मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मटा चे महान मद्यप्रेम!

सर्वसाक्षी · · काथ्याकूट
सरकारने मद्यपानचे वय किमान २५ केल्यामुळे समाजावर ओढवलेल्या भयानक संकटाच्या आणि झालेल्या घोर अन्यायाच्या निवारणार्थ मटाने मोहिम उघडली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणुन आजच्या मटामध्ये पृष्ठ क्रमांक ११ वर १/३ पान भरेल अशी भव्य व काळी चौकट - लाल अंग - पांढरी मोठी अक्षरे असलेली एक जाहिरात मटा ने दिली आहे. ही जाहिरात म्हणते " देशाचे सीमारक्षण करण्यासाठी आपल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी विश्वास ठेवला जातो. पण २५ वयापर्यंत जबाबदारीने मद्यपान करु शकत नाकी." खालोखाल लहान अक्षरात लिहिले आहे " आपल्या देशाचे कायदे सैन्यात भरती होण्यासाठी आणि सीमारेषेवर लढण्यासाठी १८ व्या वर्षी आपल्याला पात्र समजतात. पण आपण काय प्यावे याची निवड करण्याची परिपक्वता येण्यासाठी अजुन ७ वर्षे थांबायला सांगतात. मद्यपानचे वय अतार्किकदृष्ट्या २५ ठरविल्यामुळे, असे वाटते की आपल्या क्षमतांचे मूल्यमापन करण्याचे निकष समान नाहीत. त्यामुळे कोणतीही शंका राहणार नाही अशा निकषांची मागणी करण्याची आता वेळ आली आहे. आपले म्हणणे स्पष्ट आणि मोठ्या आवाजात ऐकावे यासाठी" माझ्या लहानपणी '१९७१ चे अभिमन्यू' हे पुस्तक वाचनात आले होते. त्यामध्ये ७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात हौतात्म्य लाभलेल्या कॅप्टन प्रकाश पेठे, मेजर रमेश दडकर, फ्लाईत लेफ्टनंट किशोर भडभडे इत्यादींच्या शौर्यकथा होत्या. पैकी एका सुपुत्राची अशी हकिकत सांगितली होती, की जेव्हा त्याच्यावर अपेंडीक्सची शस्त्रक्रिया करायचा प्रसंग आला तेव्हा त्याने डॉक्टरना सांगितले की जर जखम दिड इंचाहुन मोठी असेल तर सैन्यात प्रवेश मिळत नाही, त्यामुळे अधिक त्रास झाला तरी लहान छेद घेउनच शस्त्रक्रिया केली जावी. देशासाठी बलिदान करायचे ध्येय बालपणापासूनच उराशी बाळगणार्‍या अनेक हुतात्म्यांविषयी ऐकले, वाचले होते. मात्र मद्यपानाचे ध्येय तरुणांमध्ये असते व अशा गळाचेपी करणार्‍या कायद्यांमुळे तरुणांवर स्वप्नभंगाला सामोरे जाण्याचा दारुण प्रसंग येउ शकतो व त्यामुळे तरुणांचे जीवन उध्वस्त होउ शकते हे केवळ मटानेच जाणले. देशासाठी लढण्याच्या ध्येयासाठी सैन्यात प्रवेश करणारे युवक आणि मद्यपनाचा हक्क १८ व्या वर्षीच मिळावा यासाठी लढणारे युवक यांना एकाच पंगतीस बसविणार्‍या महान मटाला त्रिवार वंदन.

वाचने 8570 वाचनखूण प्रतिक्रिया 38

चिरोटा Fri, 06/24/2011 - 09:52
बिजान दारूवाला ह्यांना महाराष्ट्रातील युवकांचे भविष्य काय ते म्.टा.ने विचारावे.

मी-सौरभ Fri, 06/24/2011 - 10:00
पण हा प्रस्तावित कायदापण चुकीचा आहे. १८ वर्षे वयाचा माणूस ईतर अधिकार गाजवू शकतो तर हा का नाही? जे मद्यपान करत नाहीत त्यांना वयाच बंधन असो नसो फरक पडत नाही. यावर २१ वर्षांनंतर लग्न अन् मद्यपान दोन्हीला एकाच वेळी परवानगी देता येइल.......;) -- सर्वपेयी

पिवळा डांबिस Fri, 06/24/2011 - 11:32
बाकी सर्व बाबतीत १८ हे कायद्याने सज्ञान होणे हे वय मानता मग याच बाबतीत सरकारला काय झालं? आणि वयोमर्यादा २५ वर्षे केली म्हणून त्याखालच्या व्यक्तींना मद्यपान अशक्य करणं काय सरकारच्या हातात आहे? असलेले कायदे अंमलात न आणू शकणार्‍या सरकारच्या या नवीन भंपकपणाचा निषेध!!!! देशाचे सीमारक्षण करण्यासाठी आपल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी विश्वास ठेवला जातो. पण २५ वयापर्यंत जबाबदारीने मद्यपान करु शकत नाकी." मग याविरुद्ध आवाज उठवला यात मटाचं काय चुकलं? समाजावर ओढवलेल्या भयानक संकटाच्या आणि झालेल्या घोर अन्यायाच्या निवारणार्थ.... "भयानक संकट आणि घोर अन्याय" वगैरे लेखकाचं एकतर्फी चित्रण जाऊ द्या पण तरूणांना स्वतःचं हित कळत नाही असं ठरवायचा अधिकार ह्या सरकारी म्हातार्‍यांना कुणी दिला? खरं म्हणजे ६५ वर्षांवरच्या सगळ्या नेत्यांना (पक्षनिरपेक्ष!!!) सक्तीने घरी बसवलं पाहिजे आणि त्यांना मद्यपानबंदी केली पाहिजे!!!! साले उद्या कदाचित मटाचा झणझणित 'वेब मसाला' बंद करायचे!!!! :)

मटा चे महान मद्यप्रेम!
अंमळ गल्लत होते आहे का? कँपेन निट वाचली तर टाईम्स ग्रुपने कुठेही मद्यपान अथवा मद्यविक्रीला प्रोत्साहन दिल्याचे जाणवत नाही. हान, इंग्रजीचे मराठीत भाषांतर करताना कदाचित वापरल्या गेलेल्या शब्दांमुळे गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे. सकाळीच टाईम्स ग्रुप मधील एका जबाबदार व्यक्तिशी ह्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्यावेळी टाईम्सचा ह्या कँपेनमागचा उद्देश लक्षात आला. मुळात २५ वर्षे हा वयाचा आकडा कुणी आणि कुठल्या निकषावर निश्चित केला आहे ? वयाच्या १८ व्या वर्षी जो युवक ( / युवती) देश चालवणारे सरकार निवडू शकतो, सीमेचे रक्षण करु शकतो, वाहन परवाना काढू शकतो तो युवक मद्यपाना सारख्या वैयक्तिक निर्णयाच्या बाबतीत मात्र अपात्र कसा ठरु शकतो ? हा अधिकार त्याला का नाही ? आज हा निर्णय मद्यपाना संदर्भात घेतला गेला आहे. कदचित उद्या गाडी चालवणे, आईसक्रिम खाणे, शहराबाहेर पिकनिकला जाणे अशा टूकार कारणांसाठी देखील घेतला जाऊ शकेल. आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते आणि ह्याचा फायदा शेवटी कोणाला होतो हे आपण जाणताच. वयाचा निकष, फक्त आणी फक्त वयाचा निकष ह्या एकाच मुद्याच्या विरोधात हे कँपेन सुरु करण्यात आलेले आहे. टाईम्स ग्रुपच्या कँपेनबद्दल गैरसमज नसावा म्हणुन हा खुलासा. ह्याच मुद्याच्या विरोधात अभिनेता इम्रान खान देखील न्यायालयात सरकार विरुद्ध लढत आहेच. धन्यवाद.

मृत्युन्जय Fri, 06/24/2011 - 11:13
यात प्रामुख्याने २ मुद्द्यांचा विचार करणे जरुरीचे आहे. पहिला मुद्दा म्हणजे असा काही कायदा करण्यामागे सरकारचे काय निकष असु शकतात दुसरा म्हणजे वयाच्या अटीच्या विरोधात चळवळ करणे गरजेचे आहे काय? अणि तिसरे म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी कशी करणार. नुसते कायदे करुन शुन्य उपयोग आहे जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर. आज किती मद्यविक्रेते परवान्याची मागणी करताना दिसतात. रात्रीच्या वेळी जागोजागी दारुडे झिंगुन पडलेले असतात. यापैकी किती जणांकडे परवाने असतात? १८ वर्षाखालील लोकांना सध्या दारु उपलब्ध होते काय आणि होत असेल तर त्यावर कधी काही कारवाई होते काय? आणि असे गैरप्रकार होउ नयेत म्हणुन सरकारने काही उपाययोजना केली आहे काय आणि केली असेल तर त्याची अंमलबजावणी होते काय? वरीलपैकी सगळ्या किंवा बहुतांश प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर नवीन कायदे करुन नक्की काय उपयोग? आता असा काही कायदा सरकारने करावा की नाही याचाही थोडा विचार करावा. २५ ची वयोमर्यादा घालण्यात आलेली आहे. २५ च का? २१ का नाही? १८ का नाही किंवा १५ का नाही? किंवा ३० का नाही? बहुतेक सगळे जण लग्नासाठी २१ या वयोमर्यादाचा संबंध परिपक्वतेशी जोडतात. तसा तो थोडाफार आहेही. पण मुख्य कारण हे आहे की १६ ते २१ या कालावधीत पुरुषांची तर १४ ते १८ या कालावधीत स्त्रियांची प्रजननक्षमता सर्वाधिक असते. लोकसंख्यानियमनाच्या दृष्टीकोनातुन ही वयोमर्यादा प्रामुख्याने ठरवण्यात आलेली आहे. अन्यथा स्त्री - पुरुषांसाठी वेगेवेगळी वयोमर्यादा नाही. माझ्या मते लोकसंख्या नियमन हे उद्दिष्ट नसल्याने अमेरिकेत विवाहासाठी वयोमर्यादा दोघांसाठीही १८ च आहे. काही राज्यांमध्ये तर पालकांच्या संमतीने १७ पुर्ण झाल्यावर देखील बकरा स्वतःची मान कापुन घेउ शकतो. असे जर असेल तर मग मद्यपानाची वयोमर्यादा कशावर ठरवणार? सज्ञान होण्यासाठी १८ हे वय योग्य मानण्यात येते. १८ च का? याला तसे काही उत्तर नाही. पण मग १५ च का, १२ च का यालाही फारसे योग्य उत्तर देता येणार नाही. सामान्यतः माझ्यामते वयाच्या १५ व्या वर्षापर्यंत मानवी मेंदुची पुर्ण वाढ होते. म्हणजे १५ हे वय सारासार विचार करण्यासाठी योग्य मानायला हरकत नाही. पुर्वी १५ व्या वर्षी मुले संसारी व्हायची, कामधंदा करु लागायची. गेल्या शे दोनशे वर्षात परिस्थिती बदलत गेली. आता १५ व्या वर्षी मुलगा स्वत:च्या पायावर उभा नसतो. तसा तो १८ व्या वर्षीही असतोच असे नाही. मग १८ ची वयोमर्यादा पण वाढवावी का? शिवाय मुद्दा असा आहे की ज्या वयात माणूस मतदान करु शकतो. आपल्याबरोबर थोड्या अंशाने का होइना पण लोकशाही मार्गाने समाजाचे भवितव्य ठरवु शकतो. तोच माणूस स्वत:च्या आयुष्यात मद्य प्यावे की नाही हे नाही ठरवु शकत का? मग सरकारने कुठल्याही प्रकारे बळजबरी का करावी? बरं सरकारला जर लोकहिताची एवढीच काळजी आहे तर मग सरसकट मद्यावर बंदीच घालावी ना. ही २५ च्या वयोमर्यादेची गंमत कशाला? सरकार सामाजिक हितासाठी काहितरी करते आहे हे दखवण्यासाठी नसते कायदे कशाला? राहता राहिला याविरुद्ध चळवळ करण्याचा. तर मटाचा विरोध नक्क्की कशाला आहे हे कळाले पाहिजे. सरकारच्या अनाकलनीय कायदे करण्याच्या वृत्तीला की पिण्याच्या स्वातंत्र्यावर आलेल्या संक्रांतीला. टाइम्स म्हणते "It's my life. If you can't help, at least do not hinder." याच मटाने हेल्मेटसक्तीच्या कायद्याचे स्वागत केले होते. त्यावेळेस यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याला काय धाड भरली होती. आणि पिण्यावर बंधने आली तर नक्की काय hinder होणार आहे ते तरी नक्की कळु देत. It's my life. If you can't help या वाक्याचाही उद्देश कळत नाही. सरकारने नक्की काय हेल्प करणे टाइम्सला अपेक्षित आहे? टाइम्स असेही म्हणते की संसदेत गदारोळ घालणार्‍या राजकारण्यांना आमच्यावर अशी बंढने घालणारे कायदे करण्याचा हक्क नाही. मग तसे म्हतले तर सरकारला एकही कायदा करण्याचा हक्क नाही. प्रत्येक कायद्यासाठी ही बोंब का नाही मारत? आणि समजा हा कायदा पृथ्वीराज चव्हाणांच्या डोक्यातुन निघाला आहे तर त्यांनी नक्की कधी असभ्य वर्तन केले आहे. ते त्यांच्या सज्जन वागणुकीसाठीच प्रसिद्ध आहेत ना? टाइम्सचे असेही म्हणणे आहे की हा कायदा भ्र्ष्टाचार आणि पिळवणुकीचे आश्रयस्थान होइल. नक्की कसे? सध्याच्या कायद्याचीही जिथे नीटशी अंमलबजावणी होत नाही तिथे या कायद्याची काय होणार. मग पिळवणुक होइलच कशी. आणि कायदा मोडल्याबद्दल शिक्षा झाल्यास ती पिळवणुक कशी ठरेल. टाइम्स एक गोष्ट मात्र बरोबर विषद करते: "This is not about drinking. This is about respect and liberty. This is about arbitrary and autocratic exercise of power" वरीलपैकी अधोरेखित वाक्ये माझ्यामते महत्वाची आहेत. कायदे करा. पण त्याच्यामागे योग्य असे तर्क आणि युक्तिवाद असु देत. आणि दुर्दैवाने २५ वर्षाच्या वयोमर्यादेमागे ते नसल्यामुळे मी या कायद्याचा पुरस्कार करु शकत नाही

मराठी_माणूस Fri, 06/24/2011 - 11:49
मद्यपान हा जणू काही जीवन मरणाचा प्रश्न असल्या सारखे कँपेन चालवतात आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधातील लेख मात्र भरभरुन छापतात. प्रश्न त्यांनी उचलुन धरलेला मुद्दा बरोबर का चुक हा नसुन त्याला दिलेल्या अवाजवी मह्त्वाला आहे. ह्यापेक्षा सामान्य माणसाचे कितीतरी जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. मद्यपान कोणत्या गटात मोडते ? जीवनावश्यक ? तरुणांचे आरोग्य वाढवण्यासाठी ? नशा, मजा न पिल्याने कोणते नुकसान होणार आहे ?

In reply to by मराठी_माणूस

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या विरोधातील लेख मात्र भरभरुन छापतात.
कै-च्या कै मुद्दा अमान्य , एकन्दरिन्तच टाइम्स समूहाने आंदोलनाच्या विरूढा साठी काय केल ते पहिले सांगा ? टाइम्स नाउ ने जितक कवरेज दिल तास इतर कोणीच दिल नाही !!!

In reply to by मराठी_माणूस

रोज वाचतो ! तुम्ही पण टाइम्स नाउ चे मागील तीन महिन्याचे रेकॉर्डिंग कुठूनही शोधून बघा मग वाद घालू या :)

तिमा Fri, 06/24/2011 - 13:51
'सज्ञान' या शब्दाची कायद्याने व्याख्या काहीही असली तरी बहुतांशी लोक हे वयाच्या पन्नाशीनंतरच जीवनाचा जरा गंभीरपणे विचार करु लागतात. या जगरहाटीचे ज्ञान साधारण साठीपर्यंत दृष्टीपथात येते आणि आपण गतायुष्यात केलेल्या चुका जाणवू लागतात. आणि संपूर्ण ज्ञान? ते बहुतेक मेल्यानंतरच मिळत असावे.

In reply to by नितिन थत्ते

छोटा डॉन Fri, 06/24/2011 - 16:51
अरेरेरे ... राष्ट्रपिता पुज्य बापुजींच्या ह्या देशात चक्क २५ नंतर मद्यपानाला परवानगी मिळते हे पाहुन जीव इवला इवला झाला. खरेतर सरकारने वर्धा जिल्हा आणि काही अंशी गुजराथचाचा आदर्श घेऊन मद्यसंस्कृतीचे समुळ उच्चाटन करण्यासाठी संपुर्ण मद्यबंदी घालायला हवी. २५ नंतरची पिढी कायद्यानुसार मद्यपान करताना पाहुन पुज्य बापुजींच्या आत्म्याला किती यातना होत असतील. आख्ख्या देशात त्वरित 'मद्यपान बंदी' जाहिर करावी अशी मागणी मी करतो - छोटा डॉन

In reply to by मराठी_माणूस

टिळकांना पण सुपारीच व्यसन होतं म्हणतात. (वयाच्या कितव्या वर्षीपासून ते माहिती नाही.) सगळी बामण व्यसनी. च्यायला !!

गवि Fri, 06/24/2011 - 15:27
पिईनात का १८ व्या वर्षीपासून.. बाकी पिऊन गोंधळ घालणे, बेफाम गाडी हाकणे याबाबतीत सर्व वयोगटांना सारखे कायदे आणि शिक्षा आहेत ना? मग झालं तर..

बहुगुणी Fri, 06/24/2011 - 20:15
..........नाशिक-पुणे रोडवरील चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या म्हणजे मद्यपींसाठी दारूचे बारच झाले आहेत. हॉटेल द्वारकासमोर उभ्या राहणाऱ्या गाड्यांवर चायनीज खाण्याच्या निमित्ताने थांबणारे रिक्षावाले, ट्रक ड्रायव्हर राजरोस मद्यपान करताना दिसतात. तसेच अशोका रोड, नेहरूनगर, आंबेडकरनगर, उपनगर, बिटको कॉलेजसमोरील चायनीज गाड्या पाहून तर 'बार गल्ली'च निर्माण झाल्याचा भास निर्माण होतो. चायनीज खाण्याचे निमित्त करून केवळ मद्यपान करण्यासाठी स्वत:च दारू घेऊन येणारे अनेक जण तर आहेतच. पण, ज्यांच्याकडे दारू नाही त्यांची खास सोयही चायनीज गाडीवाल्यांनी आधीपासूनच करून ठेवलेली असते. बारमध्ये जाऊन दारू पिणे परवडत नसल्याने व कोणी ओळखीचे भेटण्याची शक्यता कमी असल्याने २५ वर्षाच्या आतील तरुणही बिनधास्तपणे या गाड्यांवर दारू पिताना आढळतात. ............

In reply to by बहुगुणी

विकास Fri, 06/24/2011 - 23:35
बारमध्ये जाऊन दारू पिणे परवडत नसल्याने व कोणी ओळखीचे भेटण्याची शक्यता कमी असल्याने २५ वर्षाच्या आतील तरुणही बिनधास्तपणे या गाड्यांवर दारू पिताना आढळतात. ............ अनेक वर्षांपुर्वी एका गुजराथेतील गुजराथी मित्राकडून ऐकलेला किस्सा - गांधीजींचे राज्य म्हणून कायम दारूबंदी. मग काय करायचे तर धाबा अथव लहानसहान हॉटेलात जाऊन "हाफ ग्लास थम्स अप" मागायचे. आणि हॉटेलवाला ऑप्टिमिस्ट असल्याने उरलेला अर्धा ग्लास तो कधीच रिकामा देऊ शकायचा नाही! मग त्यात काहीतरी अल्कोहोलीक पेय भरले जायचे. थोडक्यात आधी घरच्या पित्याकडे पाठ मग राष्ट्रपित्याकडे.... बाकी असलाच अजून एक न कळलेला प्रकार म्हणजे, महाराष्ट्र दिनाला दारू विक्रीवर असलेली बंदी.

विकास Fri, 06/24/2011 - 20:26
सध्या अमेरीकेत एक अशाच वयाच्या अटीवरून चर्चा चालू आहे. सोशल नेटवर्कींग साईट्स (फेसबुक वगैरे) आणि मला वाटते कुठल्याही ऑनलाईन साईट रजिस्ट्रेशनसाठी स्वतःहून जाण्यासाठी किमान १३ वर्ष वय असले पाहीजे असा इथला सरकारी नियम आहे. त्याआधी जायचे असेल तर पालकांची परवानगी लागते असे देखील नियम सांगतो. फेसबुकला ते १३ वरून ११ वर का असेच काहीसे खाली आणायचे आहे! रेडीओवर यासंदर्भातील चर्चा ऐकत असताना जे अनुभव ऐकले त्याप्रमाणे काही शाळकरी मुलांनी फेसबुकचे खाते उघडले आणि जालावर मैत्री करायला लागल्यावर, तात्काळ त्यांना कोणीतरी फोटो पाठवा म्हणून मागणी केली! थोडक्यात हे प्रकरण गंभीर होऊ शकते आणि त्याचे परीणाम हे त्या मुला/मुलीच्या आयुष्यावर कायमस्वरूपी होऊ शकतात. मग येथे उलट मुद्दा आला होता. जर मतदानासाठी १८ वर्षापर्यंत थांबावे लागते तर जालावर १३ वर्षाचीच मर्यादा का? एका मानसोपचार तज्ञाने म्हणले की वास्तवीक जालावरील गंभिरप्रसंगांची शक्याशक्यता कळण्याची मॅच्युरीटी येण्यासाठी कदाचीत २० वर्षापर्यंत थांबणे पण योग्य ठरेल. पण तो पुढे असे देखील म्हणाला की हे सगळेच रँडम नंबर्स आहेत....क्रेग्जलिस्टवर (जी वास्तवीक सोशल नेटवर्कींग साईट नाही आहे) मुलीशी ओळख होऊन तिला मारण्याचे उद्योगही येथे विकृत गुन्हेगाराने केले आहेत. आपल्या सरकारने असा २५ वर्षाचा निर्णय का घेतला असावा? (मला माहीत नाही, पण) कदाचीत त्याचे कारण तरूणांच्या हातात असलेली वाहाने आणि त्यातून झालेले अपघात/मृत्यू आणि इतर काही संभाव्य गुन्हे हे असावे. त्याचा विदा देखील सरकारकडे असू शकेल पण निर्णय कसा आणि का घेतला हे कदाचीत "नॅशनल सिक्रेट" समजून "गोपनिय" ठेवले गेले असावे... टाईम्सला जर यावर लिहायचेच असेल तर ते चर्चा म्हणून घडवून आणावे असे वाटते. आणि तसे करत असताना लोकशिक्षण होऊ शकेल असा स्वतःच्या माध्यमाचा उपयोग करून द्यावा असे वाटते. अनिर्बंध वागणे आणि वाहनांचा गैरवापर ह्यावर आळा घालण्यासाठी, सरकारने जसे ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी (१ जानेवारीच्या पहाटेसाठी) मुंबई आणि इतर शहरात आधीपासूनच काळजी घेणारे निर्णय आणि कडक अंमलबजावणीची धमकी जाहीर केली तसे काहीसे सतत करावे. शेवटी नशा ही दारूपेक्षा पिणार्‍याच्या डोक्यात जास्त असते अस वाटते.

ऋषिकेश Fri, 06/24/2011 - 23:06
सरकारचा कायदा योग्य की अयोग्य हा निश्चितच वादाचा मुद्दा आहे. मी २५ वर्षांपेक्षा मोठा असल्याने वैयक्तिक रित्या मी मद्य पित असलो/नसलो तरी या कायद्याने मला फरक पडणार नाही. मात्र हे २५ कोणत्या आधारावर काढले हा प्रश्न उरतोच व त्याबद्दल वृत्तपत्रातून आवाज उठला तर ते योग्यच आहे. मात्र हा आवाज वृत्तपत्रातून लोकांनी उठवण्यापेक्षा वृत्तपत्राकडूनच समाजात स्वाभाविक रित्या उमटलेल्या प्रतिक्रीयेपेक्षा अधिक चढ्या आवाजात उठवला जात आहे असे मला वाटते. एरवी भारतात किती राजकीय प्रश्नांवर वृत्तसमुह 'चळवळ' उभी करताना दिसतात? भारतात याहून गंभीर प्रश्न असूनही हा 'अ‍ॅक्टिविजम' फक्त याच कायद्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात का पेक्षा कसा काय बॉ? असा प्रश्न मला पडला आहे. मद्यकंपन्यांकडे भरपूर पैसा आहे आणि कोणताही वृत्तसमुह (इतर अनेक व्यवसायांप्रमाणे) पैशावरच चालतो इतके लक्षात घेतले तर हीच चळवळ इतक्या मोठ्या प्रमाणार का उघडली गेली आहे त्याचा अंदाज यावा.

In reply to by ऋषिकेश

विकास Fri, 06/24/2011 - 23:29
एरवी भारतात किती राजकीय प्रश्नांवर वृत्तसमुह 'चळवळ' उभी करताना दिसतात? भारतात याहून गंभीर प्रश्न असूनही हा 'अ‍ॅक्टिविजम' फक्त याच कायद्या विरोधात इतक्या मोठ्या प्रमाणात का पेक्षा कसा काय बॉ? काही काय? ;) असा कसा काय प्रश्न पडतो तुम्हाला? म्हणून म्हणतो दै. प्रहार वाचावा! किमान संस्थळावर काय चालले आहे त्याच्या तरी बातम्या कळतील... ;) (हा प्रश्न उपरोधीक आहे आणि तो तुम्हाला उद्देशून नाही हेवेसानल) :-)

In reply to by ऋषिकेश

मटासारख्या मराठी पत्राच्या हेतूवर संशय घेतल्याबद्दल ऋषिकेश यांचा निषेध. मागे मटाने रेज युवर व्हाईस या आंदोलनाअंतर्गत भ्रष्टाचार, बालगुन्हेगारी इ अनेक विषयांबद्द्ल विपुल लेखन केलेले असताना तुम्ही असा संशय घेऊच कसा शकता. *हलकेच घेणे*

In reply to by ऋषिकेश

नितिन थत्ते Sat, 06/25/2011 - 12:38
काहीही अपेक्षा बुवा तुमच्या !!!!! मटा हे आता नुसते "मित्र" नसून "स्मार्ट मित्र" आहे हे ठाऊक नाही काय? स्मार्ट मित्राला दारू हवीच. :)

रामपुरी Sat, 06/25/2011 - 01:26
या चळवळीसाठी टाईम्सला पैसा कोण देत असेल याची उत्सुकता लागून राहीली आहे. कारण जो ग्रुप नाकाचा शेंबूडपण फुकट देणार नाही तो एवढ्या जाहीराती कश्या काय छापतोय?

चतुरंग Sat, 06/25/2011 - 05:46
भारताच्या सध्याच्या लोकसंख्येतील ५०% लोक हे २५ वर्षाखालील आहेत! http://en.wikipedia.org/wiki/Demographics_of_India दारुचा दिवसेंदिवस वाढता खप बघता २५ वर्षे हे पिण्याचे वय केले तर १८ ते २५ मधल्या केवढ्यातरी मोठ्या संभाव्य पिणार्‍यांना दारु कंपन्यांना मुकावे लागेल आणि अब्जावधी रुपयांची उलाढाल असलेल्या या कंपन्या एवढ नुकसान होत असताना गप्प कशा बसतील? उघड उघड दारुची जाहिरात केली तर ते अंगावर येईल त्यामुळे अशा स्वरुपाची सैन्यातली भरती वगैरे भावनिक मुद्दे पुढे करुन त्यामागे दारु विक्री कायम रहावी असा छुपा उद्देश ठेवून जाहिरात केली आहे! यांचे बोलविते धनी म्हणजे दारु कंपन्या आहेत हे कोणीही सांगू शकेल! वय १८ असावे की २५ वगैरे चालूच राहील. तसेही नेमके सामाजिक जबाबदारीचे भान कधी येते हा वादाचा मुद्दा ठरु शकेल. दारु पिऊन गुन्हे करणार्‍यांना मात्र कडक शासन असणे आणि अंमलबजावणी होणे महत्त्वाचे. -रंगा

सर्वसाक्षी Sat, 06/25/2011 - 10:31
मतप्रदर्शनाबद्दल सर्वांचे आभार. मात्र मूळ मुद्दा भरकटला आहे. कायदा योग्य की नाही हा मुद्दा नव्हता. मटा ला आपले मतप्रदर्शन करायचा व त्यांना पटेल त्या मताला पाठिंबा देण्याचा पूर्ण अधिकार आहे व त्याविषयी माझी हरकत नव्हतीच, माझा अक्षेप होता तो प्रसारमाध्यमातील नामांकित वर्तमानपत्राने मद्यपानोत्सुकांची तुलना सैन्यप्रवेशाचे ध्येय असलेल्या तरुणांशी करण्याला. श्री. चतुरंग यांनी व्यक्त केलेल्या अनुमानाविषयी पूर्ण सहमती. १८ ते २५ हा मद्यनिर्मात्यांसाठी महत्वाचा गट. हा वयोगट म्हणजे महाविद्यालयीन युवक ज्यांना किशोरवयापासून अनेक गोष्टींचे आकर्षण असते (उदा. मद्यपान )आणि आता स्वातंत्र्य व हाती येणारा पैसा तसेच समवयिन, सहविद्यार्थी यांचा आग्रह यामुळे हा वर्ग मद्यनिर्मात्यांसाठी महत्वाचा. २१-२५ म्हणजे नुकतेच नोकरीला लागलेले तरुण. सुस्थितील युवकांना या काळात संसार, घर चालविणे वगैरे बंधने नसतात, लग्नही झालेले नसते व पालक त्यांचा पैसा त्याना साठवायला सांगतात, घरखर्चाला पैसा घेत नाहीत. अर्थातच प्रलोभन, पैसा व संधी हे तिन्ही हजर असते व अर्थातच मद्यनिर्मात्यांच्या दृष्टीने हा वर्ग महत्वाचा. शिवाय नवी उत्पादने नवे नाव हे अगोदरच आपली निवड ठरविलेल्या ग्राहकांपेक्षा या नवग्राहकांना विकणे सुलभ असते. आणखी एक असे, की भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाला जसा जनाधार दिसला तसा प्रत्यक्ष जनतेचा खास विरोध दिसत नाही; किंबहुना मटा ने गाजावाजा करेपर्यंत हे कुणाला माहितसुद्धा नसावे. इतर वर्तमानपत्रात असा सूर दिसला नाही. तेव्हा मटा चे हे प्रकरण 'प्रायोजित' असण्याची शक्यता दिसते.

In reply to by सर्वसाक्षी

मद्यपानोत्सुकांची तुलना सैन्यप्रवेशाचे ध्येय असलेल्या तरुणांशी करण्याला.
हिंसा करण्यापेक्षा मद्यपान करणे वाईट का समजावे? सैन्य फक्त हिंसाच करते असं अजिबात नाही. देशाचं संरक्षण महत्त्वाचं आहेच आहे, शिवाय सैन्याने बांधलेले पूल, रस्ते, नैसर्गिक आपत्तींमधे सामान्य नागरीकांचं संरक्षण या सर्व गोष्टींसाठी सैनिकांबद्दल आदर आहेच; पण सैन्य हे लढाईसाठीच मुख्यत्त्वे आहे हा मुद्दा विसरता येत नाही. उगाचच "मायबाप" बनू पहाणार्‍या सरकारचा निषेध! अवांतरः अमेरिकेतल्या वास्तव्यात वॉर व्हेटरन्सना मदत करा म्हणून फोन आल्यावर तोंडात आलेलं वाक्य गिळलं, "व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तानात जाऊन बेछूट हिंसा करायला मी सांगितलं होतं का रे $%^&* ?"

रणजित चितळे Sat, 06/25/2011 - 12:34
माझ्या लहानपणी '१९७१ चे अभिमन्यू' हे पुस्तक वाचनात आले होते. त्यामध्ये ७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात हौतात्म्य लाभलेल्या कॅप्टन प्रकाश पेठे, मेजर रमेश दडकर, फ्लाईत लेफ्टनंट किशोर भडभडे इत्यादींच्या शौर्यकथा होत्या. पैकी एका सुपुत्राची अशी हकिकत सांगितली होती, की जेव्हा त्याच्यावर अपेंडीक्सची शस्त्रक्रिया करायचा प्रसंग आला तेव्हा त्याने डॉक्टरना सांगितले की जर जखम दिड इंचाहुन मोठी असेल तर सैन्यात प्रवेश मिळत नाही, त्यामुळे अधिक त्रास झाला तरी लहान छेद घेउनच शस्त्रक्रिया केली जावी. देशासाठी बलिदान करायचे ध्येय बालपणापासूनच उराशी बाळगणार्‍या अनेक हुतात्म्यांविषयी ऐकले आपण सु ग शेवड्यांची आठवण करुन दिलीत. मस्त असायची त्यांची प्रवचने.