मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रथम तुला वंदितो

अर्धवटराव · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम मंडळी. आम्हि अर्धवटराव. नावाप्रमाणेच आचार, विचार, उच्चार, आणि इतर बर्‍याच बाबतीत आम्हि अर्धा पेला भरलेला (कि रिकामा... काय ते असेल) आहोत. काहि बाबतीत मात्र आम्हि परिपूर्ण आहोत... पण त्यांचि आम्हाला अर्धवट माहिती आहे. तर सांगायचा मुद्दा हा कि अश्या आमच्या सारख्या मडक्यांचि ठण्ठण् कोणिही ऐकुन घेत नाहि. अश्या उदास अवस्थेत व्रुथा भुमीवर भटकत असता आम्हाला या मिसळेच्या हाटेलाचा पत्ता सापडला. बरेच दिवस हाटेलाबाहेर उभं राहुन आम्हि आत यावं का हा विचार केला. इथे कसली तालेवार मंडळी आहेत. कोणि संगीत कोळुन प्यालय तर कोणि सहित्य. कोणाला राजकारण आवडतय तर कोणाला समाजकारण. कोणि कविता करतय तर कोणि जिभेचे चोचले पुरवायचे धडे देतय. क्रिकेट आणि सह्याद्रिचि दर्‍याखोर्‍यातलि यथेच्च भ्रमंति इथे आपल्या पूर्ण वैभवासकट नांदतेय. जीवन उलगडुन दाखवणारे पैलु इथे वाचायला मिळताहेत आणि "असेहि अनुभव येउ शकतात ??" असा विचार करायला लावणारे लेख सुद्धा इथे आहेत. आणि टिका टिप्पणे तर काय म्हणावि... गदेच्या प्रहारासारखि ठिकर्‍या उडवणारि म्हणा, सुई सारखि टोकदार म्हणा, किंवा अलगद लेंग्याचि नाडि सोडणारि इरसाल म्हणा ... एक से एक मिरच्या आहेत चविला. तर अश्या हाटेलात आपला फुटका माठ कसा घेउन जावा याचा अर्धवट विचार आम्हि भरपूर केला..... आणि शेवटि एक आशा आम्हाला हिम्मत देउन गेलि. ति म्हणजे इथे सर्वच आमच्या लाडक्या विठुरायचे-आमच्या सारख्या अर्धवटांना साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवुन देणार्‍या साहित्य सम्राटाचे- आमच्या पु.ल.देशपांड्यांचे भक्त आहेत. अहो एरवि आम्हा गजा खोत, नारायण, सख्या गटणे... आणि अश्या इतर अनेक चोखा महारांना या शहारुख आणि अमिताभच्या जगात कोण विचारतो. तेव्हा मंडळि, या डोंग्या चोख्याचे अर्धवट भाव गोड करुन घ्या आणि चार समजुतदारिच्या गोष्टी, जमेल तश्या, पण नक्कि सांगा... आम्हि आमचा अर्धवटपणा-कितिही प्रिय असला तरी- कमि करायचा अवश्य प्रयत्न करु... ********************************************************************************* प्रथम तुला वंदितो- ओठांवर सहज सुंदर हास्य अनुभवलय पण पु. ल. कोण हे माहीत नाहि, असा मनुष्य कमितकमि महराष्ट्रात तरि सापडणे कठिण (असतिल म्हणा अशे महाभाग... जगात दुर्दैवी लोकांचि कमि नाहि). भाईंचा साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, समाजकारण, राजकारण, पर्यटन... अशा अनेक परिचीत-अपरिचित क्षेत्रातला अफाट वावर नेहमीच चर्चेचा विषय राहिला. त्यावर भरपूर बोलण्यात आलं, लिहीण्यात आलं. स्वभावाला पैलुंचि गणती नसलेला हा अवलीया 'देता पुरुषोत्तम...' या उक्ति प्रमाणे उदंड देत रहीला आणि अनेक पिढ्या त्याच्या आनंद-दानावर जगल्या-पोसल्या गेल्या, अजुनहि जगताहेत. लो़कं भाईंना आपापल्या फुटपट्टीने मोजत रहिले. पण मला आश्चर्य या गोष्टिचे वाटते कि भाईंच्या अत्त्युच्च आध्यात्मिक पातळिबद्दल कोणिच कसं बोलले नाहि. अर्थात, हे मुल्यमापन करायचि आमचि पात्रता खचितच नाहि. आम्हाला भाईंनि इतकं काहि दिलय कि त्याचिच मोजदाद करायला उभा जन्म पुरायचा... पण आम्हि आहोतच अर्धवटराव... नसत्या खोड्या काढायचि या माठाला सवयच. त्यातुन भाईंबद्दल तर आमचं मन जास्तच चौकस. तेव्हा सहज विचार आला कि तुकोबा-रामदासांचा महीमा अखंड गाणारा मराठि माणुस भाईंबद्दल चिडिचुप्प का राहिला ?? आध्यात्मिक साधनेबद्दल आमचि समजुत अशि कि ज्या योगे माणसाचि चेतना उन्नत होउन विश्वचैतन्याशि एकरूप होते. ईश्वर निर्गुण आहे, निराकार आहे. आणि प्रक्रुति रुपानि तो प्रकट होतो. हे जर खरं तर मुळ्माया सरस्वती, जी संगीत-कला-साहित्य रूपाने प्रकट झालि, भाई तिच्या या रूपाशि एकरूप झाले नव्हते काय ?? या एकरूपतेतुनच भाईंनि परमेश्वराचे सत्-चित्-आनंद स्वरूप अनेकदा अनुभवले नसेल काय ?? अहो, तात्यांच्या भिमण्णांचे सुर जर आमच्या सारख्या फुटक्या माठाला देखिल ओलावा देउन जातात, तर अश्या अगणीत मैफिलींचि तल्लफ भोगलेले पु. ल. कित्येकदा 'ब्रम्हानंदी टाळि'त रममाण झाले नसतील काय ?? आई अन्नपूर्णेचि ममता त्यांना आशिर्वाद देति झालि नाहि काय ?? मग "माझे खाद्यजीवन" हे अन्नपुराण असेच अवतरले काय ?? भाईंचि कुठल्याहि देवावर श्रद्धा नव्हति म्हणतात. त्यांनि कधि उपास केले नाहीत कि पोथ्या वाचल्या नाहीत. पण व्यक्ति तितक्या प्रक्रुति-तितके साधनामार्ग हे जर खरं तर पु. लं.च्याच भाषेत सांगायच, तर त्यांचि कुळं वेगळि-कुळाचार वेगळे. मिपावरच मी वाचलं होतं बहुतेक... कि भाई कोणाला तरि म्हणाले होते- "तुझ्यापाशि जे काहि चांगले, सुंदर आहे ते इतरांना मुक्त हस्ते वाटत राहा" मला वाटते भाईंच्या पंथाचा हाच कुळाचार, हाच कुळ्धर्म. हीच त्यांच्या पंथाचि शिकवण आणि हाच गुरुमंत्र. किती म्हणजे किती उदात्त. कशाने, कुठल्या मापाने मोजायचे ?? अशिच एक गोष्ट आठवते... एक सैनीक सीमेवर तैनात होता. बरेच दिवस तो एकटा त्या दुर्गम भागात कसातरि दिवस ढकलत होता. शेवटि तो इतका वैतागला कि आत्महत्येचा विचार करु लागला. पण कुठुन कोण जाणे, त्याच्या हाती पु. लं.चे "माझे खाद्यजीवन" लागले आणि हे सर्व चाखायला तरि मला जगलच पाहिजे असा उत्साह त्याच्या मनात उपजला. मग सांगा, भाईंचि हि दानत 'भक्त संकटी पडता झेलुन घेशि वरचेवरि हो' या कोटीतलि नाहि काय ?? भाई निर्भय होते. आणिबाणिविरुद्ध ते बिन्दिक्कत उभे राहिले. महाराष्ट्रभूषण स्विकारताना तत्कालीन सरकारला 'ठोकशाहि' बद्दल रोकठोक बोलले. आणि भाईंचि दानशुरता काय वर्णावि... त्यांच्या दात्रुत्वाच्या हीमनगाचं टोक सुद्धा त्यांनि समोर येउ दिलं नाहि. वैराग्य म्हणजे मनाचि अत्यंत परिपक्व अवस्था. ज्या प्रमाणे फळ पिकल्यावर स्वताहुन झाडापासुन अलग होतं तसाच वैराग्य भाव माणसाला संसारापासुन अलगद तोडतो. वैरागि स्वानंदातच इतका मग्न असतो कि तो आपोआप कमलपत्राप्रमाणे संसारपासुन विलग होतो.वैराग्य म्हणजे भगवि कफनि नव्हे... त्रागा तर अजीबात नव्हे. असा हा वैरागि काकाजि 'तुझे आहे...' मधे आचार्यांना कसला मौलिक सन्देश देउन जातो. इतरांना सुद्धा किती व्यवस्थीत 'ज़ींदगी कि लाइन पे लाके' सोडतो. भाईंनि हे पात्र लिहीताना त्याचा अनुभव घेतला नसेल काय ?? चेतनेचि फार ऊच्च कोटिचि अवस्था असल्या शिवाय हे होणे शक्य नाहि हो !! असा हा पु. ल. नामक वैरागि आपल्या शेवटच्या आजारपणात डॉ. ना म्हाणाला कि मला उगाच क्रुत्रीम श्वसनावर वगेरे ठेउ नका... काय म्हाणावं याला!!! "जर दूसरा जन्म असेल तर त्यात मला पुन्हा मराठि भाषेचि सेवा करायचि आहे" हे भाईंच वाक्य "तुका म्हणे गर्भवासि सुखे घालावे आम्हासि" याच पठडितलं नाहि काय ?? पु. लं. ज्या भक्तिपंथावर आजन्म चालले त्या मार्गाने गेले असता परलोकि मुक्ति मिळेल कि नाहि माहित नाहि, पण प्रुथ्विवरच परमेश्वर नक्कि मिळेल... कारण तो पंढरीचा राणा स्वतः या पु.ल.कित मांदियाळित अबीर गुलाल उधळत जीवा-शीवाचे प्रेम उपभोगत नाचत असेल !!

वाचने 4941 वाचनखूण प्रतिक्रिया 10

राजेश घासकडवी गुरुवार, 03/04/2010 - 07:38
पुलंच्या चौफेर प्रतिभेला, रसिकतेला, आणि लोकांमधलं सौंदर्य पाहून आपल्याजवळ जे सुंदर आहे ते मुक्तहस्ताने उधळण्याच्या प्रवृत्तीला.
अश्या अगणीत मैफिलींचि तल्लफ भोगलेले पु. ल. कित्येकदा 'ब्रम्हानंदी टाळि'त रममाण झाले नसतील काय?
कितीकदा वाटतं की त्यांचं जीवन म्हणजे एक अखंड मैफिल होती. तुमच्या माठातून अजून मधुकण मिळत राहोत ही इच्छा. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव Fri, 03/05/2010 - 00:37
--कितीकदा वाटतं की त्यांचं जीवन म्हणजे एक अखंड मैफिल होती. अगदि मनातलं बोलला दादा. हा कलाकार लौकिक अर्थाने जरि मैफिल सोडुन गेला तरि मैफिल संपलेलि नाहि. जो पर्यंत त्यांचं साहित्य वाचलं जातय, तोवर हि मैफिल संपणार देखिल नाहि. --तुमच्या माठातून अजून मधुकण मिळत राहोत ही इच्छा आज्ञा प्रमाण आपला, अर्धवटराव -रेडि टु थिन्क

शुचि गुरुवार, 03/04/2010 - 07:50
इतका उत्कट आणि सुंदर लेख लिहीणारे आपण स्वतःला "अर्धवट राव" , कच्चं मडकं म्हणवता तर आमच्या सारख्यांनी तर "चुल्लुभर पानी मे डूब मरना चाहीये" आणि परत तेसुद्धा पाणी वाया गेलं म्हणून त्या पाण्याचे पैसे आधी भरून . फारच सुरेख लिहीलय. पारायणं करतीये. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

In reply to by शुचि

अर्धवटराव Fri, 03/05/2010 - 00:43
--इतका उत्कट आणि सुंदर लेख... अहो आमचा दाताच असा आहे, कि त्याच्या बद्दल बोललेले कुठलेहि बोबडे बोल गोडच वाटतात --फारच सुरेख लिहीलय. पारायणं करतीये. धन्यवाद ताई. आमचि हिम्मत अगदीच वाया गेलि नाहि म्हणायचि :) आपला, अर्धवटराव -रेडि टु थिंक

टारझन Fri, 03/05/2010 - 00:50
प्रकटन आवडले :) पु.ल. म्हणजे दैवी देणगी लाभलेला ऑलराऊंडर ! -

चित्रा Fri, 03/05/2010 - 00:58
मिपावर स्वागत. लेख चांगला उतरला आहे. पुढच्या लेखनास शुभेच्छा.

अर्धवटराव Sat, 03/06/2010 - 00:07
आपण या मडक्याचे शब्द गोड करुन घेतले... इतक्या छान प्रतिक्रिया दिल्यात. सर्वांचे मनःपूर्वक आभार !! (धन्य धन्य) अर्धवटराव -रेडि टु थिन्क