मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये - १

यकु · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
- यशवंत कुलकर्णी
सत्तरच्या दशकात उठलेले रजनीश नावाचे वादळ आता जवळपास विस्मरणात गेले आहे. यापूर्वी मी लिहिलेल्या यु. जी. विषयीच्या लेखमालेत रजनीशांचा जरुरीपुरता आढावा घेतला आहे. पण हा विषय तेवढ्यात संपणारा नाही. म्हणून मुद्दाम रजनीश हा विषय ठरवून ही लेखमाला लिहिण्याचे योजिले आहे. विविध पैलूंतून रजनीश उलगडून समोर मांडण्याचा, आणि कोणताही आरोप न करता, या माणसाचा धूर्तपणा, त्याची खरोखर पोहोच कुठवर होती हे खुद्द वाचकांनाच दिसावे असा प्रयत्न आहे. रजनीश कोण होते, त्यांनी भारतात व अमेरिकेत काय भानगडी केल्या, त्यांच्या बुद्धीची झेप किती मोठी होती वगैरे तपशीलात जाण्याचे कारण नाही. रजनीश उदो उदो करणारे व रजनीश मुर्दाबाद छाप साहित्य आंतर्जालावर उपलब्ध आहे. त्यांच्या सुरुवातीच्या पुस्तकांपासून (पुंगलिया बंधू, टिंबर मार्केट) पुण्यात व भारतभरात दिलेली व्याख्याने (जवळपास ४००० तासांचे रेकॉर्डिंग), बरीचशी पुस्तके, अमेरिकेत पत्रकारांना दिलेल्या मुलाखती आणि अमेरिकेतून हकालपट्टीनंतरची व्याख्याने हे सगळे मी ऐकले, चित्रफितीवर पहिले आहे. त्यांचे साहित्य आणि वाणी आवडत होती, प्रभावीतही झालो होतो. रजनीश कसे बरोबर आहेत आणि जग त्यांना ओळखण्यात कसे चुकले आहे हे सांगणारे लेखही सकाळ व लोकमत मध्ये मी लिहिले. इथल्या ओशोप्रेमींच्या ध्यान शिबिरातही मी अनेकवेळा गेलो – व नंतर ध्यान करू लागलो. एवढं, की मला नोकरी सोडून दोन वर्षे फक्त ध्यानासाठी द्यावी वाटली. एवढ्यासाठीच हे तपशीलवार सांगत आहे की, नंतर नीट अभ्यास न करता काहीबाही लिहिल्याचा आरोप होऊ नये. मी रजनीश ऐकत होतो पण कुठेतरी खोलवर हा माणूस फसव्या आहे, हा भासवतो तसा पूर्ण पारदर्शक बिलकुल नाही हे नेहमी वाटायचं, पण अगदी किंचित, ओझरतं. कदाचित आपणच समजून घेण्यात चुकत असू असं मानून ध्यान करीत होतो. पण ध्यानात जस-जसा खोलवर जाऊ लागलो तस-तसा या माणसाचा खरा चेहरा दिसू लागला. मला जे तथाकथित समाधीचे अनुभव आले तेव्हा मी हादरून गेलो. ध्यानात एका उन्मुक्त भावावास्थेच्या क्षणी मी दशदिशांना विस्तारलो आहे ही जाणीव होत असतानाच “आता पुढे काय” हा मनात चाललेला विचार मला सुस्पष्टपणे दिसू शकत होता! विचार थांबल्याशिवाय समाधीप्रवेश होतच नाही या समजाला धक्का बसला होता. सविचार समाधीही असते हे लक्षात आले. तरीही या माणसाचे फोटो फेकून देऊन पुस्तके जाळून टाकण्याचे धैर्य माझ्याकडे नव्हते, हे मुद्दाम नमूद करतो. ते धैर्य ते युजी वाचल्यानंतर आले. रजनीश गेले आणि युजी आले असे नाही. दोघेही गेले. अजूनही कुठेतरी वाटत होतं की, नाही प्रत्येकाची व्यक्त होण्याची पध्दत वेगळी असते – शेवटी सत्य एकच आहे. रजनीश कसेही असोत, त्यांना ऐकले म्हणून आपण ध्यान करू लागलो हेच मोठे उपकार आहेत. पण या समजुतीआड मला दिसलेले रजनीश कसे ते लिहिणे राहून जात होते.
अज्ञाताचे भांडवल जागृत झालेल्या माणसाला सगळेच ज्ञात असते – काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. जागृत झाल्याचा जो दावा करील तो हमखास स्वत:ची फसवणूक करीत आहे असे समजा हे रजनीशांनी सांगितले होते. आणि ते जागृत झाल्याचा दावाही त्यांनी स्वत:च केला होता! आडवे-तिडवे प्रश्न विचारणारास त्यांचे सरळ सांगणे असे – “तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...” त्यांनी जगभरात होते नव्हते तेवढे सर्व सद्गुरू उकरून काढले व त्यांच्या साहित्यावर रसाळ व उद्बोधक व्याख्याने दिली. जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.
(क्रमश:)

वाचने 7409 वाचनखूण प्रतिक्रिया 20

जयंत कुलकर्णी Mon, 07/18/2011 - 09:08
सर्वसाधारण समज असतो. असा माणूस व इतरेजन यांच्यातील फरक म्हणजे आध्यात्माच्या वाटेवर चालून कुठेतरी पोहोचलेला तो, त्या विषयातील अनुभवांमुळे ज्ञानी. बाकी सर्व अज्ञानी अशी सर्वमान्यता. वरून पुन्हा तो लोकांना ज्ञान विसरण्याची शिकवण देत असतो! त्याला काहीतरी जगावेगळे मिळालेले असते किंवा तो स्वत:च ते जे काही असेल त्यात हरवलेला असतो. किंवा असूनही शिल्लक उरलेला नसतो. इतरांनाही तसे कसे होता येईल हे तो सांगत असतो. एकीकडे अज्ञानी होण्याची शिकवण देताना तो त्याच्या ज्ञानाचा घडा आपल्या डोक्यावर बदाबदा ओतत असतो. ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले
लेख फार सुंदर लिहीला आहे. ya, अगदि हेच विचार ओमर खय्यामने १००० वर्षापूर्वी मांडले आणि मला ते पटतात. (जरी सगळे नाही पटले तरी बरचसे पटतात) आहे ! तुझ्या लेखणीत खिळवण्याची ताकद आणि निर्मळपणा आहे.

रणजित चितळे Mon, 07/18/2011 - 09:16
वाचत आहे (क्रमशः आहे पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत). मला सुद्धा तो भोंदू वाटायचा (पण त्याचे वक्तृत्व व बोलण्याचे कौशल्य फार चांगले) पण बरेच लोक ओशो साहित्यावर अजून सुद्धा भारावलेले आहेत.

सहज Mon, 07/18/2011 - 10:00
>ही अज्ञातातील उडी असते, हेच अज्ञाताचे भांडवल असते. हे अज्ञाताचे भांडवल रजनीशांना जन्मभर पुरले. एकदा का जम बसला की मरणोप्रांत देखील ते भांडवल वठते. बघा ना कोणाच्या तरी आजोबांनी हजारो वर्षापुर्वी लिहलेल्या पट्ट्या आजही वाचल्या जात आहेत.. कारण तेच झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये!! पुढच्या भागात कोणाकोणाला घेणार आहेस ट्रेलर दे रे बाबा!

टुकुल Mon, 07/18/2011 - 12:37
वाचतोय.. बरच चांगल लिहिताय.. मधे बरेच दिवस मिपाला जास्त वेळ देवु शकत नव्हतो, म्हणुन तुमची यु. जी मालीका वाचायची राहुन गेली, आत वाचतो.. ---टुकुल

आत्मशून्य Mon, 07/18/2011 - 16:41
जे. कृष्णमूर्ती व यु.जी. कृष्णमूर्ती या समकालीन जागृत पुरुषांची मात्र चुकुनही भेट घेतली नाही.
हॅहॅहॅ, मजाच आहे. फूल धमाल आली असती दोन रथी असे समोरासमोर आले असते तर. असो... बाकी एक खरं मला रजनिशांच्या अध्यात्मीक बंडखोरीची(?) तूलना गौतम बुध्दा बरोबर कराविशी वाटते. फर्क इतकाच असावा बूध्दांनी शांततेचा आधार घेतला तर रजनीशांनी चावटपणाचा. पण हे दोघही असेच ज्यांनी भारतभर पसरलेली हिदू वैदीकता जिचा बेस "ज्ञानाप्राप्तीसाठी गूरू लागतो " हा आहे हा अत्यंत यशस्वीपणे फाट्यावर मारला, किम्बहूना गूरूला टाळूनही फक्त स्वतःच्याच जिवावर ज्ञान प्राप्ती होऊ शकते याचा विश्वास बूध्दांमूळे लोकांना जाणवला असावा, या आधी वैदीकतेला इतक्या सहजपणे व यशस्वीपणे कूणीच गूंडाळले न्हवते (माझ्या ज्ञात इतिहासात तर कूणीच नाही माहीत). म्हणून जे वादळ रजनीशांने केलं त्याच्या कैकपटीने मोठे वादळ बूध्दानी त्याच्या काळात उमटवलं असावं आणी रजनीशांनी याच सखोल अभ्यास केला असावा असं वाटतं. आय अ‍ॅम स्पिरीचूअल, नोट रिलीजस मानसिकतेचा उगम हा बहूतेक हाच

धमाल मुलगा Mon, 07/18/2011 - 20:36
"रजनीश इज, वॉज अ‍ॅण्ड एव्हर वील बी ए पोर्नो अवतार... हि वॉज ए पिम्प..ही प्रोव्हायडेड बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स टेलींग देम यू फक अ‍ॅण्ड थ्रू फकींग, तान्त्रिक फकींग यू वील गेट एन्लायट्न्मेंट... हाऊ मेनी पीपल हॅव बीन एन्लायटण्ड??... यू ऑल फेल फॉर दॅट... पिम्पस यूज्वली शेअर मनी विथ दी बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स.. बट दॅट बास्टर्ड टूक मनी फ्रॉम बॉय्ज अ‍ॅण्ड गर्ल्स अ‍ॅण्ड केप्ट ऑऽऽऽल फॉर हिमसेल्फ.." - यु.जी. कृष्णमुर्ती. -------------------------- वि.सु.: आम्ही ओशो अथवा यु.जी. दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाचे नाही, दोन्हीपैकी कोणत्याही पक्षाच्या विरोधातीलही नाही. आम्ही केवळ निरिक्षणं नोंदवित आहोत. कळावे, -सो.सो. धमालमुर्ती.

निमिष ध. Mon, 07/18/2011 - 21:09
रजनीशांचे साहित्य वाचालेल्यानी लिहिलेली लेखमाला नक्कीच चांगली असेल. लवकर भाग टाका. पुलेशु

ईश आपटे Mon, 07/18/2011 - 21:12
तुम्ही जागृत आहात तर इथे कशाला आलात, जागृत नसाल तर माझे ऐकून घ्या.. आणि मनात समर्पण जन्मू द्या...” ह्याला द्वंद्व तर्क अस म्हणतात, अशा गुरुला नागार्जुनाच्या शिष्याने खालील प्रश्न केला असता. तुम्ही जागृत आहात तर मग इतर शिष्य अजागृत का दिसत आहेत ?? व तुम्ही जागृत नसाल तर तुम्हाला इतरांना उपदेश करायचा अधिकारच प्राप्त होत नाही ...................... द्वंद्व तर्क करुन बुध्दिभेद करण्याचा मक्ता काही मॉडर्न गुरुनाच दिलेला नाही. वरील प्रश्नावर ओशोनी काय उत्तर दिले असते बर ????

रामपुरी Mon, 07/18/2011 - 22:33
असले सगळे बाबा आणि बुवा आम्ही एकाच तराजूत तोलतो. सत्यसाईबाबा, अनिरुद्धबापू, रविशंकर, ओशो, यु जी आणि याच माळेतले ईतर सर्व आमच्यासाठी सारखेच. त्यामुळे त्यांचं साहित्य वाचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या वाटेला जाण्याचा प्रश्नच येत नाही पण गरीब लोक यांच्यावर पैसे वाया घालवताना बघितलं की वाईट वाटतं. (बाकी कधी यांचा खाजगीत यांचा उल्लेख करायचा प्रसंग आलाच तर आम्ही तो एकेरीच करतो, एक लांबलचक कोल्हापूरी शब्द जोडून)... असो... चालू द्या...

In reply to by रामपुरी

सुधीर१३७ Tue, 07/19/2011 - 13:00
तेवढा लांबलचक कोल्हापुरी शब्द सांगून टाका................... लवकर............... :wink: ..............( व्य. नि. केलात तरी चालेल ).................. तेवढीच ज्ञानात भर............. :wink:

अर्धवटराव Fri, 07/22/2011 - 10:08
आपल्याला बॉ सगळेच आवडतात... झुकनेवाले, झुकानेवाले, दोघांनाही फाट्यावर मारनेवाले आणि यापैकी काहिच न करणारे सुद्धा :) जगाला सर्वांचीच गरज आहे. >>काय वाट्टेल त्यावर तो बोलू शकतो व ते पूर्णतः सत्य असते असा एक सर्वसाधारण समज असतो.. -- फुल पटेश यशवंतराव, तुमचा अभ्यास (आणि कदाचीत आवाका सुद्धा) बाकी दांडगा दिसतोय. छान चाललय. (ध्यानस्थ) अर्धवटराव