✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जिवंत पण जाणीवरहित

ह
हेमंतकुमार यांनी
Wed, 05/29/2019 - 07:21  ·  लेख
लेख
बेशुद्ध पडलेला रुग्ण हा त्याच्या कुटुंबीयांसाठी धडकी भरवणारा विषय असतो. अचानक आलेली बेशुद्धी ही तर अधिक चिंताजनक असते. ही अवस्था नक्की कशामुळे येते हे सामान्यांना नीट समजले नाही तरी तिचे गांभीर्य कळते. तिच्या मुळाशी मेंदूच्या कार्यातील विशिष्ट बिघाड असतो. या बिघाडाची अनेक कारणे असतात. त्यामध्ये विविध आजार, गंभीर अपघात, व्यसनांचा अतिरेक आणि काही औषधांचे प्रमाणाबाहेर सेवन यांचा समावेश होतो. बेशुद्ध रुग्णास शुद्धीवर आणणे हे डॉक्टरसाठी एक आव्हान असते. ते पेलत असताना त्याला आपले वैद्यकीय कौशल्य अगदी पणाला लावावे लागते. बेशुद्धावस्थेची विविध कारणे, संबंधित रुग्णतपासणी व त्याचे निष्कर्ष आणि अशा रुग्णाचे भवितव्य या सगळ्यांचा आढावा या लेखात घेत आहे. सुरवातीस आपली जागृतावस्था आणि मेंदूचे संबधित कार्य यांची माहिती देतो. त्यातून पुढे माणूस बेशुद्धावस्थेत कसा जातो हे समजेल. pict लेखातील विवेचन खालील मुद्द्यांच्या आधारे असेल: १. जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य २. बेशुद्धावस्थेची कारणे ३. रुग्णतपासणी ४. उपचार, आणि ५. रुग्णाचे भवितव्य जागृतावस्था आणि मेंदूचे कार्य: हे समजण्यासाठी मेंदूची संबंधित रचना जाणली पाहिजे. ढोबळपणे मेंदूचे ३ भाग असतात: मोठा मेंदू, छोटा मेंदू आणि मेंदूची नाळ (stem). मोठ्या मेंदूच्या बाहेरील आवरणाला cortex असे म्हणतात. हा भाग जैविकदृष्ट्या सर्वात उत्क्रांत असतो. तिथे सर्व मज्जातंतूंच्या संदेशांचे एकीकरण होते. pict याउलट मेंदूची नाळ ही जैविकदृष्ट्या सर्वात प्राचीन भाग आहे. तिच्यामध्ये RAS नावाची एक ‘सक्रीय यंत्रणा’ असते. तिच्यातील मज्जातंतूंत सतत काही रासायनिक क्रिया होतात. त्यातून cortexला संदेश जातात. RAS आणि Cortex यांच्या समन्वयातून आपली जागृतावस्था टिकवली जाते. जेव्हा कुठल्याही कारणाने या यंत्रणेवर विपरीत परिणाम होतो, तेव्हा संबंधिताची शुद्ध जाऊ शकते. बेशुद्धावस्थेची कारणे: अनेक प्रकारचे आजार आणि डोक्याला जबरी मार बसणारे अपघात यांमध्ये व्यक्ती बेशुद्ध होते. काही प्रमुख कारणे आता समजून घेऊ. १. मेंदूच्या रक्तपुरवठ्यातील अडथळा: याची दोन कारणे आहेत : अ) रक्तवाहिन्या त्यांच्यात साठलेल्या मेद-थरांमुळे आकुंचित वा बंद होणे (Stroke) आ) रक्तवाहिनी फुटणे. या कारणामुळे येणारी बेशुद्धी ही बरेचदा अचानक येते. बऱ्याचदा अशा रुग्णांना लकवा / पक्षाघात झालेला असतो. २. अपघात : बऱ्याच वाहन अपघातांत डोक्यास जबरी मार लागतो. तसेच डोक्यावर कठीण वस्तूचा जोराचा प्रहार हेही महत्वाचे कारण आहे. ३. औषधांची विषबाधा: मेंदूला गुंगी आणणारी औषधे (प्रामुख्याने opium गट) आणि अन्य घातक पदार्थ अतिरिक्त प्रमाणत घेणे. हे मुख्यतः व्यसनी लोकांत आढळते. तसेच आत्महत्या वा खून करण्यासाठी देखील यांचा वापर होतो. जवळपास ४०% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते. ४. हृदयक्रिया बंद पडणे: हृदयविकाराचा तीव्र झटका व अन्य काही आजारांत जर हृदयस्पंदन थांबले (arrest) तर मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होतो. जवळपास २५% बेशुद्ध रुग्णांत हे कारण सापडते. ५. जंतूसंसर्ग: विशिष्ट जिवाणू आणि विषाणूंमुळे मेंदूदाह किंवा मेंदूच्या आवरणांचा दाह होतो. हे आजार गंभीर असतात. ६. ग्लुकोजच्या रक्तपातळीचे बिघाड: मेंदूला ग्लुकोजचा योग्य प्रमाणात पुरवठा सतत आवश्यक असतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी अति वाढणे अथवा कमी होणे या दोन्ही कारणांमुळे बेशुद्धावस्था येते. आता ही दोन्ही कारणे विस्ताराने बघू. अ) ग्लुकोजची पातळी अति वाढणे : याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अनियंत्रित मधुमेह. जेव्हा ग्लुकोजची पातळी खूप वाढते तेव्हा शरीरातील भरपूर पाणी मूत्रावाटे निघून जाते (dehydration). त्यातून एकूण रक्तपुरवठा खूप मंदावतो(shock). तसेच अशा रुग्णास खूप उलट्याही होत असतात. त्यातून दुष्टचक्र होऊन परिस्थिती अजून बिघडते. आ) ग्लुकोजची पातळी खूप कमी होणे: जेव्हा ही पातळी ४० mg/ dL चे खाली जाऊ लागते तेव्हा मेंदूच्या कार्यात बिघाड होऊ लागतो. जर का ती २० mg इतकी खाली गेली तर रुग्ण बेशुद्ध होतो. ही पातळी कमी होण्याची प्रमुख कारणे अशी: मधुमेहीने घेतलेला इन्सुलिनचा अतिरिक्त डोस, स्वादुपिंडातील अति-इन्सुलिन निर्माण करणाऱ्या गाठी, यकृत आणि मूत्रपिंडाचे तीव्र आजार आणि फाजील मद्यसेवन. मद्यपी लोकांत मद्यपानाच्या जोडीला अन्य व्यसनी पदार्थांचे सेवन सुद्धा असू शकते. तसेच असे लोक जबरी वाहन अपघातालाही आमंत्रण देतात. ७. चयापचयातील अन्य बिघाड: यामध्ये रक्तातील सोडियमची पातळी खूप कमी वा जास्त होणे आणि काही हॉरमोनचे बिघाड यांचा समावेश आहे. ८. अपघाती विषबाधा: यामध्ये मुख्यतः कार्बन मोनोऑक्साइड व शिसे यांचा समावेश आहे. खाणी किंवा गटारातील कामे करणाऱ्यांना कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा होऊ शकते. हा वायू आपल्या रक्तात हिमोग्लोबिनला घट्ट चिकटतो आणि त्यामुळे असे हिमोग्लोबिन ऑक्सिजनचे वहन करू शकत नाही. रुग्णाची शारीरिक तपासणी: सर्वप्रथम रुग्णाचे नातेवाईकांकडून त्याचा इतिहास जाणून घेणे महत्वाचे असते. यात व्यसनाधीनता, पूर्वीचा आजार, औषधे आणि अपघात या माहितीचा समावेश होतो. प्रत्यक्ष तपासणी करताना डोक्याला मोठी जखम आहे का आणि हातापायाच्या त्वचेवर सुया टोचल्याच्या खुणा पाहतात. मग रुग्णास चिमटे काढून तो काही प्रतिसाद देतो का अथवा डोळे उघडतो का, हे पाहतात. तसेच मनोरुग्णांचे बाबतीत ते बेशुद्धीचे सोंग करीत नाहीत ना, हेही पहावे लागते. शरीर-तापमान पाहणे महत्वाचे. रुग्णाच्या नाडी आणि श्वसनाची गती आणि ताल हे काळजीपूर्वक पहिले जाते. दोन्ही डोळ्यातील बाहुल्यांचा आकार आणि त्यांनी टॉर्चच्या प्रकाशाला दिलेला प्रतिसाद पाहणे हेही महत्वाचे ( विशेषतः ओपियम गटातील रसायनांची विषबाधा झाली असल्यास). निरोगी डोळ्याच्या बाहुल्या : pict ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या : pict याव्यतिरिक्त रुग्णाचे विविध प्रतिक्षिप्त प्रतिसाद तपासले जातात. पूर्ण शारीरिक तपासणीनंतर बेशुद्धीची खात्री केली जाते आणि तिची तीव्रता ठरवली जाते. आता पुढची पायरी म्हणजे बेशुद्धीचे कारण ठरवणे. त्यासाठी विविध प्रयोगशाळा आणि प्रतिमाचाचण्या कराव्या लागतात. प्रयोगशाळा चाचण्या १. रक्त: यावरील चाचण्या ३ गटांत मोडतात. रक्तनमुन्यात खालील रासायनिक घटक गरजेनुसार मोजले जातात. अ) ग्लुकोज, कॅलशियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, युरिआ आणि क्रिअ‍ॅटिनिन. आ) ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण, अमोनिआ इ) विशिष्ट औषधांचे प्रमाण २. पाठीच्या मणक्यातील द्रव (CSF) : जेव्हा मेंदूच्या जंतूसंसर्गाची शक्यता वाटते तेव्हा ही तपासणी केली जाते. त्यात जंतूंचा शोध घेणे आणि काही रासायनिक चाचण्या करतात. प्रतिमा चाचण्या यात मुख्यत्वे CT अथवा MRI स्कॅन आणि EEG (मेंदू-विद्युत आलेख) यांचा समावेश असतो. त्यातून मेंदूला झालेल्या इजेबद्दल सखोल माहिती मिळते. वरीलपैकी योग्य त्या चाचण्या झाल्यावर बेशुद्धीचे निदान केले जाते. आता त्यानुसार उपाय केले जातात. उपचार आणि रुग्णाचे भवितव्य अशा रुग्णांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवले जाते. त्यांच्यावर उपचार करताना प्रथम त्यांच्या श्वसन व रक्ताभिसरण या मूलभूत क्रियांवर लक्ष केंद्रित केले जाते. गरजेनुसार रुग्णाच्या श्वासनलिकेत नळी घातली जाते. तिचा उपयोग कृत्रिम श्वसन देण्यासाठी होतो. बेशुद्धीच्या कारणानुसार शिरेतून औषधे देऊन उपचार केले जातात. आता रुग्ण शुद्धीवर कधी येणार हा कळीचा प्रश्न असतो. त्याचे उत्तर मेंदूस किती प्रमाणात इजा झाली आहे, यावर ठरते. ती मध्यम स्वरूपाची असल्यास काही दिवसांत रुग्ण शुद्धीवर येतो. मात्र ती गंभीर स्वरूपाची असल्यास तो महिनोंमहिने बेशुद्धीत राहू शकतो. त्यानंतर पुढे ३ शक्यता असतात: १. काही रुग्ण बरे होतात २. काही मृत्यू पावतात, तर ३. काही vegetative अवस्थेत राहतात. vegetative अवस्था आता ही अवस्था आणि निव्वळ बेशुद्धावस्थेतील फरक समजून घेऊ. बेशुद्ध माणूस निद्रिस्त आणि जाणीवरहित असतो. तर vegetative अवस्थेतील माणूस हा “जागा” असला तरी पूर्णपणे ‘जाणीवविरहित’ असतो. असे रुग्ण हे वेळप्रसंगी डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करू शकतात. तसेच ते ‘झोपी जाणे’ आणि ‘जागे होणे’ या अवस्थांतून जाऊ शकतात. पण, त्यांना कुठलेही आकलन (cognition) होत नाही. एक प्रकारे ही ‘जागृत बेशुद्धावस्था’ (coma vigil) असते ! म्हणजेच असा रुग्ण हा केवळ कागदोपत्री जिवंत पण काहीही समजण्यास वा करण्यास असमर्थ असतो. असा रुग्ण जर या अवस्थेत १ महिन्याहून जास्त काळ राहिला तर तो कायमच्या अशा अवस्थेत गेल्याची नोंद होते. त्यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांना त्या रुग्णावरील सर्व ‘जीवरक्षक उपाय यंत्रणा’ बंद करण्याची कायदेशीर परवानगी (काही देशांत) मिळते. *** अनेक प्रकारचे अपघात, गंभीर आजार, व्यसनांचा अतिरेक अशा अनेक प्रसंगांत माणूस बेशुद्ध होतो. आपल्या कोणाच्याही कुटुंब अथवा परिचयातील व्यक्तीवर अशी वेळ येऊ शकते. अशा दुःखद प्रसंगाला सामोरे जाताना आपल्याला मनोबल वाढवावे लागते. त्या दृष्टीने बेशुद्धावस्थेची मूलभूत माहिती या लेखात दिली आहे. वाचकांना ती उपयुक्त वाटेल अशी आशा आहे. ************************************************************* 'vegetative ' (अवस्था) साठी मराठी शब्द जरूर सुचवावा ही वि.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
66452 वाचन

💬 प्रतिसाद (106)

प्रतिक्रिया

जोडप्रश्न

मराठी कथालेखक
Sun, 06/02/2019 - 20:47 नवीन
वैद्यकीय इच्छापत्र (मेडिकल विल) संदर्भाने काय्द्यात काही उपकलमे आहेत का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

सख्खे नातेवाईक आणि फॅमिली

नावातकायआहे
Mon, 06/03/2019 - 21:42 नवीन
सख्खे नातेवाईक आणि फॅमिली डॉक्टर यांनी संमती अर्ज सही करून दिल्यास जीवरक्षक उपाय यंत्रणा बंद करता येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक

म.क., धन्यवाद

हेमंतकुमार
Sun, 06/02/2019 - 21:36 नवीन
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मला कायद्याचे वाचन करून द्यावी लागतील. सवडीने प्रयत्न करतो.
  • Log in or register to post comments

सन्मानाने मरण्याचा हक्क

हेमंतकुमार
Mon, 06/03/2019 - 09:47 नवीन
@म.क., लोळागोळा अवस्थेतील रुग्णाच्या जीवरक्षक यंत्रणा कधी काढून घ्याव्यात, याबाबत कायद्यात संदिग्धता आहे. किंबहुना ही जगभरात आहे. जालसंदर्भ चाळताना एक जाणवते की याबाबत भारतातील कायद्यातील एखाद्या कलमाचा थेट उल्लेख नसतो. विविध लोकांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका-निकालांचे काही संदर्भ मिळतात. अशाच एका याचिकेत न्यायालयाने असे म्हटले आहे: “ अशा रुग्णाच्या जीवरक्षक यंत्रणा काढून घेणे म्हणजे त्याला सन्मानाने मरण्याचाच हक्क आपण देतो. त्याच्या देहात नैसर्गिक मृत्यूची प्रक्रिया आधीच चालू झालेली असते. त्याच्या यंत्रणा आपण काढून घेण्याने त्याच प्रक्रियेला आपण फक्त गती देतो.” .... अशा ज्या रुग्णांचे बाबतीत कोणीच न्यायालयात जात नाही ते रुग्ण वर्षानुवर्षे त्या अवस्थेत पडून असतात. या विषयावर कोणी कायदा जाणकारानेच माहिती दिलेली बरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

काही गोष्टी विपरीत घडतात

Rajesh188
Sun, 06/02/2019 - 22:20 नवीन
माझा जवळचा मित्र लहान पणापासून सर्व गोष्टी एकमेकात share करणारे कोणतीच गोष्ट लपवत नाही . त्याचे जेवण ज्वारीची भाकरी ,आणि सर्व कड धान्य . पिझ्झा, चीझ,बटर ,बिलकुल नाही . रोज व्यायाम . घरची आर्थिक आणि कोटांबिक स्थिती अती उत्तम. कोणतेच व्यसन नाही वय ४५, तरी अशा व्यक्तीला अँजिओप्लास्टी करावी लागली . ९० percent blockages आहेत . सायन्स कडे ह्याचे काय उत्तर आहे . त्या उलट सर्व व्यसन करणारे .सर्व junk food खाणारे मस्त लाईफ जगत आहेत
  • Log in or register to post comments

मुद्देसूद तरीही रोचक पद्धतीने

अनिंद्य
Mon, 06/03/2019 - 12:26 नवीन
मुद्देसूद तरीही रोचक पद्धतीने लिहिता तुम्ही डॉक, लेख आवडला. कुठल्याही कारणाने दीर्घकाळ कोमात राहावे लागल्यास 'सन्मानाने मरणाचा' हक्क मला अगदी हवाच आहे :-) पु ले शु
  • Log in or register to post comments

अनिंद्य, धन्यवाद

हेमंतकुमार
Mon, 06/03/2019 - 13:51 नवीन
अनिंद्य, धन्यवाद आणि सहमती. सन्मानाने मरण्याचाच हक्क जगातील सर्वांनाच मिलो हीच माझीपण इच्छा.
  • Log in or register to post comments

आमच्याकडून दंडवत स्वीकारा

खिलजि
Mon, 06/03/2019 - 15:56 नवीन
आमच्याकडून दंडवत स्वीकारा कुमारसाहेब ... सुंदर माहितीपूर्ण लेख आणि तोही समजेल अश्या सहजसोप्या भाषेतून .. आणि हो सुंदर प्रतिसादांसाठीहि धन्यवाद ..
  • Log in or register to post comments

@ कुमार१

खिलजि
Mon, 06/03/2019 - 16:05 नवीन
डॉक्टर मला एक प्रश्न पडला आहे तो हा कि माणसाच्या कवटीमध्ये काही किडे असतात का ? मी हे विचारतोय कारण मी बोकडाला कापताना बऱ्याचदा बघितलंय आणि तेही जवळून . त्याला कापल्यानंतर भेजा घेणारे उभे असायचे . त्याची कवटी मोठ्या चाकूने फोडल्यावर बरेच जिवंत किडे इकडेतिकडे पळायचे. मी उत्सुकतेने त्या खाटीकल विचारले तेव्हा तो म्हणाला कि " भाय अपने मग्जने भी ऐसैच किडा रहता है . एक भी काम करना बंद करेगा तो आदमी इस दुनियासि उठ जायेगा . " हे ऐकून मी चाट पडलो . मला एक विचारायचं आहे ते हे कि , खरंच असे काही आहे का ? हे किडे माणसाला नियंत्रित करतात का ? आणि जर उत्तर हो असेल तर या किड्यांचा नक्की रोल काय आहे आपल्या आयुष्यात ?
  • Log in or register to post comments

बदला..

चिगो
Wed, 06/26/2019 - 14:14 नवीन
मटणवाला बदला तुमचा.. फालतू गोष्टी सांगण्यापेक्षा दर्जेदार माल देणारा आणि स्वच्छतेची दक्षता घेणारा मटणवाला शोधा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

=)) =)) =))

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/27/2019 - 11:52 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

खिलजी,

हेमंतकुमार
Mon, 06/03/2019 - 19:15 नवीन
खिलजी, धन्यवाद. माणसाच्या कवटीच्या आत फक्त मेंदूच आहे हे नक्की. बाकी ते बोकड आणि किडे याबाबत म्या पामरास काय नाही हो माहित !
  • Log in or register to post comments

जाणीव होते

Rajesh188
Mon, 06/03/2019 - 19:34 नवीन
तहान,भूक ह्याची जाणीव होते का बेशुद्ध अवस्थे मध्ये . तसेच वेदना,लघवी होणार त्याची जाणीव ,संडास होण्याची जाणीव सुख ,दुःख, हे सर्व समजत का?
  • Log in or register to post comments

नाही,

हेमंतकुमार
Mon, 06/03/2019 - 19:57 नवीन
ही पूर्णपणे जाणीवरहित अवस्था असते.
  • Log in or register to post comments

मृत्यू च म्हणावं लागेल मग

Rajesh188
Tue, 06/04/2019 - 09:11 नवीन
भूक लागत नाही म्हणजे बाहेरून मोजून जेवण द्यावे लागेल. तहान लागत नाही म्हणजे ते सुधा बाहेरून मोजुंच द्यावे लागेल. संडास आणि लगविची जाणीव नाही . म्हणजे ती सुधा शरीरातून वेळेत बाहेर काढावी लागेल. पोटात दुखत नाही ,डोकं दुखत नाही म्हणजे वेदना होतेय हे डॉक्टर तरी कसे ओळखणार . असा व्यक्ती मृतच आहे . फक्त heart आणि श्वास चालू आहे म्हणून जिवंत समजायचं का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

vegetative ला प्रतिशब्द

गामा पैलवान
Tue, 06/04/2019 - 17:38 नवीन
कुमार१, अतिशय माहितीपूर्ण लेख. त्याबद्दल धन्यवाद! :-) vegetative या शब्दाबद्दल विचार करत असतांना हिंदू तत्त्वज्ञानासंबंधी कुठल्याशा पुस्तकातली काहीबाही चर्चा अंधुकशी आठवली. तिच्यात 'वृक्षपाषाणैव स्थिती' असा काहीसा शब्दप्रयोग होता. त्यावरून vegetative ला मराठीत वृक्षदशा म्हणता येईल. अगदी पाषाणदशा नको. गावरान मराठीत 'पालापाचोळ्यावाणी पडलंय' म्हणता येईल. शिष्ट शब्दांत पाचोळदशा, पाचोळणे, इत्यादि प्रयोग करता यावेत. भारदस्त प्रयोग हवा असेल तर अवचेष्ट हा शब्द बरा वाटतो. देहात चेतना आहे म्हणून तो चेष्ट आहे ( म्हणजेच निश्चेष्ट नाही ). पण त्यात जाणीव नाही म्हणून ही चेतना अव म्हणजे नकोशी आहे. म्हणून अवचेष्ट यथोचित ठरावा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

गा पै, धन्यवाद .

हेमंतकुमार
Tue, 06/04/2019 - 18:00 नवीन
'पालापाचोळ्यावाणी पडलंय' हे लै आवडले !
  • Log in or register to post comments

फ्लावरचा गड्डा की विधात्याची कमाल ?

चौकटराजा
Wed, 06/05/2019 - 16:40 नवीन
मी एक व्हिडीओ पाहिला होता . तो तू नळीवर उपलब्ध आहे. मेडिकल विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा म्हणून मेंदूच्या प्रत्यक्ष काचऱ्या काढून मेंदू " शिकविला " जातो. ( सी टी स्कॅन नाही ). बर ते जाऊ द्या . फ्लावर सारखा दिसणारा हा गड्डा गंध ,रंग, आठवणी ,चव, भावना कितीचे पृथक्करण करील ? त्याला काही मर्यादा ? आईच्या गर्भात जुळणी होणारी ही असेम्ब्ली जगातील आद्य आश्चर्य ठरावे. प्रष्ण असा की कवटी मेंदूचे बाह्य आघातापासून रक्षण करते पण पेशीबाह्य आक्रमणाचे पासून मेंदूचे रक्षण कोण करते ? त्या रक्षा भिंतीची ही काही मर्यादा असेल ना ? नाहीतर मस्तिष्कावरण दाह कसा झाला असता ? दुसरा प्रशन असा आहे की मेंदू संदेश ग्रहण व आज्ञादान असे कार्य करतानाच तो एंडो क्राइन संस्थांचे ही काही काम करत असतो .या संस्थांचे काम हे मनुष्य बेशुद्धावस्थेत असताना चालू असते का ?
  • Log in or register to post comments

चौरा, धन्यवाद !

हेमंतकुमार
Wed, 06/05/2019 - 17:38 नवीन
शंकानिरसन १. पेशीबाह्य आक्रमणाचे पासून मेंदूचे रक्षण कोण करते ? त्या रक्षा भिंतीची ही काही मर्यादा असेल ना ? नाहीतर मस्तिष्कावरण दाह कसा झाला असता ? >>>>> शरीराचा रक्तप्रवाह आणि मेंदू यांना वेगळे करणारी जी रक्षाभिंत आहे तिला Blood Brain Barrier (BBB) असे म्हणतात. ती भिंत म्हणजे सूक्ष्म रक्तवाहिन्यांतील विशिष्ट पेशी असतात. निरोगीपणात ही भिंत जीवाणूंना मेंदूत शिरू देत नाही. पण जेव्हा काही तीव्र जंतूंचा शरीरात प्रवेश होतो, तेव्हा ते या भिंतीला दुबळी बनवतात. मग त्यांची विषे मेंदूत शिरतात.
  • Log in or register to post comments

शंकानिरसन २.

हेमंतकुमार
Wed, 06/05/2019 - 17:46 नवीन
मेंदू एंडो क्राइन संस्थांचे ही काही काम करत असतो .या संस्थांचे काम हे मनुष्य बेशुद्धावस्थेत असताना चालू असते का ? >>> होय, हे काम तेव्हाच्या चयापचयाच्या गरजेनुसार चालू असते. जेव्हा मेंदूस गंभीर मार लागलेला असतो, तेव्हा तर अनेक हॉर्मोन्सच्या पातळीत चढउतार होत राहतात. त्यामध्ये प्रामुख्याने थायरोईड, TSH, इन्सुलिन आणि ग्रोथ हॉर्मोन यांचा समावेश आहे.
  • Log in or register to post comments

Blood Brain Barrier

जॉनविक्क
Wed, 06/05/2019 - 21:05 नवीन
हे औषधशास्त्रासाठी एक challange सुद्धा आहे बरे का, ही तीच भिंत आहे जी मेंदुच्या गरज असलेल्या भागात पोचणं अपेक्षित असणारे औषध सुद्धा मेंदूला मिळणाऱ्या रक्तातून फिल्टर करते :)
  • Log in or register to post comments

जॉनविक्क ,

हेमंतकुमार
गुरुवार, 06/06/2019 - 10:48 नवीन
अतिशय चांगला मुद्दा. मेंदूच्या कर्करोगावरील काही औषधे BBB भेदून आत पोचवणे हे एक आव्हान असते. आता nano तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य होणार आहे. यावरील संशोधन जोरात चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

प्रश्न चे उत्तर हवे आहे विश्लेषण नको

Rajesh188
Wed, 06/05/2019 - 22:07 नवीन
स्टेम सेल पासून dna, chromosome, मानवी शरीराचे कार्य कसे चालते ह्याचे विश्लेषण खूप झाले . जीन्स मध्ये बदल #कॅन्सर मेंदूला मार# बेशुद्ध अवस्था जीन्स मध्ये बदल #मधुमेह. अशी खूप खूप प्रश्नांची मालिका आहे उत्तर कोणाकडे नाही त्या मुळे हे सर्व ज्ञान हे वांझोटे आहे
  • Log in or register to post comments

स्वामीला इचारा कि!

गड्डा झब्बू
Wed, 06/05/2019 - 22:35 नवीन
उत्तर कोणाकडे नाही>>>स्वामीला इचारा कि! त्या मुळे हे सर्व ज्ञान हे वांझोटे आहे>>> मंग करा कि थोडे प्रयत्न फळवायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

समारोप

हेमंतकुमार
Fri, 06/07/2019 - 10:20 नवीन
उपयुक्त सूचना, चांगल्या शंका आणि पूरक माहितीची भर या सगळ्यांमुळे चर्चा छान झाली. सर्व सहभागी सदस्यांचे मनापासून आभार ! लेखाचा विषय असलेली अवस्था आपणा कुणावरही कधीही न ओढवो, या सदिच्छेसह समारोप करतो.
  • Log in or register to post comments

वाह डॉक्टर साहेब,

टर्मीनेटर
Sun, 06/09/2019 - 12:54 नवीन
वाह डॉक्टर साहेब, नेहमीप्रमाणेच खूप छान माहितीपूर्ण लेख. व्यसनांच्या अतिरेकाने येणाऱ्या बेशुद्धावास्थेची दोन गंभीर उदाहरणे प्रत्यक्ष बघितली असल्याने लेखाशी जास्त चांगल्या प्रकारे रिलेट करू शकलो. मागे 'गांजाला भारतात कायदेशीर मान्यता मिळावी का?' या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादात त्यांचा उल्लेखही केला होता.
  • Log in or register to post comments

टर्मिनेटर,

हेमंतकुमार
Sun, 06/09/2019 - 13:15 नवीन
धन्यवाद. तुमच्या वरील संदर्भातील प्रतिसादातील खालील वाक्य..... पुण्यात गांजा पिणाऱ्या/ओढणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील देशात सर्वात जास्त झाली आहे. >>>>> ......हे धक्कादायक आहे. वाईट वाटले.
  • Log in or register to post comments

खूपच छान, माहितीपूर्ण आणि सुबोध लेख....

Nitin Palkar
Sun, 06/09/2019 - 13:35 नवीन
खालील प्रतिमा दिसल्या नाहीत.... निरोगी डोळ्याच्या बाहुल्या : pict ओपियम गटातील रसायनांची विषबाधा : डोळ्याच्या बाहुल्या : pict ..... काही सुबुद्ध वाचक उद्धटपणे प्रतिसाद कसे देऊ शकतात हे एक न उमगलेले कोडे आहे...
  • Log in or register to post comments

खालील प्रतिमा दिसल्या नाहीत....

Nitin Palkar
Sun, 06/09/2019 - 13:39 नवीन
सर्व प्रतिमा आता दिसत आहेत. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

नितीन,

हेमंतकुमार
Sun, 06/09/2019 - 14:16 नवीन
नितीन, धन्यवाद. बरेच दिवसांनी आपली भेट झाल्याने आनंद झाला. ओपियम विषबाधेत डोळ्यांच्या बाहुल्या खूप बारीक होतात. त्यांना pin point pupils म्हणतात.
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणे एक सुरेख .......

सुधीर कांदळकर
Mon, 06/10/2019 - 06:46 नवीन
लेख. फार्माकोलॉजी ऑफ स्लीप वाचतांना वाचतांनाअनेक वर्षांपूर्वी कधीतरी कार्यालयात झोपा काढतांना करमणुकीसाठी तिथेच उपलब्ध असलेल्या मोजसंदर्भग्रंथातून फार्माकोलॉजी ऑफ स्लीप की तसेच काहीतरी वाचतांना या विषयात कधीतरी बुडी मारायची इच्छा झाली होती. मग ते तसेच राहून गेले. (मेंदू नसल्यामुळे)आता निदान पाय बुडवायला मिळाले. बरे वाटले, अनेक धन्यवाद. घातनिद्रा, कटुनिद्रा, कृष्णनिद्रा हे शब्द चिरनिद्रा, कालनिद्रा या शब्दांवरून सुचले. प्रतिशब्द कोणताही निवडला तरी मग त्यात अवस्थातीव्रतेप्रमाणे घातनिद्रा १, घातनिद्रा २, घातनिद्रा ३ असे वर्गीकरण देखील करता येईल. संगणक नुकताच घातनिद्रेतून जागा झाल्यामुळे प्रतिसाद देता आला.
  • Log in or register to post comments

सुधीर,

हेमंतकुमार
Mon, 06/10/2019 - 07:47 नवीन
सुधीर, मिश्किल प्रतिसादाबद्दल आभार ! तुमचे पर्यायी शब्द वेगळ्या पठडीतील आहेत. या धाग्याच्या निमित्ताने आता vegetativeसाठी किमान डझनभर मराठी शब्द माझ्या संग्रहात जमा झाले. त्याबद्दल सर्व संबंधितांचे आभार. … बाकी तुमच्या संगणकाची घातनिद्रा संपली हे लै बेश झाले !
  • Log in or register to post comments

शाकावस्था ....

सुधीर कांदळकर
गुरुवार, 06/13/2019 - 06:57 नवीन
तृणावस्था आणि क्षुपावस्था हे तीन शब्द असेच सहज आठवले/सुचले. मस्त ब्रेनस्टॉर्मिन्गबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

धन्यवाद,

हेमंतकुमार
गुरुवार, 06/13/2019 - 07:44 नवीन
पण 'क्षुपा' चा अर्थ नाही समजला.
  • Log in or register to post comments

क्षुप = झुडुप वा झाळकट. इंग्रजीत ......

सुधीर कांदळकर
Fri, 06/14/2019 - 18:40 नवीन
श्रब - Shrub म्हणतात ते
  • Log in or register to post comments

क्षुप = झुडुप वा झाळकट. इंग्रजीत ......

सुधीर कांदळकर
Fri, 06/14/2019 - 18:41 नवीन
श्रब - Shrub म्हणतात ते
  • Log in or register to post comments

बिहार मधील मुलांचे मृत्यू

हेमंतकुमार
गुरुवार, 06/20/2019 - 14:24 नवीन
सध्या चर्चेत असलेली ही दुर्घटना आहे. या रुग्णांत मेंदू बिघाड असा झालाय: काही कुपोषित मुलांनी लिचीची फळे खाल्ली >> त्यातील methylene cyclopropyl glycine (MCPG) या विषामुळे रक्तातील ग्लुकोज पातळी खूप कमी झाली >>> बेशुद्धावस्था >>> मृत्यू.
  • Log in or register to post comments

याबाबत इथे तज्ज्ञांनी,

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/20/2019 - 17:00 नवीन
याबाबत इथे तज्ज्ञांनी, तुलनेने सोप्या भाषेत, दिलेली जराशी सविस्तर माहिती आहे... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

बिहार : गूढ वाढले !

हेमंतकुमार
Sat, 06/22/2019 - 11:57 नवीन
सदर मुलांचे मृत्यू लिचीतील रसायनाने की विषाणूजन्य तापाने, यावर आता परस्परविरोधी मते व्यक्त होत आहेत. सत्य जाणून घेण्यासाठी आता राज्य सरकारने कृषी तज्ज्ञांची समिती नेमली आहे.
  • Log in or register to post comments

या प्रकरणात लिचीची शेती

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/22/2019 - 12:43 नवीन
या प्रकरणात लिचीची शेती करणार्‍या मोठ्या शेतीउद्योगाचे राजकारण आहे असे म्हटले जाते. हा आजार फक्त लिचीच्या मोसमात आढळतो व अनेक वर्षांच्या व्हायरालॉजी अभ्यासांत, व्हायरस असल्याचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संकेत मिळालेले नाहीत. मात्र, लिचीतील रसायनांमुळे चयापचय प्रक्रियांवर होणारे परिणाम आणि त्यामुळे सकाळच्या वेळी रक्तातले प्रमाण लक्षणियरित्या कमी होणे, हे सिद्ध झाले आहे. वरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे लिची तोडणी करणार्‍या मजुरांची मुले योग्य तेवढे रात्रीचे जेवण घेतात याची खात्री/सोय केल्यास, सकाळच्या वेळी रक्तात साखरेचे पुरेसे प्रमाण राहील व हा आजार होणार नाही. हा जवळ जवळ डायग्नोस्टिक असलेला (निदान पक्के करणारा) कमी खर्चाचा, साधासोपा प्रयोग मोठ्या प्रमाणावर शास्त्रिय पद्धतीने करून पहायला हरकत नव्हती. तो यशस्वी झाला तर समस्येचे निवारण करणे सोपे होईल. पण, ते सिद्ध झाले तर लिचीवर (तिच्यात धोकादायक रसायने असल्याचा) ठपका येऊन, तो व्यवसाय धोक्यात येईल... कमीत कमी त्याची उलाढाल तरी कमी होईल. त्यामुळे, 'सधन शेतीउद्योग' आणि 'त्यात काम करणार्‍या मजूरांची मुले' या दोन गटांच्या हितसंबंधामध्ये, अजून तरी पहिला गट जिंकत आहे, हेच दिसत आहे... दुर्दैवाने. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

खूप दिवस याविषयी वाचतो आहे.

गवि
Sat, 06/22/2019 - 13:23 नवीन
खूप दिवस याविषयी वाचतो आहे. फक्त कुपोषण हाच प्रश्न असेल तर देशभर, जगभर कोट्यवधी मुलं तीव्र कुपोषणात राहतात. रात्रीचं जेवण न घेऊ शकणं हा काही ठराविक प्रांतातल्या मुलांबाबत घडणारा प्रसंग नव्हे. पण त्यातून जी शुगर लेव्हल कमी होते तिच्यातून मेंदूला सूज येणं आणि चालत्या खेळत्या बालकाचा रातोरात मृत्यू होणं हा सिन्ड्रोम फक्त या ठराविक भागात का व्हावा? कुपोषण तसं सर्वव्यापी आहे. आणि लहान मुलंच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

त्या संबंधात संशोधन केलेल्या

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/22/2019 - 17:47 नवीन
या समस्येला "केवळ कुपोषण जबाबदार आहे", असा दावा कोणीच (अगदी राजकारण्यांनीही) केलेला नाही, फक्त कोणत्या मुद्द्यावर भर दिला पाहिजे याचा विचार करताना बर्‍याचदा शास्त्र मागे पडते आणि अर्थ-राजकारण आड येते आणि मग साधासोपा उपायही दुर्लक्षिला जातो... असे मी म्हटले आहे. कुपोषण, रात्रीचे जेवण चुकवणे, यांचा चयापचयक्रियेवर होणारा एकत्रित परिणाम, लिचीचा मोसम, लहान मुलांनी ती फळे दिवसाच्या विशिष्ट वेळी खाणे, इत्यादी अनेक पैलू व त्यांचे एकमेकावर होणारे परिणाम, या घटनेमागे आहेत. अर्थ-राजकारण बाजूला ठेऊन, त्या सर्व पैलूंचा एकत्रितपणे शास्त्रिय विचार केला तरच योग्य उपाय सापडेल... आणि कदाचित, "तो रात्रीचे पुरेसे जेवण" इतका साधासोपा असू शकतो, असे एका संशोधकाचे मत आहे. त्या वार्षीक घटनेचे "जागेवर संशोधन केलेल्या त्या तज्ज्ञाची" घटनेसंबंधीची निरिक्षणे, त्यांचे शास्त्रिय विश्लेषण व निष्कर्ष , "हिंदू"मध्ये प्रसिद्ध झालेल्या (आणि वर एका प्रतिसादात ग्राफिक स्वरूपात दिलेल्या) लेखात आहेत. पुनरुक्ती टाळण्यासाठी, या आताच्या प्रतिसादात, त्या बातमीतील केवळ संबंधीत मुद्द्यांचाच त्रोटक उल्लेख केला आहे. तो सर्व लेख वाचल्यास, या समस्येचे अनेक पैलू आणि त्यांचा एकत्रित परिणाम समजून घेण्यासाठी मदत होईल. मग, प्रतिसादातील वरच्या लेखात लिहिल्याप्रमाणे लिची तोडणी करणार्‍या मजुरांची मुले योग्य तेवढे रात्रीचे जेवण घेतात याची खात्री/सोय केल्यास, सकाळच्या वेळी रक्तात साखरेचे पुरेसे प्रमाण राहील व हा आजार होणार नाही. या वाक्याचा अर्थ स्पष्ट होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

डॉ. सुहास, सहमत.

हेमंतकुमार
Sat, 06/22/2019 - 14:44 नवीन
डॉ. सुहास, सहमत. आणि एकदा का अशा प्रश्नात अर्थकारण व राजकारण शिरले, की सत्य बाहेर यायला अडथळा होतो. मुलांचे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

गवि,

हेमंतकुमार
Sat, 06/22/2019 - 13:32 नवीन
तुमचे प्रश्न चांगले आहेत. सविस्तर उत्तर जरा वेळाने. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

गवि, शंकानिरसन:

हेमंतकुमार
Sat, 06/22/2019 - 13:54 नवीन
गवि, शंकानिरसन: **** रात्रीचं जेवण न घेऊ शकणं हा काही ठराविक प्रांतातल्या मुलांबाबत घडणारा प्रसंग नव्हे. पण त्यातून जी शुगर लेव्हल कमी होते तिच्यातून मेंदूला सूज येणं व बालकाचा रातोरात मृत्यू होणं हा सिन्ड्रोम फक्त या ठराविक भागात का व्हावा? कुपोषण तसं सर्वव्यापी आहे. आणि लहान मुलंच का?**** >>>>>> १. हा लिची तोडणी चा काळ आहे. ते काम पहाटे ४ - ७ वेळात करतात. त्यासाठी मुलांसह सगळे मजूर तेव्हा उठतात. बऱ्याचदा ही मुले रात्री च्या जेवणाविना व फक्त लिचीवर. २. कुपोषण व त्या जेवणाचा अभाव >>> यकृतातील ग्लाय कोजेन चा साठा बराच कमी, जो मुलांत आधीच कमी असतो. ३. अशा वेळेस शरीरात नव-ग्लुकोज निर्मिती होणे आवश्यक असते. निरोगीपणात ती व्यवस्थित होते. ४. आता खूप लिची खाल्ल्यास त्यातील MCPG हे वरच्या प्रक्रियेस खीळ घालते. ५. >>> ग्लुकोज पातळी खूप कमी >>> बेशुद्धी. सारांश : हा प्रश्न कुपोषण, MCPG, लिची उत्पादनाचे स्थान व काळ या सर्वांचा एकत्रित परिणाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

धन्यवाद,

गवि
Sat, 06/22/2019 - 14:02 नवीन
धन्यवाद, म्हणजे फक्त कुपोषण इतकाच भाग कारणीभूत नाही ही शंका योग्य ठरली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

फक्त लीची हे कारण नसावे

Rajesh188
गुरुवार, 06/27/2019 - 14:47 नवीन
प्रचंड उष्णता,रात्री जेवण न करणे,प्रमाण पेक्षा जास्त लिची खाणे आणि अजुन बरीच कारण असतील . माझ्या ओळखीचे जेवढे बिहारी आहेत त्यांचा बायका गावी राहतात आणि प्रत्येकाच्या बायकोला पोटाचा काही ना काही आजार आहे . ते जे पाणी पिण्यासाठी वापरतात त्या मध्ये गंधकाचे प्रमाण जास्त आहे असे मी बऱ्याच ठिकाणी वाचलं आहे
  • Log in or register to post comments

शक्य आहे,

हेमंतकुमार
गुरुवार, 06/27/2019 - 15:19 नवीन
लिचीतील रसायन की मेंदूदाह यावर अद्याप तज्ज्ञांचे एकमत दिसत नाही. आता समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
  • Log in or register to post comments

https://www.loksatta.com/desh

मराठी_माणूस
Wed, 07/10/2019 - 16:18 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/doctors-said-her-son-was-dead-telangana-mothers-love-brought-son-back-to-life-gandham-kiran-dmp-82-1928188/ इथे काय झाले असेल (अवांतरः डॉक्टरांचे म्हणणे (ब्रेनडेड) हे कुटूंबाने मान्य केले असते तर पुढे काय झाले असते?)
  • Log in or register to post comments

ही बातमी

हेमंतकुमार
Wed, 07/10/2019 - 16:30 नवीन
वृत्तपत्रातील आहे. त्या रुग्णाचा पूर्ण वैद्यकीय अहवाल वाचायला मिळाला तरच त्यावर काही मत देता येईल, असे माझे मत.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा