भारतीय सिनेमाला आता शंभर वर्षांचा इतिहास आहे व संगीताचे आज चित्रपटातील महत्व तुलनात्मक रित्या कमी झालेले असले तरी संगीत हा भारतीय बोलपटाचा ( टॉकी) एकेकाळी प्राण होता यात शंका नाही. भारतीय बोलपटांच्या विषयात काळाच्या संदर्भाप्रमाणे बदल झाले तसे संगीताच्या शैलीतही.पहिल्या कालखंडात गायक व नट ही भूमिका एकच व्यक्ति करीत असे. त्यामुळे अभिनय यथातथा असला तरी चालेल पण गाता आले पाहिजे अशी अट असे. पु़ढे तांत्रिक प्रगति होऊन पार्श्व गायनाचे युग निर्माण झाले. सैगल, पंकज मलिक, सुरेंद्र, श्याम, यांची जागा तलत महमूद, रफी, मन्ना डे, हेमंतकुमार किशोरकुमार यानी घेतली.