मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तत्त्वभान ३. स्वजाणिवेचे पक्व रूप

निरन्जनदास · · जनातलं, मनातलं
स्वजाणिवेचे पक्व रूप
- श्रीनिवास हेमाडे    

Plato
प्लेटो

ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला. प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत यात फरक केला आणि अधिक विकसित असे ‘ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य विश्वास’ असा सिद्धान्त मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार मत हे बदलत्या चंचल जगाचे असते तर ज्ञान हे वस्तूंमधील सत्-सामान्यांचे किंवा सद्-रूपांचे असते.
चेतना, जाणीव आणि स्वजाणीव हा फरक विसाव्या शतकातील एका तत्त्वचिंतकाने केला. स्वजाणीव हे केवळ माणसाचे वैशिष्टय़ आहे. मानवी जाणिवेकडे पाहण्याचा हा एक मार्ग आहे. अर्थातच तो एकमेव मार्ग नाही. जीवशास्त्रीय चेतना आणि ज्ञानशास्त्रीय चेतना हे शब्द आणखी सुलभ करावयाचे तर 'जैविक चेतना आणि ज्ञानात्मक चेतना' असे म्हणता येईल.

या तत्त्वचिंतकाच्या मते, शरीर व जैविक चेतना यामध्ये एक मूलभूत फरक आहे. शरीर आणि जैविक चेतना यात फरक करता येतोच. शिवाय शरीर आणि जैविक चेतना एकमेकांपासून अलग होऊ शकतात, असे मानता येते. जैविक चेतना शरीरापासून अलग होणे हा मृत्यू असतो. चेतना, जाणीव आणि स्वजाणीव या तीन प्रकारांमध्ये आपण फरक करू शकतो, पण त्यांना अलग करता येत नाही. ज्ञानात्मक चेतना जैविक चेतनेपेक्षा पूर्णपणे वेगळी, अलग मानता येत नाही. स्वजाणीव ही उत्क्रांतशील संकल्पना आहे.

स्वजाणिवेची जाणीव ही पुढील पायरी असू शकते. पण इतक्या खोलात जाण्याची इथे आत्ता गरज नाही आणि त्या रीतीची चर्चा करणे, तूर्तास अपेक्षित नाही. दुसरे म्हणजे जैविक चेतना शरीरापासून अलग झाली की शरीर जसे स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते, तसे जैविक चेतना स्वतंत्रपणे अस्तित्वात राहते व तिचा काही मूलस्रोत आहे. तिलाच आत्मा, ब्रह्म म्हणतात किंवा कसे, याचीही चर्चा करणे तूर्तास अपेक्षित नाही.(ती नंतर कधी तरी येईलच.)

स्वजाणीव माणसाला 'मी कोण आहे' याचे भान देतेच, पण 'मी कोण नाही' याचेही भान देते. ज्याला आत्मदुरावा म्हणता येईल, ते जाणिवेचे एक कार्य आहे. जसे की, एखाद्या पुरुषाला 'आपण स्त्री आहोत' असे वाटते किंवा उलट. अथवा 'मी भारतीय असण्यापेक्षा आधी मी अमुक एका जाती-जमातीचा आहे, म्हणून जमातीचेच नियम मी पाळेन' असे म्हणताना भारतीय नागरिकाची कर्तव्ये दूर सारली जातात आणि जात प्रभावी ठरते. येथे आत्मदुरावा कोणता आत्मपरिचय निर्माण करते आणि कोणता अपेक्षित आहे, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठीच्या कोणत्या जाणिवा निर्माण व्हाव्यात, कशा, कुणी कराव्यात हेही प्रश्न येतील.

स्वजाणीव पुढे कसे रूप धारण करते, त्यातून काही निष्पन्न होते ते पाहू. स्वजाणिवेचे पक्व आणि परिष्कृत रूप म्हणजे ज्ञान असे मांडता येते. ही व्याख्या नाही, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. ज्ञान या संकल्पनेकडे कसे पाहिले गेले, याकडे लक्ष वेधणे एवढाच मर्यादित हेतू येथे आहे. ज्ञान या संकल्पनेची व्याख्या करण्यातूनच सामाजिक व्यवस्थेचे राजकारण घडते, असेही दाखवून देता येईल. त्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे.

ज्ञान या संकल्पनेचा विचार ग्रीक-पाश्चात्त्य परंपरेत आणि भारतीय परंपरेत अतिशय मूलगामी रीतीने झाला.प्लेटोने (इ.स.पू. पाचवे शतक) ज्ञान आणि मत यात फरक केला आणि अधिक विकसित असे "ज्ञान म्हणजे समर्थनीय सत्य विश्वास" असा सिद्धान्त मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार मत हे बदलत्या चंचल जगाचे असते तर ज्ञान हे वस्तूंमधील सत्-सामान्यांचे किंवा सद्-रूपांचे (आयडियाज किंवा फॉम्र्स) असते. 'सुंदर', 'त्रिकोण', 'घोडा' विशिष्ट वस्तू इंद्रियगोचर आहेत, पण 'सुंदर', 'घोडा' यांसारख्या सामान्य पदांनी जे व्यक्त होते - म्हणजे सौंदर्य, घोडेपणा - ती विशिष्ट वस्तू नसते; तर ते एक सत्-सामान्य, सद्-रूप असते. ते केवळ विवेकशक्ती जाणू शकते. वस्तूंची स्वरूपे बदलत जातात. पण सत्-सामान्ये स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य, दिव्य आणि चिरंतन असतात. मत हे वस्तूबद्दल असते, ते वस्तूबरोबरच सतत बदलते. ते स्वीकारता येत नाही.

प्लेटोच्या म्हणण्यानुसार आत्म्याचे स्वरूप सत्-सामान्यांसारखे दिव्य असते व म्हणून आत्मा अमर असतो. आत्मा सत्-सामान्यांचे बौद्धिक दर्शन घेत असतो, ते ज्ञान असते. प्लेटोने हे सत्-सामान्यांचे ज्ञान व्यवहारात कसे लागू करावे, याचे दिलेले सूत्र म्हणजे साधकाचे जीवन.

प्लेटोचा ज्ञानसिद्धान्त इतका मौलिक आहे की "सबंध युरोपियन तत्त्वज्ञान म्हणजे प्लेटोच्या तत्त्वज्ञानाला दिलेल्या तळटिपा आहेत", असा गौरव व्हाइटहेड हा तत्त्ववेत्ता करतो. प्लेटोचे विचार ही एक मोहिनी आहे. तिच्यातून सुटणे अवघड आहे. प्लेटोच्या या भूमिकेवर विद्यमान अ‍ॅँग्लो-अमेरिकन तत्त्ववेत्ता एडमंड गेटीअर याने केलेल्या टीकेने मात्र चांगलीच खळबळ माजली.

भारतात 'ज्ञान' ही संकल्पना धर्म आणि अध्यात्माच्या दिशेने गेली खरी, पण ती समाज व्यवस्थेचे नियामक तत्त्व म्हणून उपयोगात आणली गेली. मुळात विद्या आणि ज्ञान यात फरक झाला. जशा की चौसष्ट विद्या किंवा कला. विद्या ही स्वरूपाने तांत्रिक मानली गेली तर ज्ञान हे त्यापेक्षा अधिक काहीतरी आहे, असा समज दृढ होता. विद्या बुद्धीशी संबंधित असते हे खरे, तथापि ती पढिक असू शकते, तर ज्ञान मात्र आत्मसात केलेले असते. ज्ञानाचा प्रत्यक्ष शिक्षणाशी संबंध असतोच असे नाही, अशिक्षित माणूसही ज्ञानवान असू शकतो. पढतमूर्ख आणि ज्ञानी यातील फरक त्यामुळेच कळतो. विद्य्ोचा जाणिवेशी संबंध नाही. पण ज्ञान हीच जाणीव आहे, असे मानण्याची परंपरा होती. वेद म्हणजे ज्ञान, (विद्- जाणणे) असे समीकरण होते.

वेद म्हणजे ज्ञान या मूलाधाराच्या आधारे भारतीय परंपरेत सर्व विद्या व ज्ञान दोन प्रकारात विभागल्या होत्या. पराविद्या आणि अपराविद्या. पराविद्या म्हणजे ब्रह्मविद्या तर अपराविद्या म्हणजे भौतिक जगताचे ज्ञान. यात पराविद्येला प्राथम्य होते तर अपराविद्येला दुय्यम स्थान मिळाले. हा भेद कधी झाला हे सुस्पष्ट नाही. पण तो प्रभावी ठरला. प्रत्यक्ष समाजव्यवस्थेत हा भेद काटेकोरपणे अमलात आला. पराविद्येशी निगडित वेदोपासना, यज्ञ उच्च समजले गेले आणि श्रमजीवी मात्र नीच समजले गेले. म्हणजे काय झालं पाहा, सामान्य जीवनासाठी आवश्यक असलेली शेती, व्यापार इत्यादी कौशल्ये असणारे शूद्र, सर्वात नीच ठरले आणि ते कष्ट न करणारे श्रेष्ठ ठरले. सामाजिक विषमता अशी ज्ञानाशी निगडीत झाली. कारण मूलतः न्याय, समता इत्यादी मूल्यव्यवस्थाच या वैदिक ज्ञान कल्पनेशी जोडली गेलेली होती.

आता एक नवी मांडणी पुढे आली आहे, तिचा विचार केला तर वेगळे चित्र मिळेल. या मांडणीनुसार वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान असा नसून अग्नी असा आहे आणि वेद हा शब्द संस्कृतात रुळल्यानंतर त्याला ज्ञान असा अर्थ दिला गेला. म्हणून वेदसूक्ते म्हणजे अग्निसूक्ते, त्यांच्या संकलनाला वेद हे नाव मिळाले. अग्नीला आहुती देणे म्हणजे यज्ञ करणे हाच धर्म झाला, तेव्हा वेदसूक्तांचे पठन हा मुख्य धर्माचार होऊन तो करणाऱ्या वर्णाला श्रेष्ठत्व मिळाले. ते अबाधित राखण्यासाठी 'सारे ज्ञान वेद या संकलनात आहे' अशी स्वतची आणि इतरांची समजूत करून देण्यासाठी वेद म्हणजे ज्ञान असे सांगण्यात येऊ लागले. हे संशोधन विश्वनाथ खैरे (नवभारत, सप्टेंबर २००४) यांनी मांडले आहे. ते परंपरेला मान्य होईलच असे नाही. ही मांडणी किंवा असा नवा विचार सुरू केला तर कुंठित झालेली भारतीय परंपरा किमान पातळीवर प्रवाही होण्याचे मार्ग तर मोकळे होतील. तसे झाले तर इतर जगाचे योग्य आणि चांगले ते घेण्याचा आणि आपले त्यांना देण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

लोकसत्तेत १६ जानेवारी २०१४ रोजी पूर्वप्रकाशित.

तत्त्वभान ०१. तत्त्वभानाच्या दिशेने ०२. भानावर येण्यापूर्वी..

वाचने 15488 वाचनखूण प्रतिक्रिया 42

समजा एखाद्या व्यक्तीला जन्मल्या पासुन एका बंद अंधाऱ्या खोली मध्ये डांबुन ठेवले कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा प्रकाश तिच्या पर्यंत पोचू दिला नाही. अगदी जेवण सुध्दा देताना कोणी दृष्टीला पडणार नाही असे बघितले. तर त्या व्यक्तीला स्वाजाणीव होईल का? माझ्या अंदाजाने नाही. एखाद्या रानटी प्राण्यात आणि त्या व्यक्ती मध्ये काहीचा फरक असणार नाही. म्हणजेच स्वजाणीव वैचारिक आदानप्रदानामुळे, म्हणजेच ज्ञानाच्या स्पर्शाने होते असे म्हणता येईल. या मालिकेच्या मागील भागातल्या चर्चे मध्ये तुम्ही असे म्हणाला होता
ज्ञानाला अक्षय्यतेचा नियम लागू करणे, हा 'तर्कदोष' आहे.
हे बरोबर असेल तर ज्ञानाची निर्मिती ही व्यक्तीसापेक्ष आहे. किंवा उपलब्ध ज्ञान हे अनुभवांचे संकलन आहे. याचाच अर्थ उपलब्ध ज्ञान हे परिपूर्ण नाही. मग त्या ज्ञानाच्या आधारावर झालेली स्वजाणीव ही देखील परिपूर्ण कशी असेल? आणि अशा अपरिपक्व माहितीवर काढलेले निष्कर्ष पण अपरीपक्वच असणार. चार आंधळे आणि हत्तींच्या गोष्टी सारखे. असा तर्क काढून ज्ञानार्जन थांबवावे असे माझे म्हणणे मूळिच नाही पण ज्ञानार्जन करताना सुध्दा सावध पणा असला पाहिजे. रच्याकने :- वेदाध्यायन ही सुधा अपरा विद्या आहे असे उपनिशदांनि परखड पणे नमूद करुन ठेवले आहे. पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

निरन्जनदास गुरुवार, 07/09/2015 - 17:09
बुवा, तुम्ही दिलेला दृष्टांत तसा प्राचीन आहे आणि अगदी योग्य आहे. प्लेटोने 'गुहेचे रूपक' देऊन हेच सांगितले आहे. "स्वजाणीव वैचारिक आदानप्रदानामुळे, म्हणजेच ज्ञानाच्या स्पर्शाने होते." हेच खरे आहे. दुसरे "ज्ञानाची निर्मिती ही व्यक्तीसापेक्ष आहे." हे ही बरोबरच आहे. पण यातला मुद्दा असा आहे की एकदा ज्ञान निर्माण झाले की ते साऱ्या मानवजातीचे होते, ते खासगी व्यक्तीचे अथवा एखाद्या गटाचे नसते. विज्ञानाची हीच धारणा आहे, याला 'वैज्ञानिक दृष्टी' म्हणता येईल. त्यामुळेच ज्ञानावर मालकी आली की वर्ण-जात-लिंगभेद अथवा भांडवलशाहीचा उदय होतो. आणि या मालकशाहीचे भीषण परिणाम आपण भोगतो आहोत. ज्ञान व्यक्तिनिरपेक्ष असणे, हेच समाजाच्या हिताचे असते. ज्ञान विकायला काढले की ज्ञानवंत, शहाणी माणसे आणि चप्पल, निरोध, सोने, हिरा यात फरक उरत नाही. तिसरे, तुम्ही नमूद केले तसे ज्ञान परिपूर्ण नसते. पूर्ण ज्ञान, अंतिम ज्ञान हा भ्रम असतो. जी ए नी 'रमलखुणा' त साहित्यिक भाषेत हे फार चांगले मांडले आहे आणखी एक, जे ज्ञान उपलब्ध आहे, ते अपुरे आहे हे मान्य करून पुढील अधिक ज्ञानाकडे वळणे भाग असते. इथे पुन्हा वैज्ञानिक प्रगतीचा मुद्दा आहे. एकेकाळी पृथ्वी सपाट आहे, विश्व पृथ्वी केंद्रित आहे, असे समज होते. आज नाहीत. कारण आज आपण नवे ज्ञान, नवी ज्ञान साधने शोधली. आज जास्त सत्य वास्तवाकडे जात आहोत. आपले अंतिम कुतूहल विश्वाची, जीवाची निर्मिती आणि लय यात संपते. उपलब्ध ज्ञान सत्य आहे की नाही, यापेक्षा ते असत्य, दिशाभूल करणारे नाही ना ? याची काळजी घेणे ही कोणत्याही काळातील गरज असते. "ज्ञानार्जन करताना सुध्दा सावधपणा" बाळगावयाचा तो याच रीतीने. पण इथे एक फरक आवश्यक आहे : निसर्ग ज्ञान आणि माणसाचे ज्ञान. भौतिकशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी निसर्ग शास्त्रे आणि समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रे. यांच्या नंतर तत्त्वज्ञान येते. तिथे फार गोंधळ असतो. पण विरोधाभास असा की या गोंधळातूनच निसर्ग शास्त्रे आणि सामाजिक शास्त्रे यांचा जन्म होतो. बोलू आपण सावकाश. आणखी काही लेखांची कृपया वाट पहा

In reply to by निरन्जनदास

मराठी_माणूस Fri, 07/10/2015 - 12:19
...ज्ञान परिपूर्ण नसते. पूर्ण ज्ञान, अंतिम ज्ञान हा भ्रम असतो. ....
बुध्दाला बोधीवृक्षाखाली संपुर्ण ज्ञान प्राप्त झाले, किंवा काहीना साक्षात्कार झाला असे म्हणतात , ते नक्की काय ?

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Sat, 07/11/2015 - 19:18
मला प्रश्न थोडा वेगळा पडतो... जर उत्तर गवसले आहे (अनुभवातुन) तर प्रत्येकजण त्या उत्तराला आत्मसात का करत नाही ? खरचं इतकं कठीण आहे का ते मिळवणे ?

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Sun, 07/12/2015 - 13:30
होय, मेट्रीक्स चित्रपटात निओला सांगीतलच आहे की देर इज डिफरन्स बिटवीन वांकिंग द पाथ अँड क्नोइंग द पाथ. आणी प्रश्न हाच पडतो की "ते जगणं" खरचं इतकं कठीण आहे का ? की बरेचदा उत्तर माहित असुनही तसे जगता येत नाही ?

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Sun, 07/12/2015 - 15:45
Matrix triology is based on buddhism and hindu philosophy. So its correct that walking the path is difficult. उत्तर माहित असुनही तसे जगता येत नाही ex. Himalayat gelyavar tithech rahave ase baryach lokana vatate pan rahu shakat nahi. Naam jap ek sadha sopa samadhi kade nenara marg aahe. Khup kami lokana tyatun samadhi prapt hote. Sadha naam jap hou shakat nahi pudhachya steps ajun kathin aahet. hope you can imagine now.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Sun, 07/12/2015 - 17:09
अहो मी समगमातुनही कोणी समाधी मिळवलेला प्रत्यक्ष बघितलेला नाही, नुसत्या नामस्मरणाची तर गोष्टच निराळी. मी समगमाचे उदा. अशासाठी दिले की किमान ती क्रिया तरी समाधीप्राप्तीसाठी वापरणे तरुणांना नकोशी/अवघड नाही ? पण नाही.. ते पुन्हा पुन्हा तंत्रोक्त करुनही कसलीच अध्यात्मीक गती मिळालेली व्यक्ती कोणालाच अनुभवाला येत नाही. हे तरी का घडत असावे, बरे ?

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Mon, 07/13/2015 - 00:59
Tumhi oshonche sambhog se samadhi tak pustak vachale aselach tyat ti prakriya tyani sopi karun sangitali aahe. Pan ti kathin aahech he lakshyat aalach asel. Samagam is most basic form to attain samadhi. But much difficult. People visualise sex while doing it. First step is not to visualise but to concentrate on the act. its difficult to concentrate when aroused. So samadhi is difficult during sex. That one fraction of moment had to be prolonged. That is samadhi. Practice will attain it. But concentration, meditation is the first condition which is not easy to achieve.(sorry for english..typing from mobile)

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Mon, 07/13/2015 - 16:21
पुन्हा पुन्हा तंत्रोक्त करुनही कसलीच अध्यात्मीक गती मिळालेली व्यक्ती कोणालाच अनुभवाला येत नाही >> फारच चमत्कारिक वाक्य आहे तुमचं. अहो, याचा पुरावा कोण आणि कसा देणार? समाधी आणि आध्यात्मिक प्रगती ही ढोल बडवून सांगता येत नाही. जे तसं करतात ते साप समजून भूई धोपटतायत असं सरळ समजावं.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Mon, 07/13/2015 - 21:19
अनुभवाला येत नाहि म्हणजे पाहण्यात येत नाही. जसे नामस्मरणाने समाधी मिळालेल्या व्यक्ती तुमच्या अनुभवात नाहीत पण त्या आहेत होत्या हे तुम्ही मानता व तसेच समागमाचे उदा. दिले आहे. मी ओशोचे फ्रोम सेक्स टु एनलाइटमेंट कोणत्याही भाषेत वाचलेले नाही. पण मला विवीध धर्मातील मान्यवर गणलेल्या व्यक्तींकडुन या कृतींबाबत केलेले भाष्य अवलोकीत आहे इतकेच. पण समागम ही अशी क्रिया आहे जी तांत्रीक अटेंशन प्रॅक्टीस नक्किच प्रोवोक करते पण तरीही... रिजल्ट नसतो. थोडक्यात अवघड सोपे मार्ग अनुसरल्याने नक्किच फरक पडत नाही हे वास्तव आहे... विनाकारण वाकिंग द पाथ हा अवघड असल्या म्हणून लोक तो मार्ग अनुसरु शकत नाहीत वा समाधीपर्यंत पोचत नाहीत या दाव्यात तथ्य दिसत नाही... अनेक लोक असे आहेत त्यांनी साधु संतांसमोर उर्मटपणा केला पण संतानी त्यांचा गर्व चक्क समाधीवस्था देउनच उतरवला व त्यांना अध्यात्माक अधीकारी बनवुन सोडले. त्यांनी पुर्वायुष्यात कोणतेही कश्ट घेतले न्हवतेच पण समाधीवस्था सहजी मिळवली.... उदा. जि.के. प्रधान शंकरमहाराजांना मानत न्हवते पण त्यांनीच प्रधानांचे गर्वहरण केलेच व्र समाधेवस्थाही दिली.

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Tue, 07/14/2015 - 15:04
समाधीसाठी नामजप करणारे आणि समागम करणारे. यात प्रत्यक्ष दिसणारे कोण आणि किती? या प्रश्नाचा आपण अंदाज लावू शकता. नामजप करणारे आताच लाखोच्या संख्येने पंढरपुराकडे प्रस्थान करत आहेत. समागम करणारे दाखवू शकतो का आपण? असो. ही चर्चा व विषय उत्तम व उपयुक्त आहे पण अवांतर होत आहे. तस्मात तुम्ही वेगळा धागा काढा किंवा खरडवहीतून पुढची चर्चा करू.

In reply to by संदीप डांगे

द-बाहुबली Tue, 07/14/2015 - 15:19
संख्या साधकांची न्हवे "साध्य" प्राप्त केलेल्यांची बघायची आहे. नुसतेच साधक पाहिले तर ख्रिश्चन सर्वाधीक आहेत त्या खालोखाल इस्लाम फॉलॉ करणारे त्या खालोखाल बुध्दीजम अन मग नाशीक, पंढरपुर, नर्मदा, गंगा वगैरे वगैरे फिरणारे येतिल... पण मुळातच मार्ग सोपा, अवघड वा ते अनुसरणारे अनुयायांची संख्या,किती दिसते यावरु त्याचे यशापयश का ठरवावे. संख्या साधकांची न्हवे "साध्य" प्राप्त केलेल्यांची बघायची आहे ना ? मग त्यांनी काय केले हे अभ्यासु ना ? असो पुढची चर्चा खरडवही अथवा वेगळ्या धाग्यावर. कारण विषय अवांतर नाही पण गहन नक्किच होतोय...

In reply to by द-बाहुबली

संदीप डांगे Tue, 07/14/2015 - 18:50
मी सुरुवात कुठून केली होती? उत्तर मिळणे आणि जगणे यात फरक आहे. इथे साधकांच्या संख्येवर 'साध्य' कितींना मिळेल हे ठरत नाही. मुद्दा साधकांच्या संख्येचा आहे असं कधी म्हटलं मी? एखादी साधना करत असलेले साधक दिसण्याची संभावना किती ह्यावर तो मुद्दा मांडला मी. अर्थात समाधी मिळवण्यासाठी समागमाची साधना करणारे रस्तोरस्ती दिसत नाहीत तो काय माझ्या तर्काचा दोष नाही. मला वाटलं नव्हतं इतकं स्पष्ट बोलायला लागेल. असो. साधना कुठलीही असो ती समजायला, समजून घ्यायला सोपी आहे पण करायला, आचरायला कठीण आहे हा मुद्दा आहे. मग ते समागम असो वा नामजप वा हठयोग. राहिला प्रश्न समाधी मिळवणार्‍यांचा. अमूक एकाने समाधीअवस्था मिळवली हे तुम्हा-आम्हाला कुठून कळेल? शेअरमार्केटसारखे किंवा ब्रेकींग न्यूजसारखे अपडेट येत नाहीत. समाधीअवस्था मिळवणे ही फारच वैयक्तिक बाब आहे. तिथून पुढे आत्मज्ञानाच्या पायर्‍या सुरू होतात. पोथ्यापुस्तकांमधून कोणी कोणाला काय दिले वैगेरेंचे संदर्भ गैरलागू आहेत. पुरेशी साधना झालेल्या अधिकारी व्यक्तीला 'समर्थ योगी' असलेला प्रचिती देऊ शकतो, संपूर्ण साध्य नाही. (प्रचिती: काय मिळवायचे आहे याची झलक) जशी परमहंसांनी विवेकानंदांना दिली. कारण काही कारणास्तव योग्य अवस्थेला पोचलेले मार्ग भटकू शकतात. हीच प्रचिती प्रत्येक समागमकर्त्यालाही येते. पण सेकंदाच्या शंभराव्या भागाइतकीच. ती अजून प्रलंबित करायची तर साधना योग्य पद्धतीने व्हायला हवी. जी कठीण आहे. अहो पूर्ण एक मिनिटभर ती अवस्था मिळवणे हेसुद्धा एक दिव्यच आहे. मिळाली तरी दुसर्‍यांना कसं व का सांगणार? म्हणजेच उत्तर सर्वांकडे आहे पण सफल होणे महाकठीण काम आहे. प्रत्येकाला ते व्यक्तिगत पद्धतीनेच मिळवायचे आहे. हे म्हणजे अगदी तसेच जसे सचिन तेंडूलकरला कोणी विचारले की बाबारे तू अव्वल नंबर बॅट्समन कसा झाला तर तो काय सांगेल, 'सरावाने'. आता सराव करणारे तर लाखोंनी आहेत, सगळे सचिन नाही होत. आणि सचिनने स्वतः कितीही प्रयत्न केला तरी तो दुसरा सचिन नाही बनवू शकत. आता समागमात कठीण काय आहे पहा: क्रिया चालू असतांना क्रियेत पूर्ण लक्ष असणे, इकडचे तिकडचे, हिचे/तिचे विचार न आणणे, पुर्वी केलेल्या किंवा कसं करायचं ते आधीच ठरवलेल्या क्रिया न आठवणे, संपूर्ण ध्यान शरिराच्या हालचालीकडे, अभिसरणाकडे, संवेदनांवर असणे, यात काम(1), क्रोध, लोभ, मोह, ममता, अहंकार या षड् रिपूंचा पूर्ण अभाव असणे, परमोच्चबिंदूला पोचतांना श्वास अतिशय संथ गतीने (अगदी घोडा शांत उभा असतांना ज्या गतीने श्वासोच्छवास करतो त्या गतीने) करणे, इत्यादी सर्व गोष्टींचे भान ठेवले तरच समाधीअवस्था प्राप्त होण्याच्या दृष्टीने तयारी सुरू झाली असे मानावे. तेव्हा दोन्ही शरिरांचे अस्तित्व शून्य होते आणि राहते ती फक्त समाधीअवस्था. यापैकी बाकी सारं सोडा, हे श्वासावर नियंत्रणच किती कठीण आहे हे जे अनुभवी आहेत त्यांना लक्षात येईल. अजून काय बोलणे? अघोरी पंथामधे याबद्दल बरीच कर्मकांडे, प्रतिकात्मक क्रिया आहेत. ती त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून सिद्ध केली आहेत. पण मूळ विचार एकच. 'समग्र ध्यान' (1) तुम्ही म्हणाल कामक्रिडेत कामभावनेलाच कसे दूर ठेवावे? तर काम म्हणजे कुठल्याही माध्यमातून शरिरसुख मिळवण्याची इच्छा, लौकिकार्थाने संभोगसुखाची इच्छा म्हणजेच कामेच्छा असे समजल्या जाते. वास्तवात शरिराच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे सुख प्राप्त करण्याची इच्छा म्हणजे कामेच्छा. चांगलं आईस्क्रीम खाण्याची इच्छा ही कामेच्छाच. समागमातून संभोगसुख मिळवण्याची इच्छा असणे ही अनेक कामेच्छांपैकी एक. समाजाला असं काही सांगितलं असतं तर जगणेच कठीण झाले असते सर्वसामान्यांचे म्हणून शरिरसुख म्हणजे संभोगसुख एवढंच मतलबापुरतं घेण्यात आलं. त्याचाही बोर्‍या वाजलाच. या विषयावर अधिक चर्चा करायची असेल तर तुम्हीच नविन धागा काढा. आमचा धागा काढण्याचा या महिन्याचा कोटा खतम! (तसेच आमच्यावर हेवनवासी गुर्जींचे डुआयडी असण्याचे आरोप होतीलच)

In reply to by संदीप डांगे

राही Tue, 07/14/2015 - 19:41
ही सर्व उपचर्चा अतिशय छान झाली. आपले प्रतिसाद आवडले. 'काम' हा चार पुरुषार्थांपैकी एक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या दृष्टिकोनांतून पाहिले तर 'कामा'चे निराळे स्वरूप दृष्टीस पडते.

In reply to by भिकापाटील

त्यांच्या मुख्य किंवा मूलभूत गुण म्हणजे ते त्यांना स्वत:ला जे अजिबात कळलेलं नाही..असच तत्वज्ञान आपल्याला इथे सांगायचे.. आपण कळत नाही म्हणून इचारलं की परत त्यांना त्याच आत्म अनाकलनीय भाषेचा आधार घ्यावा लागायचा! पुन्हा आपण इचारलं की मग ते शिव्या द्यायचे! :-D

गामा पैलवान Sat, 07/11/2015 - 22:45
निरन्जनदास, लेख पटला. फक्त एक विधान पटलं नाही : >> पराविद्येशी निगडित वेदोपासना, यज्ञ उच्च समजले गेले आणि श्रमजीवी मात्र नीच समजले गेले. >> ...... >> सामाजिक विषमता अशी ज्ञानाशी निगडीत झाली. पहिली गोष्ट म्हणजे वेदोपासना आणि यज्ञयाग हे पराविद्या नसून अपराविद्येत मोडतात. पराविद्या म्हणजे ज्यातून आत्मसाक्षात्कार होतो ती आणि फक्त तीच विद्या. दुसरी गोष्ट म्हणजे यज्ञ करणारा श्रेष्ठ आणि श्रम करणारा कनिष्ठ अशी वर्गवारी वैदिक साहित्यात माझ्या मते कुठेही सापडत नाही. प्रत्येकाची कामं असतातंच. यज्ञासाठी समिधा आणि इतर गोळा करण्यासाठी कष्ट करावेच लागतात. यज्ञ हे सांघिक कार्य (=टीमवर्क) आहे. तसेच वेदविद्याविभूषितास वेदांचा अर्थ माहीत असेलंच असं नाही. तुकोबांनी म्हंटलंय त्याप्रमाणे तो केवळ भारवाही असू शकतो. मग भारवाही हा शूद्राहून श्रेष्ठ मानावाच कशासाठी? याउलट पराविद्या जाणणारा वेदविद्याविभूषित नसू शकतो. बरेचसे पराविद्याधर वेदविद्याविभूषित नव्हते. डोळ्यासमोरचं उदाहरण म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस. सांगायचा मुद्दा काय आहे की, हिंदूंच्या सध्याच्या सामाजिक विषमतेला आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या दु:स्थितीला वैदिक परंपरा जबाबदार नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

निरन्जनदास Mon, 07/13/2015 - 21:02
गामाजी, भक्तीमार्गी संत अद्वैती होते, मीमांसक नव्हते, नसतात. भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांसाठी आहे, असा माझा समज आहे. ती मूठभर लोकांसाठी असेल तर, ते भयानक मानावे लागेल. कोणतीही खगोलशास्त्रीय घटना ही निव्वळ घटनाच असते. खगोलशास्त्रीय नियमानुसारच ती घडते. पण या साऱ्या घटना इतक्या अचूक आणि विस्मयकारक असतात की त्याला कुणीतरी 'रचियता' असावा, असे वाटू लागते. ती ईश्वर ही संकल्पना. थेलीझ (इ.स.पू सहावे शतक) नावाच्या प्राचीन ग्रीक गणितज्ञाने त्याच्या मृत्यूनंतर होणाऱ्या एका ग्रहणाचे भविष्य मृत्यपुर्वी २५ वर्षे आधी वर्तविले होते. ते खगोलशास्त्रीय गणित होते. आपणही आज असे गणित, तर्क यावर आधारलेले भविष्य सांगू शकतो. या घटनांचा अर्थ लावायचा म्हणजे अज्ञात असणाऱ्या नियमांचा शोध घ्यावयाचा, ते गवसले की आधीचे नियम बाद. यज्ञ करणारा श्रेष्ठ आणि श्रम करणारा कनिष्ठ अशी वर्गवारी उदाहरण म्हणून मनुस्मृतीत सापडते. "हिंदूंच्या सध्याच्या सामाजिक विषमतेला आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या दु:स्थितीला वैदिक परंपरा जबाबदार नाही" तर मग कोण जबाबदार आहे ? इस्लाम कि ख्रिश्चन की आणखी कोण ? इंग्रज ?

In reply to by निरन्जनदास

गामा पैलवान Fri, 07/17/2015 - 23:45
निरन्जनदास, तुमचा संदेश वाचला. माझी मतं लिहितो. १. >> भक्तीमार्गी संत अद्वैती होते, मीमांसक नव्हते, नसतात. मूळ मुद्दा मीमांसेत विषमता आहे, असा होता. वैदिक परंपरेतल्या संतांच्या वर्तनावरून विषमता प्रत्ययास येत नाही. मग मीमांसेस विषमतेचं जनक मानावं का? असा प्रश्न आहे. २. >> भारतीय राज्यघटनेत सामान्य नागरिकांसाठी आहे, असा माझा समज आहे. ती मूठभर लोकांसाठी असेल तर, >> ते भयानक मानावे लागेल. भारतीय राज्यघटनेमागील उद्दिष्ट पाहायला पाहिजे. १९४७ साली भारताचा बराच मोठा भूभाग एकछत्री अंमलाखाली आला होता. त्यास मजबूत राजकीय पाया मिळावा म्हणून घटनेची निर्मिती झाली आहे. लोकांना मार्गदर्शन व्हावं म्हणून नव्हे. राज्यघटनेत निर्देश केलेल्या संस्था व तरतुदी अगोदरपासून कार्यान्वित झालेल्या आहेत. उदा, : न्याययंत्रणा, प्रांतिक सरकारे, इत्यादि. बऱ्याच तरतुदी १९३५ च्या भारत शासन कायद्यातून उचलल्या आहेत. त्यामुळे मूठभर लोकांसाठी घटना लिहिली असं म्हणता येत नाही. ३. >> यज्ञ करणारा श्रेष्ठ आणि श्रम करणारा कनिष्ठ अशी वर्गवारी उदाहरण म्हणून मनुस्मृतीत सापडते. नक्की कुठे सापडते? ४. >> "हिंदूंच्या सध्याच्या सामाजिक विषमतेला आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या दु:स्थितीला वैदिक परंपरा जबाबदार नाही" >> तर मग कोण जबाबदार आहे ? इस्लाम कि ख्रिश्चन की आणखी कोण ? इंग्रज ? याचं उत्तर यापूर्वी दिलं आहे. परत देतो. आपण शिवाजीमहाराजांची शिकवण विसरलो हे आपल्या दु:स्थितीचं कारण आहे. आ.न., -गा.पै.

निरन्जनदास Mon, 07/13/2015 - 16:12
मित्रहो, चांगलं चाल्लय की ! तुमचं सगळ्यांच. अशीच चर्चा अपेक्षित आहे. पण ती तार्किक असावी, म्हणजे प्रत्येक मुद्द्याला सबल पुरावा असावा. उगाच स्वतःला भावनिकदृष्ट्या काहीतरी किंवा काहीतरीच वाटते म्हणून प्रतिसाद नसावा, एवढेच !

In reply to by निरन्जनदास

@ पण ती तार्किक असावी, म्हणजे प्रत्येक मुद्द्याला सबल पुरावा असावा. उगाच स्वतःला भावनिकदृष्ट्या काहीतरी किंवा काहीतरीच वाटते म्हणून प्रतिसाद नसावा, >> तेव्हढं सोडुन बोला..! आमच्याकडे धर्म ही अशी गोष्ट आहे की जिथे "खरं ते आपलं" हा मंत्र तोण्डानि जपत "आपलं ते(च) खरं" हा नियम पाळतात. कारण सगळ्या धर्मांचा, तोच-खरा धर्म आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

तेव्हढं सोडुन बोला..! आमच्याकडे धर्म ही अशी गोष्ट आहे की जिथे "खरं ते आपलं" हा मंत्र तोण्डानि जपत "आपलं ते(च) खरं" हा नियम पाळतात. कारण सगळ्या धर्मांचा, तोच-खरा धर्म आहे.
खरयं =)) =)) =))

पैसा Sat, 07/25/2015 - 16:57
सगळेच एकदम गिळण्याचा प्रयत्न करणार नाही. हळूहळू चावून खाल्लेले कधीही चांगले!

In reply to by तुडतुडी

गामा पैलवान Mon, 07/27/2015 - 17:38
तुडतुडी, भारतीय दर्शनशास्त्रांत ज्ञान म्हणजे अनुभवाद्वारे होणारी जाणीव. मधाची बाटली बघून वा बाहेरून चाटून चवीचं ज्ञान होत नाही. त्यासाठी मध प्रत्यक्ष चाखायला हवा. आ.न., -गा.पै.