मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरूत्वाकर्षण नव्हे, कर्मविपाकातून अधःपतन

३_१४ विक्षिप्त अदिती · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अलिकडेच वाचलेल्या एका संशोधनानुसार गुरूत्वाकर्षण हे खरे बल नसून ते सर्वव्यापी परमेश्वराने निर्माण केलेले कर्मविपाकामुळे होणारे अधःपतन असते. शाळांमधे भौतिकशास्त्र, उत्क्रांती, अणूरासायनिक प्रक्रिया इत्यादी पाश्चात्य विज्ञान शिकवावे का नाही यावरून चर्चा सुरू असताना, कांदा संस्थानाच्या माजी संस्थानिकांच्या देणगीतून सुरू असणार्‍या संशोधनसंस्थेतील पदार्थविज्ञानिक आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांनी त्यांच्या या नव्या 'कर्मविपाकामुळे अधःपतन' या संशोधनाची माहिती दिली. संस्थानातील विद्यापीठातच प्रौद्योगिकी भौतिकशास्त्र आणि शिक्षण या विषयांतून विद्यावाचस्पती या पदवीसाठी संशोधन करून आता तिथेच प्राध्यापक पदाचा भार सांभाळत तीन विद्यार्थ्यांना संशोधनात मार्गदर्शन करणार्‍या आचार्यांना या विषयावर अधिक बोलण्याचा वेळ देण्यात आला. आचार्यांच्या मते, "पतन होणे हे नैसर्गिकच वाटते, यात गुरूत्वाकर्षणाचा हात असावा असे वरकरणी वाटते, पण ते तसे नसून कर्मविपाकाचा जो सुंदर डाव भगवंताने मांडला आहे त्यामुळे होते. भगवंताच्या इच्छेवरून आपापल्या कर्मानुसार वस्तूंचे अधःपतन होते. गुरूत्वाकर्षणाचा नियम आपण शिकतो, पण त्याचे आकलन साकल्याने झालेले नसून त्यात अनेक त्रुटी आहेत. दोन वस्तूंमधे आकर्षण असणारे बल किती असते याचे गणित गुरूत्वाकर्षणाने मांडले आहे, परंतू हे बल येते कुठून याचे उत्तर गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत देऊ शकत नाही. खुद्द गुरू न्यूटन यांच्या वदनाचा तरजुमा असा, "मला अशी शंका आहे की माझे सर्व सिद्धांत अशा बलावर अवलंबून आहे ज्याचा शोध तत्त्वज्ञ गेली कितीक वर्षे घेत आहेत, पण त्यात त्यांना यश आलेले नाही." अर्थातच गुरू न्यूटन एका वरच्या तत्त्वाकडे, शक्तीकडे निर्देश करत आहेत. आपण पाश्चात्यांचं सरसकट अंधानुकरण करतो आहोत पण आपल्या शास्त्रांमधे निसर्गाच्या गूढरम्य विस्ताराचे आकलन मांडून ठेवले आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. उद्या कोणी हेक्टर हिल्टन जर आपली शास्त्र कशी महान आहेत असं सांगायला लागला तरच आपण आपल्या शास्त्रांना मान देऊ अशी आपली आजची शिक्षक पिढी आहे. त्यांच्यामुळे तरूणांचाही बुद्धीनाश होत असल्यामुळे हे सर्व अधःपतन थांबवण्याची जबाबदारी आपलीच आहे." या बातमीमुळे मी आचार्यांच्या संस्थेस भेट देण्याचे ठरवले. १८५७ च्या बंडानंतर ज्ञानेश्वरांनंतर भारतीय संस्कृतीचा र्‍हास का झाला याचे संशोधन करण्यासाठी त्याच वर्षी सुरू झालेल्या महाराजाधिराज सोमशेखरनाथ संस्था, मसोसं, इथे स्थापनेपासूनच कर्मविपाक सिद्धांताचा अभ्यास आणि त्यानुसार विज्ञानाची आपल्या जुन्या शास्त्रानुसार संगतवार पुनर्मांडणी हे दोन विषय महत्वाचे समजले जातात. त्याशिवाय मसोसंमधे इतरही काही महत्त्वपूर्ण विषयांवर संशोधन होते; तिथल्या ग्रंथालयात दिसणार्‍या काही प्रबंधांच्या शीर्षकांवरून तिथल्या संशोधनाचा आवाका लक्षात येईल. उदाहरणार्थ झेंड्याचा आकार त्रिकोणी असण्याचा पृथ्वीच्या आकाराशी असणारा संबंध, न्यूटनच्या तिसर्‍या नियमांचा पुनर्जन्म आणि कर्मफलाशी असणारा अन्योन्यान्वय, केप्लरच्या पहिल्या नियमाचे मूळ भारतीयांनी शोधलेल्या शून्यात, इ. ग्रंथालयात फिरताना तिथल्या एक विद्यार्थिनी श्रीमती रतीचंद्रिकादेवी म. बाणकोटे यांच्याकडून त्यांच्या कामाची माहिती मिळाली. श्रीमती रतीचंद्रिकादेवी या आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यावाचस्पतीपदाच्या प्रबंधासाठी संशोधन करत आहेत. त्यांचा विषय हा त्यांच्या पूर्वसूरींनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. त्यांच्या संशोधनाचा सारांश असा, "न्यूटनचा पहिला नियम म्हणजेच अनंत काळ आणि जन्मोजन्मीचे फेरा ही कल्पना आहे. आमच्या पूर्वजांनी अनेक सहस्रकांपूर्वीच हा शोध लावला होता, आणि आता कुठे या पाश्चात्यांना त्याची माहिती समजली. हळदीचं पेटंट या पाश्चात्य लोकांनी चोरण्याचा प्रयत्न केला, हा ही तसलाच प्रकार आहे." त्यांच्याकडूनच समजलेले न्यूटनच्या नियमांचे भारतीय मूळ हे असे, "भगवंताचा पहिला नियम असा देवाच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट बदलत नाही. देवाच्या हस्तक्षेपाशिवाय आपण सर्वच जन्ममृत्युच्या फेर्‍यातून जात रहाणार. तुम्ही जड वस्तूंचे नियम तेवढे पहाता, त्यात खूप गूढ गहन अर्थ दडलेला आहे. दुसरा नियम असं म्हणतो, आपले वस्तूमान 'व' आणि देवाची भक्ती करण्याचे त्वरण 'त' असेल तर भल्याकडे जाण्याचे आपले बल असेल 'तव'. अर्थात हा नियम एवढा सोपा नाही, त्याचे संपूर्ण विवरण 'खासशोध' या आचार्यांच्या ग्रंथात दिलेले आहे. आणि तिसरा नियमतर न्यूटनने शब्दाचीही अदलाबदल न करता तसाच उचलला आहे. कर्मविपाकाची आणखी वेगळी सिद्धता काय द्यावी? ही एक बाजू झाली. न्यूटनचा पाश्चात्यांना प्रचंड अभिमान वाटतो. पण न्यूटनच्या आधी कितीक सहस्रके हिंदुस्थानात गुरूत्वीय स्थिरांकाचा शोध लागला होता. हा स्थिरांक, जी, ८४ लक्ष, जेवढ्या योनी आहेत असं समजलं जातं, गुणिले हिंदू वर्षातले दिवस गुणिले आर्यभटाने आखलेल्या त्रिकोणी पृथ्वीला मंडल असणार्‍या वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच आज आधुनिक लोक ज्याला पृथ्वीची त्रिज्या म्हणतात, त्याचा व्यस्त आहे." पाश्चात्यांच्या नावाला आज वलय आहे आणि आम्हाला नोकरी देताना मात्र कोणी विचारत नाही ही खंत त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. आचार्यांच्या निवेदनानुसार हे नवीनतम संशोधन 'डॉग्मॅटीक अ‍ॅनल्स ऑफ सोसायटी ऑफ इंडीया' (दासी) आणि तरूणाईचे आवडते नियतकालिक 'भगवंताचे सृष्टीनियमन' या दोन्ही ठिकाणी गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. या संशोधनांनुसार, ज्या इतर अनेक घटना फक्त गुरूत्वाकर्षणातून समजावता येत नाहीत त्या समजून घेता येतात. या प्रश्नांपैकी काही म्हणजे मृत्युनंतर माणूस 'वर जातो' ते कसे, स्वर्गाची जागा वरच्या आणि नरकाची जागा खालच्या दिशेला का असते, अवकाशातून पुष्पवृष्टी होताना फुलांना हवेचा रोध का जाणवत नाही तसेच फुलांच्या उल्का का होत नाहीत. मसोसं आणि आचार्य यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा संस्थानातील तरूण विद्यार्थी आणि खुद्द संस्थानिक, महाराज सोमशेखरनाथ यांचे वारस आणि मसोसंचे महागुरू महाचार्य महाराज नीलेंद्रप्रताप यादव हे लवकरच पंतप्रधानांकडे एक निवेदन देणार आहेत. या निवेदनात भारतातील सर्व शाळांमधे या कर्मविपाक पतनाचा सिद्धांत शिकवावा अशी विनंती असेल. विनंती अमान्य झाल्यास खुद्द महाराजांचे दिवाण हरदासशास्त्री हे "मी दिवाण" असे लिहीलेले सोवळे नेसून उपोषणास बसणार आहेत, असेही आचार्यांनी जाहीर केले. "आम्हाला मुलांच्या हितामधेच रस आहे" असे आचार्यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेरणा सदर संशोधनपर लेख वाचून, त्याचे आकलन करून तो इथे लिहीण्यात मला सर्वश्री गुर्जी राजेश घासकडवी, नंदन, Nile आणि सर्वसाध्वी प्रियाली आणि ढब्बू पैसा यांची मदत झाली त्यांचे आभार.

वाचने 9177 वाचनखूण प्रतिक्रिया 39

अर्धवटराव Wed, 09/28/2011 - 01:26
हे गुर्‍हाळ चालुच आहे अक अजुन... ते गुरुत्वाकर्षण मरतय आता आपल्या कर्मविपाकाने... झिरो ग्रॅव्हिटीत जगायची प्रॅक्टीस सुरु करावी काय??? ;) (गुरुत्वाकर्षी) अर्धवटराव

शुचि Wed, 09/28/2011 - 01:45
हाहाहा :) मी एका पुस्तकात खरोखर (देवाची शप्पत) असे वाचलेले आठवते की - दगडाला तो स्वतः दगड वाटतो म्हणून तो दगड असतो ;) असले भारी सिद्धांत लोक लिहीतात. खरच :)

In reply to by रमताराम

Nile Wed, 09/28/2011 - 22:39
_/\_ फुटलो, च्यायला!!

In reply to by शिल्पा ब

आत्मशून्य Wed, 09/28/2011 - 12:33
पण कै कै दगडांना आपण सर्वज्ञ, महाज्ञानी, महापंडीत आहोत असे वाटते त्याचा काय सिद्धांत आहे?
फार सोपा सिध्दात आहे. जॉर्ज ओरवेलने लिहलं आहे तोच... All animals are equal, some animals are more equals. दगडांना तूम्ही दगड आहात याची जाणीव करून द्या ते कदाचीत एकत्रीत लेखही पाडू लागतील, असाही सिध्दांत आकार घेत आहे असं निरीक्षण आहे.

पाषाणभेद Wed, 09/28/2011 - 01:57
अत्यंत तांत्रीक लेख. समजून घेतो आहे. कर्मविपाक म्हणजे काय ते समजले नाही. त्याची व्याख्या काय आहे? मला दासीचे सबस्क्रिप्शन करायचे आहे. दासीसाठी कुणाशी संपर्क करावा लागेल?

In reply to by पाषाणभेद

प्रियाली Wed, 09/28/2011 - 05:00
साखरपाक, मैसूरपाक, स्वयंपाक, भारतपाक तसाच कर्मविपाक. आपल्या मगदूराप्रमाणे अर्थ लावावेत. डोक्याला फुकट त्रास कशाला? है काय आणि नै काय? मा अदिती, आपल्या कांदा संस्थानातल्या कहाणीला थोडा वेगळाच वास येतो आहे... म्हणजे कांद्याचा! :) पण चालू द्या, आमच्या डोक्याची शंभर शकले होऊन आमच्या पायाशी लोळण घेत नाहीत तोवर कर्मविपाकामुळे अध:पतन चालू द्या!

रमताराम Wed, 09/28/2011 - 08:20
सहज (सहजरावांमुळे नव्हे) आठवले. जी. एं.ची एक उपकथा आहे. हंसांची जोडी नि कावळ्यांचा थवा यांच्यात मानससरोवर नक्की कोणाचे यावरून वाद होतो. प्रथम कावळ्यांचा नेता म्हणतो हे आमचेच आहे. हंस त्याला आव्हान देताना म्हणतो की आमच्या कित्येक पिढ्या इथे राहिल्या* म्हणून हे आमचे. कावळा म्हणतो छट्, आपण बहुमत घेऊ हे सरोवर कोणाचे म्हणून नि ठरवू** सरोवर कोणाचे म्हणून. त्यानुसार सार्वमत होऊन - अर्थात - सरोवर कावळ्यांचे आहे हे जाहीर होते. हंस निराश होतो. पण अखेरचा प्रयत्न म्हणून हंस म्हणतो पण अनेक जुन्या लेखातून, साहित्यातून, ग्रंथातून सरोवर हंसांचे आहे हे लिहिलेले आहे***. कावळ्यांचा नेता म्हणतो हरकत नाही. तसे असेल तर ते मान्य करावेच लागेल. आणि म्हणूनच आम्हा हंसांसाठी हे सरोवर सोडून तुला निघून जावे लागेल****. हंस अवाक्. असे पण मी हंस आहे, तो वैतागून म्हणतो. 'छट् आम्ही हंस आहोत, चल बहुमत घेऊ या तू हंस की मी हंस ते**' कावळ्यांचा नेता आव्हान देतो. चांदण्यांची विधाने परिचयाची वाटतायत का? ;) तात्पर्य मी सांगणार नाही कारण ते सापेक्ष आहे. ज्याची त्याची जाण ज्याची त्याची समज या न्यायाने ज्याने त्याने समजून घ्यावे. (आणि तसेही बरेचदा तात्पर्य गृहितकाच्या पातळीवरच राहते, पण ते असो.)

In reply to by रमताराम

आवरा ररा आजोबांना = )) =)) मला एकदम ती हंस आणि कावळ्याची अवकाश भरारी स्पर्धेची गोष्ट आठवली ;)
"पतन होणे हे नैसर्गिकच वाटते, यात गुरूत्वाकर्षणाचा हात असावा असे वरकरणी वाटते,
हे वाक्य १००% घासूगुर्जींची प्रेरणा आहे. (कारण लेखात हे एकमेव वाक्य भ्रमनिरास करणारे आहे आणि त्यावर आंबटशौकी छाप जाणवते)

मदनबाण Wed, 09/28/2011 - 10:15
फारच अभ्यासपूर्ण लेख लिहला असल्या सारखे वाटत असल्याने सदर लेखिकेस वाढदिवसाच्या शुभेच्छा ! ;) तसेच वरती फारच अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया आलेल्या दिसत आहेत ! ;) त्या वाचुन काही विचारतरंग मनपटलावर उमटले ! ते असे... १) हे गुर्‍हाळ चालुच आहे अक अजुन मला तर काकवी प्यायची इच्छा झाली बाँ... ;) २) असले भारी सिद्धांत लोक लिहीतात. खरच जितम जितम... सॉरी सॉरी आय मीन टू से... युरेका ! युरेका... ;) ३)पण कै कै दगडांना आपण सर्वज्ञ, महाज्ञानी, महापंडीत आहोत असे वाटते त्याचा काय सिद्धांत आहे? अश्याच एका दगडाला गावातले लोक घाबरायचे ! देवीचा कोप होईल अशी त्यांना भिती वाटायची,त्यांची ही समजुत नष्ट करण्यासाठी स्वामी समर्थांनी त्या दगडावर प्रातःविधी आटपला ! आणि त्यांनी गाणदेवीचे महात्म्य बुडवले....(संदर्भ :--- स्वामी समर्थांची बखर) ४) अत्यंत तांत्रीक लेख. समजून घेतो आहे. समजला की त्याचा अर्थ मला व्यनी कर हो... ;) मला दासीचे सबस्क्रिप्शन करायचे आहे. दासीसाठी कुणाशी संपर्क करावा लागेल? दफोराव काय हे ! मागुन मागुन दासीचे सबस्क्रिप्शन मागितलेत ! छ्या ! तप करा तप ! मग लगेच इंद्र भगवान अस्वस्थ होउन तुमचे तपोभंग करण्यासाठी अप्सरा पाठवतील अप्सरा ! ;) ५) साखरपाक, मैसूरपाक, स्वयंपाक, भारतपाक तसाच कर्मविपाक. आपल्या मगदूराप्रमाणे अर्थ लावावेत. डोक्याला फुकट त्रास कशाला? है काय आणि नै काय? खी खी खी... ख्या ख्या ख्या ! इति पाताळविजयम हास्य ! ;) मी तर आज पॉपकॉर्नच्या जागी कुरकुरे घेउन बसलोय ! ;) ६) चांदण्यांची विधाने परिचयाची वाटतायत का? तात्पर्य मी सांगणार नाही कारण ते सापेक्ष आहे. ज्याची त्याची जाण ज्याची त्याची समज या न्यायाने ज्याने त्याने समजून घ्यावे. (आणि तसेही बरेचदा तात्पर्य गृहितकाच्या पातळीवरच राहते, पण ते असो.) नारायण !!! नारायण !!! ;) बाकी हल्लीच इथे कुठल्याश्या लेखात पत्त्याच्या खेळा बद्दल वाचले होते,मी ३२ लाडवांची वख्खई बोलुन मोकळा झालेलो आहे बरं ! ;) जाता जाता :--- आसमान में लाखों तारे !!! टॅणॅव... टॅणॅव... ;) (सध्या भिकू म्हात्रे मोड मधे असलेला) ;)

In reply to by मदनबाण

लोकांचा विश्वास असणार्‍या पण स्वतःला भंपक वाटणार्‍या समजुतींमुळे (योग्य जागा वगळता इतर ठिकाणी) प्रातर्विधी करणं अतिशय रूचीहीन आहे. पण असंच करायचं असेल तर सगळे बाबा, बुवा, देव, इ गोष्टी निरीश्वरवाद्यांना भंपक वाटतात. त्यावर निरीश्वरवाद्यांनी तसे वर्तन केले की भडका उडतो (आणि काही प्रमाणात तो रास्त आहे). समंजस माणसाला त्यातला फोलपणा समजायलाही वेळ लागत नाही. जी गोष्ट निरीश्वरवादी मेघना आणि अदितीला समजते ती स्वामी समर्थ आणि/किंवा त्यांच्या भाटाला समजू नये याला काय म्हणावं? अनियनवरच्या या लेखाचं भारतीयीकरण करावं का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मदनबाण Wed, 09/28/2011 - 22:29
ह्म्म्म... अपेक्षित प्रतिसाद... लोकांचा विश्वास असणार्‍या पण स्वतःला भंपक वाटणार्‍या समजुतींमुळे (योग्य जागा वगळता इतर ठिकाणी) प्रातर्विधी करणं अतिशय रूचीहीन आहे. पण असंच करायचं असेल तर सगळे बाबा, बुवा, देव, इ गोष्टी निरीश्वरवाद्यांना भंपक वाटतात. त्यावर निरीश्वरवाद्यांनी तसे वर्तन केले की भडका उडतो (आणि काही प्रमाणात तो रास्त आहे). समंजस माणसाला त्यातला फोलपणा समजायलाही वेळ लागत नाही. काय आहे बाई ज्या गोष्टीचा संदर्भ मी दिला आहे, ती न वाचल्यानेच तुम्ही असे बरळताना दिसत आहात ! (मी मुद्दामुनच बरळणे हा शब्द प्रयोग करतो आहे, कारण स्वामी समर्थ हे हिंदुस्थानी भूमीत झालेल्या अनेक श्रेष्ठ संतापैकीच एक होते. ) स्वामींचा मूर्ती पुजेला विरोध नसुन उठसुठ "कोणत्याही" दगडाला शेंदुर फासुन देव मानणार्‍या अंधश्रद्धाळु लोकांना होता, तेच स्वामींनी त्यांच्या कॄतीतुन दर्शवले एव्हढेच... असो. जसे त्या दगडांना काही महत्व नव्हते,तसेच स्वतःला आपण सर्वज्ञ, महाज्ञानी, महापंडीत समजणार्‍या दगडांना किंमत देउ नये असा आशय माझ्या प्रतिक्रियेचा होता. कथा संपूर्ण माहित नसताना (मी म्हणुनच बखरीचा संदर्भ दिला होता,) तुम्ही असा प्रतिसाद द्याल हे अपेक्षितच होते,म्हणुनच मी सुरवातीलाच म्हंटले आहे की अपेक्षित प्रतिसाद ! जी गोष्ट निरीश्वरवादी मेघना आणि अदितीला समजते ती स्वामी समर्थ आणि/किंवा त्यांच्या भाटाला समजू नये याला काय म्हणावं? आता आपल्याला "बरेच" काही समजते आहे हे स्पष्ट झाले. संताच्या श्रेष्टत्वाची तुलना इतक्या सहज प्रकारे करता येते ते आज नव्याने कळले.

In reply to by मदनबाण

शिल्पा ब Wed, 09/28/2011 - 22:37
तुम्हाला विज्ञान हा प्रकार भंपक वाटतो का? नै अगदी तावातावाने चाललंय म्हणुन विचारलं. विज्ञानातल्या गोष्टी प्रयोग करुन सिद्ध करता येतात तसं देव वगैरेबद्द्ल होत नै, ते आपण मानु तसं असतं म्हणुनच देवावरुन (किंवा त्या डिपार्टमेंटातल्या गोष्टींवरुन) लोक दंगली करतात. तस आमचंच विज्ञान खरं म्हणुन भांडणं होत नैत. अधिक संशोधन करुन नविन नविन जे सापडेल ते पुराव्यानिशी मांडतात. थिअर्‍या सिद्ध करता येतात. बाकी तुमचं काय ते चालुद्या.

नितिन थत्ते Wed, 09/28/2011 - 10:53
जेव्हा जेव्हा आमचे नैतिक अधःपतन होते त्यावेळी गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव मात्र कमी झाल्याचे जाणवते. (विशेषतः विकांताच्या सायंकाळी).

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 11:19
नवे शीर्षक घ्या आणि पडा चालू... कृष्णविवरात शिरताना! इथल्या कृष्ण या शब्दाचा त्या तथाकथित देव कृष्णाशी संबंध नाही. हा शब्द काळा या रंगासाठी योजलेला आहे. कृष्ण हा तथाकथित देव आहे, कारण तो प्रत्यक्ष होता, गवळ्यांचा राजा होता. मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची वेळ त्या काळी भारतात नव्हती, असे आमचे म्हणणे आहे. गंभीरपणे आणि विनोदानेही. तेव्हा या विषयावर उगाच उपप्रतिसाद देऊन आम्हाला खाजवू नये. कारण आम्हाला कसलाही कंड सुटलेला नाही. ;)

प्यारे१ Wed, 09/28/2011 - 12:09
याच्यापेक्षा, भौतिकशास्त्राच्या चार दोन संकल्पनाद्वारे कर्मविपाक चुकीचा कसा हे कर्मविपाक मानणार्‍यांची तोंडे बंद करण्यासाठी लिहिले असते तर बरे झाले असते. असो. चालू द्या. यू स्क्रॅच माय बॅक, आय स्क्रॅच युअर्स. श्रामो यात सामील झालेले पाहून सखेद आश्चर्य वाटले. पुन्हा असो.

राजेश घासकडवी Wed, 09/28/2011 - 13:26
ओनियनमधला मूळ लेख वाचला होता तेव्हा हसून हसून वेडा झालो होतो. त्याची पार्श्वभूमी सर्वांनाच माहीत असेल असं वाटत नाही, म्हणून सांगतो. अमेरिकेत शाळांमध्ये उत्क्रांतीवाद शिकवतात हे अनेक धार्मिकांना आवडत नाही. याचं कारण उत्क्रांतीवादाने सृष्टी देवाने निर्माण केलेली नसून आपोआप निर्माण कशी झाली हे सांगितलेलं आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये देव घुसडण्यासाठी त्यांनी इंटेलिजेंट डिझाइन नावाची थिअरी तयार केली. ही थिअरी वगैरे काही नाही, सरळसरळ बायबलमध्ये जे सांगितलं आहे तेच आहे. ती भारदस्त वाटावी यासाठी कुठल्यातरी रीसर्च संस्था तयार करणं, त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वतःची रीसर्च मॅगेझिनं छापून त्यात रीसर्चसदृश पेपर छापणं वगैरे अनेक गोष्टी केल्या. मग त्यांनी वेगवेगळ्या स्कूल बोर्ड्सकडे जाऊन 'मुलांच्या भल्यासाठी' उत्क्रांतीवाद आणि इंटेलिजंट डिझाइन या दोन स्वतंत्र थिअरी आहेत व त्या दोन्ही पाठ्यपुस्तकात स्वीकारल्या जाव्यात असं लॉबिइंग सुरू केलं. म्हणून हे इंटेलिजेंट डिझाईन वाले लोक पुढे जाऊन गुरुत्वाकर्षण सिद्धांतालाही निव्वळ थिअरी म्हणतील आणि देवाने पाडलं म्हणून वस्तु पडतात असं म्हणायला लागतील अशी गमतीदार कल्पना मूळ लेखात आहे. अशी पार्श्वभूमी आपल्याकडे नसताना लेखाचं मराठीकरण किंवा भारतीयीकरण करणं ही कठीण गोष्ट असते. अदितीने हे छान केलेलं आहे. बाकी अमूक वाक्य अमूकचं वगैरे गमतीदार वाटलं. हा लेख अदितीनेच लिहिलेला आहे, आम्ही मदत केली म्हणजे काही शैलीविषयक, संकल्पनाविषयक सूचना केल्या. पाचसहा लोकांचे आभार मानलेले आहेत म्हणजे सर्वांनी मिळून वेगवेगळी वाक्यं लिहिली असा प्रकार नाही.

In reply to by राजेश घासकडवी

सहमत आहे. यावरूनच एक गंमतीदार उदाहरण आठवले... पाकिस्तानातल्या पाठ्यपुस्तकात 'हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू एकत्र आले की अल्लाच्या मर्जीने त्याचे पाण्यात रुपांतर होते' असे असल्याचा उल्लेख वाचला होता.

In reply to by राजेश घासकडवी

श्रावण मोडक Wed, 09/28/2011 - 13:51
पार्श्वभूमी आपल्याकडे नसताना लेखाचं मराठीकरण किंवा भारतीयीकरण करणं ही कठीण गोष्ट असते. अदितीने हे छान केलेलं आहे. बाकी अमूक वाक्य अमूकचं वगैरे गमतीदार वाटलं. हा लेख अदितीनेच लिहिलेला आहे,
खरंय. तिनं हा लेख छान लिहिला. तात्कालीक एन्जॉय करता येतोच, संदर्भ असेल तर त्यापेक्षाही अधिक काळ एन्जॉय करता येतो. पण त्यापलीकडे ती लिहू शकते. ते सध्या बंद दिसतंय. गुर्जी, हे तुम्ही जरा मनावर घ्याच. अंगठे धरून उभे करा तिला. :)

In reply to by राजेश घासकडवी

प्रियाली Wed, 09/28/2011 - 13:57
ओनियनवरील मूळ लेख मीही वाचला. त्या धर्तीचा लेख मराठीत येणे गंमतीशीर आणि रोचक आहे.
बाकी अमूक वाक्य अमूकचं वगैरे गमतीदार वाटलं. हा लेख अदितीनेच लिहिलेला आहे, आम्ही मदत केली म्हणजे काही शैलीविषयक, संकल्पनाविषयक सूचना केल्या. पाचसहा लोकांचे आभार मानलेले आहेत म्हणजे सर्वांनी मिळून वेगवेगळी वाक्यं लिहिली असा प्रकार नाही.
हे सांगायची गरज नव्हती गुर्जी. ज्यांना जे वाटते ते वाटू द्या. काय फरक पडतो?

In reply to by राजेश घासकडवी

बाकी अमूक वाक्य अमूकचं वगैरे गमतीदार वाटलं.
आमचे अभ्यासू व प्रामाणिक मत तुम्हाला गंमतीदार वाटले ? आज खरंच दुखावलेत तुम्ही मला. आजकाल जुने स्कोर नव्-नव्या धाग्यांवर प्रतिसादातून सेटल करत रहायची जी फ्याशन आहे, त्याचा फायदा घेउन मी तुमच्यावर असा आरोप करुन जुने स्कोर सेटल करत आहे असे तर वाटत नाही ना तुम्हाला ? भ्रमनिरास झाला माझा.

In reply to by राजेश घासकडवी

क्रेमर Wed, 09/28/2011 - 21:35
आम्ही मदत केली म्हणजे काही शैलीविषयक, संकल्पनाविषयक सूचना केल्या.
'श्रीमती रतीचंद्रिकादेवी म. बाणकोटे' यांचे नाव कोणी सूचवले याविषयी बारीकशी उत्सुकता आहे.

In reply to by क्रेमर

हे पात्र माझ्या डोक्यातूनच आलेलं असलं तरीही नाव खरोखरच टीमवर्कमधून आलेलं आहे. आणि त्यात माझा अजिबातच सहभाग नाही. माझी क्रिएटीव्हीटी नावं ठेवण्यात चक्क चक्क कमी पडली. ;-)

उत्तम लेख. सध्या इतकेच. वाचल्यावर अजून प्रतिक्रिया देईन! ;) बाकी सर्वश्री आणि सर्वसाध्वी याच्या पुढची नावांची यादी वाचल्यावर त्या दोन शब्दांच्या ऐवजी केवळ संधिसाधू एवढाच एक शब्द पुरला असता असे वाटून गेले! ;)

चिंतातुर जंतू Wed, 09/28/2011 - 15:20
नास्तिकांनी कितीही आक्रोश केला तरी अस्सल धर्माभिमानी त्यास कधीही भीक घालणार नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने अनेक अतींद्रिय वस्तूंविषयी व त्याबरोबर परलोकाविषयीही सूक्ष्म ज्ञान संपादन केले होते, असा माझा पूर्ण विश्वास आहे. भौतिक सृष्टीविषयीच्या त्यांच्या कल्पना बर्‍याच काव्यमय होत्या. त्यांनी दुर्बिणीचा शोध लावला नसला तरी त्यांना योगबलाने परलोकाबद्दल खडानखडा माहिती असे. ते आगगाडीतून प्रवास करीत नसले तरी ते सूक्ष्म देहाने सूर्यचंद्रादि लोकांवर निमिषार्धात जाऊन परतसुद्धा येत. सूक्ष्म देहाच्या मध्यस्थीने त्यांनी कदाचित पृथ्वीवरीलही सारे प्रदेश व समुद्र पालथे घातले असतील, पण त्यांच्या स्वरूपाबद्दल त्यांस निमिषार्धात ज्ञान कसे व्हावे? अर्थात ते अस्पष्ट व डळमळीत असल्याबद्दल त्यांना दोष देता येत नाही. त्यांनी ऐहिक जगाविषयीच्या आपल्या अज्ञानाचा वचपा पारलौकिक जगाच्या ज्ञानाने पूर्णपणे भरून काढला होता. त्यांस स्वतःच्या घरांची क्षेत्रफळे व त्यांची स्नेह्यांच्या घरांपासूनची अंतरे एक वेळ माहीत नसतील, पण यमपुरीची लांबीरुंदी व त्यांचे येथपासूनचे अंतर त्यांस मुखोद्गत असे. श्रेयअव्हेर: 'मरणोत्तर' - श्री. कृ. कोल्हटकर ('सुदाम्याचे पोहे'). :-) त्यामुळे केवळ एवढेंच म्हणतो आणि माझे चार शब्द आटोपते घेतो: उगाच कोणीतरी मारलेल्या वैज्ञानिक पातळीवरच्या थापा लगावण्यापेक्षा माझे मत माझ्या, मग ते मर्यादित का ज्ञानावर देणे कधीही उत्तम. तुमच्या चालूंदे सायन्स आर्टिकल्स मधल्या गप्पा. ;-)

विसुनाना Wed, 09/28/2011 - 17:45
श्रीमती रतीचंद्रिकादेवी म. बाणकोटे किंवा अगदीच गेलाबाजार आचार्य दीपांकर भिर्टाचारजी यांचे फोटू नसल्याने लेख वाचला नाही. ;)

राजेशच्या प्रतिसादात भरः पोटापाण्यासाठीच नव्हे तर आवड आहे म्हणूनही मी भौतिकशास्त्राचा अभ्यास करते ही गोष्ट लपवलेली नाही. कर्मविपाक सिद्धांत वगैरे माझा प्रांत नव्हे त्यामुळे त्यावर थोडे विनोद करणं (त्यातून हा शब्दसुद्धा मजेशीर आहे) आलंच, पण आवडत्या विषयावरही विनोद करणं हा एक मुख्य भाग या लेखात आहे. एखाद्या सिद्धांताचा अभ्यास करणं, तो समजून घेणं वेगळं आणि त्याचीच खिल्ली उडवणं वेगळं. कोणत्याही गोष्टीची खिल्ली उडवता येते आणि प्रत्येक वेळेस न पटणार्‍या विचारांचीच खिल्ली का उडवा, यावेळेस मी भौतिकशास्त्रातल्या सिद्ध झालेल्या सिद्धांतांचा आधार घेऊन खिल्ली उडवली आहे. रहाता राहिला स्कोर सेटल करण्याचा मुद्दा, तर कोणी आपल्या प्रेयसीवर लिहीलेल्या कवितेतही एखाद्याला* स्कोर सेटलिंग वाटू शकतं. अशा लोकांसाठी काय लिहायचं? राजेशने 'द अनियन'मधला हा लेख दाखवला तेव्हाच डोक्यात चक्र फिरायला लागली होती की या लेखाचं भारतीयीकरण करावं, ते ही स्वतःला मजा यावी म्हणून. कर्मविपाक सिद्धांताच्या धाग्यामुळे थोडी पार्श्वभूमी मिळाली एवढंच. कर्मविपाक सिद्धांत खोटा आहे का खरा आहे याची चिकीत्सा करण्यासाठी हा लेख नाही. भौतिकशास्त्राचे नियम, ते समजून न घेता आपल्या सोयीप्रमाणे वापरून घेणार्‍यांची खिल्ली उडवली आहे इतकंच फारतर. जंतू: कोल्हटकरांना _/\_ आणि तुमचे आभार. विसूनाना: फोटोंचं डिपार्टमेंट स्पाकडे आहे, त्याला वेळेत सुपारी दिली तर तुम्ही पुढच्या धाग्यावर प्रतिक्रिया देणार ना? ;-) प्यारे१: तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरं देण्यासाठी लिहायचं तर जवळजवळ एखादं पुस्तक लिहावं लागेल; तेवढा वेळ असल्याशिवाय या गोष्टींत हात घालणं योग्य नाही. त्यापेक्षा प्रा. मोहन आपट्यांनी 'मला उत्तर हवंय' या शीर्षकाची पुस्तकं लिहीलेली आहेत; त्यात या आणि अशा अनेक प्रश्नांची खूप सोप्या भाषेत आणि पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत; उत्सुकता असणारे ती पुस्तकं वाचू शकतात. *सत्यघटनेच्या डीटेल्ससाठी व्यनी करू नयेत. मिळणार नाहीत.

पैसा Wed, 09/28/2011 - 19:42
सकाळी सक्काळी हा लेख पाहिला होता, आणि त्यावर विचार चिंतन करता करता बसमध्ये मला 'निर्वाण प्राप्त झाले'. परत भूतलावर आले तेव्हा डायरेक्ट पणजी बसस्टॅण्ड डोळ्यांना दिसला. लेख पॉवरफुल्ल आहे खराच. संध्याकाळी परत येताना हीच समाधी अवस्था अनुभवाला आली. आमच्या कोणत्या तरी कर्माच्या 'पाकामुळे' हा लेख वाचायला मिळाला. श्री श्री अदिती मां याना विनवणी की मज पामराचा शिष्या म्हणून स्वीकार करावा. लेखाची प्रेरणासुद्धा मनाला उल्लसित करून गेली. माताजीना ३/१४ दंडवत!

Nile Wed, 09/28/2011 - 23:02
नव्या संशोधनास विरोध करणार्‍या सगळ्या दगड अंधश्रद्धाळूंचे नेहमीचे रडके प्रतिसाद वाचून मनोरंजन झाले!!