मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जाणता राजा

महासंग्राम · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गाव : विदर्भातलं एक खेड वेळ : सकाळची , स्थळ : गावाची चावडी पात्र : रामराव आणि शामराव, वय : ५५-६० च्या आसपास. रामराव : "राम राम ओ शामभौ कुटी चालले इतक्या घाई मदी." शामराव : "राम राम, ते शेतात गेल्तो जरा सोयाबीन ले पानी द्याचं व्हतं, तुमाले मालूम नाई का रातीची इज देतात ना ते MSEB वाले." "न आता जरा उमरावातीले जाऊन येतो, ते मावा पडलाय सोआयबीन वर त्यासाठी कीटकनाशक घेऊन येतो जरा. लौकर जा लागते सकायची बस गेली का त वडाप नायतर कोणाच्या तरी गाडीवर जा लगीन मले शहरात." रारा : "जाशीन ना बे, पण हे बातमी पायली का त्वा, आताच लाईट आली अन टिव्ही लावला तर ते बातमी सुरु होती." " पाह्यलं का किती जंगी उदघाटन झालं स्मारकाचं, आता आपल्या राजाची किर्ती जग भर पोहोचणार पायतच जाय बाबू तू" !!! शारा : "अबे हो, तुय सारं बरोबर पन त्या साठी तर लैच पैका खर्च झाला म्हने ?" रारा : "हो मग ३६०० करोड रुपये खर्च होणारे, असं तसं स्मारक नाही जागतिक दर्जाचं स्मारक व्हनार आहे ते तेवढा खर्च किरकोळ आहे बे." शारा : "त्याले तिथल्या मच्छीमारांचा पन विरोध आहे असं ऐकलं बे म्या खरं व्हय का ते ?" रारा : "व्हय हुईन त्यायले थोडा प्रॉब्लेम, थोडा त्रास सहन करावाच लागन त्यायले. पण त्यामुळे पर्यटनाले किती हातभार लागीन बाबू याचा इचार कर न तू . जगभरातले लोकं येतीन ते पाहाले." शारा : " पण मले एक सांग शिवाजी राजाच सारं आयुष्य गडकिल्ल्यावर गेलं. मग हे स्मारक कायले ते गडकिल्ले ते काऊन दुरुस्त नाई करत सरकार त्या पैशातून ? " अन स्मारक शिवाजी राजाने तर जलदुर्ग बांधेल हायेत ना मंग तटी काऊन नाही केल स्मारक. रारा : "सरकार कुटी-कुटी लक्ष दिन बे. लोकाईन त थोडं काम कराले पाइजे कि नाई ?" शारा : "तुयी गोस्ट बरोबर हाये, तू म्हणत तसं काई संस्था काम करतात बी जीव वतुन किल्ले बांधाच, पण त्यायले पैका कसा पूरन. सरकार न जर त्या लोकयाले मदत केली किती भारी हुईन ते, स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून काम करणाऱ्या लोकाईले किती हुरूप येईन याचा बी इचार करन तू जरा." रारा : " हम्म, तुया बोलन्यात पॉईंट हाय थोडा. " शारा: "आता मले सांग आपल्या अटीच लाईट नसते, यस्टी वेळेवर येत नाई. सकायी सकायी अर्धे लोकं त्या कमानीपाशी रस्त्यावर बसत्यात. गावात नवीन कोणी पावना आला कि त्याले सलामी देत उबे रायतात." "आता माया शेतात म्या जलयुक्त शिवार अंतर्गत शेततळं करून घेतलं त्यामुळे माया न बाजूच्या सुदाम्या अन सुभानरावाच्या शेतात पाण्याची सोय झाली. पण गावात असे बी कास्तकार हायेत त्यायच्या कडे या साठी पैसा नाई, त्यामुळे त्यायले रब्बीत काय करावं,कास्तकारी सोडून द्यावी का ?" "हे झाली आपल्या गावाची कंडिशन, तू जरा खाली मेळघाटात जाय बरं तिकडं प्याले पानी नाई, रस्ते नाई, लाईट नाई. त्याहिनं काय करावं ?" आता तू सांग कोणत्या राजाळे आपल्या प्रजेले असा त्रास झालेला आवडीन. रारा : "अबे पन !!!" शारा : "पन गिन काई नाई मी काय बोलतो ते बघ आदी. हा स्मारकावर खर्च होणारा पैका थोडा किल्ले दुरुस्त कराले. थोडा जिकडे रस्ते, पानी, लाईट नैत अशा म्हणजे मेळघाट, चंद्रपूर मदल्या दूरच्या खेड्यात थोड्याफार त सोई देता येतीन. " "अन शिवाजी राजाले 'रयतेचा राजा' म्हटलं जायचं, मग तो पैसा त्याच्या रयतेसाठी वापरला तर त्यायचं कल्याण हुईन ना." रारा : "लैच चाबऱ्या तोंडाचा होयेस बे तू . देवाले असं एकेरी नावानं बोलतेत का ?" शारा : "बरं मी निगतो आता, पण त्या आदी व्हॉटसऍप वर माया पोरानं एक 'नरहर कुरुंदकर' म्हणून मोठा माणूस हुन गेला त्याचा म्यासेज पाटवला तो ऐक अन तुया डोक्शात काय प्रकाश पडते का बग." कुरुंदकर म्हन्तेत, " माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."

वाचने 17363 वाचनखूण प्रतिक्रिया 62

अनन्त अवधुत Mon, 12/26/2016 - 14:18
पन कोनीतरी म्हटल्याप्रमाणे गडकिल्ले किंवा स्मारक असे नाही , आपल्याले दोनीबी पायजे. आपल्यापुढे समद्याईले १. अन्न नाही २. वस्त्र नाही ३ निवारा नाही ४ रस्ते नाही ५ ट्रेन नाही ६ शाया नाही ७ मोबाईल नाही ८. लाईट नाही ९ फलाना नाही १० ढिकाना नाही असे सततच काही तरी नन्नाचा पाढा असणार. मंग काय हे अन स्मारक कदीच करायचं नाही का? अन शिवाजीचे स्मारक होऊन राहिले आहे , मंदिर बांधून कोणी आरती नाही गाऊन राहिले. तवा कुरुंदकर कितीबी खरे बोल्ले असले तरी इकडं लागू होत नाही.

In reply to by अनन्त अवधुत

महासंग्राम Mon, 12/26/2016 - 14:59
अनन्त अवधुत आपण लेख पुन्हा वाचण्याची तसदी घेतली तर स्मारक कधीच नव्हे तर, योग्य जागी व्हावे असं लिहिले आहे हे आपल्या लक्षात येईल. मोहिमेवर असताना रयतेच्या गवताच्या काडीलाही हात न लावण्याची ताकीद महाराजांची होती. तेव्हा त्यांच्याच रयतेच्या पोटावर पाय देऊन त्या ठिकाणी स्मारक उभारणं कितपत योग्य याचा विचार आपण नक्कीच कराल अशी आशा आहे.
शिवाजीचे स्मारक होऊन राहिले आहे , मंदिर बांधून कोणी आरती नाही गाऊन राहिले.
उद्या आरत्या सुद्धा होणार नाही याची खात्री आपण कोणीच देवू शकत नाही ???

In reply to by अनन्त अवधुत

महासंग्राम Mon, 12/26/2016 - 15:00
सततच काही तरी नन्नाचा पाढा असणार
आणि हा नन्नाचा पाढा नाहीतर वास्तव आहे जे नाकारून चालणार नाही.

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम Mon, 12/26/2016 - 17:36
हे स्मारक नाही झालं तर महाराष्ट्रापुढचे सगळे प्रश्न सुटणार आहेत असं आहे का? तुम्ही राममंदिर म्हटलं असतंत तर मी मान्य केलं असतं. तो वेडगळपणा आहे आणि धार्मिक उन्माद आहे. हा इतिहासाचा भाग आहे. उद्या लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. इथे परतावा अपेक्षित आहे.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम Mon, 12/26/2016 - 17:44
देवा, सगळे नाही तर काही प्रश्न कमी होण्यास नक्की मदत होईल. मग ते प्रमाण १-२% का असेना. बाकी परतावा म्हणाल तर स्मारक दुसऱ्या जागी उभं केलं असतं तरी भेटला असताच. समजा विजयदुर्गाजवळ हे स्मारक उभं केलं असतं तर स्थानिक पर्यटनाला चालना मिळून तिथल्या स्थनिक लोकांना लाभ झाला असता. हे तुम्ही पण मेनी करालच.

In reply to by बोका-ए-आझम

फेदरवेट साहेब Tue, 12/27/2016 - 12:47
लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. हे टुमच्या विधान, अज्ञानोद्भव टरी हाय किंवा सोईस्कर डूर्लक्ष टरी हाय, मंगलयान, चांद्रयान हे प्रोजेक्ट 'capability demonstrator' प्रोजेक्ट अस्ते सन, अश्या प्रोजेक्ट मधून टेक्निकल क्षमता एसर्ट केल्या जाते जेच्यामुळे इंडियाला अटीशाय lucrative (वर्षाला $५ बिलियन तूर्तास) अश्या space launch business मदी पैका बनवायचा (तो बी फॉरेक्स) चान्स भेटते, सद्ध्या भारत डेस चा ह्या मार्केट मंदी शेर लै कमी हाय ठो ग्रो करायला, अशे प्रोजेक्ट मदत करते. सो स्टॉप गिविंग दॅट बुलशीट आरग्युमेंट इफ यु मे सन. उदाहरण :- २०१४ मंदी इंडिया ने मंगलयान धाडून 'कॅपबिलिटी डेमॉन्सत्रेत' केली म्हनून टर २०१६ मदी इंडिया अँड इसरोला एकदम २० सॅटेलाईट लॉन्च करायचा बिझनेस मिळाला. क्लिअर? पीएस :- माय आयडी इज स्टील हेल्दी अँड फेरिंग वेल, थँक यु

In reply to by बोका-ए-आझम

चिनार Tue, 12/27/2016 - 15:11
उद्या लोक चांद्रयान, मंगळयान याबद्दलही असेच प्रश्न विचारतील. तिथे तर परतावा जवळपास शून्य आहे. इथे परतावा अपेक्षित आहे.
गाववाले असं नसते ते.. चांद्रयान आणि मंगळयान च्या भरवश्यावर ISRO ला भरपूर बाहेरील देशांच्या सॅटेलाईट वगैरेंच्या ऑर्डर्स मिळतात.

In reply to by चिनार

बरोबर! म्हणजेच मंगळयान मोहिमेवरील ४५० कोटींचा प्रत्यक्ष परतावा काही विशेष नाहीये. पण अप्रत्यक्ष परतावा खूप मोठा असू शकतो. म्हणजे, इतर देश आपल्या स्पेस टेक्नॉलॉजीला विश्वासार्ह्य मानून आपल्याकडून संबंधित उपकरणांची खरेदी करतील, आपले स्पेस लॉन्चर वापरतील किंवा स्पेस टेक्नॉलॉजी आणि मिसाईल टेक्नॉलॉजी बेस जवळपास सारखा असल्याने मिसाईलची निर्यात वाढणे वगैरेतुन अप्रत्यक्षपणे परतावा मिळेलच. मग अशा अप्रत्यक्ष फायद्यांचा विचार स्मारकाच्या बाबतीत करायला काय हरकत आहे (तोही काही लोक खर्चाची चर्चा "अपव्यय" ह्या एकाच पैलूने करत असल्याने)?

In reply to by फेदरवेट साहेब

चंद्रयानाचा खर्च आणि अपव्यय या दोन संदर्भांना धरून वरचा प्रतिसाद आहे. तुम्ही जर "जसे चांद्रयानामुळे आपली काही गोष्टींची निर्यात वाढेल तसे पुतळ्यामुळेही काही गोष्टींची वाढेल" या अर्थाने विचारत असाल तर मला तसे म्हणायचे नव्हते. मुळात या प्रकल्पात खर्च वसूल होण्याबाबत काही विचार करावा असं मला अजिबात वाटत नाही. मी माझे मत फक्त हा खर्च म्हणजे अपव्यय आहे यासंदर्भात मांडत आहे. मला असे वाटते कि भारतात पर्यटकांना आकर्षित करण्यासारख्या बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी आहेत पण फक्त त्याच पर्यटकांना आकर्षित करतात असं नाही. भारताच्या जिडीपीच्या जवळजवळ ६% पर्यटनातून येतं. यातलं अर्धं म्हणजे साधारणपणे ३% पर्यटनाच्या अप्रत्यक्ष परिणामातून येते. म्हणजे पर्यटकांच्या भेटीतील हॉटेल्स(राहणे, खाणे), छोट्या मोठ्या खरेदी (भेटवस्तू, कपडे इ. ), वाहतूक इ.तुन जमणारे उत्पन्न. म्हणून माझे असे म्हणणे आहे कि असे प्रकल्प जितके जास्त तितकं पर्यटन वाढण्याची शक्यता असेल आणि त्यातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मिळणारं उत्पन्न जिडीपीला हातभार लावू शकतं! अवांतर : मी या बाबतीतला जाणकार नाही, वाचिव गोष्टिंतील माहिती सांगण्याचा प्रयत्न!

अमितदादा Mon, 12/26/2016 - 18:06
छान लेख सहमत. तुमच्या लेखाशी समांतर असा लेख आज वाचला दर्या खुश.. त्या लेखातील आवडलेलं वाक्य खुद्द शिवरायानाही जमले नव्हते अश्या स्मारकाचे बांधकाम, त्यांनी उभारला तो महाराष्ट्र..

In reply to by लालगरूड

महासंग्राम Tue, 12/27/2016 - 11:21
लालगरूड आपण कोणती तुलना कशाशी करता आहात ध्यानात घ्या. कुठे मेट्रो आणि कुठे स्मारक दोन्हीची तुलना होऊच शकत नाही.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम Tue, 12/27/2016 - 11:14
मास्तर, तुमच्याकडून जरा अभ्यासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा होती, पण तुम्ही निराश केलं, असो

In reply to by महासंग्राम

बोका-ए-आझम Tue, 12/27/2016 - 11:30
डावे विचारवंत जे म्हणतात त्याच्या बरोबर उलटं करतात. लेनिन, मार्क्स,स्टॅलिन, माओ यांची त्यांनी दैवतं बनवलीच की. इतकी की त्यांच्या तत्वांमध्ये थोडासा फरक करणाऱ्यांनाही ते revisionist म्हणून बहिष्कृत करतात. अशा दांभिक लोकांच्या तत्वांचा निर्वाळा तुम्ही दिल्यावर मला स्वारस्य उरलं नाही.

In reply to by बोका-ए-आझम

महासंग्राम Tue, 12/27/2016 - 11:53
देवा, आमचं सूत्र सबका साथ सबका विकास हे आहे हो. बाकी तुम्ही कुरुंदकरांना डावे म्हणत असाल तर ते मान्य, पण त्यांचे महाराजांविषयीचे विचार पटतात. बाकी डाव्यांविषयी ममत्व बिलकुल नाही. फक्त महाराजच नाही तर इतरही लोकांना देवत्व न बहाल करता प्रॅक्टिकल नजरेने पहायला हवं हे म्हणणं आहे.

ज्योति अळवणी Mon, 12/26/2016 - 20:31
जर असाच विचार शहाजहानने केला असता तर कदाचित ताजमहाल नसता आणि भारताचं नाव जगाच्या पाटीवर कधी लिहिलं गेलं नसत. हे मान्य आहे की अजून अनेक बेसिक प्रश्न आहेत. पण गेल्या दोन वर्षात महाराष्ट्र सरकारच काम बघितलं तर असं वाटत की हे प्रश्न देखील सोडवले जातील पुढील भविष्यात. मुख्य म्हणजे एकदा हे स्मारक झालं की ते पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक येतील आणि त्यातून जे अर्थार्जन होईल ते नक्कीच विकास कामांसाठी वापरलं जाईल त्यात गफला होणार नाही; निदान इतका विश्वास तर फडणवीस सरकारने कमावला आहे. आता विषय स्मारकाच्या जागेचा. येणारे पर्यटक हे केवळ स्मारकच नाही तर जगत्विविख्यात मुंबापुरी देखील बघतील. म्हणजे अजून जास्त अर्थार्जन होईल. दोस्तानो, हा निर्णय घेताना नक्कीच खूप विचार झाला असणार. शेवटी मोदीजी बनिया आहेत!☺

In reply to by ज्योति अळवणी

महासंग्राम Tue, 12/27/2016 - 11:20
आपली गल्लत होतेय शिव स्मारकाचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता, आणि फक्त मुंबईच का ??? अजिंठा-वेरूळ, लोणार, खिद्रापूर कोप्पेश्वर, सिन्नरच शिवपंचायतन हे काय दुसऱ्या आहेत का ??? इथला विकास नको व्हायला. बाकी ठिकाणी अर्थांजन नको व्हायला असे तुमचे म्हणणे आहे समजायचं का ???

In reply to by महासंग्राम

ज्योति अळवणी Wed, 12/28/2016 - 08:21
केवळ महाराष्ट्रचं का संपूर्ण भारत प्रगत झाला पाहिजे असं माझं मत आहे. पण त्यासाठी लागणारा पैसा जर विदेशी नागरिक इथे आल्याने उभा राहत असेल तर काय हरकत आहे? तुम्हाला एक कांडी फिरवून जादूची अपेक्षा का आहे? निर्णय कोणाच्याही काळात झाला असो, execution आता होतं आहे. या सरकारचे प्रगतीसाठीचे प्रयत्न प्रामाणिक आहेत; असं नाही का वाटत तुम्हाला. जे 60 वर्षात झालं नाही ते 60 महिन्यात व्हावं असं का वाटत आपल्याला? मागील सरकारने अनेक निर्णय घेतले आणि काम नाही केलं. या सरकारने कामाला सुरुवात तर केली आहे. थोडा विश्वास ठेवला तर कदाचित positive results दिसतील की

In reply to by ज्योति अळवणी

महासंग्राम Wed, 12/28/2016 - 12:19
हे माझ्या आपण विषय दुसरीकडे नेता आहात, इथे ६० वर्ष आणि ६० महिने तुलना कुठून आली. आपण मुद्द्यांना दहरुन उत्तर द्याल हि अपॆक्षा आहे.

पैसा Tue, 12/27/2016 - 11:22
माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.""समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."
एकदम सही लिहिलंय. लेख आवडला. पण बहिर्‍या कानांवर पडणार आहे. :( लोकांचे टॅक्सचे पैसे इकडे खर्च करण्यापेक्षा सरकारने राज ठाकरे, करण जोहर वगैरे मुख्यमंत्र्यांचे जे मित्र सैनिक कल्याण निधीला पैसे द्यायला तयार होते त्यांच्याकडून आणि उद्योगपतींकडून पैसे गोळा करावेत आणि स्मारक बांधावे. रस्ते जसे टोलवाल्यांना बांधा, डागडुजी करा आणि मग सरकारच्या हवाली करा म्हणून सांगतात तसे हे स्मारकही करावे. कोणालाच कटकट नको.

सतिश पाटील Tue, 12/27/2016 - 12:58
थोडक्यात का्य तर मुंबई महापालिका काबिज करण्यासाठी ३६०० कोटी रुपये खर्च करण्याची तयारी ठेवलीय यांनी. एवढे पैसे जर गड किल्ल्यांची डागडूजीसाठी वापरले तर सबंध महाराष्ट्रात पर्यटन वाढ होईल एवढेकिल्ले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात. इतिहास, किल्ल, पार्श्वभूमी अणि शिवाजी पण समजेल, पाहिजे त्या ठिकाणी एवढे पैसे खर्च केल्यावर. पण परदेशी लोकांना तिकडे मुम्बैच्या किनार्यावरच शिवाजी दाखवायचा, म्हणजे आतली पड़झड लपवता येइल.

वरुण मोहिते Tue, 12/27/2016 - 13:06
हे स्मारक आणि भाजप यांचा बिलकुल संबंध नाही . आज सत्ता त्यांची म्हणून अतिशय चुकीचं आणि भपकेबाज प्रदर्शन केलं. ह्यामुळेच १२ वर्षांपूर्वी भाजप ची सत्ता गेली होती .मूळ निर्णय काँग्रेस चा असो काँग्रेस चा हि हक्क नाही . पण जाहिरातबाजी मध्ये भाजप अव्वल आहे . साधं अजून कामाचा टेंडर नाही निघालंय त्यामुळे घाईत मत मांडणं चुकीचं होईल . स्मारक व्हावं हि इच्छा आहे स्मारक का व्हावं त्यालाही काही कारण आहेत पण त्याचा बाकीच्या पैसांशी संबंध लावणं हाच पैसा इथे गेला तर चांगला अशी तुलना अस्थानी आहे . राज्य शासनाची कामे ठराविक मंत्रालय त्यांना मिळालेला निधी हे नियोजित असतं.

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे Tue, 12/27/2016 - 13:31
अहो, कॉन्ग्रेसने (खरंतर साहेबांनी) ही टूम काढली ती मराठा मतांची मोळी बांधायला. शिवसेनेनी महाराज कवटाळून धरलेत, मग स्मारक करुन मते फोडायची चाल होती. त्याला तेव्हाही विरोध झालेलाच. कुमार केतकरांनी उपरोधपूर्ण लेख लिहिला तेव्हा त्यांच्या घरावर विनायक मेटेनी जमाव नेऊन तोडफोड केली होती. समुद्रातले शिवस्मारक ह्याला अनेक शिवप्रेमींचा विरोध तेव्हाही होता आताही आहे. तो तेव्हाही सरकार बघून होत नव्हता आताही नाही. सरकार कोणाचे आहे हे बघून स्मारकाला विरोध होतोय म्हणणारे कदाचित २००८ मध्ये जन्माला आलेले नसतील. =))

In reply to by संदीप डांगे

हे तेच २००८ वाले विरोधक आहेत हे मोठ्या खात्रीने सांगत आहात आपण! पण हेच लॉजिक स्मारकाच्या समर्थकांना लागू नाही होत बहुतेक! ते आताच्या भाजप सरकारचे समर्थक असा सूर दिसतो, असो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

विशुमित Tue, 12/27/2016 - 13:56
हेच लॉजिक स्मारकाच्या समर्थकांनाच म्हणजेच भाजपच्या समर्थकांना लागू होतंय, म्हणून तर एवढी आदळआपट आहे. बाकी असो...!!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे Tue, 12/27/2016 - 14:53
गल्लत होते आहे का मुद्दा समजण्यात? विरोधकांचे महत्त्वाचे मुद्दे: १. वायफळ खर्च - हाच खर्च किल्ल्यांवर अपेक्षित २. मतांचे राजकारण - शिवाजी महाराज निवडणुकीतल्या मतांसाठी वापरले जाणे कोण्याही खर्‍या शिवभक्ताला आवडणार नाहीच. ३. अनावश्यकता - सत्ताधार्‍यांकडून स्मारकाची आवश्यकता पटवून देणारे कोणतेही लॉजिकल कारण नाही. पर्यटनविकास-महसूल कातडी-बचाव प्रयत्न आहेत राजकारण लपवण्याचे. तेव्हाही आताही. ४. दिखावूगिरी - राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असतांना भपकेबाजीचा भंपकपणा करण्याची गरज नाही. तेवढाच खर्च कल्याणकारी योजनांमध्ये, ज्यांच्या प्रेरणा त्याकाळात राजांनी रयतेसाठी घेतलेल्या निर्णयांमधे असू शकतात, केल्यास व त्यांना महाराजांचे नाव देऊन चालवल्यास जास्त उपयुक्त प्रकल्प तयार होतील. आता हेच मुद्दे तेव्हा आणि आताही कायम असतील तर २००८ चेच विरोधक आताही आहेत असे म्हणायला हरकत नाही. आणि हे मुद्दे पक्षसापेक्ष नाहीत तर स्मारकसापेक्ष आहेत. विरोधक शिवस्मारक हे मतांच्या पेटीसाठी वापरले जाण्याविरूद्ध आहे. उलट तेव्हाचे समर्थक आताही समर्थकच असतील तर मला तरी काही म्हणायचे नाही. तेही सरकार कोणाचे हे बघून निर्णय घेत नाहीत असे म्हणता येईल फारतर.. त्यांच्याशी स्मारक का असावे की नसावे, असले तर कसे असावे, नसले तर काय करावे अशी चर्चा करता येईल जी उत्पादक, विधायक होऊ शकते. ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे. अशा चर्चांमधे शेवटी मजबूत मुद्दे नसलेले लोक फुटकळ, असंबंद्ध तपशील आणून विखारी व्यक्तिगत होतात असे एव्हाना लक्षात आले आहे. त्यापेक्षा न केलेल्या बर्‍या. और कुछ? :-)

In reply to by संदीप डांगे

त्यांच्याशी स्मारक का असावे की नसावे, असले तर कसे असावे, नसले तर काय करावे अशी चर्चा करता येईल जी उत्पादक, विधायक होऊ शकते
आता कसं पटण्यासारखं बोललात बघा! हेच सांगणं आहे एकमेव! भाजप राजकारण करतोय, फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय, दिखाऊगिरी चाललीय, मतांचे राजकारण चाललंय, खरे शिवभक्त, खोटे शिवभक्त वगैरे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे असे मला वाटते. म्हणून दुसऱ्या धाग्यावर तुम्हाला टाकलेला प्रतिसाद पुन्हा इकडे टाकतो (तिकडे तुम्ही वाचनमात्र झालात म्हणून) - "बाकी हे सरकार हे कशासाठी करतंय (निवडणुकांसाठी, मराठा मोर्चान्ना उत्तर, शिवसेनेवर कुरघोडी) वगैरे मुद्दे आपण "राजकारण" आणि "तळे राखील तो पाणी चाखील" या सदरात टाकून थोडावेळ बाजूला ठेवू आणि खालील मुद्द्यांवर बोलू - १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?"

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बोका-ए-आझम Tue, 12/27/2016 - 20:25
डांगे अण्णांना भाजप आवडत नाही एवढी एक साधी सरळ गोष्ट ते सांगत नाहीत आणि वितंडवाद घालत बसतात, वर परत दुस-यांच्याकडे मुद्दे नाहीत वगैरे म्हणतात. आता इथे नाव घेतल्यानंतर ते मी व्यक्तिगत होतोय असं म्हणतील आणि याही धाग्यावर conveniently वाचनमात्र होतील. आपला विरोध राजकीय आहे हे मान्य करायचं सोडून लोक तात्विक मुलामा का लावतात तेच कळत नाही. सांगा ना सरळ - भाजपला श्रेय मिळतंय म्हणून आम्हाला हे खपत नाहीये. उगाचच या पैशांत हे करता येईल आणि ते करता येईल अशा पळवाटा कशाला काढता? आपण स्पष्टपणे म्हणतो - मी ज्या पक्षाला समर्थन देतो त्याने घेतलेला हा निर्णय मला आवडलेला आहे. मी त्याचं समर्थन करणार म्हणजे करणारच.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे Tue, 12/27/2016 - 21:01
कोण काय आहे ह्याचं सर्टीफिकेट तुम्हाला द्यायला नियुक्त केलंय हे माहित नव्हतं. धन्यवाद! मला भाजप आवडत नाही, मी वितंडवाद घालतो, माझा विरोध राजकिय आहे, शिवाय भाजपला श्रेय मिळतंय म्हणून मला खपत नाही म्हणून मी मुंबईतल्या शिवस्मारकाला विरोध करतो हा आपण लावलेला शोध महान आहे. गुड! प्रयत्न चांगला आहे. लगे रहो. आता इतके तुम्हाला इत्थंभूत पक्के माहित आहे तर फक्त एक सांगा की २००८ मध्येही ह्या स्मारकाला माझा विरोधच होता, तो का असेल बुवा? (अवांतर सूचना: वाह्यात ट्रोल्सना उत्तरे दिली जाणार नाहीत याची कृपया सर्व ट्रोलभैरवांनी नोंद घ्यावी)

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम Tue, 12/27/2016 - 21:41
त्या वेळचे सगळे संदर्भ कालबाह्य झालेले आहेत. तेव्हा तुम्ही तुमचा विरोध कुठे व्यक्त केला असेल तर त्या संस्थळाचं नाव सांगा. शोधून निष्कर्ष ऐकवू. हाकानाका. फक्त प्रामाणिकपणा दाखवा एवढं म्हटल्यावर तु्म्ही चिडला आहात. त्यावरून काय ते समजतंय. तुमचा विरोध असायला हरकत नाही, पण त्याला तात्विक मुलामा देऊ नये. तुम्ही प्रामाणिक आहात अाणि स्पष्ट काय ते बोलता असा समज होता. तो गैरसमज ठरला याचा खेद आहे.

In reply to by बोका-ए-आझम

संदीप डांगे Tue, 12/27/2016 - 21:59
त्या वेळचे सगळे संदर्भ कालबाह्य झालेले आहेत. ^^^ how convenient is that...;) जरा स्पष्ट कराल काय कोणते संदर्भ कालबाह्य झालेत ते..

In reply to by बोका-ए-आझम

ज्योति अळवणी Wed, 12/28/2016 - 08:26
तुमचं मत अगदी मान्य. याशिवाय असही वाटत की थोडा काळ या सरकारला देऊन बघायला काय हरकत आहे? त्यांचे इतर प्रयत्न प्रामाणिक आहेत हे सिद्ध झालं आहेच न

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे Tue, 12/27/2016 - 20:53
कसं आहे प्रसादजी, जो महत्त्वाचा मुद्दा आहे "राजकारण" हाच तुम्ही बाजूला टाकताय. कोणत्याही राजकिय पक्षाची बाजू न घेताही ह्या निर्णयावर राजकिय दृष्टीकोनातून चर्चा करता येते. कारण स्मारकाची संकल्पना जिथून उचलली गेलीये, ज्यासाठी उचलली गेलीये ते राजकारण आहे फक्त. बाकीचे सगळे मुद्दे त्या मूळ राजकारणाला लपवण्यासाठी केली जाणारी सारवासारव आहे. खोड तोडा, सगळ्या शाखा गळून पडतील. तरी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. १. शिवाजी महाराजांची प्रतिमा आणि कर्तृत्व याला शोभेल असे स्मारक नको का? कशाला काय शोभेल आणि त्यासाठी काय करावं ह्याच्या संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहेत. माझ्यामते भव्य स्मारक हवे असेल तर रायगड किल्ल्यावर सर्व डागडुजी करुन, लायब्ररी, थीएटर इत्यादी मुंबईतल्या संयोजित स्मारकातल्या गोष्टी तिथेही होऊ शकतात. जिथे महाराजांचा राज्याभिषेक झाला, जीथून मराठा साम्राज्याची सुरुवात झाली ती जागाच जीवंत स्मारक असतांना नवीन भलतीकडे बांधायची गरज नाही. २. हे स्मारक भव्य असू नये का? आणि असावे तर मग खर्च तसाच मोठा असणार नाही का? स्मारक भव्य नसायला काहीच हरकत नाही. शिवभक्तांनी स्वतःच्या खिशातून करत असल्यास कितीही खर्च केल्यास कुणाची ना नाही. सरकारचे म्हणजे पर्यायाने टॅक्सपेयरचे पैसे इथे वापरु नये. कोणाचीही स्मारके (अगदी शिवाजीमहाराज असो की बाबासाहेब आंबेडकर) बांधणे हे सरकारचे काम नव्हे. असले तरी स्मारके ही तरी सरकारची प्राथमिकता नसावी. ३. हे मुंबईला असणे हे एकूणच फायदेशीर नाही का? (पर्यटन, आंतरराष्ट्रीय ख्याती वगैरेसाठी) मग दिल्लीलाच का नको? आणखी आंतरराष्ट्रिय ख्याती हवी असेल तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, न्यूयॉर्क इथेही जागा घेऊन एक एक स्मारक बांधायला हरकत नाही. पर्यटन, ख्याती हे ठिसूळ कारणे आहेत. ही कारणे देणार्‍यांना दोन्हीपैकी एकाबाबत तरी पुरेसा अभ्यास आहे का असा प्रश्न आहे. मुंबईच्या गर्दीवर, गलिच्छपणावर, ट्रान्स्पोर्ट, नागरीसुविधांवर, जरा नीट लक्ष देऊन काम केले तर जास्त ख्याती होईल. जगातल्या बहुतेक सर्वांना स्टॅच्यु ऑफ लिबर्टी माहित आहे, पण त्यामागची कथा माहिती आहे? चीनची भींत माहित आहे, कुणी कशाला बांधली माहित आहे? आयफेल टॉवर का बांधला माहित आहे? झुलत्यामनोर्‍याची कारणं? बहुतेकांना ही नावे आणि चित्रात बघून ओळख असते. त्यामागची कथा बहुसंख्य लोकांना अभ्यासल्याशिवाय, स्वतःहून शोधल्याशिवाय माहित नसते. ख्यातीचे असे असते. शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आंतरराष्ट्रिय पातळीवर पोचवायचे तर त्यासाठी अमेरिकन फंडे वापरले पाहिजेत. नुसती स्मारकं बांधून आपोआप ख्याती होत नसते. त्याचाही काही अभ्यास आहे. चला मला ह्या प्रश्नांची उत्तरे मिळवून द्या: शिवाजींचा पुतळा म्हणून ओळख हवी की जगातला (भारतातला किंवा व्हाटेवर) सर्वात मोठा पुतळा अशी ओळख हवी? स्मारकाचं ब्रॅण्डींग/पोजिशनिंग नक्की काय असेल? मार्केटींगचे मूलभूत तत्व काय असेल? ताजमहाल, लिबर्टी पुतळा, आय्फेल टॉवर, पिसामनोरा ह्यासारखे इथेही विदेशी-देशी बावळट पर्यटकांनी येऊन शिवाजीमहाराजांची टोपी, तलवार वगैरे चिमटीत पकडून फोटो काढावे आणि जालावर अपलोड करावे अशी संकल्पना नसावी बहुतेक. मलातरी तसलं काही अजिबात आवडणार नाही. ४. गड किल्ल्यांवर स्मारक करणे हे ह्या भव्यदिव्य स्मारकाइतके परिणामकारक ठरेल का? नक्कीच. तुमच्या मते परिणामकारक म्हणजे काय याबद्दल स्पष्टीकरण दिलंत तर सांगताही येईल. ५. पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने सरकार किंवा अजून कोणी यात गुंतवणूक करावी का? पैसे परत मिळावेत ह्या उद्देशाने स्मारक होतंय काय? राजाच्या स्मारकासाठी असले दळभद्री विचार? हौसेला मोल नसतं, हे तर साक्षात शिवबांचं स्मारक, शिवप्रेमींकडून देणगीची अजिबात कमतरता येणार नाही. प्रसंगी आपला एक एक वर्षाचा पगार, धंद्यातला नफा, शेतीतली कमाई इत्यादी देऊन छत्तीसशे कोटीच काय छ्त्तीस हजार कोटीही गोळा होतील. ६. पैसे परत मिळूच शकनार नाहीत का?" हवेतच कुणाला इथे पैसे परत? मुंबईत अनावश्यक स्मारकाचा राजकिय स्वार्थासाठी खटाटोप करणारांना 'पैसे परत मिळतील, महसूल मिळेल' हे गाजर जनतेसमोर टाकलंय. खर्‍या शिवप्रेमींनी महाराजांची ख्याती जगभर कशी पसरेल ह्यावर लक्ष केंद्रीत करावे, काही गोष्टींमधे परतावा मिळावा अशी अपेक्षा धरत नसतात. राजांनी रयतेकडून केली नाही, आपण त्यांच्या स्मारकाकडून तरी का करावी? जर गडकिल्ल्यांवर स्मारक झालं तर उलट जास्तीत जास्त नीटनेटका ठेवायला लागेल तेवढा खर्च करावा. बाकी समर्थकांना नक्की काय हवंय हे स्पष्ट नै अजून. पर्यटनस्थळ हवंय, स्मारक हवंय, सर्वात उंच पुतळा हवाय, महाराजांची ख्याती हवीय, नक्की काय हवंय? सर्व एकत्र हवंय असं काही उत्तर देऊ नये. सिंगल लाईन नॅरेटीव च्या जमान्यात आहोत आपण. स्मारकाचे टार्गेट ऑडियन्स कोण आहेत? देशी/परदेशी/महाराष्ट्रीय, नक्की कोण? समर्थकांसाठी माझ्याकडेही अनेक प्रश्न आहेत. ते नंतर बघूया. वन बाय वन. :-)

In reply to by संदीप डांगे

मेगाबायटी प्रतिसाद देणं अजिबात आवडत नाही, पण पर्याय नव्हता :(.
माझ्यामते भव्य स्मारक हवे असेल तर रायगड किल्ल्यावर सर्व डागडुजी करुन, लायब्ररी, थीएटर इत्यादी मुंबईतल्या संयोजित स्मारकातल्या गोष्टी तिथेही होऊ शकतात.
हे काहींच्या काही वाटतेय! थोडक्यात रायगडाचे संवर्धन म्हणजे रायगडावर सुविधा पुरवण्यासाठी सिमेंटचं जंगल आणणे आहे! मुळात गड किल्ल्यांवर काय केले म्हणजे लोक तिकडे फिरकतील आणि महाराजांचा इतिहास जास्तीत जास्त पोहोचवता येईल यावर थोडा प्रकाश टाकता आला तर बघा! आणि डागडुजी करायची म्हणाल तर उत्कृष्ट स्थितीत असणाऱ्या परांडा किल्ल्याला महाराष्ट्रातील तरी लोक भेट देतात का हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे!
सरकारचे म्हणजे पर्यायाने टॅक्सपेयरचे पैसे इथे वापरु नये.
हे पटतंय तुम्हाला? म्हणजे आपल्या न आवडलेल्या प्रकल्पांवर सरकारने आपल्या करातून पैसा गुंतवावा कि नाही हे (व्यक्तिसापेक्षपणे) ठरवण्याची मुभा करदात्याला देण्यात यावी असं आहे तर! प्राथमिकता - हे बरोबर बोललात! आता सरकारची प्राथमिकता कशी ठरवायची हे पण समोर यायला हवं ना? या हिशेबाने जोपर्यंत सगळ्यांच्या पोटात अन्न पोहोचत नाही तोपर्यंत शौचालय वगैरे योजनांवर एक रुपयाही खर्च करायला नको असं काहींचं मत येऊ शकतं!
मग दिल्लीलाच का नको? आणखी आंतरराष्ट्रिय ख्याती हवी असेल तर दुबई, सिंगापूर, मलेशिया, न्यूयॉर्क इथेही जागा घेऊन एक एक स्मारक बांधायला हरकत नाही.
काहींच्या काही! हे आपलं खरंच मत आहे कि आपलं उगाच मुद्द्याला मुद्दा? स्मारकाचा प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे आणि प्रकल्प महाराष्ट्रात कुठे एवढाच मुद्दा आहे! पर्यटन आणि ख्याती हि कारणे ठिसूळ आहेत असं आपल्या पुरेश्या अभ्यासाने दाखवून दिलंत कि बाकीचे आपोआप उघडे पडतील आणि माझ्यासारखे चारदोन हि कारणे वापरणार नाहीत किंवा पर्यायाने प्रकल्पाचं समर्थन करणार नाहीत. जगातल्या स्टॅच्यु ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर, चीन ची भिंत वगैरे ठिकाणी भेट दिलेल्या बहुतांशी लोकांना त्या त्या ठिकाणाची माहिती नसणारच असा आपला दावा आहे का? आणि या स्मारकामध्ये कलादालन, ऑडिटोरियम वगैरे गोष्टी आहेत, याचा योग्य वापर करून गड किल्ल्यांची माहिती आलेल्या पर्यटकांना सांगितली तर ते लोक आपसूकच गड किल्ल्यांकडे वळणार नाहीत का?
शिवाजींचा पुतळा म्हणून ओळख हवी की जगातला (भारतातला किंवा व्हाटेवर) सर्वात मोठा पुतळा अशी ओळख हवी?
जगातला सर्वात मोठा पुतळा शिवाजी नावाच्या भारतातील महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्ववान राजाचा आहे अशी ओळख मिळयाला काही हरकत असू शकते का?
ताजमहाल, लिबर्टी पुतळा, आय्फेल टॉवर, पिसामनोरा ह्यासारखे इथेही विदेशी-देशी बावळट पर्यटकांनी येऊन....
थोडक्यात भेट देणारे सर्व पर्यटक बावळटच असतील असं गृहीतक आहे तर? आणि गड किल्ल्यांवर स्मारक केलं तर तिथे प्रेमाचे चाळे, दारूपार्ट्या, खडूने लिहिणे वगैरे प्रकार करणारे बावळट लोक येणार नाहीत का? परिणामकारक म्हणजे जास्तीत जास्त लोक भेट देतील आणि महाराजांचा जाज्वल्य इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल! हे मुंबईच्या जवळ असणाऱ्या एका भव्यदिव्य स्मारक अधिक बरंच काही असणाऱ्या ठिकाणाहून सहज पोहोचवता येईल असं माझं मत आहे! बाकी विरोधकांना कशाला विरोध करायचा आहे हेच स्पष्ट नै अजून! पैसे कसे ओतणार आहेत हे अजून स्पष्ट नसताना उगाच वितंडवाद कशाला? एका बाजूला एवढा खर्च करदात्यांच्या पैशातून का म्हणून ओरडायचे आणि मग त्यातून परतावा मिळू शकतो म्हणून सांगितले कि म्हणायचं "पैसे हवेतच कुणाला?" याला काही अर्थ आहे का? "पर्यटनस्थळ हवंय, स्मारक हवंय, सर्वात उंच पुतळा हवाय, महाराजांची ख्याती हवीय, नक्की काय हवंय" याला - स्मारक हवंय पण अगदी विचार्पूर्वक हे स्मारक एक नुसताच पुतळा म्हणून उभारण्यापेक्षा महाराजांची ख्याती पोहोचवू शकणारं, जगातील एकमेवाद्वितीय उत्कृष्ट सुविधा असणारं पर्यटन स्थळ म्हाणून तयार गेलं तर "सर्व एकत्र हवंय मिळतंय" म्हणायला काही हरकत असावी का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

संदीप डांगे Wed, 12/28/2016 - 16:04
मेगाबायटी प्रतिसाद आवडत नाही म्हणता, सगळे प्रतिसाद वनलाईनर हवेत की व्हॉट्सॅपीय चर्चा हवी? थोडक्यात रायगडाचे------करण्यासारखी गोष्ट आहे! किती विरोधाभास आहे बघा इथे. रायगडावर सिमेंटचे जंगल होईल त्याची चिंता पण समुद्रात भराव टाकून जलचर आणि पर्यावरणाचे नुकसान होईल त्याबाबत मौन. गडकिल्ल्यांवर काय करावे याबद्दल आधीच सांगितलंय. पर्यटक अजिंठा,वेरुळसाठी औरंगाबादला जातात पण मुंबईपासून तेवढेच अंतर असलेल्या परांडा किल्ल्याला का भेट देत नाहीत याची कारणे शोधावी. किल्ल्यांवर डागडुजी उपयोगी नाही असं वाटतंय का? आपल्या न ---- मत येऊ शकतं गरजू शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या अनुदानांवर डोळा वटारणारा करदाता शिवस्मारकावर उधळल्या जाणार्‍या पैशाबद्दल सोयिस्कर मौन घेतोय असं निरिक्षण आहे. अन्न-शौचालय वगैरे लाड तरी कशाला हवे, ते सगळं सोडून आधी स्मारके बांधायला हवीत. महाराजांना जनता विसरली-बिसरली तर काय घ्या, नै का? जगातल्या ------वळणार नाहीत का? मी असा कोणताही दावा केलेला नाही. गडकिल्ल्यांबद्दल माहिती घ्यायला पर्यटकांना स्मारकाला भेट द्यावी लागेल, त्याआधी स्मारकाला भेट द्यावी म्हणून मार्केटींग करावी लागेल. एवढ्या द्राविडी प्राणायमाची गरज काय? पर्यटनस्थळांचे आंतरराष्ट्रिय स्तरावर मार्केटींग हा एक गहन विषय आहे. उभारले स्मारक की झाली पब्लिसिटी अन आली गर्दी असे होत नाही. जगातला सर्वात मोठा ------असू शकते का? तुम्ही सांगताय ते लांबलचक होतंय, आणि खूप एक्स्प्लेन करायला लागतंय. एक मराठी म्हणून नव्हे तर परदेशी अनभिज्ञ पर्यटक म्हणुन ह्याकडे पहा. थोडक्यात --------बावळट लोक येणार नाहीत का? "सर्व पर्यटक बावळटच" हे माझे शब्द नव्हेत. प्रेमाचे चाळे, दारूपार्ट्या, खडूने लिहिणे हे प्रकार उत्तम सुरक्षाव्यवस्था असलेल्या गडकिल्ल्यांवरच्या स्मारकांमधे होतील अशी आपली खात्री आहे? परिणामकारक ------ मत आहे! सहज पोचता येतं म्हणून पर्यटनस्थळे विकसित झालेली नसतात, होत नसतात. जाज्वल्य इतिहास पोचवण्याबद्दलः शिवस्मारक हा काही महाराजांच्या कर्तृत्वाचा पुरावा नव्हे. त्यांच्या कर्तृत्वाचे पुरावे महाराष्ट्रात ठायीठायी जीवंत आहेत. बाकी ---- अर्थ आहे का? हे हे हे! विरोध कशाला करायचा हे स्पष्ट नै? वरच चार मुद्दे स्पष्ट दिलेत की? पैसे कसे ओतणार हे स्पष्ट नाही म्हणता? मग स्पष्ट आहे तरी काय? पैसे परत मिळतील हा समर्थकांचा दावा आहे, विरोधकांनी केलेली मागणी नव्हे. परताव्याचे गाजर दाखवून खर्चाची भलामण करणारे महान आहेत. हौसेला मोल नसतं हे आधीच मी म्हटलंय. ते समजायला इतके कठिण का असावे? खर्चाला जे डिफेन्ड करत आहेत त्यांनीच परत पैसे वसूल होतील, कमाई होइल, रोजगार होइल, पर्यटन होईल असे तकलादू मुद्दे काढलेत. रोजगार, पर्यटनविकास, हे उद्दिष्ट असेल तर वेगळे मार्ग आहेत, शिवाजींची ख्याती पोचवायची तर त्याचेही वेगळे मार्ग आहेत, ह्या दोन्हींचा मेळ घालायचा तर तेही शक्य आहे. त्यासाठी स्मारकाशिवाय काही तरणोपायच नाही असे काही नाही. तसे बघायचे तर राजकिय पक्षांना स्मारकाशिवाय पर्याय नाही हे मात्र खरे!

In reply to by संदीप डांगे

वरुण मोहिते Wed, 12/28/2016 - 16:57
खूप मोठा इतिहास आहे त्याची तुलना परांडा किल्ल्याशी होऊ शकत नाही . विदेशी पर्यटकांमध्ये त्याची क्रेझ आहे . युनेस्को ची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ती . मी कित्येकदा विदेशी मित्रांना मैत्रिणींना घेऊन गेलोय तिथे तर तिथे किती विकास झाला . महसूल किती विकास किती ह्याची आकडेवारी द्यावी . आजही जागतिक दर्जाचं असून तिथे विकास नाही . समुद्र पर्यावरण वैग्रे असेल तर समुद्रात कधी काही कामच झाला नाही असा दावा आहे का ? अगदी ताजमहाल हॉटेल पण समुद्रात भराव टाकून बांधलं होतं. जगात अनेक गोष्टी आहेत अश्या . आपला मुद्दा बरोबर असला शिवप्रेमींचा तरी हे कार्य समजायची आवश्यकता होती त्यामुळे ते ठिकाण निवडलं. बाकी भाजप ने तर बिलकुल हुरळून जाऊ नये प्रकल्प नियोजित होता ह्यांच्या काळात भूमिपूजन झालं इतकंच. उद्या सत्ता नसली तर काँग्रेस ओपनिंग करेल . अजून कोणी करेल .त्यात काय

In reply to by वरुण मोहिते

संदीप डांगे Wed, 12/28/2016 - 17:31
विदेशी पर्यटकांमध्ये त्याची क्रेझ आहे आणि आजही जागतिक दर्जाचं असून तिथे विकास नाही ही वाक्ये संधी असून पर्यटनविकासाला सरकारच्या दृष्टीने किती प्राथमिकता आहे त्याचीच द्योतक आहेत. माझेच मत आपण सिद्ध करत आहात की पर्यटनविकास हे फक्त गाजर आहे, बाकी, अख्खी मुंबई समुद्रात भर घालून बनवलेली आहे. तीची बकाल अवस्था सुधारण्याचं सरकार कधी मनावर घेईल कोण जाणे. महाराजांचे कार्य 'कोणाला' समजवायचे आहे, ते करायला स्मारकच कसे उपयुक्त ठरेल, त्याने कोणती उद्दिष्टे सफल होतील व कशी? ह्याचे मुद्देसूद स्पष्टिकरण अजून समर्थकांकडून आलेले नाही. समर्थक विरोधकांनाच उलट प्रश्न विचारत आहेत असे दिसले. विरोधाचे स्पष्टिकरण दिले मग समर्थनाचेही स्पष्टिकरण दिले पाहिजे की नाही? बाकी हूरळून जायचा मुद्दा आपण अचूक बोललात. यु मे नेवर नो काय घडेल. बाकी, गडावरही नको आणि समुद्रातही नको, माझी स्मारकाबद्दल काही संकल्पना आहे, ती नंतर मांडतो.

In reply to by संदीप डांगे

डांगेंजी, एक खुलासा : मेगाबायटी प्रतिसाद देणे "मला" आवडत नाही असे मी म्हणालो वर त्यामुळे तुम्ही वन लायनर किंवा व्हॉट्सॅपीय प्रतिसाद न देता मेगाबायटी प्रतिसाद देण्यास मोकळे आहातच! मोठे प्रतिसाद कमी लोकांपर्यंत पोहोचतात असं माझं वैयक्तिक मत आहे, तुमचंही तेच मत असण्याची आवश्यकता नाही. बाकी तुमच्या/विरोधकांच्या चारही मुद्द्यांचे/आक्षेपांचे उत्तर माझ्या वरच्या एक दोन तसेच बाकी मिपाकरांच्या प्रतिसादात आलेच आहेत, त्यावरच परत परत प्रतिवाद करण्यात काही हाशील नाही. तस्मात - इथून पुढचा वितंडवाद टाळण्याच्या दृष्टीने माझी असहमतीवर सहमती! कसे?

विशुमित Tue, 12/27/2016 - 15:04
ज्यांना 'स्मारकाचे श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळावे' असे वाटत असेल किंवा 'श्रेय भाजप/कॉन्ग्रेसला मिळेल म्हणूनच विरोध होतोय' किंवा 'भाजप/कॉन्ग्रेस राजकारण करतात म्हणून यांच्या पोटात दुखतंय' असे वाटत असेल त्यांचं प्रेम महाराजांपेक्षा राजकिय पक्षांवर जास्त आहे असे समजूयात. अशांशी चर्चा करणे म्हणजे चिखलात उतरणे आहे.>>>> -- एक्साक्टली. या विचारला प्रचंड अनुमोदन. पण महाराजांचे नाव घेऊन जगणाऱ्या बांडगुळांना त्याचे काहीच सोयरेसुतक नाही.

पिलीयन रायडर Tue, 12/27/2016 - 20:09
स्मारकाचा निर्णय आवडलेला नाही. स्मारक व्हावं, त्याला पर्यटक मिळतील वगैरे सगळं खरं असलं तरी गड किल्ल्यांची अवस्था इतकी वाईट असताना येड्यासारखा पैसा स्मारकात ओतणं हेच गाढवपणाचे लक्षण आहे. म्हणजे तिकडे वर्डक्लास स्मारक आणि इकडे अत्यंत बेक्कार अवस्थेतले गड-किल्ले.. काहीही अर्थ नाही. दोन्ही गोष्टी सुद्धा होऊ शकतातच.. तसं होणार असेल तर "आधी" गड-किल्ल्यांचं पहा.. नंतर काय स्मारकं उभी करायची ती करा..

ट्रेड मार्क Wed, 12/28/2016 - 01:52
हे स्मारक व्हायला पाहिजे असं मनापासून वाटतं पण आपले भारतीय लोक किती काळ हे स्मारक सुस्थितीत राहू देतील? सगळीकडे थुंकणे, कचरा टाकणे, आपली नावे लिहिणे ह्यात धन्यता मानणारे आपले लोकच त्याची वाट लावतील. एवढ्या एकांतातल्या जागी असल्याने, कुठला ना कुठला मार्ग शोधून, रात्रीच्या वेळेला जाऊन नसते उद्योग करणारे कमी नसतील. पक्षी स्मारकांवर/ पुतळ्यावर घाण करतात हे आहेच. त्यांना कळत नाही, पण माणसांचं काय? प्रत्यक्ष महाराजांनी बांधलेले आणि वास्तव्य केलेले किल्ले व महाल यांची काय दयनीय अवस्था करून ठेवली आहे. यात फक्त सरकारच दोषी नसून जनताही तेवढीच दोषी आहे. आपला कुठलाही वारसा आपल्याला जपता येत नाही हेच खरं.

लालगरूड Wed, 12/28/2016 - 02:13
Which Indian city do foreign tourists visit the most? Where do they spend the most? The answer to both the questions is Mumbai, according to a study by card payment services provider, MasterCard. In 2016, the city had 4.86 million overnight visitors who spent a collective $3.6 billion, or Rs 24,120 crore, said the study.

अर्धवटराव Wed, 12/28/2016 - 04:54
छत्रपतींच्या कर्तुत्वाचा आलेख मांडणारे संग्रहालय सदृष ऑडीटोरीअम, मराठा साम्राज्याची शक्य तेव्हढी माहिती रंजक पद्धतीने देणार्‍या चित्रफिती, गड-किल्ल्यांच्या ऐतिहासीक माहितीसह सफारी आयोजन करणारी पथकं, शिवाय बाकी पर्यटन सोयींनी युक्त असं भव्य स्मारक झालं तर काय बहार येईल. स्मारक असं व्हावं कि छत्रपतींबद्दल अगदी जुजबी/शुण्य माहिती असणार्‍या व्यक्तीने आत पाऊल टाकावं व शिव-कर्तुत्वाने भारावुन जावुनच बाहेर पडावं. छत्रपतींच्या पुतळ्याची भव्यता त्यांच्या व्यक्तीमत्वाला साजेशी असल्याची खात्री पटावी. मराठी/मराठा वगैरे कुंपणांत बदीस्त शिवबा आजवर आपल्याला अखील भारतीय गौरवाच्या पातळीवर स्थापन करता आला नाहि. हे स्मारक त्या दृष्टीने दमदार पाऊल पडावं. भारतीय पराक्रमाचा, शहाण्या राजसत्तेचा मानबींदु म्हणुन छत्रपतींचं नाव जगभर गाजावं. आधी गड-किल्ल्यांच्या अवस्थेचं बघा वगैरे म्हणण्यात काहि अर्थ नाहि. स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि. गड-किल्ल्यांची व्य्ववस्था वेगळ्या पातळीवर करायला लागेल. किंबहुना स्मारकाने प्रभावीत होऊन गड-किल्ल्यांकडे पाऊले वळायला लागली तर किल्ल्यांची अवस्था नीट लावण्याची अवष्यकता तीव्रतेने जाणवायला लागेल.

In reply to by अर्धवटराव

महासंग्राम गुरुवार, 12/29/2016 - 10:19
स्मारकाच्या टार्गेट ऑडीयन्सपैकी १०% सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकणार नाहि.
तसं झालं तर सरकारच्या मार्केटिंगच पराभव ठरेल.

In reply to by महासंग्राम

अर्धवटराव Fri, 12/30/2016 - 02:08
वय वर्षे १० ते ७० हा स्मारकाचा टार्गेट ऑडीयन्स धरला, त्यात मराठी/अमराठी/परदेशी सगळे आले, तर त्यापैकी १०% लोकांकडुन सुद्धा गड-किल्ल्यांकडे भटकायची अपेक्षा नाहि. शिवाजीला लोकांपर्यंत पोचवायला प्रस्तावीत स्मारक जास्त प्रभावी आहे गड-किल्ल्यांपेक्षा.

आडोसा मारामारी आन तिकडं दर्यात आजून येक. महाराजांसारखं वागून दाखवा, त्यांनी तयार केलेली व्यवस्था परत तयार करा ... हर गाव हर शहर, पुतले, नगर, रस्ते महाराजजीके नामपे है. मग अजून एक बांधून काय फायदा?