मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सत्याचा जय...

डॉ सुहास म्हात्रे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वपिठिका: नुकतेच मिपावरच्या एका धाग्यावरच्या डॉ सुबोध खरे यांच्या प्रतिसादात खालील वाक्य वाचले... शेवटी काय माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. या वाक्यात सांगीतलेल्या शंभर नंबरी सत्याविरुद्ध समाजात काही वेळेस जाणीवपूर्वक तर इतर काही वेळेस अजाणतेपणाने विचार पसरवला जात असतो आणि त्यामुळे समाजावर किती अनिष्ट परिणाम होतो याबद्दल लिहायचे बरेच दिवस मनात होतेच. पण, डॉ खरेंच्या प्रतिसादाने हातातले काम बाजूला ठेऊन आजच त्यावर खालील विचार लिहायला भाग पाडले, याबद्दल त्यांचे खास धन्यवाद ! ============================================ "नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो."; "गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते."; "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" वगैरे, वगैरे, वगैरे... अशी काल्पनिक, फसवी आणि भोंदू विधाने सर्वसामान्य माणसातल्या भोळसट कवीमनाला भुरळ घालतात. डोळे उघडे ठेवून आजूबाजूला पाहिले तर त्यातला फोलपणा दिसायला फार वेळ लागत नाही. दुर्दैवाने भावनेच्या पुरात वाहून जाणार्‍या माणसाला सर्वसाधारणपणे डोळे उघडे ठेऊन बघणे जरासे कठीणच जाते. सर्वात वाईट गोष्ट ही की बर्‍याच वेळेस अशी विधाने आपले अपयश झाकण्यासाठी एक उत्तम पळवाट म्हणून सोईची वाटतात... अश्या फसव्या फुंकरीने मूळ आजारावर (अपयश) उपाय तर होत नाहीच पण तो अधिकच बळावतो (यशासाठी प्रयत्न करण्याऐवजी अपयशाचे समर्थन करून स्वतःचेच मानसिक खच्चिकरण करण्याची वृत्ती बळावते). जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम परखडपणे सत्याला सामोरे जायची (ब्रूटल ऑनेस्टी) आणि वस्तूस्थितीकडे डोळे उघडे ठेऊन बघण्याची (लॉजिकल थिंकिंग) सवय अंगीकारली पाहिजे. मग त्यावरून झालेल्या बोधाने जो निर्णय पटेल तो ज्याचा त्याने घ्यावा... मात्र जर चुकीचा निर्णय घेतला तर त्याच्या परिणामांची तयारी ठेवावी... त्या परिणामांची जबाबदारी झटकून टाकायला काल्पनिक समजूतींचा आधार घ्यायची घातक सवय सोडून देणे आवश्यक आहे. कोणीतरी म्हटले आहेच ना की, "यश म्हणजे अपयशाचा अभाव नाही तर अपयशातून उठून, अंग झटकून, परिस्थितीचा सामना करून तिच्यावर विजय मिळवणे आहे." म्हणूनच सुरुवातीला दिलेल्या किंवा तत्सम फसव्या वाक्यांऐवजी खालील परखड सत्य स्विकारल्यास "मानसिक खरेपणा" आणि "ऐहीक यश" या दोन्हींची शक्य तेवढी "नैतीक सांगड" घालणे शक्य होईल: १. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो. नेहमी सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतोच असे नाही. परिश्रम घेतल्याविना असे काही झाल्यास तो योगायोग समजावा. याचा अर्थ विजयासाठी असत्याने वागायला पाहिजे असा अजिबात नाही तर असत्याचा पराभव करण्यासाठी लागणारी अक्कलहुशारी आणि ताकद बाळगणे जरूर आहे असा आहे. सितेला पळवून नेल्यावर पश्चाताप झाला म्हणून रावणाने तिला सन्मानाने परत पाठवले नव्हते. रामाला रावणाबरोबरचे युध्द जिंकूनच सत्याचा विजय सिद्ध करावा लागला होता. २. गरिबीची भाकरी श्रीमंतीच्या लाडूपेक्षा गोड असते. हा चलाख श्रीमंतांनी गरीबाला कायम गरीब ठेवण्यासाठी आणि त्याच्या जीवावर स्वतः कायम श्रीमंत राहण्यासाठी पसरवलेली खोटी कल्पना आहे. या खोडलेल्या विधानाचा मानसिक सुखांशी ओढून ताणून संबंध लाउन (वडाची साल पिंपळाला लाउन) आर्थिक अपयशाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला जातो. सत्य हे आहे की लाडू हा नेहमीच भाकरीपेक्षा गोड असतो आणि श्रीमंती ही नेहमीच गरिबीपेक्षा जास्त सुखकारक जीवन शक्य करते. मात्र ऐहीक सुख समाधानकारक पद्धतीने भोगण्यासाठी, "जर तो पैसा सरळ मार्गाने मिळवलेला असला तर" खूप मदत होते. पैशाबद्दल सत्य असे आहे की त्याला ऋण/नकारार्थी (negative) मुल्य आहे. म्हणजे थोडक्यात असे "तो नसला तर नक्कीच दु:खदायक असतो, पण असला तर सुखदायक होईलच असे नाही." मात्र पैसा योग्य मार्गाने मिळवलेला असला तर त्याचे फायदे उपभोगताना न्युनगंड / पकडले जाण्याच्या भितीचा अभाव तरी नक्की राहील. ३. लुळीपांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी. हे एक भंपक विधान आहे. लुळेपांगळेपणा-धडधाकटपणा आणि श्रीमंती-गरिबी यांचा अर्थाअर्थी अथवा सरळ-सरळ काहीच संबंध नाही. सत्य हे आहे की, या जगात अनेक लुळेपांगळे गरीब आहेत आणि धडधाकट श्रीमंत आहेत. शिवाय अनेक पंगु श्रीमंत त्याच्या श्रीमंतीमुळे उत्तम/बरे जीवन जगत आहेत आणि त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रमाणात असलेले धडधाकट गरीब हालाखीचे जीवन जगत आहेत. वैध मार्गाने कमावलेली सधनता तुम्हाला अश्या अनेक सुखकारक गोष्टी मिळवून देऊ शकते, ज्यांची गरीब स्वप्नेही बघू शकत नाही. ४. "लबाडी केल्याशिवाय धन अथवा यश मिळत नाही" हे सुद्धा वरच्या भोंदू वाक्यांइतकेच... किंबहुना त्यांच्यापेक्षा जरा जास्तच... भोंदू वाक्य आहे. जगात असत्य, अनिती वगैरेचा मार्ग पकडून धन आणि यश कमावणारे अनेक लोक आहेत पण त्याबरोबरच सत्य आणि नीतिच्या मार्गावर चालून सधन आणि यशस्वी झालेले लोकही कमी नाहीत. मात्र आपण दुसर्‍याची परिस्थिती पडताळून पाहत असताना वापरलेले सधनतेचे आणि यशाचे निकष आपले नसून त्या व्यक्तीचे असायला हवे; स्वतःबद्दल पडताळणी करायची असेल तेव्हाच स्वतःचे निकष वापरणे योग्य होईल; इतके तारतम्य ठेवणे जरूर आहे. कारण सधनतेची आणि यशाची व्याख्या माणसागणीक वेगळी असू शकते. वर केवळ चारच वाक्ये उदाहरणाखातर दिली आहेत. जरा आजूबाजूला पाहिले तर अशी अनेक भंपक वाक्ये "चलाख लोक स्वत:च्या फायद्यासाठी" किंवा "स्वघोषित विचारवंत चार टाळ्या कमवायला" वापरताना दिसतील. या आणि अश्या इतर वाक्यांना केवळ निरर्थक अथवा फोल म्हणून सोडण्यात अर्थ नाही. सक्रिय प्रयत्नांनी त्यांना कचर्‍याचा डबा दाखवणे आवश्यक आहे... कारण अपयश मागे सारून सतत स्वतःच्या बळावर प्रामाणिक प्रयत्न करून सधन व सुखी होण्याचा प्रयत्न करायला उत्साहीत करण्याऐवजी अशी वाक्ये अपयशाचे भ्रामक समर्थन करत समाजाला पंगू करण्याचे काम करत असतात... सशक्त, विचारी आणि शहाणा समाज बनण्याच्या वाटेत अश्या अंधश्रद्धा फार मोठा अडथळा बनून उभ्या आहेत.

वाचने 55827 वाचनखूण प्रतिक्रिया 218

In reply to by विटेकर

कानडाऊ योगेशु Sat, 09/13/2014 - 22:53
तसेही मास्तरांचे लेख क्रिप्टीकच असतात. ज्याला त्याला त्याच्या बकुबानुसार वेगवेगळे ( भलतेसलते) अर्थ लागु शकतात.

In reply to by नगरीनिरंजन

प्रामाणिकपणे श्रीमंत होण्यात काय हरकत आहे ? आणि संभ्रमीत वाक्याच्या मागे लागून गरीब राहण्यात काय अर्थ आहे ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

नगरीनिरंजन Tue, 09/09/2014 - 18:40
प्रामाणिकपणे श्रीमंत व्हायला हरकत नाही आणि बहुसंख्य माणसे प्रामाणिकपणेच श्रीमंत होतात म्हणूनच प्रमोशन कथेवर कै च्या कै असा प्रतिसाद दिला होता.

विटेकर Tue, 09/09/2014 - 09:20
आता पुन्हा सगळे नव्याने सुरु ! १. सुख म्हणजे काय ? २. यशस्वी कोणाला म्हणावे ? ते कशात मोजावे ? ३. श्रीमन्ती म्हणजे काय ? श्रीमन्त कोणाला म्हणावे ? ४. समाधान कशाला म्हणावे ? ५. प्रामाणिक कोणाला म्हणावे ? ६. चारित्र्य म्हणजे काय ? ७. सत्य कशाला म्हणावे ? का ? ८.सत्य एकच आहे की अनेक ? ९. लोक "जीत " केव्हा "पावतात" ? का ? पुरे की अजून काही ? एकदा प्रश्न निश्चित झाले की मण्थन सुरु करु. कसे ? ६. चारित्र्य म्हणजे काय ? ७.

In reply to by संजय क्षीरसागर

खालचे तुमचे स्वतःचे प्रतिसाद वाचा: ====== http://www.misalpav.com/comment/607891#comment-607891 प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरुवात करावी संजय क्षीरसागर - Tue, 02/09/2014 - 07:22 त्यापेक्षा स्वतःपासून करावी! देव पाठीशी आहे तो सर्व संकटातून तारून नेईल वगैरे वगैरे भ्रामक विचारसरणीतून मुक्त व्हावे. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या दोन गोष्टींना पर्याय नाही असा वस्तुनिष्ठ दृष्टीकोन राखावा. ====================== http://www.misalpav.com/comment/608713#comment-608713 लाखमोलाची गोष्ट बोललात! संजय क्षीरसागर - Thu, 04/09/2014 - 07:46 माणूस चांगला असणे आणी आयुष्यात यशस्वी होणे या दोन गोष्टींचा परस्पर संबंध नाही. आणी या गोष्टींची भरपूर उदाहरणे आपल्या आजूबाजूला दिसत राहतात. ===================== इतर विचारी माणसांच्या ध्यानात यातल्या "विचारांची गल्लत" घ्यानात येईलच. तुम्ही ते ध्यानात येण्यापलिकडे गेला आहात हे दिसत आहेच. एक प्रतिसाद लिहून झाला की तो विसरून जाऊन नविन अगदी विरुद्ध प्रतिसाद लिहीणे हे तुमचे सम्यक लक्षण दाखवणारी अनेक उदाहरणे मिपावर विख्रून पडलेली आहेत. ती एकत्र लिहीणे काही कठीण नाही. पण तरीही ती उदाहरणे पाहून तुम्हाला "सोईस्कर अंधत्व" येऊन ते लिखाण न दिसता भलतेच काही "दिसू" लागेल आणि त्याबाबत भरपूर नविन असंबद्ध लिहाल याची खात्री आहेच्च ! भाग २ चे उत्तर लिहीणे विसरणे हे पण त्यातलेच ! शिवाय जसजश्या स्वतःच्या चुका लपविणे अशक्य होत जाते तसतसा भाषेवरचा ताबा सुटत जातो हे ही नविन नाही (आता "आत्मज्ञान झाल्याचा दावा करण्यार्‍याला हे शोभत नाही"... पण असो !) तेव्हा, ह्या "खुदके मनके साथ बातां" करत "जितं मया" म्हणणे चालू ठेवा (आम्ही कोण सांगणार ? तुम्ही चालू ठेवणारच म्हणा) ! ज्याने सगळ्या जगाला शहाणे करून सोडावे असा महात्मा असल्याचा भ्रम आम्हाला तरी झालेला नाही. मी पुरेसा प्रयत्न केला हे समाधान घेऊन तुम्हाला तुमच्याच भरवशावर सोडतो आहे ! सांभाळून रहा !! शुभेच्छा !!! :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हाडक्या Tue, 09/09/2014 - 16:18
@संजय क्षीरसागर/ ई. एक्काजी, एक प्रश्न - (संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा) (तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!) ;) (ह.घ्या. हे.वे.सां.न.ल )

In reply to by हाडक्या

विटेकर Tue, 09/09/2014 - 17:34
हाडक्याजी, (तुम्ही विवाहीत असल्यास ) तुमच्या घरी वाद-विवाद नक्की कोण जिंकतं ? ( घरी विचारून प्रश्नाचे उत्तर दिलेत तरी चालेल!) या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ? (संपादकांना अयोग्य वाटल्यास खुशाल उडवून टाकावा) संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...

In reply to by विटेकर

हाडक्या Tue, 09/09/2014 - 19:21
हा हा हा..
या तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरुन तुम्ही विवाहीत नाही हे सिद्ध होते आहे की हा प्रश्न घरी विचारुनच टाकलाय ?
या प्रश्नाचे उत्तर आम्ही राखून ठेवतो.. ;)
संपादकांना कांए नसतात असे तुम्हाला का वाटते ? ते काय हातात कात्री घेऊन बसलेत का ? असा त्रास देऊ नये संपादकाना ...
आमच्या (अशाही दुर्मिळ) अशा प्रतिसादांना बर्‍याचदा आधीच कात्री लागल्याचा अनुभव आहे. म्हणून आधीच आमच्या मनाची तयारी म्हणून ते वाक्य. बाकी जर होऊ दे खर्च, मिपा आहे घरचं, तर मग त्रास तर देणारच.! (बाकी इतर उपद्रवी लोकांच्या मानाने आम्ही तसे खिजगिणतीतही नसणार याची कल्पना आहेच तरी पण..) ;) असो, तरी आमच्या प्रश्न क्र. १ चे उत्तर अजूनही सन्मानीय आय्डींनी दिलेले नाही याची नोंद घेतलेली आहे आणि काय ते समजून पण घेतलेले आहे हो .. :D

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

माझा प्रतिसाद इतका स्पष्ट आहे की तो लेखनातला गोंधळ दाखवतो. `जिंकले ते सत्य' या भ्रामक विचारातला बाळबोधपणा उघड करतो. त्याविषयी वरच्या प्रतिसादात उत्तरच नाही! शिवाय उधृत केलेल्या माझ्या प्रतिसादात कुठेही विरोधाभास नाही. आणि त्या वाक्यांचा माझ्या उपरोल्लेखित प्रतिसादाशी किंवा लेखाशी काडीमात्र संबंध नाही.

In reply to by कवितानागेश

मदनबाण Tue, 09/09/2014 - 15:54
मूळ विषय काय होता? आठवी ते दहावी शंभर मार्कांचं संस्कृत :P

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- राजधानी.. गुंडगिरीची!

कवितानागेश Tue, 09/09/2014 - 16:20
थोडसं श्रीमंतीबद्दल.. "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी."; याचा मी पाहिलेला अर्थ असा आहे की सुखासीन आणी परावलम्बी श्रीमंतीपेक्षा कणखर, स्वावलम्बी गरिबी बरी. अगदी जवळच्या ओळखीतलं हे उदाहरण आहे, की घरातली मुले १० वर्षाची होईपर्यंत आपले बूट आपली आपण काढत, घालत नसत. घरातली २४ तासाची नोकर असलेली बाई ते करायची. शिक्षणासाठी प्रत्येक विषयासाठी घरीच वेगले शिक्षक यायचे. पण शिक्षण झाल्यावर जेंव्हा नोकरीसाथी बाहेर रहायची वेळ आली तेन्व्हा अत्यंत रडवेल्या स्वरात त्यातला एक मुलगा तक्रार करत होता, की बाहेर जेवायचे हाल होतात, वाढायलापण कुणी नसतं. आपल्या हातानी घ्यावं लागतं..(?) उच्च शिक्षण घेणं कठीण झालं कारण त्यातही 'स्पून फीडिन्ग'ची सवय होती. ज्या वयात ही मुले आपले आपन आपल्य हातानी जेवायला शिकत होती, त्याच वयात आम्ही (तुलनात्मक्रित्या गरीब मुलं) मुंबईतल्या मुंबईत हाफ तिकिट काढून बसेस बदलून सुखरुप सगळीकडे पोचत होतो आणि तसेच घरी परत येत होतो. शिवाय ट्य्शन्साठी पैसे आणि आभ्यास घेण्यासाठी पालकांकडे वेळही नव्हता. त्यामुले आपलीच अक्कल वापरायची सवय लागली. त्यामुळे जी काही तथाकथित कमतरता होती, तिचा आव्हानासारखा उपयोग होउन, आपलीच लायकी वाढवायला उपयोग झाला. अशा वेळेस "लुळ्यापांगळ्या श्रीमंतीपेक्षा धडधाकट गरिबी बरी." हे बरोबरही ठरु शकतं. अर्थात, कायम गरीबच रहावं असा त्याचा अर्थ नाही. पण आपल्याकडे असलेली कमतरता (ती आपोआप आलेली असो, अथवा कर्मभोगामुळे) लक्षात घेउन तरीही पायाखालची जमीन सरकु न देण्यासाठी अशी 'सान्त्वनापर वाक्ये' उपयोगी पडतातच. अर्थात याचा उपयोग तात्पुरता अशक्तपणा घालवायला सलाईन देणे, किंवा तातपुरती शान्त झोप लागायला ट्रॅन्क्विलायझर देणे, इतकाच असू शकतो. त्यावर आयुष्यभर अवलम्बून रहाता येत नाही. पण एक क्षण उसंत घेण्यासाठी, धीर येण्यासाठी आणि पुन्हा लढायला उभं रहाण्यासाठी तरी, 'होतं ते बर्‍यासाठी', 'यातून धडा घे', 'कर्मभोग फिटले म्हण, आणि कामाला लाग', असे शिकण्यासाठी तरी 'नेहमीच सत्याचा जय आणि असत्याचा पराजय होतो' वगरै वाक्य महत्त्वाची ठरतात.

In reply to by कवितानागेश

प्रभाकर पेठकर Tue, 09/09/2014 - 16:26
सुंदर प्रतिसाद. माझही तेच मत आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य महत्त्वाचे. ते न बिघडविता श्रीमंत व्हावे. पण श्रीमंत नाही होता आले म्हणून वाईट वाटून घेऊ नये, आरोग्य जास्त महत्वाचे आहे ते तुमच्याजवळ राहणारच आहे.

In reply to by कवितानागेश

स्पा Tue, 09/09/2014 - 16:37
ह्येच बोलतो अर्थाचा विपर्यास करून कै च्या कै लेख लिहिलेला वाटला असो

In reply to by स्पा

एका वाक्यात सारांश! आणि विपर्यास होण्याचं कारण म्हणजे जेते इतिहास लिहीतात ही गोष्टच लक्षात घेतली नाही! त्यामुळे `जे जिंकले ते प्रामाणिक' असं ठरवून, (सत्याचा) संघर्षाशिवाय विजय नाही हा निष्कर्ष काढला. ती चूक लक्षात आणून दिल्यावर मला विचारलेला पहिला प्रश्न संपला! मग `तुम्हाला इतके प्रतिसाद का द्यावे लागतात?' या प्रश्नाचं उत्तर द्या असा घोषा लावला. आणि त्यावरनं काय सिद्ध करायचं तर `सत्याचा आपोआप विजय होत नाही!' (संपादित)

In reply to by कवितानागेश

प्रसाद१९७१ Tue, 09/09/2014 - 19:06
@माऊ ताई - तुम्ही दिलेल्या उदाहरणाच्या अगदी उलटी उदा बघण्यात आली आहेत. ८० च्या दशकात इंपाला सारखी गाडी घरात आणि नोकरचाकर असताना अजिबात न बिघडलेली आणि आयुष्यात भरपुर कष्ट केलेली ( ते कष्ट भाकरी मिळवण्यासाठी नव्हते, २-४ कोटीची गाडी मिळवण्यासाठी असतील ) २ व्यक्तीमत्व बघितली आहेत. या उलट गरीब मुले सुद्धा थोडे पैसे आल्यावर माजलेली आणि गर्भश्रीमंताचा आव आणणारी बघितली आहेत. तो त्या त्या माणसाचा गुणधर्म.

In reply to by प्रसाद१९७१

कवितानागेश Tue, 09/09/2014 - 19:18
होय. तशीही उदाहरणं पाहण्यात आहेत. पण मूळात आपल्यातली कमतरता ओळखून त्यातून मार्ग काढावा का? आणि कसा काय काढता येइल? याबद्दल चर्चा सुरु आहे. काही श्रीमन्त लोक त्यांच्यापेक्षा श्रीमन्तांकडे बघून पुढे जायचा मार्ग काढतात. काही लोक आहे त्यात 'गर्भश्रीमंताचा आव' आणतात. किंवा क्वचित 'समाधानी' असल्याचे नाटक करतात. पण ते स्वत्;ला फसवणं आहे हे ओळखत नाहीत..... त्याबद्दलच मूळ चर्चा आहे. :)

विटेकर Tue, 09/09/2014 - 17:49
नवीन आलेले प्रतिसाद " नवीन " असे लाल लेबल लावून का दिसत नाहीत या धाग्यावर ? संबन्धित अधिकारी इकडे लक्ष देतील काय ?

काउबॉय गुरुवार, 09/11/2014 - 22:25
48 laws of Power रोंबर्ट ग्रीन Marathi अनुवाद सत्ता Shailaja madam वाचा सगळी हरामखोरी काउन्टर हरामखोरी नो फिलोसोफी प्रैक्टिकल ओनली कोळुन प्याल

In reply to by बॅटमॅन

वा, वा ! अनेकांच्या धाग्याला पंख लावण्याच्या अनेक मोहिमांनंतर आणि संमंच्या अनेकदा अनेक प्रतिसाद उडविण्याच्या/इकडून तिकडे नेण्याच्या अथक प्रयत्नांनंतरही धाग्याने व्दिशतक गाठले, हे पाहून ग्लब्लून आले ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Mon, 09/15/2014 - 18:51
द्विशतकी धाग्याबद्दल अभिनंदन! काही विशिष्ट विषय मिपावर काढले की "शतक-द्विशतक होणार 'निछ्छित'" या सत्याचा मात्र नेहमीच जय होतो बरे का ;)

In reply to by पैसा

विलासराव Mon, 09/15/2014 - 22:47
एक्का हातात ठेवा, आणि छेक्के पंजे टाकून द्या. हे अर्धसत्य आहे . पुर्ण सत्य हवे असेल तर शेवटी का होईना एक्काही टाकावाच लागेल.

अर्धवटराव गुरुवार, 09/18/2014 - 02:07
सत्याचा विजय काय, प्रामाणिकपणाचं आध्यात्म काय, त्यातच नितीमत्ता थयमान घालतेय... ओहोहोहो. विजय ना सत्याचा होतो ना असत्याचा... विजय/पराजय होतो सामर्थ्याचा. हे सत्य-असत्य मंडळी उगाच मधेमधे लुडबुड करतात ;) पण एक आपल्याला पटतं हां... अंतीम विजय सत्याचाच होतो असं का म्हटल्या जातं? आपापलं सामर्थ्य घेऊन सत्य-असत्य दोघेही आमने सामने येतात. पण सत्य असत्याच्या एक पाऊल पुढे असतं. असत्याचा आधारच मुळी सत्याचा नकार असतो. सत्य इन फर्स्ट प्लेस येतें आणि मग त्याला नाकारणारणं असत्य. त्यामुळे निर्णायक क्षणी सत्याला फायनल घाव घालायची संधी मिळते व युद्ध तात्पुरतं संपतं. अवांतरः सत्य, असत्य, विजय, पराजय, प्रामाणीक/अप्रामणिकपणा, मनाची एकसंघता वगैरे हे सर्व मनाचे खेळ आहेत. त्यापलिकडे काहि नाहि. अति अवांतरः अंमळ उशीरच झाला धागा उघडायला (एका अत्यंत आदरणीय मिपावृंदाने हा धागा अवश्य चाळायचा सल्ला दिला त्याबद्दल आभारी आहे :) ) . तिकडे तो रामायण धागा रिड ओन्ली झाला त्यामुळे टंकनश्रम वाचल्याची प्रामाणीक हळहळ वाटली :( पण त्या धाग्यात इतक्या वेळा "राम" वाचायला मिळाल्यामुळे धागाकर्त्याचे आणि प्रतिसादकांचे आभार मानावे तेव्हढे कमिच. रामरायाला किती चिंता आमची. येन केन प्रकारेण रामनामाचे घास भरवतोच :)

प्यारे१ गुरुवार, 09/18/2014 - 13:41
काय ठरलं शेवटी? सत्या २०१४ अ‍ॅवॉर्ड कुणाला देणार शेवटी (म्हणजे २०१५ मध्ये ) -हा धागा २०१५ पर्यंत चालेलच अशी 'खात्री' असलेला :)