मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता !!!

निमिष सोनार · · काथ्याकूट
"सून-मुलगा अति नालायक आणि वाईट असतात पण आई-वडील-नणंद-जावई ही माणसे देवापेक्षाही श्रेष्ठ आणि आदर्श माणसं असतात" असा संदेश देणारे मराठी चित्रपट बंद होत आहेत आणि मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक प्रगल्भ होत आहेत असे मला वाटायला लागले असतांनाच मध्यंतरी एक "स्वातंत्र्याची ऐशी तैशी" हा चित्रपट आला आणि वाटलं की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहाणार म्हणजेच मराठी चित्रपट हे सून-मुलगा द्वेष्टेच राहाणार!! असे हे चित्रपट नाण्याच्या केवळ एकाच बाजू साठी बनवले जाणारे चित्रपट असतात. नाण्याला दुसरी बाजू असते हेच मुळी त्यांना मान्य नसतं. हे कमी पडले की काय म्हणून बहुतांश मराठी सिरीयल सुद्धा रोज रोज हेच दळण दळत असतात. मराठी निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांना पक्के माहिती आहे की, मराठी चित्रपट (बक्कळ पैसा मिळवून देणाऱ्या मल्टीप्लेक्स सह) चालण्याचे एकमेव हक्काचे ठीकाण आहे पुणे आणि पुणे येथे पेन्शनर वृद्ध वयस्कर मंडळी जास्त राहातात. मग त्यांच्या मनाला कॅश करुया. मग असे चित्रपट काढतात. पैसे कमावतात. तरूण मंडळी इमाने इतबारे आपल्या आई वडीलांची सेवा करतात. यात वाद नाही. आदर्शपणाने नव्हे तर प्रॅक्टीकली! शक्य होईल तसे ते आई-वडीलांची हौस मौज करतच असतात, गरजा पुरवतच असतात. कोणतेच आई वडील सुद्धा आपल्या मुलांना आदर्शपणे वाढवत नाहीत. तेही प्रॅक्टीकली विचार करूनच शक्य तेवढे शिक्षणच मुलांना देतात. शक्य तेवढे ते मुलांसाठी करतात. स्वतःसाठी काही राखून! बरोबर? त्याचबरोबर मग इच्छा मारून मुलेही न आवडणारे शिक्षण आई- वडिलांच्या दबावाखाली किंवा इच्छेखातर पूर्ण करतातच की! मुले आयुष्यभर आई-वडीलांखातर, त्यांचे पांग फेडण्याखातर स्वत:च्या अनेक स्वप्नांवर आणि छंदांवर पाणी सोडतातच !! मग हेच आई वडील एकदा का वृध्द झाले की अचानक मुलांकडून आदर्शवादी अपेक्षा करतात.का तर ते फक्त "वृद्ध" आहेत म्हणून? मुलाला लहानपणी अभ्यासासाठी स्वतंत्र खोली सुद्धा न देऊ शकणारे आईवडील मुलगा नौकरीला लागताच शहरामध्ये त्याचेकडून २/3 BHK flat ची अपेक्षा करायला लागतात. हेच नाही तर लहान बहिणीचे/भावाचे ही सगळे मोठ्या मुलाने करावे असा आग्रह धरला जातो. हा मुद्दा मराठी चित्रपट का मांडत नाहीत ??? आजकाल गळेकापू स्पर्धेमुळे पुर्वीच्या पिढी पेक्षा तरुण मंडळींना दुप्पट तिप्पट संघर्ष करावा लागतोय हे लक्षात न घेता फक्त विविध प्रकारचा अपेक्षा ते करताच असतात. आणि या विरोधात मुलगा काही जरी बोलला तरी त्याचे खापर सुनेवर फोडले जाते. याच ठिकाणी त्याच आई- वडिलांचा जावई जर मुलीचे ऐकत असेल तर याच आई वडिलाना आपला जावई आपल्या मुलीच्या मुठीत आहे हे ऐकून कोण आनंद होतो आणि चित्रपटात हा मुद्दा कधीच विचारात घेतला जात नाही. त्या वेळेस मात्र जावयाचे आई वडील खडूस आहेत, आमच्या मुलीचा काही दोष नाही असा प्रचार केला जातो. लक्षात आला का विरोधाभास? हा मुद्दा चित्रपटात ठळकपणे दाखवला पाहिजे. त्यात मग अशा सिनेमांमुळे तरुणांची गळचेपी, मुस्कटदाबी होते. काही घरांमध्ये असे आदर्शवादी आणि मुलगा-सून द्वेष्टे मराठी चित्रपट बघण्यासाठी "मुला-सूनेवर" दबाव टाकला जातो आणि टोमणे मारले जातात हे सत्य आहे. सगळीकडेच नसेल पण हे आहे. "पहा पहा कशा एकेक सुना असता बाई!!" "पहा तीने सासूचे पाय दाबायला नकार दिला?! एकदा सुलोचना दिदी म्हणाल्या होत्या की, प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत. पण, निर्माते-लेखक-दिग्दर्शक यांचेकडे असल्या "आगलाव्या" चित्रपटांशिवाय दुसरे काही दाखवायला नसेल तर माझ्यासारखे असंख्य त्रस्त प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवतीलच. हे विषय सोडले तर मराठी चित्रपटांचा दर्जा उत्तम असतो यात वादच नाही. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे कोणताच मुलगा-सून टोकाचे वाईट नसतातच. बहुतेक सासवा सुद्धा तश्या नसतात. मात्र हुंड्यासाठी सुनेला जाळून मारणाऱ्या सासवा आजही आहेत. त्यांना कायदेशीर पणे अटकही होते असे दाखवणारे चित्रपट का बनवत नाहीत? अशा सासवा म्हणजे खुनीच की. पुरुष एक खून केला की तुरुंगात खितपत पडतो. मात्र घराघरातींल अशा "जाळकुट्या" आणि अखंडपणे शब्दांनी सुनेला छळत रहाणार्या "दहशतवादी" बायकांचे काय करायचे?? त्याना कोण अटक करणार?? त्यांच्यावर चित्रपट कधी निघणार?? चित्रपटात त्याना अटक होते आहे फाशी होते आहे असे कधी दाखवणार? जेणेकरून अशा प्रवृत्तीला आळा बसेल!! याच सासवा स्वत:च्या मुलीच्या आणि जावयांच्या चुकांवर मात्र जाडजूड चादर पांघरतात आणि सुनेची छोट्यात छोटी चूक मोठ्ठी करुन सगळीकडे सांगितली जाते, याला काय म्हणावे? सासू-सून वाद हे पिढीततले अंतर असल्याने आहे, हे एकवेळ समजू शकते, पण एकाच वयाचे, एकाच काळातले असूनही सून-नणंद-भावजय एकमेकांना समजावून का घेऊ शकत नाही?? अशा या अति भयानक घरगुती दहशतवादाला खतपाणी घालणारे हे चित्रपट बंद झाले पहिजेत असं मी म्हणत नाही, पण कमीत कमी त्याची कथा ही दोन्ही बाजू मांडणारी हवी.खतपाणी मी यासाठी म्हणालो की घराघरात मुलगा-सून हे आई-वडिलांना त्यांची चूक लक्षात आणून देवू शकत नाही कारण ते "मोठे" असतात आणि एक प्रभावी माध्यम म्हणून चित्रपटाकडे गेले तर ते चित्रपट सुद्धा "मुलगा-सून" हे नेहेमी चुकतातच असेच दाखवतात त्यामुळे सासू-नणंद याना फावते म्हणजेच त्यांच्या वागणुकीला खतपाणी घातले जाते. बरोबर की नाही? महेश मांजरेकर नेहेमी हट के चित्रपट बनवतात. त्यांचे कडून एक तरी "मुलगा-सून" यांची बाजू मांडणारा चित्रपट पुढे येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. हिंदी चित्रपटसृष्टी सुद्धा पूर्वी असे चित्रपट काढून वीट आणायचे (अवतार-राजेश खन्ना, उमीद, बागबान वगैरे) जर असे मानले की "समाजातलेच प्रतिबिंब चित्रपटात उमटते" तर माझ्या आजूबाजूला आणि समाजात आणि मित्र मंडळी मध्ये मला इतके टोकाचे दुष्ट मुलगा-सून आणि आदर्श मुलगी-जावई कधी कुठे पाहाण्यात नाहीत. याउलट वर्तमानपत्रांमधील ९० टक्के बातम्या पाहाता सासू-सासर्याच्या-नणंदेच्या छळवादी वृत्तीला आणि अत्याचाराला कंटाळून स्वत:ला संपवणार्या सुनांच्या बातम्याच वाचायला मिळतात.... काय वाटते आपल्याला? असल्या अतिशयोक्तीपूर्ण चित्रपटांची/सिरीयल्सची आवश्यकता आहे का?? मुलगा आणि सून द्वेष्ट्या ढीगभर चित्रपटांची/सिरीयल्सची गरज आहे का? दहा चित्रपट/मालिका "सून-मुलगा द्वेष्ट्ये" आणि "आई-वडील-मुलागीई-जावई धार्जिणे" असले तर एक तरी चित्रपट नाण्याची दुसरी बाजू दाखवणारा का नसावा??? मला एक हिंदीतला "वक्त" नावाचा अक्षय कुमार आणि अमिताभचा एक चित्रपट आठवतो तो मुलगा- सून यांची चांगली बाजू दाखवतो!!! कुणाला माहिती आहे का असा एखादा मराठी चित्रपट ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे?? माहिती असेल तर येथे सांगावे. म्हणजे तो चित्रपट समाजातील "सून-मुलगा द्वेष्ट्या" सासू-सासार्याना दाखवायाला बरे!!! काय म्हणता? खरे की नाही?

वाचने 23623 वाचनखूण प्रतिक्रिया 40

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 14:57
विचारप्रवर्तक लेख. बाकी कोणतीच मालिका आणि अशी कथानके असलेले चित्रपट बघत नसल्याने त्याबद्दल काही सांगू शकत नाही. धागाकर्त्याने 'ज्यात सून-मुलगा यांची चांगली बाजू मांडली आहे' अशी एक कथा लिहून मिपावर प्रसिद्ध करावी. कदाचित निघेलही त्यावर चित्रपट.

In reply to by चित्रगुप्त

निमिष सोनार Sat, 07/19/2014 - 11:32
आणि ती कुणी चित्रपट निर्मात्याने घेतली नाही घेतली तरी फरक पडत नाही पण माझे विचार काही लोकांपर्यंत पोहेचाले तरी बास झाले....

मुक्त विहारि Fri, 07/18/2014 - 15:05
तुमच्या कडे भरपूर वेळ दिसत आहे... मज्जा आहे बुवा... मला तर, फावल्या वेळात पुस्तके वाचायला किंवा छान छान ब्लॉग वाचता वाचता, फावला वेळ कसा जातो, ते पण समजत नाही. असो, कुणी फावल्या वेळात वाचन करतो तर कुणी वेड्या मुलाचे चाळे बघत बसतो. आपल्याला काय? पुस्तके वाचायला मिळाली, बस्स झाले.

In reply to by मुक्त विहारि

जिन्क्स Fri, 07/18/2014 - 16:02
फावल्या वेळात पुस्तके वाचायला किंवा छान छान ब्लॉग वाचता वाचता, फावला वेळ कसा जातो, ते पण समजत नाही. छान छान ब्लॉगच्या लिन्क्स द्या की...

शिद Fri, 07/18/2014 - 16:20
माझे आई-वडील ह्यांना देखील या अतिशय भिकार, टुकार व रटाळ अश्या मराठी मालिका फारच आवडतात. येथे येउन सुद्धा न चुकता यु-ट्युब वर प्रत्येक भाग अगदी चवीनं बघतात. पण त्यांना आवडत असल्याकारणाने मग काही बोलता येत नाही. 'असं कसं, अस कसं' बोलणारी सविता प्रभुणे असली डोक्यात जाते ना कि विचारता सोय नाही. स्वःतच्या मुलीच्या संसारात ढवळाढवळ करण्याव्यतिरीक्त ह्या बाईला संपुर्ण दिवसात काहीच कामं करताना दाखवत नाही. हिचा उद्देश फक्त एकच कि लेकीला व जावयाला येनकेन प्रकरणाने कायमचं माहेरी रहायला आणायचं. च्यायला, सिरीयलच नाव पण म्हणे तर काय? 'जावई विकत घेणे आहे'. डोक्याची कटकट नुसती. हे असले भिकार*ट मालिका पाहून सासु-सासर्‍यांच्या(दोन्ही कडच्या) डोक्यात न असलेले विध्वंसक विचार यायला कितीसा वेळ लागणार आहे? 'सुपरफास्ट कॉमेडी एक्स्प्रेस' हाच तो काय एकमेव चांगला करमणुकीचा कार्यक्रम(मराठी) सध्या उरला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.

In reply to by शिद

रेवती Fri, 07/18/2014 - 16:33
मालिकांची नावं माहित नाहीत पण माझी आई अगदी चवीनं या मालिका बघत असते शिवाय डोळ्याला रुमाल लावलेला. ;)

In reply to by रेवती

निमिष सोनार Fri, 07/18/2014 - 18:53
परावृत्त करा त्याना अशा सिरीयल्स पासून... मुलांनो, सेन्सॉरशिप लावा पालकांना !!! नाहीतर या सासू सून कट कारस्थानी सिरीयल मधल्या घटना तुमच्या घरात घडायला वेळ लागणार नाही .... :-)

In reply to by निमिष सोनार

चित्रगुप्त Fri, 07/18/2014 - 21:27
मुलांनो, सेन्सॉरशिप लावा पालकांना !!!
छान. म्हणजे त्यांना आणखी एक तक्रार करायला विषयः मुलगा सून आम्हाला आवडणारे कार्यक्रमही बघू देत नाहीत... मुळातच आवड असावी लागते राव. आणि ते सिंह हरणाला मारतो वगैरे रोज रोज असंख्य वेळेला बघणंही पुढे पुढे नकोसं होतं...

एसमाळी Fri, 07/18/2014 - 19:40
हे सगळ बघण्यापेक्षा, fox life,discovery च्ये सगळे च्यॅनल,history,national geo,travel xp, ndtv good times,TLC, animal planet काही बघायला सांगा नक्कीच आवड बदलेल. कॉमेडी एक्सप्रेस सारखा बालीश प्रकार मी आजतागायत पाहिला नाही.

धन्या Fri, 07/18/2014 - 21:38
लेख सरकवून दमलो. माणूस जेव्हा इतके पोटतिडकीने लिहीतो तेव्हा त्याचा अर्थ त्याने ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अनुभवलेलं असतं. :)

भृशुंडी Sat, 07/19/2014 - 01:17
लेखनविषय राजकारण देण्याचं कारण समजलं नाही. मालिका बघून कुणी तसं वागण्यालाच "योग्य" समजत असेल तर कठीण आहे. निव्व्ळ घटकाभर करमणूक किंवा त्याहीपेक्षा टाईमपास - हेच कारण वाटतं अशा मालिका बघण्याचं. तेव्हा निमिषदादा, चिंता करू नका, आणि मालिकांना विरोध कायम ठेवा!

In reply to by भृशुंडी

यशोधरा Sat, 07/19/2014 - 04:15
ओ असं काय करता? टीव्ही मालिका आणि मराठी सिनेमा ह्यातलं मुलगा, सुनेला वैट्ट ठरवणारं कुटील राजकारण असं म्हणायचं असेल त्यांना. तुम्ही कुंचकुट्टोयम सारखी दुसरी जागा शोधून काढा पाहू. *good*

पियू परी Sat, 07/19/2014 - 11:30
निमिषजी काळजी करु नका. हे तुमच्याबाबतीत घडत असेल तर (ज्या पोटतिडकिने लिहिले आहे त्यावरुन तरी असेच वाटते) आईवडिलांसोबत चित्रपट मालिका बघायला जाऊच नका तुम्ही व मिसेस.. मुलगा सुन वाईट आणि लेक जावई चांगले हा त्यांचा ग्रह आपल्या समाजात आधीपासुन आहेच (रेफरः चिमणराव गुंड्याभाऊ). मालिकेने फक्त त्यांच्या हातात तुम्हाला व तुमच्या बायकोला टोमणे मारायला एक चान्स मिळवुन दिला. त्यामुळे त्यांच्यासोबत 'जुळुन येती रेशीमगाठी' हि एकच मालिका बघा आणि कल्टी मारा. तुम्ही 'जुळुन येती रेशीमगाठी' सारखी मालिका त्यांना दाखवा. आणि मध्ये मध्ये.. "बघा.. ते आपल्या सुनेशी कसे वागतात ते (नाहीतर तुम्ही)" असे टोमणे मारा मस्तपैकी.. अवांतरः बायको लकी आहे तुमची. तिची बाजुही समजुन घेताय त्याबद्दल. *good*

In reply to by पियू परी

निमिष सोनार Wed, 07/30/2014 - 17:27
धन्यवाद पियू परी ... अगदी मनातले ओळखलेत. पण ही समस्या (घरातली आणि चित्रपटातली) केवळ माझ्या एकट्याची नसून माझ्या ओळखीतल्या अनेक मित्र, चुलत मावस भाऊ यांची सुद्धा आहे. अनेकांशी दीर्घ चर्चा करून त्यावरून निष्कर्ष काढून मग मी ही चर्चा सुरु केली आही आणि त्या चर्चेला आपल्यासारखा प्रतिसाद मिळतो तेव्हा कुणीतरी आपले दु:ख समजावून घेतोय असे वाटते ...

In reply to by अप्पा जोगळेकर

प्यारे१ Sat, 07/19/2014 - 18:18
नैतर काय! एवढं नाव व्यवस्थित आहे, दूरदर्शन! घ्या की दुरुन दर्शन पण नाही. लोकांना अग्गदी जवळून दर्शन घ्यायची नि घरात विकतची दुखणी घ्यायची 'बाद' सवय असतेच.

निमिष सोनार Mon, 07/21/2014 - 13:07
इतर लोक बघून तेच खरे मानून चालतात.. त्याचा राग येतो. यात भर म्हणून सावधान इंडिया/क्राईम पेट्रोल सारख्या मालिका सुद्धा गुन्हेगारी दाखवतांना मी वर सांगितलेल्या नाण्याच्या एकाच बाजूचा विचार करणाऱ्या कथा निवडून निवडून दाखवतात असा अनुभव आहे. मी बघत नाही पण अंदाजाने,जाहीरातीने कळतेच.

कळीच्या मुद्द्याला हात घातला आहेस निमिषा.आपल्या चित्रपटांना,दिग्दर्शकांना नाविन्याचे जरा वावडेच असते.'माहेरची साडी' आमच्यातल्या काहीजणींनी ५ वेळा पाहिला होता.९२ साली बहुतेक.

निमिष सोनार Wed, 07/30/2014 - 17:32
फक्त वाचन न करता वाचणार्या प्रत्येकाने आपले मत सुद्धा व्यक्त करावे अशी अपेक्षा आहे. ही एक चळवळ व्हावी...

रेवती Wed, 07/30/2014 - 18:52
अहो निमिषजी, आमच्याकडे या किंवा कुठल्याच मालिका बघत नाहीत, इतकेच काय टीव्ही नावाचे खोके चालू करून महिने लोटलेत. माझ्या साबासाबूंनी मराठी मालिका बघणे सोडून दिले आहे किंवा त्यांनी कधी बघितल्या नसाव्यात, हिंदी त्यांना फारसे समजत नाही त्यामुळे ते कार्यक्रम बघण्याचा प्रश्न येत नाही. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी ते लहान मुलांचे सा रे ग म प लागायचे तेंव्हा मात्र सगळेजण न चुकता बघायचे. माझे बाबा एकंदरीतच बातम्या सोडता टीव्हीवर काही बघत नाहीत. फक्त आई तिच्या अश्रूढाळू मालिका बघते. ती इतकी भित्री आहे की असलं काही बघून सुनांना काय त्रास देणार? त्यामुळे आमचे मत काही नाहीये. अनेक वर्षांपूर्वी मी चुकून एका मालिकेचा एक एपि. बघितला तर त्यातून अजून सावरले नाहीये. ;) त्यात एक बाई दुसरीला "का गं असं करतेस?, सांग ना असं कसं करवलं तुझ्याच्याने, बोल ना!" वगैरे ऐकून मीच मनातल्या मनात "अगं बये बोल काहीतरी नैतर ती दुसरी प्रश्न विचारतच राहील" असे म्हटले होते. शिवाय घरातल्या घरात असणारा व्हिलन बुवा ;) ढँटॅढँ असे वाजवून तीन तीन अँगलातून दाखवतात ते मला अनेक वर्षे पुरले. आता नको. तुमच्याकडे किंवा मित्रमंडळींकडे खरच इतका गंभीर प्रश्न आहे काय? टीव्ही बिघडला म्हणून बंद करून ठेवा की! सोप्पे आहे. नैतरी टीव्हीवर तसेही फार जीवनावश्यक काही नसते. नेमक्या त्या मालिकांच्यावेळी घरातील सगळेजण योगासने शिकायला जावा म्हणजे बरे वाटेल. चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.

In reply to by रेवती

बॅटमॅन Wed, 07/30/2014 - 19:04
चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.
नाही ओ, कारण आहे. इतकी लोकं अलीकडे पाहतात की काय सांगू नका. सॉरॉनने रिंग देऊन भुलवलेल्या रिंगरेथ ऊर्फ नाझगुलांसारखे अगदी हुच्चभ्रू पुरुषही इकडे वळालेत. बायकांची मक्तेदारी त्यांनी इथे कधीच मोडीत काढलेली आहे.

In reply to by रेवती

धन्या Wed, 07/30/2014 - 20:35
टीव्ही बिघडला म्हणून बंद करून ठेवा की! सोप्पे आहे. नैतरी टीव्हीवर तसेही फार जीवनावश्यक काही नसते. नेमक्या त्या मालिकांच्यावेळी घरातील सगळेजण योगासने शिकायला जावा म्हणजे बरे वाटेल. चळवळ सुरु करण्याइतके महत्व देण्याचे कारण वाटत नाही.
टीव्ही बंद करुन ठेवला तर मालिका कशा पाहणार? आणि मालिका पाहील्या नाहीत तर मग मालिका समाजाला कशा चुकीच्या दिशेने नेत आहेत यावर मिपावर काथ्या कसा कुटणार? लोक एकुणात टीव्ही आणि काही चॅनेल यांच्या नावाने गळे काढत राहतात मात्र टीव्ही बंद ठेवायचा किंवा चॅनल बदलायचा खुप सोपा उपाय आपल्या हातात असतो हे सोयिस्कर विसरतात. :)