"जलवंती" वर प्रवेश करण्याआधीचे इशारे
महासागराचे अथांग पाणी........
संकटे एकटी कधीच येत नाहीत
पाण्याइतक्याच खोल अशा नियतीची सदैव साथ घेऊन येतात
वरचे असीम आकाश.......मनातल्या साऱ्या आकांक्षा चुरडून टाकणारी निराशेची पोकळी
दूर राहिलेला किनारा.......कधीकाळी पाहिलेली स्वप्ने ........
आठवणीतच राहिलेले आप्तस्वकीय
तरीसुद्धा
तरीसुद्धा
प्रवास कुणी टाळत नाही
पाय थांबत नाहीत
हात थकत नाहीत
डोळे शिणत नाहीत
मन मात्र स्वप्नांचे पंख लावून दिशाहीन असीम आकाशात विहार करतच रहाते
अशा प्रवासाला शेवटचा मुक्काम नसतो
असते ती फक्त अर्ध्यातून सुटलेली सोबत
कधी घरादाराची
कधी सख्या-सवंगड्यांची
जिवलगांची
कधी कधी तर स्वतःची सुद्धा.....
वरती नियती फक्त आपली बोटे चाळवते
दोऱ्या अकल्पितपणे हलतात
आणि आपण कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे
या समुद्रावरून त्या समुद्रावर
या खंडावरून त्या खंडावर
कधी आपल्या स्वप्नातून दुसऱ्याच्या स्वप्नात
....कधी या जन्मातून त्या जन्मात
....एका अज्ञातातून दुसऱ्या अज्ञातात
अपरिहार्यपणे फेकले जातो
कुणी म्हणतात
"नशीब आपले, दुसरे काय?
असेच चालत राहतील पाय
जीवन अळवावरचे पाणी
इथून तिथे वाहत जाय"
अशा घटना घडतात
काही पाण्यातल्या क्षुल्लक बुडबुड्याप्रमाणे फुटून जातात
काही कथा होतात आणि एका शतकातून दुसऱ्या शतकामध्ये
निरंतरपणे वाहत जातात
त्यांना अंत नाही क्षय नाही
......याही कथेला वय नाही........
उपोद्घात
तो अथांग सागर अपुल्या मस्तित होता
लाटांचे वैभव उधळित गर्जत राही
मज कोण रोखते एकवार तरि पाहू
धुंदीत मग्न अपुल्याच बरळतो काही.
नमनालाच घडा नाहीतर घाणा
अभ्या