मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिथक

पेशवा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
१. अजयने खिडकीचे दार उघडले. समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. सकाळच्या आठाचे ठोके पडायला सुरुवात झाली. एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. डोळे मिटून अवघडलेली मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवली. पुन्हा एक दीर्घ श्वास घेत तो वळला. पलंगावर त्याचा इस्त्री केलेला ड्रेस पडला होता. चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला. "अजय, तू शहाण्यासारखा ऐकणार असशील तरच मी पुढची गोष्ट सांगेन. नाहीतर जा पाहू कामाला", सोनावणे आजी अजयला लटके रागे भरत होत्या. "सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता. अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. अ‍ॅम्ब्युलन्स अजयसमोर येऊन उभी राहिली. अजयने आजीचा हात सोडला व धावतच तो अ‍ॅम्ब्युलन्समध्ये चढला. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते. अजय दचकून जागा झाला आणि उठून बसला. त्याचे हृदय भयंकर वेगाने धडधडत होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. घर शांत होते. बाहेर रहदारीचा आवाज येत होता. अजय बेसिनपाशी गेला. त्याने तोंडावर पाणी मारले. परत येऊन पलंगावरचा फोन उचलला आणि ऑफिसचा नंबर फिरवला."सुरेश, धिस इज अजय हिअर. येस. आय वॉज. बट आय नीड सम मोअर टाइम. आय अ‍ॅम एक्स्टेन्डिंग माय लीव्ह. येस, आय विल फाइल इट. प्लीज अप्रूव्ह. नो, आय डोन्ट नो. येस, अ मंथ, मे बी मोअर. थँक्स. शुअर." फोन बाजूला फेकत तो पुन्हा खिडकीसमोर येऊन उभा राहिला. "आपल्या या बोधी पर्वतात? आजी, तू कशावरपण विश्वास ठेवतेस. अगं, मिथ आहे ते." गारी, अजयची आजी, वाती वळतावळता थांबली व अजयकडे पाहत तिने विचारले, "मिथ म्हणजे?" "मिथ म्हणजे... आई, 'मिथ'ला मराठीत शब्द काय, गं?" अजयने आईला विचारले. "दंतकथा. अजय, तिला छळू नकोस उगाच." "कळलं?" गारी आजीकडे पाहत अजय चेष्टेच्या सुरात म्हणाला. "डोंबलाची दंतकथा. अरे, खरंच, अशी माची आहे, जिथे एक झोपडं आहे आणि त्यात द्विज नावाचा ऋषी गेली अनेक तपं राहतोय. त्याचेच तर शिष्य होते आपले गोविंदमहाराज. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्या ऋषीकडे. गोविंदमहाराजांना त्यानेच दीक्षा दिली. गोविंदाय नम: गोविंदाय नम:", आजीने भिंतीवरच्या गोविंदमहाराजांच्या फोटोला मनापासून हात जोडले. अजय तावातावाने पुढे काही बोलणार इतक्यात आईने त्याला डोळ्यांनी दाबले. अजय गप्प झाला. खिडकीच्या समोर अजय गप्प उभा होता. गारीआजीच्या वाड्यातला तो झोपाळा, ते सारवलेले अंगण, तिच्या सुरकुतलेल्या हाताचा तो मऊ स्पर्श, तिचे ते "गोविंदाय नम:" म्हणणे... अजयला भडभडून आले. आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग? सगळं तार्किकदृष्ट्या योग्य पण... "सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्यांच्याकडे", आजीचा आवाज अजयच्या कानाजवळ कुजबुजला. दचकून अजयने आजूबाजूला पाहिले. घर शांत होते. बाहेरून रहदारीचा आवाज येत होता. समोरच्या टीपॉयवर स्नेहाचे मृत्युपत्र पडले होते. "अजय या पैशांचं काय करायचं? सोन्यासारखी पोटची पोर गेली. या पैशांनी परत येणार आहे?" स्नेहाच्या वडिलांची व्याकुळता, तिच्या आईचे कोलमडून पडणे अजयला आठवले. आधार देण्यासाठी आतआतपर्यंत त्याला काही सापडले नव्हते. आवंढा गिळून त्याने पुढची इच्छा कशीबशी वाचली होती. स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते. "अजय, बघ पटकन. हा इंडियन ग्रे हॉर्नबिल", आपली बायनॉक्युलर अजयकडे देत स्नेहा उत्साहाने म्हणाली. अजय कुणाशीतरी फोनवर बोलत होता. कसनुसा विनवणी करणारा चेहरा करत त्याने फोनच्या तोंडावर हात ठेवत ओठांनीच 'बॉस' असे म्हटले आणि पुन्हा बोलण्यात मग्न झाला. परत घरी येताना स्नेहा एक शब्दही अजयशी बोलली नव्हती. "ओ, कमॉन स्नेहा. कशाकरता चिडली आहेस इतकी?" "कशाकरता? राइट, आजचा दिवस दोघांनी एकत्र घालवायचा ठरवले होते. पण तुला कामापुढे काही सुचत नाही." "अरे! असे काय करतेस. हे प्रोजेक्ट महत्त्वाचं आहे." "आणि मी नाही? मला काही कामं नाहीत? तुला माझी आणि माझ्या वेळेची काही किंमत नाही, अजय." "याचा आणि त्याचा काय संबंध. उगाच कुठलीही गोष्ट कुठेही ताणू नकोस. तुला आवडतं म्हणून आपण गेलो होतो." "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल", स्नेहा फणकार्‍याने निघून गेली. हातातल्या बायनॉक्युलरमध्ये पडलेले प्रतिबिंब न्याहाळत अजय बराच वेळ बसून होता. त्याच्या नकळत त्याने बायनॉक्युलर डोळ्यांना लावली. समोर बॅंडेजमध्ये गुंडाळलेली स्नेहा झोपली होती. नकळत त्याने हात पुढे केला. "प्लीज, इथे जवळ बस", स्नेहाला बोलायला खूप त्रास होत होता. "एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन, यू सी.." अजयने तिचा हात हातात घेतला. "आय हॅव नो रिग्रेट्स... आय लव्ह यू", स्नेहा सारा जीव एकवटत म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. "ग्रे हॉर्नबिलांची नेहमी जोडी दिसते, अजय", स्नेहा पूर्ण कोमात जायच्याआधी बरळताना म्हणाली होती. अजयने बायनॉक्युलर पुन्हा टेबलावर ठेवली. टेबलावर क्रेडिट कार्ड कंपन्यांची निमंत्रणे, बँकेची पत्रे, घराच्या टॅक्सचे पेपर पडले होते. समोरच्या कपाटात अजयने मिळवलेल्या ट्रॉफ्या होत्या. अजय ताडकन उठला. त्याने बायनॉक्युलर उचलली, बूट घातले, घराच्या बाहेर पडला आणि तिथेच पुतळ्यासारखा उभा राहिला. पाचेक मिनिटांनी मनाशी निश्चय झाल्यासारखा पुन्हा घरात आला. फोन उचलला आणि त्याने घरचा नंबर फिरवला. त्याला कल्पना होती अजून आईबाबा घरी पोचले नसतील. त्याने मेसेज ठेवला, "आई, बाबा, काळजी करू नका. मी एका महिन्यासाठी परगावी जात आहे. मला या एक महिन्यात कॉन्टॅक्ट करणं जमणार नाही. कुठलीही काळजी करू नका". २. अजयच्या पायाला चालूनचालून भेगा पडल्या होत्या. अंगावर जागोजागी खरचटले होते. आज पंधरा दिवस झाले होते. अजय या पर्वतरांगांमध्ये एकाकी फिरत होता. बोधी पर्वतातील त्या माचीचा शोध घेत होता. दोन दिवसांपूर्वी चोबेच्या झोपडीवजा हॉटेलात चहा घेताना चोबेच्या मागे लटकवलेल्या चित्राने त्याचे लक्ष वेधून घेतले होते. "चोबे, हे कसले चित्र आहे?" अजयने विचारले. चोबे कसनुसे हसला व म्हणाला, "काही नाही साहेब. उगाच पोरखेळ". अजय त्याच्याकडे रोखून बघत राहिला. तसा त्यालाही कंठ फुटला. "साहेब, या भागात अशी दंतकथा आहे की ही झोपडी दक्षिणेकडच्या अतिशय दुर्गम अशा रांगेत एका माचीच्या टोकाला आहे. म्हणतात तिथे कुणी साधू अनेक वर्षे तप करत बसलाय." "चोबे, तुमचा विश्वास दिसतो,या कथेवर." "तसं नाही साहेब, पण हे चित्र माझ्या आज्याने काढलंय. त्याने म्हणे प्रत्यक्ष त्याच्या डोळ्यांनी पाहिली ही झोपडी. आज्याचे आशीष म्हणून लावलं आहे हे चित्र. इतकंच." "मला माहीत आहे तिथे कसं जायचं", या दोघांचे बोलणे ऐकत बसलेल्या एका इसमाने मध्येच म्हटले. "भोसडीच्या, गप्प राहा", चोबे त्या इसमावर खेकसला. "साहेब, वाईट शब्दाची माफी करा. पण हे आहे गांजाड. दिवसभर पडलेला असतोय इथे. दुसरा उद्योग नाही. लोकांकडून पैसे घेतो, गांजा मारून पडून राहतो. ऐकू नका याचं काही". अजयने चोबेचे पैसे चुकते केले आणि तो बाहेर पडला. त्याच्या मागून तो गांजाडा इसमही. "मला माहीत आहे तिथे कसे जायचे ते." अजयने दुर्लक्ष केले. त्यानंतरही बराच वेळ तो इसम अजयच्या मागे मागे येत राहिला. अजयला काय वाटले कोण जाणे, अचानक थांबून म्हणाला, "सांग कसे जायचे तिथे?" "काय देणार?" "किती पैसे हवेत?" "पैसे सगळे. त्याचबरोबर तुमचे जॅकेट, शर्ट आणि हे तुमचे बूटसुद्धा." "वेड लागलंय का?" तो इसम नुसताच हसला. दहाएक मिनिटांनंतर अजय थांबला. बराच वेळ तो झाडावरच्या कुठल्यातरी पक्ष्याकडे बघत राहिला आणि अचानक मागे वळून त्या इसमाला म्हणाला, "ठीक आहे. सांग". अजय दगडाच्या आडोशाने झोपला होता. हे शरीर नवीन होते. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक श्वास वेगळा होता; मोकळा होता. स्नेहा गेली हे आयुष्याला पडलेले भगदाड कसे बुजवावे हे समजत नव्हते. प्रत्येक पानाचे, प्रत्येक पक्ष्याचे बारकाईने निरीक्षण करण्याचा चाळा लागला होता. नकळत त्याचे कान बारीक आवाज टिपत होते. रात्रीच्या काळोखात सजीव, निर्जीव या सगळ्यांमध्येच काहीकाही बदलत जाते आणि दुसर्‍या दिवशी उजाडलेल्या प्रकाशात लखलखणारे जग सर्वस्वी नवे, निराळे असते. अजय उठला. दूरवर पसरलेल्या पर्वतरांगांकडे त्याने पाहिले. थंडगार वार्‍याच्या जाणिवेने त्याने त्या इसमाने दिलेली फाटकी शाल गुंडाळून घेतली आणि तो चालू लागला. आज पाच दिवसांनंतर तो माचीसमोर उभा होता. दूर माचीच्या टोकाला एक झोपडे होते. पण माचीची रुंदी अतिशय कमी होती. त्यावरून चालणे शक्यच नव्हते. इतक्या उंचीवर वार्‍याचा वेग प्रचंड होता. दोन्ही बाजूंना हजारो फूट खोल दर्‍या होत्या. अजयचे सगळे अवसान गळले. मनाचे सारे बांध फोडत वैफल्य दाटून आले आणि दुःखातिशयाने तो तिथेच मटकन बसला. "सॉरी, वुई ट्राइड अवर बेस्ट", डॉक्टरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. "व्हॉट डू यू मीन, यू ट्राइड युवर बेस्ट? कम ऑन, डॉक्, डू समथिंग. काहीतरी असेल, कुणीतरी असेल?" डॉक्टरांनी मान हालवली. अजयच्या डोळ्यांत साठलेल्या पाण्यात त्याच्या मुठीत असणारे आयुष्य विरघळून गेले. "अजय, आत जा", बाबांनी त्याच्या खांद्यावर थोपटले. "नाही जमणार मला, बाबा. काय सांगू मी तिला. कसा फेस करू?" "राजा, मन घट्ट कर. दैवापुढे इलाज नसतो. सगळं आपल्या हातात नसतं रे!" आईने तोंडाला पदर लावत हुंदका दाबला. अजय ताडकन उठला. दूरवर दिसणार्‍या झोपडीकडे जळजळीत कटाक्ष टाकत त्या माचीवर त्याने स्वतःला झोकून दिले आणि सरपटत सरपटत तो त्या झोपडीकडे सरकू लागला. दोन दिवस लागले त्याला ती माची पार करायला. अंगावरचे उरलेले कपडे फाटून गेले होते. जणू काही पहिल्या मीलनासाठी कुठलेही कृत्रिम पेहराव न घालता भेटणे अपेक्षित होते. सारे अंग जखमांनी भरले होते. या दोन दिवसांत तो एखाद्या जनावरासारखाच राहिला होता. माणसाच्या जनावर या रूपाची झालेली ही ओळख आयुष्यभर बाळगलेल्या स्वतःविषयीच्या त्याच्या कल्पनांना उद्ध्वस्त करून गेली होती. झोपडी ज्या जागेवर होती ती जागा विस्तीर्ण होती. तिथे पोचताच शक्तिपाताने अजयने जमिनीवर अंग झोकून दिले आणि गाढ झोपी गेला. जाग आली तीच मुळी पावसाच्या हलक्या सरीने. समोरच्या दगडी खळग्यात साचलेले पाणी पिऊन त्याने तहान भागवली आणि तो झोपडीच्या समोर उभा राहिला. "तू तिला विचारणार आहेस? आज?" राहुलचा, अजयच्या मित्राचा, विश्वास बसत नव्हता. "हो." "मला नाही वाटत ती तुला हो म्हणेल." "का?" "तुझी अ‍ॅम्बिशन कॉर्पोरेट लॅडर चढायची. तिला कॉर्पोरेट वर्ल्डची किती अ‍ॅलर्जी आहे माहीत आहे ना तुला?" "सो? ऑपोझिट्स अ‍ट्रॅक्ट हे ऐकलं आहेस ना रावल्या? आणि लग्न करशील का? हे नाही विचारणार तिला गाढवा! जस्ट अ डेट. माय फिलॉसॉफी या बाबतीत 'वाहने सावकाश हाका' अशीच आहे बे." तो सार्‍या शक्यतांचा क्षण पुन्हा अजयच्या मनात तरळून गेला. आज तो गारीआजीच्या गोष्टीतील झोपडीसमोर उभा होता. काय असेल आत? प्रचंड उत्सुकतेने त्याने झोपडीत प्रवेश केला आणि तितक्याच तोलमोलाने निराशेने त्याचे स्वागत केले. आत काही नव्हते. प्रचंड संतापाने त्याने झोपडीच्या भिंतीवर लाथा घालायला सुरवात केली. तोंडाने अखंड शिव्या चालू होत्या. भावनेचा आवेग ओसरल्यावर तो बाहेर आला आणि आजूबाजूच्या शिखरांकडे पाहत जोरात ओरडला, "यू फूल". काही सेकंदांनी ती सारी शिखरे पुन्हा त्याच्यावर ओरडली, "यू फूल". अजय मोठ्यांदा हसायला लागला. त्याचे सारे त्राण संपले होते. त्याच्या हातात पुन्हा एकदा काहीच लागले नव्हते. अजयला भोवळ आली आणि तो त्या झोपडीसमोरच कोसळला. जाग आली तेव्हा उन्हे चढली होती. बहुतेक सोसाट्याचे वादळ येऊन गेले असावे. ती झोपडी दूर फरफटून गेली होती आणि माचीच्या टोकाला अगदी पडण्याच्या बेताने उभी होती. झोपडी बांधायला वापरलेला एक बारीक दोर दगडांच्या सांदीत अडकला होता. केवळ त्याच्या आधाराने ती अजून टिकून होती नाहीतर ती कधीच खाली कोसळली असती. अजयने मागे पाहिले. इथे थांबण्यात काही अर्थ नव्हता. पण मग त्याने विचार केला, या मिथकाचा शेवट बघून जाणेच कदाचित योग्य ठरेल. "आय नीड क्लोजर", असे पुटपुटत तिथेच एका दगडावर तो वाट बघत बसून राहिला. ३. मिनिटांचे तास झाले, तासांचे दिवस. ती झोपडी अजूनही कोसळली नव्हती. त्या एका दोर्‍याच्या बळावर ती उभी होती. अजयला नवल वाटले. नकळत त्याने बघ्याची भूमिका घेतली. जवळच उगवलेली करवंदं आणि पानावर साठणारे दंव, अधूनमधून पडणारी सर यांनी पोटापाण्याचा प्रश्न तसा सोडवला होता. वाट बघण्यात महिना उलटून गेला होता. घरचे काळजी करत असतील, एक विचार येऊन गेला. एकापाठी दुसरा, दुसर्‍यापाठी तिसरा. तो त्रयस्थपणे विचारांकडे पाहत होता. ऋतू बदलत होते. जोरदार वार्‍यांचा ऋतू संपला. पावसाचा ऋतू आला आणि गेला. पण तो इवलासा दोर हार मानायला तयार नव्हता. झोपडी अजूनही उभीच होती. पावसाच्या ऋतूनंतर आला बहराचा ऋतू. झोपडी अजूनही तग धरून होती. आज सहाएक महिने होत आले होते. अचानक एक निळा पक्षी घुमटदार शीळ घालत त्या झोपडीवर उतरला. अजयकडे तो बराचवेळ बघत बसला होता. त्यानंतरच्या दिवसांत त्या पक्ष्याने त्या झोपडीच्या छपरावर एक घरटे बांधले. काही दिवसांनी त्यात दोन अंडी घातली. अजय हे सगळे पाहात होता. याचा काय अर्थ लावावा हेच त्याला समजत नव्हते. काही दिवसांनी त्या अंड्यांतून दोन इवले राखाडी रंगाचे जीव बाहेर आले आणि त्यांच्या किलबिलाटाने ती माची भरून गेली. कुठल्यातरी अनामिक आनंदाची जाणीव अजयला होत होती. तो पक्षी रात्रंदिवस त्या पिलांसाठी चारा आणत होता. अजयच्या लक्षात आले दोन पिलांत एक पिलू आडदांडपणाने सगळा चारा घेत होते व भराभर वाढत होते तर दुसरे कमजोर होत चालले होते. अचानक अजयच्या काळजात धस्स झाले. "यातले एकच जगणार", तो स्वतःशीच पुटपुटला. काहीतरी करायला हवे. दुसर्‍या कमकुवत पिलाला वाचवायला हवे. त्याची उलाघाल चालली होती. एके दिवशी या अस्वस्थतेत तो झोपडीच्या दिशेने निघाला आणि "सगळं आपल्या हातात नसतं रे!" हे आईचे शब्द ऐकून जागीच थबकला. स्नेहा गेली, गारी गेली, आता हे पिलू जाणार. एक दीर्घ श्वास घेत तो मागे फिरला आणि त्या अटळ क्षणाची वाट पाहत बसून राहिला. एका दुपारी त्या आडदांड पिलाने धक्का दिल्यानंतर एक हृदय पिळवटणारी शीळ घालत ते कमजोर पिलू खालच्या खोल दरीत फेकले गेले. अजयने डोळे मिटले. त्या कोसळणार्‍या पिलाची प्रत्येक भावना त्याला समजत होती. काही वेळाने त्याचे सारे शरीर खालच्या दगडावर आदळल्याचा भास त्याला झाला. सारे संपले. त्याने डोळे उघडले. समोर तो निळा पक्षी त्या उरलेल्या पिलाला चारा भरवत होता. एक पिलू कमी आहे हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते. डोळ्यांच्या कडेला साचलेले पाणी अजयने पुसले. बहराचा ऋतू संपत आला होता. येणार्‍या सोसाट्याच्या वार्‍यांच्या ऋतूची चाहूल लागायला लागली होती. अजयला त्या दोराची कंपने समजत होती. हा शेवटचा ऋतू. घरट्यातील पिलू आता चांगलेच मोठे झाले होते. घरट्याबाहेर तासन्‌तास ते बसून राहत असे पण अजूनही ते उडायचा प्रयत्न करत नव्हते. अजयच्या मनाची उलाघाल होत होती. याने उडायला हवे. नाहीतर याचाही शेवट... अजयचे मन धजत नव्हते... आयुष्यावर स्वार होण्याची इतकी सवय अजूनही मोडत नव्हती. हे पिलू उडाले नाही तर तो बघ्याची भूमिका सोडणार हे स्वतःलाच बजावायचा प्रयत्न करत होता. पण आज मन ते ऐकत नव्हते. सोसाट्याचा वारा सुटला होता. कोणत्याही क्षणी तो दोर तुटणार. अजयच्या काळजात धस्स झाले आणि दोर तुटला. त्या झोपडीच्या कोसळण्याबरोबर ते पक्ष्याचे पिलूदेखील कोसळत होते. त्या पिलाची आई वर घिरट्या घालत शीळ घालत होती. अजयने डोळे मिटले. अजयच्या आयुष्याला बांधून ठेवणारा स्नेहा नावाचा दोर तुटला. अजय आयुष्यावर बेफिकीरपणे बसला होता. सगळे संपले होते आणि अचानक कुठूनतरी अजयच्या मनाला पंख फुटले. एका अनामिक शांततेने त्याला बुडवून टाकले आणि त्याने आपले दोन्ही हात फैलावले. आपल्या अंगाखाली दूर दूर जाणार्‍या झोपडीकडे एकदा पाहिले आणि त्याला तरंगल्याची जाणीव झाली. समोर मोकळे आकाश होते आणि नकळत त्याच्या चोचीमधून एक घुमटदार शीळ बाहेर पडली. अजयच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. ते निळे पिलू आपल्या पहिल्या उड्डाणात आसमंत काबीज करायला निघाले होते. अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" काही सेकंदांनी एकापाठोपाठ एक शिखरांतून उत्तर आले, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते. ----- सुचना: - सर्व हक्क लेखकाकडे. - मायबोली दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित

वाचने 16210 वाचनखूण प्रतिक्रिया 69

रामपुरी Fri, 04/13/2012 - 03:59
हि "कथा प्रतिभा" मराठी म्हणायची की इंग्रजी? (काही टाळता येण्याजोगे इंग्रजी शब्द वाचले आणि पान उलटले त्यामुळे पूर्ण वाचू शकलो नाही. )

In reply to by शिल्पा ब

नगरीनिरंजन Fri, 04/13/2012 - 14:15
कथा आवडली पण समजली नाही. अजयला मृत्यु हे मिथक आहे हे कळले की जीवन हे मिथक आहे हे कळले (की दोन्ही) ते नक्की ठरवता आले नाही. वातावरण निर्मिती चांगली जमली आहे.

अशी पुसट शंका मनाला स्पर्शून गेली. मग वाटलं नाही, हे कसं शक्य आहे? कालानुक्रमाची दखल घ्यायला नको का? इथे जरी आता प्रकाशित झाली असली तरी मुळात ती `काऊ आणि चिऊ' पूर्वीच प्रकाशित झाली आहे आणि मग जाणवलं की अशा कथा कालातीत असतात. जोपर्यंत मानव या पृथ्वीवर आहे तोपर्यंत विवाह होत राहणार आणि अशा कथा येत राहणार.

मुक्त विहारि Fri, 04/13/2012 - 11:06
यस्....काऊ आणि चिऊच..... पण कथा मनाला भिडली नाही..... बरीच सरमिसळ आहे.... थोडी झलक "तो आणि ती" व "संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली" ह्यांची पण जाणवत आहे... कादंबरीची कथा झाली आहे....आणि मुख्य म्हणजे कथा नायक पुढे काय करतो ह्याचा काहिच पत्ता नाही... १. तो तिथेच राहतो की नविन जोडीदार बघुन परत डाव मांडतो... २. गावातिल लोक आता त्याला साधूचा दर्जा देतात का? ३. आई-वडिलांचे काय? त्यांची जबाबदारी तो का झटकून टाकतो?

In reply to by मुक्त विहारि

निळे पिलू, अजय की `ऋषी द्विजा' (पक्षी (इथे पक्षीचा अर्थ `म्हणजे' असा आहे निळा पक्षी असा नाही) तर, ...पक्षी मूळचे निळे पिलू आणि सद्यस्थितीत साक्षात्काराचा क्षण उपभोगलेला अजय)? तुम्ही कथेचा शेवट पाहा : "स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते" अशा परिस्थितीत अजयला पुढे खूप काम पडणार आहे याची दखल घ्यायला हवी असे वाटते (थोडक्यात तुमचे प्रश्न गैरलागू आहेत) किंवा हा पुन्हा `नव्या मिथकाचा' पूर्वसंकेतही असू शकतो हे लक्षात घेण्यासारखे आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Fri, 04/13/2012 - 15:12
सुरुवातिला उल्लेख केलेल्या "मुग्धा सोनावणे" चे काय झाले? हा प्रश्न मला "मारुती कांबळेचे काय झाले?" ह्या सामना सिनेमा सारखाच सतावत आहे..... म्हणजे हा नायक परत त्या मुग्धा बरोबरच लग्न करतो का? किंवा कसे हे प्रश्न पण आहेतच...कदाचित ह्या मुग्धाच्या लोभा पाई ह्याने स्नेहाचा खुन पण केला असेल म्हणुनच ह्याने तिच्या प्रवासाला मान्यता दिली असेल्...आणि मग तिचा काटा काढला असेल्...कारण स्नेहाचे देहावसान कसे झाले ह्याचा उलगडा होत नाही... म्हणुन मी म्हणालो की कादंबरीची कथा केली आहे.....

In reply to by परिकथेतील राजकुमार

ते नायकाने पुढे काय `केलं '? असा खडा सवाल करून दस्तुरखुद्द पेशव्यांनाच स्पष्टीकरण मागतायंत, आणि नायकानंच नायिकेची गेम केली नसेल कशावरून? असा पतीसुलभ प्रश्न विचारतायंत

In reply to by मुक्त विहारि

तुमच्या प्रश्नांमुळे वाचकांचा गोंधळ उडतो आहे स्नेहा पूर्वाश्रमीची मुग्धा सोनावणे असून तिचा - आता पुनर्जन्म झालायं निळे पिलू - ऋषी द्विजा बनून अवकाशात गेले आहे आणि अजय - स्तंभित होऊन ऐकत आहे >ह्या मुग्धाच्या लोभा पाई ह्याने स्नेहाचा खुन पण केला असेल? असा विचार तरी कसा आला तुमच्या मनात? ही दंतकथा आहे रहस्यकथा नाही, तरी आता जास्ती प्रश्न विचारून वाचकांची दिशाभूल करू नये ही विनंती

In reply to by परिकथेतील राजकुमार

मानव हा पुत्र नसून धर्म आहे आणि "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते......असं खुद्द स्नेहानी म्हटल्यावर अजय `दोष ना कुणाचा.. हे साँग कसं म्हणू शकेल असाही प्रश्न उरतोच.

In reply to by संजय क्षीरसागर

असं वाटायला लागलं आहे कारण रोज नवेनवे अर्थ उलगडत आहेत "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते......" इति स्नेहा. आता हे वाक्य सहज वाचलं तर नेहमीचं आहे पण लेखकानं माझ्याबरोबर ऐवजी माझ्यावर अशी भेदक रचना करून अजय-स्नेहा संबंधाचं एक वेगळंच चित्रण केलंय असं वाटतं

मुक्त विहारि Fri, 04/13/2012 - 18:57
१. अ)" शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा ". ( हिचे आणि हिच्या आज्जीचे पुढे काय झाले?...गेले २ दिवस खूप सतावले आहे ह्या कूट प्रश्नाने...) ब) सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. (आता त्यांनी हे सर्व सोडले आहे का?....की त्यांच्या अशा वागण्याने मुग्धा पळुन गेली....कारण अशा वागण्याने मुले पळुन जातात , अशा खुप कथा आहेत....) क) अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. (तुम्हाला कपातल्या चहाचा असे म्हणायचे आहे का? कारण चहा हा गरम असल्याने, आम्ही तो कपातुन पितो, तुम्हाला हवे असेल तर आम्ही तो चहा तुम्हाला हातात देवु...) ड) एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. (हे त्याला कसे काय जमले?...मी खूप प्रयत्न केला पण मी एका वेळी , एक तर श्वास घेवु शकतो किंवा सुस्कारा सोडु शकतो).....(मला अद्याप खोकला आणि शिंक एकाच वेळी आलेले नाही, ) इ) चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत. (मघाशी हातात असलेला चहा एक्दम कपात कसा काय गेला? म्हण्जे अजय हा एक हौशी जादुगार पण होता असेच तुम्हाला सुचवायचे असेल तर ह्या सुचक वाक्याला आमचा प्रणाम.....) फ) शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. (मी आणि माझ्या आजू - बाजूची सर्व नर जमात आधी पँट आणि मग मोजे घालतात.....) ग) हा पुढचा संवाद का टाकला आहे? "अजय, तू शहाण्यासारखा ऐकणार असशील तरच मी पुढची गोष्ट सांगेन. नाहीतर जा पाहू कामाला", सोनावणे आजी अजयला लटके रागे भरत होत्या. "सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता. (कारण ह्या संवादाचा पुढच्या कथेशी काहीच संबंध नाही आहे.....बरे लाल बुट घालुन कामावर आज काल कोणीच जात नाही....काळेच बुट घातले पाहिजेत असा अलिखित नियम आहे...अपवाद देव आनंद आणि राज कुमार...म्हणजे नायक हा ह्या दोघांचा फॅन आहे असे समजुन मी पुढे वाचायला सुरुवात केली....) ह) स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते. (ह्या वॉलेटचे एकदम हृदयात रुपांतर झालेले बघुन "अजय हा पार्ट टाईम जादुगार होता" हेच सिद्ध झाले...) हा) समोरच्या टीपॉयवर स्नेहाचे मृत्युपत्र पडले होते. "अजय या पैशांचं काय करायचं? सोन्यासारखी पोटची पोर गेली. या पैशांनी परत येणार आहे?" स्नेहाच्या वडिलांची व्याकुळता, तिच्या आईचे कोलमडून पडणे अजयला आठवले. (ह्या माणसांचे पण पुढे काय झाले?..) ही ) स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते....(घ्या हे असेच काहीसे "तो आणि ती" ह्या पुस्तकात आहे... सगळ्याच स्त्रियांना हे वेड असते.) हु ) "अजय, बघ पटकन. हा इंडियन ग्रे हॉर्नबिल", आपली बायनॉक्युलर अजयकडे देत स्नेहा उत्साहाने म्हणाली. अजय कुणाशीतरी फोनवर बोलत होता. कसनुसा विनवणी करणारा चेहरा करत त्याने फोनच्या तोंडावर हात ठेवत ओठांनीच 'बॉस' असे म्हटले आणि पुन्हा बोलण्यात मग्न झाला. परत घरी येताना स्नेहा एक शब्दही अजयशी बोलली नव्हती... (वरिल वाक्ये नीट वाचा.बघा ह्याच्या कडे वायरलेस "फोन" आहे....मोबाईल वायरलेस असतो असे माहित आहे पण फोन?... म्हणजे ह्यांनी मिलिटरीतुन आणला का?... असे असेल तर हा नायक खुप पोचलेला दिसत आहे.) हे) भांडण करुन स्नेहा फणकार्‍याने निघून गेली. (कुठे , कशाला , का, कधी, कोणाबरोबर....सगळे प्रश्न एकदम आले.) है) हातातल्या बायनॉक्युलरमध्ये पडलेले प्रतिबिंब न्याहाळत अजय बराच वेळ बसून होता. त्याच्या नकळत त्याने बायनॉक्युलर डोळ्यांना लावली. समोर बॅंडेजमध्ये गुंडाळलेली स्नेहा झोपली होती. (आता समोर जर स्नेहा असेल तर ह्या बायनॉक्युलरची काय गरज?...म्हणजे ह्याची नजर कमकुवत आहे काय? पण नसावी कारण ह्याला "समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी असलेली दिसते....इथुन माझ्या मनात संशय यायला सुरुवात झाली.) हो) त्याने मेसेज ठेवला, "आई, बाबा, काळजी करू नका. मी एका महिन्यासाठी परगावी जात आहे. मला या एक महिन्यात कॉन्टॅक्ट करणं जमणार नाही. कुठलीही काळजी करू नका". (आपल्या आई-बाबांना वार्‍यावर सोडा असेच हा लेखक सुचवत आहे का? की नायक व्यक्ती-स्वातंत्र्याच्या यात्रेतील एक यात्रेकरु आहे? शी बाबा किती हा खुराक नाही बुध्धीला?) आता आपण वळुया भाग २ कडे... ह्यात तर वेळेचा काहीच संबंध नाही आहे....अर्थात "इन्सेप्शन" पाहिल्यामुळे बरे झाले... २. अ) अजयच्या पायाला चालूनचालून भेगा पडल्या होत्या. अंगावर जागोजागी खरचटले होते. आज पंधरा दिवस झाले होते. (आणि मग "स्नेहा गेली " ह्या एका वाक्या भोवती भरपुर वाक्ये) ब) आज पाच दिवसांनंतर तो माचीसमोर उभा होता...(नक्की ५ की १५) क) दोन दिवस लागले त्याला ती माची पार करायला.....(आता हे २ दिवस का?, कसे काय ? मग त्या ५ आणि १५ चे काय करायचे?) ड) जणू काही पहिल्या मीलनासाठी कुठलेही कृत्रिम पेहराव न घालता भेटणे अपेक्षित होते. (हं आतां कसं.. हे असेच वाक्य "संन्याशी ज्याने आपली संपत्ती विकली"..सारखे आहे...आणि मतितार्थ पण तसाच आहे..) ३. अ) पण तो इवलासा दोर हार मानायला तयार नव्हता. झोपडी अजूनही उभीच होती. आज सहाएक महिने होत आले होते. (कमाल आहे नाही...झोपडी पडायची वाट बघण्याची सवय काही गेली नाही...म्हणजे हा नायक लोकशाही वर विश्वास ठेवणारा मध्यमवर्गीय दिसत आहे... दुसरा कुणी तरी ते काम करेल मग आपण का मध्ये पडा? असाच काहीसा विचार तो करत असेल.... इथे मी खूप वेळ विचार केला...नायकाने ६ महिने घेतले मी १२ तास घेतले.. आणि पुढे वाचायला सुरुवात केली..) ब) अचानक एक निळा पक्षी घुमटदार शीळ घालत त्या झोपडीवर उतरला... (परत एक कूट...आता असा निळा पक्षी शोधा , जो शिट्टी वाजवतो आणि ती पण घुमटदार ....म्हणजे रोड साईड रोमियो तर नसेल?...ते पण निळे सिनेमे बघुन घुमटदार शिट्टी वाजवतातच की?...परत एक कुट सोडवा....आपण काही पक्षी तज्ञ नाही..त्यामुळे आपला पास...) क) अजयकडे तो बराचवेळ बघत बसला होता.... (का?...विचार नको करायला...तो आणि निळा पक्षी बघतील , आपण मध्यमवर्गीय आहोत...दोघांत नको पडायला) ड) त्यानंतरच्या दिवसांत त्या पक्ष्याने त्या झोपडीच्या छपरावर एक घरटे बांधले. काही दिवसांनी त्यात दोन अंडी घातली... (पक्षीण अंडी घालते , पक्षी कसा काय घालेल?...ऐकावे ते नवलच आणि वाचावे तर अजुनच...जगातील पहिले आश्चर्य ते हेच की काय?) इ) काही दिवसांनी त्या अंड्यांतून दोन इवले राखाडी रंगाचे जीव बाहेर आले आणि त्यांच्या किलबिलाटाने ती माची भरून गेली. (पक्षी निळा आणि राखाडी पिल्ले?...आता जमतय हे कूट्...फार मोठ्ठा क्लु मिळाला...आंतरजातिय विवाह दिसत आहे..) ई) दोन पिलांत एक पिलू आडदांडपणाने सगळा चारा घेत होते व भराभर वाढत होते तर दुसरे कमजोर होत चालले होते. (लोकशाही म्हणतात ती हीच...म्हणजे भारत देश....अजुन एक क्लु) ऊ) "सगळं आपल्या हातात नसतं रे!" हे आईचे शब्द ऐकून जागीच थबकला. स्नेहा गेली, गारी गेली, आता हे पिलू जाणार. एक दीर्घ श्वास घेत तो मागे फिरला आणि त्या अटळ क्षणाची वाट पाहत बसून राहिला. (१००% मध्यमवर्गीय.... हेच फायनल..) ए) एका दुपारी त्या आडदांड पिलाने धक्का दिल्यानंतर एक हृदय पिळवटणारी शीळ घालत ते कमजोर पिलू खालच्या खोल दरीत फेकले गेले. अजयने डोळे मिटले. त्या कोसळणार्‍या पिलाची प्रत्येक भावना त्याला समजत होती. काही वेळाने त्याचे सारे शरीर खालच्या दगडावर आदळल्याचा भास त्याला झाला. सारे संपले. त्याने डोळे उघडले. समोर तो निळा पक्षी त्या उरलेल्या पिलाला चारा भरवत होता. एक पिलू कमी आहे हे त्याच्या गावीसुद्धा नव्हते. डोळ्यांच्या कडेला साचलेले पाणी अजयने पुसले. (आयला मस्तच....सगळे क्लु मिळाले.... न्यायदेवता आंधळी असते...ती ठाक-ठीक करणारे पण निळे सिनेमे बघु शकतात....म्हणजे रोड साईड रोमियो पण मोठे होवु शकतात...व्वा!! व्वा!! एकदम सॉलिड...) ऐ) बहराचा ऋतू संपत आला होता. येणार्‍या सोसाट्याच्या वार्‍यांच्या ऋतूची चाहूल लागायला लागली होती. अजयला त्या दोराची कंपने समजत होती. हा शेवटचा ऋतू. घरट्यातील पिलू आता चांगलेच मोठे झाले होते. घरट्याबाहेर तासन्‌तास ते बसून राहत असे पण अजूनही ते उडायचा प्रयत्न करत नव्हते. अजयच्या मनाची उलाघाल होत होती. याने उडायला हवे. नाहीतर याचाही शेवट... अजयचे मन धजत नव्हते... आयुष्यावर स्वार होण्याची इतकी सवय अजूनही मोडत नव्हती. हे पिलू उडाले नाही तर तो बघ्याची भूमिका सोडणार हे स्वतःलाच बजावायचा प्रयत्न करत होता. पण आज मन ते ऐकत नव्हते. सोसाट्याचा वारा सुटला होता. कोणत्याही क्षणी तो दोर तुटणार. अजयच्या काळजात धस्स झाले आणि दोर तुटला. त्या झोपडीच्या कोसळण्याबरोबर ते पक्ष्याचे पिलूदेखील कोसळत होते. त्या पिलाची आई वर घिरट्या घालत शीळ घालत होती. (म्हणजे निवडणुका आल्या...आणि त्या अनुषंगाने इतर गोष्टी...) ओ) अजयने डोळे मिटले. अजयच्या आयुष्याला बांधून ठेवणारा स्नेहा नावाचा दोर तुटला. अजय आयुष्यावर बेफिकीरपणे बसला होता. सगळे संपले होते आणि अचानक कुठूनतरी अजयच्या मनाला पंख फुटले. एका अनामिक शांततेने त्याला बुडवून टाकले आणि त्याने आपले दोन्ही हात फैलावले. आपल्या अंगाखाली दूर दूर जाणार्‍या झोपडीकडे एकदा पाहिले आणि त्याला तरंगल्याची जाणीव झाली. समोर मोकळे आकाश होते आणि नकळत त्याच्या चोचीमधून एक घुमटदार शीळ बाहेर पडली. अजयच्या डोळ्यांतून अश्रू वाहात होते. ते निळे पिलू आपल्या पहिल्या उड्डाणात आसमंत काबीज करायला निघाले होते. अजय अत्यानंदाने त्याच्याकडे पाहत ओरडला, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" काही सेकंदांनी एकापाठोपाठ एक शिखरांतून उत्तर आले, "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" अजय स्तंभित होऊन ऐकत होता. साक्षात्काराचा क्षण असेल तर तो असाच, याची एक वेगळीच जाणीव त्याच्या मनात होत होती. स्नेहाचे जाणे एक मिथक बनून पुन्हा जन्माला येत होते. (म्हणजे नविन सरकार आले...) हं) सुचना: - सर्व हक्क लेखकाकडे. - मायबोली दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित (म्हणजे जे काही आहे ते कायद्या प्रमाणे आहे.......) आता हे सगळे क्लु जोडा आणि मग वाचा..... साधी एका वाक्याची कथा आहे... एक मध्यमवर्गीय माणुस , निवडणुकांच्या बाबतीत बघ्याची भुमिका घेतो आणि निरपराध लोकांचा बळी जातांना आपल्या डोळ्यासमोर बघतो.न्याय देवता पण काही करु शकत नाही..आणि आपल्या सुखा-समाधानासाठी आपल्या आई-वडिलांना पण विचारत नाही, पर स्त्रीची अभिलाषा धरतो, तिच्या संपत्तीची हाव धरतो..(कारण तो आधी , तिने किती पैसे देणगी म्हणुन दिले आहेत ते बघुन, मग बिले बघतो.) पण मि.पा.चे धोरण ओळखुन त्यांनी ही कथा फुलवली आहे हा ? प्रश्न मनांत आल्या शिवाय रहात नाही.(सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? ह्या प्रश्नाचा इथे काहीच संबंध नाही आहे , हे आधीच सांगुन ठेवतोय.)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तिमा Sat, 04/14/2012 - 12:09
कथा डोक्यावरुन गेली. लेखकाच्या अंगात कथा लिहिताना, एकाच वेळी , ग्रेस व जी. ए. संचारले असावेत.

In reply to by मुक्त विहारि

काही प्रश्न : ही `काऊ आणि चिऊ' ची कमालीच्या प्रतिभेनं कथन केलेली स्टोरी आहे किंवा ज्यांना हे मिथक उलगडत नसेल त्यांनी बलमनाला समजेल अशी काऊ आणि चिऊची कथा वाचावी असं आपल्याला वाटत नाही काय? आपण माझ्या पहिल्याच प्रतिसादाशी सहमत झाल्यामुळे मी हे विचारायचं साहस करतो . आपण हे मिथक अत्यंत पृथक-पृथक करून ते वृथक आहे असं दाखवायचा प्रयत्न तर करत नाही ना? अशामुळे ज्यांना ते समजले आहे आणि ज्यांची मने शांत झाली आहेत त्यांचा आपण गोंधळ उडवत आहात अशी आपल्या समज देण्याची मला मुभा आहे का? एखाद्याचा `पोपट होणं' या समाजमान्य वाक्प्रचाराला आपण `मिथक वाचून माझं बदक झालं' असा नवा पर्याय निर्माण करत आहात काय? "हे ऋषी द्विजा, तुला माझा प्रणाम!" असं एखादा सदस्य आपल्याला म्हणाला तर आपल्याला काही ऑब्जेक्शन असेल काय? आणि नसेल तर तसं म्हटलंय असं समजून घ्याव ही विनंती. मी का केलं मिथकचं कथ्थक उगीच पृथक पृथक? अशी कविता कुणी केली तर प्रताधिकाराचं बदक कुणाच्या अथक कामाला मिळेल अशी साधकबाधक आणि मादक चर्चा... आयला आता मी पार गंडलोयं, सॉरी.

In reply to by संजय क्षीरसागर

५० फक्त Sat, 04/21/2012 - 07:16
म्हणजे एका आयडिनं लॉगाऔट होउन दुस-या आयडिनं लॉग इन व्हावं असं म्हणायचं का तुम्हाला ?

पैसा Fri, 04/13/2012 - 19:09
काही रुपकं कळली. काहींवर विचार करते आहे. आणि तुमच्या आधीच्या कवितेचे काही धागेदोरे या कथेत असावेत अशी शंका येतेय!

यकु Fri, 04/13/2012 - 19:37
अजय ने काय काय केले? 1. अजयने खिडकीचे दार उघडले. [नंतर अजय खिडकीतून पहातो आहे आणि त्याला हे दिसतं] ---- समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. 2. खिडकीजवळ उभ्या असलेल्या अजयने हातातल्या चहाचा घोट घेतला. [अजय पहात असलेले दृश्‍य पुढे चालू ] ---- पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता. अजय निर्विकारपणे हे पाहत होता. सोनावणे आजी, म्हणजे मुग्धाची आजी, मुग्धाला हे करू नको, ते करू नको, असे वाग, तसे वागू नको हे सांगण्यात गुंग होत्या. 3. हे सगळं पाहून झाल्यानंतर खिडकीजवळ उभ्या असलेल्या अजय ने काय केले? ---- एक दीर्घ श्वास घेत त्याने सुस्कारा सोडला. डोळे मिटून अवघडलेली मान उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे फिरवली. पुन्हा एक दीर्घ श्वास घेत तो वळला. पलंगावर त्याचा इस्त्री केलेला ड्रेस पडला होता. चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेवत त्याने आवरायला सुरूवात केली. शर्ट चढवला, मोजे घातले, यांत्रिकपणे पँट चढवली. मानेभोवती टाय अडकवून तो आरशात पाहत उभा राहिला. टाय बांधता बांधता नेहमीच्या सवयीने त्याने स्नेहाला हाक मारली, "स्नेहा, माझं वॉलेट कुठे आहे?" आणि दुसर्‍या क्षणी त्याच्या काळजाचा ठोका चुकला. डोळे पाण्याने भरून आले. हाताला घाम फुटला. तसाच आवेगाने मागे होत तो पलंगावर दोन हात बाजूला ठेवून मान खाली घालून बसला. येणार्‍या उमाळ्याला आवरायचे सामर्थ्य त्याच्याकडे नव्हते. ओंजळीत चेहरा लपवत तो तसाच पलंगावर लवंडला. मुसमुसत रडत राहिला. [म्हणजे स्नेहा नावाची अजयची पत्नी या जगात राहिली नाहीय, अजयची मन:स्थिती ठिक नाही, या पार्श्वभूमीवर ही कॅलीडोस्कोपीक कथा आधारित आहे.] 4. मग पुढे अजयने काय केले? [त्याला स्वप्न पडले, किंवा तो ट्रान्समध्‍ये गेला. देवाघरी गेलेल्या स्नेहाला अ‍ॅम्ब्युलन्समधून घरी आणलं तेव्हाचं एक दृश्‍य त्याच्या मनावर कोरले गेलेले आहे, कोणतीही दृश्‍ये कधीही त्याच्या मनासमोर तरळून जात आहेत, आणि वाचकांचा गोंधळ उडत आहे.] --- "अजय, तू शहाण्यासारखा ऐकणार असशील तरच मी पुढची गोष्ट सांगेन. नाहीतर जा पाहू कामाला", सोनावणे आजी अजयला लटके रागे भरत होत्या. "सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता. अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. अ‍ॅम्ब्युलन्स अजयसमोर येऊन उभी राहिली. अजयने आजीचा हात सोडला व धावतच तो अ‍ॅम्ब्युलन्समध्ये चढला. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते. "अजय, तू शहाण्यासारखा ऐकणार असशील तरच मी पुढची गोष्ट सांगेन. नाहीतर जा पाहू कामाला", सोनावणे आजी अजयला लटके रागे भरत होत्या. "सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता. अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजत होता. अ‍ॅम्ब्युलन्स अजयसमोर येऊन उभी राहिली. अजयने आजीचा हात सोडला व धावतच तो अ‍ॅम्ब्युलन्समध्ये चढला. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये स्नेहा आडवी पडली होती. अजय तिच्या शेजारी जाऊन बसला. "तुला नीट ठेवायला काय होतं रे तुझं वॉलेट? हे घे", स्नेहाने पुढे केलेले वॉलेट अजयने हातात घेतले. अजयच्या हातात लाल भडक, रक्त गाळणारे हृदय ठोके घालत होते. 5. पुढे अजय ने खरोखर काय केले? --- अजय दचकून जागा झाला आणि उठून बसला. त्याचे हृदय भयंकर वेगाने धडधडत होते. अंगाला दरदरून घाम फुटला होता. घर शांत होते. बाहेर रहदारीचा आवाज येत होता. अजय बेसिनपाशी गेला. त्याने तोंडावर पाणी मारले. परत येऊन पलंगावरचा फोन उचलला आणि ऑफिसचा नंबर फिरवला."सुरेश, धिस इज अजय हिअर. येस. आय वॉज. बट आय नीड सम मोअर टाइम. आय अ‍ॅम एक्स्टेन्डिंग माय लीव्ह. येस, आय विल फाइल इट. प्लीज अप्रूव्ह. नो, आय डोन्ट नो. येस, अ मंथ, मे बी मोअर. थँक्स. शुअर." फोन बाजूला फेकत तो पुन्हा खिडकीसमोर येऊन उभा राहिला. 6. गारी आजीच्या दंतकथेत अजयला झालेल्या दु:खापासून मुक्त होण्याचा उपाय आहे का हे अजय चाचपून पहातोय. अर्थातच गारी आजी कधीची मरण पावली आहे, पण स्नेहाच्या मृत्यूमुळं अजय गारी आजीची, ‍ती ज्या गोष्‍टी बोलत होती त्याची पण मनातल्या मनात आठवण काढत आहे. "आपल्या या बोधी पर्वतात? आजी, तू कशावरपण विश्वास ठेवतेस. अगं, मिथ आहे ते." गारी, अजयची आजी, वाती वळतावळता थांबली व अजयकडे पाहत तिने विचारले, "मिथ म्हणजे?" "मिथ म्हणजे... आई, 'मिथ'ला मराठीत शब्द काय, गं?" अजयने आईला विचारले. "दंतकथा. अजय, तिला छळू नकोस उगाच." "कळलं?" गारी आजीकडे पाहत अजय चेष्टेच्या सुरात म्हणाला. "डोंबलाची दंतकथा. अरे, खरंच, अशी माची आहे, जिथे एक झोपडं आहे आणि त्यात द्विज नावाचा ऋषी गेली अनेक तपं राहतोय. त्याचेच तर शिष्य होते आपले गोविंदमहाराज. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्या ऋषीकडे. गोविंदमहाराजांना त्यानेच दीक्षा दिली. गोविंदाय नम: गोविंदाय नम:", आजीने भिंतीवरच्या गोविंदमहाराजांच्या फोटोला मनापासून हात जोडले. अजय तावातावाने पुढे काही बोलणार इतक्यात आईने त्याला डोळ्यांनी दाबले. अजय गप्प झाला. खिडकीच्या समोर अजय गप्प उभा होता. गारीआजीच्या वाड्यातला तो झोपाळा, ते सारवलेले अंगण, तिच्या सुरकुतलेल्या हाताचा तो मऊ स्पर्श, तिचे ते "गोविंदाय नम:" म्हणणे... अजयला भडभडून आले. आजी गेली तेव्हा अजयला जायला जमले नव्हते. कुठल्यातरी असाइन्मेन्टवर तो युरोपमध्ये होता. क्लायंट महत्त्वाचा होता. त्याच्याशिवाय डील होणार नव्हते. थांबणे भाग होते. घरी सगळ्यांनी समजून घेतले होते. अजयची समजूत घातली होती. आजी कोमामध्ये आहे, तू आलास तरी काय उपयोग? सगळं तार्किकदृष्ट्या योग्य पण... "सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत बघ त्यांच्याकडे", आजीचा आवाज अजयच्या कानाजवळ कुजबुजला. दचकून अजयने आजूबाजूला पाहिले. घर शांत होते. बाहेरून रहदारीचा आवाज येत होता. 7. यानंतर अजयला काय आठवले? समोरच्या टीपॉयवर स्नेहाचे मृत्युपत्र पडले होते. "अजय या पैशांचं काय करायचं? सोन्यासारखी पोटची पोर गेली. या पैशांनी परत येणार आहे?" स्नेहाच्या वडिलांची व्याकुळता, तिच्या आईचे कोलमडून पडणे अजयला आठवले. आधार देण्यासाठी आतआतपर्यंत त्याला काही सापडले नव्हते. आवंढा गिळून त्याने पुढची इच्छा कशीबशी वाचली होती. स्नेहाने एक बरीच मोठी रक्कम बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीला देणगी म्हणून दिली होती. स्नेहाला पक्ष्यांचे वेड होते. स्नेहाला सगळ्या निसर्गाचेच वेड होते. [स्नेहाला पक्षीनिरीक्षणाचा छंद होता.] 8. मग अजय नेमके काय करीत असे? आणि त्या दोघांचे पती-पत्नी म्हणून आयुष्‍य कसे होते? हे असे ------------ "अजय, बघ पटकन. हा इंडियन ग्रे हॉर्नबिल", आपली बायनॉक्युलर अजयकडे देत स्नेहा उत्साहाने म्हणाली. अजय कुणाशीतरी फोनवर बोलत होता. कसनुसा विनवणी करणारा चेहरा करत त्याने फोनच्या तोंडावर हात ठेवत ओठांनीच 'बॉस' असे म्हटले आणि पुन्हा बोलण्यात मग्न झाला. परत घरी येताना स्नेहा एक शब्दही अजयशी बोलली नव्हती. "ओ, कमॉन स्नेहा. कशाकरता चिडली आहेस इतकी?" "कशाकरता? राइट, आजचा दिवस दोघांनी एकत्र घालवायचा ठरवले होते. पण तुला कामापुढे काही सुचत नाही." "अरे! असे काय करतेस. हे प्रोजेक्ट महत्त्वाचं आहे." "आणि मी नाही? मला काही कामं नाहीत? तुला माझी आणि माझ्या वेळेची काही किंमत नाही, अजय." "याचा आणि त्याचा काय संबंध. उगाच कुठलीही गोष्ट कुठेही ताणू नकोस. तुला आवडतं म्हणून आपण गेलो होतो." "मी बळजबरी केली नव्हती. उपकार नाही केलेस माझ्यावर आलास ते. आधी विचारलं होतं तुला. जेव्हा काहीही ठरवायचं असतं दोघांनी करण्यासारखं तेव्हा तुला इच्छा नसते काहीही ठरवायची. मी ठरवलं की तुला इतर उद्योग सुचतात. हे असं अर्धवट मनाने काही करण्यापेक्षा स्पष्ट नाही म्हणालास तर खूप बरं होईल", स्नेहा फणकार्‍याने निघून गेली. [म्हणजे चारचौघांसारखेच आयुष्‍य अजय आणि स्नेहा जगत होते. स्नेहा कशाने वारली हे अजय सांगत नाहीय, ती वारलीय एवढं खरंय. ] 9. अजयला आणखी काय आठवले? ------------ हातातल्या बायनॉक्युलरमध्ये पडलेले प्रतिबिंब न्याहाळत अजय बराच वेळ बसून होता. त्याच्या नकळत त्याने बायनॉक्युलर डोळ्यांना लावली. समोर बॅंडेजमध्ये गुंडाळलेली स्नेहा झोपली होती. नकळत त्याने हात पुढे केला. "प्लीज, इथे जवळ बस", स्नेहाला बोलायला खूप त्रास होत होता. "एव्हरीथिंग इज गोइंग टू बी फाईन, यू सी.." अजयने तिचा हात हातात घेतला. "आय हॅव नो रिग्रेट्स... आय लव्ह यू", स्नेहा सारा जीव एकवटत म्हणाली. तिच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. "ग्रे हॉर्नबिलांची नेहमी जोडी दिसते, अजय", स्नेहा पूर्ण कोमात जायच्याआधी बरळताना म्हणाली होती. 10. मग पुढे अजयने काय केले? ----- अजयने बायनॉक्युलर पुन्हा टेबलावर ठेवली. टेबलावर क्रेडिट कार्ड कंपन्यांची निमंत्रणे, बँकेची पत्रे, घराच्या टॅक्सचे पेपर पडले होते. समोरच्या कपाटात अजयने मिळवलेल्या ट्रॉफ्या होत्या. अजय ताडकन उठला. त्याने बायनॉक्युलर उचलली, बूट घातले, घराच्या बाहेर पडला आणि तिथेच पुतळ्यासारखा उभा राहिला. पाचेक मिनिटांनी मनाशी निश्चय झाल्यासारखा पुन्हा घरात आला. फोन उचलला आणि त्याने घरचा नंबर फिरवला. त्याला कल्पना होती अजून आईबाबा घरी पोचले नसतील. त्याने मेसेज ठेवला, "आई, बाबा, काळजी करू नका. मी एका महिन्यासाठी परगावी जात आहे. मला या एक महिन्यात कॉन्टॅक्ट करणं जमणार नाही. कुठलीही काळजी करू नका". [छ्‍या बॉ! ह्या अजयला मध्‍येच काहीही आठवण्‍याचा भलताच प्रॉब्लेम आहे पुढच्या कथाभागात. आणि वरुन तो एका दंतकथेचा पाठलाग करतोय, म्हणजे वाचणार्‍यांच्या डोक्यांची शंभर शकलं होणार हे ठरलेलंच! आप बच गये मुक्त विहरी;-) ] (थकून कॉम्प्युटरपासून उठून चहा प्यायला निघून गेलेला) यशवंत

In reply to by मुक्त विहारि

अजय, मूवी आणी यक्कू व बोधी पर्वत . ह्यांना साक्षात दंडवत कथेचे रसग्रहण व अन्वयार्थ आपल्यामुळे समजला. बाकी मूळ कथेत नेमके काय आणी का चालू आहे हेच कळत नव्हते. मात्र त्याचा शेवट आवडला. येथे वाचकाने आपल्या बौद्धिक कुवतीनुसार ह्या कथेचे सार जाणून घ्यायचे आहे. तेव्हा माझी जाणीव प्रगल्भ आणी माझी बौद्धिक कुवत अफाट असल्या चा आव आणत मी ह्या कथेतून काय बोध घेतला हे जाहीररीत्या न लिहिता त्यावर आज दिवस भर मनन करणार आहे. स्वगत आज कथेवर मनन आणी त्यावर चिंतन करायचे नसते तर मूळ लेखाहून मोठी . प्रतिक्रिया दिली असती. नेहमी प्रमाणे

In reply to by निनाद मुक्काम …

आधीच गोंधळ उडाला आहे आणि त्यात तुम्ही आणखी नवीन पात्र निर्माण करतायं. असो, धन्यवाद!

रमताराम Fri, 04/13/2012 - 21:56
मुजरा मालक. मिथकाचा इतका सुंदर वापर नि इतका सुरेख सूचक शेवट, वर्तमानाची नि भूतकाळाची अलवार गुंफण. क्या बात है. टोपी काढली आहे. अवांतरः कथेचा अर्थ लावू पाहणारे बहुतेक सर्व प्रतिसाद वाचून ह. ह. पु. वा. विशेषतः पुढे मुग्धाचे काय झाले हा प्रश्न वाचून तर लेखकाने बिचार्‍याने आत्महत्या वगैरे केली नाही ना या विचाराने धास्तावलो आहे. त्याची उत्तरे देण्याच प्रयत्न तर हिट्ट विनोदी. असो.

In reply to by रमताराम

साती Sat, 04/14/2012 - 19:36
आम्हा पामरांसाठी अर्थसह रसग्रहण कराल का? मला समजलेली नाही कथा नीटशी. बाय द वे,वर इतकी बोंबाबोंब कथा समजली नाही म्हणून आहे की शेवटची दोन वाक्य वाचून ? ;)

पेशवा Sat, 04/14/2012 - 22:18
सर्व वाचकांचे व अभिप्राय दात्यांचे आभार. त्यातुनही ज्यांनी समजून घेण्यासाठी व समज्वून देण्यासाठी अपार कष्ट घेतले त्यांचे विषेश आभार. 'हे मला समजले पाहिजे' व त्यासाठी काय वाट्टेल ते करीन हा मिपा वरील काही वान्ना-बी रसिक आयडींचा चिवट्पणा मला माझ्या सारख्या वन्ना-बी लेखकांच्या दृष्टिने खूपच आशादायक वाटतो. पण'जे मला समजले तेच तुलाही समजले पाहीजे' हा हेकट पणा कुठेतरी आड येतो असे देखील वाटले :दिवा: धन्यवाद!

In reply to by पेशवा

मुक्त विहारि Sat, 04/14/2012 - 22:44
जरा ह्या २/४ गोष्टी क्रुपया समजावुन द्या....फार छळत आहेत त्या... १. त्या मुग्धाचे पुढे काय झाले? २. ते १५ दिवासांचे नंतर ५ दिवस आणि नंतर २ दिवस कसे काय झाले? ३. नायक बायनॉक्युलर न वापरता " "समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी असलेली बघतो " ....आणि....समोर असलेल्या पत्नी साठी...बायनॉक्युलर वापरतो..... हे असे का? ४. पक्षी अंडी कसा काय घालतो?...कारण व्याकरणाच्या नजरेतून पक्षी पुल्लींगात मोडतो... ५. निळ्या पक्षाची अंडी रा़खाडी कशी काय? ६. एक पिल्लू , त्याने मदत न केल्याने मेले...ठीक आहे....तरी पण त्याने दुसर्‍या पिल्लाला मदत का नाही केली?....कारण एकदा चुक समजू शकतो...पण तिच चुक परत्?....काही पटत नाही गड्या... निदान माझी तरी कातडी एव्हढी जाड नाही आहे... ७. कुठलाही मनुष्य आपली बायको मेल्यावर तिचे म्रुत्यु-पत्र आधी बघून मग बिले बघणार नाही?..... निदान ज्याचे आपल्या बायकोवर मनापासून प्रेम आहे तो तर नक्कीच नाही.... ८. आपली बायको गेल्यावर कुठलाही मनुष्य टाकोटाक घर सोडणार नाही....विशेषतः आपले म्हातारे आई-वडिल असतांना.... ९. त्याच्या पत्नीचे देहावसान नकी कशामुळे झाले हे पण कथेत यायला हवे होते... १०. त्या मुग्धाची आजी २ वेळा कथेत आली...तिचा नक्की सहभाग काय? आणि वरिल प्रश्नांची उत्तरे एक वेळ दिली नाहित तरी चालेल्....पण ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र देवुन टाका बरे... त्या मुग्धाचे पुढे काय झाले?

In reply to by मुक्त विहारि

>त्यातुनही ज्यांनी समजून घेण्यासाठी व समज्वून देण्यासाठी अपार कष्ट घेतले त्यांचे विषेश आभार. = इथे समजाऊन देण्यासाठी कुणी कष्ट घेतलेत? पेशवे तर आज आलेत आणि ते देखील कथेबद्दल जाम बोलत नाहीयेत >'हे मला समजले पाहिजे' व त्यासाठी काय वाट्टेल ते करीन हा मिपा वरील काही वान्ना-बी रसिक आयडींचा चिवट्पणा मला माझ्या सारख्या वन्ना-बी लेखकांच्या दृष्टिने खूपच आशादायक वाटतो. = आता कथा समजली नाही म्हणून तर हे चाललंय आणि तुम्हाला ते आशादायक वाटतंय मग सांगा ना काय आहे कथा. >पण'जे मला समजले तेच तुलाही समजले पाहीजे' हा हेकट पणा कुठेतरी आड येतो असे देखील वाटले = अरे कुणालाच काही समजलेलं नाही. कथेतून अनेकांनी अनेक अर्थ काढले असते तरी चाललं असतं पण एक अर्थ निघेल तर शप्पत! >:दिवा: = आता हा काय नवीन प्रकार? (पेशवे कुणालाही त्रास द्यावा असा हेतू नाही पण कथेतून काहीच टोटल लागत नाही आणि कथेतल्या लेखनाचा बाज, ओघवती सहज भाषा (भले अर्थ न समजू दे) शुद्धलेखन आणि प्रतिसादातलं अशुद्धलेखन यांचा मेळ मला तरी वाटला नाही)

पेशवा Sun, 04/15/2012 - 03:18
मुवि व संजय , कथा पटकन आकलन होत नाही हा तुमचा फीड्बॅक कदाचित रास्त आहे कारण ह्या आधीसुधा ह्या कथे संदर्भात तो मिळाला आहे. कदाचित तो माझ्या लेखनातील दोष आहे. पण कोणतीही कथा / कवीता /कलाकृती जे प्रष्ण जो अर्थ रसिकाच्या मनात निर्माण करते त्याची उत्तरे शोधायची जबाबदारी त्या रसिकावरच असते. जे मला व्यक्त करायच होत ते कथा लिहुन मी केल आहे. माझ्या तोकड्या लेखन सामर्थ्यामुळे ते आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचत नाही आहे हे समजले. हे ही नसे थोडके. लोभ असावा

In reply to by पेशवा

>मुवि व संजय , कथा पटकन आकलन होत नाही हा तुमचा फीड्बॅक कदाचित रास्त आहे कारण ह्या आधीसुधा ह्या कथे संदर्भात तो मिळाला आहे. = अब आगए ना लाईन पे >कदाचित तो माझ्या लेखनातील दोष आहे. पण कोणतीही कथा / कवीता /कलाकृती जे प्रष्ण जो अर्थ रसिकाच्या मनात निर्माण करते त्याची उत्तरे शोधायची जबाबदारी त्या रसिकावरच असते. = पेशवे आपण समेट करत आहात म्हणून सांगतो की हे जगातला कुणीही दिग्गज म्हणत असेल तर ते चूक आहे आणि हे मी ग्रेससारख्या प्रतिभावंताबद्दल देखील म्हटले आहे. कलाविष्कार हा कलाकार आणि रसिक यामधला संवाद आहे (घ्या लिहून). त्यामुळे रसिकांच्या मनात होणार्‍या प्रश्नांची उत्तरं त्यांनीच शोधावी असं जर कुणी म्हणत असेल तर त्याला संवाद साधता येत नाहीये. प्रत्येक उत्तम अभिव्यक्ती कलाकाराला अभिप्रेत असलेला अर्थ, त्याचा अनुभव, त्याची सौंदर्यदृष्टी, त्याच्या संवेदनेची तरलता रसिकांपर्यंत पोहोचवते. या ही पुढे जाऊन प्रत्येक उत्तम कलाकृती, जो रसिक आस्वादासाठी ओपन आहे (थोडक्यात पूर्वधारणा आणि समिक्षेचाभाव न ठेवता कलाकाराशी संवाद व्हावा अशा प्रामाणिक हेतूनं कलाकृतीशी समरस होण्याचा प्रयत्न करतोयं) त्याची सौंदर्यदृष्टी आणि संवेदनाक्षमता वरच्या स्तरावर नेते. उदाहरणार्थ पु. ल. ग्रेट आहेत कारण ते हसवात, ते त्यांचा प्रत्येक अनुभव रसिकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतात. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून ते रसिकाची अवलोकनक्षमता, विनोदबुद्धी, सौंदर्यदृष्टी आणि जगण्याचा स्तर उंचावण्याला सहाय्यभूत होतात. झाकिर ग्रेट आहे कारण त्याच्या वादनाशी तुम्ही रिलेट होता, त्याचा रिदमसेन्स तुमच्या श्रवणाची संवेदनक्षमता तीव्र करत जातो कारण अनाहूतपणे तुम्ही ते वादन ऐकतांना एकाग्र होता, तुमच्या मनात अविरत चाललेला अंतर्संवाद काही काळ थांबतो. कोणतीही कलाकृती रसिकाच्या मनात गोंधळ उडवून आता निस्तरा तुमचं तुम्ही म्हणू शकत नाही आणि जो कलाकार स्वत:च्या कलेशी इमान राखतो तो प्रामाणिक रसिकासाठी आविष्काराचं विश्लेषण करायला राजी असायला हवा कारण रसिक जर आविष्काराशी रिलेट होऊ शकला नाही तर तो आविष्कार फक्त त्या कलाकारापुरताच मर्यादित राहिल. > जे मला व्यक्त करायच होत ते कथा लिहुन मी केल आहे. माझ्या तोकड्या लेखन सामर्थ्यामुळे ते आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचत नाही आहे हे समजले. हे ही नसे थोडके. = तुम्ही तुमचं असामर्थ्य मान्य केलंय म्हणून आम्हीही दोस्तीचा हात पुढे करतो (मुवि चला करा शेकहॅंड) आणि तुमच्या कथेतील लेखनशैली आणि प्रतिसादातील लेखनशैली यांचा अत्यंत सूक्ष्म आढावा घेण्याचा आमचा आजचा बेत रद्द करतो. >लोभ असावा = प्रत्येक चांगल्या आणि प्रामाणिक कलकृतीला आमची नेहमी दाद राहिल आणि ज्या आविष्कारांनी आम्हाला आनंद दिला किंवा नवा नजरिया दिला त्याविषयी आम्ही कायम कृतज्ञ राहू भले त्या कलाकाराची प्रतिभा अजून विकसित होण्याच्या मार्गावर असो. चलो, ज्या सदस्यांनी टोप्या काढल्या त्यांनी त्या परत डोक्यावर चढवाव्या अशी नम्र विनंती करून माझं भाषण संपवतो.

In reply to by शिल्पा ब

>कथा आवडली पण पुर्ण समजली नाही असं म्हणून आम्ही एकाच वेळी दोन्हीकडे राहण्याच्या विरूद्ध आहोत. एक तर समजली आणि आवडली किंवा मग समजली पण आवडली नाही. पूर्ण समजली नाही तरी आवडली असं होत असेल तर प्रामाणिकपणे न समजेल्या भागाची विचारणा करतो म्हणून तर इथपर्यंत आलोत. असो, आता सर्व क्लिअर झालंय त्यामुळे गोंधळलेल्या सदस्यांनी रविवार सकाळ आमच्या मिथक विरूद्ध चिऊ आणि काऊ : या तौलनिक अभ्यास्याचा मनमुराद आनंद घेण्यास हरकत नाही. ज्यांनी आमची समज दाखवून देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडून त्यांच्या ज्येष्ठत्वामुळे दिलगीरी व्यक्त करण्याचा आग्रह धरणं योग्य होणार नाही किंवा ते इतके ज्येष्ठ आहेत की ते आता अजून किती मोठे होणार? याची आम्हाला कल्पना असल्यानं आम्ही त्यांच्याशी प्रतिवाद करत नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Sun, 04/15/2012 - 11:31
प्रिय संजय, तुम्ही तुमचे मनोगत व्यक्त करत होतात, तसे मी पण... माझे मनोगत हे फक्त माझे असते... मी कधीच कुणालाही ग्रुहीत धरून माझे मत व्यक्त करत नाही ( पण तशीच गरज असेल तर आधी व्य. नि. करुन त्या व्यक्तीची परवानगी जरुर घेतो, कारण कधी-कधी अनावश्यक गैर-समज होतात) त्यामूळे, तुम्ही पण मला ह्या कथेच्या बाबतीत ग्रुहीत धरू नका... शंका काढणे हा वाचकाचा हक्क आहे, तर, त्या शंकांचे निरसन करणे ही लेखकाची लेखनिक जबाबदारी आहे ... मी माझा हक्क बजावला तर माझे काही चुकत आहे असे मला वाटत नाही आहे. प्रिय पेशवा, अ) माझे तुमच्या बरोबर काही वैर किंवा हेवेदावे नाही आहेत.... माझा आक्षेप आहे तो त्या लेखातील अनावश्यक आणि अस्ताव्यस्त मांडणीला.... ४/५ चुका आपण समजु शकतो पण ह्या कथेत १०-१२ चुका आहेत की ज्या तुम्ही मान्य करता...पण कसे, तर... ह्या चुका , वाचकांनाच गोष्ट समजली नाही आहे, त्यांनीच अर्थ लावा, असे सांगून तुम्ही मोकळे होता...... अहो आपले मूल शेजार्‍यांनी वाढवून कसे चालेल?... हे तुमचेच मूल आहे... ब) कथेत फ्लॅश-बॅक हवाच असे नाही, पण जर तो आला असेल, तर त्याचा परीणाम पूर्ण कथेत जाणवला पाहिजे... आणि ह्या कथेत हा "फ्लॅश-बॅक " फक्त गोंधळ निर्माण करतो, मेंदूला कुठलाच खूराक न देता डोक्याचे खूराडे आणि मेंदूला अंडे बनवण्याशिवाय ह्या "फ्लॅश-बॅक"चे काहीच काम नाही... क) ह्या आधी पण हाच लेख तुम्ही आधी प्रकाशित केला होता... आणि त्यावेळी पण हा लेख समजावुन घेतांना काही वाचकांना त्रास झाला होता...मग त्या चुका टाळून तुम्ही हा लेख परत एकदा संकलित करून टाकायला हवा होता.... ड) आणि परत एकदा जर हे लेखक वाचत असतिल तर, कारण लेख ज्या वाक्यापासून सुरु होतो त्यात जर एखादे पात्र असेल तर त्याचा पुढे-मागे काही तरी संदर्भ असावा असे सतत वाचकाला वाटत राहते आणि तो संदर्भ असाच हवेत न सोडता त्याचे योग्य तिथे आणि योग्य त्या पध्दतीने निरसन करणे ह्यातच लेखकाचे खरे सामर्थ्य असते...आणि कथेत तर हे पात्र (एकदा) आणि तिची आजी २ वेळा येते.. त्या मुग्धाचे काय झाले ते सांगून टाका हो.... हे एव्हढे रहस्य सुटले की आम्हा जरा इतर लेखांकडे वळतो...

In reply to by मुक्त विहारि

स्नेहा हीच पूर्वाश्रमीची मुग्धा सोनावणे आहे कसं ते पहा : >अजयने खिडकीचे दार उघडले. समोरच्या पदपथावर शेजारच्या सोनावण्यांची मुग्धा शाळेच्या बसची वाट पाहत उभी होती. पाठीवर दप्तर, हातात पाण्याची बाटली, पायात लाल बूट, चेहर्‍यावर बस कधी येते याची आतुरता >"सांग ना आजी पुढे काय झालं", अजय आपले लाल बूट पुढे मागे हलवत आजीला विचारत होता = दिसले का लाल बूट? अशा रितीनं वैवाहिक जीवनात स्रिया `आपली आवड' हा एकच प्रोग्रॅम कायम रेडिओवर लावून ठेवतात त्यामुळे वैवाहिक मतभेद होतात इतका भारी पण सहज लक्षात न येणारा अर्थ असावा. आता तुमचा प्रश्न : त्या मुग्धाचे काय झाले ते सांगून टाका हो! उत्तर : स्नेहा पूर्वाश्रमीची मुग्धा सोनावणे असून तिचा - आता पुनर्जन्म झालायं

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Sun, 04/15/2012 - 12:35
पण ते पेशवे ह्याचे उत्तर का देत नाही आहेत? असे आपण एकमेकांना किती गोष्टी समजावुन सांगणार? जावू दे... आपण आपले एक्-मेकांना व्य.नि. करत बसू..

पेशवा Sun, 04/15/2012 - 12:48
मुवि, शंका काढणे हा वाचकाचा हक्क आहे, तर, त्या शंकांचे निरसन करणे ही लेखकाची लेखनिक जबाबदारी आहे ...>> हे कुण्या गाढवाने सांगीतले तुम्हाला? लिहिले आहे ते वाचा त्याबद्दल विचार करावासा वाटला तर करा त्यातुन काही सापडले, जे आधी अनुभवले नव्हते असे, तर ते तुमचेच यश जर काही मिळाले नाही तर तुमचेच अपयश! तुमच्या विचार्सरणिवर विष्वास ठेउन त्या लिखाणाला अशावेळी कचर्यात टाका किंवा त्याला झेन कोन समजुन आत्मविकास करा.. सर्वस्वी तुमचा निर्णय! लेखकाची वाचकाशी कोणतीही बांधिलकी नाही. वाचकांना सुलभ जावे म्हणुन लिहायला कथा ही पाठ्यपुस्तकातील पाठ नाही. बाकीच्या मुद्द्यांबद्दल म्हणायचे तर लेखकाने कथा कशी लिहावी हा त्याचा प्रश्ण त्याने केलेले कथेबद्दलचे निवाडे आवडले नाहीत तर तसे नमुद करा पण लेखकाने काय करायला नको करायला हवे हे सल्ले स्वतःजवळ ठेवा व जेंव्हा स्वतःची कथा लिहाल तेंव्हा वापरा. संजयक्षीरसागर, समेट करायला माझे इथे कुणाशीही वैर नाही. कलाकृती कशी असावी ह्याबद्दलचे भाषण अस्थानी आहे. तुमच्या दृष्टिने काय उत्त्म आहे किंवा लेखन कसे असावे वैगेरे तर अशक्य काहीच्या काही. माझ्या स्वतःच्या लिखाणात दोष आहेत ही माझी भावना तुम्ही तुम्ही जे काही ह्या कथेबद्दल मतप्रदर्शन करताय त्यास संमती अशी घेत असाल तर इतकेच म्हणेन तुम्ही तुमच्या स्वप्नरंजनात सुखी रहा. प्रत्येक उत्तम अभिव्यक्ती कलाकाराला अभिप्रेत असलेला अर्थ, त्याचा अनुभव, त्याची सौंदर्यदृष्टी, त्याच्या संवेदनेची तरलता रसिकांपर्यंत पोहोचवते>> जो कलाकृतीच्या ह्या सगळ्या वैशिष्ठ्या पर्यंत पोचु शकतो तो रसिक. नाहीतर गाढवासमोर गीता वाचुन गाढवाला अर्थ कळाला नाही म्हणुन गीता थोर कलाकृती नाही असा अर्थ एखादा संजयक्षीरसागर सहज काढू शकतो नाही का? माझ्या जे मला व्यक्त करायच होत ते कथा लिहुन मी केल आहे. माझ्या तोकड्या लेखन सामर्थ्यामुळे ते आपल्या सारख्या वाचकांपर्यंत पोचत नाही आहे हे समजले. हे ही नसे थोडके. ह्या वाक्याच अर्थ लावताना आपण "आपल्या सारखा" ह्या शब्दाचा अर्थ कसा लावलात हे ऐकायला आवडेल. कारण जरी शब्द समुह साधासा असला तरी त्या मगच्या अध्यारुताने ह्या वाक्याच्या अर्थामधे बराच फरक पडतो. कोणत्या गुणवत्ता आपण आपल्याला आहेत असे अध्याऋत मानलेत? सुज्ञास अधिक सांगणे न लगे...

In reply to by पेशवा

मुक्त विहारि Sun, 04/15/2012 - 13:19
"लिहिले आहे ते वाचा त्याबद्दल विचार करावासा वाटला तर करा त्यातुन काही सापडले, जे आधी अनुभवले नव्हते असे, तर ते तुमचेच यश जर काही मिळाले नाही तर तुमचेच अपयश"" हे पण आपणच ठरवलेत का?...... बरं बॉ.... "तुमच्या विचार्सरणिवर विष्वास ठेउन त्या लिखाणाला अशावेळी कचर्यात टाका किंवा त्याला झेन कोन समजुन आत्मविकास करा.." हे पटले.... खुप्प विकास झाला आहे... पण हे झेन कोन आहे?....का तुम्हाला शंका निरसन करायला आवडत नाही?... काय करणार हो? आमचा ज्ञान मिळवायचा प्रयत्न चालू आहे अजुन.... " लेखकाची वाचकाशी कोणतीही बांधिलकी नाही" ...... अरे बापरे!!!! मग ते बाकिचे लेखक असे कसे काय म्हणतात?.....किती नाही विचार सरणीत फरक?...... "वाचकांना सुलभ जावे म्हणुन लिहायला कथा ही पाठ्यपुस्तकातील पाठ नाही. " हे असे धडे ठेवत नाहीत हो आज-काल..... ते बिचारे अजुन वाचकांना काय पटेल ह्याचा विचार करून ठेवतात....आता काय करावे बरे?.... " त्याने केलेले कथेबद्दलचे निवाडे आवडले नाहीत तर तसे नमुद करा" मग तेच तर केलेले आहेत..... की मुळात पायच भुसभुशीत आहे....तर कसला निवाडा?... "पण लेखकाने काय करायला नको करायला हवे हे सल्ले स्वतःजवळ ठेवा व जेंव्हा स्वतःची कथा लिहाल तेंव्हा वापरा." हे मनापासुन पटले.... आणि आपले ते वाक्य आहेच... ह्या मुग्धा बाईचे झाले काय? आणि तिच्या आज्जीचे पन जरा सांगुन टाका..

In reply to by पेशवा

पियुशा Sun, 04/15/2012 - 14:57
@ पेशवा शंका काढणे हा वाचकाचा हक्क आहे, तर, त्या शंकांचे निरसन करणे ही लेखकाची लेखनिक जबाबदारी आहे ...>> हे कुण्या गाढवाने सांगीतले तुम्हाला? लिहिले आहे ते वाचा त्याबद्दल विचार करावासा वाटला तर करा त्यातुन काही सापडले, जे आधी अनुभवले नव्हते असे, तर ते तुमचेच यश जर काही मिळाले नाही तर तुमचेच अपयश! तुमच्या विचार्सरणिवर विष्वास ठेउन त्या लिखाणाला अशावेळी कचर्यात टाका किंवा त्याला झेन कोन समजुन आत्मविकास करा.. सर्वस्वी तुमचा निर्णय! लेखकाची वाचकाशी कोणतीही बांधिलकी नाही. वाचकांना सुलभ जावे म्हणुन लिहायला कथा ही पाठ्यपुस्तकातील पाठ नाही. सगळ्या वाचकांचा बुध्यांक सारखाच नसतो म्हणल , असतात काही थोडे कमी जास्त अकलेने ,काहींना जास्तीचे कळते ( उदा. तुम्ही ) काहींच्या डोकयावरुन जाते ( उदा. मी , मुक्तविहारी ,संजय वैगेर वैगेरे ) आता तुम्ही हात वर केलेच आहेत तर ,शंका निरसन तरी कोण करणार अजुन ...असो....

अन्या दातार Sun, 04/15/2012 - 15:07
शंका काढणे हा वाचकाचा हक्क आहे, तर, त्या शंकांचे निरसन करणे ही लेखकाची लेखनिक जबाबदारी आहे ...>> हे कुण्या गाढवाने सांगीतले तुम्हाला? लिहिले आहे ते वाचा त्याबद्दल विचार करावासा वाटला तर करा त्यातुन काही सापडले, जे आधी अनुभवले नव्हते असे, तर ते तुमचेच यश जर काही मिळाले नाही तर तुमचेच अपयश!
लेखकाची दृष्टी समजून घ्यावेसे वाटणे हे चूक निदान मलातरी वाटत नाही. तदनुषंगाने जर काही प्रश्न विचारले तर त्यात काय बिघडले? असं जर असतं तर शाळेत, कॉलेजात शिक्षकांची नेमणूक तरी का करावी? कारण पाठ्यक्रम समजला तर ते तुमचे यश, नाहीतर तुमचेच अपयश असं म्हणून सगळेचजण गप्प राहिलो नसतो का? अन व्यक्तिगणिक वेगवेगळ्या अर्थछटा निघू शकतील हे मान्य, पण त्याबद्दल खुद्द लेखकाने मौन बाळगावे हे पटत नाही. स्वतःच्या कलाविष्काराबद्दल कलाकार जेवढ्या आत्मीयतेने बोलेल तेवढ्याच आत्मीयतेने इतर कुणि बोलेल यावर कसा विश्वास ठेवावा? "आपल्याला एखादी गोष्ट कळलीच पाहिजे" हा काही आयडींचा हेकटपणा जेवढा तुम्हाला डाचतो, तेवढाच "मी शंकानिरसन करण्यास बांधील नाही" हा तुमचा हेकटपणाही आम्हाला डाचतो. असो, पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून. सूज्ञ वगैरे असाल या गृहितकाचा आधार घेऊन प्रतिसाद लिहिलाय, बाकी तुमच्यावर!

यकु Sun, 04/15/2012 - 19:40
त्यातुनही ज्यांनी समजून घेण्यासाठी व समज्वून देण्यासाठी अपार कष्ट घेतले त्यांचे विषेश आभार. 'हे मला समजले पाहिजे' व त्यासाठी काय वाट्टेल ते करीन हा मिपा वरील काही वान्ना-बी रसिक आयडींचा चिवट्पणा मला माझ्या सारख्या वन्ना-बी लेखकांच्या दृष्टिने खूपच आशादायक वाटतो. पण'जे मला समजले तेच तुलाही समजले पाहीजे' हा हेकट पणा कुठेतरी आड येतो असे देखील वाट
मायला हे बरंय! एकतर तुमचे म्हणजे जगभरात, घराघरात वाचक असले पाहिजेत.. नाही म्हणजे मिपावरील काही वान्ना-बी वाचक म्हणालात म्हणून म्हणालो. या कथेच्या वाचनापूर्वीही वाचक इथे होते, हां तुमच्या कथेच्या बाबतीत थोडे चिवट झाले तर लगेच त्यात वान्ना - बी म्हणण्यासारखं काय आहे त्यात? तुमच्या कथेच्या उकलणीचा असा धूवांधार प्रयत्न आधी कुठे झाल्याचे दाखवा, म्हणजे बाकीचं बघता येईल. खर्‍याची दुनिया नाही म्हणतात तेच खरं !

आता तुमची कथा आणि तिचा अर्थ सोडा, फक्त तीन प्रश्नांची उत्तरं द्या. १) "शिफ्ट" ही कि-बोर्डवरची अत्यंत महत्त्वाची की वारंवार चुकीच्या पद्धतीनं वापरल्यानं किंवा अजिबात न वापरल्यानं प्रत्येक प्रतिसादात डायरेक्ट शब्दलेखनाच्या चुका आहेत (शुद्धलेखनाची तर बातच सोडा) : >हि कथा माय्बोलीवर दिवळी अंक २०१० ह्यात प्रकाशित करण्याआधी दोनेक वर्श लिहिलेली आहे >तुमच्या विचार्सरणिवर विष्वास ठेउन त्या लिखाणाला अशावेळी कचर्यात टाका >कारण जरी शब्द समुह साधासा असला तरी त्या मगच्या अध्यारुताने ह्या वाक्याच्या अर्थामधे बराच फरक पडतो. कोणत्या गुणवत्ता आपण आपल्याला आहेत असे अध्याऋत मानलेत? निरिक्षण : या वाक्यातले व्याकरण तर चूक आहेच पण `इंप्लाइड' या अर्थी आपण जो मराठी शब्द वापरलायं तो दोन्ही ठिकाणी वेगवेगळा आणि चूक आहे, आपण योग्य शब्द लिहू शकाल काय? एक समर्थ लेखक अशी चूक करेल हे मनाला पटत नाही. आता प्रश्न असा आहे की एकच व्यक्ती कथा लिहीताना "शिफ्ट" ही कि-बोर्डवरची की अत्यंत योग्यप्रकारे वापरते (कारण कथेत अशी एकही चूक नाही) आणि तीच व्यक्ती प्रतिसाद लिहीताना वारंवार चुका कशी करते? २) कथा लिहीतांना विराम चिन्हांचा अत्यंत योग्य वापर कथेत आहे (आणि तो योग्य अर्थनिष्पत्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे) पण तीच व्यक्ती प्रतिसाद देतांना पूर्णविरामाशिवाय एकही विराम चिन्ह वापरत नाही, असं का? ३) कथा लेखनातील व्याकरण शुद्धता पाहा, ती भाषाशैली, लेखनातील ओघ आणि सहजता बघा आणि प्रतिसादातलं लेखन पाहा: >तुमच्या दृष्टिने काय उत्त्म आहे किंवा लेखन कसे असावे वैगेरे तर अशक्य काहीच्या काही. निरिक्षण : "उत्त्म" अनावधानानं झालं असेल पण "वगैरे " हा शब्द नेहमीच्या वापरातला आहे, तो इतका सिद्धहस्त लेखक चुकीचा कसा लिहीतो? >माझ्या स्वतःच्या लिखाणात दोष आहेत ही माझी भावना तुम्ही तुम्ही जे काही ह्या कथेबद्दल मतप्रदर्शन करताय त्यास संमती अशी घेत असाल तर इतकेच म्हणेन तुम्ही तुमच्या स्वप्नरंजनात सुखी रहा. निरिक्षण : बेडौल भाषा, शब्दांची चुकीची द्विरुक्ती, आणि नेमक्या ठिकाणी शब्दयोगी अव्ययाचा आभाव. आता प्रश्न : एकच व्यक्ती इतकं भिन्नशैलीचं लेखन कसं करू शकते?

In reply to by संजय क्षीरसागर

मुक्त विहारि Mon, 04/16/2012 - 00:05
मुळात त्यांना आपण चुकत आहोत हेच मान्य नाही... आणि आपण काही चांगले सुचवायला गेलो तर ते संपुर्ण मि.पा.ला वेठीस धरतात... आणि गंमत अशी आहे , की ह्याला फक्त ह्याची स्तुती करणारी लोकंच आवडतात.....त्याने एका शब्दाने कुणाला विचारले नाही , की बाबा माझी कथा , तुला का आवडली?....मी ज्यांना, ज्यांना लेख आवडला असे सांगितले त्या प्रत्येकाने , हे विचारले आहे....अगदी गिरीश कुबेर, दा. क्र्रु. सोमण ते पार अविनाश भोमे, वीणा गवाणकर, डॉ. उल्हास कोल्हटकर पर्यंत आणि ते तर म्हणतात की वाचकांनी प्रश्न विचारले पाहिजेत..... हा काय स्वतःला ह्यांच्या पेक्षा मोठा समजतो का?... आणि जर समजत असेल तर आपण ह्याचे लेख वाचुन न वाचल्यासारखे केलेलेच उत्तम... आपण थोड्या विनोदी ढंगाने , हसत-खेळत सांगितले तरी पण तेच आणि व्यवस्थित भाषेत सांगितले तरी तेच... उगाच आपण आपला वेळ का वाया घालवा? पण उगाच एखाद्या लेखकाचे अजुन चांगल्या लेखकात रूपांतर होवु शकले नाही असे वाटायला नको म्हणुन सांगायला गेलो तर ह्याचे आपले भलतेच... अरे मला पण सुरुवातीला असाच त्रास (?) झाला इथे... पण मी योग्य त्या व्यक्तीला सांगितले...आणि त्याने एकच सांगितले.... इथे लेख एक डोक्यावर उचलुन तरी धरल्या जातो, नाहीतर पायदळी...आणि इथे व्यक्ती पूजा नाही आहे..... तुमचे १००० लेख चांगले असले आणि नंतरचा बिघडला तरी इथे त्याला क्षमा नाही... पण एक जाणकार वाचकांचा समुह म्हणून हा ग्रुप खूप चांगला आहे.... मला नाही वाटत की मी आता हा ग्रूप सोडीन म्हणून... १०-१५ ग्रुप फिरून मी आता इथेच तंबू टाकायचे ठरवले आहे.... सोका़जींच्या दारूचे , गणपाच्या पाक - क्रुतींचे कौतुक होतेच पण ते जरा कुठे चुकले तर फटके पण मिळतात... (हे एक उदाहरण म्हणून दिले आहे... काही चुकले असेल तर "सोकाजी आणि गणपा" माफ करतीलच ह्याची खात्री आहे) जावु दे....

कारण लेखातली भाषा आणि प्रतिसादातली भाषा इतकी भिन्न आहे की त्या दोन व्यक्ती एकच आहेत का? हा मुग्धा सोनावणेचं काय झालं? याही पेक्षा गंभीर प्रश्न मला पडलाय. पेशव्यांनी उत्तर दिलं नाही तर संभ्रम वाढत जाईल आणि जितकं जास्त लिहीतील तितकी तफावत एकतर दूर होईल किंवा आणखी स्पष्ट होईल त्यामुळे आता येऊ दे म्हण!

साती Mon, 04/16/2012 - 11:54
वरील काही प्रतिसाद पाहून 'एक मिपाकर म्हणून शरम वाटली' चा अर्थ कळला. एकांचा तर-"मला माझ्या सासूने त्रास दिला म्हणून -मी माझ्या सुनेला त्रास देईन' हा अ‍ॅट्यिट्यूड जाणवतोय. प्रतिसाद विनाकारण खोड्साळ-आणि-वैयक्तिक-आहेत.

In reply to by साती

आपला प्रतिसाद मला असेल तर मी लेखकाशी आधीच समेट केला होता आणि मुवीला पण मिटवायला सांगीतलं होतं. त्यांनी पुन्हा : >नाहीतर गाढवासमोर गीता वाचुन गाढवाला अर्थ कळाला नाही म्हणुन गीता थोर कलाकृती नाही असा अर्थ एखादा संजयक्षीरसागर सहज काढू शकतो नाही का? असा डायरेक्ट प्रतिसाद दिला. आता असंय की "माणूस मुखवटे बदलू शकतो पण लकब बदलू शकत नाही" या उक्तीनं आम्ही निव्वळ लेखनशैलीवरून लेखक ओळखू शकतो मग आयडी कोणताही असो....आणि तो अंदाज सहजी चुकत नाही

चतुर नार Wed, 04/18/2012 - 22:12
FYI - मायबोलीचा दिवाळी अंक संपादित असतो. आलेल्या प्रत्येक साहित्यकृतीचे मुद्रितशोधन केले जाते.

In reply to by चतुर नार

आलेल्या प्रत्येक साहित्यकृतीचे मुद्रितशोधन केले जाते, येस, नाही तर कथा आणि प्रतिसादात जाणवण्याजोगी तफावत आहे . आणखी एक अगम्य गोष्ट म्हणजे भाषाशैली; कथेतला भाषेचा ओघ, डौल आणि मांडण्यची पद्धत निदान मला तरी एकाही प्रतिसादात जाणवत नाही.

चतुर नार Sat, 04/21/2012 - 03:36
>>भाषाशैली; कथेतला भाषेचा ओघ, डौल आणि मांडण्यची पद्धत हे कथानक, ते घडण्याचे स्थळ, काळ, त्यातली पात्रे यावर अवलंबून आहे. एखादी कथा आणि तिच्या लेखक/लेखिकेची बोलण्याची, संभाषणाची, उत्स्फूर्त प्रतिक्रियेतल्या भाषेची शैली याच्यात तुलना करण्यास मी तरी धजावणार नाही. त्याचे प्रयोजनच काय हे मला अगम्य आहे.

बॅटमॅन Mon, 12/24/2012 - 02:20
मायला माझ्या मौसचा स्क्रोल मोडू पाहत होता ;) कथा मस्त - पण मेसेज नीट नै कळ्ळा. वातावरणनिर्मिती खल्लास जमलीये. बाकी चर्चा पाहून चांगलीच हहपुवा झाली. (लोकांचे कथेचे आकलन पाहून आणि स्कोर सेटलिंग पाहून कळायचे बंद झालेला) बॅटमॅन.