मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आरोग्य पंचविशी -२ -- गंधार-पुढे

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
वासाच्या या दुनियेत मानवाने काही गोष्टी जाणून घेतल्या त्या म्हणजे कोणत्या वासामुळे आपल्याला धोका आहे आणि कोणता वास आपल्या फायद्याचा आहे. सडक्या मासाचा वास हा इतर परभक्षी जनावरांना आकर्षित करतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो या मुळे असा सडक्या मासाचा वास आपल्याला शिसारी आणतो. तसेच सडक्या अन्नामुळे विषबाधा होऊ शकते हे कळल्यामुळे तसा वास येणारे पदार्थ आपण आपोआप खाणे टाळतो. आता या गोष्टी साध्या सरळ आहेत. पण ज्या गोष्टी इतक्या सरळ नाहीत त्या कोणत्या. तर मानवी शरीराचा वास. स्त्रियांना पुरुषांच्या अंगाचा(यात घाम स्वेद ग्रन्थि स्त्राव यांचा समावेश आहे) वास दिला तर काही तर्हेचा वास त्यांना आकर्षित करतो आणि काही तर्हेचा वास आकर्षित करत नाही. ( मूळ घामाला वास नसतो तर त्यातील प्रथिनांवर जीवाणूची प्रक्रिया झाल्याने एक तर्हेचा वास येतो) याचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले कि स्त्रियांना आपल्या पेक्षा वेगळ्या तर्हेच्या MHC ( ज्या जीन्समध्ये प्रतिकार शक्तीची सांकेतिक भाषा लिहिलेली असते)असलेल्या माणसांच्या शरीराचा वास आवडतो. जेंव्हा आई आणि बापाचे MHC वेगळे असतात त्या मुलांची प्रतिकार शक्ती खूपच जास्त चांगली असते. त्यामुळे अशा माणसाशी संबंध झाल्यामुळे जन्म झालेली संतती जीवशास्त्रीय दृष्ट्या जास्त सशक्त असते. दुर्दैवाने आपल्या लग्न संस्थेत जीवशास्त्रीय गोष्टीन महत्त्व नाही. तेंव्हा मुलीला किंवा मुलाला काय आवडते त्यापेक्षा त्यांची जात धर्म, वर्ण, आर्थिक स्थिती आणि पत्रिका हे प्राधान्य घेतात. (एक वेगळा विचार- पत्रिकेत ३६ गुण जुळलेले स्त्रीपुरुष जीवशास्त्रीय दृष्ट्या अनुरूप आहेत/ होतात का हे त्याचे MHC जुळवुन पाहिले पाहिजे म्हणजे पत्रिका पाहण्यात तथ्य आहे काय ? या प्रश्नाचे अंशतः उत्तर मिळू शकेल.) एवढ्या सगळ्या काथ्याकुटाचा आपल्या जीवनात उपयोग काय? आपल्या अंगाला येणारा वास( पायाच्या मोज्यांचा वास सुद्धा) हा माणसाला स्वतः ला येत नाही कारण काय? आपली घ्रणेन्द्रीये थोड्या वेळाने संतृप्त होतात त्यामुळे त्यातून मेंदूला जाणार्या संवेदना बोथट होतात. पण तोच वास दुसर्याला अतिशय तीव्र वाटू शकतो. म्हणून दिवस सुरुवात करताना आपल्या पूर्वजांनी सकाळी स्नान करण्याची पद्धत रूढ केली. कोणत्याही कामाला निघताना आपण स्वतःला शुचिर्भूत करणे अतिशय आवश्यक असते. जे लोक कोणत्याही विक्री/विपणन विभागात कामाला असतील त्यांनी तर हे विशेषतः लक्षात ठेवले पाहिजे कारण आपल्या अंगाला वास येत असेल तर आपले ग्राहक आपल्याला दूरच ठेवतील. हि गोष्ट आपले ग्राहक जर स्त्रिया असतील तर प्रकर्षाने लक्षात ठेवावी(यात कापड --बुटिक/ कोस्मेटीक्स म्हटले कि जास्त सोफिस्तीकेटेड वाटते दागिने किंवा सौंदर्य प्रसाधने विक्री हे व्यवसाय येतील) कारण स्त्रियांची वासाची शक्ती पुरुषांच्या पेक्षा दोन ते तीन पट जास्त तीव्र असते (त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या कचर्याच्या ढीगा जवळून चालताना ९० % बायका नाकाला पदर लावून जाताना दिसतील तेथेच पुरुष त्यामानाने शांतपणे पुढे जाताना दिसतात. वासाचे एवढे महत्त्व का? आपल्या मेंदूत वासाची एक प्रतिमा उमटलेली असते आणी हि प्रतिमा त्यावेळच्या स्मृतीशी घटत पाने निगडीत असते. त्यामुळे आपल्या मित्र/ मैत्रिण जर एक विशिष्ट अत्तर / सुगंध वापरात असेल तर त्या सुगंधाचा वास आल्यास आपल्याला त्या मित्र/ मैत्रिणीची आठवण प्रकर्षाने येते. मी माझ्या लग्नागोदर माझ्या (होणार्या) बायकोला GAMBIT हा सुगंध भेट दिला होता आणी तो सुगंध आमच्या लग्न ते हनिमून आणी एक वर्ष पर्यंत(संपेपर्यंत) ती वापरत असे. त्यानंतर तो सुगंध मी कटाक्षाने परत आणणे टाळले(अतिपरिचयात अवज्ञा होऊ नये म्हणून). आता परत क्वचित कधी कुणाकडे हा सुगंधाचा दरवळ आला तर मला आपले सोनेरी आणी सुगंधी दिवसांचा पुनः प्रत्यय येतो. प्रत्येक स्त्री/ पुरुषाच्या अंगाचा एक विशिष्ट गंध असतो. आणी भिन्नलिंगी व्यक्तींना तो आकर्षित करतो परंतु आपण या गोष्टी विसरलो आहोत. आपल्या जोडीदाराला आपले आकर्षण वाटावे असे आपल्याला वाटत असेल तर हि बाब त्याच्या/ तिच्या ध्यानात आणणे आवश्यक आहे आणी जर त्याला किंवा तिला तो गंध आवडत नसेल तर त्याला/तिला आवडणाऱ्या गंधाचे अत्तर/सुगंध वापरणे हितकारक असते. जोडीदाराबद्दल आकर्षण निर्माण करणे हा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. बर्याच पुरुषांच्या हे ध्यानात येत नाही. रात्री आपल्या बायकोच्या जवळ जाताना हा भाग ध्यानात न घेतल्याने बायकोला नवर्याबद्दल आकर्षण वाटत नाही आणी बाब टोकास गेल्यास नवर्याबद्दल किळस सुद्धा वाटते. ( बर्याच वेळेस पुरुष बायकोचा झोपेची गोळी म्हणून वापरताना सर्रास आढळतात आणी बायकोचा विचार करणे त्यांच्या पौरुश्त्वाला कमी पण आणणारे वाटते. असे महाभाग शेकड्यांनी दिसतात हा भाग अलाहिदा) त्यामुळे बायको शृंगारात रस घेत नाही हि तक्रार घेऊन कित्येक रुग्ण घेतात. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेची पातळी फार कमी असल्याचे दिसून येते. अशा रुग्णांना प्रथम स्वतः रात्री स्वच्छ स्नान करून नवे कपडे घाला आणी अंगाला एखादी सुवासिक पावडर/ सुगंध लावा हे सांगावे लागते. बायकोसाठी एखादा मोगर्याचा गजरा आणून पहा हि गोष्ट सांगावी लागते याचेच आश्चर्य वाटते. बहुतांश नवरे लग्नाच्या एक दोन वर्षानंतर या गोष्टी विसरून जातात.दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही बरेच पुरुष "आम्ही कोणतेही सौंदर्य प्रसाधन वापरत नाही" हे अभिमानाने सांगतात हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत लागू होते. लिंग शैथिल्य चे रुग्ण पाहताना या गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. बायकोचे रात्री घामाने थबथबलेले थंड गार शरीर जवळ घेताना कोणतेही उद्दीपन होत नाही. स्त्रिया पाळीच्या वेळेस आरोग्याची तेवढी काळजी घेत नसतील तर येणाऱ्या अंगाच्या दुर्गान्धामुळे पुरुषाला किळस येते हे ते बायकोसमोर सांगू शकत नाहीत. काही वेळेस बायका अतिशय हट्टी आणी दुराग्रही असलेल्या आढळून आल्या( मी आहे हि अशी आहे आता काय बदलणार?). फरक हाच आहे कि शृंगाराच्या वेळेस स्त्री हि निष्क्रिय राहू शकते पण पुरुषाला सक्रीय भाग असल्याने जर स्त्रीबरोबर प्रतिकर्षण असेल तर शृंगार होऊ शकत नाही. अशी जोडपी जेंव्हा वंध्यत्वाच्या उपचारासाठी येतात तेंव्हा त्यांच्यात वर्षनुवर्षे संबंधच झालेला नाही असे सुद्धा दिसून येते. केवळ एकत्र राहत असतात आणी जेंव्हा पालकांकडून मुलाबद्दल आग्रह चालू होतो तेंव्हा हे उघडकीस येते. मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते कि सर्वात सहज आणी फुकट मिळणारे उच्च दर्ज्याचे सुख म्हणजे झोप. मग झोप हि उत्सवासारखी का साजरी करू नये?वैयक्तिकरीत्या मी स्व्तःरोज झोपताना शुचिर्भूत होऊन स्वच्छ चेहरा धुवून सुगंधी पावडर लावून नवीन पायजमा शर्ट घालून कडक इस्त्रीच्या चादरीवर झोपणे पसंत करतो.सुरुवातीला बायको जरा संशयाने पाहत असे पण नंतर तिला ती गोष्ट आवडू लागली.लष्करात असल्याने कडक इस्त्री हा जीवनाचा अविभाज्य भाग होता तरीही चांगली गोष्ट चांगलीच असते जर लोक दारू पिण्यासाठी/ हॉटेलात जाण्यासाठी एवढा खर्च करू शकतात तर स्वच्छ कपडे आणी इस्त्रीची चादर यासाठी महिना दोन तीनशे रुपये खर्च करण्यास प्रत्यवाय नसावा. एका चादरीच्या इस्त्रीला फारतर ५ रुपये पडतात पण त्यावर झोपण्याचे सुख स्वर्गीय असते. त्यातून उशाशी मोगर्याचा गजरा असेल तर रात्री झोप चाळवली असताना पण एक अनाहूत आनंद आणी सुगंधाचा अनुभव येतो.

वाचने 15462 वाचनखूण प्रतिक्रिया 33

खटपट्या Sat, 08/24/2013 - 08:45
धुतलेले कपडे घालुन खरच छान झोप लागते... "इस्त्रीची चादर आणि मोगर्‍याचा गजरा" आज प्रयोग करतो. मोगर्‍याचा गजरा कैलिफोर्नियात मिळणे मुश्कील आहे पण बघतो.

In reply to by खटपट्या

शशिकांत ओक Sun, 12/01/2013 - 00:59
गजरा मिळेल हो. पण तो मिळवून, केशकलापात माळून मग मस्त इस्त्री च्या कडक चादरीवर मस्ती करायची तर खटपटीला लागा.

मृत्युन्जय Sat, 08/24/2013 - 11:32
स्वच्छ कपडे घालुन, मस्त पावडर वगैरे लावुन झोपले की सुखाची झोप लागते हे अगदी शंभर टक्के खरे आहे. मला बहुधा त्यामुळेच सुखी झोपेची देणगी मिळाली असावी. हे झोपताना भांग पाडुन पावडर लावुन झोपण्याच्या सवयीमुळे बर्‍याच वेळा घरचे हसतात त्याकडे मी दुर्लक्ष करतो हे चांगलेच आहे हे आता जाणवते. :)

दत्ता काळे Sat, 08/24/2013 - 12:22
छान. लेख आवडला. मला सुगंध (सेंटस्) आवडतात. मी कॉलेजला असताना परिक्षेचा अभ्यास रात्री आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून परत खोलीत छान सुगंधी उदबत्ती लावून ( सुवासाकरता ) करायचो. वातावरणनिर्मिती मस्तं होत असे, पण अभ्यास म्हणावा तितका चांगला झाला नाही. त्याऐवजी अवांतर वाचन फार चांगले झाले. त्याकाळात माचीवरला बुधा, शेलारखिंड, मिरासदारी, रारंगढांग, पार्टनर, दुनियादारी, ललितचे अंक ह्या पुस्तकांचे वाचन झाले. अजूनही त्या उदबत्ती वास दरवळला पुस्तके वाचण्याच्या आठवणी जाग्या होतात.=)

दादा कोंडके Sat, 08/24/2013 - 12:23
मस्त लेख. पण माझ्यासाठी सुखाच्या झोपेसाठी दिवसभर केलेले श्रम पुरेशे असतात. - (रात्री गंद्पावडर न करता झोपणारा) दादा

In reply to by दादा कोंडके

पण माझ्यासाठी सुखाच्या झोपेसाठी दिवसभर केलेले श्रम पुरेशे असतात!
संपूर्ण सहमत! आणि प्रणयाचं म्हणाल तर गंध अनुषंगिक आहे, पारस्पारिक आकर्षण आणि फिटनेस मुख्य आहेत. आगदि व्यक्तिगत बोलायचं तर स्वच्छ आणि मोकळा श्वास, आणि गंधरहित अंगप्रत्यांगाच्या स्पर्शसुखाचा कैफ, ही प्रणयाची खरी मजा आहे! फ्रॅगरन्स वातावरणात असावा आणि शरीर गंधरहित हवं.

वामन देशमुख Sat, 08/24/2013 - 12:55
डॉ. खरे,
मी स्वतः रोज झोपताना शुचिर्भूत होऊन स्वच्छ चेहरा धुवून सुगंधी पावडर लावून नवीन पायजमा शर्ट घालून कडक इस्त्रीच्या चादरीवर झोपणे पसंत करतो.
या मुद्द्याशी मी पूर्णतः सहमत आहे आणि माझे स्वतःचे वागणेही जवळजवळ असेच आहे. तथापि, रात्री झोपताना चेहऱ्यावर पाउडर लावणे योग्य आहे का? सौंदर्य तज्ज्ञ तर रात्री मेक-अप पूर्णतः उतरवून ठेवावा असे सांगतात. रच्याक... लेख फारच उपयुक्त आहे, विशेषतः आळशी स्त्री-पुरुषांसाठी. प्राणीमात्रांना प्रणय-सुख हे निसर्गाचे सर्वोत्तम वरदान आहे. ते भरभरून देण्या-घेण्यातही अकारण आळस/ कंजुषी/ हातराखलेपणा करणाऱ्या स्त्री-पुरुषांना मी सहानुभूतीदेखील दाखवू इच्छिणार नाही; नोकरी/ उद्योग/ घरकाम/ आहे अशी कारणे असणाऱ्यांना/ सांगणाऱ्यांना देखील नाही. आयुष्य मजेत जगा(की जागा!)...

In reply to by वामन देशमुख

सुबोध खरे Sun, 08/25/2013 - 22:00
साहेब, पावडर मध्ये मूळ घटक टाल्क हा असतो आणि हा एक निष्क्रिय(INERT) आहे त्यामुळे तो आपल्या त्वचेबरोबर अजिबात क्रियाशील नाही. उलट त्वचेतून बाहेर पडणारे अतिरिक्त तेल/ स्वेद शोषून (ADSORB ) घेतो. शिवाय पावडर मध्ये वापरण्यात येणाऱ्या त्याच्या कणांचा आकार त्वचेच्या रंध्रांपेक्षा मोठा असतो त्यामुळे तो त्वचेची छिद्रे बंद करीत नाही. इत्राघातक सुगंधी द्रव्ये असतात त्यामुळे रात्री साधी पावडर लावल्याने कोणताही अपाय होत नाही. लहान मुलांची पावडर (जोन्सन बेबी पावडर) मोठ्यांनी वापरू नये याचे कारण त्यांचा कणांचा आकार अतिशय लहान असतो( जो बालकांच्या त्वचे च्या छिद्रांपेक्षा मोठा असतो). हि पावडर अतिशय वस्त्रगाळ अशी असते ती बालकांच्या त्वचेला मुळीच हानी होउनये म्हणून. बाकी प्रणय सुख हे फक्त मनुष्याला मिळालेले वरदान आहे खालच्या प्राण्यांसाठी ती एक जीवनाची अत्यावश्यक अशी सहजप्रेरणा(INSTINCT) आहे. त्यामुळे एकदा संबंध झाला कि कुत्रा आणि कुत्री वेगवेगळ्या दिशांना जातात मांजर किंवा चित्त यात तर संभोग हि मादीसाठी अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे. त्यामुळे मांजरांचा प्रणय हा अतिशय वादळी आणि कर्कश आवाजाचा असतो कारण मादी प्रणयासाठी मुळीच तयार नसते पण नर तिचा सतत पाठपुरावा करून शेवटी तिला खिंडीत गाठून संभोग करायला लावतो आणि या संभोगाच्या वेद्नेनेच स्त्रीबीज पक्व होते आणि पुढची संतती होते. मानवाला संभोग हि एक अत्यंत उच्च दर्जाचे सुख देणारी क्रिया आहे म्हणून पुरुष लग्नासाठी तयार होतात. जर मानवात नराचे काम फक्त शुक्राणू दान हे असते तर पुरुष एका संभोगानंतर नम निराला झाला असता आणि स्त्रीवर बालकाला अठरा वर्षे पर्यंत पोसण्याची अत्यंत कठीण जबाबदारी आली असती. अशा परिस्थितीत किती बायका त्याला तयार झाल्या असत्या? आणि मग मुळ प्रेरणा वंशसातत्य हि खुंटलीच असती. आपण जर रोज खायच्या पदार्थावर चव वाढवण्यासाठी नारळ कोथिम्बिर शेव असे पदार्थ पेरतो तर प्रणयाची प्रक्रिया खुलवण्या साठी थोडेसे जास्त कष्ट घेतले तर कुठे बिघडले ? दुर्दैवाने अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने नवरा/बायको सुद्धा रोजची होतात आणि लोक जसे नित्य कर्माने स्नान/ जेवण उरकून घेतात तसा प्रणयसुद्धा "उरकून" घेतात. यासाठीच हा वेगळा विचार आहे. जसे जेवण पंगतीत बसून सुवासिक उदबत्ती आणि मंगल सनईच्या सुरात करता येते किंवा रेल्वेच्या डब्यात मिळणाऱ्या राईस प्लेटने पण पोट भरता येते. काय करायचे ते आपण ठरवा

In reply to by सुबोध खरे

हा श्लोक लोकांनी नको तिथे जोडला आहे. विषय वेगळा होईल म्हणून इतकेच.

In reply to by अनिरुद्ध प

सुबोध खरे Mon, 08/26/2013 - 15:02
नाही ADSORB हा शब्दच बरोबर आहे याचा अर्थ पृष्ठभागावर पकडून धरणे. ABSORB म्हणजे शोषून घेणे त्या अर्थाने तो शब्द वापरलेला नाही.

पैसा Sun, 08/25/2013 - 19:22
मला कोणत्याही कृत्रिम सुगंधाने शिंका येऊ लागतात आणि जबरदस्त अ‍ॅलर्जी येते. फुले मात्र प्रचंड आवडतात.

एकाच वासाचा दोन व्यक्तींवर वेगवेगळा परिणाम होतो. उदा. बोंबलाचा वासाने एखाद्या व्यक्तित भूक निर्माण होते. काहींची चक्क लाळ गळते तर काहींना मळमळते. भूक नाहीशी होते. संस्काराचा परिणाम कसा असतो ना?

In reply to by संजय क्षीरसागर

दादा कोंडके Mon, 08/26/2013 - 12:07
मला वाटलं, (अरबट-चरबट खाउन) अजीर्ण झाल्यावर येणार्‍या वासाने 'हाय' म्हणण्याची वेळ येते. ;)

गवि Mon, 08/26/2013 - 15:51
डॉक्टरसाहेब. झकास लेखमाला आणि लेख. रात्री आंघोळ (डोके धुण्यासहित) केल्यावर झोपताना अत्यंत छान, सुगंधित , स्वच्छ वाटतं हे अगदी खरं आहे. मी कितीही उशीरा घरी आलो तरी, कितीही थकवा आला असला तरी, रात्री आंघोळ केल्याशिवाय जेवत किंवा झोपत नाही. घरात सर्वजण या सवयीला हसतात. आणि मलाही कधीकधी असं वाटायचं की मी रात्रीच्या आंघोळीचा नियम फारच कडकपणे पाळतोय की काय.. ?! ऑब्सेसिव्ह काहीही वाईटच.. असाही विचार यायचा. हे इतर लोक कसे बिन आंघोळीचेही मस्तपैकी झोपू शकतात असंही वाटायचं.. पण आता तुम्ही लिहील्यावर वाटतंय की चांगलीच सवय आहे.. काही ऑब्सेसिव्ह नाही. धन्यवाद.. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

In reply to by युगन्धरा@मिसलपाव

सुबोध खरे Sat, 11/30/2013 - 09:57
युगंधरा ताई, रोज नाही तरी आठवड्यातून दोन दिवस जरी आपण झोपण्यापूर्वी स्वच्छ स्नान करून मंद सुगंध असलेली पावडर किंवा गजरा घालून एक इस्त्री केलेला गाऊन(किंवा आपण निजताना वापरता ते वस्त्र) घालून इस्त्रीच्या चादरीवर झोपून पहा. या गोष्टीना फारतर दहा मिनिटे जास्त लागतील. स्त्रिया एकदा मुल झाले कि स्वतःकडे लक्ष देणे सोडून देतात."स्त्री हि क्षणाची पत्नी आणी अनंत कालची माता आहे" हे आचार्य अत्र्यांचे वचन स्त्रियांच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करून आहे. या गोष्टी केवळ दुसर्यासाठी नव्हे तर स्वतः साठी करून पहा. जर आपण सध्या हळदी कुंकू समारंभात जाण्यासाठी तयार होण्यात दहा मिनिटे घालवू शकता तर स्वतःला आनंदित करण्यासाठी आपण दहा मिनिटे दिली तर चालेल. ( हे आपल्याला उद्देशून आहे असे नाही तर सर्व स्त्रियांसाठी लागू आहे.) आपल्या व आपल्या आवडत्या व्यक्तीच्या (पतीच्या) नातेसंबंधात किती फरक पडतो ते सुद्धा आपल्याला जाणवेल. I AM ALWAYS DECKED UP FOR THE CELEBRATION CALLED "LIFE"