Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्यारे१ on गुरुवार, 11/21/2013 - 00:45
नमस्कार मंडळी! नेहमीच्या पेक्षा थोडा वेगळा विषय. म्हणजे पटतंय का बघा. मला जे वाटतंय ते लिहीतोय. अनेक क्षेत्रातील कला- अभिनय, दिग्दर्शन, गीतकार, साहित्य- ह्यात कथा, कादंबर्‍या, कविता, सगळे प्रकार, संगीत, क्रिडा नि अनेक अशाच क्षेत्रांतील बर्‍याच प्रतिभावंत लोकांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला हे लोक ज्या दर्जाच्या क्रिएशन्स (निर्मिती?) करतात तशा, त्याच दर्जाच्या क्रिएशन्स नंतर करु शकत नाहीत का? उदाहरणादाखलः ए आर रेहमान ह्या अत्यंत प्रतिभावान संगीतकाराची कुठली गाणी आपल्याला पटकन आठवतात? मला रोजा, बॉम्बे अशा हातावर मोजण्या इतक्या चित्रपटांची नावं आठवतात. दिल तो पागल है चे उत्तम सिंग एका चित्रपटानंतर गायब च झाले जणू. मिलिंद इंगळे नि सौमित्रचा गारवा ऐकल्यानंतरची कुठली गाणी आठवतात? अनेक कलाकार पहिल्या दोन चार चित्रपटांच्या कमाईच्या जोरावर पुढचे अनंत दिवस घालवतात. सानिया मिर्झाचं टेनिस, अनेक लेखकांच्या पहिल्यावहिल्या कथा कादंबर्‍या कवितांना मिळणारं यश हेच शेवटचं यश असतं. काय होतं नेमकं? प्रतिभा कमी पडते की प्रतिभेसाठी लागणारी साधना / कष्ट कमी पडतात...? एकदा प्रसिद्ध झाल्यावर लोकानुवर्ती जीवनशैली, सातत्यानं समाजामध्ये राहणं किंवा साधनेला वेळ कमी मिळणं अशांमध्ये कालापव्यय होतो का? ह्याचबरोबर उलट उदाहरणं देखील आहेत मात्र ती अपवादानं नियम सिद्ध होतो अशा प्रकारची आहेत. हे लोक 'लिजंड्स' म्हणून ओळखले जातात. प्रतिभेचं उगमस्थान नेमकं काय असतं? कुठून येतं हे सगळं? अशा पार्श्वभूमीवर सांगायचं ते सांगून झालं म्हणून लेखणी न उचलणारे विंदा करंदीकर नि त्यांच्याच बरोबरीनं विस्मृतीत जाणार्‍या सिझनल कविता करणारे अनेक कवीवर्य ह्यात डावं उजवं करावं का??? सर्व क्षेत्रातील निरीक्षणं ह्यात यावीत असं वाटतं. निव्वळ हीच कारणं असतात की अपेक्षा, वयोमर्यादा, शारीरिक, मानसिक साथ, कौटुंबिक पार्श्वभूमी, सामाजिक जाण इ.इ.इ. सगळ्या गोष्टींचा विचार व्हावा अशी अपेक्षा आहे. आपल्याला काय वाटतं?
  • Log in or register to post comments
  • 17345 views

प्रतिक्रिया

Submitted by मोदक on गुरुवार, 11/21/2013 - 01:49

Permalink

हर्षा भोगलेच्याच शब्दात

हर्षा भोगलेच्याच शब्दात बोलायचे झाले तर "एकदा एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर तुमच्याकडे प्रतिभा आहे की नाही हा मुद्दा सर्वस्वी गौण ठरतो. तुमच्याकडे आहे त्या प्रतिभेचे तुम्ही काय करता? हा मुद्दा निर्णायक ठरतो" लेखात उल्लेखलेली नावे वाचल्यावर एक लक्षात येते की या सर्व व्यक्ती नि:संदिग्धपणे गुणवान आहेत, प्रतिभावान आहेतच मात्र अशा प्रतिभावान व्यक्ती कामगिरीमध्ये सातत्य का राखू शकत नाहीत यालाही अनेक कारणे असतात. एकदा काहीतरी "achieve" केले की "आपण परिपूर्ण झालो" अशी भावना येत असावी.. या विचाराने प्रगती खुंटण्याची शक्यता जास्त! खेळाडूंच्या बाबतीत एका ठिकाणच्या कामगिरीच्या तुलनेत दुसर्‍या ठिकाणची स्पर्धात्मक परिस्थिती, प्रतिस्पर्धी, असे घटक निर्णायक ठरतात. अंतर्गत / कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पोत्याने पदके जिंकणारे समरेश जंग, अंजली वेदपाठक सारखे नेमबाज मोठ्या स्टेजवर आयत्यावेळी कामगिरी उंचावता न आल्याने मागे राहतात. प्रतिभेचं उगमस्थान नेमकं काय असतं? कुठून येतं हे सगळं? प्रतिभा, गुणवत्ता वगैरे सगळे त्या त्या व्यक्तींकडे असतेच.. मात्र स्वतःला "किती प्रमाणात पणाला लावायचे" यावर अनेकदा "एंड रिझल्टस्" अवलंबून असतात. जाता जाता - रेहमानचे नाव वरील यादीत पाहून आश्चर्य वाटले. रोजा, बाँबे नंतरही पुकार, साथीया, रंग दे बसंती, लगान, दिलसे, ताल.. लंबी लिस्ट आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 11/21/2013 - 13:09

In reply to हर्षा भोगलेच्याच शब्दात by मोदक

Permalink

मोदकानं बर्‍याच दिवसांनी काही

मोदकानं बर्‍याच दिवसांनी काही लिहीलं. बरं वाटलं. (इ. ए. च्या धाग्यावर प्रतिक्रिया आहे एक ) >>>रेहमानचे नाव वरील यादीत पाहून आश्चर्य वाटले. का कुणास ठाऊक पण पहिल्या ऐकण्यात रेहमानची गाणी ऐकवत नाहीत. हळूहळू आवडायला लागतात. रोजा बॉम्बे चं प्रत्येक गाणं अप्रतिम होतं असं वैयक्तिक होतं. साथिया वगैरे मेलोडी कधीमधीच... माझा मुद्दा आहे तो हा की बरेच दिवसांच्या अभ्यास किंवा थॉट प्रोसेस नंतर एक विषय मूर्त आकार घेतो. ज्यांच्या प्रतिभांची झेप कदाचित कमी आहे त्या लोकांकडून निघणारं पहिलं 'प्रॉडक्ट' हे त्यांच्या ह्या थॉट प्रोसेसमधून निघणारं एक चांगलं प्रॉडक्ट असतं. ते बाहेर पडल्यानंतर जणू हे लोक रिकामे होत असावेत काय अशा प्रकारे निस्तेज होत जातात. रामगोपाल वर्मा हे आणखी एक उदाहरण जाताजाता देऊ इच्छितो. पूर्वीचे चित्रपट नि आत्ताचे चित्रपट...
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 11/21/2013 - 04:22

Permalink

जेंव्हा तुमच नाव होतं,

जेंव्हा तुमच नाव होतं, तेंव्हा तुम्ही एक उंची गाठलेली असते अन त्या उंचीचे सातत्य राखण जमेलच अस नाहे, किंबहुना अवघड होत. लोकांचा अपेक्षांचा भार सुद्धा वाढत जातो, अन मग पहिल्यासारख नाही जमल अशी मत व्यक्त होउ लागतात. त्यातच स्वतःला एकदा सिद्ध केल्याने पुन्हा पुन्हा फक्त तेव्हढ्या यशावरच तोलल जाउ लागल्याने कलाकाराचा हिरमोड होत असावा. काहीजण त्या पहिल्या यशाच्या धुंदीत वाहून जात असावेत. काहीजण पुन्हा त्या तोडीच जमल तरच पुन्हा व्यक्त होत असावेत. बाकी ए आर रहेमान सातत्य राखून आहे या मताची अपर्णा.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on गुरुवार, 11/21/2013 - 19:45

In reply to जेंव्हा तुमच नाव होतं, by स्पंदना

Permalink

+१

अगदी असच म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by ग्रेटथिन्कर on गुरुवार, 11/21/2013 - 07:56

Permalink

एका राष्ट्रीय समस्येला वाचा

एका राष्ट्रीय समस्येला वाचा फोडल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 11/21/2013 - 13:11

In reply to एका राष्ट्रीय समस्येला वाचा by ग्रेटथिन्कर

Permalink

आभारी आहे.

आभारी आहे. अवांतरः असेच 'बसून' किती दिवस राहणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प on गुरुवार, 11/21/2013 - 13:16

In reply to आभारी आहे. by प्यारे१

Permalink

हा हा हा

प्यारेकाका तुसि 'ग्रेट' हो
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 11/21/2013 - 09:02

Permalink

यश आणि धंदा

सुरुवातीला शिकायचं म्हणून, कलासाधना म्हणून कलावंत जे काही करत असतो, त्यात एक टवटवी, उत्साह, अद्भुतता, समर्पण इ.इ. असतं, मात्र लौकीक यश, पैसा मिळू लागला, मानसन्मान लाभले, व्यावहारीक गाडी चालू पडली, की बहुतेकांसाठी कला ही कला न रहाता धंदा बनतो, पुष्कळ कामे मिळू लागली की कसेतरी नगास नग करून देणे, अन्य लोकांकडून करून घेऊन स्वतःच्या नावाने विकणे असे प्रकार सर्रास चालू होतात. कलेच्या दर्जाऐवजी प्रसिद्धी, गवगवा यांचेमागे कलावंत लागतात. त्यांना भरीस घालणारे खुषमस्करे, त्यांच्या निर्मितीतून पैसा कमावणारे डीलर, गॅलरीवाले, चित्रपट निर्माते, एजंट वगैरे ठेकेदार मंडळींना हवी तशी निर्मिती कलावंत करून देऊ लागतात. या कलावंतांचे बाजारमूल्य सतत वाढते राहण्यात या ठेकेदारांचा, कलेत पैसा गुंतवणार्‍यांचा लाभ असल्याने त्यांना मानसन्मान, पद्मपुरस्कार वगैरे मिळवून देणे, नसलेली लायकी सुद्धा असल्याचे बांधलेल्या समिक्षकांकरवी आणि अन्य प्रचारतंत्रातून जनतेच्या गळी उतरवणे, असे अनेक प्रकार घडू लागतात. कलेच्या दर्जाच्या बाबतीत आपली घसरण होत असल्याचे कित्येक कलावंतांना कळतही नसावे, किंवा त्यांना त्याची गरज सुद्धा वाटेनाशी होते. कुटुंबियांना तर त्यांच्या कलेच्या दर्जापेक्षा मिळणार पैसा, मानसन्मान वगैरेंमधेच रस असतो. पूर्वीची उदाहरणे द्यायची, तर शंकर-जयकिशन, लक्ष्मी-प्यारे वगैरे प्रतिभावान संगीतकार सुद्धा कालांतराने कसे संगीत देऊ लागले, रझा, हुसेन सारख्या चित्रकारांची चित्रे एका अवस्थेनंतर कशी सरधोपट,एका साच्याची होऊ लागली, लेखक मंडळी कसा रतीब घालू लागली, अशी अनेक उदाहरणे दिसून येतील. याउलट ज्यांचा धंदा फारसा चालला नाही, वा सुरुही झाला नाही, अशी काही मंडळी सुरुवातीच्याच उत्साहाने वा निरागसपणाने वृद्धापकाळापर्यंत कलासाधना करत असलेली माझ्या प्रत्यक्ष माहितीत आहेत. मी त्यांना सुप्रसिद्ध वगैरे कलावंतांपेक्षा श्रेष्ठ मानतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/21/2013 - 15:28

In reply to यश आणि धंदा by चित्रगुप्त

Permalink

अतिशय अचूक अन नेमका प्रतिसाद!

अतिशय अचूक अन नेमका प्रतिसाद!!! मान गये (पुनरेकवार) _/\_
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on गुरुवार, 11/21/2013 - 09:11

Permalink

काकडी कवळिच गोड़ लागते हो;)

.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on गुरुवार, 11/21/2013 - 11:31

In reply to काकडी कवळिच गोड़ लागते हो;) by अग्निकोल्हा

Permalink

कवळी काकडी

काकडी कवळिच गोड लागते हो
राईट्ट सर. आठवा यल्ल. मंगेशकरांची पन्नासच्या दशकातली गाणी.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/21/2013 - 15:27

In reply to कवळी काकडी by चित्रगुप्त

Permalink

"यल्ल मङ्गेशकर"

"यल्ल मङ्गेशकर" जबराट आवडले. यच्च मङ्गेशराव आठवले एकदम- त्यांसोबत 'तुम्बिन मोरी' त तोंड घालणार्‍या वरदाबाईपण =))
  • Log in or register to post comments

Submitted by खबो जाप on गुरुवार, 11/21/2013 - 09:23

Permalink

राज्य मिळवणं सोप असता पण

राज्य मिळवणं सोप असता पण टिकवणे अवघड असते म्हणतात त्यातला प्रकार आहे …. बस्स एव्हडच
  • Log in or register to post comments

Submitted by नानबा on गुरुवार, 11/21/2013 - 11:07

In reply to राज्य मिळवणं सोप असता पण by खबो जाप

Permalink

+१

राज्य मिळवणं सोप असता पण टिकवणे अवघड असते म्हणतात त्यातला प्रकार आहे ….
१००% सहमत. तुम्ही लेखात म्हटलंय ते ए आर रहमानच्या बाबतीत प्रचंड जाणवतं. रोजा, बॉम्बे, ताल, सपने, दिल ही दिल में, दिल से, लगान अशा एक से एक संगीतांनंतर त्यांचं पुढल्या चित्रपटांचं संगीत अगदीच सो सो आलं. मध्ये स्वदेस आला, पण रावन (अभिषेक ऐश्वर्याचा), जाने तू या जाने ना यांच्या संगीतातून रहमान प्रभाव दिसला नाही. (जाने तू चं संगीत त्याच्या कोण्या ज्युनियर गायक की कंपोझरने बनवलं होतं, आणि ते रहमानच्या नावावर वापरलं असं कुठेतरी वाचलं होतं) नुकत्याच आलेल्या रॉकस्टार मधून पुन्हा रहमानी संगीत दिसलं खरं, पण तुमचा मुद्दा त्याने पुराव्याने शाबित केला.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on गुरुवार, 11/21/2013 - 11:37

Permalink

प्रतिभाशक्तीची ही गंमत आहे.

प्रतिभाशक्तीची ही गंमत आहे. ती अनंत मानली (सदैव आपल्यासोबत राहील अशी खात्री बाळगली), की ती नाहीशी होते आणि ती गेली आहे आपल्याला सोडून असं मानलं की अचानक ती उगवते पुन्हा. मला वाटतं की प्रतिभावंतांचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचं तिच्याशी असणारं नातं बनवतो - तयार करतो. आणखी एकः सदैव प्रतिभेच्या शिखरावर एखादी व्यक्ती अपवादानेच राहू शकते. बाकी अनेकदा प्रतिभेच्या दोन क्षणांच्या दरम्यान बरंच काही मामुली असतं! प्रतिभाधारित धंदा (व्यवसाय या अर्थाने) केला की उत्तुंग आणि मामुली दोन्ही दिसतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on गुरुवार, 11/21/2013 - 13:20

Permalink

डोक्याबाहेरचा विषय

डोक्याबाहेरचा विषय :( अवांतर : पेर्‍या , हुच्चभ्रु व्हायच्या वळणावर जात आहेस याची नोंद घेतली आहे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 11/21/2013 - 14:49

In reply to डोक्याबाहेरचा विषय by सुहास..

Permalink

+१

अवांतराशी सहमत! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 11/21/2013 - 15:17

In reply to +१ by कवितानागेश

Permalink

श्या द्याचं काम न्हाई आदीच

श्या द्याचं काम न्हाई आदीच सांगुन ठिवतोय!
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 11/23/2013 - 20:14

In reply to श्या द्याचं काम न्हाई आदीच by प्यारे१

Permalink

प्रतिभा

प्यारे १ च्या प्रतिभेला सं पू र्ण निखार आलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 11/23/2013 - 20:20

In reply to प्रतिभा by विनायक प्रभू

Permalink

___/\___ कृ शि सा न वि वि सर!

___/\___ कृ शि सा न वि वि सर!
  • Log in or register to post comments

Submitted by जे.पी.मॉर्गन on गुरुवार, 11/21/2013 - 13:50

Permalink

बी अ स्टूडंट ऑल द टाईम

प्रतिसादांमधल्या बर्‍याच मुद्द्यांशी सहमत. मोदकाच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे - "एकदा एक विशिष्ट उंची गाठल्यानंतर तुमच्याकडे प्रतिभा आहे की नाही हा मुद्दा सर्वस्वी गौण ठरतो." रादर त्यानंतर प्रतिभा असणं हे गृहितच धरलेलं आहे. चित्रगुप्तनी म्हटल्याप्रमाणे गाणी असोत, सिनेमे असोत अथवा लेखन असो. सोर्‍या घेऊन जिलब्या टाकायची सवय लागली की संपलं! मी एक विचार मांडतो. तुमची प्रतिभा ही "प्रॉडक्ट" झाली की तिचा तुम्ही mass अथवा batch manufacturing सारखा उपयोग करायला लागता. पण तुमच्या प्रत्येक कलाकृतीकडे stand alone product म्हणून बघितलंत तर तुम्हीदेखील त्यात नाविन्य आणायला बघता. आणि आधीच्या यशाच्या प्रेमात न पडता समोर असलेल्या कामाकडे पुन्हा एक आव्हान म्हणून बघितलं तर तुमची पुढची कलाकृती पुन्हा एकदा फ्रेश असण्याची शक्यता वाढते. अजून एक म्हणजे अजिबात समाधान आणि हार न मानणं. सच्यानी बोर्डरला मागे टाकल्यावर "धिस इज इट" म्हटलं असतं, मूर्तींनी ५०० इन्फी लोकांची झाल्यावर हुश्श केलं असतं, किंवा थोरल्या बच्चनसाहेबांनी "लाल बादशाह", "तूफान", "इंद्रजीत" वगैरे नंतर "नाही बुवा झेपत आता" म्हणून निवृत्ती घेतली असती तर ही लोकं आज आहेत त्या ठिकाणी पोचली असती का? अजय-अतुलच्या एका मुलाखतीत त्यांनी ह्याचं सार एका वाक्यात मांडलं होतं. "आम्ही प्रत्येक गाण्याला सुरुवात करताना हे आमचं पहिलं गाणं आहे अश्या भावनेनं सुरुवात करतो आणि ते संपवताना हे आपलं शेवटचं गाणं आहे अश्या भावनेनी जीव तोडून काम करतो." जे.पी.
  • Log in or register to post comments

Submitted by पिशी अबोली on गुरुवार, 11/21/2013 - 14:24

Permalink

एक प्रसिद्ध कथा आहे ना, ज्यात

एक प्रसिद्ध कथा आहे ना, ज्यात एक चित्रकार अप्रतिम चित्रं काढत असतो. त्यांच्या गावातील धनिक ते बघून आश्चर्यचकित होऊन ते चित्र स्पर्धेला पाठवतो. त्याला अर्थात पुरस्कार मिळतो. पुढच्या वर्षीही चित्रकार चित्र काढतो, पाठवतो, पण त्याला काहीच मिळत नाही. त्या धनिकाने विचारल्यावर तो उत्तर देतो, 'आधी मी आनंदासाठी चित्रं काढायचो, यंदा स्पर्धेसाठी काढलं, प्रसिद्धीसाठी काढलं. यंदा त्याच्यात साधना नव्हती, महत्त्वाकांक्षा होती.' यश मिळाल्यावर साधनेची महत्त्वाकांक्षा बनते, म्हणून असं होत असेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on गुरुवार, 11/21/2013 - 14:45

Permalink

अवांतर

बाकी 'सान्त' शब्द पहिल्यांदाच 'सांत' असा वाचनात आला :-)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 11/21/2013 - 14:48

In reply to अवांतर by आतिवास

Permalink

तरी वाटतच होतं काहीतरी

तरी वाटतच होतं काहीतरी चुकल्यासारखं आत जाईपर्यंत : ए कोणे रे तिकडे? जरा बगा तै काय म्हनतेत ते! आत गेल्यावर : जरा दुरुस्ती करता का प्लिज? (संपादकांनी ह घ्या. नि दुरुस्तीनंतर उडवून टाका.)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/21/2013 - 15:26

In reply to तरी वाटतच होतं काहीतरी by प्यारे१

Permalink

मराठी पद्धतीनुसार

सांत आणि सान्त दोन्हींचाही उच्चार एकच आहे, सिमिलर उदा. म्हणजे घंटा-घण्टा, अंबा-अम्बा, शंख-शङ्ख, पंच-पञ्च, इ.इ.इ.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on गुरुवार, 11/21/2013 - 22:54

In reply to मराठी पद्धतीनुसार by बॅटमॅन

Permalink

रोचक

मला सांत मधे उगाच सा नाकात व् वरच्या पट्टीत परिणामी काहीसा दीर्घ बोल्ल्याचा भास होतो तर सान्त मधे न चा उच्चार तितकी पातळी/तीव्रता वरची व् दीर्घ राखत नाही वाटायचे
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/21/2013 - 23:42

In reply to रोचक by अग्निकोल्हा

Permalink

तो उच्चार हिंदीत साँत असा

तो उच्चार हिंदीत साँत असा दाखवतात. म्हणजे मेरे पास माँ है मधला माँ चा उच्चार. जो मराठीत मां म्हणून लिहितील तो. पण अनुस्वारानंतर क ते म या रेंजमधील ङ,ञ,ण,न,म हे वर्ण वगळता कुठलेही अक्षर आले तरी नुस्ता तो नाकातला उच्चार असा येत नै. तुम्ही म्हणता तो उच्चार संस्था, संवाद, इ. शब्दांत येतो, 'सौंस्था', 'सौंवाद', इ.इ.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अग्निकोल्हा

Submitted by अग्निकोल्हा on Fri, 11/22/2013 - 09:27

In reply to तो उच्चार हिंदीत साँत असा by बॅटमॅन

Permalink

रोचक माहिती.

.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sat, 11/23/2013 - 21:16

In reply to मराठी पद्धतीनुसार by बॅटमॅन

Permalink

टिळकांनी

संत, सन्त, सन्^त अशा तीन प्रकारे लिहिल्याचे आठवले.
  • Log in or register to post comments

Submitted by मिहिर on Sun, 11/24/2013 - 18:17

In reply to अवांतर by आतिवास

Permalink

युगान्त, वेदान्त वगैरे

युगान्त, वेदान्त वगैरे अन्तान्त्य शब्द युगांत (युगांमध्ये), वेदांत (वेदांमध्ये) वगैरेंपासून वेगळे दाखवण्यासाठी अंतान्त्य न लिहिता अन्तान्त्य लिहावेत असा नियम आहे. सगळ्या नियमांची यादी विकीवर सापडेल. त्याच प्रकारे त्यामुळे सान्त हा सांत (सांमध्ये (अनेक)) पासून वेगळे दाखवण्यासाठी सान्त असा नेहमी लिहिला जात असावा असा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 11/21/2013 - 15:05

Permalink

उत्तम विषय

असा सर्वसाधारण नियम करता येणार नाही. आठवा, जी ए आणि पु ल. आणि असे अनेक लेखक कवी, लता आशा, भीमसेन जोशी असे गायक, अनेक नर्तक. गायक आणि नर्तक नवे असताना बहुतांश कोणाची तरी नक्कल करताना आढळतात. काही काळाने त्यांना स्वतःचा सूर सापडतो. सतत अभ्यास करणार्‍याला नवी नवी शिखरे खुणावत रहातात. इतर काहींच्या बाबतीत ते आपल्याला पहिल्या भेटीत एकदम मनावर मोहिनी घालतात, पण नंतर परिचयांती ती जादू तेवढीशी जाणवत नाही, कारण आपण काही एक गोष्ट त्यांच्याकडून अपेक्षित असतो. काहीजणांची कुवत टिकून रहाण्यासारखी नसते. केवळ काही कारणाने ते एखादी चांगली कामगिरी करून जातात, पण मग ती परिस्थिती सतत न मिळाल्याने मग ते हळूहळू मागे पडतात. ज्यांचे सुरुवातीचे यश हे परिस्थितीवर जास्त अवलंबून असते त्यांच्या बाबतीत असे व्हायची शक्यता जास्त. मात्र जे खरे प्रतिभावंत आहेत आणि मेहनती आहेत त्यांची प्रतिभा आयुष्याच्या अंतापर्यंत साथ देते.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 11/21/2013 - 17:50

Permalink

मला वाटतं,

प्रतिभेला मर्यादा नाहीत ! मर्यादा आहेत त्या मनवी देहाला आणि जीवनाला. ज्ञानेश्वर आणखी जगले असते तर ज्ञानेश्वर्‍या' अनंत झाल्या असत्या. गांधीजी राहिले असते तर सत्य आणखी प्रखर झाले असते. न्यूटन अन आईनस्टाईन यांची आयुष्ये वाढली असती तर आपण आज कदाचित चंद्रा-मंगळावर रहात असू. प्रतिभा हा एक प्रवाह आहे. किती किनारे सरले तरी वहातच आहे. सरत्या जिवांनी उगवत्या जिवांना दिलेलं व्रत आहे. किती जीवने सरली तरी प्रतिभा नाही सरणार !
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Fri, 11/22/2013 - 04:48

In reply to मला वाटतं, by सस्नेह

Permalink

क्या बात है.

सुंदर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Fri, 11/22/2013 - 05:24

In reply to मला वाटतं, by सस्नेह

Permalink

सुंदर प्रतिसाद.

सुंदर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 11/24/2013 - 15:12

In reply to मला वाटतं, by सस्नेह

Permalink

अप्रतिम!

अप्रतिम!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on गुरुवार, 11/21/2013 - 18:42

Permalink

दोन मुद्दे

दोन मुद्दे १) पैसा प्रसिद्धी या गोष्टी क्षणभर बाजूला ठेवू. कलावंताला स्वतःच्या प्रयत्नांशी (मी मुद्दाम इथे प्रतिभा हा शब्द वापरत नाहीये) प्रामाणिक राहून काही सुचले, त्याने ते प्रत्यक्षात आणले (साहित्य,गाणे,चित्र, काहीही) आणि जर ते जनतेला आवडले नाही तर त्या कलावंताची प्रतिभा संपली असे म्हणायचे का? २) सोर्‍याने जिलब्या पाडणार्‍या लोकांविषयी चर्चा वरच्या प्रतिसादांमधे वाचली. एखाद्या कलाकृतीला जेव्हा व्यावसायिक स्वरूप देणे आवश्यक असते तेव्हा त्याला नैसर्गिकपणे टाईमलाईनचे बंधन येते. पण त्या टाईमलाईनप्रमाणे काम केल्यावर जर आधीच्या आणि नंतरच्या कलाकृतीमधे काही साम्य आढळले तर कलावंताची प्रतिभा संपली असे म्हणायचे का? अजून एका अँगलने पाहिल्यास कलावंताच्या प्रतिभेचे (वाढत्या/घटत्या) मोजमाप त्याच्या एकापाठोपाठच्या कलाकृतींमधल्या साम्यस्थळांवर करायचे की फरकांवर करायचे?
  • Log in or register to post comments

Submitted by एम.जी. on गुरुवार, 11/21/2013 - 18:57

Permalink

रहमानचा विषय निघालाच म्हणून .

रहमानचा विषय निघालाच म्हणून .... तामिळ अॅन्थेम बाय रहमान.. ऐकून बघा.. अप्रतिम कॉम्पोझिशन आहे.. व्हिजुअल्स सुरेख. करुणानिधी यांनी लिहिली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on Fri, 11/22/2013 - 10:37

Permalink

विचारशील धागा

धागा उत्तम आहे. वर मंडळींनी काही उत्तम प्रतिसादही दिले आहेत.... माझे दोन पैसे. ..... प्रतिभा ही अनंतच असते..... पण कधिकधी जर प्रतिभावंत मनस्वी असेल तर त्याला/तिला आपल्या कलाकृतीचं कसं स्वागत/मूल्यमापन होतंय याचीही काळजी असू शकते. जर ते मूल्यमापन ठराविक असेल, मग स्वागत म्हणा वा टीकात्मक म्हणा, तर त्या प्रतिभावंताला कंटाळा येऊ शकतो... आणि जर त्या प्रतिभावंताचं पोट त्या कलाकृती करण्यावर अवलंबून नसेल, तर तो कलाकॄती निर्माण करणं थांबवू ही शकतो!!! काय म्हणता?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 11/22/2013 - 11:21

In reply to विचारशील धागा by पिवळा डांबिस

Permalink

एकदम परफेक्ट.

एकदम परफेक्ट. म्हणजे अशा कलाकृती घडवुन घेणे दोन हाताची टाळि आहे. मग क्कलाक्रुतिसाठि प्रतिसाद की प्रतिसादासाठि कलाकृती?
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 11/23/2013 - 05:20

In reply to एकदम परफेक्ट. by अभ्या..

Permalink

कलेसाठी कलाकृती आणि कलेच्या

कलेसाठी कलाकृती आणि कलेच्या अविष्काराला मनापासून दाद म्हणून प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Sat, 11/23/2013 - 08:20

Permalink

चांगली चर्चा

चित्रगुप्त,मोदक, जेपी ह्यांचे प्रतिसाद वाचनीय
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 11/23/2013 - 09:27

Permalink

कुठलीही कलाकॄती घडुन यायला

कुठलीही कलाकॄती घडुन यायला बर्‍याच वेळा अनेक गोष्टी एकत्र घडुन याव्या लागतात... त्या एकत्र आल्या की मिळतो तो केवळ आनंद. :) ए आर रेहमान नाव घेतलं की मला Spirit of Unity Concert हेच आठवत बघं...त्याच संगीत मला आवडत पण हे थीम म्युझिक देणारा रेहमान कुठेतरी हरवला असे का कुणास ठावुक पण मला वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 11/23/2013 - 12:18

In reply to कुठलीही कलाकॄती घडुन यायला by मदनबाण

Permalink

त्याच संगीत मला आवडत पण हे

त्याच संगीत मला आवडत पण हे थीम म्युझिक देणारा रेहमान कुठेतरी हरवला असे का कुणास ठावुक पण मला वाटते. +१११११ (पुढील थीम्स ऐकताना हेडफोन जरूर वापरावेत..) __/\__
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 11/23/2013 - 21:53

Permalink

मोदकराव मग हे दोन पीस पण ऐका

मोदकराव मग हे दोन पीस पण ऐका :- बाकी अदनान सामी बद्धल सुद्धा माझं हेच मत झालयं जे एआर बद्धल ! त्यांचीही काही माझी आवडती गाणी देतो इथे :-
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद घारे on Sun, 11/24/2013 - 11:01

Permalink

ती येते आणिक जाते

"ती येते आणिक जाते येतांना कधी कळ्या आणिते आणि जातांना फुले मागते" असे आरती प्रभू यांनी प्रतिभेबद्दल लिहिले आहे. ती लहरी असते. कधी येईल, कसल्या कळ्या आणेल, त्या कितपत फुलतील वगैरे काही सांगता येत नाही. शिवाय कलेच्या बाबतीत बरे, चांगले, उत्तम, अप्रतिम, टाकाऊ, टुकार, असह्य वगैरेबद्दल सर्वमान्य निकषही नसतात. त्याशिवाय कोणतीहे कलाकृती हा प्रतिभेचा आविष्कार आहे की कलाकुसर आहे हे सुद्धा नक्की ठरवता येत नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Sun, 11/24/2013 - 11:11

Permalink

मादक ....आपल हे ...मोदक ...ही

मादक ....आपल हे ...मोदक ...ही पण एक प्रतिभा ..
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sun, 11/24/2013 - 11:49

Permalink

ंमुवि

मुवि ची आवडती (पहीला प्रतिसाद) प्रतिभा अशांत आणि अनंत म्हणावी का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sun, 11/24/2013 - 13:52

Permalink

प्रतिभा....कोणाची बटीक नाही.

प्रतिभा भूगर्भातील तेला प्रमाणे असावी. कुठला साठा लवकर संपतो तर कुठला दीर्घकाळ चालतच राहतो, चालतच राहतो. प्रतिभावंतासही आपल्या प्रतिभेवर जबरदस्ती करता येत नसावी. एकदा झालेले नांव चलनी नाण्यासारखे वापरल्यासारखे होते. परंतु, प्रामाणिकपणे साधना आणि त्या प्रतिभेची आर्जवे केल्यास पुन्हा कधी कधी प्रतिभा प्रसन्न होते आणि एखादी अजरामर कलाकृती साकार होते. मीपणा विसरून संपूर्ण समर्पण असेल तर कदाचित प्रतिभेला पुन्हा बहर येत असावा.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 11/24/2013 - 15:03

Permalink

नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा

प्रतिभेला खालील गोष्टींचे वावडे असते, असे दिसते: हव्यास, अहंकार, फाजील महत्वाकांक्षा, मत्सर, खोटारडेपणा, आळस, वगैरे. यांच्यामुळे प्रतिभा झाकोळली जाते. प्रतिभेला लागणारे विशेषण 'नवनवोन्मेषशालिनी' असे आहे. त्यामुळे साचेबंद पुनरावृतीत प्रतिभेला ग्रहण लागल्याचे जाणवते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sun, 11/24/2013 - 15:25

Permalink

सगळ्याच वाचक नि मुख्यत्वे

सगळ्याच वाचक नि मुख्यत्वे प्रतिसादकांचे हार्दिक आभार. सगळ्यांचेच प्रतिसाद भावले. मनाचा मोकळेपणा कुठल्याही प्रकारे व्यापला गेला की प्रतिभेला ग्रहण लागतं असं थोडकयात म्हणता येईल. काहीही सुचायला मन मोकळं असावं लागतं. विचार करुन करुन एखादी गोष्ट मूर्त स्वरुप धारण करेल पण कन्सेप्ट फेज मध्ये तिची ठिणगी पडायला नि ती जाणवायला मन मोकळंच असावं लागतं. आपलं मन सातत्यानं विचार करत असतं. त्यात सातत्यानं तरंग उमटत राहतात त्यामुळं त्याचा ठाव घेणं अवघड होऊन बसतं. तळ सापडत नाही. एखादी नवी कल्पना कधी विरुन गेली कळत देखील नाही. कलेच्या (सगळ्याच प्रकारच्या) अभिव्यक्तींची सुरुवात अशीच होत असावी. कलाकार तोच जो त्या ठिणगीला इतर भावभावनांच्या तुलनेत जास्त अवकाश देतो, तिला फुलवतो, मोठं करतो. प्रतिभावंतांच्या मांदियाळीत अनेकानेक लोक असताना देखील एखादाच 'लिजंड' बनतो त्याचं कारण देखील त्यानं मनाला जास्त मोकळं ठेवलेलं असतं. काही काम नाही म्हणून माणूस रिकामा असू शकतो, मोकळा नाही. का रे? आज तू मोकळा आहेस का असं विचारताना त्याला तू रिकामटेकडा आहेस का असं नाही विचारत आपण! तू त्या कामातून मला वेळ काढून देऊ शकतोस का असा त्याचा अर्थ. 'लिजंड्स' असं करु शकत असावेत. मनाची कवाडं स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर, क्रिया, प्रतिक्रिया, आनंदाचा, दु:खाचा आवेग, आशा, निराशा नि इतर सगळ्यासाठी हळूच बंद करुन मनाला मोकळं ठेवलं की आत आनंद निधान कायम आहेच की. आपण सगळेच असं करु शकतो. ठिणगी आपल्या आत देखील आहेच. क्रिया प्रतिक्रियांचे खेळ थांबवले तर! पटतंय???
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com