मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अल्लाल शेती

दादा पेंगट · · काथ्याकूट
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त. जमीन ओलिताखाली( वरच्या अंगाला तळे+ शेतात विहीर) आहे, म्हणजे फ़क्त अतिवृष्टिची किंवा अवकाळी ढगाळ वातावरणाची( कीड पडते) फ़क्त भीती आहे, दुष्काळाची नाही. अधिक, धुर्‍यावर(बांधावर) तूर लावली ती घरी खायला पुरेसी दाळ देते.धान कापणीनंतर शेतातल्या ओलावरच थोड़ी मोहरी, लाखोळी, तीळ नि जवस पण होते. ही घरीच वापरली जाते सहसा. जास्त उत्पन्न झाले असेल तर विकून पै-पावली मिळते. जी जमीन ओलिताखाली नाही तिथे कधी धान पिकतो तर कधी पिकत नाही. थोडक्यात रामभरोसे. नफा शून्यावर येतो पण अजूनतरी उणे गेलेला नाही कारण विकण्यापुरते नाही तरी खाण्यापुरते धान येतेच. इतर दुय्यम पिके, जी विनाखर्च निव्वळ जमीनीच्या ओलावर घेतो, ती बेरजेचाच व्यवहार असते. आमच्या झाडीपट्टीत शेतकरी आत्महत्या का करत नाही ह्याचे कारण लक्षात येईल.(२-३ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत पण त्यावर 'चर्चा' करता येईल.) ओलित नसले तरी पोटापुरते धान आणि बाकी पोटउत्पन्न होते. गरीब असला तरी कर्जबाजारी नसतो.बचत म्हणून एक पैसा नसेल कदाचित. 2 वेळ पोट भरते आणि तेवढ्यात तो खुश असतो. जास्त मेहनत करत नाही. सिंचनाची सोय असली तरी दोन-तीन पिके घेईलच ह्याची खात्री नाही.(पाण्याची सोय असली तरी आम्ही पण नाही घेत उन्हाळी धान.) जास्त टेंशन पण घेत नाही. आमचा शेतकरी महागडे प्रयोग सहसा करत नाही. नगदी पीके घेण्याचा धोका घेत नाही. काही 'प्रगतिशील शेतकरी' तेवढे नगदी पिके घेणे, प्रयोग करणे वगैरे छंद करत असतात. बहुतेक शेतकर्‍यांचे जोडधंदे असतात. एखादी म्हैस तर नक्कीच असते. माझ्या गावात प्रत्येक शेतकर्‍याचा छोटामोठा कसलातरी जोडधंदा आहे. धानाची शेती करून आपण कधी श्रीमंत होणार नाही ह्याची त्याला स्पष्ट कल्पना आहे, पण आपल्या डोक्यावर मोठे कर्ज नि विकतचे टेन्शन नसणार हेपण त्याला माहीत आहे. 'चलरा वैसा चलने दो. खेतीबाडी में ज्यादा पैसा डालनेका नइ' ही त्याची मानसिकता आहे. त्यामुळे किमान माझ्या गावातला कोणीही शेतकरी स्वत:च्या अवस्थेला शासनाला जबाबदार धरत नाही. 'सरकारने ये करनेको होना और वो करनेको होना' अशी काही मागणीही कधी केल्याचे माझ्या लक्षात नाही. त्याला पश्चिम महाराष्ट्राच्या बागायतीची कल्पना आहे, नाही असे नाही. 'पर उसके लिए दिनरात खेत मेंच रहना पडता, वो लोग वोही पे घर बनाके रहते, इत्ती मरमर कौन करेगा?' हे उत्तर आमची आईच देते.धानाच्या शेतीत भागत नसले तर जोडधंदा करतात, त्याने भागत नसले तर उन्हाळ्यात शहरात कामावर जातात, पण बागायतीकडे वळत नाही किंवा नगदी पिकांकडे वळत नाही. त्याऐवजी शिकून , गेलाबाजार डिएड करून एखाद्या शाळेत शिक्षक बनणे त्याला जास्त सोयीचे वाटते. आमच्याकडे बव्हंशी सगळेच नोकरदार आपली नोकरी सांभाळत शेती करत असतात. सगळ्या घरी नोकरदार झाले म्हणून 'आता शेती कोण करणार?'हा प्रश्न आलेला नाही. शेतमजूरांची टंचाई आली तसे यांत्रिकीकरण वाढले. ट्रॅक्टर, थ्रेशर वगैरे यंत्रे 'भाड्याने' घेणे सुरु झाले. मार्ग सापडत राहतात. परिस्थितीशी जुळवून घेणे सुरु असते. पण शेतीशी नाळ तुटत नाही. आपल्याला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायत शक्य नाही हे स्वतःलाच पटवून दिले की,अपने अभावों का रोना औरों के पास न रोते हुए, डोक्याला जास्त ताप न देता आपली पारंपारिक धानाची शेती मजेत सुरु असते. झाडीपट्टीतले जिल्हे अतिमागास म्हणून ओळखले जातात. असतील अतिमागास, असतील शेतकरी गरीब, पण डोक्याला जास्त ताप नाही. खुश रहो, आबाद रहो, बर्बाद मत होवो. ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो. मी हा असा अल्लाल प्राणी असल्याने कधीकधी माझ्या डोक्यात मजेदार प्रश्न येतात. १) आमच्या ह्या मानसिकतेमागचे काय कारण असावे? असंच काहीसं कोकणाचं आहे असे ऐकून आहे. तिकडे पण धानाची शेती होते. शेती/पीक पद्धतीचा आणि मानसिकतेचा काही परस्परसंबंध असू शकतो का कोकणातले शेतकरी शेतीबद्दल कशा पद्धतीने विचार करतात? २) वर्‍हाडात सातत्याने कपाशीला कमी दर मिळाल्याने आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या अशी परिस्थीती होती. कमी दरामागची काही कारणे आंतरराष्ट्रीय आणि काही महाराष्ट्रीय होती. तेव्हा ते शेतकरी पारंपारिक पिकांकडे (अन्नधान्यांकडे) का वळले नाहीत? नगदी पिकांसाठी वारंवार कर्ज काढण्याचे धाडस कुठून येते?(कर्जाच्या बाबतीत आम्ही पराकोटीचे घाबरट!) मुळात वर्‍हाडात पाऊस तुलनेने कमी. जमीनीतही खूप पाणी नाही. शेती जास्त बेभरवशाची. त्यात कपाशी म्हणजे खर्चिक, जास्त मनुष्यबळ लागणारी. तरीही कपाशीच का? कपाशीला पर्याय शोधला तोदेखील नगदी पिकाचाच, सोयाबीनचा. यंदा सोयाबीनचेही दर पडले. नगदी पिकांचा असा वाईट अनुभव सातत्याने गेली दहा वर्षे तरी येत असताना नगदी पिकांचाच अट्टाहास कशापायी? कारण आपल्या दुरावस्थेचे खरे कारण नगदी पिके आहेत हे तर एव्हाना भेज्यात आले असेलच. चांगले दर मिळण्याच्या आशेवरती किती ताणून लावायचे माणसाने? थोडे व्यावहारिक व्हावे ना?कशाला कर्जावर कर्ज काढत बसावे? आणि आकड्यांचेच सांगायचे तर कपाशीचे दर हेकटर उत्पादन महाराष्ट्राचे सर्वात कमी आहे, गुजरातचे सर्वाधिक. म्हणजे सर्वाधिक उत्पादनखर्चात सर्वात कमी उत्पादन होते आपल्या राज्यात. म्ह्णजे फार नफ्याची अपेक्षा करणेही चुकीचेच. जर नगदी पिके घ्यायचीच आहेत तर किमान उत्पादनक्षमता तरी वाढवायला पाहिजे. त्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? त्याची इथे कोणाला कल्पना आहे का? ३) मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. पण तरीही तिकडे नवे साखर कारखाने येत असल्याची बातमी वाचली. मला कोणी ऊसाचे अर्थशास्त्र समजावून सांगेल? फार जुने कुतूहल आहे. गन्ने में ऐसा क्या है के सारे किसान चींटी की तरह गन्ने को चिपक जाते है? ४) शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात? एकतर हे टोक किंवा ते टोक. जर ह्यामागचे कारण एका बाजूचे शेतीविषयक अज्ञान आणि दुसर्‍या बाजूचे शेतकर्‍यांना भगवान का धरती पे प्रतिरुप समजणे असेल तर ते गैरसमज दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जावेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रकारच्या, प्रत्येक भागातल्या शेतीचे अर्थशास्त्र प्रामाणिकपणे जनतेपुढे आणायला पाहिजे. तसा प्रयत्न कोणी केला आहे का? त्याचप्रमाणे काही शेतकरी जे 'उपद्व्याप' करतात तेपण रोखठोकपणे जनतेपुढे आणले पाहिजे. सरसकट उदात्तीकरण थांबवण्याचा तोच एक मार्ग आहे असे वाटते. ह्याला प्रखर विरोध होईल ह्याचीपण कल्पना आहे कारण हर कोई अपना उल्लू सीधा करना चाहता है! पण नेटाने हे काम रेटले तर यश मिळेलच. शेती हा देखील एक उद्योग आहे, व्यवसाय आहे.( आमच्या सीमेपलीकडच्या तेलुगु बांधवांनी शेतीला 'व्यवसायम' हेच नाव दिले आहे.) तर, शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते. नफा-तोटा ह्यांचा विचार करूनच गुंतवणूक केली जाते. मग एखादा शेतकरी धोका टाळून सुरक्षित व्यवसाय करतो तर कुठे शेतकरी थोडी जोखीम घेऊन जास्त नफा कसा कमावता येईल हे बघतो. मग एका शुद्ध व्यावसायिकाकडे आपण 'तारणहार' म्हणून का बघतो? असो, पेंगायची वेळ झाली. काथ्या कूटून दमलो..

वाचने 22020 वाचनखूण प्रतिक्रिया 114

In reply to by रेवती

बहुगुणी Sun, 01/25/2015 - 03:19
उत्तरे माहीत नाहीत, सध्याचा तसा ज्वलंत चर्चा-विषय असणार्‍या शेतीविषयी अनुभवाधारित विना-अभिनिवेश लिहिण्याची शैली खूप आवडली. (तुमचं हे इथलं पहिलंच लिखाण दिसतं आहे, तुम्ही लिहिलेलं आणखी बरंच वाचायला आवडेल. खाली मधुराताईंनी म्हंटलंय तसं एकांगी लिखाणच वाचायला मिळतं संस्थळांवर, त्याला असं संतुलित पण प्रामाणिक लिखाण हाच उतारा ठरेल.) पूर्व महाराष्ट्रातील चार टोकाचे जिल्हे म्हणजे भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. यातील बहुतेक ठिकाणी नक्षली चळवळ्यांचा प्रभाव शेतीवर कसा पडतो तेही वाचायला आवडेल. (जाता जाता: माझं अज्ञान दाखवतोय, पण धान म्हणजे भात ना?)

In reply to by बहुगुणी

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:12
धानाची शेती म्हणजेच भातशेती. धान म्हणजे भात नाही आमच्याकडे. भात म्हणजे शिजलेला तांदूळ. धान म्हणजे ओंब्यावर येते ते.

In reply to by बहुगुणी

नरेंद्र गोळे Wed, 01/28/2015 - 09:37
एका माणसाने विचारले सत्तू म्हणजे काय? सत्तू म्हणजे अनेक धान्यांच्या भाजणीचे पीठ. त्यात दूध साखर घालून खायचे. म्हणजेच अवघड रेसिपी आहे. त्यावर तो म्हणाला, "सत्तू मलमत्तू कब घोले, कब खाए, कब पिए! धान भाई भले, कुटे, खाए, चले!!" झटपट खायला तयार होते ते धान!

अगदी प्रामाणिकपणे, शेतीविषयक लेख, त्यातही विदर्भातील शेती याबद्दल येणारे इतर लेख डोक्यात असल्याने, साशंक मनाने वाचायला सुरुवात केली. पण सकारात्मक लेखन आवडले. प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. चौथ्या प्रश्नाबद्दल -
शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून येतात?
संस्थळांवर वावरणार्‍या शेतकर्‍यांच्या काही तथाकथित पुढार्‍यांनी जे एकांगी लेख लिहिले हे एक कारण नक्कीच आहे. सतत फक्त सरकारवर दोषारोपण, परिस्थितीला दोषी दर्शवणे, आत्महत्त्यांचे अप्रत्यक्षरीत्या समर्थन एवढेच दिसले. दुसरी बाजु जर समोर आली तर कदाचित ही मतं थोड्या प्रमाणात बदलु शकतील.

In reply to by मधुरा देशपांडे

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:54
म्हणूनच प्रत्येक भागातल्या लोकांनी इकडे आपले अनुभवकथन करावे असे वाटते. मला वाटते इकडे अनेकांना शेतीचा काही-ना-काही अनुभव असेलच.

In reply to by दादा पेंगट

प्रत्येक भागातील लोकांचे अनुभव वाचायला सगळ्यांनाच आवडतीलच. सुरुवात तुम्ही करा. तुमचे अनुभव अजुन विस्तारीत स्वरुपात लिहा. :)

आदूबाळ Sun, 01/25/2015 - 03:08
फार छान लिहिलं आहे. प्रश्नही आवडले. एक शंका : या झाडीपट्टी जिल्ह्यांत बल्लारपूर इंडस्ट्रीज, एसीसी, कोल इंडिया वगैरे मोठे उद्योग आहेत ना?

In reply to by आदूबाळ

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:17
उद्योग आहेत, पण हाताच्या बोटावर मोजण्याइतके. त्यातला कामगारवर्गही स्थानिक कमी आहे, बाहेरचे जास्त. नव्या संधी खूप कमी आहेत. आता तिरोड्यात अदानीचा विद्युत प्रकल्प आलाय त्यामुळे थोडा रोजगार आलाय त्या भागात.

कंजूस Sun, 01/25/2015 - 04:20
तुमचे आणि तुमच्या गावाकडचे लोकांचे विचार एकदम बरोबर आहेत. दुसऱ्याने कर्ज काढून बांधलेला बंगला पाहून चिडून स्वत:ची झोपडी जाळत नाहीत. शेती हा व्यवसाय मानला तर त्याचे नफातोटागणित करायलाच हवे हे पटले. मी जरी शेती करत नसलो तरी शेतीचे कार्यक्रम पाहतो. त्यातले समजून घेतो. नकदी पिके, तिप्पट उत्पन्नाचे वाण पिकवायला लावणेआणि इतर व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांना खर्च करायला लावणे हे एक मोठे जाळे, फास, रैकेट आहे. बिटि कापूस, स्ट्रॉबेरी लागवड, इमू पालन, वांझोटे आले लागवड, सोयाबिन लागवड, ही काही उदाहरणे आहेत. मोठ्या कंपन्यांकडून खरेदीच्या अपेक्षेने केलेली कोको, सोयाबिन, कापूस, कोरफड, सफेद मुसळी लागवड भाव पडल्याने आतबटटयाची झाली आहे. आपल्याकडे शेतीकडे हेटाळणी करून पाहिले जाते परंतू शेतीचं उत्पन्न आयकरमुक्त असल्याने कागदोपत्री शेती दाखवून 'इतर' ठिकाणाकडूनचे उत्पन्न विनाकर पांढरे करता येते यासाठी शेतजमीनीचे भाव वाढताहेत.

अजया Sun, 01/25/2015 - 07:44
लेख आवडला.खरंच हा विचार का करत नसावेत शेतकरी?त्यामागे काय कारणं असतील की तोटा,कर्ज सगळं डोक्यावर घेऊन नगदी पिकं घेतली जातात,बेभरवशी पावसाच्या जीवावर.तेही सध्या शेतकरी अनेक ठिकाणाहून मोफत मार्गदर्शन घेऊ शकत असताना?

पैसा Sun, 01/25/2015 - 08:54
लेख खूप आवडला. कोकणातले लोक पण असेच मस्त रहाणारे आहेत. जमीन खूप उंचसखल आणि खडकाळ असल्याने शेतीयोग्य जमीन मुळात कमी. कष्ट खूप करतात. पण त्यातून श्रीमंत होण्याइतके पैसे कमवता येतील अशी शक्यता खूप कमी. घरात पाहिजे तेवढे पीक झाले तरी खूप. उडीद, भाज्या असे काही काही करतात. नाही असे नाही. पण तेही घरच्या उपयोगासाठीच. बहुधा घरातले बाकी लोक मुंबईला जातात आणि एखादा काका काकू शेती बघतात. एक मात्र आहे, कोकणी माणूस हा तसा ऋण काढून सण करणारा नव्हे. शिक्षणाचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे खाजगी सावकाराच्या विळख्यात कोणी शेतकरी अडकत नाही. बँकांची शेती कर्जे सुद्धा अगदी बाबापुता करून गळ्यात घालायची वेळ येते. मुळात आधी निव्वळ शेतीवर सगळे घर अवलंबून आहे असा प्रकार नसतो. एखादा भाऊ नोकरी करणारा आणि एखादा घरचे बघणारा. अशी वाटणी कित्येक पिढ्या सुखाने चालत आलेली आहे. विहिरींना पाणी भरपूर असते. पण दोन पिके घेत नाहीत. कोकणात जोडधंदा म्हणून गायीम्हशी ठेवणेही हसण्याची गोष्ट आहे. त्या म्हशीला एखादा लीटर दूध आले तर लै मोठी गोष्ट झाली. आंबे काजू आहेत पण ते कंत्राटावर कोणा आंबेवाल्या पटवर्धनाला देऊन मोकळे होतील. राहिलेल्या वेळात कोडतात केशी चालवणे हा आवडता छंद आहे. मात्र मिळतंय त्यात, आहे त्यात समाधानी असतात. माझ्यात पण हा सुशेगाद रहायचा गुण इथल्या मातीतूनच आला आहे. त्यामुळे जास्त पैसे मिळवण्यासाठी धडपड करावी असे वाटतच नाही! भात खाऊन किती झोप येते हे तुम्हाला माहीतच असेल दादा! मग भाताचे एक पीक घेऊन कोकण आणि विदर्भातले शेतकरी मजेत रहातात. एवढंच नव्हे तर सरकारच्या मदतीकडे पण बघत नाहीत आणि आत्महत्यांच्या वाटेलाही जात नाहीत यात काय नवल?

In reply to by पैसा

राही Sun, 01/25/2015 - 14:42
प्रतिसाद आवडला. पण एक सांगणे जरूरीचे आहे. कोंकणात पाणी भरपूर आहे ही समजूत सध्या तित्कीशी खरी राहिलेली नाही.तीव्र उताराच्या जमिनींमुळे आकाशातून जितके पाणी पडते तितके भर्रकन वाहून जाते.उन्हाळ्यात विहिरी आटतात. नद्यांमधून गोड्या पाण्याचा ओघ कमी झाल्यामुळे नदीमुखे खूप आतपर्यंत खारी होतात.विकासाच्या कामांमुळे डोंगर ढासळत चालले आहेत आणि ही धुपणारी माती नद्यानाल्यांत जाऊन खाड्या ओहोरताहेत. समतल जमिनीची वानवा असल्यामुळे शेततळी वगैरे संकल्पना बाद आहेत. हिरवा चारा फक्त काही महिनेच मिळू शकतो. त्यामुळे गुरेपालन बाद. आंबा-काजूची बागायती होऊ शकते पण त्याला राखणदारी लागते,ती मजुरी परवडत नाही. दक्षिण कोंकणात रानटी हत्तींचे आक्रमण होऊ लागले आहे. पण यावर एक नामी उपाय कोंकणाला ब्रिटिशांच्या कृपेने लाभला, तो म्हणजे मुंबई. गेल्या दीड शतकापासून कोंकणातून मुंबईत चाकरमान्यांचे स्थलांतर सुरू आहे. मुंबईवर गडद कोंकणी छाप इतके दिवस होती ती यामुळेच आणि पश्चिम महाराष्ट्राला मुंबई सांस्कृतिक दृष्ट्या आपलीशी वाटत नाही तीही यामुळेच.

In reply to by राही

पैसा Sun, 01/25/2015 - 14:56
खालाटपट्टीत, म्हणजे समुद्रकिनार्‍यापासून साधारण १५/२० किमि अंतरापर्यंत विहिरींना कायम पाणी असते. पण जरा उंचावर गेले की उन्हाळ्यात पाणी आटून जाते. जिथे अजून जंगलतोड झाली नाही तिथे हा प्रश्न एवढा भेडसावणारा नाही. पण चिपळूण, लांजा अशा ठिकाणी झाडी तुटली त्या त्या भागात पाण्याचा प्रश्न मोठा आहे. दक्षिण कोकणात रानटी हत्ती येत आहेत तेही गोवा कर्नाटक बॉर्डरवर खाणींमुळे जंगलतोड झाल्यामुळे. आता खाणी परत सुरू होणार असे सध्या वाचत आहे. प्रत्येकाला आपापल्या खाजगी फायद्याची काळजी आहे. पर्यावरण आणि जंगलांचे कोणाला काय?

In reply to by राही

आदूबाळ Sun, 01/25/2015 - 15:07
कोंकणात पाणी भरपूर आहे ही समजूत सध्या तित्कीशी खरी राहिलेली नाही.तीव्र उताराच्या जमिनींमुळे आकाशातून जितके पाणी पडते तितके भर्रकन वाहून जाते.उन्हाळ्यात विहिरी आटतात. नद्यांमधून गोड्या पाण्याचा ओघ कमी झाल्यामुळे नदीमुखे खूप आतपर्यंत खारी होतात.विकासाच्या कामांमुळे डोंगर ढासळत चालले आहेत आणि ही धुपणारी माती नद्यानाल्यांत जाऊन खाड्या ओहोरताहेत. समतल जमिनीची वानवा असल्यामुळे शेततळी वगैरे संकल्पना बाद आहेत. हिरवा चारा फक्त काही महिनेच मिळू शकतो. त्यामुळे गुरेपालन बाद. आंबा-काजूची बागायती होऊ शकते पण त्याला राखणदारी लागते,ती मजुरी परवडत नाही. दक्षिण कोंकणात रानटी हत्तींचे आक्रमण होऊ लागले आहे.
प्रवीण दशरथ बांदेकर यांची "चाळेगत" ही कादंबरी याविषयावर आहे. (कादंबरी फसली आहे हे माझं वैयक्तिक मत, पण) कोकणातल्या वास्तवाचं वर्णन भयावह आहे.
गेल्या दीड शतकापासून कोंकणातून मुंबईत चाकरमान्यांचे स्थलांतर सुरू आहे. मुंबईवर गडद कोंकणी छाप इतके दिवस होती ती यामुळेच
अगदी अगदी. मुंबईला जिथे नोकरीला होतो तिथे सगळे सावंत, सामंत, महाडिक, राणे, देसाय, पाडेकर, म्हात्रे असेच होते. एकमेकांत अगदी स्वच्छ कोकणी / मालवणी बोलत. फार गोड भाषा.

In reply to by आदूबाळ

सतिश गावडे Sun, 01/25/2015 - 16:49
म्हात्रे आगरी. कोकणी नव्हे. आगरी लोक पेण, पनवेल, उरण आणि ठाण्याचा काही भाग या पट्टयात राहतात.

In reply to by खटपट्या

सोत्रि Mon, 01/26/2015 - 07:09
अजुनही आडनावावरून जात शोधण्याचा समाजाचा सोस काही जात नाही आणि जात काही जात नाही हेच खरं! - (आडनाव न लावावे का हा विचार करणारा) सोकाजी

In reply to by सोत्रि

सतिश गावडे Mon, 01/26/2015 - 12:23
"आगरी" म्हणून काही जात आहे की नाही हे मला माहिती नाही. कदाचित असेलही. मात्र उत्तर रायगड मधील पेण, पनवेल, उरण आणि अलिबाग हे चार तालुके आणि ठाणे व नवी मुंबई शहरांच्या बहुतांशी भागात "आगरी" भाषा बोलणारे लोक राहतात. हे लोक "आगरी" म्हणुणच ओळखले जातात. या समाजाची वस्ती समुद्रकिनार्यावरील व खाडीच्या शेजारील गावांमध्ये असते. या लोकांचा मिठागरे हा एक व्यवसाय असून "आगरी" हा शब्द मिठागर शब्दातील आगर शब्दावरून आला आहे. आगरी ही मराठीची एक बोलीभाषा आहे. आंतरजालावर "आगरी रामायण" असा शोध घेतल्यास मिमिक्री आर्टिस्ट जॉनी रावत यांची आगरी भाषेतील ध्वनिफीत सापडते. ती ऐकल्यास आगरी भाषेची कल्पना येते. टाईमपास चित्रपटातील "दादूस" म्हणणार्या पात्राची भाषा आगरी आहे.

In reply to by खटपट्या

पिंगू Wed, 01/28/2015 - 02:40
मुळात आगरी म्हणजे मिठाच्या आगरांची मालक असलेले आणि तिथे काम करणारे. भातशेती आणि मिठागरे हा आगरीसमाजाचा पारंपारिक व्यवसाय.

In reply to by पिंगू

आणि ह्या जमिनी विकून त्याच्या इमारती बांधून बक्कल पैसा हाती घ्यायचा. पायातील चपलेसह पांढरा पोशाख गळ्यात सोन्याच्या चेन अश्या अवतारात गावभर भटकंती करतांना ह्या समाजाला डोंबिवलीत लहानपणापासून पहिले आहे. आगरी मुलांशी मैत्री नाही ना असे अनेकदा घरी विचारले जायचे. डोंबिवलीत आगरी लोकांना ब्रिटीश म्हटले जाते,

In reply to by निनाद मुक्काम …

पिंगू Wed, 01/28/2015 - 04:32
मी पण आगरीच. पण मला कधीच असले शौक जडले नाहीत. आता तर जमिनी विकून भिकेला लागलेल्या कितीतरी जणांना बघितले आहे. काहीच कारण नसताना उगाच मिरवामिरवी करायची, हा इथला चुकीचा पांयडा आहे.

In reply to by पिंगू

माझे खुप मित्र आहेत आगरी समाजात. एकदा मैत्री केली की जिवाला जिव देणारी माणसं. वेळ पडल्यास तुमच्यासाठी जीवही देतील आणि वेळ पडल्यास घ्यायलाही तयार होतील. लहानपणी कळव्यात राहत असताना एक आगरी आज्जी फार जवळची होती आम्हाला. तीचे नाव शेवटपर्यंत काही कळाले नाही, रादर आम्ही तसा प्रयत्नच केला नाही. कारण तिचा आवाज एखाद्या आगबोटीच्या भोंग्यासारखा खणखणीत होता. माझे मामा म्हणायचे 'कसला ढणढण आवाज करतेस गं मावशे?' त्यावरून आम्ही तीचं नावच पाडलं होतं "ढणढणआज्जी " ;) नन्तर मोठे झाल्यावर कळले तीने तिच्या तरुणपणी एक खुन केला होता. भर बाजारात एका मासे खरेदी करायला आलेल्या माणसाने काहीतरी भांडणावरून तिच्या नवर्‍याच्या अंगावर हात उचलला. या बाईने तिथेच मासे कापायच्या सुरीने त्याच्या कोथळाच काढला. गंमत म्हणजे या गुन्ह्याच्या आरोपाखाली तिचा नवरा शिक्षा भोगून आला. ढणढण आज्जी आता नाहीये पण कळव्यात गेलो की तिच्या घरी नेहमी जातो आम्ही अगदी हक्काच्या आजोळी जावे तसे. या आज्जीच्या कळव्यात तीन चाळी आहेत चार मजली ;)

In reply to by पिंगू

डोंबिवलीत बालपण गेले तेथे ह्या समाजाची जी प्रतिमा आहे ती येथे लिहिली,पण चेंबूर ला घाटाला विलेज , छोटा राजांचा बालेकिल्ला किंवा जुहु कोळीवाडा येथील अनेक आगरी माझ्या पुढे ओळखीचे झाले , अनेक जण उच्च शिक्षित आहेत.

In reply to by सोत्रि

बॅटमॅन Mon, 01/26/2015 - 15:25
यात इतके वाईट काय आहे हेच मला समजत नाही. कुठल्याही जातीबद्दल अनुद्गार निघत नसतील तर काय त्रास काय आहे नेमका? उलट 'आमच्यात असं व तुमच्यात तसं' छाप न्यूट्रल चर्चेतून जितकी माहिती मिळते त्याने आपले अनुभवविश्व समृद्ध होतेच. जातपात व तज्जन्य वाईट प्रकार नको असतील तर हा विषय असा कुष्ठरोग्यागत बाहेर ठेवून दुर्लक्षिण्याजोगा आहे का?

In reply to by बॅटमॅन

दादा पेंगट Mon, 01/26/2015 - 21:33
आपल्याकडे कित्येक रीतीभाती ह्या एकेका जातीपुरत्याच आहेत, शतकानुशतके रोटीबेटी व्यवहार जातिपुरता मर्यादित राहिल्याने. जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी कोणी चालीरीती, खाद्यसंस्कृती वगैरे बद्दल बोलत असेल तर जातीचा उल्लेख आवश्यक ठरतो. आमच्या जातीत अमुक असते, तमुक सणाला अमुक बनते वगैरे सांगितले आणि त्याच्यावर जातीयतेचा आरोप केला तर आपण आपल्या ज्ञान मिळवण्यावरच मर्यादा आणत असतो.

In reply to by दादा पेंगट

जर समाजशास्त्रीय अभ्यासासाठी कोणी चालीरीती, खाद्यसंस्कृती वगैरे बद्दल बोलत असेल तर जातीचा उल्लेख आवश्यक ठरतो सहमत आहे. वर बॅटमन यांनी म्हटल्याप्रमाणे जर अवमान, अवहेलना होत नसेल तर जातीच्या उल्लेखाने फारसा फरक पडत नाही. आणि भारतासारख्या देशात जिथे अठरापगड जातींचे वर्चस्व आहे तिथे तर या गोष्टी अपरिहार्यपणे संवादात येतच राहणार.

In reply to by विशाल कुलकर्णी

नाखु Wed, 01/28/2015 - 11:37
जावू द्या मिपा "आसबें" च लेखन प्रताप पाहून ही तुम्हाला अशे प्रश्न पडावेत?? जात आहेच ती सांगीतली किंवा नाही सांगीतली तरी राहणारच (आपल्या कुणाची इच्छा असो नसो तरी) पण जातीभेद्/जातीद्वेष कसोशीने टाळणे/निपटणे हातात आहे हे सत्य स्वीकारणारा गावकुसाबाहेरचा नाखु

In reply to by पैसा

सस्नेह Sun, 01/25/2015 - 15:34
'कोडतातल्या केशी' बद्दल प्रचंड सहमत ! कोकणात पोष्टिंग झालेल्या आमच्या काही घाटी 'खाते'-बंधूंना या केशींनी दे माय धरणी ठाय करून सोडले आहे.

In reply to by पैसा

गवि Tue, 01/27/2015 - 11:53
एक मात्र आहे, कोकणी माणूस हा तसा ऋण काढून सण करणारा नव्हे. शिक्षणाचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे खाजगी सावकाराच्या विळख्यात कोणी शेतकरी अडकत नाही.
चपखल. आता कोंकण बदललं असं ऐकू येतं. पण वीसेक वर्षापूर्वी मी जी पंधराएक वर्षं कोंकणात होतो तेव्हा भिकारी जवळजवळ अजिबातच बघितला नाही. एकच म्हातारा होता तो आठवड्या पंधरा दिवसांनी कधीतरी घरी येऊन अन्न मागून न्यायचा, पण तोही भिकारी नव्हता. शौचालये आणि रस्ते यांची साफसफाई करणारा पण वयाने फार काम झेपत नसलेला कामगार होता. रस्त्यात शी करायला पोरांना बसवणे हा प्रकार पूर्ण शहरात वर्ज्य होता. मोठ्यांनी तसे करण्याची बात दूरच राहिली. एका नव्याने शहरात आलेल्या कुटुंबाने पोरांना बाहेर शी ला बसवलं तेव्हा सगळी आळी त्यांच्या विरोधात गेली आणि ते बंद करवलं. स्वच्छतेचा सेन्स कोंकणातल्यासारखा घाटावर नाही दिसला. कोल्हापूर्-सांगली-सातारा भागात खूप वर्षं राहणं झालं, तिथे रस्ते हे कडेला संडासला बसण्यासाठीच असतात आणि कोणतीही रिकामी जागा हा संडास, मुतारी कम उकिरडाच असतो अशी समजूत व्यापक दिसली. रत्नागिरीत पावसाचं पाणी फार साठून रहायचं नाही, पण जे काही साठायचं त्यात पाय बुडवून खेळतानाही स्वच्छ वाटायचं. देशावर आल्यानंतर कोणतंही पाण्याचं डबकं म्हणजे गटार ऊर्फ टाळण्याची गोष्ट असंच वाटलं.

In reply to by गवि

खटपट्या Tue, 01/27/2015 - 12:05
सहमत !! बर्‍याच वेळेला रानातल्या झर्‍याचं पाणी पीण्याईतके शुद्ध असायचं. अजुन असतं. कोल्हापूर सातारा सांगली वाल्यांच्या भावना दुखावल्या नाही म्हणजे झालं :)

सौन्दर्य Sun, 01/25/2015 - 09:07
लेख फार छान आणि संतुलित आहे. तुमचे विचार आवडले आणि पटले देखील. एक नवीनच दृष्टीकोन वाचायला मिळाला. अजून लिहित रहा आम्हाला वाचायला आवडेल.

किशोर७० Sun, 01/25/2015 - 10:33
लेख आवडला. एक शंका आहे- तुम्ही म्हणता तसे विदर्भातल्या कोरडवाहू शेतकऱ्याने अन्नधान्याच्या उत्पादनाकडे वळायचे तर तो कोणती पिके घेऊ शकतो? भात आणि गहू घेणे शक्य नाही. मग उरतात ज्वारी आणि बाजरी ही दोनच पिके. त्यावर त्याने जगावे का? दुसरं, तुमच्याकडे आणि कोकणात नोकरी करून शेती करतात किंवा शेती करून नोकरी करतात... तसं विदर्भात होत नाही, याची कारणं तिथल्या विकासाशी जुळलेली असावीत. झाडीपट्टीतली आणि कोकणातली लोकसंख्या, खाणउद्योगात किंवा औद्योगिक क्षेत्रात नोकरी साठी होणारे स्थलांतर हे लक्षात घ्यायला हवे.

In reply to by किशोर७०

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:40
मला वाटते गहू शक्य असावे. पण कपाशीपूर्वी ज्वारीच प्रमुख पीक होते. ते स्थानिक वातावरणात चांगले उत्पन्न देईल असे वाटते. अर्थात मीदेखील वर्‍हाडात शेतकर्‍यांनी पारंपारिक पीकेच घ्यावी असे म्हणत नाही आहे तर पारंपारिक पीके का घेत नाहीत हा प्रश्न केलाय. मला उत्तर माहीत नाही. 'नगदी पीकेच घेऊ, सातत्याने कर्जबाजारी झालो तरी चालेल' ह्यामागची भूमिका, मानसिकता जाणून घ्यायची आहे, कारण आमच्या भागात वेगळी मानसिकता असते.

In reply to by दादा पेंगट

अर्धवटराव Wed, 01/28/2015 - 01:30
'नगदी पीकेच घेऊ, सातत्याने कर्जबाजारी झालो तरी चालेल' ह्यामागची भूमिका, मानसिकता जाणून घ्यायची आहे
स्थानीक पंजाबी, मारवाडी, सिंधी लोकांसारखं गबर व्हायचं असेल तर पश्चिम महाराष्ट्राने नगदी पिकातुन कमवला तसा बक्कळ पैसा कमवायचा अशी काहिशी अतरंगी आयडीया आहे वर्‍हाड-विदर्भात. पण मुळात त्यासाठी अत्यावष्यक अशी व्यावसायीक वृत्ती आणि कष्ट करण्याची इच्छा नसल्यामुळे वाघाचं कातडं पांघरुन शेर बनायला निघालेल्या गाढवासारखी अवस्था झाली आहे.

चेतन Sun, 01/25/2015 - 10:33
लेख आवडला. पण अल्लाल शेती पुढिल काहि वर्षात होइल याबद्दल साशंक. नगदी पी़क थोड्या प्रमाणात घेता येत नाही का?

In reply to by चेतन

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 20:44
खरे तर थोडे, एखाद्या बांधीत घेता यायला हवे. पण घेत नाहीत. अल्लाल शेती होत राहील. धानाचे अर्थशास्त्र किंवा थोडे वेगळे आहे. मिनिमम सपोर्ट किमत असते. तसेच नवनवे वाण येत असतात आणि शेतकरी ते वापरत असतात. प्रतिहेक्टर उत्पादन हळूहळू का होईना पण वाढत आहे. उदाहरणार्थ आता आमच्या गावी जय श्रीराम हे धानाचे वाण मोठ्या प्रमाणात लावले जाते कारण दर चांगला मिळतो, जरा काटक आहे, उत्पादनही चांगला होते. सुगंधी चिन्नोर वाण एखाद्याने लावलेच तर थोडे पोटापुरतेच.

साधी सरळ गोष्ट आहे दादा, आपल्याकडे नैसर्गिक उपलब्धी काय आहे?जमीन कुठल्या उत्पादनाला पोषक आहे? याचा अंदाज घेवून पिके घ्यायला हवीत. उगीच निव्वळ उत्पन्नाच्या मागे लागून नगदी पिके घ्यायची आणि मग शेवटी तेलही गेले .... करत बसायचे याला काहीच अर्थ नाही. सुटसुटीत आणि थेट लेख, आवडलाच.

सोत्रि Sun, 01/25/2015 - 10:51
ह्या शेतीला आम्ही गमतीने अल्लाल(आळशी/अतिनिवांत) शेती म्हणतो.
१. पहिला प्रश्न आणि वरील ही ओळ आणि तुमचा आयडी तुमच्या आळशी मनोवृतीचे द्योतक आहे. प्रयोगशील असण्यास तुमची हरकत का आहे? तर आतबट्ट्याचा व्यवहार होण्याची शक्यता असते म्हणून! त्यासाठी कोकणी माणसाला समविचारी बनवून हाताशी धरताय, का? २. उत्पादनक्ष्मता वाढविण्याची कल्पना आहे का? हा प्रश्न कशाच्या आधारावर विचारताय? त्यासाठी लागणारी आर्थिक सुबत्ता यावी म्हणूनच तर नगदी पिकांचां अट्टाहास आहे हो. पण तिथेच बोंब आहे. नगदी पिकांची गरज तर आहे पण त्यासाठी शेतकर्‍याला मदत मात्र कोणी करणार नाही. तुमचा उपाय काय तर हातावर हात धरून पोटापुरते पिकवा. देशाच्या एकंदरीत मागणीचे काय करायचे? आयात ??? ३. मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये हे तुम्ही, अल्लाल शेतकर्‍याने सांगावे हाच मोठा विनोद आहे. ४. शेती आणि शेतकरी ह्यांच्याबद्दल प्रसार माध्यमांत किंवा सोशल साइट्सवर टोकाचीच मते का दिसून ह्याचे उत्तर शोधण्यापेक्षा प्रत्याक्षात काय स्थती आहे त्याबद्दल विचार करायला हवा. शेती हा देखील एक व्यवसाय आहे हे मान्य केले तर व्यावसायिकता आपोआप येते असे म्हणताय ना? मग कर अब्जोपती माल्ल्या किंगफिशर वाचणन्यासाठी सरकार कडे हात पसरू शकतो तर शेतकर्‍यानेच काय घोडं मारलं आहे? -('सदा जागरूक') सोकाजी

In reply to by सोत्रि

चेतन Sun, 01/25/2015 - 11:12
>>पहिला प्रश्न आणि वरील ही ओळ आणि तुमचा आयडी तुमच्या आळशी मनोवृतीचे द्योतक आहे. कशावरुन. त्यांनी आधिच सांगितलय शेतीच्या जोडीने इतर व्यवसाय आणी नोकरी करतात म्हणून (उगाच उचलली..) नगदी पीकं उदा. कापुस आणि आयात काय संबध्द? भाव आपोआप मिळेल. मग कर अब्जोपती माल्ल्या किंगफिशर वाचणन्यासाठी सरकार कडे हात पसरू शकतो तर शेतकर्‍यानेच काय घोडं मारलं आहे? दरवर्षी? प्रयोगशील रहावे पण पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यावर

In reply to by चेतन

सोत्रि Sun, 01/25/2015 - 11:25
कशावरुन
त्यांनीच प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर म्हणून उचलली आणि...पण उगाच नव्हे :)
काय संबध्द?
मुद्दा नीट समजून घ्या, नाही समजला तर विचारा की नेमका मुद्दा काय आहे! ठीक ?
दरवर्षी?
हो! कारण तसे करत राहवे लागते ह्याचा अर्थच मागच्या वर्षी काही केले गेले नाही!!
प्रयोगशील रहावे पण पोटापाण्याचा प्रश्न सुटल्यावर
लेख असे म्हणत नाही, लेख फक्त पोटापाण्याचे बघा असे म्हणतोय! - (प्रयोगशील) सोकाजी

In reply to by सोत्रि

चेतन Sun, 01/25/2015 - 11:44
मग मुद्दा नीट समजउन सांगाचं. कापसाची जर डिमांड असेल तर भाव का मिळत नाही? कारण तसे करत राहवे लागते ह्याचा अर्थच मागच्या वर्षी काही केले गेले नाही!!?? नक्की???? मग दरवर्षीची कर्जमाफी प्रत्यक्शात नसते का? माल्याबद्दल सरकारने काय केले? माल्या टॅक्स भरतो शेतकरी भरतो का? माल्याच्या कंपनीवर बर्‍याच नोकरदारांची घरे अवलंबुन असतात तसे इथे असते का? शेवटच्या मुद्द्याबद्दल किंचीत सहमत. म्हणुन नकदी पीकं थोड्याप्रमाणात घेता येतात का हा प्र॑श्न विचारला. (फुकटचा टॅक्स भरणारा नोकरदार) चेतन

In reply to by चेतन

विवेकपटाईत Mon, 01/26/2015 - 17:23
महानगरात राहणाऱ्या नौकार्दाराला सर्वात जास्त सरकारी अनुदान मिळते (अप्रत्यक्ष रुपात ). मुंबईत आणि दिल्लीत राहणाऱ्या लोकांसाठी पाणी, वाहतूक (मोठे मोठे उड्डाणपूल च्यायला जेवढा पैसा मुंबईच्या लोकांना पाणी पाजण्यात आणि रस्त्यांवर खर्च होतो तेवढा संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रावर होत नाही. स्वस्त लोकल, बस, बाबुंसाठी नुकसानात चाललेली AI, नियमित २२ तासांपेक्षा जास्त वीज. सबसिडी वाली गस व गेल्या ५० वर्षांपासून पेट्रोल डीजेल सबसिडी (सध्या नाही आहे, उद्या पुन्हा चालू होई शकते). विचार करा निदान प्रत्येक महानगरीय व्यक्ती वर २० ते २५ हजार रुपयांची दरवर्षी सबसिडी सरकार तर्फे जाते.

In reply to by विवेकपटाईत

वामन देशमुख Mon, 01/26/2015 - 22:39
महानगरात राहणाऱ्या नौकार्दाराला सर्वात जास्त सरकारी अनुदान मिळते...
हो, पण शहरात राहणारे नोकरदार आणि त्यांच्या कंपन्याही सरकारला कररूपाने सर्वात जास्त महसूल देतात. आणि अजून एक, शेतीजन्य उत्पन्नावर करच नाही!

In reply to by वामन देशमुख

मराठी_माणूस Tue, 01/27/2015 - 18:00
त्यांच्या कंपन्याही सरकारला कररूपाने सर्वात जास्त महसूल देतात.
ह्या कंपन्यांचे उत्पादन भलत्याच शहरात होत असते. कॉर्पोरेट ऑफिस महनगरात असते आणि वित्तिय कारभार तिथुन होतो म्हणुन तसे भासते.

In reply to by वामन देशमुख

विवेकपटाईत Tue, 01/27/2015 - 19:40
चुकता आहात राव, शेतीचे भाव सरकार ठरवते आणि ते कमी कसे ठरवायचे हाच प्रयत्न असतो. पण अप्रत्यक्ष रूपेण कर वसूलीच आहे.

In reply to by विवेकपटाईत

सुबोध खरे Wed, 01/28/2015 - 11:56
Mumbai accounts for slightly more than 6.16% of India's economy contributing 10% of factory employment, 30% of income tax collections, 60% of customs duty collections, 20% of central excise tax collections, 40% of foreign trade and rupees 40,000 crore (US $10 billion) in corporate taxes to the Indian economy.[2]source wikipedia साहेब एवढा पैसा मिळवण्यासाठी मुंबईला दिलेल्या सुविधा आणि त्यावरील खर्च नगण्यच आहे. मुंबईतील माणूस जेवढी मेहनत करतो तेवढी महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा गावात होत नाही हि वस्तुस्थिती आहे. मुंबईत विजेची गळती( चोरी) नगण्य आहे. मुंबईत कुणालाही फुकट काहीही मिळत नाही. उगाच गावांचा कळवळा घेणे हि फ्याशन झालेली आहे.

In reply to by सुबोध खरे

मुंबईतील माणूस जेवढी मेहनत करतो तेवढी महाराष्ट्रातील कोणत्याही शहरात किंवा गावात होत नाही हि वस्तुस्थिती आहे. हे आमच्या मुटेसाहेबांना सांगा. ते म्हणतात शेतकर्‍यांइतके कष्ट कोणीच करत नाही. ;)

In reply to by सोत्रि

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 21:05
लेख फक्त पोटापाण्याचे बघा असे म्हणतोय! >>> मी असे म्हणत नाही. मी शेती व्यावहारिक होऊन करावी म्हणतोय. ज्याला पोटापुरती करावीशी वाटते त्याने तशी करावी, ज्याला बक्कळ पैसा काढावासा वाटतो त्याने तसे करावे. पण वास्तवाचे भान असू द्यावे. :)

In reply to by सोत्रि

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 20:59
१. मी कुठे हरकत घेतली आहे? मी माझ्या भागापुरती असलेली एक मानसिकता सांगितली आहे. आणि तशी मानसिकता कोकणात पण आहे का ते विचारले आहे. त्याच्यामागचे कारण जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. २. नगदी पिकांची गरज तर आहे पण त्यासाठी शेतकर्‍याला मदत मात्र कोणी करणार नाही. >> मदत करायला ब्यांका आहेत, कृषी विद्यापीठे आहेत, शासनाच्या योजना आहेत. तसेही तुम्ही तुमच्या मनातली वाक्ये माझ्या तोंडी घालण्याचे धंदे करत आहात असे वाटत आहे. मी कुठलाही उपाय सांगितला नाही. माझा तेवढा अभ्यास, कुवत, अधिकार नाही. ३. ऊस जिथे भरपूर पाणी आहे त्यांनी घ्यावे ना. पण पाणीच नसताना ऊस का घ्यावे? इतर नगदी पिके आहेतच. जमिनीतले सगळे पाणी ऊसाच्या घशात घातले तर मग प्यायच्या पाण्यासाठी वणवण करण्यात काय अर्थ आहे. पावसाळा संपला नाही की जिथे टँकर मागवावा लागतो तिथे ऊस का लावावा? ४. सरकारने किंगफ़िशर वाचवण्याची कोशीश केली का?

In reply to by सोत्रि

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:35
माझ्या घरी एसी नाही. हिवाळा असल्याने पंखाही बंदच अस्तो. त्यामुळे हा लेख एसीत बसून खरडला आहे हा आरोप सरासर झूठ आहे.

In reply to by बाबा पाटील

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:46
साहेब, तुमचा शेतीशी कितपत संबंध आहे मला माहीत नाही. पण माझा आहे. मी फक्त माझे अनुभवकथन केले आहे. तुमचे अनुभव वेगळे असू शकतात. भारताच्या प्रत्येक भागातल्या शेतकर्‍यांचे अनुभव वेगळे असू शकतात. सरसकटीकरण करता येत नाही. म्हणून मी माझ्या भागापुरते बोललो आणि इतर क्षेत्रांविषयीचे जाणून घ्यायची इच्छा व्यक्त केली. आपण आपले अनुभव लिहावेत ही विनंती.

In reply to by बाबा पाटील

सतिश गावडे Sun, 01/25/2015 - 17:02
डॉ. साहेब त्यांनी त्यांचा अनुभव लिहिला आहे. केवळ त्यांचा अनुभव तुमच्या अनुभवाशी मिळता जुळता नाही म्हणून लेखकाची आणि लेखाची "फेक" अशी संभावना करुन कशी चालेल? कोकणातील शेती आणि शेतकर्‍यांची मानसिकता या लेखातील वर्णनापेक्षा फार वेगळी नाही. आज जरी मी आयटीत असलो तरी मी वयाची पहिली बावीस वर्ष ते अनुभवलं आहे. आपला देश इतका अवाढव्य आहे, ऋतूमानात इतकी विविधता आहे की एका जागेचे किंवा हवामानाचे ठोकताळे दुसर्‍या ठिकाणी लागू होत नाही. सोत्रींच्या प्रयोगशीलतेच्या मुद्याबद्दल बोलायचे झाले तर वर्षानूवर्षे हात पोळणारी, हताश शेतकर्‍याचा जीव घेणारी प्रयोगशीलता काय कामाची?

In reply to by सतिश गावडे

खटपट्या Sun, 01/25/2015 - 22:44
काही लोकांना कोकणात शेतकरी आहेत हे सुद्धा माहीत नाही असे दीसतेय. महाराष्ट्रातील शेती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शेती असे एक समीकरण झाले आहे.

कंजूस Sun, 01/25/2015 - 11:45
सोत्रि आणि चेतन यांच्या प्रश्नांची उत्तरे मीही देऊ शकतो. प्रथम प्रयोगशील आणि पारंपारिक शेतीतला फरक जाणून घ्यावा लागतो. आता हे सगळं थोडक्यात पाच दहा ओळीत नाही सांगता येणार. केरळ, कर्नाटकचे अथवा जर्मनी, जपान, इस्राइलचे उदाहरण घेऊन लगेच इकडे तसे केले असं होत नाही याला बरीच कारणे आहेत. काही एकर ते फक्त वीस गुंठे जमीनीचा तुकडा असणाऱ्यांचे प्रश्न वेगळे असतात.

In reply to by कंजूस

सोत्रि Sun, 01/25/2015 - 11:50
प्रथम प्रयोगशील आणि पारंपारिक शेतीतला फरक जाणून घ्यावा लागतो
ह्यावर लिहा, प्लीज! मनापासून वाचायला आवडेल. ह्या विषयावर काहीही माहिती नसताना लेखाला 'चान चान' म्हणणार्‍यांनाही खरे काय ते कळावी ही इच्छा आहेच! - (प्रयोगशील) सोकाजी

In reply to by सोत्रि

कंजूस Sun, 01/25/2015 - 21:25
प्रगतिशील शेतकऱ्याकडे भांडवल, पाण्याची स्वत:ची व्यवस्था आणि रस्त्याकडे जाण्याचा मार्ग असणे गरजेचे आहे तर तो काही वेगळे पीक घेण्याचा विचार करू शकतो. हे शेतकरी बहुधा बाजारपद्धती चांगली अवगत असणारे असतात. कोणत्या वेळेस कोणत्या बाजारात काय विकायला आणायचे हे अचूकपणे करून भाव मिळवण्यात यशस्वी होतात. उदा लाल गुलाबाची फुले व्हलेंटाइन डेला आणणे. परंपरागत शेतीमध्ये सर्व गाव जे पीक लावेल ते घ्यावे लागते. पाणी पाटाचे अथवा विहिरीचे पाळीने मिळते. पंचक्रोशीतले पीक तयार झाल्यावरच गाडीवाट मिळते. अगदी बांधापर्यंत रान असते. बैलगाडी आतल्या शेतात नेता येत नाही. मिरची, वांगी वगैरे आठवड्याला तोडून बाहेर आणता येत नाही. पिकातलेच काही दाणे ठेवून पुढच्या वर्षीचे बियाणे होते. वेगळे महागडे वांझोटे बियाणे खरेदी करावे लागत नाही. धान्य कडधान्याच्या भावात फार चढ उतार होऊन नुकसान होत नाही. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. शिवाय धान्य उत्पादन टाळून सर्वच फुलशेती करू लागले तर काय होईल ? हे थोडेफार मुद्दे शेतीचे कार्यक्रम घरी कोचावर बसून पाहून लिहिले आहेत त्यामुळे चुका संभवतात.

ह्या विशयावर झी न्यूजवर सगुणा बागच्या मालकान्ची मुलाखत होती परवा. त्यानी भात शेती कमी खर्चात करण्याचे तन्त्र विकसीत केले आहे. तचेच इतर जोडधन्दे करुन उत्पन्न कसे वाढवले तेही चान्गले वाटले. ज्याना रस असेल त्यानी यूनळीवर बघावा.

आजवर किती प्रधानमंत्री आपल्या "जंबो डेलीगेशन" मधे शेतकरी प्रतिनिधि घेऊन गेलेत? नाही म्हणजे शेतकरी पोशिंदा वैग्रे वैग्रे सगळे सोडा! आपण असे धरून चालू की शेती हा एक व्यवसायच आहे! (आहेच!) पण मग किती शेतकरी प्रतिनिधि ह्या डेलीगेशन मधे नेले गेले? न नेल्यास का नाही? भारत कृषिप्रधानदेश आहे न ? मग? बरं अगदी व्हाईट हाउस च्या ऑफिसियल डिनर मधे मुंडासे हवे असा अट्टहास नाही पण कमीत कमी , डब्ल्यु टी ओ राउंड्स मधे तरी किती कास्तकार (शेतकरी) नेले जातात? एकंदरीत शेतकरी लोकांस इंटरनेशनल किंमत निर्धारण प्रक्रियेत ? ज्याला धंदा करायचा आहे त्यालाच बारगेनिंग मधे स्थान नाही मग हा व्यवसाय इतर व्यवसाया सोबत लेवल प्लेयिंग ग्राउंड वर आहे अन तमाम शेतकरी हे ऐतखाऊ आळशी असल्याचे बोलणे कितपत संयुक्तिक?? हे पेंगट ब्वा त्यांच्या जिल्ह्यातले सांगत आहेत! तिथल्या भौगोलिक परिस्थिति नुसार तेथील शेतकरी त्याची मानसिकता लाइफस्टाइल बेतलेली आहे ! जनारालायाझेशन न व्हावे ही मनापासून इच्छा!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दादा पेंगट Sun, 01/25/2015 - 14:33
आपले मुद्दे रास्तच आहेत. मी फक्त माझ्याच भागातले माझेच अनुभवकथन केले आहे हे स्पष्ट केले आहेच. जनरलायझेशन करण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक भागातला शेतकरी वेगळा असतो. डेलिगेशन, शेतकर्‍यांना प्रतिनिधित्व देण्याचे बोलाल तर मला वाटते की तुमचे पवार साहेब सुद्धा एका अर्थाने शेतकरीच आहेत.तुलनेत थोडे सधन शेतकरी आहेत, पण आहेत तर शेतकरीच. ते कृषिमंत्रीसुद्धा होते. आणि त्यांच्या हाती निर्णय अधिकार होतेच. म्हणजे यशस्वी व्यावसायिकाला प्रतिनिधित्व मिळतेच. शासन जेव्हा उद्योगपतींचे डेलिगेशन नेते तेव्हा कोपर्‍यातल्या पानठेलेवाल्याला किंवा गावातल्या बंदर छाप लाल दंतमंजन बनवणार्‍याला नेत नाही, तर मोठ्या, यशस्वी उद्योगपतींनाच नेते. तसाच प्रकार शेतीतही घडत असेल, काय माहीत? ह्याबद्दल अर्थातच जाणकार लोक जास्त योग्य माहिती देऊ शकतील.

अर्थातच! मी काही "यष्टी" भरुन शेतकरी न्या म्हणालो नाही!! पण अल्पभुधारक, कोरडवाहू शेती ची जाण , अनुभव अन अर्थकारण ह्याचे ज्ञान असलेला शेतकरी न्यायला काय हरकत आहे! ?? कोरडवाहू शेती चा अनुभव नसणे ह्या पाई पवार "आमचे" नाही!! (अर्थात ते कोणाचेच नाहीत) अन बाय शेतकरी आय मीन "प्रतिनिधी" ! नाहीतर परत म्हणाल गलाटा कायले न्याव!!!, बव्हंशी भारतीय शेती ही कोरडवाहू असल्याने हा प्रतिनिधी त्यांचा असावा! उगा डुबुक शेती करून गब्बर झालेला, पैनल ची कारखान्याची राजकारणे करून शेतकरी लोकांची बाजु घेतल्याचे भासवुन आपलीच पोळी शेकुन घेणारा कुठल्या संघटनेचा "नेता" "राजकारणी" "धरतीपुत्र" इत्यादी नसावेत! शेती वर कर नसल्याचा अति गैरफायदा घेणारे अन तदानुषंघाने बागायतदार ओलित धारी खादी धारी नक्कीच नसावेत!!! (बाणेदार वर्हाडी) बाप्या

राही Sun, 01/25/2015 - 15:12
विदर्भातल्या शेतकर्‍यांची किंबहुना सर्वसाधारण लोकांची मानसिकताच वेगळी आहे असे आम्हां प.महाराष्ट्र आणि मुंबईवाल्यांना जाणवत राहाते. एक तर भाषेवर हिंदीची छाप. मुंबईपेक्षा नागपूरचे आणि त्याहीपेक्षा हैद्राबादचे जास्त आकर्षण. चंद्रपूर-मूळ रोडचा खूपसा ट्रॅफिक हैद्राबादचा असतो. सीपी अँड बेरार म्हटले की मालगुजार आणि सरंजामदार लोकच डोळ्यांपुढे उभे राहातात. सेंट्रल प्रॉविन्शिअल मानसिकता. खंडांतर्गत भाग त्यामुळे वेगळे हवामान. मध्यप्रदेश,छत्तीसगढ, आन्ध्र यांच्याशी सीमा जुळलेल्या. उडीशाही फार दूर नाही.या सर्वांच्या वेगवेगळ्या प्रकृती झाडीपट्टीमध्ये दिसतात.गावांची नावेसुद्धा नागेपळ्ळी, ईटापळ्ळी अशी. शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा मूळचा आदिवासी कोअर भाग. आदिवासी हे जंगलाचे राजे. त्यांची मूल्ये, जगण्याचे नियम नागरी संस्कृतीपेक्षा अगदी वेगळे. आजची भूक भागली की झाले. उद्याची भ्रांत नाही आणि उद्यासाठी साठा करून ठेवायचा नाही.एका अर्थी ही आदिम मूल्ये चांगलीच. इथे अधाशीपणा, ग्रीड, हरबक याला स्थान नाही. खरे तर या वृत्ती म्हणजे नागरी संस्कृतीची 'देणगी'. पण काळाच्या ओघात कोणतीही संस्कृती शुद्ध स्वरूपात टिकत नाही. बदल आणि सरमिसळ अटळ असतात. तेच झाडीपट्टीत दिसते.

सस्नेह Sun, 01/25/2015 - 15:50
लेख आणि 'अल्लाल' दृष्टीकोन आवडला. दृष्टीकोन शेतीविषयी नसून जीवनातल्या वास्तवाविषयी आहे असे वाटते. तसेच सोत्री म्हणतात तसे प्रायोगिक किंवा व्यावसायिक शेती करूच नये किंवा वाईट असे काही लेखात लिहिलेले नाही. प्रायोगिक आणि व्यावसायिक शेतीबद्दल स्वानुभवाचे लेखन वाचणे, सोत्रींप्रमाणेच, आवडेल.

५० फक्त Sun, 01/25/2015 - 19:18
लेख, पैसातै आणि राहितै चे प्रतिसाद आवडले, एकंदर कर्ज काढुन सण करु नये तशीच कर्ज काढुन शेती करण्यापुर्वी हजारदा विचार करावा हे पटलं.

विवेकपटाईत Mon, 01/26/2015 - 17:16
लेख आवडला,काही मुद्दे निश्चित विचारणीय आहेत (मीही नौकरीची १५-१६ वर्षे कृषी भवन मध्ये व्यतीत केली आहे), तिथे ही अधिकार्यांना कित्येक गोष्टींची चिंता होती १. जमिनीतून पाणी काढून उस लावणे म्हणजे भविष्यात वाळवंट तैयार करणे. नागपूर जिल्ह्यातील काही भागात पाण्याची पातळी संत्र्याच्या शेतीमुळे १००-१५० पेक्षा ही खाली गेली आहे. भविष्यात पिण्याचे पाणी ही दुर्मिळ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत आहे. आणि कुणाला ही चिंता नाही. २. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून शेती करणे, काळाची गरज आहे. विदर्भात ही पारंपारिक शेती करणारा शेतकऱ्या वर आत्महत्येची पाळी येत नाही. . गोंदिया, भंडारा, गढचिरोळी या मागासलेल्या जिल्ह्यांत आत्महत्या कमी आहेत. दुसरी कडे अकोला, अमरावती, येवतमाळ, बुलढाणा या ठिकाणी जास्त. (BT जास्त जिम्मेदार)].

भारतात आय आय टी काढायची कल्पना नेहरूंची , अर्थात त्यावेळच्या शहरी मध्यमवर्ग तेथे शिकणार होता त्याबद्दल त्यांचे कौतुक , अगदी रशिया व अमेरिकेच्या सहाय्याने ह्या आय आय टी भारत भर बनल्या पण त्यावेळी ७० हून कदाचित जास्त भारतीय गावात राहणारे शेतीवर अवलंबून होते , त्यांच्या साठी जागतिक दर्जाचे कृषी महाविद्यालये देशभरात का झाली नाहीत , देशात हरित क्रांती एकाचवेळी का झाली नाही , कम्युनिस्ट लोकांना व समाजवादी लोकांना खाजगी उद्योग धंद्याचे वावडे होते पण शेतीत प्रगत व व्यवसायिक दृष्ट्या ह्या देशात शेतकऱ्यांना कशी करावी हे का त्यांना शिकवता आले नाही.

नाखु Tue, 01/27/2015 - 12:55
  • मी शेतकरी नाही.
  • मी शेतकरी नाही आणि शेतीही कसत्/करीत नाही
  • मी शहरातील नोकरदार असल्याने मी नक्की शेतकर्यांचा शोषणंकर्ता का पोषणकर्ता हेच अजून सिद्ध झाले नाही/सिद्ध केलेले नाही *SCRATCH*
  • शेतकर्यांनी स्वतःवर "प्रयोग्/अधांनुकरण" आणि पर्यायाने समाजावर "परंपरवादी अनुकरण" करावे का नाही हे समजण्याची "समज" मला आहे का नाही हेच मला समजले नाही. *UNKNOWN* :HZ: :hz:
  • सबब या सर्व परिस्थीतीत "निवांत बोलू (आयुष्यावर) नंतर काही " हेच फक्त अनुभवत आहे. *YES*
सातवी "फ" जीवन शिक्षण मंदीर ता:पारनेर जि.अहमदनगर

नरेंद्र गोळे Wed, 01/28/2015 - 10:00
गडे हो, पत्याची बात बोललात. प्रश्न पुसलेत. १. शेती का करायची? तर थोड्या वेळात उपजीविका साधून उरलेला वेळ काव्य-शास्त्र-विनोदात घालवून आनंदाने जीवन जगता यावे म्हणून. झाडीपट्टीत हे सहजच साधले जाते आहे. म्हणूनच तुम्ही 'ठेविले अनंते तसेच' म्हणजे आनंदात राहत आहात. कव्वालीचे मुकाबले करत आहात, हाडपाक्यात नाचत आहात, मारबती काढत आहात, रामलीला भरवत आहात. काय कमी आहे हो. सुख आहे. २. नगदी पिके कार्यक्षमतेने उत्पादित व्हावीत ह्या दृष्टीने तसे विशेष प्रयत्न होत आहेत का? खरे तर नाही! ३. मराठवाड्याने ऊसाचा स्वप्नातही विचार करू नये. नाहीतर कायमचे वाळवंट होईल तिकडे. >>> सत्यवचन! इतरही भागांत गरज नसता साखरपेरणी हवीच कशाला. ज्याची गरज आहे तेच पेरावे. ४. दादा, व्यवसायम करायला हवा आहे. बरे झाले तुम्हीच कान टोचलेत. मी तुमच्याशी सहमत आहे. मात्र तुम्ही म्हणता इथे अल्लाल शेती करतात. प्रत्यक्षात, गुटखा, गुडाखू, तमाखू, गुटका, मावा, खर्रा हेही खातात. मोहाची दारू पेतात. ह्यातले काय काय चांगले म्हणायचे हो? आत्महत्या करणारे आपले प्रश्न आपण सोडवोत. मात्र झाडीपट्टीतल्या लोकाईनी बी आजूबाजूच्या विकासाची दखल घ्यावी. थे लोक कुठ चाल्ले, आपुन कुठे!

In reply to by नरेंद्र गोळे

दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 13:09
प्रत्यक्षात, गुटखा, गुडाखू, तमाखू, गुटका, मावा, खर्रा हेही खातात. मोहाची दारू पेतात.
बरोबर आहे साहेब. मी बी ह्याचे समर्थन नाही करत. मोहाची दारू पेवाच्या बदली मोहाची राब खा, मोहाच्या फुलाची भाजी खा..
मात्र झाडीपट्टीतल्या लोकाईनी बी आजूबाजूच्या विकासाची दखल घ्यावी. थे लोक कुठ चाल्ले, आपुन कुठे!
विकासाबद्दल माहेवाले मत जरा अलग आहे. विकासाच्या मांगे लंगलंग फिरुन जर का रात्रिचि झोप उळत असल, शुद्ध हवा नाकात जात नसल तं का फायदा? माले वाट्टे का आपल्या गरजा पुर्‍या होत असतील, सुखशांतींनं राहानं जमतं असनं तं तेवळाच विकास पाहिजे. झाडिपट्टीचा थोडा विकास जरूरी आहे, पर झाडीपट्टी झाडीपट्टीच राह्यली पाह्यजे. तिचा पुणेमुंबई झाल्या नाही पाह्यजे.

प्रसन्न केसकर Wed, 01/28/2015 - 10:21
ठेविले अनंते... असे जगले तर धोके कमी होतात. म्हणून तसेच जगावे? कधी एकाच पिकाचे उत्पन्न सगल्यांचेच अमाप झाले तर? आलशिपना हा गुण की दुर्गुण?

In reply to by प्रसन्न केसकर

दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 13:12
ठेविले अनंते... असे जगले तर धोके कमी होतात. म्हणून तसेच जगावे?
तो इस में बुरा क्या है?
कधी एकाच पिकाचे उत्पन्न सगल्यांचेच अमाप झाले तर?
धान जास्त झाला तरी आम्ही ढोलीत जमा करून ठेवतो. पुढच्या वर्षी कामात येते. बाजारात नाही आणत त्या वर्षी.
आलशिपना हा गुण की दुर्गुण?
कधी गुण कधी दुर्गुण.

नक्शत्त्रा Wed, 01/28/2015 - 14:16
वाचत आहे । लेख आणि लेखावारचे प्रतिसाद पण चांगले आणि विचार करायला लावणारे आहेत पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून ती सर्व शेतकर्यान पर्यंत पोहचली तर काह्रेच खूप कुटुंबांची वाताहत थांबेल

In reply to by पैसा

विलासराव Wed, 01/28/2015 - 20:12
माहीत नाही. नवीनच लाँच केलीय फडणवीस सरकारने. मंत्रालयातील काही तक्रारीही करु शकता. प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला तरी वाटते काही उपयोग होईल.

विटेकर गुरुवार, 01/29/2015 - 13:01
लेख आवड्ला पण त्याही पेक्षा त्यामागची भूमिका आवडली. वरती कुणीतरी म्ह्टळे आहे की हे सारे खरे तर फक्त शेतीलाच नव्हे तर संपूर्ण जगण्याला लागू होते. मुटेंच्या धग्यावर प्रतिक्रिया देताना मीलिहले होते की , आत्माह्त्या का होतात त्याच्या पाठी मागची मान्सिकता ध्यानी घ्यायला हवी. ती परिस्थिती सापेक्श नसते, पूर्वी शेतीत नुकसान होत नव्हते का ? दुष्काळ / अतिवृष्टी नव्हती का ?लोक आत्महत्या का करत नव्हते ?? त्याचे उत्तर मनोवृत्तीत आहे. अधिकाधिक मिळवण्याची हाव हे त्या पाठीमागचे कारण आहे. अधिक परतावा मिळावा म्ह्नून अधिक धोका पत्करणे आणि धोका झाल्यावर सरकारच्या नावाने खडे फोडणे / आत्महत्या झाल्यावर त्याचेही भांड्वल करणे ही ती वृत्ती आहे.

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 01/29/2015 - 13:13
माझ्या मते हे पेंगट ब्वा, सरकार ने ह्यावर केलेला "शेतकरी बन्धुंसाठी आर्ट ऑफ़ लिविंग कोर्स" ह्या अस्सल इलाजाच्या समर्थानात असावेत!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दादा पेंगट गुरुवार, 01/29/2015 - 13:17
मला ह्या 'आर्त ऑफ लिविंग' बद्दल काही माहीत नाही बापु. पण जर का ह्याच्याने शेतकरी आत्महत्या करणार नसेल आणि व्यवस्थित शेती करू शकत असेल तर माझे समर्थन असणार.

पुष्करिणी Sun, 02/01/2015 - 23:25
कोर्सेरा वर एक नविन कोर्स सुरू होतोय - https://www.coursera.org/course/postharvestloss जे शेती करतात किंवा ज्यांना शेती या विषयात रस आहे त्यांनी जरून 'Global Postharvest Loss Prevention: Fundamentals, Technologies, and Actors' या कोर्सला एन्रोल करा, कोर्स फ्री आहे.