मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिला क्रिकेट वर्ल्ड कप - २०१७

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
डिस्क्लेमर : खालील लेखातील काही टीका-टिप्पणी ही माझी वैयक्तिक मते आहेत.अशा लेखात "मी आणि माझी मते", होणे स्वाभाविकच आहे.तस्मात माझ्या ह्या मतांकडे दूर्लक्ष करावे, ही विनंती. कुणीतरी ह्या विषयावर धागा काढेल असे वाटत होते पण..... एक श्रीलंकेविरूद्धचा सामना सोडला तर आजपर्यंत तरी भारतीय महिलांनी ह्या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मिताली राज स्वतः एक अप्रतिम फलंदाज आणि एक उत्तम संघनायक तर आहेच पण ह्यावेळी स्मृती मंधाना आणि पूनम राऊत ह्यांच्यामुळे एक उत्तम ओपनिंग पण मिळत आहेच. झूलन गोस्वामी, एकता बिश्त, दिप्ती शर्मा, हरमीत कौर, पूनम यादव, मानसी जोशी आणि शिखा पांडे ह्यांची गोलंदाजी पण बर्‍यापैकी होत आहे. सुषमा वर्मा ह्या विकेट कीपरने पण ऐन मोक्याच्या वेळी जलदगतीने धावा जमवल्या आहेत (विशेषतः पाकिस्तान विरूद्धच्या मॅचच्या वेळी) इंग्लंड विरुद्धची मॅच सोडली तर इतर संघां विरूद्ध जिंकणे बर्‍या पैकी सोपे होते. पण आता मात्र पुढे होणार्‍या, भारता विरूद्धच्या सगळ्याच मॅचेस घाम काढणार्‍या आहेत.आता मात्र भारतीय संघाला गचाळ क्षेत्ररक्षण, मंद गतीने केलेली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा फायदा न घेता केलेली गोलंदाजी, अशा चूका ह्या तिन्ही संघांविरूद्ध महागातच पडतील.ह्या सगळ्या चूका आधीच्या सामन्यात करून झाल्या आहेत.पण साउथ आफ्रिका , न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ फार व्यावसाइक वृत्तीने खेळतात.इथे चुकांना क्षमा नाही. ८ जुलैला होणारी साउथ आफ्रिका विरूद्ध भारत.. (साऊथ आफ्रिकेने वेस्ट इंडिजला ४८ धावातच गुंडाळले) १२ जुलैला होणारी ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत (अद्याप तरी हा संघ हा वर्ल्ड कप जिंकेल असे वाटत आहे.सगळ्या मॅचेस ह्यांनी फार अभ्यास करून जिंकल्या आहेत.अगदी श्रीलंकेने केलेला २५७ धावांचा डोंगर पण एकदम लीलया पार केला.चमारी अटापट्टूच्या १७८ रन्स हे पण ह्या सामन्याचे वैशिष्ट्य.) १५ जुलैला होणारी न्युझीलंड विरूद्ध भारत (सूझी बेट्सचा अडथळा आहेच पण त्याही पेक्षा अ‍ॅमी आणि राचेल प्रिस्ट ह्या फलंदाजांचा पण काही भरवसा नाही.) राचेल प्रिस्टची ही खेळी एकदम प्रेक्षणिय (http://www.hotstar.com/sports/cricket/womens-world-cup-2017/m183478/match-clips/priests-blistering-90-downs-wi/2001904476) १८ जुलै सेमी फायनल २० जुलै सेमी फायनल २३ फायनल सर्व मॅचेस दुपारी ३ वाजता सुरु होतात. आता पर्यंतची सगळ्यात जास्त रन्स झालेली मॅच म्हणजे इंग्लंड विरूद्ध साऊथ आफ्रिका http://www.hotstar.com/sports/cricket/womens-world-cup-2017/m183475/match-clips/england-end-sas-unbeaten-run/2001904460

वाचने 17749 वाचनखूण प्रतिक्रिया 63

In reply to by उपेक्षित

मुक्त विहारि Fri, 07/07/2017 - 16:04
एकाच विषयाला अनेक पैलू असतात. झूलन गोस्वामीच्या गोलंदाजीपेक्षा मला ऑस्ट्रेलियाच्या पेरीची गोलंदाजी आवडते, पण कदाचित दुसर्‍या व्यक्तीला ते मत पटणार नाही, म्हणून आधीच असे खुलासे केलेले बरे..... शिवाय, माझेच म्हणणे खरे, असे आम्हाला तरी वाटत नाही.

In reply to by मुक्त विहारि

उपेक्षित Fri, 07/07/2017 - 18:11
बरोबर आहे तुमचे म्हणणे, असो मला फ़क़्त इतकेच वाटले कि वरच्या सध्या आणि सरळ लिखाणाला डिस्क्लेमरची गरज नव्हती. पण दुर्लक्षित अशा महिला क्रिकेट वर धागा काढल्याबद्दल धन्यवाद देवा.

In reply to by उपेक्षित

मुक्त विहारि Fri, 07/07/2017 - 18:51
बरेच रिपू ह्यामूळे दूर आहेत. जाहीराती न बघता, हा खेळ बघता येतो.पुरुषांच्या मॅचच्या प्रक्षेपणाच्या वेळी, एखाद्या ओव्हर मधल्या शेवटच्या बॉलला चौकार/ षटकार/किंवा आऊट झाला की लगेच जाहीराती सुरु. इथे मात्र तसे होत नाही...... "महिला क्रिकेट वर धागा काढल्याबद्दल धन्यवाद देवा." माझे धन्यवाद मानू नका, कारण खेळांवरील चर्चा मला आवडतात (मला चेस खेळणे जमत नसले तरी चतुरंगांनी काढलेले चेस मधली चर्चा आवर्जून वाचतो.) कुणीतरी धागा काढेल म्हणून वाट बघत होतो. पण परवाची इग्लंड वि साऊथ आफ्रिका मॅच बघीतल्या नंतर मात्र रहावले नाही.

विशुमित Fri, 07/07/2017 - 15:54
कालच वाटले होते श्रीगुरुजींनी महिला वर्ल्ड कप वर धागा काढायला हवा. ते काम तुम्ही केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद. या धाग्यावर गुरुजी चारचाँद लागवतील आणि आमच्या ज्ञानात भर टाकतील, ही आशा करतो.

मुक्त विहारि Sat, 07/08/2017 - 22:52
आधी लिहिल्या प्रमाणे "साउथ आफ्रिका , न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे तिन्ही संघ फार व्यावसाइक वृत्तीने खेळतात.इथे चुकांना क्षमा नाही." असेच घडले.... असो,

श्रीगुरुजी Sat, 07/08/2017 - 22:53
आज भारताला द. आफ्रिकेने ११५ धावांनी हरविले. दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ५० षटकांत २७३ धावा केल्यानंतर भारताची एक वेळ १ बाद ४७ अशी बरी परिस्थिती होती. परंतु नंतरच्या ८ षटकात केवळ १८ धावा करताना भारताने ६ बळी गमाविल्यामुळे अवस्था ७ बाद ६५ इतकी दारूण झाली व तिथेच सामना जवळपास संपला. आता ५ सामन्यानंतर भारताचे एकूण ८ गुण असून भारत ८ देशांच्या या स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. श्रीलंका (४ सामने), वेस्ट इंडिज (४ सामने) आणि पाकिस्तान (५ सामने) यांचे अजूनही शून्य गुण असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताला उपांत्य फेरीत जाण्याची बरीचशी संधी आहे. अजून १ सामना जिंकला किंवा अनिर्णित राहिला तरी भारताचे उपांत्य फेरीतील स्थान नक्की होईल. अर्थात भारत उपांत्य फेरीचा अडथळा पार करून अंतिम फेरीत जाण्याची शक्यता खूप कमी आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sat, 07/08/2017 - 23:07
तुम्ही प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद... खरे तर ह्या विषयावरील आपला अभ्यास मोठा...मीच चोंबडेपणा केला..... दुसरी गोष्ट अशी की, भारतीय संघात जिंकण्याची कॅपॅसिटी आहे...फक्त थोडी मेहनत आणि कचकाऊ वृत्ती सोडली तर हा संघ उत्तम कामगिरी अद्यापही करू शकतो.असे माझे मत. अज्ञान दूर केल्यास उत्तमच.

In reply to by मुक्त विहारि

श्रीगुरुजी Sat, 07/08/2017 - 23:25
खरे तर ह्या विषयावरील आपला अभ्यास मोठा...मीच चोंबडेपणा केला..... कसचं कसचं . . . भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व द. आफ्रिकेच्या महिलांचे संघ खूपच तगडे आहेत. जरी भारताने इंग्लंडला हरविले असले तरी तो संघ खूप तगडा आहे. भारत या ३ संघांच्या बरोबरीने नक्कीच उपांत्य फेरीत येईल. परंतु त्यानंतरच खरी परीक्षा आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ सुद्धा पहिल्या पाचात असला तरी तो संघ बहुतेक उपांत्य फेरीत येणार नाही असे वाटते. उर्वरीत ३ संघ केव्हाच बाहेर पडले आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मुक्त विहारि Sat, 07/08/2017 - 23:30
न्युझीलंड आणि साऊथ आफ्रिकेची मॅच पावसाने वाया घालवल्यामुळे ह्या पुढील एक जरी (अर्थात चान्सेस फक्त "न्युझीलंड" पुरतेच) सामना जिंकला तरी खूप. ऑस्ट्रेलियाच्या पेरीच्या फॉर्म पुढे आपली डाळ शिजणे जरा कठीणच.

श्रीगुरुजी Sun, 07/09/2017 - 19:17
इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया - इंग्लंड ५० षटकांत ८ बाद २५९, ऑस्ट्रेलिया ८ षटकांत बिनबाद ३१. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर ऑस्ट्रेलियाचे १० गुण होऊन त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश नक्की होईल. इंग्लंडने जिंकला तर ५ सामन्यात इंग्लंडचे ८ गुण होऊन ऑस्ट्रेलिया, भारत व इंग्लंड या तिघांचे समान ८ गुण असतील. परंतु निव्वळ धावगतीमुळे ऑस्ट्रेलिया प्रथम क्रमांकावर राहील व त्यापाठोपाठ इंग्लंड दुसर्‍या क्रमांकावर असेल.

श्रीगुरुजी Wed, 07/12/2017 - 20:55
ऑसीजविरूद्ध भारत पराभवाच्या मार्गावर आहे. भारताच्या २२६/७ चा पाठलाग करताना ऑसीज ३७ षटकांत १७९२ इतक्या मजबूत स्थितीत आहेत. दुसरीकडे आफ्रिकेने लंकेला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश नक्की केला आहे. तिसरीकडे इंग्लंडच्या २८४ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड ३४.४ षटकांत ६ बाद १५९ अशा अडचणीत आहे. इंग्लंड हा सामना बहुतेक जिंकेल अशी चिन्हे आहेत. म्हणजे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व आफ्रिका यांचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की आहे. भारताचा शेवटचा सामना न्यूझीलंडबरोबर आहे. या सामन्यातील विजेता हा उपांत्य फेरीत प्रवेश करणारा चौथा संघ असेल. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारत उपांत्य फेरीत जाईल.

In reply to by अभिदेश

मुक्त विहारि Sun, 07/16/2017 - 00:11
असो. तुम्ही जर ह्या वर्ल्ड कप मधील सगळ्या मॅचेस बघीतल्या असत्या तर हा प्रश्र्न तुमच्या मनांत नसता आला. अर्थात. पुणेकरांना शंकाच फार....(आमच्या बाबा महाराजांच्या मते पुणेकर म्हणजे एक नंबरचे आस्तिक....त्या आस्तिकांत (आमच्या भाषेत पुणेकरांत) तुमच्यासारखे शंकेखोर पण आलेच.)

In reply to by मुक्त विहारि

अभिदेश गुरुवार, 07/20/2017 - 21:59
त्यामुळे नो कंमेंट्स ...बाकी तुमचा चालू द्या ..एक सल्ला ... इकडे कोण पुणेकर , तुमच्या भाषेत आस्तिक/नास्तिक आहे ते शोधण्यापेक्षा चांगले वाचन करा . गरज आहे त्याची तुम्हाला.

भारतिय महिला क्रिकेट संघ सद्या चांगली कामगिरी करत आहे. पुरुष क्रिकेटमध्ये इतका पैसा (आणि त्यामुळे मिळालेले महत्व) आहे की त्यामुळे केवळ महिला क्रिकेटच नाही तर इतर सर्व खेळ झाकोळले गेले आहेत. त्यामुळे हा धागा काढल्याबद्दल मुविंचे खास अभिनंदन !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मुक्त विहारि Sun, 07/16/2017 - 00:06
कृपया, माझे अभिनंदन करू नका. कारणे, १. जेम्स वांड सारखे डू आय डी शत्रू होतात. २. काही पुणेकरांच्ता (आमच्या गुरुजींच्या भाषेत "आस्तिकांच्या" पोटात दुखते.) ३. आस्तिकांच्या मते तुम्ही पण पार्शालिटी करता असे मनांत येवू शकते. (तसे ते अजया ताईच्या बाबतीत झालेले आहे.) मिपा सदस्यांसाठी इशारा : आमच्या विचारांना सहमती देणे धोकादायक होवू शकते. जेम्स वांड सारख्या पुणेकरांची शिकार होवू नका.

श्रीगुरुजी Sat, 07/15/2017 - 14:35
आज भारताचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड बरोबर आहे. न्यूझीलंडचा सुद्धा हा शेवटचाच सामना आहे. भारताचे ८ गुण असून न्यूझीलंडचे ७ गुण आहेत. भारताला हा सामना जिंकायला हवा. अगदी बरोबरीत सुटला किंवा अनिर्णित राहिला तरी चालेल.

श्रीगुरुजी Sat, 07/15/2017 - 20:51
न्यूझीलंडविरूद्ध भारतीय महिला संघ विजयाच्या मार्गावर आहे. भारताच्या ५० षटकांतील २६५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची २२ षटकांत ७ बाद ६२ अशी दारूण अवस्था झालेली आहे. भारताचा विजय जवळपास नक्की झाल्याने भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेशही जवळपास नक्की झाला आहे.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 15:34
आज भारत वि. ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीचा दुसरा सामना आहे. इंग्लंड आधीच अंतिम फेरीत पोहोचले आहेत. आजचा सामना पावसामुळे अजून सुरू झालेला नाही. सामना रद्द झाला तर सरस गुणांमुळे ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत जाईल. आज सामना सुरू होऊन पावसामुळे अर्धवट अवस्थेत थांबला किंवा आज पावसामुळे सामना सुरूच झाला नाही तर सामना उद्या खेळविला जाईल.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 19:20
पावसामुळे ४२ षटकांचा सामना खेळला जातोय. भारताची प्रथम फलंदाजी आहे. आतापर्यंत १६ षटकांत २बाद ५७ धावा झाल्या आहेत. मिताली राज अजून खेळत आहे. ४२ षटकांत किमान २२५ धावा व्हायला हव्यात.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 19:59
११५/३(२७). मिताली राज ३६ धावांवर बाद. हरमीत कौर ने ६ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने आतापर्यंत ६४ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या आहेत.

श्रीगुरुजी गुरुवार, 07/20/2017 - 21:26
४२ षटकांच्या सामन्यात भारत ४२ षटकांत ४ बाद २८१. हरमनप्रीत कौरने तुफान फलंदाजी करताना २० चौकार व ७ उत्तुंग षटकार मारून केवळ ११५ चेंडूत नाबाद १७१ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला ६.७१ प्रतिषटक धावगतीने ४२ षटकात २८२ धावा कराव्या लागतील. भारताला सामना जिंकून अंतिम फेरीत जाण्याची उत्तम संधी आहे. आज हरमनप्रीत कौरची फलंदाजी बघून असे वाटत आहे की भारतीय पुरूष संघातल्या एखाद्या खेळाडूच्या जागी तिला घ्यावे.

एस Fri, 07/21/2017 - 00:42
भारतीय संघाला अंतिम सामन्यासाठी भरभरून शुभेच्छा! लॉर्ड्सवर विश्वचषक उंचावण्याचा बहुमान मिताली राजला मिळावा ही प्रार्थना!

श्रीगुरुजी Mon, 07/24/2017 - 14:21
मुली चांगल्या खेळल्या. थोडासा अनुभव कमी पडला. १९१/३ वरुन १९६/५ झाल्यानंतर उरलेल्या सर्व जणी गडबडून गेल्या. विजय हातातोंडाशी आहे. संयम ठेवला तर व्यवस्थित जिंकू हे लक्षात न घेताच एकदम पॅनिक होऊन घाईगडबड केली. वेदा कृष्णमूर्ती आक्रमक खेळत होती. परंतु ती दोन वेळा वाचली होती. एकदा यष्टिरक्षकाला चेंडू नीट पकडता न आल्याने ती यष्टिचित होताहोता वाचली, तर दुसर्‍यांदा तिचा अगदी सोपा झेल सुटला. तरीसुद्धा ती चेंडू उचलून मारतच होती. २-३ वेळा उचललेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेला. थोडासा खाली असता तर झेल गेला असता. परंतु तिने संयम दाखविला नाही. दिप्ती शर्माने तीच चूक केली. ती खूप चांगली फलंदाज आहे. तिची सर्वाधिक धावसंख्या १८८ आहे. ती असताना शेवटच्या १८ चेंडूत १४ धावा हव्या होत्या व ७ गडी बाद झाले होते. फक्त स्ट्राईक रोटेट करीत १-१ धाव घेण्याची गरज होती. परंतु तिनेसुद्धा चेंडू उचलून मारून झेल दिला. इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ४४ षटकांत ६ बाद १८८ धावा होत्या. परंतु उर्वरीत ६ षटकात त्यांनी ४० धावा करताना चेंडू क्वचितच निर्धाव जाऊन दिला. त्यांचे फलंदाज जवळपास प्रत्येक चेंडूवर किमान १ धाव तरी घेत होते. भारताने शेवटी तसेच करायला हवे होते. ४२ चेंडूत फक्त ३८ धावा हव्यात आणि फक्त ३ गडी बाद अशा अवस्थेत सामना हरणे ही जवळपास अशक्यप्राय गोष्ट होती. परंतु मुलींनी ती अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. सामना जिंकता आला नसला तरी संपूर्ण स्पर्धेत मुली खूप चांगल्या खेळल्या. कालच्या सामन्याचे प्रक्षेपण २०० देशात केले गेले होते. यानिमित्ताने महिला क्रिकेटचे महत्त्व अधिक वाढो हीच सदिच्छा!

In reply to by श्रीगुरुजी

रुपी Tue, 07/25/2017 - 01:55
खरंय. काही काळापूर्वी महिला क्रिकेटबद्दल फार काही माहीत नसायचे. आता सामने पाहिले जात आहेत, इतक्या खेळाडूंची नावे माहीत आहेत, सगळीकडे इतकी चर्चा होत आहे यासुद्धा खूप सुखद बाबी आहेत. काल पूनम राऊत आणि हरमनप्रीतही चांगल्या खेळल्या. हरमनप्रीतने आल्यावर संथ सुरुवात केली, पण तेव्हा विकेट जाऊ न देणेही महत्त्वाचे होते.