तापत जाणारं ऊन!
नुकताच नागपूरला जाऊन आलो.आता मूळ गाव म्हटल्यावर एक ओढ असतेच मनाला.. त्यामुळे खरं तर कितीही वेळा तिथे गेलो कि अगदी नवीन वाटतं. एकदम फ्रेश! पण आत्ताचा उन्हाळा म्हणजे तिथे खरंच बाहेर पडू देत नाहीये. ४५ अंशांवर पारा सहज चढतोय. पोचलो तेव्हा सकाळचे ८ वाजले होतेत. पण अगदी ११ वाजलेत का काय असं ऊन तापलेलं.
विचार करण्याजोगी गोष्ट आहे - सध्या संपूर्ण विदर्भच तापतोय. अकोला, खामगांव सुद्धा असंच भट्टीत जमा झालंय. अकोल्यात तर म्हणे दिवसाला ८ तास लोडशेडींग अन आठवड्याला १ तास पाणी येतंय अशी परिस्थिती आहे. टॆंकर बोलवायला पैसे आहेत लोकांकडे पण त्या टॆंकरमधे पाणी घालायला पुरेसा साठा नाही. अकोल्यासारख्या जिल्ह्याच्या गावात जर ही अवस्था तर बाकी लहान गावांमधे काय परिस्थिती असेल? कल्पना करवत नाही.
पुणं पुर्वी बर्यापैकी थंड असायचं. पण आता इथेही अशीच परिस्थिती झपाट्यानं बदलतेय. का? असं घडायची काय काय कारणं असू शकतील? मला वाटणारी काही कारणं -
- गेल्या ५-७ वर्षात अतिशय झपाट्यानं वाढलेली वस्ती
- त्यामुळं उद्भवलेली वाहतूक समस्या अन आत्यंतिक प्रदूषण
- नवीन गाड्यांचे अनियंत्रीत उत्पादन अन वाढलेली ईंधनपुरवठ्याची मागणी
- सोबत सर्व वस्तूंच्या अन बांधकाम जागेच्या वाढलेल्या मागणीमुळं चढणारी महागाई
- मागणी पुरवण्यासाठी झालेली बेसुमार वृक्षतोड अन सपाटलेले वा सपाटत जाणारे आजुबाजुचे डोंगर
- बिल्डर्सनी (बहुदा राजकारण्यांनी संगनमतानं) चालवलेली धडाक्यातली बांधकामं
- बेसुमार कूपनलिकांमुळे खोलवर जाणारी पाणी पातळी
ही सर्व कारणं केवळ वाढत्या तपमानासाठी नसून अनेक समस्यांसाठी आहेत. आजुबाजुच्या गावांतील बर्याच(!) सुपीक जमिनी बिल्डर्सनी विकत घेतलेल्या आहेत.
उदा. फुरसुंगी गावातील विकल्या गेलेल्या शेतजमीनी. आज ना उद्या त्यावर बांधकाम सुरू होणारच. खेदाची बाब म्हणजे फुरसुंगीतली शेती ही बागयती शेती म्हणून प्रसिद्ध होती. याचा अर्थ बारो महिने पाणी मिळणारी शेती. आज हा दावा हास्यास्पद वाटतो.
जर शेतजमीनी शहरापासून आणिक दूर गेल्यात तर मुख्य शहरांतील महागाई आणिक किती वाढेल! आत्ताच कोथरूड सारख्या भागांत मिळणारा भाजीपाला हा हडपसरच्या मंडईतल्या किंमतीपेक्षा कमीतकमी दुपटीनं महाग आहे. पुढे आणिक काय होईल?
हे सर्व कशाचं लक्षण?
पूर्वी पुण्यात रहावं असं मला मनापासून वाटायचं, पण आज मला स्वत:ला पुणं रहायला नको वाटतं. नागपूरसुद्धा याच मार्गानं जातंय. तिथेही काही वर्षांनी हीच परिस्थिती होईल अशीच लक्षणं आहेत.
यावर खरंच काही उपाय असेल काय? आपल्या हातात काय आहे असे कि जे आपण स्वत:पासून सुरुवात करू शकू अन ज्याची फळं आज नाही तर काही वर्षांनंतर तरी मिळतील?
राघव
प्रतिक्रिया
राघव सेठ ...