मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पु लं , तुम्ही परत या

yeda · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पु लं , तुम्ही परत या. आम्हाला येवून हसवा. खूप खूप हसवा. तुम्हाला जावून आज १२ वर्ष झाली. आम्ही पोरके झालो. १२ वर्षात आमच्या आयुष्यात बरेच बदल झाले. अहो, 'भाई' या शब्दाचा अर्थही बदललाय. विनोदाची व्याख्याही बदललीय. तुमच्या सारखा निर्भेळ विनोद आज नाही. आज पोपट पंचीला प्रतिष्ठा मिळाली आहे. निराश झालो कि तुमचे टेप केलेले कार्यक्रम बघतो; मनाला उभारी येते. आजही नारायण आहे, आजचा नारायण जीन्स घालतो, रंगीबेरंगी टीशर्ट घालतो. मनगटावर किमती घड्याळ, डोळ्यावर ray -ban चा गॉगल घालतो. पायात reebok चे बूट घालतो. हातात आयफोन असतो. तो बाईक चालवतो. पण तो तेवढाच जुन्या वळणाचा आहे . खिशात पाकिटात कुठल्या तरी महाराजांचा फोटो असतो, त्यांच्यावर त्याची श्रद्धा आहे . तो मधून मधून महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाला जातो. त्याची स्वतःची पत्रिका पण पाकिटात असते. दिसेल त्या जोतीशाला पत्रिका दाखवण्याची त्याची हौस आहे. आजही चितळे मास्तर आहेत. पण ते शिक्षण सम्राटाच्या शाळेत शिकवतात. शिकवण्या घेतात. त्यांची फी भरपूर आहे. काळाप्रमाणे त्यांच्याही गरजा वाढल्यात. शिकवण्यापेक्षा पैश्यात जास्त रस आहे. ते तरी काय करणार. शिक्षणसम्राट विद्येच्या माहेर घरी येवून विद्येलाच विकून खावू लागलेत. आजही नाथा कामत आहे. तो शादी डॉट कॉम वर असतो. त्याला इंटरनेट वर कविता मिळतात, त्याच चिकटवून मुलीना पाठवतो. आय टी मध्ये आहे, त्याचा बराच वेळ फेस बुक वर च्या मुली बघण्यात जातो. रात्री बेरात्री इंटरनेट वर काय बघत असतो त्याच त्यालाच माहित. आजही नंदा प्रधान आहे. अमेरिकेत new york मध्ये एका मोठ्या कंपनीत गुंतवणूक सल्लागार आहे. गोर्या पोरी त्याच्या मागे आहेत. त्यांच्या बरोबर तो फिरत असतो. पण त्याची एक इराणी मैत्रीण होती, तिचं लग्न झालं आणि त्याला पोरका करून गेली. तो मधून मधून महाराष्ट्र मंडळात कार्यक्रमाला जातो. आजही पेस्तन काका आहेत. मुंबईत त्यांच्या जुन्या घरा शेजारी उंच उंच इमारती आहेत. त्या अंधार्या घरात अजूनच अंधार झालाय. त्यांना बिल्डरांचे धमकीवजा फोन येत असतात. त्यांच्या शेजारच मराठी कुटुंब कधीच डोंबवलीला गेल. पेस्तन काकांच्या जिभेवर अजूनही मालती काकूने केलेल्या अळूवड्याची चव आहे. बटाट्याची चाळ इकडे होती ते आज सांगून सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही. तिथे आता मोठ्ठी स्कीम झाली आहे. नावाला एक दोन मराठी कुटुंब आहेत. पण त्यांचे ब्लॉक्स बंद आहेत. कारण ते सर्व जण अमेरिकेत आहेत. माणसांपेक्षा गाड्याच जास्त आहेत. त्या सांभाळता सांभाळता बिचार्या यु पी तून आलेल्या गुराख्याची त्रेधा तीरपिट उडते. आमच्या आयुष्यात इंटरनेट आलं आणि आमचा, मध्यम वर्गीयांचा कणाच मोडला. पोर पोरी शिकून आय टी मध्ये जावून ऐटीत फिरायला लागली, आई बापापासून दूर गेली. कुटुंब दुरावली. आता आम्ही इंटरनेटवरच आम्ही सगळे भेटतो. आज आजी आजोबा TV वर मराठी मालिका बघण्यात दंग. मुलं इंटरनेट वर दंग. आई क्लब मध्ये दंग. बाबा कामात दंग. आम्हा मध्यम वर्गीयांचा तुम्ही मध्यबिंदू होतात. तुम्ही परत या आणि आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणा. -भूषण

वाचने 7347 वाचनखूण प्रतिक्रिया 45

जेनी... Wed, 06/13/2012 - 05:38
आमच्या आयुष्यात इंटरनेट आलं आणि आमचा, मध्यम वर्गीयांचा कणाच मोडला. पोर पोरी शिकून आय टी मध्ये जावून ऐटीत फिरायला लागली, आई बापापासून दूर गेली. कुटुंब दुरावली. आता आम्ही इंटरनेटवरच आम्ही सगळे भेटतो. आज आजी आजोबा TV वर मराठी मालिका बघण्यात दंग. मुलं इंटरनेट वर दंग. आई क्लब मध्ये दंग. बाबा कामात दंग. ________________________________ आत कुठेतरी लागलं, पण जखम दिसत का नाहिय कुणास ठाऊक ....

In reply to by जेनी...

कापूसकोन्ड्या Wed, 06/13/2012 - 07:53
आत कुठेतरी लागलं, पण जखम दिसत का नाहिय कुणास ठाऊक ....
अगदी.. अगदी.. वाटतच नाही हो, १२ वर्षे झाली. लेखक विनोदी रुढ अर्थाने. पण एखाद्या चुकार क्षणी, एखादा प्रसंग, एखादी वाक्य रचना,जशी त्या तशी जेव्हा आठवते, तेंव्हा मात्र डोळे ओले होतात, तर कधी कधी चक्क काही टिपे पडतातच. असे का होते? त्या जगन्नाथाच्या रिष्टवाचात एखादाच सेकंद काटा पुढे सरकेलेला असतो, पण आपल्याला मात्र वाटते बारा वर्षे झाली.

In reply to by किसन शिंदे

५० फक्त Wed, 06/13/2012 - 08:34
कुणालातरी लग्नाच्या रिसेपशनमध्ये असं म्हणुन बघा, लग्न छान केलंय पण (तुम्ही) तुमच्या बायडिला शोभुन दिसत नाही.

५० फक्त Wed, 06/13/2012 - 07:51
आठवण म्हणुन ठिक पण एक वेगळ्या प्रकारे व्यक्तीपुजा मांडली आहे असं वाटलं. पुलंच्या प्रतिभेबद्दल प्रश्न नाही पण जे जग त्यांनी दाखवलं, उभं केलं आज मराठी माणुस त्याच्या पासुन बराच पुढं गेला आहे किंवा लांब गेला आहे, तर त्याबद्दल तक्रार का आहे समजलं नाही, पतंग जेंव्हा दिसेनासा होतो तेंव्हा तो खुप खुप उंच गेलेला असतो, आणि मग त्याचंही दुखः व्हायला लागतं असं आहे हे. आमच्या आयुष्यात इंटरनेट आलं आणि आमचा, मध्यम वर्गीयांचा कणाच मोडला. पोर पोरी शिकून आय टी मध्ये जावून ऐटीत फिरायला लागली, आई बापापासून दूर गेली. कुटुंब दुरावली. आता आम्ही इंटरनेटवरच आम्ही सगळे भेटतो. आज आजी आजोबा TV वर मराठी मालिका बघण्यात दंग. मुलं इंटरनेट वर दंग. आई क्लब मध्ये दंग. बाबा कामात दंग. - हे शेवटचं तर एकदम हाय पॉइंट आहे, काही वर्षापुर्वी हेच टिव्हीबद्दल बोललं जात होतं. इंटरनेटनं मध्यमवर्गीयांचा कणा मोडला कसा, ते तर ऐच्छिक आहे, कुणी सक्ती नाही केलेली याच इंटरनेटवर अन घ्या कणे मोडुन अशी. प्रत्येक काळात वेगवेगळ्या गोष्टींमुळं दोन किंवा तीन पिढ्यांच्या बदलणा-या इंटरेस्टस मुळं काही काळ घरातली माणसं ही अशी वेगळी पडतातच, जणु काही पुलंच्या काळात आणि पुलंच्या मु़ळं घरातली सगळी माणसं, आपले आपले कामं करुन आले की घरात एकत्र बसुन परवचा म्हणायचं असं चित्र उभं होतंय उगाचच. आम्हा मध्यम वर्गीयांचा तुम्ही मध्यबिंदू होतात. तुम्ही परत या आणि आम्हाला पुन्हा एकदा एकत्र आणा. - हा तर एकदम हायक्लास उच्चभ्रु का काय असा विनोद आहे, पार ओएसओएस आहे हे वाक्य. थोडा बदल करुन शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, गेला बाजार राजीव गांधी आणि पि व्हि नरसिंहरावांना पण असंच आवाहन करता येईल.

In reply to by ५० फक्त

कापूसकोन्ड्या Wed, 06/13/2012 - 08:26
अरे काय हे? पुल परत या म्हणजे काय? इंटरनेट चा त्यांनी जास्त वापर केला असता. एक कल्पना करा, पुल आहेत, मिसळपाव वर काहीतरी नावाने वावरत आहेत.''अळूरपांडे'' वगैरे. काय धमाल आली असती? पुलं ची आठवण आहे. 'कणा मोडला' वैगरे एखादा शब्द इकडे तिकडे झाला असेल, पण भावना समजा. पुल स्वत: सर्व लेखनात आपल्यासमोर स्मरण रंजन म्हणूनच आले, पण त्यांचे विचार प्रगतच होते. ''गेले ते दिन गेले'' असे म्हणत असताना एक हळहळ जरूर असायची, पण नवीन काळाचे स्वागत पण होते. असो. तुमच्या भावना समजल्या. व्यक्तीस्तोम ...... वगैरे वगैरे खास

In reply to by कापूसकोन्ड्या

सहज Wed, 06/13/2012 - 10:15
भाईकाका कसे तासनतास फेसबुक, चॅट मधे अडकले असायचे व शेवटी सुनीताबैंनी कठोर होउन नेट कनेक्शन फक्त स्व:ताच्या देखरेखीतच ठेवून मग भाईंकडून अजुन एक दोन चांगल्या मालीका, दोन चार ग्लोबल मराठी पोएट्री प्रॉजेक्ट्स, शास्त्रीय संगीताचा इंटरनॅशनल फेस्टीव्हल, मधुनच काही इंट्रनॅशनल भाषांतरे लिहून घेतली असेही वाचायला मिळाले असते ना? :-) पण ट्विटर, फेसबुकवरच्या कॅंडींड कॉमेंट्समुळे हे दांपत्य सदानकदा वादाच्या भोवर्‍यात अडकून गेले असते वर ते लोक ना फक्त पैशा व प्रसिद्धीकरता.. असे म्हणत तमाम मध्यमवर्गीय मराठी लोकांनी त्यांना निकालात काढले असतेच!

In reply to by ५० फक्त

चिगो Wed, 06/13/2012 - 13:54
पुलंचं आमच्या जीवनातलं स्थान हे दुसरं कुणीही घेऊ शकत नाही.. आजही मन त्यांच्या पुस्तकांत रमतं. त्यांच्या सोन्या बागलाणकरमार्फत मारलेल्या टपल्या आजही तितक्याच चपखल आहेत. पुलं वाचत सततांना काही कारणांनी पुस्तक हातातून खाली ठेवावं लागल्यास, आजही तोंडून "सॉरी पुलं" निघून जातं, इतके ते आमच्यात आहेत, पण... पण, तरीही इंटरनेट आणि टिव्हीचा मध्यमवर्गीयांचा कणा तुटण्याशी लावलेला संबंध पटला नाही.. मला तरी व्यक्तिशः मिपावर भेटलेली अनेक मंडळी, व्यक्ती आणि लेखक म्हणून भावलेली आहेत. (आणि हे इंटरनेटमुळेच) रामदासकाका, गवि, धमु, सुहास, परा, ५०राव,मृत्युंजय, शरद, वल्ली, मितानतै, तात्या यांसारखी अनेक.. आणि नवीन गोष्ट आली की लगेच जुनं सगळं संपतं, हा सुरही दिसतोय लिखाणात जो की चुकीचा आहे.. मी इ-बुक्स पण वाचतो आणि पुलंची पारायणं पण करतो. संदिप-सलील इंटरनेटवर ऐकतांना आशा-लता, बाबुजी ह्यांच्या सिड्यापण संग्रही असु शकतातच की ऐकायला.. पुलंनी असायला हवंच होतं.. आताच्या परिस्थितींवर त्यांच्या कोट्या, चिमटे ऐकायला वाचायला प्रचंड आवडलं असतं. त्यांनी दिलेला ठेवा चिरंतन अक्षय आहे, पण हा लेख म्हणजे भाईंच्याच स्टायलीत (थोडं एडिटींग करुन) "ते बाया-माणसांना सेंटी करुन धागा गाजवायचा म्हण्जे पा ऽ प बघा.." ;-)

पैसा Wed, 06/13/2012 - 08:01
पण हे घडलंय, घडून गेलंय. आता परतीचा रस्ता नाही. जगाबरोबर राहण्याचा प्रयत्न करताना काही बरं काही वाईट बरोबर आलंय. आहे ते ठीक आहे म्हणून रहायचं. कारण तो काळ परत येणार नाही तसे पु. ल. परत येणार नाहीत. हेच वास्तव आहे.

कापूसकोन्ड्या Wed, 06/13/2012 - 08:03
आजही नारायण आहे,
आजही चितळे मास्तर आहेत.
आजही नाथा कामत आहे.
आजही नंदा प्रधान आहे.
आजही पेस्तन काका आहेत.
बटाट्याची चाळ इकडे होती ते आज सांगून सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही.
अगदी खरे आहे. हे सर्व जण आहेतच पण ते वर्णन करायला कुणाला वेळ आहे,तेवढी प्रतिभा आहे, आणि जरी असली तरी, ते वाचायला/ ऐकायला कुणाला वेळ आहे?

चौकटराजा Wed, 06/13/2012 - 08:51
अरे भाउ साहेब, आम्ही मी गेलो नाही. मी अगदी तुमच्यात आहे. आजकालच्या पोरांची विनोदबुध्दी आमच्या पिढीपेक्षा चांगली आहे. पोरांनी ती ताणतणावाच्या जिंदगीतही शाबुत ठेवली आहे. निराश नका होउ ! निसर्ग जर गावसकर नंतर कोण हा प्रश्न सोडवू शकतो याचाच अर्थ निसर्ग इतका करंटा नाही. खिल्ली उडवावी,अगदी नाईलाजानं टवाळीही करावी असे विषय तर गेल्या बारा वर्षात भरपूर वाढले आहेत असे ऐकतो. ......खरे तर आमच्या साहित्यकृतीच्या रूपात आम्ही वावरतच आहोत. पण अगदीच हट्ट असेल तुमचा तर पुन्हा साहित्यातला तेंडूलकर म्हणून जन्म मिळेल् ही ! नियतीचं काय सांगावं भाउसाहेब ! आपला भाई .. ... ता क -- अक्षरास हसू नये. ......

अर्धवटराव Wed, 06/13/2012 - 09:06
पण पु.लं आपल्यात नाहि असं का वाटतं तुम्हाला? मला कधीच तसं जाणवत नाहि. बाकी इतर पात्रांचं स्थित्यंतर छान जमलय... एक नारायण सोडुन. नारायणाने वधु-वर सुचक मंडळ आणि शादी इव्हेंट मॅनेजमेण्ट वगैरे धंदा सुरु करायला हवा होता. अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

प्रसाद प्रसाद Wed, 06/13/2012 - 13:23
पण पु.लं आपल्यात नाहि असं का वाटतं तुम्हाला? मला कधीच तसं जाणवत नाहि. मला अगदी हेच म्हणायचे होते. पु.लं. ची आठवण आली की त्यांचे एखादे प्रवासवर्णन (पूर्वरंग वगैरे) वाचले की पु.ल. आपल्यात नाहीत असे वाटतच नाहीत. त्यांच्या कथाकथनाच्या आणि इतर असंख्य दृकश्राव्य माध्यमातून ते जवळच आहेत असे वाटते.

In reply to by दिपक

५० फक्त Wed, 06/13/2012 - 09:55
चिंटुला त्याचे बाबा सगळे असली न कळणारी पुस्तकं आणुन देतात म्हणुन निराश आहे हे समजुन घ्या, त्याला चंपक, मॅजिक वर्ल्ड, ठकठक, चांदोबा असली पुस्तकं दिली असती ना तर ही वेळ आली नसती, तुमच्याकडं ही चिंटु असेल तर ही काळजी घ्या नक्की. हे काय वय आहे का चिंटुचं तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी, व्यक्ती आणि वल्ली, तुझं आहे तुजपाशी वगैरे वाचायचं.

In reply to by ५० फक्त

प्रसाद प्रसाद Wed, 06/13/2012 - 13:29
व्यंगचित्रांचा / चित्रांचा काय आणि कसा अर्थ लावावा ह्यावरून झालेला हलकल्लोळ ताजा आहेच. (ह. घे. हे. वे. सां. न. ल.)

In reply to by दिपक

मृगनयनी Wed, 06/13/2012 - 16:12
दिपक!... बरोब्बर १२ वर्षांनी "तोच्च" चिन्टू रिपिट झाला... २००० साली १२ जूनला पुल. दुपारी गेल्यानन्तर १३ जूनचा चिन्टू' हाच्च होता!... खूपच इफेक्टीव्ह वाटला तो तेव्हा!.... आणि आजही वाट्टोय..... :| १३ जून २००० ला सकाळी भान्डारकर रोडला.. "मालती-माधव"च्या पार्किन्ग मध्ये जेव्हा पु.लं.च अन्त्यदर्शन घेतलं.. तेव्हा या "चिन्टू"सारखंच सुन्न वाटलं होतं.... तेव्हा "श्रीकान्त मोघे" हसता हसता रडत होते.. आणि सांगत होते.. की "भाईने जगाला हसायला शिकवलं.. तर त्याला निरोप देताना.. डोळ्यांत पाणी आणून कसं चालेल?" :|

ऋषिकेश Wed, 06/13/2012 - 10:52
शेवटी काय घड्याळाचे पट्टे नी तबकड्या बदलतात. सुखाने टळलेली दुपार पहायला तबकडी नी पट्टे कसले का असेना. आपला तोल सांभाळला म्हणजे झालं.. फार पुढे जायचीही भिती नाही आणि फार मागे पडायचीही भिती नाही! छ्या! पुलंनी हे असं सांगुनही हे आठवणींचे कढ काढणं - आठवणींचा तोल न सांभाळणं आहेच का? असो. भाई अजूनही आमच्यातच असल्याने त्यांना परत या सांगायची गरज वाटत नाही. सबब लेखन आवडले नाही

योगप्रभू Wed, 06/13/2012 - 10:29
पु. ल. गेले आणि हसणं बंद झालं बघा मराठी मध्यमवर्गीयांचं. आता नेटवर फक्त भांडण्यापुरते आणि दुसर्‍याला कुत्सितपणे बोलून निराश करण्यासाठी भेटतात लोक.

रणजित चितळे Wed, 06/13/2012 - 14:02
ही सगळी पात्र आपल्यात लपलेली असतात. आपण जरी आधूनिक युगात वावरत असू तरी सुद्धा एखादा चितळे मास्तर (;-)) असतो. कामाचे स्वरुप जरी बदलले असले तरी भावना जपणारी लोक आहेत व राहतील.

निश Wed, 06/13/2012 - 17:56
yeda साहेब, पुल किंवा अत्रे काय ही सगळी देव माणस. भरभरुन आनंदाच व सुखाच दान आपल्याला देउन ते ह्या जीवन रूपी रंगमंचावरुन निघुन गेली नविन लोकांसाठी हा रंगमंच ठेवुन. तो ह्या नविन लोकानी त्यांच्यातल्या प्रतिभेने जिवंत करायचा आहे. पुल वरुन तल्लिन होउन ह्या नविन लोकांची प्रतिभा बघत असणार व विचार करत असणार ह्यातील त्यांचा नारायण कोण? नाथा कामत कोण व खुद्द पुल कोण ते ?

विकास Wed, 06/13/2012 - 19:14
एखाद्या आवडीच्या कलाकार/लेखक/कवी/राजकारणी व्यक्तीची त्याच्या जयंतीस अथवा मयंतीस आठवण येणे हे समजू शकते आणि केवळ तेव्हढ्या अर्थाने लेखातील भावना जरी मला पटल्या नसल्या तरी पोचल्या. पुलंच्या व्यक्तींवल्लींच्या सुधारलेल्या आवृती सादर करण्याची कल्पना देखील आवडली आणि चांगली जमली आहे असे माझे मत आहे. पण तितकेच... आपण आधीच्या पिढीसारखे अथवा लहानपणातील वातवरणाप्रमाणे, तसेच्या तसे आज रहात नाही याची कुठेतरी, तुम्हालाच नाही तर प्रत्येकालाच, कधी ना कधी अपराधी जाणीव अथवा मनाला हुरहुर लावून जाते. आज अनेक गोष्टी अस्वस्थ करणार्‍या झाल्या आहेत. पेस्तनजींवरून तुम्ही जे काही लिहीले ते वाचताना ते जास्तच वाटले. पण तरी देखील, आज बटाट्याची चाळ आपल्याला (त्यात मी देखील आहे) वाचायला आवडते म्हणून तेथे जाऊन आयुष्य काढायला आपण तयार होऊ का? अधुनिकतेपेक्षा जागतिकीकरणाच्या दबावाखाली मराठी माणूसच काय सगळा भारतच बदलत आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीयांना, इतर कुठल्याही देशातील त्याच वर्गातील व्यक्तींप्रमाणे त्याचा जास्त nostalgia असतो.... पण तेव्हढ्या पुरतेच. या चर्चेसंदर्भातच बोलायचे तर, स्वतः पुलंनी किती बदल बघितले आहेत? पण ते बदल बघत असताना, ते थांबले नाहीत. गतकाळाबद्दलची आत्मियता आणि जेथे हवी तेथे कृतज्ञता ठेवत ते पुढे गेले. आपण कधी त्यांचा हा गुण घेणार? विचार करा, आपली मुले मोठी होत असताना, आपण त्यांना नक्की काय शिकवतो/शिकवू? त्यांना केवळ परीक्षांच्या मोटेस बांधून ठेवून, त्याच सिस्टीममधे डॉक्टर-इंजिनिअर-सॉफ्टवेअर पुरते मर्यादीत ठेवणार (का तर त्यात पैसा आहे) का त्यांच्या आवडी निवडी बघत त्यांना फुलवत इतरही क्षेत्रात येऊन देणार? खरे म्हणाल तर, आज पुलच कशाला, गतकालातील इतर अनेक - सर्वच क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तीमत्वांचे बियाणे नव्हते असे नाही... पण शिवाजी असोत अथवा पुल, त्यांचा जन्म हा शेजार्‍याच्याच्या घरीच असावा असे जो पर्यंत वाटत रहाणार, तो पर्यंत असेच वार्षिक लेख लिहून इंटरनेटचा वापर करत आपल्या भावना व्यक्त करत बसावे लागणार..

शकु गोवेकर गुरुवार, 06/14/2012 - 08:38
१) एका मित्राकडे मैफिलिला पु ल गेले होते,तेव्हा शरद तळ्वळ्कर यांची भेट झालि ,घरी परतताना पु ल ना एकाने विचारले काहो पु ल ,तुम्हाला शरद तळ्वळ्कर हा माणुस कसा वाट्तो, पु ल म्हणाले- अहो काय सांगु,हा साधा सरळ्सोट माणुस आहे त्याने विचारले-ते कसे काय तेव्हा पु ल म्हणाले-अहो,हा माणुस ईतका साधा आहे कि त्याच्या नावात काना मात्रा किंवा वेलांटी सुद्धा नाही ,खरे कि नाही -- २) प्रख्यात किराणा गायिका माणिक ताई दादरकर यांच्या लग्नाला पु ल गेले होते ,माणिक ताई नी वर्मा या अमराठि माणसाशी लग्न केले तेव्हा एकाने पु ल ना विचारले की पु ल तुम्हाला या जोडी बद्दल काय वाट्ते,पु ल म्हणाले- माणिक ने वर्मावरच घाव घातला कि हो-- आणि वर्माजीना काय्,चांगले त्याना माणिक मिळाले आहे -- दुर्दवाने माणिक ताई आता हयात नाहित व पु ल हि हयात नाहीत्, या दोघांना श्रद्धाजली

In reply to by शकु गोवेकर

प्रभाकर पेठकर गुरुवार, 06/14/2012 - 10:10
शरद तळ्वळ्कर ........त्याच्या नावात काना मात्रा किंवा वेलांटी सुद्धा नाही ,खरे कि नाही -- तुम्ही मात्र त्यात जोडाक्षरे घुसडून पुलंनाही खोटं ठरवलंत.

In reply to by प्रभाकर पेठकर

५० फक्त गुरुवार, 06/14/2012 - 12:10
काका, डुआयडि म्हणजे अशा चुका कराव्याच लागतात, जाणुन बुजुन. नाहीतर उघड होईल ना पितळ.