मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रार्थना

जयनीत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
जसे जसे बाबांचे गाव जवळ येत होते तशी येणा-या प्रत्येक स्टेशनवर गाडीतली भक्तांची गर्दी वाढतच होती. छातीला लटकणारे बिल्ले, गळ्यातले गमछे, खांद्यावरील बाबांच्या नाव लिहिलेल्या थैल्या, हातातील पोथ्या ह्यावरून बाबांचे भक्त चटकन ओळखू येत होते. डब्यात आता त्यांचीच संख्या जास्त झाली होती. " किती डॉक्टरांना दाखवलं, कोणत्याही उपचारांचा, कुठल्याही औषधांचा परिणाम झाला नाही, नुसता पाण्यासारखा पैसा खर्च झाला, मात्र फायदा काहीच झाला नाही, किती प्रार्थना केली, किती देवांना नवस बोललो असेल, त्याची गणतीच नाही. काहीही फायदा झाला नाही, सगळीकडून निराशाच हाताला लागली, काय करावं कळेनासं झालंय, त्रास बघवत नाही हो! पण आपलं माणूस आहे, सोडता थोडीच येतं, काही करायचं बाकी ठेवलं नाही, बाबांबद्दल ऐकलं अन तसाच धावत आलो!" विनायक शेजारी बसलेल्या भक्तांना सांगत होता. " अगदी योग्य केलंत!" शेजारचा भक्त म्हणाला " सगळं काही ठीक होईल! बाबांचा महिमाच आहे तसा! एकदा का बाबांची कृपा झाली की सगळं काही सुरळीत होईल बघा! बाबांचा आशीर्वाद घ्या! त्यांचा गंडा, अंगारा जे काही मिळेल ते घेउन जा! तो काय चमत्कार घडविल ते बघाच तुम्ही!" बाजूचा भक्त म्हणाला. " कित्येक लोकांच्या असाध्य व्याधी बाबांच्या कृपेमुळे चुटकी सरशी दूर झालेल्या आहेत. सगळे उपाय करून थकलेत की लोक येतात बाबांच्या चरणी!" दुसरा म्हणाला. " पण एकदा का तिथे पोहोचला की माणूस नेहमीसाठी तिथलाच होऊन जातो. आयुष्यच बदलून जाईल तुमचं! बघालच तुम्ही!" तिस-या भक्ताचे म्हणणे पडले. " मी तर गेल्या वीस वर्षापासून जातोय नेमानं! कळेल हळू हळू तुम्हाला! काय काय अनुभव आलेत लोकांना!" चौथ्याने म्हटले. जसे जसे लोक भेटत होते तसे तसे एक एक अनुभव कानावर येत होतेच. क्षणोक्षणी त्याचा विश्वास वाढतच चालला होता. गावात उतरल्या वर त्याला एक वेगळीच उर्जा जाणवली, गावात प्रत्येक गोष्टीवर बाबांचा ठसा होता, सर्व गावच दूर दूरून आलेल्या भक्तांनी फुलून आले होते, देशातल्याच विविध प्रांतातून नव्हे तर परदेशातून आलेल्या भक्तांना बघून तर तो अधिकच भारावला, कुणाला कुणाची भाषा कळत नसली तरीही सर्वांच्या चेह-यांवरचा भक्तीभाव सारखाच होता. आश्रमाची भव्यता बघून तर तो नतमस्तकच झाला. सेवाधारी अन साधकांची नम्र वागणूक, भक्तांचा शिस्तबद्ध संचार, धर्मशाळेतील स्वच्छता, अन माफक दरातले सुग्रास अन्न बघून त्याच्या मनात कुठलाही किंतु उरला नाही. 'उगाच ह्याला त्याला साकडं घालण्यांत वेळ घालवला, इथल्या सारखी भक्ती कुठल्याही देवस्थानात नजरेस आली नाही. बाबांचा आशिर्वाद आपल्याला संकटातून बाहेर काढेल नक्कीच!' विनायक विचार करीत होता. आता त्याच्या मनातील निराशेचे मळभ दूर झाले होते. आशीर्वादासाठी लागलेल्या लांब रांगेत त्याचा क्रमांक बराच पुढे होता. थोडे समोरच उभ्या असलेल्या काही स्त्रियांनी बाबांच्या पायावर ठेवायला आणलेल्या गोड बाळांकडे तो बघत असताच बातमी आली की दर्शनाचा कार्यक्रम अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आला होता. बाबांना हृदय विकाराचा झटका आला होता, आश्रामातीलच सुसज्ज इस्पितळात बाबांना भरती करण्यात आले होते. वातावरण क्षणात गंभीर झाले. गेल्या ब-याच काळापासून बाबांची प्रकृती खूपच खालावलेली होती. म्हणूनच आजकाल बाबांचे दर्शनही दुरूनच होत असे. उपचार सातत्याने सुरूच होते. पण कुठल्याही उपचारांना बाबांच्या व्याधी दाद देत नव्हत्या. त्यातच वर्षभरातच बाबांना आलेला हा हृदयविकाराचा दुसरा झटका होता हे त्याला बाकी भक्तांकडून कळले. सगळे उपाय करून झाले होते, पण परिस्थितीपुढे सर्वच हतबल होते, कुणालाही काही सुचेनासे झाले होते. " चिकीत्सेच्या सर्व आधुनिक सोयी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेतच, देशोदेशीचे बाबांचे शिष्य असलेले असलेले निष्णात डॉक्टर स्वत: जातीने बाबांवर उपचार करताहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश यावे आणि बाबा पूर्वीप्रमाणेच आपल्यात यावेत ह्यासाठी आपण सर्वशक्तीमान ईश्वराची प्रार्थना करूया!" बाबांच्या पट्टशिष्याने सर्व भक्तांना आवाहन केले. विस्तीर्ण सभामंडपातील असंख्य भक्तजनांसोबत विनायकनेही बाबांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना केली आणि तो गावी परतला. (समाप्त)

वाचने 8289 वाचनखूण प्रतिक्रिया 29

या कथाविषयक लेखनात समाजातील अनेक लोकांना असलेल्या बाबा लोकांच्या गरजेचे, आश्रमाचे, पंचतारांकित भक्तीचे जोरदार वर्णन आहे, परंतु शेवट वाचून अजिबात कळले नाही की नेमका कोणता संदेश द्यायचा आहे? तुमची भाषाशैली आवडली...

मराठे 22/06/2012 - 22:38
पुढे वेताळाने विक्रमास विचारले "इतक्या लांबून बाबांच्या दर्शनासाठी आलेला विनायक, वेगवेगळ्या भक्तांकडून बाबांच्या आशिर्वादाचे, कृपाप्रसादाचे दृष्टांत ऐकूनही शेवटी बाबांना न भेटता गावी परत का गेला ? या प्रश्नाचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्या पायाशी लोळू लागतील." विक्रमाने हसून उत्तरास प्रारंभ केला "वेताळा... रिकाम्या जागा भरा> " ------ भाषाशैलीबाबत जोशीसाहेबांशी +१

In reply to by मराठे

जयनीत 24/06/2012 - 19:13
विक्रम अन वेताळ ह्या फॉर्म मधे कथा लिहिण्याचे कधी पासुन मनात आहे. आता विषय निघालाच आहे म्हणून अशीच एक ह्या विषयावरच दुसरी एक स्वतंत्र कथा नक्कीच टाकील. प्रतीसादा बद्दल मनापसुन धन्यवाद.

वाचल्या वाचल्या कथा झटकन संपविल्यासारखी वाटली.तसा प्रतिसाद लिहिणारही होतो पण तेव्हा जाणवले कि कथेचा अगदी योग्य समारोप केला आहे.कथा अजुन मोठी असायला हवी होती हा विचार मनात येण्यामागे तुमची लेखनशैली कारणीभूत आहे.वाचतच राहावेसे वाटत होते. थोडक्यात ये दिल मांगे मोअर! ;)

तिमा 23/06/2012 - 09:56
बाबांवर वा त्यांच्या आजारावर कोणतेही भाष्य न करता देखील तुम्हाला जे सांगायचे आहे ते आम्हाला समजले.

कथेतून एक फार चांगला, आवश्यक आणि अत्यंत मोलाचा संदेश समाजाला तुम्ही दिला आहे. अभिनंदन. भावनांच्या भोवर्‍यात सापडून बाबांच्या चरणी हजर झालेल्या हतबल कथानायकाला एका घटनेने, क्षणात, वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोन प्राप्त झाला आणि त्याचा भ्रमनिरास झाला. 'बुवांच्या' पाठोपाठ 'राजकारण्यांच्या' बाबतही लवकरात लवकर भ्रमनिरास व्हावा (सर्वांचाच) म्हणजे देश प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करेल.

चौकटराजा 23/06/2012 - 11:19
कथा चांगली होण्यात समस्या, संघर्ष व नाट्य या तीन गरजा असतात. आपल्या या अत्यंत छोट्या कथेतही ते साधले आहे. लेखन शैली ही मस्त ! पु क शु

मृत्युन्जय 23/06/2012 - 11:37
मस्त जमली आहे कथा. अतिशय मार्मिक भाष्य. खरे म्हणजे कुठलेही भाष्य न करता अचुकपणे पोचलेला संदेश. लोकांना कथा कळली नाही याचेच आश्चर्य वाटते आहे.

शिल्पा ब 24/06/2012 - 09:56
शेवटी बाबा सुद्धा डॉक्टरच्या प्रयत्नांवरच जर जगणार तर भक्ताने त्या बाबाच्या नादी का लागावं? असा काहीसा संदेश असावा असं मला वाटलं तिमांना नेमकं काय समजलय ते आम्हाला समजलं नसावं असं दिसतंय.

In reply to by शिल्पा ब

अर्थातच इतका बाळबोध संदेश रुपककथेद्वारे गूढरीत्या या व्यासपीठावर दिला गेला तर तो एकदम समजला जाणार नाहीच. मला तर वाटले क्रमशः असणाऱ्या रहस्यकथेचा हा एक भाग असावा. योगायोगाने मनोगतावरही याच विषयावरील समीकरण नावाची कथामालिका सुरू झालेली आहे. माझ्या नशिबाने मला असा एकही माणूस आजवर नाही भेटला, की ज्याच्या सगा रोयऱ्याचा जीव वाचवणे तज्ज्ञ डॉक्टरांनाही जमत नव्हतो तो कुण्या पंच वा सप्त तारांकित बुवा अथवा महाराजांनी वाचवला आहे. अनेक लोक शेवटचा उपाय म्हणून या प्रकारच्या भक्तिमार्गावर जाताना पाहिले आहे कारण सर्व उपाय संपल्यावर अधिक काहीच केले नाही अशी रुख रुख मनाला लागू नये म्हणून ते लोक तसे करतात व तेही असा दावा करत नाही की त्यांचे मानलेले महाराज चमत्काराने कुणाचा जीव वाचवू शकतात. असे एक उदाहरण तर आमच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीच्या अशिक्षित कुटुंबाचे होते. अन मिपाच काय कुठल्याच मराठी संस्थळावर अशा तथाकथित चमत्कारांचा यशस्वितेबाबत दावा करणारे लेखन सांप्रतच्या काळात आढळून आलेले नाहीये. तात्पर्य, हा संदेश अशा प्रकारे येथे देणे म्हणजे, निर्व्यसनी माणसांना निर्व्यसनी असण्याचे लाभ सांगणारा संदेश देणे. समाजात कुणालाच याची आवश्यकता नसेल असे मी म्हणत नाही. पण या व्यासपीठावर तरी हे अपात्री दानच समजले जाईल.

आनंदी गोपाळ 24/06/2012 - 11:52
सरळ साधी कथा अन त्याचे सरळ तात्पर्य ध्यानी न येता पहिलेच 'काय कल्ला नाय' प्रतिसाद देणे अन मग त्याचे स्पष्टीकरणही पानभर देणे हे पाहून करमणूक झाली.

In reply to by आनंदी गोपाळ

आपले मनोरंजन झाले याबद्दल मनापासून आनंद आहे? कृपया 'पाटी पडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ समजून सांगावा. ठाऊक नाही म्हणून विचारतोय.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरे मला कुणी पाटी पडणे चा अर्थ समजावून सांगेल काय? परवा नाना पण 'बुच मारणे' हा वाक्प्रचार वापरत होते. आमच्या शाळेत नाही बुवा असे वाक्प्रचार वापरले जात.

जयनीत 24/06/2012 - 21:25
विस्तीर्ण सभामंडपातील असंख्य भक्तजनांसोबत विनायकनेही बाबांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी देवाकडे मनोभावे प्रार्थना केली आणि तो गावी परतला.>>>> जे लोक तथाकथीत ईश्वराला सर्वशक्तीमान म्हणतात अन वरून बाबां सारख्या मर्त्य माणसां कडुन जे त्या ईश्वराला जमले नाही ते घडण्याची अपेक्षा ठेवतात, अन वर ईश्वरावर अगाध श्रद्धेचा दावाही करतात त्याना काय म्हणावे? विनायक हा अनेक देवस्थानांना ही आधी जाऊन आलेला आहे, पण तेथे प्रत्यक्ष देवाला ही प्रार्थना केल्यावर त्याला निश्चित फळ मिळत नाही म्हणून तो निराश होऊन अजून एक उपाय म्हणून बाबांकडे जातो. पण तिथेही चमत्कारी बाबांसाठीही विनायकलाच नव्हे तर बाबांच्या मी मी म्हणणा-या जुन्या भक्तांही तथाकथीत सर्वशक्तीमान देवाकडे साकडे घालायची पाळी येते. तशी प्रार्थना करणा-या किती लोकांना आपल्या कृत्यातील विसंगती लक्षात येईल? काही लोकांना ही घटना दूरुन बघूनही त्यातली विसंगती लक्षात येईल आणि काही लोकांना प्रत्यक्ष अशा घटनांचा अनुभव घेउनही त्यांना त्यातील विसंगती जाणवणार नाही. अशी विसंगती न जाणवणारे लोक बहुसंख्य असतात. म्हणूनच अशा अनेक विपरीत अनुभव देणा-या घटना घडूनही आणि सारे मूलभूत तार्किक विरोध पचवून बाबा नावाची संस्था काहीही फरक न पडता ऐटीत उभी आहे.

स्पंदना 25/06/2012 - 08:03
मार्मिक ! कथा विस्तार अगदी हवा तेव्हढाच ! अन त्या मुळेच प्रभावी. फार लांबड लावुन काय साध्य होणाराय? नुसती शब्दबंबाळता आली असती मग . मला अतिशय आवडल लिखाण.

टुकुल 25/06/2012 - 11:03
छान.. आवडली कथा. बाबांना त्यांच्या आंतरीक शक्तिने आधीच कळाले कि विनायक असे काही तरी मागायला आलाय कि जे मला जमणार नाही आणी ह्याचे खुप वाईट वाटुन बाबांना हार्ट अ‍ॅटक आला. :-) --टुकुल

बाबा आपण स्वतः माणूसच होते ना? का ते चिरंजीव होते असा काही त्यांचा दावा होता ? माणूस मरणार म्हणजे काहीतरी होऊनच मरणार ना? हल्लीच्या कथांनुसार फॅशनेबल कथा आहे इतकंच.

जयनीत 27/06/2012 - 15:19
असो हे फक्त गमतीखातर घेतलंय. अरुण म्हात्रेंच्या ओळी खरंच खूप चांगल्या आहेत आणि वेगळ्या संदर्भात आहेत. इथे दुस-यांच्या समस्या स्वतःच्या अलौकिक शक्तीद्वारे चुटकी सरशी सोडवायचा दावा करायचा अन स्वत:च्या बाबतीत ही शक्ती कुठे जाते? कथा बाबा किंवा भक्ता बद्दल नाहीच भक्ती बद्दल आहे . बाकी सर्व वरच्या प्रतिसादात लिहिलं आहेच. एकच म्हणू इच्छितो देवा वरून विश्वास पूर्णपणे उडाला नाही पण कमी झाल्यावर लोक बुवा बाबां कडे जातात. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

In reply to by जयनीत

>> अरुण म्हात्रेंच्या ओळी खरंच खूप चांगल्या आहेत आणि वेगळ्या संदर्भात आहेत. अहो ही तर पुपेंची स्वाक्षरी आहे. मला वाटते स्वाक्षरीच्या वापरासाठी काही आचारसंहिता असायला हवी. पहिला मुद्दा म्हणजे, प्रतिसाद संपतोय कुठे अन स्वाक्षरी कुठे सुरू होत आहे हे कळायला हवे त्यासाठी एखादी रेघ आखल्यास उत्तमच. इतर मुद्दे - यावर चर्चा करण्यासाठी काथ्याकुटात चर्चा प्रस्ताव मांडावा लागेल.

In reply to by श्रीरंग_जोशी

जयनीत 27/06/2012 - 21:03
श्रीरंग, तुमचं म्हणणे बरोबर आहे, ती त्यांची स्वाक्षरी आहे हे माहीत आहे. ह्या आधीही त्यांच्या नावा सोबत दिसलीच होती. पण त्या बाबतीत पुण्याच्या पेशव्यांना क्रेडीट आणि धन्यवाद द्यायला हवेत, कारण त्या त्यांच्या प्रतिसादा सोबत नेहमीच दिसतात अन म्हणून लक्षात राहतात. अन मी नकली नोट हा शब्द वापरला तो त्या ओळीं वरुन सुचला म्हणुन तसे लिहिले.