मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आस्तिक-नास्तिक, श्रद्धा-अंधश्रद्धा, इ इ इ मानवी संकल्पनांवर होणारे वादविवाद

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रेरणा : अठ्ठावीस लक्ष रुपये, त्यात उद्धृत केलेले एका नियतकालिकात प्रसिद्ध झालेले एक वाचकाचे पत्र, तत्सम विषयांवरचे इतर लेख व त्यांच्यावरची चर्चा. वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून... (अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले किंवा (आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले असाच जास्त दिसतो. याप्रकारे, असुरक्षित मनस्थिती असलेल्या एखाद्या भ्रष्ट नास्तिक माणसालाही दुसर्‍या एखाद्या चलाख आस्तिक/नास्तिक माणसाने फसवणे सहज शक्य आहे, नाही का? त्याचा धर्म अथवा श्रद्धा यांच्याशी ओढून ताणून संबंध लावल्यासारखेच दिसत आहे. धर्म किंवा श्रद्धा यांच्याबद्दल वेगवेगळी मते असणे योग्य आहे पण अयोग्य प्रकारे त्यांचे समर्थन अथव खंडन करणे नक्कीच निषिद्ध असते. या लेखातला, लेखकाचा मूळ हेतू योग्य आहे असे जमेस धरूनही, लेखातच दिलेल्या मजकूरावरून त्या उदाहरणामध्ये... (अ) त्या साधूला कोणी धर्ममार्तंड समजणे किंवा तसा दावा करणे, (आ) फसलेली व्यक्ती धार्मिक व्यक्ती आहे आणि एक लखपती उद्योजक असून तिने केवळ अंधश्रद्धेने त्या साधूला पैसे दिले असे समजणे, (इ) आणि त्या दोघांमधला व्यवहार केवळ धर्मिक/अंध-श्रद्धेवर अवलंबून झाला होता, असे समजणे हे काही फार मोठ्या विचारशक्तीचे लक्षण आहे, असे म्हणणे धाडसाचे होईल, यात शंका नाही ! अशी बाळबोध गृहितके धरून पोलिस जर अश्या केसेस सोडवायला लागले तर 'कालचा गोंधळ बरा होता' अशी परिस्थिती निर्माण होईल ! मला वाटत नाही की तसे होईल ! *************** माणसात आणि (आपल्याला सर्वात जवळ असलेल्या चिंपॅझीसह) इतर सर्व प्राण्यांत एक फार महत्वाचा फरक आहे, तो म्हणजे... संकल्पना (किंवा साध्या शब्दांत आपल्या मनातली गोष्ट दुसर्‍याला पटेल अश्या प्रकारे) सांगण्याची पात्रता... याला साध्या इंग्लिशमध्ये "स्टोरी टेलिंग" असेही म्हणतात. माणसांचा विशेष समजल्या जाणार्‍या आस्तिक/नास्तिक, देव/धर्म/जात, राज्य/राष्ट्र/संस्था या सर्व संकल्पना आहेत आणि त्यांच्यासाठी निर्माण केलेले नियम, भौगिलिक सीमारेखा, ध्वज, राष्ट्र/संस्था यांच्या घटना (constitution)/ प्रघात/मिशन/व्हिजन/पॉलिसी/प्रोसिजर, इ इ इ सर्वच संकल्पना आहेत... हे सर्व इतर प्राण्यांमध्ये शक्य नाही, फक्त माणसांतच शक्य असते. त्याच स्टोरी टेलिंगच्या बळावर माणसे एकत्र आणता येतात आणि त्यांच्याकरवी काम करवून घेता येते, केले गेले, केले जात आहे आणि भविष्यातही केले जाईल. या संकल्पनांच्या अभावात माणूस आणि इतर प्राण्यांतला फरक खूपच कमी होईल. मुख्य म्हणजे, या संकल्पना वेळेबरोबर बदलत गेलेल्या आहेत... विकसित होत आहेत. गंमत अशी आहे की, (वर्तमानपत्र किंवा मिपासारख्या इतर) माध्यमांत मानवी व्यवहारसंबंधी गंभीरपणे लेख लिहितानासुद्धा... (अ) मानवी व्यवहारांसंबंधीचे (ह्युमन बिहेवियर) शास्त्रिय ज्ञान असणे आवश्यक असते किंवा (आ) सबळ पुरावे (केवळ आपल्याला "खरे वाटणारे" आणि म्हणून ठासून सांगितलेले ठोकाताळे नव्हे) आवश्यक असतात आणि विशेषत: (इ) जनमानसात रुजलेल्या बर्‍यावाईट समजूती दूर करताना त्यांच्या जागी भौतिक आणि मानसिक अश्या दोन्ही स्तरांवर परिणामकारक ठरणारा पर्याय देणे आवश्यक असते, कारण, संकल्पनेच्या अभावात माणसाची अवस्था एका असुरक्षित गोंधळलेल्या प्राण्याप्रमाणे होते हे तथाकथित विचारवंत विसरतात आणि केवळ वादविवादाचे धनी होतात. म्हणजे त्याचा प्रयत्न फायदेशीर ठरण्याऐवजी उलटतो (counter productive होतो). त्यातही, सर्वात महत्वाचे म्हणजे, अयोग्य समजूती दूर करताना, भावनेच्या भरात वाहून जात, बळेच ओढून ताणून सत्याचा विपर्यास करणारी उदाहरणे देण्याने, आपणच आपल्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभे करत असतो आणि आपल्या विचारशक्तीबद्दल दुसर्‍यांच्या मनात प्रश्न निर्माण करत असतो (व ही कृती अत्यंत अशास्त्रिय असते) हे सहजपणे विसरले जाते. आपल्याला शास्त्रिय आणि समतोल विचाराचा समजाणार्‍याने, प्रथम सर्व तथ्यांचे सर्व दिशांनी प्रामाणिकपणे विष्लेशण करून मगच त्यावरून निष्कर्ष काढणे अपेक्षित असते. प्रथम निष्कर्ष ठरवायचा आणि मग तथ्यांना त्याच्या दिशेने हवे तसे वाकवायचे हे निषिद्ध असते... तसे करण्याला फारतर सोईस्कर राजकारण म्हणता येईल, शास्त्रिय विचार नक्कीच नव्हे आणि समाजकारण तर नव्हेच नव्हे. पूर्णविराम. *************** मी स्वतःला अज्ञेयवादी समजतो. मला स्वतःला यनावालांसारख्या समाजसुधारणेचे व्रत घेतले आहे असा दावा करणार्‍या व्यक्तींबद्दल बर्‍यापैकी आदर आहे आणि मी सुद्धा माझ्या वकुबाप्रमाणे ते जमेल तसे करतो. मात्र, तसे करताना, चुकीची उदाहरणे / ओढून-ताणून बनवलेल्या कथा / एखाद्या प्रसंगाचे स्वतःला सोईस्कर असे ओढून-ताणून बनविलेले विश्लेषण, इत्यादी कटाक्षाने टाळतो. कारण, तसे केल्याने, केवळ आस्तिकच काय पण अशिक्षित मंडळींनाही त्यांच्यातला विसंवाद सहजपणे समजतो. सर्वसामान्य लोक बर्‍यापैकी हुशार असतात, ते तो विसंवाद सांगतिलच असे नाही, किंवा सांगायला गेले तर त्यांना शास्त्रिय पद्धतिने प्रतिवाद करता येईलच असे नाही. पण, त्यामुळे आपल्याला शिकविण्याचा आव आणणारी व्यक्ती भोंदू आहे असा त्यांचा ठाम (व योग्य) ग्रह होत जातो आणि त्यांचे स्वतःचे (कदाचित चुकीचे) मत अधिक पक्के होत जाते. हे सर्व समजून-उमजून मगच आपले म्हणणे योग्य रितीने मांडणार्‍या व्यक्तीच आपल्या प्रयत्नांत यशस्वी होतील. तसेही, चुकीच्या पद्धतीने केलेले शास्त्रिय कामाची अशास्त्रिय कामातच गणना केली जाईल. असे करण्याने, योग्य रितीने सामाजिक काम करणार्‍या इतर लोकांच्या कामावरही बोळा फिरविला जातो, ते वेगळेच. मानवी संकल्पना आणि त्यांचे योग्य रितीने विष्लेशण करणारी शास्त्रे सद्या खूप विकसित झालेली आहेत आणि त्यांच्या कक्षा दिवसेदिवस विस्तारत आहेत. मानवी व सामाजिक व्यवहारांत आणि विकासात, मानसशास्त्र आणि मानवी संकल्पना यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यांचा विचार न करता समाजाचा विकास करणे हे अंधारात दगड मारण्यापेक्षा फार वेगळे नाही. या वर्षाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार "behavioral economics" या विषयासंबंधिच्या संशोधनाबद्दल दिला गेला आहे, यावरून हे म्हणणे अधोरेखित व्हावे. यासाठीच, आपल्या प्रयत्नात यश मिळविण्यासाठी समाजसुधारणेचे व्रत घेतलेल्या व्यक्तींनी... (अ) मानवी मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे आणि (आ) समाजसुधारणेच्या प्रयत्नांमध्ये वापरलेली साधने (उदाहरणे, इ) आणि विष्लेशणासाठी वापरलेली पद्धत, प्रामाणिक व शास्त्रिय असणे आवश्यक आहे मानवी जीवनाचा विकास, मानसशास्त्र आणि मानवाच्या वैचारिक विकासाच्या वाटचालीवर मानली गेलेली अनेक संशोधनपर पुस्तके व असंख्य शोधनिबंध आहेत. त्यातील, सर्वसामान्यांसाठी कळायला तुलनेने सोपी, रोचक भाषाशैलीत लिहिलेली व मला आवडलेल्या काही पुस्तकांची/लेखकांची नावे खाली देत आहे... The Third Chimpanzee : Jared Diamond The God Delusion : Richard Dawkins The Extended Phenotype : Richard Dawkins Selfish Gene : Richard Dawkins The Blind Watchmaker : Richard Dawkins The Greatest Show On Earth : Richard Dawkins Unweaving the rainbow : Richard Dawkins Sapiens, A brief history of Humankind : Yuval Noah Harari हा विषय वाचायला-समजायला आयुष्य पुरे पडणार नाही... मात्र, वरच्या पुस्तकांपासून चांगली सुरुवात करता येईल. यातील काही लेखकांच्या व्हिडिओ क्लिप्स यु ट्युबवर उपलब्ध आहेत... त्या बघणे ज्ञानार्जन करण्यास उपयोगी तर आहेतच पण त्यांत "आपले मत जडजंबाळ शास्त्रिय भाषा न वापरता... आणि मुख्य म्हणजे आपला गर्व व दुसर्‍याबद्दलचा तिरस्कार यांचे हिडिस प्रदर्शन न करता... प्रभावी पद्धतीने कसे मांडावे" याचा वस्तूपाठही बघायला मिळेल.

वाचने 27315 वाचनखूण प्रतिक्रिया 122

In reply to by अर्धवटराव

arunjoshi123 गुरुवार, 11/09/2017 - 12:14
१. रेडिओ म्यूट करता येतो. २. रेडिओ बंद करता येतो. ३. चॅनेल बदलता येतो. ४. चॅनेलचा अपप्रचार करता येतो. ५. चॅनेलवर बहिष्कार टाकता येतो. ६. आकाशवाणीचे अधिकारी, कार्यक्रम बदलता येतात. ७ सरकार बदलून रेडिओची मॅनेजमेंट बदलता येते. ८. रेडिओ फोडून टाकता येतो. ================================= पण रेडिओ चालावा, दर्जेदार पद्धतीनं चालावा हे कधीही चांगलं.

In reply to by arunjoshi123

अर्धवटराव Fri, 11/10/2017 - 12:10
पण त्याचं आंधळं-बहिरंपण नाहि जाणार.
पण रेडिओ चालावा, दर्जेदार पद्धतीनं चालावा हे कधीही चांगलं.
अर्थात.

गामा पैलवान गुरुवार, 11/09/2017 - 00:46
डॉक्टर सुहास म्हात्रे, १.
हे तर कोणत्याही माध्यमात लिहिणार्‍या कोणत्याही लेखकाने स्वतःची किमान पत राखण्यासाठी पाळले पाहिजे, नाही का ?
यनावाला यांना आधुनिक विज्ञानाच्या इतिहासाची जराही माहिती नाही. त्यामुळे त्यांच्याशी विज्ञानाच्या विकासाविषयी चर्चा होऊ शकंत नाही. ही त्रुटी त्यांना पुरेपूर माहिती आहे. भले त्यांना ती जाणवली असेल, पण ते मान्य करीत नाहीत. म्हणून त्यांच्या लेखाची किमान पत बऱ्याचदा शंकास्पद (=questionable) असते. २.
तुम्ही यनावालांचे "मूळ लेखन" आणि "मुख्यतः त्यांच्याशी सहमत असलेल्या प्रतिसादांवर असलेले त्यांचे अत्यंत कमी संख्येचे प्रतिसाद" परत नीट वाचणे जरुरीचे आहे, इतकेच सुचवतो !
माझ्या अंदाजाप्रमाणे स्वत:च्या लेखाची किमान पत न राखता आल्यामुळे ते ठाम दावे न करता फक्त श्रद्धेविरुद्ध मोघम विधाने करतात. माझ्या मते ही शिकवण्याची भूमिका नव्हे. मात्र प्रत्येकास आपापलं मत बाळगण्याचा अधिकार आहे. आ.न., गा.पै.

In reply to by गामा पैलवान

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 17:45
त्यामुळे त्यांच्याशी विज्ञानाच्या विकासाविषयी चर्चा होऊ शकंत नाही.
ते करत नाहीत की करू शकत नाहीत हे एक मस्त गूढ ठेवलं आहे त्यांनी. पण मी लिहिलेला एकही प्रतिसाद त्यांना झेपत नाही हे सुनिश्चित. कारण प्रेमाने, सन्मानाने, खवचटपणे, वैतागून, गंभीरपणे, इ इ दिलेल्या कोणत्याही उत्तरांना अर्थ आहे असं म्हणावं असं काही त्यांनी लिहिलेलं नाही. ते प्राध्यापक नसून प्राचार्य असावं कदाचित.

arunjoshi123 गुरुवार, 11/09/2017 - 14:55
लेखाचा आशय अत्यंत उत्तम आहेच, पण एखादा किचकट आशय नि:पक्षपातीपद्धतीनं कसा मांडावा याचा हा लेख वस्तुपाठ आहे.

गंम्बा गुरुवार, 11/09/2017 - 16:11
डॉक्टरसाहेब, मुळात मनुष्यप्राणी स्वार्थी आहे. म्हणजे त्याला त्याच्या फायद्याचे काय आहे हे बरोबर कळते आणि फायदा होत असल्याशिवाय कोणी काही करत नाही. हां, प्रत्येकाच्या फायद्याची व्याख्या वेगवेगळी असते. त्यामूळे कोणी माणुस श्रद्धा कुठल्याही प्रकारात बाळगत असेल ( म्हणजे देव, बुवा, बाबा, पूजा, जादुटोना , नास्तिकता ) तर ती स्वार्थासाठी आणि जाणुन बुजुन केलेली गोष्ट असते. पुजा, सत्संग, सत्यनारायण करुन त्या व्यक्तीला काय मिळत असेल हे दुसर्‍यांना समजणार नाही. काहीतरी मिळते म्हणुनच सर्व गोष्टी केल्या जातात. यनावालांना सरसकट जनता मूर्ख वाटते पण खरे असे आहे की जनता व्यवहारी असते. यनावालांना मनुष्य स्वभावातले काहीच कळत नाही असे त्यांच्या लेखावरुन वाटते. किंवा त्यांचा स्वभाव "हम करे सो कायदा" अश्या प्रकारचा हुकुमशाही असावा.

In reply to by गंम्बा

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 15:15
मुळात मनुष्यप्राणी स्वार्थी आहे.
हे पटवताना थकल्यावर शेवटी पर्मार्थालाच एक स्वार्थाचा प्रकार म्हणायचं.

In reply to by गंम्बा

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 15:18
काहीतरी मिळते म्हणुनच सर्व गोष्टी केल्या जातात.
असं असेल तर मग यनावाला म्हणत आहेत ते योग्य आहे ----------- श्रद्धा = लोभ. नै का?

In reply to by arunjoshi123

गंम्बा Fri, 11/10/2017 - 15:35
असं असेल तर मग यनावाला म्हणत आहेत ते योग्य आहे ----------- श्रद्धा = लोभ. नै का?
नाही. माणसाला त्याचा स्वार्थ कळत असल्यामुळे, यनावाला सारख्या कोणी कोणाला शिकवायला जाऊ नये. प्रत्येक माणुस आस्तिक असण्याचा विचारपूर्वक, रिस्क्/रिवॉर्ड बघुन, अत्यंत व्यवहारी पणे निर्णय घेतो ( जरी त्या आस्तिकाला हे सर्व मेंदु मधे होत लक्षात येत नसले तरी ).

पुंबा गुरुवार, 11/09/2017 - 16:11
याप्रकारे, असुरक्षित मनस्थिती असलेल्या एखाद्या भ्रष्ट नास्तिक माणसालाही दुसर्‍या एखाद्या चलाख आस्तिक/नास्तिक माणसाने फसवणे सहज शक्य आहे, नाही का? त्याचा धर्म अथवा श्रद्धा यांच्याशी ओढून ताणून संबंध लावल्यासारखेच दिसत आहे.
कसं काय बुवा?
सागरनाथ नावाचा बुवा वैद्यांकडे आला. " तुम्हांला धंद्यात आर्थिक अडचणी आहेत. मी अक्षय धनाचा कुंभ देतो. हवे तेवढे धन मिळेल. " असे सांगून त्याने नऊ हजार रुपये मागितले. वैद्यांनी आनंदाने दिले. नंतर कांही दिवसांनी , "अडथळे आहेत. ते दूर झाल्याशिवाय कुंभातून धन येणार नाही. पूजा करावी लागेल. " अशी बतावणी करून चाळीस हजार रुपये घेतले. त्यानंतर सागरनाथ कुंभ घेऊन आला. त्यांतून शंभर रुपयांच्या कांही नोटा पाडून दाखविल्या. अधिक नोटा पडेनात. "तुमच्यावर कोणी करणी केली आहे. आता स्मशानात जाऊन मोठा विधी करायला हवा. त्यासाठी बारा लाख रु.लागतील. मग नोटांचा पाऊसच पडेल." अशी आशा दाखवली. "पैसे न दिल्यास बारा भूतांचा कोप होईल" .अशी भीतीही घातली.
हे वाचले नाहीत काय? नास्तिक कशाला विधी/करणी यांच्यावर विश्वास ठेवेल? मंदार यांची त्या बुवावर श्रद्धा बसली म्हणूनच त्याने हे पैसे दिले ना त्याला? त्याची करणी, स्मशानातील विधी, अक्षयधनाचा कुंभ यावरील अंधश्रद्धा ही घातक नाही काय? याचे मूळ
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते. आपण इतकी वर्षे, अनेक धार्मिक कार्ये निष्ठापूर्वक केली आहेत. आता देव माझ्यावर कृपा करणार. तो कुणाच्या रूपाने, कसा -कधी येईल हे सांगता येणार नाही. पण तो येईल हे निश्चित. तो येणार. मला कृपाप्रसाद देणार. असे त्यांना मनोमन वाटत होते. ते देवाची प्रतीक्षा करीत होते. वैद्य अनेक बुवा-बाबांना भेटत होते.
या आशावती श्रद्धेत नाही काय? तुम्ही म्हणता
(अ) एका लोभी माणसाच्या लालचीचा (कमी वेळात पैसे अनेक पटींनी वाढवणे) फायदा घेऊन दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले किंवा (आ) एका भ्रष्ट माणसाच्या मानसिक असुरक्षिततेचा फायदा घेऊन, भ्रष्ट मार्गाने कमावलेली संपत्ती (हवाला मार्गे) कायदेशीर बनवून देतो, असे सांगून दुसर्‍या बेरकी माणसाने त्याला फसवले
आता ही केस म्हणजे (आ) आहे हे कुठल्या वैज्ञानिक चिकित्सेतून तुम्हाला कळले? (अ) ही फसवणूक होण्यासाठी सागरनाथने जादूटोण्याचा मार्ग अवलंबला होता. तुम्हाला हा जादूटोण्यावरच्या श्रद्धेतून झालेली फसवणूक वाटत नाही काय? ह्या जादूटोण्यात धार्मिक विधी, पुजा अर्चा यांसारखे विधी नव्हते काय? मग
वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून...
असा ठाम निष्कर्ष कसा काढलात? आता माझे मत, केवळ बेरकी माणसाने लोभी माणसाची केलेली फसवणूक असे रूप त्याला दिले की त्याचे गांभिर्य कमी होते असे मला वाटते. मंदार यांच्यासारखे शिक्षीत उद्योजक याला बळी पडत असेल तर गरीब, अल्पशिक्षीत माणसे तर किती पटकन या देवरुष्यांच्या, मांत्रिकांच्या, बुवा-बाबांच्या आहारी जात असेल. आता, कुणाचीही अशी फसवणूक होऊ नये ही आदर्श स्थिती निर्माण करायची असेल तर हे बुवा- बाबा जी मोडस ऑपरँडी अवलंबतात तीवर हला केला पाहिजे. आता तो करण्याचा मार्ग सरसकटपणे लोकांच्या सर्व प्रकारच्या श्रद्धांवर हल्ला करणे नाही हे मला मान्य आहे. मात्र म्हणून, अंधश्रद्धांचे आणि देव- धर्म यांचे काहीच साटेलोटे नाही असे म्हणणे शहामृगी पवित्रा वाटतो. ग्रहणाच्या वेळी उपाशी राहिल्याने एक गर्भवती महिला मरण पावली किंवा संवत्सर पर्वात ५३ दिवस उपास केल्याने एक तरूणी मरण पावली. यात सुद्धा पहाल तर पहिल्या केसमध्ये मुर्खपणा आणि दुसर्‍या केसमध्ये लोभ दिसू शकतो मात्र त्याच्या मुळाशी मुर्ख कर्मकांडावर अंध श्रद्धा आणि धार्मिक समजुतींचा लोकांवर असणारा पगडा हे आहे.

In reply to by पुंबा

गंम्बा गुरुवार, 11/09/2017 - 16:17
अहो लग्न जमवणार्‍या सायटींवरुन ओळख काढुन किंवा लॉटरी लागली आहे असे सांगुन अक्षरशः लाखो रुपयांना फसवण्याच्या कित्येक कथा दर दिवसाआड पेपर ला येत असतात. अगदी कोथरुड मधे रहाणार्‍या आय-आय-टीच्या निवृत्त प्राध्यापकाला २०-४० लाखाला फसवल्याची बातमी एका वर्षापूर्वी येत होती.

In reply to by गंम्बा

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/09/2017 - 18:32
एकाच आयडीचे असे एकमेकाविरुद्ध प्रतिसाद एकमेकाखाली कसे ?, म्हणून परत नावे तपासली... तेव्हा ती पुंबा आणि गंम्बा अशी आहेत हे ध्यानात आले. =)) =))

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पुंबा Wed, 11/15/2017 - 11:16
हे वाचले नाहीत काय? नास्तिक कशाला विधी/करणी यांच्यावर विश्वास ठेवेल? मंदार यांची त्या बुवावर श्रद्धा बसली म्हणूनच त्याने हे पैसे दिले ना त्याला? आता ही केस म्हणजे (आ) आहे हे कुठल्या वैज्ञानिक चिकित्सेतून तुम्हाला कळले? (अ) ही फसवणूक होण्यासाठी सागरनाथने जादूटोण्याचा मार्ग अवलंबला होता. तुम्हाला हा जादूटोण्यावरच्या श्रद्धेतून झालेली फसवणूक वाटत नाही काय? ह्या जादूटोण्यात धार्मिक विधी, पुजा अर्चा यांसारखे विधी नव्हते काय? मग वर लिहिलेल्या लेखातला सगळा प्रकार, धार्मिक अंधश्रद्धा नसून...> असा ठाम निष्कर्ष कसा काढलात? या प्रश्नांची उत्तरे तिथे आहेत काय?

In reply to by पुंबा

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 17:01
हे वाचले नाहीत काय?
"नोटा पाडून दाखवल्या" हे ही यनावालांनीच लिहिलेलं वाचलं. मग तेवढा चमत्कार कसा केला? मला करून दाखवता का?

In reply to by arunjoshi123

पुंबा Wed, 11/15/2017 - 11:14
मग तेवढा चमत्कार कसा केला? मला करून दाखवता का?
हे मला काय विचारता? सागरनाथ, तपास करणारे पोलिस किंवा मंदार यांना विचारा.

In reply to by पुंबा

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 17:34
प्रस्तुत प्रकरणात मंदार वैद्य यांची आशावती श्रद्धा दिसते.
प्रस्तुत लेखात सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रसार होईल अशी आशावती श्रद्धा दिसते.

In reply to by पुंबा

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 17:38
केवळ बेरकी माणसाने लोभी माणसाची केलेली फसवणूक असे रूप त्याला दिले की त्याचे गांभिर्य कमी होते असे मला वाटते.
हो ना. जणू काही मंदार वैद्य फॅक्टरीमधे बोर्ड लावूनच बसला होता - " २८ लाख घ्या नि अक्षयधनकुंभ द्या." आणि एक दिवस योगायोग आला. सुरुवातीला काही नोटा पडल्या देखील. ================== एकजरी नोट पडली तरी अनेक पडू शकतात असं वाटायला चालू होतं म्हणून तिथे लोभ नाकारून गांभिर्य कमी नै का होत?

In reply to by arunjoshi123

श्रीगुरुजी Mon, 11/13/2017 - 16:40
"आज पैसे गुंतवा आणि एक वर्षात दामदुप्पट", "सोन्याची बिस्किटे किंमतीत", "डॉलर्स स्वस्तात मिळवून देतो", नायजेरियन फ्रॉड, "कस्टममध्ये २ कोटींचे दागिने अडकले आहेत. अमुक खात्यावर २५ लाख भरा, म्हणजे दागिने सुटतील" इ. प्रकरणातही मंदार वैद्य फसला असता. अनेक जण या प्रकारात फसतात. पैशांचा पाऊस या प्रकारात फसणे हा यातलाच प्रकार आहे. काहीतरी करून कमी श्रमात भरपूर पैसे मिळविण्याच्या लोभाने अशी माणसे फसतात. अशा प्रकारात फसण्याचा आणि श्रद्धेचा/अध्यात्माचा काडीचाही संबंध नाही. या फसवणुकीमागे लोभ हे एकमेव कारण आहे.

In reply to by पुंबा

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 17:40
आता तो करण्याचा मार्ग सरसकटपणे लोकांच्या सर्व प्रकारच्या श्रद्धांवर हल्ला करणे नाही हे मला मान्य आहे. मात्र म्हणून, अंधश्रद्धांचे आणि देव- धर्म यांचे काहीच साटेलोटे नाही असे म्हणणे शहामृगी पवित्रा वाटतो.
+१ ====================== विश्वातले अन्य पुरोगामी शहामृगी पावित्रे देखील लक्षात येण्याची माणसाला सद्बुद्धी येओ.

Duishen Fri, 11/10/2017 - 17:59
आपला लेख समतोल वाटतो. दोन्ही बाजू मांडून त्यावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे हे स्तुत्य! संकल्पनांच्या बाबतीत म्हणायचे तर अनुभव हा खूप सापेक्ष आहे त्यामुळे त्याचे विश्लेषण कसे होईल किंवा कसे केल्या जाईल हे त्या व्यक्तीच्या अनुभवावर, विवेकबुद्धीवर आणि त्यानुषंगाने विवेचनावर आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जे.एफ.के. यांच्यावर एक चित्रपट पहिला होता. एकाच घटना अतिशय विविध अंगानी दाखवली होती. हत्या का झाली यांच्या विविध कारणांपासून ते हत्येची प्रक्रिया कशी झाली असणार याचे विविध विवेचन होते. किमान या केसमधे तरी काही निष्कर्ष निघाला नाही. पण मला असेही वाटते (३-४ वेगवेगळ्या धाग्यांवर विविध रकमेविषयी) जी चर्चा होत आहे उदा: अठ्ठावीस लक्ष, ४ कोटी, किंवा अनुभव कं. चे ४०० कोटी इ. या प्रकरणात गुन्ह्याची कारणे, उद्दिष्ट आणि माध्यम वेगळी आहेत. ती कारणं, उद्दिष्ट, माध्यम चर्चा करीत असतांना परिस्थितीसापेक्षता लक्षात घेणे आवश्यक आहे. उदा: हुंडा घेणे हे स्त्री धन का महिलांची गळचेपी करण्याचे माध्यम का धर्म वा परंपरेने सुचवलेला मार्ग? एखादी गोष्ट आपल्या पूर्वसंस्कारात न बसणारी आहेत पण सत्य निघाली तर त्रास होणारच ती कदाचित अपवादात्मक असतील किंवा अपवाद हाच नियम मानून घडणारी असेल. उदा: स्त्रीभृण हत्याप्रकरणी "मातृ पितृ देवो भव:" ही संकल्पना चूक ठरते. अपवादात्मक केस असेल तर ठीक अन्यथा अशा घटना वारंवार का घडतात याचा शोध जीवनाल सर्वांगाने स्पर्श करणाऱ्या धर्म, संस्कृती, परंपरा यातूनही घ्यावाच लागणार. श्री. मंदार यांच्या केसमधला लोभ कुणीही नाकारत नाही. पण भारतात असे अनेक श्री मंदार आहेत जे श्रद्धांचे बळी होतात किंवा काहीजण श्रद्धांच्या नावाने (उदा: आसाराम बापू, राम-रहीम, श्री. मंदार यांच्या केसमधील मांत्रिक) फसवतात. यामुळे श्रद्धा खरी की खोटी यापेक्षा श्रद्धेची चिकित्सा आवश्यक असे अधोरेखित करावेसे वाटते. तुम्ही नमूद केलेल्या पुस्तकांची यादी घेतली. थोड्या थोड्या कालावधीने एकेक पुस्तक जरूर वाचेन. धन्यवाद!

In reply to by Duishen

arunjoshi123 Fri, 11/10/2017 - 18:23
पण भारतात असे अनेक श्री मंदार आहेत जे श्रद्धांचे बळी होतात किंवा काहीजण श्रद्धांच्या नावाने (उदा: आसाराम बापू, राम-रहीम, श्री. मंदार यांच्या केसमधील मांत्रिक) फसवतात.
खासकरून उत्तर भारतात लोभप्रेरित श्रद्धाळू इतके आहेत नि ते इतक्या बाबांचे भक्त आहेत कि पश्चिमोत्तर भारत जवळजवळ अहिंदू म्हणावा.

गामा पैलवान Fri, 11/10/2017 - 18:56
तजो,
या संपूर्ण यनावाला प्रकरणात खटकलेली गोष्ट आहेत ती अशी की यनावाला हिणवतात ना मग त्यांना आपण हिणवा.... आता याला कितीही सुसंस्कृतपणाचा, उच्चभ्रूपणाचा, आदरसन्मानाचा वगैरे वगैरे मुलामा द्यायचा प्रयत्न केला तरी ते शेवटी ठरले नळावरचे भांडणच. यनावाला आस्तिकांची अक्कल काढतात का तर मग आम्ही त्यांना स्वयंघोषित सुधारक म्हणून त्यांची पात्रता-प्रामाणिकपणा वगैरे काढणार. शेवटी दोन्ही पार्टीज एकमेकांचे चारित्र्यहनन व प्रतिमाहनन करण्यात स्वारस्य ठेवून आहे असे दिसून आले. खर्‍याखुर्‍या चर्चेसारखं काही दिसलं नाही.
कृपया या विश्लेषणातून मला वगळावे हे विनंती. मी कुठेही यनावाला यांना हिणवले नाहीये. आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

गामा पैलवान Fri, 11/10/2017 - 23:07
तजो, धन्यवाद! :-) मी आजूनही यनावाला यांच्याविषयी आशादायी आहे. कारण की ते नास्तिपक्षाचे आस्तिक आहेत. आ.न., -गा.पै.

सचिन७३८ Mon, 11/13/2017 - 16:16
देव न मानणाऱ्यांनी देवास्तित्वावर घेतलेली चिकीत्सक वृत्ती बऱ्याचदा पटते. कोणाच्याही भावना दुखवू न देता हा विषय हाताळणे योग्य. धर्म व देवाचा आधार घेऊन केलेल्या अवडंबराविषयी वेगवेगळ्या महापुरूषांनी केलेल्या भाष्याचा अनेक नास्तिक आधार घेऊन हिरीरीने मत मांडतात. बा द वे हमीद दलवाईंच्या नास्तिकतेबद्दल नास्तिकांची मते कळू शकेल काय?

चामुंडराय Wed, 11/15/2017 - 08:58
एक्का काका तुम्ही हे बरें नाही केले. प्रा. वालावलकरांचा सगळा ट्यार्पी तुम्ही खेचून घेतला कि हो ! अगदी अजो पासून तजो पर्यंत सगळ्यांनी इकडे हजेरी लावली आणि त्यांचा धागा मागे पडला. त्यांच्या धाग्यावर अठ्ठावीस दश प्रतिसादांचे भविष्य वर्तवले होते ते तुमच्या या धाग्यामुळे खोटे ठरणार कि काय? छ्या, भविष्यानुगतिक श्रद्धा सिध्द करण्याची संधी हुकली.