अन्य काहींत जठरातील व्रण (ulcer), मधुमेह आणि पित्तखडे हे आजार उद्भवू शकतात.
प्रयोगशाळा चाचण्या :
या आजारात यकृताची कार्ये एकामागून एक ढासळत जातात. त्यांचे मूल्यमापन रुग्णाच्या काही रक्तचाचण्यांवरून करता येते. त्यातील काही प्रमुख चाचण्या अशा आहेत:
१. बिलीरुबीन पातळी : ही बराच काळ नॉर्मल असते पण आजार जास्ती वाढला की तिच्यात वाढ होते. ( बिलीरुबीनवरील स्वतंत्र लेख इथे आहे : https://misalpav.com/node/41676)
२. विशिष्ट एन्झाइम्स ( AST, ALT) ची पातळी काही प्रमाणात वाढते.
३. अल्बुमिनची पातळी बरीच कमी होते.
४. रक्त गोठण्याशी संबंधित चाचण्या (PT, PTT) : या आजारात संबंधित प्रथिनांचे प्रमाण बरेच कमी होते. त्यामुळे या चाचण्यांत बिघाड दिसून येतो.
अतिविशिष्ट चाचण्या : प्रत्येक रुग्णाचे मूल्यमापन करून गरज भासल्यास त्या करता येतात. त्यापैकी एक महत्वाची म्हणजे यकृताची ‘बायोप्सी’ ही होय. यात सुईद्वारा यकृताचा छोटासा तुकडा काढून त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी होते. त्यात पेशींची सखोल माहिती मिळते.
उपचारांची रूपरेषा
यकृत-कठीणता ही दीर्घकालीन अवस्था आहे. तिची कारणे अनेक आहेत. यकृताचा विशिष्ट आजार झाला असता योग्य ते उपचार वेळेत घेतल्यास या अवस्थेचा प्रतिबंध करता येतो. मद्यपिंनी मद्य वर्ज्य करणे, विषाणू संसर्गात त्याविरोधी औषधे घेणे इत्यादी उपचार करावेत. मात्र एकदा का कठीणता झाली की संबंधित उपचारांचा विशेष उपयोग होत नाही.
आता आजारातून कुठली गुंतागुंत निर्माण होते, त्या दिशेने उपचार करावे लागतात. तसेच रुग्णाच्या लक्षणांनुसार संबंधित उपचार करतात. अशा सर्व प्रकारच्या उपचारांबद्दल लिहिणे हे या लेखाच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्याची गरजही नाही.
(या लेखाची व्याप्ती फक्त आधुनिक वैद्यकातील उपचारांपुरती मर्यादित आहे. तथापि वाचकांनी त्यांना अन्य पद्धतीचे अनुभव असल्यास प्रतिसादांत जरूर लिहावेत).
आहार आणि आहारपूरके
या रुग्णांची भूक खूप मंदावलेली असते आणि अन्नपचनही नीट होत नसते. त्यांना दिवसातून अनेक वेळा थोडेथोडे अन्न देतात. त्यातून मिळणारे एकूण उष्मांक, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण हे काळजीपूर्वक पहिले जाते. बऱ्याच रुग्णांत जस्ताची (zinc) कमतरता होते. त्यांना जस्ताच्या गोळ्या देतात. ज्या रुग्णांना प्रत्यक्ष आहार मानवत नाही त्यांना पौष्टिक कृत्रिम पावडरी देतात.
अशा प्रकारे विविध उपचार चालू असताना रुग्णांची नियमित तपासणी आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या निष्कर्षानुसार रुग्णाचे गुणांकन (score) केले जाते. त्यानुसार त्याच्या भवितव्याचा अंदाज करतात. काही रुग्णांत यकृताच्या काही पेशी चांगल्या असतात आणि त्यांपासून निरोगी पेशींची निर्मिती होत राहते. असे रुग्ण रोगलक्षणांपासून मुक्त राहतात. मात्र काही रुग्णांत परिस्थिती बिघडत जाते. त्यांना सतत कावीळ असते आणि त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. याला आजाराची भरपाईरहित (decompensated) अवस्था म्हणतात. अशांना आता औषधांचा उपयोग होत नाही. त्यांचा यकृत प्रत्यारोपणासाठी विचार केला जातो.
यकृत प्रत्यारोपण
जेव्हा रुग्ण वरील उपचारांना दाद देत नाही आणि त्याचे यकृतकार्य खूप खालावू लागते तेव्हा याचा विचार केला जातो. अर्थात त्यासाठी रुग्णाची हृदय व फुफ्फुसकार्ये व्यवस्थित आहेत ना, हे पहिले जाते. या उपचारासाठी दात्याची निवड २ प्रकारे होऊ शकते:
१. जिवंत निरोगी व्यक्ती : तिच्या शरीरातून यकृताचा काही भाग शस्त्रक्रियेने काढला जातो. हा पर्याय तसा उत्तम आहे पण यात काही कटकटीही होऊ शकतात. दात्यावर शस्त्रक्रिया करताना काही गंभीर गुंतागुंती होण्याची शक्यता असते. असे काही दाते नंतर मृत्यू पावले आहेत.
२. मृत्यूच्या उंबरठ्यावरील व्यक्ती : ही व्यक्ती अशी असावी लागते- तिच्या हृदयाचे स्पंदन थांबलेले आहे पण अद्याप ती ‘मेंदूमृत’ या व्याखेत बसणारी नाही.
अवयवदान या विषयाला अनेक पैलू आहेत. रुग्णाच्या दृष्टीने तो सर्वोत्तम उपाय असतो. पण, दात्यांची पुरेशी उपलब्धता, सुयोग्य जुळणी, दाता व रुग्ण या दोघांना असलेले शस्त्रक्रियेचे धोके हे सर्व वाटते तितके सोपे नसते. प्रचंड तणावाखाली ही जोखमीची कामे करावी लागतात. त्यादृष्टीने अन्य काही पर्यायांचा विचार वैद्यकविश्वात होत आहे. सध्या हे विषय प्रायोगिक अवस्थेत आहेत. त्याचा हा आढावा :
• निव्वळ पेशी प्रत्यारोपण : यात निरोगी व्यक्तीतील यकृताच्या फक्त पेशी प्रयोगशाळेत अतिथंड तापमानात साठवून ठेवतात. योग्य रुग्णाची निवड झाल्यावर अशा कोट्यावधी पेशी रुग्णाच्या प्लिहेत (spleen) सोडल्या जातात. कालांतराने ती प्लिहा यकृताचे काम करू लागते !
• जैवतंत्रज्ञानाने जैविक-कृत्रिम यकृत तयार करणे.
• प्राण्यांच्या यकृताचे मानवात प्रत्यारोपण : यासाठी डुक्कर हा प्राणी सुयोग्य आहे. त्याचे यकृत आपल्यात सामावून घेण्याची शक्यता बरीच आहे.
समारोप
आपल्या पोटातील यकृत चयापचय आणि इतर अनेक कामांत महत्वाची मध्यवर्ती भूमिका निभावते. त्याचे काही आजार दीर्घकालीन होतात आणि त्यातून कठीणतेची अवस्था येते. तिच्या तीव्रतेनुसार तिचे परिणाम मेंदूसह अन्य महत्वाच्या इंद्रियांवर होतात. एका मर्यादेपर्यंत यकृत त्याचे कार्य याही परिस्थितीत काही प्रमाणात निभावते. पण ती मर्यादा संपल्यास ते पूर्णपणे निकामी होते. तेव्हा प्रत्यारोपण हाच उपाय उरतो. समाजात या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे सर्व पाहता कठीणतेच्या अवस्थेला अटकाव करणे हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. म्हणून यकृताच्या आजारांत हयगय न करता तज्ञांकडून वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत.
**********************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Dhanywad
धन्यवाद
धन्यवाद
छान लेख
छान ओळख होते आहे.
लिव्हर सिर्र्होसीस किंवा
धन्यवाद ,
यकृतकाठिन्य
खोड !
वाईट गोष्ट म्हणजे त्याच्या
यावरुन एक आठवले. मुक्तपीठ मधे
छान माहिती. ...
पूर्वार्ध वाचतांनाच ......
अगदी मनातलं बोललात ....
आपणास 94 वर्षे निरस आयुष्य हवे
आशा किती निरोगी व्यक्ती खेळाडू आहेत
आर आर पाटील, विलासराव देशमुख,
हम्म... मी वैयक्तिक कांगोरा हुडकत असता
+१
+१
मति गुंग करणारी अवस्था
...
हाच तर मुद्दा आहे
@ कुमार१,
शब्द कुतुहल..
भरपाईरहित बरोबर वाटतो
गा पै, धन्यवाद .
किंचित फरक ....
समारोप
दोन्ही भाग उत्तम माहितीपूर्ण!