मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राज ठाकरे हे नाही करू शकले !

यकु · · काथ्याकूट
राज ठाकरेंचा म.न.से. नुकताच स्थापन झाला होता आणि त्यांची मारा-ठोका छाप भाषणे गाजत होती. पुढे त्यांना अटक झाली - म्हणजे अटकेची एक मोठी मालिकाच सुरु झाली. रस्त्यावरुन जात असताना इथं, औरंगाबादला एक केवीलवाणे चित्र मला दिसले. ठाकरेंचे चार-दोन समर्थक (यापैकी एक म.न.से.कडून पदवीधर मतदार संघाची निवडणुक लढताना पडून आता शिवसेनावासी) रस्त्यावर उतरले होते आणि पोलीस त्यांना गाडीत कोंबत होते. राज ठाकरेंची भाषणे ऎकायला लोक जमत असतील, पण त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर फक्त चार-दोन पदाधिकारी आणि कार्यकर्तेच उतरले होते. राज ठाकरे यांच्या भाषणातील थेट मुद्दे, महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट इ.इ. मुळे हा माणूस काहीतरी वेगळे करणार असे चित्र निर्माण झाले होते - आजही आहे. मोठ-मोठे विचारवंत लोक त्यांना समर्थन देत होते. मी राज ठाकरेंच्याच काय पण कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नव्हतो, आजही नाही. पण मला मोठी आशा वाटत होती. पण अमुक एका पक्षाचा कार्यकर्ता व्हायचे म्हणजे नेमके काय करायचे? साहेब आले की घोषणा द्यायच्या, साहेब गेले की सतरंज्या उचलायच्या - त्यांच्या वाढदिवसाला रक्तदान करायचे, कुठेतरी वह्या-पुस्तकं वाटायची, प्रचाराच्या वेळी प्रचार करायचा, आंदोलनाच्या वेळी आंदोलने करायची ही काही फार निकडीची आणि सदा-सर्वकाळ-सगळीकडे चालणारी कामे नाहीत. पण कार्यकर्ते ती करीत असतात. ही कामे कार्यकर्त्यापुरती आणि त्या-त्या घटनेपुरतीच मर्यादीत राहातात. त्यातून लोकांनाही काही मिळत नाही आणि कार्यकर्त्यालाही कामाचे केल्याचे समाधान होत नाही. विचार केला आणि तो कागदावर लिहुन काढला. म.न.से.ने स्विकारलेली भूमिका शहरांपुरतीच मर्यादीत आहे आणि महाराष्ट्रात खेडी, अर्धशहरी गावेही आहेत. त्यांच्यासाठी काही ठोस हवे. नवनिर्माणच करायचेय तर तो दररोज आणि महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालणारा कार्यक्रम पाहीजे. गावात ग्रामपंचायत, क्रुषी उत्पन्न बाजार समित्या, पोलीस ठाणी, शहरात महानगरपालिका, बसथांबे, न्यायालये, विमानतळे, बाजारपेठा, आर.टी.ओ. कार्यालये इत्यादी ठिकाणी नडलेल्या जनतेला दररोज मदत करण्यासाठी कार्यकर्ते का नसावेत? कार्यच करायचेय, नवनिर्माणच करायचेय तर त्याला इथे तिन्ही त्रिकाळ अमाप वाव आहे. उदाहरणार्थ म.न.से. चा कार्यकर्ता असणारा एक वकील आहे. तो रोज न्यायालयात जातो. त्याला म.न.से. नियुक्त, जनतेसाठी कधीही उपलब्ध असणारा वकील म्हणून घोषीत करा. त्या-त्या विषयाचे ज्ञान असलेले तुमचे लोक ठिक-ठिकाणी द्या. अनेकप्रकारचे ज्ञान असलेली कार्यकर्तेमंडळी तुमच्याकडे आहेत - करा त्यांना लोकार्पित. अशी भूमिका तुम्ही पक्षाचे धोरण म्हणून मुंबईतून जाहीर करा. असा काहीसा आशय असणारे पत्र मी राज ठाकरे यांना लिहीले. असली हजारो पत्रे त्यांना येत असतील - अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाहीच. सुभेदारीवर एकदा राज ठाकरे आले असताना मी त्यांना वरील आशयाचे पत्र समक्षच द्यायचे असे ठरवून भेटायला गेलो. अगदी सकाळी सात वाजताच. तीन-चार तास वाट पाहिल्यावर कळले की "साहेब भाषणापूर्वी कुणाशीही बोलत नाहीत, जे काय असेल भाषण संपल्यावर बोला किंवा लिहुन आणलं असेल तर देऊन जा..." मी आता कंटाळलो होतो. श्री. मनोज हाटे नावाच्या मुंबईहुन त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिका-याला बोललो. त्यांनी पत्र वाचले आणि साहेबांच्या रुममध्ये निघुन गेले. दहा-पंधरा मिनिटांनंतर परत आले. "काय करता आपण?" पदाधिकारी "अमुक-तमुक पेपरमध्ये काम करतो" "अरे वा! किती आहे तुमच्या पेपरचं वितरण?" "भरपुर असेल...नक्की आकडा माहीत नाही.." "बरं, तुम्ही आमच्यासोबत मुंबईला याल का?" "मी नोकरी करतो, मी तिथं येऊन काय करू, तुम्ही पत्रात विनंती केलीय ते करा, फार बरे होईल..." "आम्ही निश्चित त्यावर विचार करू....खरंच हे व्हायला पाहीजे" "मुंबईला याल का?" या त्याप्रश्नामागचा त्यांचा अभिप्राय फक्त एवढाच की "काय कमाल केली यार तु हे पत्र लिहुन? चल आता मुंबईला आमच्या सोबत...! आणि जा घरी परत आणि सांगत सुट सगळ्यांना "मला मुंबईला बोलावलं आहे म्हणून..." पण हे झाल्यावरही मला राहवेना. यावर दोन वर्षे उलटली. काहीही झाले नाही. पुन्हा एकदा ते इथे आले. आता मात्र काही झाले तरी समक्षच, राज ठाकरेंच्याच हातात पत्र द्यायचे असे ठरवले. पूर्वीसारखीच कार्यकर्त्यांची, बघ्यांची ही हुल्लड, ढकला-ढकली. ते थांबलेल्या ठिकाणी कसातरी आत घुसलो. मिडियाचे काही लोकही पाठोपाठ आले. यांचं आता सुरु होणार म्हणुन मी पटकन पुढे होऊन सोबत आणलेले पत्र राज ठाकरे यांच्या हातात ठेवले. ते त्यांनी वाचले. पुन्हा एकदा वाचुन काढले. समोर उभ्या असलेल्या कुणाला तरी (बहुतेक श्री. बाळा नांदगावकर) उद्देशून वाचलेले पत्र त्यांच्याकडे देत देत ते म्हणाले - "बघा जरा काय करता येईल ते" मला फार बरे वाटले. मी तिथेच थांबून राहीलो. मग मिडियावाल्यांनी राज साहेबांची पाच-दहा मिनिटांत मुलाखत घेतली. राज ठाकरे यांच्यावर पीएच.डी. करणा-या विद्यार्थ्याने स्वत:बद्दल थोडक्यात माहिती सांगुन त्यांचे आशिर्वाद घेतले. पत्रकार परिषद दुसरीकडे होणार होती, त्यासाठी साहेब निघाले. तेवढ्यात तो पीएच.डी.वाला त्यांना काहीतरी म्हणाला. त्यांना वाटले मीच बोलतोय. ते म्हणाले, "कळ्ळयं मला...आलं माझ्या लक्षात" मी म्हणालो - "मी नाही बोललो..हे (पीएच.डी.वाले) बोलले.." मी तिथून बाहेर पडलो. आज ३-४ वर्षे झाली. त्यांना काय कळले आणि त्यांनी का काही केले नाही रामजाणे घनश्यामबापू* ! [रामजाणे घनश्यामबापू* - हा फक्त आमच्याच गावात चालणारा वाक्यप्रचार आहे. कुणाला कशातले काही कळले नाही तर घनश्यामबापू नावाच्या (वारले आता ते) एका जख्ख म्हाता-या बाबांना ते नक्कीच ते कळते असा त्याचा अर्थ] राजसाहेबांना दिलेले पत्र
ही जुनी गोष्ट. राज साहेबांचे लोक अनेक कामे करीत असतील; आहेत. पण वरील बाबतीत आपणास काय वाटते? अजूनही वरील बाबतीत मला काही तरी सकारात्मक घडण्याची अपेक्षा आहे. आपण काय करू शकतो? आधी चर्चा तर करून पाहु नुसती.

वाचने 13489 वाचनखूण प्रतिक्रिया 32

In reply to by वेताळ

चिरोटा Mon, 11/08/2010 - 11:54
काही क्षेत्रात हे करता येवू शकेल्.अर्धवेळ काम करणारे कार्यकर्ते वगैरे. पण (राडा न करता) अशी कामे करून घेण्यासाठी सरकारी दप्तरी वट असणारे लोक पाहिजेत.

In reply to by वेताळ

यकु Mon, 11/08/2010 - 11:55
फटक्यात काम होत असेल तर अर्थातच जनता आर्थिक प्रश्न सोडवणार! सध्या जनताच देणग्या देतेय ना? मग खरेच काम करणार्‍या कार्यकर्त्यांना लोक वार्‍यावर सोडतील? आणि सध्या पूर्णवेळ काम हातात नसणारेच मला वाटतं कार्यकर्ते होतात. पुन्हा निवडणुकीच्या वेळेस गुडवील वेगळेच!

वेताळ Mon, 11/08/2010 - 11:59
त्यामुळे असे न होता सरकारी अधिकार्‍याना जरब बसेल असे काहीतरी करावे म्हणजे कामे लवकर होतील. अगोदरचा भारतातील भ्रष्टाचारामुळे भारताचे बाहेर नाव खराब होत आहे,त्याबद्दल नाना देखिल चिंतीत आहेत. त्यामुळे ह्यावर नानांचे काय म्हणणे आहे ते समजणे गरजेचे आहे.

In reply to by वेताळ

यकु Mon, 11/08/2010 - 12:04
नाही. नवनिर्माण दाखवावं लागेल ना लोकांना. खायखाय करणार नाहीत कार्यकर्ते, असे म.न.से. च्या आजपर्यंतच्या वाटचालीवरून वाटते. चालेल, नानांची वाट पाहू.

चिरोटा Mon, 11/08/2010 - 12:25
बेंगळूर शहरात प्रत्येक उपनगरात bangalore one नावाची सेंटर्स आहेत. ह्या ठिकाणी वीज्/टेलिफोन्/पास्पोर्ट्/रेशन/घरासंबंधित वगैरे सर्व कामे केली जातात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे काही असले तर बरेच प्रश्न सुटु शकतील्.अर्थात हे bangalore one मधून शहरी लोकांचे प्रश्न सुटतात. शहर्/जिल्हा/तालुका पातळीवर लोकांना भेडसावणारे प्रश्न वेगवेगळे असतात. शिवाय ही सरकारी केंद्रे आहेत. सरकारी मदतीशिवाय अशी यंत्रणा राबवायची म्हणजे खूपच आर्थिक बळ पाहिजे.

१. हा हा हा. राजकारणी जनतेचे चाकर असतात वगैरे म्हणणे आणि त्यावर कोणी विश्वास ठेवणे हा निव्वळ मूर्खपणा आहे असे वाटते. राज काय कोणी महाराज तिथे आला तरी काही करू शकणार नाही. २. राहीला प्रश्न चिरीमिरीचा. मी तर असे अनेक लोक पाहीले आहेत जे थोडेसे परत घरी जायचे कष्ट टाळण्यासाठी पैसे देऊन काम करू पाहतात. सरकारी कार्यालयात नीट माहीती मिळण्याची सुविधा असतानाही अर्धवट माहितीनुसार अपूर्ण कागदपत्रे घेऊन येतात आणि पैसे देऊन काम करू घेऊ पाहतात. ३. राज ठाकरे मनसे नावाचा पक्ष चालवतो त्यामुळे त्याने तसे मनसैनिक ठेवावेत असे वाटत नाही. गरज लागलीच तर मुजोर सरकारी अधिकार्‍याना हिसका दाखवावा. असे पूर्णवेळ मनसैनिक ठेवणे वगैरे चुकीचेच आहे. जनता तरी आधी नीट माहीती घेऊन मग काम करून घेण्यास यायला शिकणार कधी? असा प्रकार मनसेच काय इतर कोणत्याही पक्षाने करू नये.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु Mon, 11/08/2010 - 12:57
जनता तरी आधी नीट माहीती घेऊन मग काम करून घेण्यास यायला शिकणार कधी? असा प्रकार मनसेच काय इतर कोणत्याही पक्षाने करू नये.
कुठे असते हो ही जनता? मी जनता आहे - तुम्ही जनता आहात. तुम्हाला सगळीच माहीती दिसतेय; पण नकारार्थी. असं काही कुणीच करू नये म्हणताय मग प्रश्न मिटला. मग पुन्हा सगळ्यांचीच नितीमत्ता ढासळली म्हणून खडे फोडण्यातही काही अर्थ नाही. जनता गां* है असं म्हणू का मी?

In reply to by यकु

जनता गां* है असं म्हणू का मी? नक्कीच. पासपोर्ट, रेशनिंग कार्ड या विभागातील माहीती व्यवस्थित उपलब्ध असतानाही विनाकारण एजंटाला पैसे देऊन या गोष्टी करून घेणारे लोक पाहीले आहेत मी. वस्तुतः या सगळ्या गोष्टी नीट माहीती वाचून गेल्यास सहज करता येण्यासारख्या असतात. आणि गरज पडलीच तर अशी माहीती नेटावरही सहज मिळू शकते. गरज पडलीच तर अशा अनेक प्रकारांची माहीती स्थानिक नगरसेवक अथवा थोडेफार सरकारी कामांशी संलग्न असलेले लोक पुरवतात. टेलिफोन, विद्युत मंडळ, रेशनिंग ऑफिस इथे तरी मला असे अडवणूक करणारे लोक भेटले नाहीत. याला हवं तर निगेटीव्ह म्हणा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु Mon, 11/08/2010 - 13:34
मलाही अडवणुक करणारे कुठेच भेटले नाहीत. ईएसआयसीचं एक चाळीस हजारांचं माझं बील होतं. शासनाकडून छदामही मिळणार नाही असं आमच्या अ‍ॅडमीनमधून मला सांगितलं गेलं. इएसायसीची इन्स्टॉल्मेंट मात्र दर महिन्याला कपात होत होती. मी कुठल्यातरी बोळात चालणार्‍या इएसायसी केंद्रातून घुसत गेलो आणि इएसायसी संचालिकेच्या केबीनमध्ये निघालो. त्यांनी झालेला आजारच मंजूर आजाराच्या लिस्टमध्ये बसत नाही म्हणून प्रकरण नाकारले. आरोग्यमंत्र्यांनी बसवले सगळे बरोबर. मध्येच अनेक बोकेही भेटले - अजूनही फोन करतात त्या सहाव्या मजल्यावरचे कारकून. शासकिय नियमाप्रमाणं तीस हजार मिळाले. या सगळ्या प्रक्रियेत कुणाला एक पैसाही दिला नाही आणि कुठलीच वट पण वापरली नाही. फक्त दीड वर्ष गेलं यात. आता अ‍ॅडमीनवाले इएसायसीच्या केसेसवाल्या लोकांना "त्याला जाऊन विचारा" म्हणून माझ्याकडे पाठ्वतात. इथून पुढे गां* वर लाथ मारतो कुणी काही विचारायला आलं तर. जनता हुशार झाली पाहिजे नाही का?

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु Mon, 11/08/2010 - 13:34
मलाही अडवणुक करणारे कुठेच भेटले नाहीत. ईएसआयसीचं एक चाळीस हजारांचं माझं बील होतं. शासनाकडून छदामही मिळणार नाही असं आमच्या अ‍ॅडमीनमधून मला सांगितलं गेलं. इएसायसीची इन्स्टॉल्मेंट मात्र दर महिन्याला कपात होत होती. मी कुठल्यातरी बोळात चालणार्‍या इएसायसी केंद्रातून घुसत गेलो आणि इएसायसी संचालिकेच्या केबीनमध्ये निघालो. त्यांनी झालेला आजारच मंजूर आजाराच्या लिस्टमध्ये बसत नाही म्हणून प्रकरण नाकारले. आरोग्यमंत्र्यांनी बसवले सगळे बरोबर. मध्येच अनेक बोकेही भेटले - अजूनही फोन करतात त्या सहाव्या मजल्यावरचे कारकून. शासकिय नियमाप्रमाणं तीस हजार मिळाले. या सगळ्या प्रक्रियेत कुणाला एक पैसाही दिला नाही आणि कुठलीच वट पण वापरली नाही. फक्त दीड वर्ष गेलं यात. आता अ‍ॅडमीनवाले इएसायसीच्या केसेसवाल्या लोकांना "त्याला जाऊन विचारा" म्हणून माझ्याकडे पाठ्वतात. इथून पुढे गां* वर लाथ मारतो कुणी काही विचारायला आलं तर. जनता हुशार झाली पाहिजे नाही का?

In reply to by यकु

इथून पुढे गां* वर लाथ मारतो कुणी काही विचारायला आलं तर. जनता हुशार झाली पाहिजे नाही का? तुमची मर्जी. आम्ही केलेल्या सरकारी कामाप्रमाणे कोणी इतर त्याच कामासाठी मार्गदर्शन घ्यायला आले तर आम्ही ते फुकटात करतो (पैसे घेऊन करतात ते एजंट, म्हणजे फुकटचे पैसे काढणारे ). व ते लोकही त्यांच्याकडे आलेल्याना मार्गदर्शन करतात. यालाच जनता हुशार होणे म्हणतात. कोणत्या राजकीय पक्षाने त्यासाठी लोक ठेवावेत असे वाटत नाही. ठेवलेच तर ठीक, नाही ठेवले तर अमुक पक्षाने हे केले नाही म्हणून त्यावर लेख लिहीणार नाही. मनसेचे कार्यकर्ते असलेले एक मिपासदस्य यानी अशा एजंटांवर आरटीओ मधे बंदी घालावी म्हणून केलेल्या आंदोलनाची आठवण झाली. असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु Mon, 11/08/2010 - 19:27
कोणत्या राजकीय पक्षाने त्यासाठी लोक ठेवावेत असे वाटत नाही. ठेवलेच तर ठीक, नाही ठेवले तर अमुक पक्षाने हे केले नाही म्हणून त्यावर लेख लिहीणार नाही.
हेच नेमकं म्हणतोय मी. सुरूवातीला तुम्ही तीन वेळेस नाही म्हणालात आता ओझरते का होईना ठेवलेच तर ठिक म्हणताय... ये क्या है पुपे.. ? आणि लेखाचं वगैरे जाऊ द्या. आम्हाला त्या तुमच्या मोडी-फारसी भाषेतले लेख (शिलालेख? ) वाचताही येणार नाहीत. ;-)

In reply to by यकु

हेच नेमकं म्हणतोय मी. नाही नेमकं 'हेच ' म्हणत नाहीयात तुम्ही. तुम्ही सरळ सरळ म्हणता आहात की मनसेने तसे करावे. तसे करण्याबाबत तुम्ही राजला पत्रही दिले होतेत असे दिसते. याउलट मी म्हणतो आहे हे काम लोकांनी स्वतःहून करायला पाहीजे जसे मी एक सरकारी काम विनासायास केले असेल आणि तेच काम इतर कोणी पैसे देऊन करवतो आहे हे कळले तर उगाच पैसे न देता काम कसे करावे हे मी त्याला सांगावे. यासाठी वेगळी माणसे ठेवायची गरज नाही. विशेषतः 'मनसेने' आणि ते ही 'वचक' ठेवायला. किंवा अन्य कोणत्याही राजकीय पक्षानेही असे करण्याची गरज नाही. त्यामुळे अशी निवेदने कोणी दिली तर त्या त्या राजकीय पक्षांनी त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली तर त्यात काही गैर नाही. समजा एखाद्या ठीकाणी अधिकारी मदत करत नाहीयेत अगदी खालपासून वरपर्यंत आणि अशा वेळेला तक्रार केली राजकीय पक्षाकडे आणि आंदोलन करविले तर ते योग्य आहे. आता ओझरते का होईना ठेवलेच तर ठिक म्हणताय... नाही ओझरते ठीक नाही म्हणत आहे. जर कोणी असे सुरू केले तर लोकांनी सूज्ञ अहोण्यासाठी ते बंद करा असे मी म्हणणार नाही हा अर्थ आहे त्याचा. आणि लेखाचं वगैरे जाऊ द्या. आम्हाला त्या तुमच्या मोडी-फारसी भाषेतले लेख (शिलालेख? ) वाचताही येणार नाहीत. मोडी ही लिपी आहे. फारसी ही भाषा आहे. असो. बाकी हा सदर लेखाचा विषय नसल्याने त्याबद्दल माहीती हवी असल्यास दुसरा धागा काढावा.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

यकु Tue, 11/09/2010 - 15:11
त्यामुळे अशी निवेदने कोणी दिली तर त्या त्या राजकीय पक्षांनी त्या निवेदनांना केराची टोपली दाखवली तर त्यात काही गैर नाही.
धन्यवाद हे सांगितल्याबद्दल! माझा ब्लॉग सुध्दा मी केराची टोपली म्हणून वापरतो. त्या डस्टबीनमधूनच हे जुने कागद काढून इथे टाकले होते. केरातील कागद वाचूनही गैर-योग्य यातला फरक सांगितल्याबद्दल पुन्हा आभार!

In reply to by llपुण्याचे पेशवेll

चिरोटा Mon, 11/08/2010 - 12:59
जनता तरी आधी नीट माहीती घेऊन मग काम करून घेण्यास यायला शिकणार कधी?
सरकारी कार्यालयात गेल्यावर अर्धवट उत्तरे देणे ,दुर्लक्ष करणे हा बर्‍याच अधिकार्‍यांचा आवडता छंद असतो.उत्तम उदाहरण म्हणजे स्टँम्प ड्युटी विभाग,वाहतूक विभाग वगैरे. सर्वानाच दमात घेवून काम करणे शक्य नाही.म्हणून अशा ठिकाणी जास्तीत जास्त पारदर्शकता कशी येईल ते पाहणे आवश्यक आहे.

JAGOMOHANPYARE Mon, 11/08/2010 - 12:40
लोक प्रतिनिधी हे प्रशासनाच्या माध्यमातूनच भ्रष्टाचार करतात.... त्यामुळे जरी सरकार बदलले तरी शोषण यंत्रणा तीच रहाते... तुमच्या पत्रात तुम्ही त्याना अध्वर्यु म्हटले आहे.. अध्वर्यु म्हणजे यज्ञात हवन करणारा मुख्य ऋषी..... तुमचे पत्र बहुतेक त्यानी अग्निकुंडात स्वाहा केले असणार... :)

In reply to by JAGOMOHANPYARE

यकु Mon, 11/08/2010 - 12:51
तुमचे पत्र बहुतेक त्यानी अग्निकुंडात स्वाहा केले असणार
हो. तसंच वाटतंय मलाही. पण त्याची एक प्रत माझ्या ब्लॉगवर तशीच पडून होती. नन्नाचे पाढे सगळ्यांच्याच पक्के लक्षात आहेत; मी मात्र रोज विसरतो. अध्वर्यू म्हणा, अध्यक्ष म्हणा, सम्राट म्हणा की अजून इतर काही म्हणा आपलं काम होण्याशी मतलब ना?

वेताळ Mon, 11/08/2010 - 12:53
पण आजकाल मिपावर अध्यात्म व प्राचिन हिंदु संस्कृतीविषयी प्रचंड आवड निर्माण झाली आहे.पुर्वीच्या काळी राजदरबारी अश्या अडचणी येत होत्या का?

सहज Tue, 11/09/2010 - 06:53
हे काम मनसेचे नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी ते केले तर उत्तम पण केले नाही तर बिघडत नाही. आपल्याकडे उरफाटे काम करणारे लोक व सरकारी नोकर तितक्याच प्रमाणात आहेत. पैसे दिल्यावर तेच काम किती झटपट होते, तोच सरकारी नोकर पण त्याची कार्यक्षमता नेहमीपेक्षा किती प्रचंड वाढते याचा कल्पना आपल्यापैकी बहुतेकांना असेल. मनसे किंवा अन्य पक्षाने हे सुविधा उपलब्ध करुन देवो अथवा न देवो. कोण्या सुशिक्षीत बेकाराने असा एक बुथ अल्पदरात चालवायला चांगली संधी आहे खरी. पण सर्व अर्ज योग्य तर्‍हेने भरले आहेत, योग्य ती पुरक कागदपत्रे सोबत जोडली आहेत इ. अर्थात हे सगळे करुन सरकारी नोकर टोलवाटोलवी करण्यात, कामचुकारपणा करण्यात, धादांत खोटे बोलण्यात समर्थ आहेतच. मग शेवटी हे कमीशन घ्या पण काम करा बॉ! परिस्थिती येते.

In reply to by पंख

यकु Tue, 11/09/2010 - 13:45
मला कसल्याही अवास्तव अपेक्षा नाहीत. या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे; मला वाटत नाही एकटे राज ठाकरे भाषणं करून नवनिर्माण होईल म्हणून. काय ते दौरे, काय ती भाषणं आणि पुन्हा हे नवनिर्माणाचे महाराष्ट्राच्या एकूण लांबीरूंदी एवढे मोठे आव्हान! शेतकरी जीन्स पॅण्ट घालून ट्रॅक्टर चालवताना दिसले पाहिजेत म्हणे. पण लोकांना राजकीय पक्षांकडून गोलमाल कल्पनांना भुलून नेहमीच फसवून घेण्याची सवय झाली असेल किंवा राजकारणी "लखोबा लोखंडेच" असतात असा समज असेल किंवा त्याहीपुढे लोक राजकीय नेत्यांना "प्रोफेशनल एंटरटेनर्स" मानत असतील तर कल्पना नाही. एक कल्पना तिकडे; एक कल्पना इकडे - काय फरक पडतो! त्यामुळे अपेक्षाभंग वगैरे काही नाही. माझ्याकडून शक्य होतं तेवढ्या वेळा ही कल्पना घेऊन त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला; प्रत्यक्ष राज ठाकरेंनाही भेटलो. पण त्यामुळं कसलाही अपेक्षाभंग वगैरे झाला नाही - उलट नेमकी समज आली या लोकांबद्दलची.

विसोबा खेचर Tue, 11/09/2010 - 11:36
नवनिर्माणच करायचेय तर तो दररोज आणि महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालणारा कार्यक्रम पाहीजे. गावात ग्रामपंचायत, क्रुषी उत्पन्न बाजार समित्या, पोलीस ठाणी, शहरात महानगरपालिका, बसथांबे, न्यायालये, विमानतळे, बाजारपेठा, आर.टी.ओ. कार्यालये इत्यादी ठिकाणी नडलेल्या जनतेला दररोज मदत करण्यासाठी कार्यकर्ते का नसावेत?
सहमत..!