मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

प्यारे१ · · जनातलं, मनातलं
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा देवी नऊ दिवस अनुष्ठानाला बसली नि विजयादशमीदिवशी ह्या महिषासुराचा वध केला (चूकभूल द्या घ्या.) जास्त प्रस्तावना न करता ह्या दुर्गोत्सवाच्या निमित्तानं मागे गणपती आरतीचा आपण विचार केला तसा देवीच्या आरतीचा विचार करण्याचा प्रयत्न करुया. सुखकर्ता दु:खहर्ता लेखामध्ये म्हटल्याप्रमाणंच आरती प्रेम असे पर्यंत, अंतःकरणपूर्वक, एकाग्र होऊन, आर्ततेनं आळवली जावी. आरतीचा विचार करुया. दुर्गे दुर्घट भारी तुज विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी| वारि वारि जन्ममरणाते वारि, हारि पडलो आता संकट निवारी ||१|| जयदेवी जयदेवी महिषा सुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी जयदेवी || धृ|| त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसे नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही| साहि विवाद करिता पडिले प्रवाही, ते तू भक्तालागि पावसी लवलाही ||२|| जयदेवी जयदेवी .... प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा, क्लेषापासुनि सोडी, तोडी भवपाशा| अंबे तुजवाचोनि कोण पुरविल आशा, नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा ||३|| जयदेवी जयदेवी .... आरती कुणी रचली ह्याबाबत थोडा प्रवाद असावा. नरहरी हे नाव आरतीत येतं. नरहरी सोनार खरंतर शिवाचे भक्त. विठठलाच्या कमरेचा हार बनवण्याचं निमित्त होऊन दोन दैवतामधलं अद्वैत उमजलं अशी कथा आपल्याला परिचित आहे. कदाचित अशी अनुभूति आल्यानंतर त्यांनी ती आरती रचली असावी. कुणी म्हणतं रामदासस्वामींनी रचलेली आरती आहे. रचनाकार कुणीही असला तरी मुळातच दोघेही अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे भक्त व तत्त्वज्ञ असल्यानं आपण त्याबाबत जास्त विचार न करता ‘आम खाने के पीछे’ जाऊया. आरती कोणी रचली ह्याबाबत न करता कुणाची आरती केलेली आहे ह्याचा विचार करता आरती देवीची आहे हे मात्र नक्की समजून येतं. मात्र ह्याबाबत थोडा सूक्ष्म विचार करण्याची गरज आहे. नेमकी आरती कुणाची केली आहे? हल्ली दहा दिवस बाजारात येणार्‍या आठभुजा असलेल्या, देखण्या, प्रमाणबद्ध मूर्तीची, देवळात असलेल्या सोन्याच्या दागिन्यांनी मढवलेल्या मूर्तीची की आणखी कशाची? कधीकधी शब्द थोडे पुढंमागं करुन बघितले की आपल्याला नेमकं विषयाचा गाभा काय ते कळतं. 'जयदेवी जयदेवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी' असं म्हटलेलं आढळतं. इथं एक विशेषण दिसतं... सुरवरईश्वरवरदा. सुरवरांनाच काय म्हणजे देवतांनाच काय तर ईश्वरालाही वर देणारी, शक्ती प्रदान करणारी अशी जी कुणी ती ही शक्ती आहे. तिची ही आरती आहे. असं काही असतं का हो? थोडं मागं जाऊ. कुठंच काहीच्च नव्हतं तेव्हा! कधीतरी काहीतरी हालचाल झाली नि सृष्टी निर्माण झाली. चराचराची व्यवस्था अत्यंत पारदर्शकपणं चालवली जाणारी व्यवस्था म्हणजे ईश्वर. तो सृष्टीबरोबर उत्पन्न होतो नि तिच्याबरोबरच लय देखील पावतो. मानवी आयुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रचंड मोठ्या 'स्केल'वर हे सगळं सुरु असतं. त्यामुळं मानवी मनाला त्याचा विचार तेवढ्या मोठ्या पातळीवर करताना तसाच व्यापक विचार करावा लागतो. अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे. (बाकी मतांतराला वाव आहेच.) ज्या शक्तीमुळे ईश्वराला कार्य करण्याचं बळ मिळतं, त्या त्या अनुरुप कार्य करणार्‍या देवतांना (कार्यानुसार नाव ब्रह्मा, विष्णू, महेश नि इतर ) ताकद मिळते (उत्पत्ती- निर्माण करणं, स्थिती- सांभाळणं नि लय- संहार करणं) त्या सगळ्याचा विचार आपल्याला एका 'सुरवरईश्वरवरदा' ह्या शब्दातून करता येतो. तिला आपण मानवानंच माऊलीरुप, मातारुप मानून तिची पूजा करता यावी म्हणून सगुणात आणली. इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली. पाकिटात असलेला कागदाचा फोटो जसा आपल्या आईवडलांची आठवण करुन देतो तसं ही मूर्ती मला त्या भगवद्शक्तीची आठवण करुन देणारी असली पाहिजे. आणखी एक शब्द आहे महिषासुरमर्दिनी. वर म्हटल्याप्रमाणं पुराणात कधीतरी एक महिषासुर नावाचा राक्षस सगळ्यांना त्रास देत होता नि त्याला देवीनं मारलं. आपण देवीचा जयजयकार म्हणून गप्प बसावं का? की ह्या महिषासुराचा नि माझा काही संबंध आहे का? तर ह्याचं उत्तर आहे असं आहे. महिष म्हणजे रेडा. रेडा हे घोर अज्ञानाचं प्रतिक आहे. अज्ञान म्हणजे अशिक्षितपण, अक्षरओळख नसणे. शालेय अभ्यास नसणं ह्या अर्थानं अज्ञान नाही. तर मी कोण? माझं जन्माचं प्रयोजन काय? ध्येय काय? ते समजण्यासाठी काय करावं लागतं? ह्या सगळ्याबद्दलची जाणीव नसणे म्हणजे अज्ञान. त्या दृष्टीकोनातून बरेच लोक अज्ञानी ठरतात. इथं आपण त्रागा करु शकण्याची दाट शक्यता आहे. मात्र ही वस्तुस्थिती आहे. जगण्याची उद्दिष्टं अनेक असू शकतात, ती वेळेनुसार, कालानुरुप बदलू शकतात, बदलावीत. मात्र ध्येय एकच असावं ते म्हणजे आत्मशोध. मी नक्की कोण आहे नि काय मिळवायचंय ह्याचा विचार करुन त्याचा पाठपुरावा करणं हे माणसाच्या आयुष्याचं ध्येय आहे. (शब्दांची अदलाबदल केली 'एक्स' ला वाय नि वाय ला एक्स म्हटलं तरी चालू शकेलच. अर्थ बदलत नाही) तर अशा ह्या अज्ञानरुपी रेड्याला मारुन आपल्यामध्येच आत असणारी ही दुर्गामाता आपल्याला प्रसन्न होऊ शकते. त्या दृष्टीनं 'महिषासुरमर्दिनी' ह्या नावाचा विचार करण्याची गरज आहे. वरच्या शब्दांचा पुरेपूर अर्थ समजला की पुढची आरती समजायला मदत होते. देवीला दुर्गा म्हणताना ह्या प्रपंचाला, संसाराला दुर्घट असं म्हटलेलं आहे. दुर्ग म्हणजे किल्ला नि दुर्गा म्हणजे त्याची किल्लेदार अशा अर्थानंही विचार होतो. ज्याप्रमाणं एखाद्या कारागृहाचा प्रमुख असतो तशी जणू ही दुर्गा आहे नि हा जो संसार रगाडा आहे तो म्हणजे कारागृह आहे. बाहेर पडायचं तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे किल्लेदारालाच पटवणे, त्याच्या मर्जीतलं बनणे. म्ह्णून म्हणतात, दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ... तुझ्या कृपेशिवाय हा संसाराचा भार खूप अवघड आहे. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी... इथं पुन्हा थांबायची गरज आहे. काय आहेत हे शब्द? अनाथनाथ अंबा म्हणजे कुणी अनाथाश्रम उघडलेली एन जी ओ नाही! खरंतर, कोण अनाथ आहे? करुणा म्हणजे काय? विस्तारी म्हणजे? आहे का मुळात करुणा? विस्तारी म्हणजे विस्तार कर, वाढव म्हणजे काय? इथं थोडा पारमार्थिक विचार आहे. 'तुझिया वियोगे जीवित्व आले' असं समर्थ रामदास म्हणतात. अत्यंत आनंदाचा, सुखाचा अनुभव हेच ज्याचं स्वरुप आहे असा मी, मूळस्वरुपाला विसरलो नि जीवभाव घेऊन जन्म पावलो. एखाद्या अत्यंत श्रीमंत, यशस्वी माणसाचा मुलगा अपघातात स्मृती घालवून बसल्यानं भीक मागू लागतो तसा मी खरा आतमध्ये आनंदरुपच असताना सुखासाठी बाहेरच्या सुखांच्या मागं लागतो नि 'अनाथ' बनतो. काल सचिन रिटायर झाला. क्रिकेट तेच, खेळ तोच, नियम तेच पण मला आता आनंद वाटेना. सुख खेळात आहे की माझ्या बघण्यात? मी रानावनात अडकून बसलोय, मला प्रचंड भूक लागलीये नि समोर एक सुंदर स्त्री मला आलिंगन द्यायला येतेय. सुख वाटेल? तीच गोष्ट दुसरीकडून. एका अत्यंत गरीब नि ओबड्धोबड दिसणार्‍या झोपडीत मला शिळी भाकरी नि चटणी मिळाली तर मला ती अत्यंत चांगली वाटेल. सुख नक्की कुठं आहे नि ते कसं मिळेल हे न समजल्यानं मी अनाथ, पोरका, दीनवाणा झालो आहे. अशा अनाथांची नाथ अशी ही अंबा आपली करुणा विस्तारुन मला पदरात घेऊ दे. करुणा उत्पन्न करुन का नाहीत म्हणत हो? कारण करुणा आधीपासूनच आहे आपल्या लक्षात येत नाहीये. एका बीजापोटी उत्पन्न होणारी अनेक कणसं माणसाच्या आवाक्यातलं काम नाहीये ना? हीच ती करुणा. जगण्याला आवश्यक प्रत्येक गोष्ट ह्याच पृथ्वीवरुन आपण हजारो वर्षांपासून घेत आलेलो आहोत. आजचं चकचकीतपण आपल्याला ते विसरायला भाग पाडतंय एवढंच. ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार तरी कमी होईल. पुढं जाऊन 'वारि वारि जन्ममरणाते वारि हारि पडलो आता संकट निवारी' असं म्हणतात. पुन्हा तेच आहे. वारि वारि म्हणजे हे माते तू ह्याचं निवारण कर. हारि पडलोय- कंटाळलोय. संकटाचं निवारण कर. जन्माला आल्यापासून आपण काय किंमत देऊन काय कमावतो ह्याचा विचार करता 'सुख कमी नि दु:ख जास्त' असाच विचार पक्का होतो. मिळणार्‍या सुखामागे देखील किती कष्ट असतात ह्याचा विचार करता हे कधीतरी संपावं हा 'वास्तववादी' विचार डोकावल्यावाचून राहत नाही. त्यामुळंच ह्या जन्ममरणाच्या फेर्‍यातून सोडव ही विनंती करावी लागते. मात्र जेव्हा विनंतीच्या मागे; काय विनंती, कुठं करायची, नि कशी करायची हा नेमका विचार असेल, तेव्हा त्या विनंतीचा निश्चितच पाठपुरावा होतो नि जे मिळवायचं ते मिळवलं जातं. गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणं अशी भगवंताच्यी, शक्तीच्या निश्चित रुपाची मांडणी समोर आली की माणूस निर्भय बनतो नि त्याला संकट हे संकट ह्या स्वरुपात न वाटल्यानं ते आपोआप निवारलं जातं. दृष्टीकोनच बदलून जातो. पुढच्या कडव्यांमध्ये बरीचशी वस्तुस्थिती, थोडासा अर्थवाद नि स्तुती आहे. 'त्रिभुवनी पाहता तुज ऐसी नाही, चारी (वेद) श्रमले परंतु (त्यांना तुझ्याबद्दल) न बोलवे काही, साही (शास्त्रं) विचार करुन करुन (जणू प्रवाह)पतित झाले , (अशी) ते तू भक्तालागि पावसी लवलाही.' आज देखील 'विज्ञान' (तंत्रज्ञान नव्हे) सृष्टीच्या उत्पत्तीचा, त्या मूळ शक्तीचा मूलगामी विचार करत आहे. थांगपत्ता लागायला अजूनही तयार नाही. त्याच अनुषंगानं चारी वेद, साही शास्त्रे वर्णन करु शकत नाहीत असं मानलं गेलं आहे. मात्र अशी तू भक्तासाठी मात्र तातडीनं धावून येतेस. अट 'भक्त' असण्याची आहे. प्रसन्न वदन अशा हे देवी तू आम्हाला प्रसन्न हो. संसारक्लेषापासून सोडवून, भवपाश तोड. इथं परत थांबावं लागतं. त्रागा करुन सोडव म्हणणं आहे की मोकळं कर? भवपाश तोड म्हणजे एखादा दोर कुर्‍हाडीने तोडल्यासारखं तोड असं आहे का? तर ह्या भवपाशाचं स्वरुप जेव्हा समजेल तेव्हा त्याचक्षणी गळून पडणारा अशा स्वरुपाचं आहे. समजायला थोडं अवघड वाटतं मात्र उदाहरणानं समजेल. एखाद्या बैलाला अथवा गाढवाला लहानपणापासून एखाद्या खुंटीला दोरीनं बांधलं तर तो सुटून जाण्याचा प्रयत्न सुरुवातीला करत करत नंतर दोरी नि खुंटी दिसली की शांत उभं राहून प्रयत्न टाळतो. तसं सातत्यानं 'माझेपणा' नि 'मी' पणाच्या दोरांनी माणूस इतका अडकला जातो की ते बंधन, तो पाश सुटता सुटत नाही. एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत. असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे. १. हे असं नेमकं कसं होतं त्याबद्दल सर्व संतांचे पाय पकडावे लागतात. २. ऋणनिर्देश : डॉ. श्री. द. देशमुख ह्यांचे प्रवचन.

वाचने 45715 वाचनखूण प्रतिक्रिया 123

स्पंदना Fri, 10/11/2013 - 05:38
माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच....... जरा वाद घालायची खुमखुमी येतेय. पण नक्की शब्द सापडत नाही आहेत. म्हणजे अति मी पणा कधीही वाईटच, पण माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल? या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चाम्गल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी. आता माझ घर जळल्यावर मला वाईट नाहे वाटायच तर कोणाला? ही आत्मियतापण सोडायची का? असो. शेवटी गदिमा म्हणतात तेच खर. - ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडीतले सखे सवंगडी, हातकडी ही अवजड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला.... लेख छान अन ओघवता आहे. फक्त एक आरती धरुन तिच्याद्वारे विश्लेषण सुरेख जमलय.

In reply to by स्पंदना

विटेकर Fri, 10/11/2013 - 10:16
अतिशय सनयोचित आणि सुरेख लेखन , धागाकर्त्याचे अभिनंदन ! पण माझेपण नसेल तर अत्मियता कशी वाटेल? या एका भावनेपोटीच तर सारं जग वाढतय, जे काही चाम्गल वाईट घडतय ते ही याच भावनेपोटी अपर्णाताई , उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय , माझेच बरोबर आहे असा अजिबात दावा नाही ! माझेपण / आत्मीयता ही भावना विसर्जित करणे हेच खरे अध्यात्म आहे ! मी आणि "तो"कोणी वेगळा आहे ही भावना नष्ट करणे हीच शेवट्ची पायरी , तिथे द्वैत सरले ! मग कर्म कसे करायचे ? कार्य घड्णार कसे ? कर्ताच नसेल तर गोष्टी घडतीलच कशा ? ज्याच्याबद्दल आत्मियता नाही ते होणार कसे ? असाच काहीसा तुमचा प्रश्न आहे असे मला वाटते. एकदा द्वैत सरले की "मी माझे" आणि "ते त्याचे" सारे एकच होऊन जाते, मी मीच रहात नाही , तो ही नाही.. अवघा रंग एक झाला ! खेम देऊ गेली तरी पाऊलची ना दिसे , उभाचे स्वयंभू असे ! मग मी आणि तो असा भेद राहीला कोठे ? मग जे घडते ( ज्ञानोत्तर कर्म ) ते सारे त्याचीच इच्छा ! माझा श्वास , माझे जगणे , ही सारी त्याचीच इच्छा ! माझे कर्तृत्व हे देखील त्याचेच ! माझे असे शिल्लक आहे काय? कर्तृत्व त्याचे भोग ही त्याचेच ! त्याचे श्रेय ही माझे नाही आणि अपश्रेय हे माझे नाही ! राम कर्ता ऐसे म्हणशी त्याने पावसी यश कीर्ती प्रताप ! माझ घर जळल्यावर मला वाईट नाहे वाटायच तर कोणाला? घर तुझे होते कुठे ? पशु म्हणती आमुचें घर| दासी म्हणती आमुचें घर |घरीचीं म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४४|| पाहुणे म्हणती आमुचें घर| मित्र म्हणती आमुचें घर |ग्रामस्त म्हणती आमुचें घर| निश्चयेंसीं ||४५|| तश्कर म्हणती आमुचें घर| राजकी म्हणती आमुचें घर |अग्नि म्हणती आमुचें घर| भस्म करूं ||४६|| समस्त म्हणती घर माझें| हें मूर्खहि म्हणे माझें माझें |सेवट जड जालें वोझें| टाकिला देश ||४७|| आई- बाप , बंधू , पुत्र आपले नाहीत , बाकीच्या काय गोष्टी? तुवां भोगिल्या पुनरावृत्ती| ऐसीं मायबापें किती |स्त्री कन्या पुत्र होती| लक्षानलक्ष ||५१|| कर्मयोगें सकळ मिळालीं| येके स्थळीं जन्मास आलीं |तें तुवां आपुलीं मानिलीं| कैसीं रे पढतमूर्खा ||५२||

In reply to by स्पंदना

प्यारे१ Fri, 10/11/2013 - 11:48
माझेपणा सोडायचा म्हणजे त्याची मालकी नाही सोडायची. त्याबद्दल वाटणारं अनाठायी प्रेम सोडायचं. घर जळाल्या'नंतर' (जर आपण घरापासून लांब असू तर काहीच्च करता येत नसल्यानं) दु:ख वाटणं स्वाभाविक आहे. मात्र वाटणार्‍या दु:खाला उगाळत बसून काहीच साध्य होत नाही. त्यानं खचून जाऊन , निराश होऊन जाण्यापेक्षा नंतर असा प्रसंग येऊ नये, आला तर काय करावं, ह्या ऐवजी दुसरा काही प्रसंग आल्यास काय करावं असा सर्वांगीण विचार करावा. घर हे फक्त एक उदाहरण आहे. असेच इतर प्रसंग देखील असतात. बाके आत्मीयता दाखवण्यासाठी असावी की 'असण्यासाठी' असावी? दाखवण्यापुरता जो 'कार्यक्रम' असतो त्यामध्ये बर्‍याचदा मी अमुकसाठी तमुक केलं चा बडेजाव असतो. ते न करता 'माझ्या वाटेला आलेली कर्तव्यकर्मं मी व्यवस्थित पार पाडली' तर तो देखील एक भगवदप्राप्तीचाच एक मार्ग म्हणजे कर्मयोग आहे. हा भाग देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मुलाची जबाबदारी अत्यंत प्रेमानं पार पाडताना तो शाळेत गेला तरी त्याचाच विचार करत बसणे ही आत्मीयता ठरते का? की शाळेत गेल्याक्षणी स्वीच ऑफ करुन आत मध्ये आपला वेगळा विचार सुरु असावा? योग्य पद्धतीनं केलेला एक विचार पुन्हा पुन्हा संकल्प विकल्प करण्यापासून 'उगाळत' बसण्यापासून मोकळं करतो. काम तेच मात्र आता अ‍ॅप्रोच वेगळा असतो. इथं थोडंस्सं 'स्मार्ट'पणा दाखवावा की आपल्या माणसाला हा बदल न समजता हे आतल्या आत घडावं. त्यानं योग्य बदल घडतो. शेवटी ही स्वतःची लढाई असते. फक्त स्वतःची.

In reply to by यशोधरा

प्रचेतस Fri, 10/11/2013 - 09:46
हाहा. पहिले खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरातले, दुसरे वेरूळच्या रामेश्वर लेणीतले आणि तिसरे सासवडमधल्या चांगावटेश्वर मंदिरातल्या स्तंभावरचे.

In reply to by प्रचेतस

विटेकर Fri, 10/11/2013 - 10:29
वल्ला ..वल्ला .. ( अप्रतिम तरी कितीवेळा म्हणायचे ) तुमच्या पोतडीत अजून पुष्कळ काही असेल , काढा ना जरा ..केवळ देवी या विषयाला धरुन !

In reply to by प्रचेतस

प्यारे१ Fri, 10/11/2013 - 12:02
अप्रतिमच. इतिहासकार, लेखात म्हटल्याप्रमाणं देवीची उपासना नि तिची वेगवेगळी रुपं ह्याबद्दल येऊ दे की माहिती.

In reply to by प्यारे१

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 12:19
मला मित्राने असे सांगितले होते की देवीची जी शक्तीपिठे आहेत तिथे देवीच्या मुद्रा वेगवेगळ्या आहेत. देवीने एके ठीकाणी महीषासुराचा वध केला तिथे देवीची उग्र मुद्रा आहे. नंतर देवी दुसर्‍या शक्तीपिठाच्या ठीकाणी गेली तिथे शांत / सात्विक मुद्रा आहे. याबद्दल कोणाला माहीती असेल तर जरुर सांगा. साडे तीन (?) शक्तीपिठे कोणती आणि कोणत्या क्रमाने येतात?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

धन्या Fri, 10/11/2013 - 15:54
साडे तीन (?) शक्तीपिठे कोणती आणि कोणत्या क्रमाने येतात?
साडे तीन शक्तीपिठे कोणती हा प्रश्न समजण्यासारखा आहे. परंतू ती कोणत्या क्रमाने येतात असा विचार मात्र अनाकलनिय आहे. एकाच देवीच्या वेगवेगळ्या रुपांमध्ये भक्त क्रमवारी लावतात हे पचनी पडत नाही.

In reply to by धन्या

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 16:21
अहो क्रम म्हणजे मान किंवा महत्व असे नाही. मी वरती जी अख्यायिका सांगितली आहे (अर्धवट) त्यासंदर्भात विचारलाय. मी ऐकलेली अख्यायिका देवीने राक्षसाचा वध केला (१ शक्तीपीठ उग्रावतार) ते एक ठीकाण नंतर देवी एके ठीकाणी आली.. उग्रावतार शांत झाला(दुसरे शक्तीपीठ) त्यानंतर अजुन एका ठीकाणी सात्विक भाव (तिसरे शक्तीपीठ) आहेत अशी काहीशी आहे. तो क्रम कोणता? ती ठिकाणे कोणती? पुर्ण शक्तीपीठे कोणती आणि अर्ध शक्तीपीठ कोणते (तुळजापुर आणि कोल्हापुर यात आहेत इतकेच माहीत आहे) बादवे काही लोक अष्ट्विनायक पण शास्त्रोक्त करतात (मोरगाव ते मोरगाव) ठराविक क्रमानेच याचाही अर्थ माहीत नाही आणि हे का हे माझ्याही पचनी पडत नाही.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Sat, 10/12/2013 - 16:48
नासिक जवळचं वणी हे अर्धं आहे. आणखी देवीचं ठिकाण कुठलं याचा शोध घेतला तर मिळालं. लिंक जोडता आली नाही. https://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=500

In reply to by प्यारे१

प्रचेतस Fri, 10/11/2013 - 12:22
देवीची उपासनापद्धती नेमकी कधी चालू ते माहिती नाही. वेदांत देवीची सूक्ते नाहीत पण देवीपूजा (स्त्रीरूपी शक्तीची) पूजा वैदिक काळाच्याही आधीची आहे असे मला वाटते. लज्जागौरीमध्ये याचे स्पष्टीकरण रा. चिं. ढेरे यांनी दिलेले आहे बहुधा (ते पुस्तक मी वाचलेले नाही) देवीची सगुण रूपात उपासना मात्र गुप्तकाळापासून चालू झालेली असावी. बाकी देवींची जुनी शिल्पे देऊन लेख लिहिण्याचा विचार होता पण टंकाळा.

किसन शिंदे Fri, 10/11/2013 - 10:00
प्यारे सुरेख विवेचन लिहलेयंस. बाकी देवीची हि आरती सुखकर्ता दूखहर्ता आणि लवलवथी विक्राळाबरोबरच त्यातल्या शब्दसाधर्म्यामूळे संत नरहरी सोनारांपेक्षा समर्थांचीच अधिक वाटते.

In reply to by किसन शिंदे

प्रचेतस Fri, 10/11/2013 - 12:38
ती नरहरींचीच आहे. पण समर्थांनी एक ग्रेट आरती रचलीय. आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनि हो ।

In reply to by प्रचेतस

विटेकर Fri, 10/11/2013 - 15:06
माझ्या माहितीप्रमाणे ही आरती श्री समर्थांनीच केली आहे. नरहरी हा समर्थशिष्य त्यावेळी उपस्थित होता , त्याची भावविभोर अवस्था झाली .. पुन्हा एकदा खात्री करुन घेईन. आश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो । प्रतिपदेपासूनी घटस्थापना ती करुनि हो । ही नऊ कडव्याण्ची आरती ही सुरेख आहे. याची चाल कोणाला माहीती आहे का ?

In reply to by प्रचेतस

विटेकर Fri, 10/11/2013 - 16:25
मग हे संत नरहरी सोनार नव्हेत का? माझ्या माहितीप्रमाणे नरहरी सोनार संत नामदेवांच्या समकालीन होते आणि त्यांचे अभंग पाहिल्यावर ही रचना त्यांची नसावी असे वाटते. बाकी, अवघे करणे जगदिशाचे आणि कवित्व काय मनुष्याचे असे समर्थांनीच म्हणून ठेवले आहे .

In reply to by विटेकर

वाचक्नवी Fri, 09/26/2014 - 00:37
समर्थ रामदासांनी लिहिलेली ही आरती म्हणताना शब्दांची खूप ऒढाताण करावी लागते. पहिल्या दोन कडव्यांची तशी ओढाताण करून खाली दाखविली आहे.:- आश्विन शुद्ध, पक्षींऽ अंबा, बैसलि सिंहाऽसनींऽ हो । प्रतीऽपदे-पासुनी घऽटस्-थापऽना ती करुनीऽ हो । मूलमंत्रजप करुनि भोंवते, रक्षऽक ठेऽवुनीऽ हो । ब्रह्माविष्णु रुद्रआइचें, पूऽजन करिती हो ।। १ ।। उदोऽ बोला उदोऽ अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो । उदोकारें गर्जति काऽय, महिमा वर्णूऽ तिचाऽ हो । उदोऽ बोला उदऽो अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो ।। ध्रु .।। द्वितीऽयेचे दिवशींऽ, मिळतीऽ चौसष्ट योऽगिनीऽ हो । सकळांमध्यें श्रेष्ठऽ परशूऽ, रामाचीऽ जननी हो । कस्तुरि मळवट, भांगीं शेंदुर, भरुनीऽ हो । उदोकारें गर्जती सकळऽ, चामुंडाऽ मिळुनीऽ हो ।। २ ।। उदोऽ बोला उदोऽ अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो । उदोकारें गर्जति काऽय, महिमा वर्णूऽ तिचाऽ हो । उदोऽ बोला उदऽो अंबा, बाईऽ माऊऽलिचा हो ।। ध्रु .।। यू-ट्यूबवर ही आरती अनुराधा पौड्वाल यांच्या सुरात https://www.youtube.com/watch?v=_Xdprjt80Iw येथे आहे.

विटेकर Fri, 10/11/2013 - 10:26
काय मस्त आणि नेमकं लिहिलय ! अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये काहीच नाही म्हणताना देखील त्या नाहीमध्ये असणारं अस्तित्व (काहीच नाही म्हणजे निर्वात पोकळी तरी 'आहे' ना?) म्हणजे ब्रह्म तत्त्व नि त्या खालोखाल वर म्हटलेली हालचाल ती मूळमाया. तिच्यातून उत्पन्न गुणमाया मग जडमाया नंतर त्रिविधा प्रकृती, पंचमहाभूते असा क्रम आहे. खरंच थोडा विचार केला तर विज्ञानाला समांतर असा हा विचार आहे पार्टिकल थियरी इथेच येऊन थांबणार आहे !पण आधिक महत्वाचे.
ह्या 'एकोऽहम बहुस्याम' च्या प्रक्रियेमागं नक्की काय दडलंय हे रुक्षपणे जाणून घेण्यातून साध्य काय होणार आहे? त्यापेक्षा त्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली तर आपला अहंकार तरी कमी होईल.
सहमत ! काय मजा आहे त्यात..देवा तुझा मी सोनार !

सौंदाळा Fri, 10/11/2013 - 11:58
आधीचा आणि हा दोन्ही लेख आवडले. छानच लिहिले आहे. शाळेत संदर्भासहीत स्पष्टीकरण लिहायचो (८,९, १० वीला) त्याची आठवण झाली. संदर्भासहीत स्पष्टीकरण मला जमायचे नाही खास पण तुमचे स्पष्टीकरण / विवेचन सुरेखच.

आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं.
म्हणजे यात महिषासुरमर्दिनीचा काहीएक हात नाही! आणि त्या आधी म्हटलंय :
इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.
याला म्हणतात गोलमाल लॉजिक. ते स्वचा उलगडाही होऊ देत नाही आणि भोंगळ विनम्रतेला निरहंकारिता म्हणून मिरवायला मदत करतं. अर्थात, अशांचाच भरणा भारंभार असल्यानं पब्लिक भावभोळ्या आरत्या करून भवसागर पार होईल अशी आशा करतं. आरतीला घंटा वाजवतात आणि काहीही अर्थ नसला की `घंटा अर्थ नाही म्हणतात ' त्याचा उत्तम नमुना! ...चालू द्या आरती!

In reply to by संजय क्षीरसागर

प्यारे१ Fri, 10/11/2013 - 12:23
प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे. आरती सुरु आहेच, आपणदेखील 'लेकुरासाठी पंते हाती धरिली पाटी' करा. बाकी हाच शेवटचा आहे.

In reply to by प्यारे१

आणि मग कशीही घंटा वाजवा. मी अशा पोस्ट उघडणार देखिल नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 14:51
असा समजूतदारपणा माझ्या लेखांवर प्रतिसाद देतांना दाखवा
आयला! परस्परं प्रशंसन्ति ची अपेक्षा चक्क तुमच्याकडून??? डोळे पाणावले. पैसा, वेळ यांप्रमाणेच प्रसिद्धीही एक भ्रमच आहे नैका? ३१ जुलैच्या भ्रामक कामांतून सवड मिळालेली दिसतेय =))

In reply to by बॅटमॅन

धन्या Fri, 10/11/2013 - 15:42
किंवा असंही म्हणता येईल, तू आपुनके येरीयामे नय आनेका. और आपुन तेरे येरीयामे नय आयेगा. मांडवली करण्याची पद्धत आवडली. :)

In reply to by धन्या

स्वतःच्या भावनांचा प्रश्न काढला तेंव्हा मी सोडून दिलं. पक्षीनामवाचक सदस्यानी मला व्य.नि. करुन प्रश्न विचारले आहेत. आणि प्राणीनामवाचक सदस्याला काही समजण्याची शक्यता नाही तस्मात त्यांना उत्तरं देत नाही. देवीबिवीला घाबरणं किंवा तिच्या करुणेच्या विस्तारीची अपेक्षा करणं म्हणजे स्वत:च्या कल्पनेचे खेळ आहेत. लेखकानं योग्य तो समजूतदारपणा दाखवला आहे त्यामुळे इथे थांबतो.

In reply to by संजय क्षीरसागर

अग्निकोल्हा Fri, 10/11/2013 - 16:13
देवीबिवीला घाबरणं किंवा तिच्या करुणेच्या विस्तारीची अपेक्षा करणं म्हणजे स्वत:च्या कल्पनेचे खेळ आहेत.
हे विधान असत्य आहे व मी ही गोष्ट तुम्हि लावाल त्या कसोटीवर फक्त तुम्हापुढे (प्रत्यक्ष अनुभवातुन निव्वळ चर्चेने न्हवे) सिध्द करण्यास तयार आहे. बोला तुमच्यात आहे तयारी हे आव्हान देण्याची ?

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 16:21
प्राणीनामवाचक सदस्याला काही समजण्याची शक्यता नाही तस्मात त्यांना उत्तरं देत नाही.
जे आपला उदोउदो करत नाहीत त्यांना असे फाट्यावर मारायचा केविलवाणा प्रयत्न आवडला.

In reply to by बॅटमॅन

न तुमच्याकडे त्याविषयी काही समज. फक्त व्यक्तिगत प्रतिसाद देणं इतकाच काय तो हातखंडा. (पाहा तुमचा इथला पहिला प्रतिसाद) तस्मात या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करतो.

In reply to by संजय क्षीरसागर

बॅटमॅन Fri, 10/11/2013 - 16:37
मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ बरी इतके तुमचे शब्दबुडबुडे जबरी असतात, त्यामुळे तुमच्या मनोरंजन क्षमतेला एक कडक सॅल्यूट!

In reply to by बॅटमॅन

विटेकर Fri, 10/11/2013 - 17:46
मृगजळात लावलेल्या कल्पवृक्षाच्या फुलांची वंध्याकन्येने घातलेली माळ बरी इतके तुमचे शब्दबुडबुडे हा वि स खांडेकर प्रभाव का ? त्यातला फक्त जबरी शब्द बदला ...

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Fri, 10/11/2013 - 17:05
माझा लेख भोंगळ होताच. परंतू माझी तेव्हाची आकलन शक्ती तेव्हढीच होती. मी रोज वाचन करतो. अर्थात माझे वाचन स्वतःला सुधारण्यासाठी असते, जगाला सुधारण्यासाठी नाही. त्यामुळे वाचनाने मला माझ्या धारणा चुकीच्या वाटल्या तर त्या बदलण्याचा प्रयत्न करतो. माझं म्हणणं अंतिम सत्य मानत नाही. :)
पक्षीनामवाचक सदस्यानी मला व्य.नि. करुन प्रश्न विचारले आहेत. आणि प्राणीनामवाचक सदस्याला काही समजण्याची शक्यता नाही तस्मात त्यांना उत्तरं देत नाही.
किती घाबरता राव. सत्याची कास धरलेल्याला असा भित्रेपणा शोभत नाही.

In reply to by धन्या

मी तुम्हाला किंवा उल्लेखित सदस्यांना घाबरतो? कोणत्या भ्रमात आहात? फक्त त्यांना प्रतिसाद देण्यात वेळ घालवत नाही इतकंच. आता तुम्ही कसं स्पष्ट कबूल केलत पाहा :
माझा लेख भोंगळ होताच. परंतू माझी तेव्हाची आकलन शक्ती तेव्हढीच होती.
आणि आता सुद्धा तितकीच आहे. नाही तर तुम्ही असं म्हणणार नाही:
माझं म्हणणं अंतिम सत्य मानत नाही
सत्य अंतिम आहे ते कुणी सांगितलंय याला महत्त्व नाही हे तुमच्या अजूनही लक्षात आलेलं नाही!

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Fri, 10/11/2013 - 18:13
मी तुम्हाला किंवा उल्लेखित सदस्यांना घाबरतो? कोणत्या भ्रमात आहात? फक्त त्यांना प्रतिसाद देण्यात वेळ घालवत नाही इतकंच.
घाबरत नसतात तर "पक्षीनामवाचक" आणि "प्राणीनामवाचक" असे शब्द वापरले नसते तुम्ही. उघडपणे त्या आयडींचा उल्लेख केला असता.
आणि आता सुद्धा तितकीच आहे.
हे दुसर्‍या कुणी म्हटलं असतं तर नक्की विचार केला असता. :)
सत्य अंतिम आहे ते कुणी सांगितलंय याला महत्त्व नाही हे तुमच्या अजूनही लक्षात आलेलं नाही!
सत्य अंतिम आहे ते कुणी सांगितलंय याला महत्त्व नाही हे मलाही मान्य आहे. परंतू कुणी मी म्हणतोय तेच "अंतिम सत्य" आहे याच भ्रमात असेल तर काय करणार ना.

In reply to by धन्या

धन्या Sat, 10/12/2013 - 22:01
सालाबाद प्रमाणे संक्षींनी माझ्या या उत्तर देण्यासाठी गैरसोयीचे ठरणार्‍या प्रतिसादाला फाटयावर मारलेले आहे. असो.

In reply to by धन्या

लेखातला अंतर्विरोध पहिल्या प्रतिसादात स्पष्ट केलायं त्यावर लेखक (किंवा तुम्ही) काहीही वक्तव्य करु शकला नाहीत. काही सदस्यांची नांवं इतकी चमत्कारिक आहेत की ती उधृत कराविशी वाटत नाहीत. आता मुद्दाच उरला नाही म्हटल्यावर तुम्ही `मी म्हणतोय तेच "अंतिम सत्य" आहे. हा नेहेमीचा रडीचा डाव सुरु केलायं, त्यावर काय लिहीणार? जमत असेल तर मुद्याला धरुन (माझा पहिला प्रतिसाद पाहा) तुम्ही काही सार्थ आणि तर्कशुद्ध प्रतिवाद करा, माझ्याकडे उत्तर आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

धन्या Sun, 10/13/2013 - 13:02
आम्ही लाख मुद्याला धरुन काही सार्थ आणि तर्कशुद्ध लिहू हो, पण तुम्ही त्यानंतर शब्दांचा कीस पाडून आम्ही लिहिलेलं चुकीचं कसं आहे आणि तुम्हीच कसे बरोबर आहात ते पुन्हा एकदा खरडाल. त्यापेक्षा नकोच ते.

In reply to by धन्या

खरं तर तुमच्याकडे मुद्दा नाही! प्रथम तुम्ही म्हणालात -
संक्षींनी माझ्या या उत्तर देण्यासाठी गैरसोयीचे ठरणार्‍या प्रतिसादाला फाटयावर मारलेले आहे.
आणि आता म्हणताय -
शब्दांचा कीस पाडून आम्ही लिहिलेलं चुकीचं कसं आहे आणि तुम्हीच कसे बरोबर आहात ते पुन्हा एकदा खरडाल.
न तुम्हाला प्रश्नात रस ना उत्तरात. मग कशाला विषय वाढवतायं?

In reply to by प्यारे१

अनिरुद्ध प Fri, 10/11/2013 - 17:14
प्यारे काका, आता तुम्हीच असे हतोत्साहित होउन पुढील लिखाण बन्द करणार का? हे काही बरे नव्हे अहो आम्च्यासार्खे सामन्य लोकाना हा विषय एव्हड्या सोप्या भाषेत सान्गणे हे अत्यन्त कठीण काम आपण खूप उत्तम करत आहात तेव्हा कोणाच्या प्रतिक्रीया काहिही असोत्,आमच्यासाठी तुम्हाला लेखन हे करावेच लागेल्,वर कोणी सान्गितले आहे ती श्री दत्त महाराजन्ची आरती आता श्रीदत्त जयन्तीच्या मुहुर्तावर धागा होउन जाउदे,अशी तुम्हास नम्र विनन्ती आहे.

In reply to by अनिरुद्ध प

प्यारे१ Fri, 10/11/2013 - 19:17
साहेब, मी माझं लिखाण बंद केलेले नाही, इतक्यात करेन असं वाटत नाही. वरील लेखात आपल्याला काही अडचण वाटत असेल तर जरुर सांगा. माझ्या कुवतीनुसार उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. दत्तात्रेयांच्या आरतीबद्दल निश्चितच लिखाण करण्याचा प्रयत्न करेन. अवांतरः काय ना मी अल्जिरियाला असतो. (जाहिरात नाही) निघताना कधी मुंबईवरुन निघतो कधी पुण्याहून. कधी दुबईमार्गे, कधी कतार मार्गे, कधी जॉर्डन, इस्तंबूल, इजिप्त असे बरेच मार्ग आहेत. कधी थेट, कधी व्हाया. समुद्रमार्गे आलो नाही कधी पण कुणास ठाऊक कधी वेळ पडलीच तर ते ही होईल. तसाही मार्ग आहे. सगळे मार्ग पोचवतात हो! मागच्या वेळी मुंबईमध्ये एकजण भेटला. म्हणाला दुबईमार्ग हाच बेस्ट मार्ग. दुसरा मार्ग चुकीचाच आहे. अल्जिरियाला पोचतच नाही. प्लेन भारी, सुविधा भारी, एअर होस्टेस भारी सगळं भारी नि हे सगळं दुबईमार्गेच भारी. मी म्हणालो 'बरं'. नंतर समजलं तो कधी असा प्रवास केलेला प्रवासी नव्हताच मुळी. कधीतरी स्वप्न पडलेलं म्हणतात! मी त्याला देखील 'बरंच' म्हणालो.

In reply to by प्यारे१

प्यारे१ Fri, 10/11/2013 - 19:47
देव कोपतो अथवा रागावतो ह्या कल्पनेसारखी खुळचट कल्पना नाही. वर लेखामध्ये असं काहीही म्ह्टलेलं नसताना संजय क्षीरसागरांनी कसं काय हे विधान ह्यामध्ये आणलं ते समजत नाही. महिषासुरमर्दिनीचा देवता म्हणून हात असू शकत नाही कारण कधीतरी सुरु झालेल्या कर्माच्या चक्रामध्ये आपण अपरिहार्यपणे अडकलेलो असतो नि वासनांनुसार कर्म नि पुन्हा कर्माचं फळ म्हणून नवीन वासना असं चक्र सुरुच राहतं. इथे ही ईश्वर म्हणून कार्य करणारी एक व्यवस्था म्हणून बघावी लागते. दुसरीकडं देवता म्हणून बघताना त्या देवतांना एकेका शक्तीचं उपास्य म्हणून बघितलं जातं नि त्या दृष्टीतून देवीला आठ हात दिलेले आपल्याला दिसून येतात. इथं देवीचा सगुणावतार अपेक्षित आहे. प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि ब्रह्म असे चार प्रकार मानले आहेत. संजयजी उपलब्ध लोकशाहीतल्या विचारस्वातंत्र्याचा तरी आदर बाळगावा माणसानं. थोडा जरी वेगळा विचार केला तरी अगदीच गाढव समजू नये माणसाला. नाई का? थोडक्यात पण महत्त्वाचं. ही उपासनापद्धत असो की आणखी कुठलीही. तिचा वापर करुन जर माणसाला 'रिझल्ट' हाती येत नसेल तर तिचा काडीमात्र उपयोग नाही. सुख, समाधान, शांती, तृप्ती ही त्या प्राप्तव्याची चिन्हं आहेत, लक्षणं आहेत. ह्यातलं एक जरी नसेल तरी काही मिळायचं , मिळवायचं बाकी आहे असं मानावं.

In reply to by प्यारे१

>देव कोपतो अथवा रागावतो ह्या कल्पनेसारखी खुळचट कल्पना नाही. वर लेखामध्ये असं काहीही म्ह्टलेलं नसताना संजय क्षीरसागरांनी कसं काय हे विधान ह्यामध्ये आणलं ते समजत नाही. = तुम्ही काय लिहीलंय ते वाचलंत बरं होईल :
एक घर आगीत भस्म झाल्याची बातमी येते, आपण शांत असतो, शहराचं नाव ऐकलं की कान टवकारतात, विभाग ऐकला की चौकशी सुरु होते नि माझाच पत्ता ऐकला की धक्का बसतो, अन्नपाणी सुटतं. माझेपणा आला की प्रतिक्रिया येते नि ती तशी आली की बंधन आलंच. बातमी तीच, मात्र प्रतिक्रिया बदलली. प्रतिकूलसंवेदनात दु:खम. पश्चातबुद्धीनं परिस्थिती नियंत्रणाबाहेर जायला आपण जास्तच कारणीभूत ठरतो. मात्र देवीच्या भक्त म्हणवणारानं असं असून चालत नाही. सगळ्या सृष्टीच्या निर्मात्याला निर्माण करणारी अंबा, दुर्गा, भवानी माता ही जर माझं आराध्य दैवत असेल तर एका घराच्या जाण्यानं असं काय हळहळ करायची? ते तसं माझ्याच बाबतीत का होतं ह्याचा विचार कर्माचा सिद्धांत ह्या एका 'अझम्शन' ने सुटतो. इथं लक्षात घ्यावं की दुसर्‍याच्या नावानं खडे फोडण्यात आपला मनस्ताप वाढतो, तसं न करता'योग्य निर्णय घेऊन आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं. इथं कुठलाही निराशावाद नाही. हा कर्माचा विचार नि बरोबरच मी आनंदरुप असल्याचा विचार हे 'गणितं' सोडवण्यापुरते वापरावेत नि नंतर अलगद बाजूला सारावेत.
= तुम्ही कुणाला उल्लू बनवतायं? एकीकडे म्हणायचं देव सगळ्याचं कारण आहे आणि फटका बसला की ती आपल्या कर्माची फळं?
महिषासुरमर्दिनीचा देवता म्हणून हात असू शकत नाही कारण कधीतरी सुरु झालेल्या कर्माच्या चक्रामध्ये आपण अपरिहार्यपणे अडकलेलो असतो नि वासनांनुसार कर्म नि पुन्हा कर्माचं फळ म्हणून नवीन वासना असं चक्र सुरुच राहतं. इथे ही ईश्वर म्हणून कार्य करणारी एक व्यवस्था म्हणून बघावी लागते.
= म्हणजे मग कर्मप्रक्रिया नक्की कुणी सुरु केली? तुम्ही की महिषासुरमर्दिनीनी? आणि मूर्ख कुणाला बनवतायं? वासना? कसली वासना? कुणी निर्माण केली वासना? घर बांधलं किंवा घेतलं ही वासना? आणि ते भस्म झालं तर आपल्या वासना चक्राचं फळ? मग काय करायचं? उघड्यावर राहायचं? तुम्हाला तुम्ही काय लिहीतायं ते समजतंय का? एकीकडे म्हणायचं ईश्वर ही कार्य करणारी व्यवस्था आहे आणि स्वत:चं घर भस्मीभूत झाल्यावर म्हणायचं ते आपल्या कर्माच फळ आहे.
दुसरीकडं देवता म्हणून बघताना त्या देवतांना एकेका शक्तीचं उपास्य म्हणून बघितलं जातं नि त्या दृष्टीतून देवीला आठ हात दिलेले आपल्याला दिसून येतात. इथं देवीचा सगुणावतार अपेक्षित आहे. प्रतिमा, सगुणावतार, ईश्वर नि ब्रह्म असे चार प्रकार मानले आहेत.
= कल्पनेला अंत कुठे आहे? आठ काय आठरा हात द्या आणि सगुणाचे चार काय चारशे प्रकार माना. शब्द तुमचे आणि कल्पनाही तुमच्या!
संजयजी उपलब्ध लोकशाहीतल्या विचारस्वातंत्र्याचा तरी आदर बाळगावा माणसानं. थोडा जरी वेगळा विचार केला तरी अगदीच गाढव समजू नये माणसाला. नाई का?
= तुम्ही माझ्या लेखांवर इतके भंपक प्रतिसाद दिलेत तरीही केवळ तुमच्या पहिल्या प्रतिसादाला मान देऊन मी लिहायचा थांबलो होतो याची दखल घ्या. माझ्याबाजूनं विषय मिटला होता. आता तुम्ही पुन्हा सुरुवात केली आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचं. ही उपासनापद्धत असो की आणखी कुठलीही. तिचा वापर करुन जर माणसाला 'रिझल्ट' हाती येत नसेल तर तिचा काडीमात्र उपयोग नाही. सुख, समाधान, शांती, तृप्ती ही त्या प्राप्तव्याची चिन्हं आहेत, लक्षणं आहेत. ह्यातलं एक जरी नसेल तरी काही मिळायचं , मिळवायचं बाकी आहे असं मानावं.
= काय ज्योक मारतायं? तुमची स्वत:ला उल्लू बनवण्याची मेथड आणि ही प्रक्रिया :
असं हळूहळू करत गेलं की आपोआप पाश सुटतात. भव म्हणजे संसार. नि अशा प्रकारे भवपाश सोडवायला अंबा मदत करते. अशा ह्या जगद्जननी अंबेच्या चरणी तद-लीन,तल्लीन होण्यामध्ये खरं भूषण आहे.
जर शांती आणि समाधान देईल असा भ्रम असेल तर तो महिषासुरमर्दिनी या भ्रामक कल्पनेनी तुम्ही स्वत: भोवती विणलेला कोष आहे. अशी कुणीही देवी नाही आणि कोणत्याही प्रसंगात ती काहीही मदत करत नाही. या आरत्या वगैरे करुन फक्त वेळ जातो आणि भ्रम सघन होण्यापलिकडे काहीही होत नाही.

In reply to by प्रचेतस

चला सोडून देऊ! पण तुम्हा भक्तीमार्गीयांशी संवाद साधताना एक ज्योक आठवतो त्यानं सांगता करतो : एकदा पंडित जवाहरलाल नेहरु एका मेंटल हॉस्पिटलला भेट द्यायला जातात. तिथला अधिकारी सर्वांना ओळख करुन देतो : " आज भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आपल्या हॉस्पिटलला भेट द्यायला आलेत." एक त्यातल्या त्यात समंजस पेशंट शांतपणे उठून पंडितजींजवळ जातो आणि विचारतो " नांव काय म्हणालात सर आपलं?" नेहरू चकित होतात आणि म्हणतात " मी पंडित जवाहरलाल नेहरु!" यावर तो अत्यंत समजावणीच्या सुरात म्हणतो : " काही हरकत नाही, मी पण सुरुवातीला असंच म्हणायचो.... आता आलात ना इथे, व्हाल बरे हळूहळू!"

In reply to by संजय क्षीरसागर

प्रचेतस Sat, 10/12/2013 - 16:22
अहो ते मी तुमच्याबद्दल कुठे म्हटलंय??? साक्षात भगवंतानं गीतेत सांगितलय ते. त्याचं झालं काय की त्याने अर्जुनाला आधी सांख्य योग सांगितला, त्याने काही विचार्‍या अर्जुनाचं समाधान होईना, मग सांगितला कर्मयोग तरी अर्जुनाच्या शंका आल्याच परत. मग त्या बिचार्‍याने त्याला ज्ञानकर्मसंन्यासयोग समजावून सांगितला तरी त्या अर्जुनाला कैच समजेना. अहो मग त्या कृष्णाने एकेक करत त्याला ध्यान योग, ज्ञान विज्ञान योग, अक्षर ब्रह्म योग, राजविद्या-राजगुह्य योग असे अजूनही कितीक योग समजावून सांगितले पण त्या अर्जुनाच्या टकुर्‍यात कायबी शिरंना. मग विश्वरूप दाखवून झालं तरी ह्याच्या शंका अजूनही आहेतच. तरी अजूनही तग धरून त्या भगवंताने मग भक्तीयोग, पुरुषोत्तम योग वैग्रे समजावून सांगितले तरी अर्जुन आपला ठोकळयासारखा तसाच. मग वैतागला तो विचारा कृष्ण, तो तरी किती अजून सहन करणार. मग शेवटी दाखवलान् त्याला 'मी' मार्ग. तेव्हा कुठे समाधान झालं त्याचं. मग तो अर्जुन म्हणाला बघा नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत । स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ||

In reply to by प्रचेतस

पैसा Sat, 10/12/2013 - 16:39
त्या कृष्णाला हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनाला कसाही युद्धाला उभा करायचा होता, म्हणून "सगळं माझ्यावर सोडून दे" म्हणाला. त्याला जर माहिती असतं की काही हजार वर्षांनी मिसळपाव नामक संस्थळावर त्याचा असा उपयोग होईल, तर तोच म्हणाला असता ना,
पार्थ म्हणे 'गा हृषीकेशी | या युद्धाची ऐशीतैशी बेहेत्तर आहे मेलो उपाशी | पण लढणार नाही ! धोंड्यात जावो ही लढाई | आपल्या बाच्याने होणार नाही समोर सारेच बेटे जावाई | बाप, दादे, काके काखे झोळी, हाती भोपळा | भीक मागूनि खाईन आपला पण हा वाह्यातपणा कुठला | आपसात लट्ठालठ्ठी या बेट्यांना नाही उद्योग | जमले सारे सोळभोग लेकांनो! होऊनिया रोग | मराना का! लढाई का असते सोपी? मारे चालते कापाकापी कित्येक लेकाचे संतापी | मुंडकीहि छाटती.'
http://www.misalpav.com/node/6610

In reply to by पैसा

  सर्व, ज्याच्या मर्जीविना झाडाचे पानही हलत नाही त्याला ही चर्चा मिपावर २०१३ साली होणार याची गंधवार्ताही नाय म्हनल्याबद्द्ल तुमचा टीव्र णिशेढ ! उलट अश्या चर्चेने मिपाकराची पापे धुवून निघाली नाही (कारण त्याबाबत शंका आहे) तरी त्यांना खळखळून हसवून एकदोन क्षण त्या पापांच्याबद्दल होणार्‍या शिक्षेची आठवण विसरायला लावण्याची ही व्यवस्था खुद्द भगवंतांनीच केली आहे... (असे नारदमुनी मिपावर टंकताना स्वप्नात पाहिल्याचे अंधुकसे आठवते आहे).

In reply to by पैसा

आम्हाला कोणताही सुमार्ग वर्ज्य नाही... हॅ हॅ हॅ ... म्हणजे असं आहे की प्रत्येक मार्गाबद्दल आम्हाला येवढे यक्षप्रश्न पडतात की आमची अल्पबुद्धी त्यांची उत्तरे देऊ शकत नाही. पण तरीसुद्धा माझ्या मार्गाने न येणारे सगळेच चुकलेले वाटसरू आहेत असे नक्कीच वाटत नाही :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पैसा Sun, 10/13/2013 - 15:54
तुम्ही आध्यात्मिक गुरू कधीच होऊ शकणार नाही. म्हणजे रिटायर झाल्यावर साईड बिझिनेसचा तो एक मार्ग बंद झालाय असं समजा! :-/

In reply to by पैसा

छे, छे !!! आम्ही कसले गुरू... प्रश्नांची उत्तरे शोधतानाच रिटायर्ड व्हायच्या अगोदर टायर्ड व्हायला होतंय ! म्हणतातच ना की, "शास्त्रिय संशोधनाने मिळालेले प्रत्येक उत्तर १०० नवे प्रश्न बरोबर घेऊन येते." आमच्या नशिबी शेवटपर्यंत विद्यार्थी राहणेच आहे ;)

In reply to by प्रचेतस

पैसा Sat, 10/12/2013 - 16:18
मूर्त्यांचे ढीगभर फोटो काढतोस आणि इथे आणून ओततोस, तेव्हा एक बारीकसा ढिस्क्लेमर टाकायला काय झाले रे तुला?

In reply to by प्रचेतस

धन्या Sat, 10/12/2013 - 21:58
भगवदगीता इतक्या शॉर्ट अँड स्वीट फॉर्ममध्ये कुण्णी म्हणजे कुण्णीच सांगितली नसेल. इस बातपे मी तुझ्यासोबत शाजीत पराठे खायला तयार आहे किंवा अगदी भुलेश्वरलाही यायला तयार आहे. :)

In reply to by संजय क्षीरसागर

अग्निकोल्हा Fri, 10/11/2013 - 15:35
"
आपल्यावर आलेला कुठलाही प्रसंग आपल्या कर्माच्या फळाच्या स्वरुपात आला असं मानणं व्यावहारिक शहाणपणाचं ठरतं.
व्हॉट इज कर्मा ? अ कॉझ दॅट हॅज नॉट फाउंड इट्स एफ्फेक्ट येट. आता हे कळालं असेल तर
म्हणजे यात महिषासुरमर्दिनीचा काहीएक हात नाही!
वोव, हे म्हणजे वस्तुमानाच्या वजनात गुरुत्वाकर्षणाचा काहीएक हात नाही मानण्याइतके अवैज्ञानीक आहे. हा शहाणपणा न्हवे, हे बघा तुम्हि शहाणे आहात.
इतकं सगळं कार्य दोन हातातून करता येणं शक्य थोडीच आहे असा विचार करुन तिला अष्टभुजा बनवली नि तिच्या प्रत्येक हातात एक एक वस्तू दिली.
या हातातिल विवीध वस्तुंमुळेच तिची कार्यओळख चटकन मनामधे स्थापित होते. फार सुरेख लिहलय.
याला म्हणतात गोलमाल लॉजिक. ते स्वचा उलगडाही होऊ देत नाही आणि भोंगळ विनम्रतेला निरहंकारिता म्हणून मिरवायला मदत करतं.
बोंबला! अनुभव घेण्याची क्षमता असलेली प्रणाली या पलिकडे "स्वतः" चा आणखि काही कोठे उलगडा अस्तित्वात आहे काय ? आता तो अनुभव काय असावा हे जाउदेना दुनियादारीत. तुम्हाला कशाला अनुभव अमुक अमुकच असावा तरच तो सत्य वगैरे वगैरे वर नियंत्रण हवय ? तुम्हि शहाणे आहात विसरु नका, हे फार महत्वाच आहे.
अर्थात, अशांचाच भरणा भारंभार असल्यानं पब्लिक भावभोळ्या आरत्या करून भवसागर पार होईल अशी आशा करतं.
पुन्हा सांगतो तुम्ही अनुभवाची सक्ति रेटु शकत नाही.. केवळ उदाहरण म्हणून म्हटलं तुम्हाला गाढवपणात आनंद आहे तर कोणाला मद्यपानात आहे, लता मंगेशकरला गाणे म्हणन्यात आहे तर कोणाला समागमामधे आहे कोणाला परिक्रमेमधे आहे कोणाला विपश्यनेमधे आहे कोणला कशाचे अन तुम्हाला शहाणपणाचे असे विवीध अनुभव हे उपभोगण्याची क्षमता असणे यालाच "मी" म्हणतात. थोडक्यात हा "मी" सक्तिरुप कधिही असता कामा नये. डों फर्गेट य आर जिनीअस!

In reply to by अग्निकोल्हा

धन्या Fri, 10/11/2013 - 15:45
तुमचे प्रतिसाद वाचल्यानंतर आमचा सख्खा शेजारी आत्मशून्यची आठवण येते.

In reply to by धन्या

अग्निकोल्हा Fri, 10/11/2013 - 16:08
कधि पुण्यात आलो तर मग त्याला नक्किच भेटेन. फारच मिजासखोर, घमंडी कार्ट आहे ते, असं कानावर आलयं, तो काय म्हणतोय हे म्हणे इतरांना कळतच नाही, अन त्यावेळी तर तो म्हणे त्याचे म्हणने/मानणे तर कधिच बदलत नाही, आता भेटला तर देतोच दोन टप्पू ठेवुन अन समजावतो त्याला सगळ्यासमोर गीता वाचलिच पाहिजे असा अट्टहास धरु नये.

In reply to by धन्या

आठवण येते.
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल बदलत नाही!! आता हे वाक्य पाहा:
व्हॉट इज कर्मा ? अ कॉझ दॅट हॅज नॉट फाउंड इट्स एफ्फेक्ट येट.
इफेक्ट झालाच नसेल तर तो जाणीवेच्या कक्षेत कसा येईल? आणि ज्या गोष्टीची जाणीव नाही त्यासाठी करुणेची आरती कशाला करायची? स्वतःच्याच काय वाट्टेल तश्या व्याख्या करायच्या आणि काथ्या कुटत राहायचा.

In reply to by संजय क्षीरसागर

अग्निकोल्हा Fri, 10/11/2013 - 16:33
करेक्ट! झुली बदलल्या तरी बैल बदलत नाही!! आता हे वाक्य पाहा:
हा हा हा ! तुम्ही म्हणे एकेकेकाळी समान झुल बाळगणार्‍या दोन वेगवेगळ्या बैलांना चक्क एकच बैल समजुन बराच काळ जगत होता.. सरपंच व अख्या पंचायतीसमोरही हा दावा केला होता पण सत्य समोर आल्यावर पंचायत तुमची झाली होती हे कधि आलं नाही तुमच्या लिखाणात ? जगता तेच लिहता ना ?
इफेक्ट झालाच नसेल तर तो जाणीवेच्या कक्षेत कसा येईल? आणि ज्या गोष्टीची जाणीव नाही त्यासाठी करुणेची आरती कशाला करायची?
जाणिवेच्या कक्षेतील परिणामांकडे निव्वळ प्रक्रिया आहे म्हणून दुर्लक्ष करायला सांगुन स्वतः ३१ जुलैच्या भ्रामक कामात गुटुंन जाणार्‍यांना इफेक्ट झालाय हेच लक्षात येत नाही त्याला इफेक्ट झाला नाही कसे म्हणनार ?
स्वतःच्याच काय वाट्टेल तश्या व्याख्या करायच्या आणि काथ्या कुटत राहायचा.
तुम्ही शहाणे आहात, विसरु नका.