मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फ़्यंड्री...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम मंडळी. मंडळी, मिपावर फ्यंड्रीबद्दल उत्तम लिहून आल्यानंतर आणि इतरही ठिकाणी फ़्यांड्रीवर येता जाता चर्चा व्हायला लागल्यामुळे चित्रपट पाहण्याची उत्सूकता लागली होती. मराठी चित्रपटांनी कात टाकली आहे. पारंपरिक चित्रपटापेक्षा काही तरी वेगळे मराठी चित्रपटातून यायला लागले आहे. वास्तवतेवर आधारित सकस कथा, ध्वनी, छायाचित्रण,कलाकार, या आणि विविध अशा बदलांनी मराठी चित्रपट जरा हटके यायला लागले आहेत. मराठी चित्रपटांना विषय फुलवता यायला लागले थेटरात शांतपणे चित्रपट बघायला जावे, इथपर्यंत मराठी चित्रपटांनी भरारी घेतली आहे, असे वाटायला लागले आहे. असाच एक चित्रपट म्हणजे फ्यंड्री. सामाजिक, धार्मिक, व सांस्कृतिक परंपरेच्या अशा अंधार कोठडीत गुदमरलेले दलित जीवन वर्षानुवर्ष बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. माणूस म्हणून जगण्याचे सर्व हक्क असतांनाही सामाजिक रुढी परंपरेत गुरफटून गेलेल्या कचरु माने (किशोर कदम) आणि त्याचा मुलगा जाबुवंतराव कचरु माने (सोमनाथ अवघडे) यांची आयुष्यातील स्वप्न, व्यवस्था आणि संघर्षाची चित्तर कथा म्हणजे फ़्यांड्री. परंपरा म्हणजे कचरु माने तर बंड म्हणजे जाबुवंतराव माने. गावकुसाबाहेरच्या समाजालाही माणूस म्हणू काही भावना असतात आणि त्याचं इतरांना काही घेणं देणं नसतं. असं एक उत्तम चित्रण फ़्यांड्रीत आपल्याला बघायला मिळते.
कैकाडी समाजातील कुटुंबाची ही कथा. माणसाच्या मनातील न्यूनगंड आणि स्वप्न यांचा हा संघर्ष. प्रेमकथा तशी ती नाहीच. कैकाडी समाजाचे टोपले विणणे हे काम परंतु गावाबाहेर वावरणारा आणि गावातील सर्व हलकी कामं करणारा अशा कुटुंबाचे चित्रण नागराज मंजुळे यांनी केले आहे. शाळेची, अभ्यासाची आवड असलेला, शाळेतल्या 'शालू’ (राजेश्वरी खरात) नामक पोरीवर एकतर्फी प्रेम करणारा. गावातल्या अशा हलक्या पोरांना उच्चवर्णीय शालू कडे पाहूही नये म्हणून समाजाने घेतलेली काळजी. आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मोहवून टाकायचे असेल तर काळीचिमणी जाळून त्याची राख डोक्यावर टाकली तर व्यक्ती मोहात पडते अशा श्रद्धेने या गायरानातून त्या गायरानात काळीचिमणीच्या शोधात फिरणारा ’जब्या’ ताकदीनिशी आला आहे. आपण हलके आहोत आणि आपण आपल्या पायरीने राहीलं पाहिजे हे कचरू मानेला (किशोर कदम) कळते पण पोराला नाही. गावातील डूकरे गावाबाहेर काढण्याचं काम करावं लागणा-या या कुटूंबाला भेदाभेद याचा सामना कसा करावा लागतो ते लहान सहान प्रसंगात उत्तम उतरले आहे. कचरु मानेची एक मुलगी लग्न होऊनही घरात पडून आहे तर दुसरीचा विवाह ऐपत नसतांनाही हुंडा देऊन करायचा आहे. आपण जे समाजाच्या दृष्टीने हलके काम करतो ते आपल्याला आवड्णा-या अल्लड प्रेमातल्या प्रेयसीला कळू नये म्हणून काम न करणा-या जब्या गावासमोर आणि ’शालू’ समोर डुकरं पकडायला लावण्याचा प्रसंग. हागणदारीचं चित्रण, हागणदारीत डुकरं पकडण्याचा फोटो काढून फ़ेसबूकवर अपलोड करणे, एका व्यवस्थेला दुस-या व्यवस्थेशी अजिबात घेणं देणं नसणे, डुक्कर शिवलं म्हणून स्नान करणारे कुटुंब. अघोरी कृत्याने यश मिळवायचा प्रयत्न करणारा गावकरी. असे सर्वच चित्रण उत्तम झाले आहे. देवाच्या जत्रेत कानठळ्या बसवणा-या वाद्याच्या मिरवणूकीत उच्च वर्णीयांचा जब-या आणि त्याच्या मित्राला होणारा धुसमुसळेपणा अतिशय सुरेख चित्रपटातून आला आहे. दलित जीवन किंवा गावकुसाबाहेरचे जीवन म्हणून जगणा-या कचरु मानेला अनेक कटू जीवघेणे अनुभव घ्यावे लागतात.
पराकोटीचा सहनशील,सोशीक, शांत व कष्टाळू आणि पिचलेले मन आपल्याला समजू लागते. अनुभवांना सामोरे जायचे परंतु संघर्ष करायचा नाही. जातीच्या दु:खाला कारण असलेल्या सामाजिक परिस्थितीविरुद्ध तो विद्रोह करुन उठत नाही. व्यवस्थेने त्याच्या माणसापेक्षा त्याच्या जातीला प्रतिष्ठा दिल्याचे दिसते. सतत टोमने, अन्याय, सतत पडतील कामे करणे, परंतु लादलेल्या जीवनाबद्दल चिडून आगपाखड नाही. जब-याला शालू मिळते का ? वाटेल ते बोलणा-या आणि वागविणा-या समाजव्यवस्थेविरुद्ध जब्या उभा राहतो का हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की बघायला हवा यात काही वाद नाही. आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते. आणि चित्रपटाच्या शेवटी ’वळू ’ या चित्रपटाची आठवण व्हावी इतका तो ‘पकडा पकडीसाठी’ वेळ गेलाय असे वाटते. किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही. चित्रपट योग्य ठिकाणी संपलाय का ? असा प्रश्न निश्चित आपल्या मनासमोर उभा राहतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीच्या उंचीने चित्रपटाचा आस्वाद घ्यावा, असे म्हणून निर्मात्याने शेवट प्रेक्षकांवर सोडला आहे. व्यक्तिगत हा चित्रपट मला फारसा का आवडत नाहीहे कोणास ठाऊक. दलित साहित्यात सतत अशा आशयाचं लेखन चाळल्यामुळे म्हणा किंवा उचल्या, उपरा वाचल्यामुळे म्हणा. चित्रपट मला थेट भिडत नाही. किशोर कदम, छाया कदम, सोमनाथ अवघडे, राजेश्वरी खरात, सुरज पवार, आणि इतर अभिनेत्यांनी एक चांगला अभिनयही केला आहे यात काही वाद नाही. आपल्याला हा चित्रपट का आवडतोय किंवा काही उणिवा जरा तपशिलवार चर्चा व्हावी म्हणून हा पुन्हा प्रपंच....! (छायाचित्र आंतरजालावरुन साभार)

वाचन 22727 प्रतिक्रिया 88

प्रचेतस Wed, 02/26/2014 - 22:09
परिक्षण आवडलं. अर्थात मराठी चित्रपट फारसे बघत नसल्याने ह्या चित्रपटाच्या वाटेला जाणार नाही.

खटपट्या Wed, 02/26/2014 - 22:35
आता चित्रपटात सर्वच उत्तम आहे असं नाही. चित्रपटाची सुरुवात संथ अशी आहे, एखादी डॉक्युमेंट्री भासावी असे स्वरुप सुरुवातीपासून वाटत राहते.
चित्रपट अगदी वास्तववादी व्हावा असे श्री मंजुळे यांचा प्रयत्न होता. तसे त्यांनी लोकसत्ता ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केल होते. त्याचसाठी त्यांना कलाकारहि अस्सल मतितलेच हवे होते असे त्यांचे म्हणणे होते.
किशोर कदमाचा अभिनय का कुणास ठाऊक फ़ारसा पोहचत नाही. कदाचित सौमित्र म्हणून की एकसुरी अभिनयामुळे ते समजत नाही.
किशोर कदम मुलाखतीत म्हणाले कि त्यांना इतकी वर्षे शिकलेला अभिनय unlearn करावा लागला. जर त्यांनी अभिनय केला असता तर ते या मुलांच्या समोर उघडे पडले असते. म्हणून चित्रीकरणाच्या वेळी त्यांनी मंजुळे ना सांगितले कि "तुला असा वाटला कि मी अभिनय करतोय तर तू मला थांबव" लोकसत्ताच्या संकेतस्थळावर हि मुलाखत तुकड्या तुकड्या मध्ये उपलब्ध आहे बाकी तुमच्या परीक्षणाने चित्रपट पाहण्याची इच्छा प्रबळ झाली आहे. बरेच लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरावा.

सुधीर Wed, 02/26/2014 - 23:05
मला तरी हा चित्रपट खूप आवडला. समाजिक प्रश्न वगैर हाताळला आहे म्हणून तो चांगला आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. मान्य आहे की "काही जणांना" काही वेळासाठी तो थोडा स्लो वाटतो (मला तरी तसा वाटला नाही). पण डॉक्युमेंट्रीतरी नक्कीच वाटला नाही. याचा शेवट तर मला खूप आवडला. कथानकाचा समान धागा असलेल्या या अगोदरच्या चित्रपटांपेक्षा (शाळा आणि टाईमपास) याचा शेवट कलात्मक वाटला. कथेच्या प्रमुख पात्राचं पुढे काय झालं असेल? वगैरे प्रश्न दिग्दर्शक प्रेक्षकावर सोडतो. चित्रपटाच्या मध्येच कुठेतरी जब्याला तो विहिरीत गटांगळ्या खातोय असं स्वप्न पडतं, तो शॉट दिग्दर्शकाने का बरं चित्रित केला असावा? म्हटलं तरं "काळी चिमणी" हा अंधश्रद्धेचा भाग आहे, पण दुसर्‍या नजरेतून बघितलं तर ते एक रुपक आहे. या काळ्या चिमणीचा पाठलाग हा त्याच्या "निरागस स्वप्नांच्या पाठलागा" सारखाच तर नव्हे? खरं तर लोकसत्ताच्या वेबसाईट वर जेव्हा ह्या दिग्दर्शकाला स्वतः ऐकलं तेव्हा वाटलं की त्याने खूप आतून चित्रपट बनवला असावा. त्यात बरेचसे त्याचेच अनुभव आहेत. देऊळ नंतर बर्‍याच दिवसांनी मला एक चांगला चित्रपट पाहिल्यासारखं वाटलं. (तसे मी फारच कमी चित्रपट पाहतो त्यामुळे कुठला चांगला चित्रपट मिस झाला असेल तर माहित नाही). राहता अजून एक मुद्दा या चित्रपटाला बर्‍याच जाणकारांनीही उचलून धरलं. नाही म्हणायला तो बायस चित्रपट पाहण्यापूर्वी होता.

धन्या Wed, 02/26/2014 - 23:25
छान परिक्षण सर. पडदयावरच्या जब्याचं आयुष्य शीतल वाटावं ईतपत दाहक आयुष्ये जवळून पाहिली आहेत. तरीही हा सिनेमा मन सुन्न करुन गेलाच.

मन१ गुरुवार, 02/27/2014 - 00:03
फॅण्ड्री थेट्रात पाहिला. प्रचंड आवडलेल्या चित्रप्टांपैकी एक आहे. अत्यंत संयत तरी प्रभावी. बाष्कळ्पणा थिल्लरपणा आणि आक्रस्ताळेपना ह्यांचा संपूर्ण अभाव, तरी शेवटी शिल्लक उरणारा ठसा. खोल जाणवनारी गोष्ट. वल्लीचा प्रतिसाद पाहून कससच झालं. तो कितीतरी चांगल्या गोष्तींना मुकलाय ह्याची त्याला जाणीवही नाही असं वाटतं. त्याची एकूण खोली व व्यासंग लक्षात घेता त्याला आवडतील असे इतरही काही चित्रपट मायभाषेत आहेत, हे नमूद करु इच्छितो.

In reply to by मन१

प्रचेतस गुरुवार, 02/27/2014 - 08:32
हाहा. ज्याची त्याची आवड. मला स्वतःला मराठीमधले सामना, सिंहासन, जैत रे जैत, धूमधडाका, धडाकेबाज, दे दणादण असे चित्रपट प्रचंड आवडतात.

In reply to by प्रचेतस

गवि गुरुवार, 02/27/2014 - 09:16
ज्याची त्याची आवड हे सर्व ठीक..पण आवडीचा निकष असा घाऊक ? मराठी चित्रपट फारसे पाहात नसल्याने याच्या वाट्यालाही जाणार नाही ही कारणमीमांसा अगदीच काहीच्या काही वाटली. विशेषत: मराठी सिनेमात खरोखर खूप काही नवे वेगळे येत असतानाच्या काळात. असो.

In reply to by गवि

प्रचेतस गुरुवार, 02/27/2014 - 09:23
कारणमीमांसा काहीच्या काही आहे हे मान्यच. पण मला स्वतःला गंभीर किंवा संदेश वैग्रे देणारे चित्रपट आवडत नाहीत. चित्रपट हा मनोरंजनासाठीच पाहणे हा माझा निकष आणि त्यात हल्लीचे मराठी चित्रपट बसत नाहीत. अर्थात त्यालाही अशोकमामांचा एक डाव धोबीपछाड, निशाणी डावा अंगठा असे काही अपवाद आहेतच.

In reply to by धन्या

प्रचेतस गुरुवार, 02/27/2014 - 11:00
हेच आम्ही तुम्हाला पण म्हणू शकतो की. आठवा अजिंठा लेणी आणि तुमचा वैतागलेला चेहरा. शेवटी हे व्यक्तीसापेक्ष असतं; नाही का? :)

यशोधरा गुरुवार, 02/27/2014 - 07:01
आत्तापरेंत वाचलेल्यापैकी आवडलेला हा दुसरा लेख. मस्त लिहिलं आहेत प्रा डॉ. मला हा सिनेमा पहायचा आहे, पण इतक्यात इतरांना थेटरमध्ये आलेले अनुभव वाचून जायची इच्छा होत नाहीये. एखाद्या मधल्या दिवशी गेल्यास गर्दी कमी असेल का? बघणार पण हा सिनेमा. ह्या सिनेमात काम केलेले बालकलाकार वन फिल्म वंडर ठरु नयेत ही इच्छा. (वळू मध्ये काम केलेला बालकलाकार पुन्हा आपल्या नेहमीच्या जगात परतला ना? काय वाटत असेल त्याला औटघटकेच्या प्रसिद्धीचं? अधिक त्रासदायक ठरत असेल का ते?) बाकी मलाही किशोर कदम हल्ली फारसा भावत नाही. त्याचा एकच प्रकारचा अभिनय आवडत नाही. एका कविता वाचनाच्या कार्यक्रमात त्याचा वावर, शब्दफेक, बोलायची एकूणच पद्धत हे सगळंच डोक्यात गेल्यापासून अधिकच.

रेवती गुरुवार, 02/27/2014 - 07:38
हेच परिक्षण काय ते समजले, नाहीतर दोन तीन लेख वाचल्यावर गोंधळ झाला होता. सिनेमा जालावर उपलब्ध झाल्याशिवाय पाहता येत नाही व उपलब्ध झाल्यास पाहू शकीन याची खात्री नाही.

In reply to by मारकुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/27/2014 - 11:58
नाना चेंगटपणाबद्दल आभारी आहे. आपल्याला चूक शोधता आली आनंद वाटला. बाकी, चित्रपट जेव्हा पाहाल तेव्हा त्याबद्दल काही लिहिता आलं तर जरूर लिहावं. वाचायला आवडेल. -दिलीप बिरुटे

आत्मशून्य गुरुवार, 02/27/2014 - 13:36
थेटरात ? सिंगल की मल्टीपल स्क्रीन ? आजुबाजौला कुणी दंगा केला का ? अगदी गेला बाजार एखादा साक्स्चा वास किंव्हा उस्फुर्त काव्य चित्रपट पाहिल्यावर सुचले काय ?

In reply to by आत्मशून्य

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/27/2014 - 13:51
मिपावर एक धागा होता तसा अनुभव आला नाही. 'काय गड्या चिमणी काय गावना गड्या' या डायलॉगला दोनचार पोरं लै फिदी फिदी हसत होते. वरीजनल जब्या काळी चिमणी बद्दल बोलत असतो तर या फिदी फिदी करणा-या प्रेक्षकांना 'शालू' ही चिमणी वाटत होती. बाकी, काही प्रेक्षकांबरोबर आम्ही त्यांच्याकडे 'काय बावळटपणा चाल्लाय राव' अशा दृष्टीने पाहिल्यावर ते जरा शांत झाले. बाकी, चित्रपट विना व्यत्यय पाहता आला. बाकी सॉक्सचा वास आला नाही आणि चित्रपट पाहून काव्यही सुचले नाही. फक्त चित्रपट अचानक संपल्यावर चित्रपट संपलाय यावर क्षणभर विश्वास बसला नाही. एवढेच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्मशून्य गुरुवार, 02/27/2014 - 18:21
जर फ़ेड्रि आपणास विषेश पसंतीस पडला नाही तर. असो चित्रपट हां गुंगवून ठेवणारा असावा ज्यांना नुसत्या जीवंत अभिनयाची हॉउस आहे त्यांनी चित्रपटातच तो पहायला मिळावा असे दिवस महाराष्ट्रात यायचेत अजुन

गणपा गुरुवार, 02/27/2014 - 14:03
फ़्यंड्री / फँड्री की अजुन काय उच्चार असेल तो अजुन पाहिला नाही. पण पहायची उत्सुकता मात्रं आहे. (म्हणुन आजवर या चित्रपटाची आलेली परिक्षणं वाचली नाहीत. काही अधले मधले प्रतिसाद तेवढे चाळलेत.) हा थेटरात पहायचं माझ्या भाग्यात लिहिलेलं नसावं, त्यामुळे यथावकाश जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पाहिनच. कारण आवर्जुन पहावेत असे मराठी चित्रपट फारच विरळे आहेत.

ऋषिकेश गुरुवार, 02/27/2014 - 16:30
अतिशय मेहनत घेऊन, प्रत्येक लहान तपशीलांना जोखूल केलेली निर्दोष निर्मिती! नागराज आणि टिमचे मनःपूर्वक अभिनंदन, शुभेच्छा आनि सलाम!

आयुर्हित गुरुवार, 02/27/2014 - 22:44
या पिक्चरने नवा विचार काय दिला आहे समाजाला ? की फक्त स्वप्न बघायला प्रवृत्त केले गेले आहे? की फक्त समाजाची वाईट परिस्थिती दाखवून/हाताळून/(जखमेवर मीठ चोळून?) त्याचे भांडवल बनविले आहे?

In reply to by आयुर्हित

स्पंदना Fri, 02/28/2014 - 04:15
चित्रपटातुन सामाजिक जाणिव जागी होत असती तर काय आयुर्हित? सर मी तुमच परिक्षण पुरं नाही वाचल कारण मला चित्रपट पहायचा आहे. अन मला आधीच ष्टुरी नाही वाचायची. तरीही एकूण असा सुर दिसतोय की एका ब्राह्मणाच्या मुलीवर एक वेशीबाहेरचा असा म्हणता येइल असा मुलगा प्रेम करतो. अर्थात कोवळ्या वयातसुद्धा ही भावना फुटताच कामा नये असा समाजाचा दंडक अस काहीस. मला एक विचारायच आहे. कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? मुलगा उच्च्वर्णिय का नाही दाखवला जात? म्हणजे उलट मांडणी वगैरे? चाणी मध्ये साधारण अशी परिस्थीती होती.पण त्यातही ती मुलगी म्हणुन तिचा फायदा घेतलेलाच दाखवला गेला होता. देव जाणे. उगा प्रश्न पडला म्हणुन बोलले झालं.

In reply to by स्पंदना

मारकुटे Fri, 02/28/2014 - 06:55
>>>एकूण असा सुर दिसतोय की एका ब्राह्मणाच्या मुलीवर एक वेशीबाहेरचा असा म्हणता येइल असा मुलगा प्रेम करतो. अर्थात कोवळ्या वयातसुद्धा ही भावना फुटताच कामा नये असा समाजाचा दंडक अस काहीस. मला एक विचारायच आहे. कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? कारण सरळ आहे. त्यामुळे अन्याय झाला अन्याय झाला असं ठासून सांगता येतं. आता तुम्ही जे विचारले आहे ते उलट का नाही दाखवलं जात... मराठीतीलच एक महान (!) लेखकांची महान (!!!)कादंबरी आहे बघा त्यात त्यांनी अनेक "दाब" कसे वर येत आहेत हे दाखवलं आहे. अगदी ज्ञाणेश्वरांपासून दाखले दिले आहेत... वाचा !! सध्या ब्राह्मणांनी आणि उच्च वर्णियांनी हजारो वर्षे फक्त अन्याय केला असा इतिहास अभ्यासक्रमात आहे पास व्हायचं तर हाच इतिहास शिकावा लागेल. प्रश्नपत्रिका चुक कि ब्र्रोबर सांगा १) ब्राह्मण या देशात उपरे आहेत २) वैदिक संस्क्रुती शोषणावर आधारीत आहे ३)... एका वाक्यात उत्तरे द्या १) ब्राह्मणांचा ग्रंथ कोणता? २) गीता युद्धास प्रवृत्त करते का? ... असेच परत केव्हातरी

In reply to by मारकुटे

केदार-मिसळपाव Sat, 03/22/2014 - 16:15
वाईट वाटले... चित्रपट पुर्ण बघा असे सुचवतो...चित्रपटात धर्माचे ऊल्लेख नाहित. तुम्हिही टाळावा असे सुचवतो. मी मात्र सुन्न झालो फँड्री बघुन. अशी परिस्थिती जवळुन बघीतली आहे म्हणुन लिहिले. सध्या जवळपास अशीच परिस्थिती बघत आहे. चित्रपटात जसे दाखवले आहे अगदी तशीच परिस्थेती एका व्यक्तिने अनुभवतांनाही बघितले आहे. बाकि नागराज ने कंपुगिरी च्या संदर्भात भाष्य केले आहे. एकदा एखाद्या कंपुने एखाद्या व्यक्तिवर प्रोटोटाईप चा शिक्का मारला कि सगळे त्याचा ऊपहास करतात. तो शिक्का कधीही पुसला जात नाही. जब्या च्या बाबतीत हेच घडतांना आपण बघतो. कमिआधिक प्रमाणात परदेशी राहणार्या जनतेला असा अनुभव कधी ना कधी आलेला असतोच. गावातला आणि गावकुसाबाहेरचा ... एकदा अशी रेशा रेषा आखली कि मग इकडच्यांनी तिकडे यायचे नाही आणि आधिकार मागायचे नाहित. शेवट अगदी खराखुरा केलेला आहे. मला त्या काठीला बांधुन घेउन चाललेल्या डुकरात परिस्थितीत आणि जब्यात काहिच फरक दिसत नव्हता. फक्त जब्या आपला राग दगड मारुन काढु शकतो एव्हढेच.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन Fri, 02/28/2014 - 17:12
मला एक विचारायच आहे. कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? मुलगा उच्च्वर्णिय का नाही दाखवला जात?
लाखमोलाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मलाही पडतो खरा. पण हा प्रश्न पडणेच चूक आहे अशी सध्याची शिकवण असल्याने गप्प बसतो झालं.

In reply to by प्रसाद१९७१

आत्मशून्य Sun, 03/02/2014 - 11:21
वरणाने न्हवे! तर सनस्कार, व्हीचार आणी दन्यानाने उच्च असणे महत्वाचे आहे हे जो परयंत समाजातील सरव वरणाच्या सरव लोकाना ओमजत नाही तो परयंत हे असेच चालणार.... त्यावर कोणाचाच तसा इलाज नाही.

In reply to by बॅटमॅन

थॉर माणूस Fri, 02/28/2014 - 18:35
माझं इंतरप्रिटेशन थोडं असं आहे... कथेत पात्रे गृहित धरताना एक साचा गृहित धरला जातो. म्हणजे पुरूष = धारीष्ट्य/जहाल/आक्रमक इ. आणि स्त्री = संयम/मवाळ इ. आता कथेत नायक डार्क हॉर्स हवा असेल तर कथेतल्या पात्राला ताकदवान असूनही विळख्यात जखडलेलं असावं लागतं (म्हणजे नायक रुबाबदार, पिळदार शरीरयष्टीचा पण गरीब घरातला... काही नाही तर किमान शत्रूपक्षातला असावा लागतो). तेच जर कथा स्त्रीप्रधान असेल तर स्त्रीपात्राच्या बाबतीत. टाईमपास किंवा फँड्री हे पुरूष व्यक्तिरेखेभोवताली फिरणारे सिनेमे आहेत. त्यांना प्रेक्षक नायकाच्या बाजूने झुकायला तर हवे आहेत पण नायक स्वतः कथेला पुरून उरलेला चालणार नाही. म्हणून मग नायकाला संवेदनशील बनवतानाच त्याच्याकडून आर्थिक, शैक्षणिक, समानतेची ताकद हिरावून घेतली. जेणेकरून तो काही प्रमाणात कमजोर पडेल आणि अपेक्षित शेवट साधता येईल. नायक उच्चवर्णिय आणि नायिका दलित दाखवणे शक्य आहे, पण उलट दिशेचे द्वंद्व दाखवणे अवघड, आणि समाजमनावर कमी परीणामकारक. ब्राम्हण कुटूंबात, कुटूंबाची घुसमट हा कंगोरा गायब होतो. दलित कुटूंबातली मुलगी वरच्या जातीत जाणार म्हणून विरोधाची धार असली तरी ती त्यामानाने कमी असू शकते. नायकाकडे त्याच्या मूळ गुणांशिवाय आता सवर्णतेचा फायदा, शिक्षण, कदाचित आर्थिक स्थैर्यसुद्धा दिसेल. नायक वरचढ होतोय. मग अर्थातच नायिकेच्या बाजूला असलेले प्रश्न जास्त मोठे दिसू लागतात आणि अजाणतेपणी प्रेक्षक तिच्याकडे झुकतो. अशात सिनेमा स्त्रीप्रधान होऊ शकतो आणि चानीच्या जवळपास जाऊ शकतो. आणि स्त्रीप्रधान चित्रपट, त्यातही अशा विषयांवरचा असेल तर किती चित्रपटगृहात पोहोचेल ह्या काळजीने अशा कथेला शक्यतो टाळले जाते. अर्थात हे माझे मत. सगळ्याच गोष्टी भावनेवर चालत नाहीत. शेवटी चित्रपटाचे उद्दीष्ट पैसे कमावणे हेच असते. (दिग्दर्शक/लेखकाचा उद्देश काहीही असला तरी).

In reply to by बॅटमॅन

नगरीनिरंजन Mon, 05/12/2014 - 05:03
अच्छा म्हणजे या चित्रपटात ज्याची २०००० रुपये द्यायची ऐपत नाही त्या वेशीबाहेरच्या एका माणसाच्या मुलीवर एक सुखवस्तु उच्चवर्णिय मुलगा प्रेम करतो आणि तिच्याशी हुंडा न घेता लग्न करायची मागणी करतो म्हणून तो गरीब माणूस त्या मुलाचा भर गावासमोर क्रूर अपमान करतो असं दाखवायला हवं होतं ना? असो. उच्चवर्णियांवरच्या अन्यायाच्या निवारण कार्यात स्वतःला झोकून देणार्‍या लोकांना आमच्या शुभेच्छा!

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना Mon, 05/12/2014 - 05:27
अन्याय उच्च्वर्णीयांच्यावर नाही तर दुसृयाच कुणावर आहे. जसा तुम्ही गावकुसाबाहेरचा माणुस हा लाचार अथवा बलहीन समजता, तसाच समाजाचा अर्धा भाग कमजोर आहे. अन तो म्हणजे स्त्री. कुणी नुसत आवडण वेगळ. मनावर कोणाचही बंधन नाही. पण त्या आवडण्याचा जर दुसर्‍या व्यक्तीवर दुश्परिणाम होत असेल तर काय? माझ म्हणन एव्हढच आहे. प्रेमाबद्दल बोलताय ना? मग हे अस प्रेम एखादा उच्च्वर्णिय तरुण एखाद्या गावकुसाबाहेरच्या मुलीवर करताना का नाही दाखवत/ का नाही तो सगळ्या सिस्टम विरुद्ध उभा दाखवत? जे कमजोर आहेत त्यांनी त्यांच्याहुन कमजोर वर्गावर नजर ठेवण्याचा भाग झाला हा. अर्थात हे समजुन घ्यायला थोड कठिण आहे,पण उच्च वर्णियांच्या घरात दलीत मुली राहु शक्ल्या तर समाजाला बदलायला जागा आहे. कारण अजुनही स्त्रीया थोड्याफार प्रमाणात सासरचे बदल स्विकारतात. पण पुरुष पत्नीकडुन आपल्या प्रमाणे वागायची अपेक्षा करतात. दुसरी गोष्ट, अन्याय घडुन गेलाय याची परत फेड दुसर्‍या कमजोरांवर अन्याय करुन होणार असेल तर असो बापडे.

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन Mon, 05/12/2014 - 07:53
स्त्रियांवर दोन्हीकडे अन्याय होतो हे मान्य आहे पण फॅन्ड्री चित्रपटाचा विषय तो नाहीय आणि बदला घ्यायला म्हणून त्या मुलीवर अत्याचार होतात असेही दाखवलेले नाही. मुळात फॅन्ड्रीसारख्या चित्रपटांचा हेतू उपेक्षित वास्तव दाखवण्याचा असताना त्यांच्याकडून उच्चवर्णिय मुलाचे दलित मुलीवर प्रेम आणि त्यासाठी स्वतःच्या समाजाविरुद्धचे बंड अशी फॅन्टसी दाखवण्याची अपेक्षा का करावी?

In reply to by नगरीनिरंजन

स्पंदना Mon, 05/12/2014 - 08:17
विषय नसेल तर असायला हवा. मग तो चित्रपट सामाजिक बनत नाही. नुसती एक बाजू दाखवुन समाजाला तसा विचार करायला लोआवण्याची परवानगी मिळते दिग्दर्शकाला. मग असे प्रश्न मांडताना तसा विचार करुन मांडावेत. माझा पहिला प्रतिसाद याला उद्देशुनच होता. अन तो व्यर्थ तर्क आधारित नव्हता. छोटी गावे अन त्यांचे छोटे प्रश्न हे अलिप्त राहू देत नाहीत.

In reply to by स्पंदना

नगरीनिरंजन Mon, 05/12/2014 - 12:48
तुम्हाला काय म्हणायचंय ते मला कळलं आता. तुमच्या मूळ प्रतिक्रियेला आलेल्या उपप्रतिसादांनी माझी दिशाभूल झाली. पुरुषाने स्त्रीवर अत्याचार केला तरी त्यातही आपल्याकडे फरक केला जातो. उच्चवर्णिय पुरुषाने अगदी खालच्या जातीतल्या स्त्रीवर केलेला अत्याचार हा अत्याचारच न वाटणारे अनेक लोक आपल्या देशात आहेत. निपाणीतल्या बिडीकामगार असो, की ऊसतोडणीच्या मजूर बाया असो की वेचणार्‍या श्रमिका असोत, त्यांचं ढळढळीत शोषण होत असतंच. कित्येक दलित स्त्रियांची त्यांच्या मुला-बाळांच्या अपराधाची शिक्षा म्हणून गावातून विवस्त्र धिंड काढली जाते पण त्याविरुद्ध फारसं लिहीलं, बोललं, दाखवलं जात नाही हे खरं आहे.

In reply to by स्पंदना

थॉर माणूस Mon, 05/12/2014 - 11:53
>>>मग हे अस प्रेम एखादा उच्च्वर्णिय तरुण एखाद्या गावकुसाबाहेरच्या मुलीवर करताना का नाही दाखवत यामुळे स्त्रीचं साध्य असणं किंवा स्त्री हीच साध्य आहे हा संदेश समाजात जाणं कसं थांबेल? त्या उच्चवर्णिय मुलासाठी ती दलित मुलगीच साध्य बनली की तुमच्या चित्रपटात! तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कारण इथला तुमचा रोख आणि खालच्या प्रतिसादातला तुमचा रोख मला काँट्रॅडीक्टींग वाटतोय.

In reply to by स्पंदना

राजेश घासकडवी Mon, 05/12/2014 - 08:55
कायम उच्च्वर्णिय मुलीनांच का दाखवल जातं अश्या कथांतुन? मुलगा उच्च्वर्णिय का नाही दाखवला जात? म्हणजे उलट मांडणी वगैरे?
याचं उत्तर थोडं तांत्रिक आहे, सामाजिक नाही. आत्तापर्यंत समाजात कर्ता म्हणजे पुरुष अशी पद्धत आहे. त्याचंच प्रतिबिंब कथनात पडतं. म्हणजे अनेक वेळा 'ध्येय साध्य करण्यासाठीचा लढा' दाखवायचा असेल तर प्रोटॅगोनिस्ट हा पुरुष आणि त्याचं ध्येय म्हणजे स्त्री असं दाखवण्याचा संकेत आहे. ते साध्य करण्यासाठी त्याच्या मार्गात अडथळे येतात, आपल्यात असलेल्या धमकेने, शक्तीने, व मानसिक बळाने हे सर्व अडथळे तो पार करतो आणि शेवटी आपलं प्राप्य - म्हणजे ती स्त्री - मिळवतो. सर्वसाधारण राजपुत्र हिरो असलेल्या अनेक परिकथांमध्ये हे दिसून येतं. साध्य हे मोहक व आकर्षक असणं, त्यावर आपलं जिवापाड प्रेम असणं, त्यासाठी आपण प्राणाचीही बाजी लावायला तयार होणं - हे कर्ता पुरुष आणि कर्म स्त्री ठेवून सहजपणे सांगता येतं. आत्तापर्यंतच्या इतिहासात कायमच स्त्रिया या पॅसिव्ह आणि पुरुष हे अॅक्टिव्ह असल्यामुळे ते रोलही योग्य जमले होते. (यापुढचा प्रतिसाद हा फॅंड्रीच्या कथावस्तूचा किंचित उलगडा करणारा आहे. पण किंचितच.) फॅंड्री ही अर्थातच परीकथा नाही. तरी तीत कशाचीतरी आस असणारा जब्या आहे. त्याला दोन गोष्टी हव्या असतात. एक म्हणजे ती मुलगी - शालू. ही वरच्या जातीतली आहे. सुंदर वगैरे नसली तरी दिसायला चांगली आहे. दुसरी गोष्ट हवी असते ती म्हणजे एक जादूई पक्षी. त्याच्या पिसाची राख तिच्या अंगावर टाकली की ती मिळणार अशा काहीशा विश्वासात तो वावरतो. आता याचा वरवर पाहता एक मुलगा, त्याचं प्रेम जिच्यावर जडलं आहे अशी मुलगी आणि तिला मिळवण्यासाठीची जादूची कांडी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असं पाहता येतं. पण नुसतं तेवढंच म्हणून चालत नाही. कथानकाच्या मांडणीत उघडउघड जब्या हा दलित समाजाचं प्रतिनिधित्व करतो. आणि शालू ही त्या समाजाची आस. चांगल्या जीवनाची, संपन्नतेची, स्थैर्याची, सन्मानाची. उच्च जातींना जसा राजरोसपणे जगण्याचा हक्क मिळतो त्या हक्काची, आणि त्याबरोबर येणाऱ्या सुखवस्तू जीवनाची. हे मिळवायचं असेल तर शिक्षण हवं, नोकरी हवी, उद्योगधंदा हवा... हे सगळे मीन्स टू द एंड. म्हणजे शालू मिळवण्यासाठी जसं जब्याला तो पक्षी हवासा वाटतो त्याप्रमाणे शिक्षण वगैरे मिळालं की चांगलं जीवन, संपन्नता मिळेल अशी आशा आहे. म्हणून तो पक्षी पकडण्याचा ध्यास. पण तो पक्षी काही हाताला लागत नाही. त्यासाठी कितीही वणवण केली तरी गवसत नाही. कधी अगदी हाताशी येतो, पण जातीवर लादलेलं गलिच्छ काम करण्याच्या जबरदस्तीखाली तो पकडायला फुरसत मिळत नाही. आणि जो गलिच्छपणा नकोसा असतो, जो चिखल नकोसा असतो त्यातच स्वतःला बरबटून घ्यावं लागतं. ही असहायता आहे. असो, मुलगाच का दाखवलेला आहे याचं थोडक्यात उत्तर हे की ध्येय साधण्याचा प्रयत्न आणि त्यातून येणारी विफलता दाखवायची असेल तर स्त्री हे ध्येय आणि पुरुषाचा प्रेमभंग हे जास्त फिट बसतं.

In reply to by राजेश घासकडवी

स्पंदना Mon, 05/12/2014 - 10:25
म्हणजे आजुनही आपण रामायण महाभारताच्या काळातच आहोत अस म्हणा की सरळ! त्या काळी कस स्त्री पळवणे, नासवणे, हेच एखाद्याची पत वाढवु वा डळमळवु शकायच तस आजकाल, पटवणे, छेडणे वा मिळवणे ही समाजाच्या स्तरात वर यायचे दाखले झाले. दुसरा कोणताही मार्ग नाही? नोकरी मिळवुन दाखवणे, व्यवसाय उभारुन दाखवणे, कोणत्याही क्रीडा क्षेत्रात चमकुन दाखवणे. हे सगळ राह्यल बाजुला. एक पोरगी मिळाली की झाली तुमची सुधारणा? का इतका संकुचित म्हणते मी असा वास्तववादी दृष्टीकोण? वर नगरी म्हणतात तुम्हाला मुलगा उच्च्वर्णीएय अशी फॅटसी हवी का? मी म्हण्ते का नाही?

In reply to by स्पंदना

राजेश घासकडवी Mon, 05/12/2014 - 10:43
तुमचा गैरसमज होतोय. मुलगी मिळाली की सुधारणा झाली असं नाही. ध्येयाचं रूपक म्हणून स्त्री-पात्र वापरणे हा साहित्यिक संकेत आहे असं मी म्हणतो आहे. त्यामुळे दलित समाजाला जी उन्नतीची आस आहे तिचं चित्रण करण्यासाठी स्त्रीपात्र योजलेलं आहे. (जब्या = दलितसमाज, शालू = उन्नती, पक्षी = ते साध्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी)

In reply to by राजेश घासकडवी

स्पंदना Mon, 05/12/2014 - 10:50
अन कशी काय बाबा ती उन्नती? फक्त तिच्या पावलाने काय शिक्षण, पैसा, समाजात पत चालत येणार आहे? काय साधल जाणार आहे? माझा विरोध या धारणेवर आधारलेल्या कल्पना विश्वालाच आहे. कारण या कल्पना फक्त थेटरात रहात नाहीत. कोवळ्या वयाच्या मनांवर परिणाम करुन जातात. मिसलीड करतात. स्त्री ही एक साध्य करायची वस्तू बनते अश्या कल्पना विलासांनी. थांबवलेलेच बरे असे कल्पना विलास. कोणताही व्हिलन उठतो हिरोच्या हिरॉईनला पळवुन नेतो. त्या आधी दिडतास तो हिरो ती हिरॉइन मिळण्यासाठी नाना प्रकार करत असतो. आयला आहे काय हे? का एव्हढी स्त्री केंद्रीत धारणा म्हणते मी?

In reply to by स्पंदना

राजेश घासकडवी Mon, 05/12/2014 - 11:07
मी वर दिलेल्या प्रतिसादापेक्षा अधिक स्पष्ट लिहिणं कठीण आहे. पण प्रयत्न करतो. साहित्यिक संकेतांचा आदर्श किंवा सत्याशी संबंध असतोच असं नाही. 'पुंगीचे स्वर ऐकून नाग डोलतो' हे वैैज्ञानिक सत्य नाही, तरी साहित्यात, लोककथांमध्ये ते जणू काही सत्य आहे अशा प्रकारे वापरलं जातं. चेटकीण ही खरी नसते, तरी कथांच्या विश्वात चेटकीण या संकल्पनेबरोबर आपण काही चित्र डोळ्यासमोर आणू शकतो. हे संकेत कलात्मक रचना करण्यासाठी वापरले जातात. ते सत्य असण्याची गरज नसते. ते समजून घेतले की आपल्याला लेखकाला काय सांगायचं आहे हे अधिक चांगलं समजून घेता येतं. एखाद्या कथेत चेटकीण आहे म्हणजे लेखकाचा चेटकिणीच्या असण्यावर विश्वास आहे, किंवा लेखक चेटकिणींना जस्टिफाय करतो असं नाही. संकेत बदलले जाऊ शकतात. भाषा हळूहळू बदलते तसंच...

In reply to by स्पंदना

थॉर माणूस Mon, 05/12/2014 - 11:42
जब्या = दलितसमाज, शालू = उन्नती, पक्षी = ते साध्य मिळवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी (शिक्षण, पैसा, समाजात पत...) पक्षी मिळाला तर शालू मिळण्याची शक्यता आहे. शालूच्या पावलाने पक्षी येणार नाहीये. आणि शेवटच्या चार-पाच ओळींचा तर या चित्रपटाच्या गाभ्याशी काहीच संबंध नाही, उगाच बॉलिवूड वड्याचं तेल इकडे काढलंय. वरच्या प्रतिसादांमधे आल्याप्रमाणे ही रुपके आहेत. आणि ती वापरताना एका समीकरणाच्या हिशोबाने वापरतात. लोकांनी गोष्ट वाचावी/पहावी म्हणूनसुद्धा एक साचा ठरवून त्यात तुमचा संदेश पोचवावा लागतो. मी मला वाट्टेल तशी गोष्ट सांगणार आणि सगळ्यांनी ती उचलून धरायलाच हवी अशी जबरदस्ती तर नाही ना करता येत. आर्थिक समिकरणे असतात ती वेगळीच. बाकी तद्दन गल्लाभरू मनोरंजन देणार्‍या चित्रपटांकडून (कुठलेही **वुड) काही अपेक्षा ठेवत असाल तर अवघड आहे.

In reply to by आयुर्हित

खटपट्या Fri, 02/28/2014 - 08:37
या पिक्चरने नवा विचार काय दिला आहे समाजाला ? की फक्त स्वप्न बघायला प्रवृत्त केले गेले आहे?
यासाठी तरी हा चित्रपट बघावा लागेल साहेब

In reply to by lakhu risbud

प्रत्येक अ , ब क ड दर्जाच्या शिनेमा आपल्याला समीक्षक ह्या नात्याने पाहायला हवा अशी ह्यांची भाबडी समजूत आहे. शिनेमा एक कलाकृती म्हणून पाहणे समीक्षक गटांना मान्यच नसते , त्यांची चिरफाड करणे व त्यावर अवास्तव स्तुती किंवा टीका करणे एवढ्चे त्यांना जमते व त्यासाठी तय्न्च्या दिमतीला असते ती गटणे मराठी.

प्रसाद१९७१ Fri, 02/28/2014 - 16:46
तेच तेच विषय, तेच तेच सामजिक भाष्य, तोच तोच उकरुन काढलेला जातीचा वाद, हागंदारी वगैरे चा खरातर आता जाम कंटाळा आला आहे. ४०-५० वर्ष झाली, अति झालय

सुधीर मुतालीक Fri, 02/28/2014 - 18:03
डॉ, आपण सविस्तर परीक्षण लिहिले हे छान केले. परीक्षण चांगले लिहिले आहे. माझ्या मते या चित्रपटाचे कथानक USP नाही. कथानकाची मांडणी भन्नाट आहे. मांडणी अतिशय स्वच्छ आहे तिला कसलाच मुलामा नाही. चित्रपटाचा म्हणून असा काही भंपकपणा नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक सराईत नाही. त्याची विषय पोहोचविण्याची तळमळ प्रत्येक फ्रेम मध्ये दिसते. सादरीकरण अफाट आहे असे माझे मत आहे . ( बाकी सॉक्सचा वास आपणाला आला असता तर कदाचित आपल्याला सिनेमा आवडला असता )

मलातरी हा चित्रपट प्रचंड आवडला. प्रिमियरमध्ये नागराज 'मला जास्त बोलता येत नाही, माझा सिनेमा काय बोलतो तेच पाहा' एवढं एकच वाक्य बोलला. 'फँड्री'ची कथा ही त्याने स्वतः अनुभवलेली / बघितलेली- असंही एका मुलाखतीत वाचलं. नागराजनी साकारलेला चंक्या, सोमनाथचा जब्या, त्याचा मित्र पिऱ्या या सर्वांनी या भूमिका अक्षरशः जगल्या आहेत असं मला वाटतं. सौमित्रच्या कचरूच्या भूमिकेतून एका बापाची लाचारी आणि अगतिकता मनात रुतत राहते कुठेतरी. तितक्याच ताकदीने जब्याच्या आईचाही अभिनय छाया कदम यांनी केला आहे. पाटलाच्या पोराने शालूकडे न पाहण्यासाठी रागावणे, जत्रेच्या वेळी शालूसमोर नाचताना अचानकच डोक्यावर कंदील घेऊन उभे राहावे लागणे, डुक्कर पकडण्याच्या वेळी शाळेतल्या कोणी विशेषतः शालूने बघू नये म्हणून लपणे आणि शेवटी बापाकडून मार खाऊन गावकऱ्यांच्या आणि शाळेतल्या सर्वांसमोर डुक्कर पकडण्याच्या वेळी सोमनाथच्या डोळ्यातली अगतिकता आपल्या मनात कुठेतरी ठसठसत राहते. शेवटी घेऊन शाळेच्या भिंतीवर रंगवलेल्या महापुरुषांच्या चित्रांसमोरून डुक्कर खांद्यावर घेऊन जब्या निघतो ती फ्रेम तर निव्वळ अप्रतिम. या अन्यायाच्या विरोधात जब्याने 'आपल्या' वरच भिरकावलेल्या दगडाने समाजातील रूढी-परंपरा, वर्ण-व्यवस्था, जातीभेद या सर्वांचा पुन्हा एकदा नव्याने विचार होण्याची गरज मात्र जाणवून दिली आहे हे नक्की.

In reply to by वैदेही बेलवलकर

नगरीनिरंजन Mon, 05/12/2014 - 07:57
प्रतिसाद अत्यंत आवडला. फॅन्ड्री पाहण्याची संधी उशीराने का होईना मिळाली. तुमच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणेच वाटले.

मंडळी आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल मनःपूर्वक आभार. फँड्री चित्रपट पाहण्यासाठी मी आणि माझी मैत्रीण जाणार होतो. (बायकोला नेलं की ती अहो, पोरांचे होमवर्क राहीले होते. नळाला पाणी नसेल ना आलं. तुमच्या कपड्यांची इस्त्री बाकी आहे, असे विषय थेट्रात काढते. आणि मा़झा चित्रपट पाहण्याचा सर्व मूड घालवते.) पण ऐन वेळी संडे ला जाऊया असा मैत्रीणीचा निरोप आला मी संडेला चित्रपट पाहू शकत नव्हतो कारण या चित्रपटाच्या निर्मात्याची नागराज मंजुळेची औरंगाबादला एमजीएमला मुलाखत आहे तेव्हा तो कार्यक्रम अटेंड करावा असा विचार माझा होता आणि मग चित्रपट पाहतांना मैत्रीणीचे सारखे एसेमेस. चित्रपट कसा आहे, विषय काय, अभिनय कसा आहे, फ्यँड्री म्हणजे काय, मध्यंतरात खायला काय घेतलं. इ.इ. असे किती तरी विषय. मीही जेव्हा तिच्या सोबत चित्रपट बघायला नसतो तेव्हा मीही असेच करतो म्हणा तिला. असो. :) ''आणि मी माणूस, माणूस शोधता शोधता माणसाच्या सावलीचा, माणसाच्या स्पर्शाचा माणसाच्या शब्दाचा, माणसाच्या नजरेचा केवळ गुलाम होवून राहीलो, यापुढे---- मी तसा मरणार नाही माणसातलं ढोर मारुन खाल्ल्याशिवाय'' जब्या चा शेवटचा दगडाचा फटकारा आपल्याला बसतो तो असा. उपेक्षितांचे, तळागाळातल्या लोकांच्या जीवनाचा ज्यांना अनुभवच नाही, ज्यांनी असं जीवन पाहिलंच नाही त्यांना हा चित्रपट भिडलाच पाहिजे यात काही वाद नाही. वास्तव जीवनात माझ्या आजूबाजूला हे सर्व घडत असते, मी ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे, तेव्हा चित्रपटातील या सर्व गोष्टी मला नाटकी वाटू लागतात. तो चित्रपट आहे हे मी विसरुन जातो. मराठी साहित्यात जे नाही ते दलित साहित्यात आहे, असे जे म्हटल्या जायचे तसे मला जे पारंपरिक चित्रपटात नाही ते फँड्रीत आहे असे वाटलेच आहे. शे दिडशे वर्षापासून एखाद्या विशिष्ट जातीकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात अजून कोणतेच बदल झाले नाहीत. समाजातील एखादी विशिष्ट जमात म्हणजे गुन्हेगार, किंवा अमूक म्हणजे अमूक पद्धतीनेच वागले पाहिजे अशा गोष्टींचे चित्रण वास्तवपणे चित्रपटात आले आहे. 'जब्या'अगदी 'कैकाडी' 'वडारी' शोभतो. माणसाच्या चेहरापट्टीवरुन माणसाच्या जातीचा अंदाज यावा इतका हुबेहुब पात्र म्हणून 'जब्या' उतरलाच आहे. कैकाड्याचं काम खरं तर पल्हाट्याच्या (कापसाच्या झाडाची सरळ वाढणारी काडी) काड्यापासून टोपल्या बनविने. कैकाडी जमातीचं खरं काम 'बुरुडकामाचं ' मयतीच्या वेळेला लागणा-या कामट्या बांबु इ.इ. असे काम करणारा हा समाज. चित्रपट पाहतांना जब्याची घुसमट जशी पोहचते तशा काही गोष्टी पोहचत नाही. अति आक्रस्ताळपणे काही गोष्टी चित्रपटात आल्या आहेत असे वाटते. वास्तव चित्रण करायचं आहे म्हणून हागणदारीत बसलेल्या माणसाचा पादण्याचा आवाज आलाच पाहिजे इतके वास्तव (विनोदी) करण्याच्या प्रयत्नात चित्रपट घसरु लागतो असे वाटते. डुक्कर पकडण्याचा प्रसंगात नेमकं शाळेत राष्ट्र्गीत सुरु होते आणि हातात आलेले डुक्कर निसटून जाते हा प्रसंग मला तर कैच्या कै वाटला. राष्ट्रपेम किंवा काही संकेत गावातले सर्वच पाळतात हे कै च्याकैच वाटले. चित्रपटाचं प्रयोजन काय असते असं विचारलं तर आपण म्हणू की मनोरंजन, कोणी म्हणेल प्रबोधन, कोणी म्हणेल पैसे कमविणे हा उद्देश असतो, कोणी म्हणेल अभिनेत्यांना आपला अभिनय लोकापर्यम्त पोहचवायचा असतो अशी आणि विविध प्रयोजने चित्रपटाबद्दल सांगता येतील. 'फँड्री' यातले काय करतो तर मला वाटतं वास्तव जिवनाचं रेखाटन करण्याचा प्रयत्न करतो. शे दिडशे वर्षाच्या सुधारणे नंतरही समाज आहे तिथेच आहे. आधुनिक जगातही भटका समाज आपले पारंपरिक जीवनच जगत आहे आणि या समाजाच्या माणसांना प्रेम आणि तत्सम गोष्टींचे स्वप्न पाहण्याचा अधिकार नाही, हाच संदेश चित्रपट देतो. व्यक्तिगत मला हा चित्रपट भिडत नाही त्याचं कारण उपेक्षितांच्या जीवनाबद्दल थोडं फार वाचन आणि वास्तवातील तशाच मित्रांचे अनुभव. माझ्या आजूबाजूला मी हे उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे. माझ्या तालुक्याच्या गावी डुकरे पकडण्याची ही पळापळी आणि हा समाज मी पाहिला आहे, आजही पाहतो. जब्या जसा चिडून आणि अपमान झाल्यांमुळे डुकरांवर आणि व्यवस्थेतील शोषण करणा-यांवर दगडांचा मारा करतो ते मी प्रत्यक्ष माझ्या मित्रांबरोबर माझ्या गावतालुक्याच्या पातळीवर अनुभवले आहे. मला यात काही नवीन वाटलं नाही. माझा बी.ए.एम.ए. पर्यंतच्या एका 'वडारी' मित्राचा अनुभव हा मला वाटायला लागतो. त्यालाही आपल्या बापाच्या डुकरं पकडण्याच्या कामाची लाज वाटायची. आपले मित्र काय म्हणतील असे सतत त्याला वाटत राह्यचे. त्याचा बाप सतत आमच्या गल्लीत डुकरं गाठायचा. फास आवळायचा. डुकरांचा तो आवाज आताही ताजा वाटतो. हा मात्र त्या कामापासून दूर असायचा. यालाही अशीच सुंदर पोरगी आवडायची. तू माझा मित्र असशील तर तिला माझ्याबद्दल बोलून ये म्हटल्यावर त्याचं प्रेम हिच्या कोणत्या गावीही नव्हतं. मग मीच तुम्हाला मी माझा मित्र समजते माझ्या मनात तसं काही नव्हतं. अशी मारलेली थाप मला आठवते. मित्रहो, चित्रपट न भिडण्याची ही मा़झी काही कारणे आहेत. निर्मात्याला असाच अनुभव असल्याने या अनुभवांपासून दूर गेलेल्या लोकांना हा चित्रपत आवडतो आहे, याचा मला मात्र आनंद वाटला आहे. प्रतिसादांबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे आभार. चुभुदेघे. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्याच जातकुळीतील अनुभव मला माझ्या बायकोसंधर्भात आला ,पहिल्यांदा भारतात ती जेव्हा माझ्याबरोबर आमच्या लग्नाकरिता आली तेव्हा प्रत्येक ट्रेफिक सिग्नल वर अनवाणी लहान मुले गाडीच्या काचातून भिका मागायचे हा अनुभव सर्वसि नवा असल्याने तिला गलबलून आले , मी ह्या गोष्टींकडे एवढ्या तटस्थ भूमिकेतून कसा पाहू शकतो ह्याचे तिला सखेद आशर्य वाटले. पुढच्या खेपेस तिने ह्या मुलांकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला. तरीही तिची जीवाची तगमग होतच होती. तिसर्या खेपेच्या वेळी तिला भारतात हे असेच होते व ह्याला ती स्वतः काहीही केल्या बदलू शकत नाही हे वास्तव उमजले. तिने निर्विकार पणे त्यांना आगे जाव असे सुनावले , माणसाचे मन सरावाने सरावते , त्याला इलाज नाही. भारत स्वतंत्र झाला म्हणजे नक्की काय झाले , आजचे श्रींमत व मध्यमवर्गाचे साहेबांच्या काळात सुद्धा बरे चालले होते , टिळक व आगरकर ह्यांच्या वादात अश्यावेळी आगरकर महत्वाचे व काळाच्या पुढचे वाटतात.

In reply to by केदार-मिसळपाव

आयुर्हित Tue, 03/25/2014 - 00:43
शिक्षण महत्वाचे. एकदा ते मिळाले की स्वातंत्र मिळवता येते आणि राखताही येते. १००% सहमत. कृपया आपल्याया पटलेले आगरकर यांवर एक छान लेख येवू द्यावा हि विनंती. धन्यवाद.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्यारे१ Sat, 03/08/2014 - 14:29
प्रतिसाद आवडलाच. गावात लहानाचं मोठं झालेल्या, गावाशी सातत्यानं संबंध आलेल्या आम्हाला देखील चित्रपटात वेगळं/ नैसर्गिक काही वाटत नाही. बर्‍याचदा तकलादूपणं उभ्या राहीलेल्या/केलेल्या समस्या नि त्यांचा ठराविक लोकांनी, वाहिन्यांनी केलेला उदोउदो एवढंच विशेष असतं. चित्रपट पाहिला नसल्यानं काही भाष्य केलं नव्हतं. गावाकडचे लोक त्याच त्या वर्तुळात राहणं जास्त पसंत करतात, त्यांना स्वतःला बदलण्याची फार इच्छा नसते, दुसर्‍यानं प्रयत्न केल्यास त्याला हसणं, टिंगल करणं नि नंतर वेळेला त्याच्याचकडं सरळ अथवा त्याला चु* बनवून पैसे लाटणं, जमिनी नावावर करुन घेणं असले उद्योग करत असल्यानं गावाकडच्या 'भोळ्याभाबड्या' जनते बद्दल अनाठायी आस्था, आपुलकी, करुणा इ.इ. वाटणं बंद झालेलं आहे. गावाकडं अजूनही जातीव्यवस्था अत्यंत स्पष्टपणं नि नागडेपणानं आपलं काम करत आहे हे वास्तव आहे. देशमुख, इनामदार इ.इ. लोक त्यांच्या तोर्‍यात, महार, मांग, रामोशी, फासेपारधी, वडार, खाटीक, चांभार, न्हावी, शिंपी इ.इ. सगळे आपापल्या जाती जमातींच्या उल्लेखात काहीही वाईट वाटून घेत नाहीत. बामणाचा वाडा असतो, वरच्या आळीला देशमुख राहतात, महारवाड्या, मांगवाड्यापलिकडं 'वडा' (ओढा)असतो. पुलाखाली हागणदारी असते, वाण्याच्या दुकानातनं चा साखर येते, न्हावी सगळ्यांच्या घरी आमंत्रणं सांगायला जातो, वडराच्या मंगीचं लगीन झालेलं असतं, गुरवाची पोरगी पळून जाते, धनगराचा म्हाद्या, तेल्याची मामी इ.इ.इ. सगळं सुरुच असतं...! महार नि मांगांमध्ये, नि इतर मागास जातींमध्ये देखील रोटी (आता असेल कदाचित) बेटी व्यवहार होत नाहीत... कवतुक 'शेरा'तल्यांना. गावातलं जिणं असंच सुरु असतं.

In reply to by प्यारे१

प्रभाकर पेठकर Fri, 03/21/2014 - 13:03
गावाकडचे लोक त्याच त्या वर्तुळात राहणं जास्त पसंत करतात, त्यांना स्वतःला बदलण्याची फार इच्छा नसते,
जाती व्यवस्थेचं समर्थन नाही पण वरील विधानातली सत्यता अनुभवली आहे. आपल्या वर्तुळातून बाहेर पडण्याची, 'स्वतःमध्ये' वैचारिक बदल घडवून आणण्याची गरज किती जणांना भासते? किती जणं प्रयत्न करतात? आणि असे चांगले विचार पसरविण्याचे काम करणार्‍या किती जणांना सक्रिय पाठींबा मिळतो? हे सर्वच विचार करण्यासारखे आहे. जर एखादा अशा बेड्या मोडून माणूस म्हणून जगू इच्छित असेल तर इतर समाज त्याला नाकारतो का? लग्नाचं जाऊद्या. लग्न करताना तर ब्राह्मण-ब्राह्मण उपजातीतही नाकं मुरडली जातात. ९६ कुळी आणि इतर मराठ्यांमध्येही भेदभाव आहेत. एवढेच काय पण कोकणातले मराठा आणि देशावरचे मराठा असा भेदभावही आहे. पण लग्ना व्यतिरिक्त इतर क्षेत्रात जसे कि शिक्षण, व्यवसाय आदी क्षेत्रात 'तेवढा' विरोध राहिलेला नाही. निदान शहारात तरी दिसून येत नाही. कदाचित त्यामुळे अस्वस्थ होऊन राजकिय नेते आरक्षणाचे फॅड लादून उच्चवर्णिय आणि 'इतर' असा सामाजिक भेदभाव रुजवतात. फँड्री पाहावयास मिळाल्यास जरूर पाहिला जाईल. बिरुटे सरांचे परिक्षण आणि त्या समर्थनातील त्यांचे प्रतिसाद आवडले.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्मिता चौगुले Wed, 03/26/2014 - 12:51
असेच म्हणते..मी ही हे सगळे लहानपणापासून खूप जवळून पाहिलयं त्यामूळे चित्रपट पाहताना रडवेले होणे,तो चित्रपट भिड्णे असं काही झाले नाही. हे वास्तव आहे, आपण बदलू शकत नाही आणि जर कोण प्रयत्न करत असेल तर हे या समाजाला (अन्याय सहण करणार्‍या) देखिल फारसे रुचत नाही कारण त्यात त्यांना आपल्यावर आन्याय होतोय याचीच जाणिव नसते. जे आहे ते आपलं काम आहे,वडिलोपार्जीत हेच चालत आले आहे आणि आपण ते केलेच पाहिजे ही एक त्यामागची भावना असते. किबंहूना खेड्यापड्यात ही अशी कामेच त्यांच्या अर्थार्जनाचे साधन असते. हे असे वास्तव कधी न पाहीलेल्या लोकांना हा चित्रपट भिडणे, वाईट वाटणे इ. साह्जीक आहे. पण हा चित्रपट पाहताना एक न समजलेली गोष्ट - हा जब्या आणि त्याचे कुटूंब कैकाडी समाजाचे दाखवले आहे. मला माहीत आहे त्याप्रमाणे (आणि वर बिरुटे सर ही म्ह्णतात) कैकाड्याचं काम खरं तर पल्हाट्याच्या (कापसाच्या झाडाची सरळ वाढणारी काडी) काड्यापासून टोपल्या बनविने मग या चित्रपटात डुक्कर पकडायचे कामपण या कुटूंबाला का करावे लागते? कारण डुक्कर पकडण्याचे काम हे खेड्यापड्यात जातिव्यस्थेप्रमाणे आणि रुढीप्रमाणे वडाराचे असते आणि माझ्या माहितीप्रमाणे हे दोन्ही समाज वेगळे आहेत. डिस्क्लेमर्-- हे फक्त माझे विचार आहेत , या प्रतिसादाने कुठ्ल्याही जातिच्या- समाजाच्या बांधवाला दुखावण्याचा प्रयत्न नाही.

पैसा Fri, 02/28/2014 - 23:02
उत्तम परीक्षण आणि आभाराच्या निमित्ताने लिहिलेलं मनोगत! आवडलं. पण आजकाल डोक्याला ताप देणारे काही वाचावे, चित्रपटातून पहावे असं वाटत नाही.

In reply to by पैसा

दिव्यश्री Fri, 02/28/2014 - 23:46
++१ पैसा ताई. आपल्या आयुष्यात समस्या काही कमी आहेत का म्हणून अगदी स्वतःच्या खिशातले पैसे घालवून मन उदास होईल असे पाहायचे , वाचायचे ? उलट विनोदी पाहून क्षणभर करमणूक करवून घ्यावी .मन प्रसन्न होते कधीकधी निखळ विनोदाने . प्रत्येक वेळी गंभीर लिहून ,पाहून नक्की काय होत असेल ? मी अजून हा सिनेमा पहिला नाही . टाईमपास पहिला , काही प्रमाणात पटला. खर्या आयुष्यात खूप गंभीर किस्से ऐकून आहे म्हणून शेवट आवडला . अवांतर : माझी आई चित्रपट पाहताना खूप भावूक व्हायची .एकीकडे ती नायिका रडायची आणि एकीकडे आमच्या मातोश्री. तेंव्हा कधी कधी हसू यायचे , बर्याच वेळा समजावून पण झाले पण फारसा फरक पडला नाही . एकीकडे ती नायिका रडायची आणि एकीकडे आमच्या मातोश्री. तेंव्हा कधी कधी हसू यायचे , बर्याच वेळा समजावून पण झाले पण फारसा फरक पडला नाही . नंतर मग रागच यायला लागला रडक्या गोष्टींचा . तिने फारसे चित्रपट पहिले नाही . टीव्ही वर लागतील तेच कधीतरी पाहणार . चित्रपटात / मालिकांमध्ये रडायचे , सोज्वळ वागायचे ते लोक पैसे घेतात. आणि आपण आपले पैसे खर्च करून मनस्ताप विकत घेतो .

साळसकर Fri, 02/28/2014 - 23:09
चित्रपट एक कलाकृती म्हणून आवडलाच. राहिला प्रश्न घसापीटाच विषय आहे..... तर हे दुर्दैव नाही का आपलेच, आपल्या समाजाचे, जे चित्र आजही थोड्याफार फरकाने तेच तसेच आहे.. जेव्हा हे चित्र बदलेल, प्रश्न बदलतीत तसे त्याला अनुसरून चित्रपटांचे विषयही आपसूकच बदलतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 03/06/2014 - 21:53
रविवारी आमच्या औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेस च्या युवा पुरस्कारच्या वतीने समाजासाठी काही उल्लेखनीय काम करणा-यां युवक युवतींचा काही रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला याच कार्यक्रमानंतर फँड्रीचा निर्माता नागराज मंजूळे (चित्रपटातील चंक्या) आणि सौमित्र उर्फ किशोर कदम (चित्रपटातील कचरु माने) यांची या कार्यक्रमाला खास उपस्थिती होती. नाट्यलेखक अजित दळवी आणि निवेदक दत्ता बाळसराफ यांनी ही मुलाखत घेतली मुलाखत अतिशय रंगतदार अशी झाली. (माझी नोटींग) - चित्रपटाचं लहानपणापासून वेड होतं. शाळेतही चित्रपटाचेच संस्कार राहीले. शाळेत दहावीला दोनदा नापास झालो.
डावीकडून सौमित्र,निवेदक दत्ता बाळसराफ, अजीत दळवी आणि नागराज मंजुळे
शाळेत मास्तर माझी जात विचारायचे तेव्हा मला वाईट वाटायचं. माझ्या मित्रांमुळे माझं शिक्षण मार्गी लावलं. शिक्षणाच्या बाबतीत मला दहावीच्या गणिताचा अजूनही मोठा धाक आहे. दहावीच्या अभ्यासक्रमाइतकं भयानक गणित कुठेच नसतं. कसं तरी गावात बी.ए. आणि विद्यापीठात एम.ए. मराठी झालो. मराठीतील 'वाङ्मयीन कार्य' मला कधीच सांगता आले नाही. बारा वेळेस नेट-सेट परिक्षा नापास झालो आणि माझं प्राध्यापक होण्याचं स्वप्न भंगलं. माझ्या आयुष्यात मी अनेक लहान सहान कामे केली. आयुष्यात अनेकदा निराश झालो. माणूस फस्ट्रेशनमधे असला की काही तरी करतो. मी टेलीफोनबूथ वर कामे केली. कपड्याला इस्त्रीचे काम केले. मिथून आणि असिफ या मित्रांचे माझ्यावर खूप उपकार आहेत त्यांच्यामुळे मी जगलो. हिंदी चित्रपटाचे नायक कसे भारी असतात पण ते वास्तव जीवनातले कधी वाटले नाही. माझ्या आजूबाजूचे लोक मला चित्रपटात कधी फारसे दिसले नाहीत. खूप सुरेख नायकांपेक्षा सामान्यांचे प्रतिनिधी करणारे चित्रपटातून मला मांडता आले पाहिजे म्हणून मी मित्रांच्या आग्रहामुळे मी 'मास कम्युनिकेशन' मधे आलो. डायरेक्टरचं आकर्षणही होतं. आणि तिथेच मी 'पिस्तुल्या' शॉर्टफिल्म मधे उभा केला. आणि मग मला माझ्या आजूबाजूच्या कथा चित्रपटातून मांडता येईल असा आत्मविश्वास निर्माण झाला. दलित जीवनाच्या बाबतीत अगोदर संघर्ष, मग संघटन आणि नंतर शिक्षण असा प्रवास सुरु होतो. म.फुले.डॉ. आंबेडकर आपण कधी शिकणार असे मला वाटायचे. आताशी कुठे फँड्री पोहचला. अजून माझी कथा यायची आहे. पण मी चित्रपटातूनच ते मांडेल का हे मला माहिती नाही. पण कोणत्या तरी माध्यमातून समाजासमोर ते येईलच. सौमित्र. माझं बालपण कोळीवाड्यात गेलं. समुद्राची गाज सतत कानावर यायची. वडीलांनी लहानपणीच हॉटेलवर कामावर ठेवले पण सतत शिकावं वाटलं. शिकण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षकांनी माझ्या पाठांतराचा गुण ओळखला. पुढे वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला बक्षीस मिळालं आणि दैनिकात नाव छापून आलं तेव्हा कितीतरी दिवस ती बातमी पाहात असायचो. एकपात्री नाटकाच्या स्पर्धेपासून रंगमंचावर उभा आहे तो आजपर्यंत. फँड्रीत मी जेव्हा अभिनय करायला लागेन तेव्हा मला थांबव असे मी नागराजला म्हणालो. चित्रपटातला अनुभव माझ्यासाठी वेगळा होता पुन्हा कधी असे जमेल का माहिती नाही. खरं तर हा गप्पांचा कार्यक्रम झकास झाला. काही मिपाकर आणि मिपा खडानखडा वाचणारे पण सदस्यत्व न घेतलेले पिव्वर वाचक मिपाकर कार्यक्रमाला उपस्थित होते. -दिलीप बिरुटे

kurlekaar Wed, 03/19/2014 - 11:00
तुमचं परीक्षण छान वाटतंय खरं पण ते बहुधा तुमच्या आकर्षक भाषाशैली मुळे सुद्धा असू शकेल, कारण मी हा चित्रपट अजूनतरी पाह्यला नाहीय. पण किशोर कदमांनी तुमची निराशा केली हे वाचून वाईट वाटलं कारण मला त्याचं जोगवा व नटरंग मधील काम खूप आवडलं होतं. मी हा चित्रपट या आठवड्यात पाहेन बहुधा व लिहीन पुन्हा एकदा.

चित्रपटाचा वेग पटकथेला अनुसरुनच संयत असा आहे.मला तर मध्यंतर केव्हा झाले तेच कळले नाही. हा संयत वेगच आपल्याला खोलवर घेउन जातो.चित्रपटाचे संगीत फार सुंदर आहे,प्रसंगानुरूप अगदी चपखल बसते.खूप छान चित्रपट REALLY.