मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा स्मृतीरममाणता

सन्जोप राव · · काथ्याकूट
मराठी माणूस स्मृतीत रमणारा 'रम्य भूतकाल' या वृत्तीचा आणि अव्यवहारिक नोस्टाल्जिक आहे का हा प्रश्न मी पूर्वी विचारला होता. (या मराठी माणसांत मीही आणि विशेषेकरुन मीही आलो!) . 'तसे स्मरणरंजक सगळीकडेच असतात' इथपासून ते 'स्मरणरंजनात वाईट काय?' अशा पिळदार मिशांच्या सवालापर्यंत उत्तरे आली. ही चर्चा उदाहरणार्थ विचारस्वातंत्र्याची तथाकथित मुस्कटदाबी होत असलेल्या संकेतस्थळावर झाली. पण स्वातंत्र्याचे मनमोकाट वारे वहात असलेल्या स्थळांवरही फारसे वेगळे चित्र नाही, असेच दिसते आहे. मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे. म्हणूनच पाडगावकरांच्या (बघा, पुन्हा नोस्टाल्जिया!) 'ही रांग कोठे जाते? ' किंवा 'अमक्याला बिर्याणीचे वावडे आहे काय? या धर्तीवर पुन्हा तेच विचारावेसे वाटते. मराठी माणसाची मनमोरी भूतकाळातील स्मरणाने तुंबली आहे काय?

वाचने 4977 वाचनखूण प्रतिक्रिया 21

शुचि Sun, 02/07/2010 - 07:10
मराठी तरुणाईने "अवधूत गुप्ते"ला डोक्यावर घेतला आहे - अ‍ॅज फार अ‍ॅज माय नॉलेज गोज. बाकी साहित्याविषयी मला माहीती नाही. वरच्या उदहरणवरुन - ही तरुणाई तर नॉस्टॅल्जिक वाटत नाही. वहातं पाणी वाटते. ********************* काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

In reply to by अमृतांजन

टारझन Sun, 02/07/2010 - 13:01
हॅहॅहॅ ... वेळ जात नाहीये का हो सन्जोपराव ;) - चल्झोपराव जोवर स्वप्नांत आयेशा आहे,तोवरंच झोपण्यात मजा आहे.

In reply to by टारझन

भडकमकर मास्तर Sun, 02/07/2010 - 23:08
मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे. अहाहा... काय वाक्य.. मस्त... मजा आली...

In reply to by शुचि

बंडू बावळट Sun, 02/07/2010 - 11:00
मराठी तरुणाईने "अवधूत गुप्ते"ला डोक्यावर घेतला आहे - अ‍ॅज फार अ‍ॅज माय नॉलेज गोज.
या पार्श्वभूमीवर मिपाची मुखपृष्ठ किती महत्वाची आणि आवश्यक आहेत ते कळतं. अवधूत गुप्ते हा आदर्श (?!) आणि मराठी तरुणाई त्याला डोक्यावर घेते ही गोष्ट घातक आहे, चिंताजनक आहे! असो.. हे आमचं आपलं एक व्यक्तिगत मत. बाकी चालू द्या! --बंड्या.

अमृतांजन Sun, 02/07/2010 - 09:52
मी खालील विचार मांडाण्याचा प्रयत्न केला आहे- त्यातुन ध्वनित होणारा अर्थ प्रत्येकाला वेगळा वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्यावर प्रतिक्रिया देण्याआधी नक्की काय म्हणायचे आहे ह्याची खात्री करावी अशी नम्र विनंती. संजोपरावांनी दिलेल्या ’रम्य भूतकाल' वृतीचा स्कोप साहित्यिक, लेखक, खेळाडू ईं, च्या आठवणीत रमणे येथपर्यंतच आहे असे मला वाटत नाही. तो "एकेकाळी भारतात सोन्याचा धूर.." इथपासून सुरु होतो. ’रम्य भूतकाल' ही गुणविषेशतः फक्त मराठी माणसातच आहे असे मुळीच नाही. त्याची पाळेमुळे भारतीय संस्कृतीच घट्ट रुतली आहेत असेही नाही. जगभरच ह्या माणसाच्या स्वभाव-गुणधर्माचा वापर हुशार व्यक्तिंनी काही नेमके साध्य करण्यासाठी करुन घेतला आहे. "मी/आपण कोण?" असा प्रश्न एखाद्या लहानग्याने वडीलधाऱ्यांना विचारला असता, जे उत्तर दिले जाते त्यात जे असते तेथून हा प्रवास सुरु होतो. त्या आपण कोणचा स्कोप सुरुवातीला आपले कुटूंब, मग नातेवाईक, समाज, गाव, देश, असा सुरु होऊन, त्या व्यक्तिचे योग्य ते ओरीयंटेशन केले जात असते. मग त्यास आडवी लांबी मिळते. खोली- रुंदीचा अंदाज हा "रम्य भूतकाल" मधे गेल्याशिवाय येत नाही. किंवा "आपण कोण?" ह्या प्रश्नाचे उत्तर देणारी व्यक्ति ह्या खोलीचा वापर प्रश्नकर्त्याच्या समजेला झेपेल अशा पद्धतीने देऊन दुसरी एक खिडकी हळूच उघडून ठेवते. वरील प्रोसेसची गरज आहे. मी/ आपण कोण ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे ही त्या प्रश्नकर्त्याची मानसिक गरज असते. विचारांना दिशा देण्यासाठी ती उपयोगी असते. आधी काय विकलं गेलं आहे ते समजण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एखादी व्यक्ति देशाबाहेर (आशय महत्वाचा) गेली तर तिच्याकडे इतरांनी "कोण/काय" म्हणून पहावे हे तीने ठरवायचे असेल तर ते शक्य नाही. ते इतरांनीच ठरवायचे असते. ते त्यांना ठरवण्यास उपयोगी पडावे म्हणून ती व्यक्ती त्यांना मदत करु शकते. ती मदत करतांना तिला ह्या ’रम्य भूतकाल' स्टाईलच्या आठवणींचा नक्कीच परिणाम होतो. मी कोठून आले, माझे पुर्वज कसे होते, काय करत होते हे सांगून त्याचे गाठोडे माझ्याबरोबर आहे हे ती व्यक्ति सांगून समोरच्याला एक दृष्टीकोन देते. अनेकदा वादासाठी वाद घालण्यासाठी ह्या वृतीचा वापर होतो. त्यात स्व दुखावला जाण्याची शक्यता जेव्हा निर्माण होते तेव्हा स्वतःच्या विचारांना इतिहासातील सोयीच्या संदर्भांचा वापर करुन दुसऱ्यांना निरुत्तर करण्यासाठी वापर केला गेलेला आहे. अनेकदा मुद्दामहून चर्चा दुसरीकडे वळवण्यात मदत व्हावी व मुख्य मुद्दा चर्चेला येऊच नये म्हणूनही लोक अशा संदर्भांचा वापर करतात. [हे लोक हुशार असतात]. समोरील व्यक्तिही तितकीच हुशार व इतिहाची जाण असलेली असली की मग आणखी रंगत येते. अनेकदा स्वतःचे वाचन, ज्ञान ह्याचे प्रदर्शन करण्यासाठीही उपयोग होतो. इतिहासाचा गाढ अभ्यास असणे वेगळे व त्या ज्ञानाचा वापर भविष्यातील होऊ शकणाऱ्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केला जात असेल तर ठिक. पण बहुदा, तशा चुका पुन्हा होणे शक्यही नसते कारण तंतोतंत तीच परिस्थिती पुन्हा उद्धवेल असे कधीच शक्य नसते. ’रम्य भूतकाल' ह्यात एखाद्या व्यक्तिचा संदर्भ असेल तर तो कालातीत असू शकत नाही. आज "मी बियॉन बोर्गचा" नातेवाईक आहे ह्या पेक्षा "मी रॉजरचा" नातेवाईक आहेला जास्त किंमत येईल, ही जाणीव असली की पुरे. वृत्तपत्रांच्या पुरवण्यात काही लेख मी लहानपणापासून वाचत आले आहे. अगदी ठर्वल्याप्रमाणे ते काही कालावधीनंतर वाचायला मिळायचे व मिळतात. त्यात ज्या कलेच्या क्षेत्रातील व्यक्ति लेखकाच्या काळातील होत्या त्यांचा संदर्भ वारंवार येत असे. आणखी काही कालावधीनंतर लोक हे कोण आणि मी ह्यांच्याबद्दल का वाचू असे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहूना आजची पिढी जेव्हा लिहिती होईल तेव्हा त्यांना त्यांच्या ’रम्य भूतकाल' हा किती खोलीचा आहे हे आपसुकच कळेल व त्यानुसार ते घेतील व विकतील. तसेच ज्यांच्यासाठी तुम्ही ’रम्य भूतकाल' (बरंका) असे जी व्यक्ति ते सांगत काहीतरी ठसवण्याचा प्रयत्न करत असते त्या व्यक्तिनेही आज काय घेतले जाईल ह्याचा अंदाज बांधला तर ते जास्त सुसह्य होईल. त्यामुळे ’रम्य भूतकाल' ह्या नोशनमधे काही चूक आहे असे मला वाटत नाही. तर त्याच्या ऍप्लिकेशनमधे दोष आहे असे वाटते.

In reply to by विंजिनेर

अमृतांजन Sun, 02/07/2010 - 13:57
>>ह्ममम... केटी क्युरीने घेतलेल्या मुलाखतीत सारा पालिनच्या बेलआऊटच्या उत्तराची आठवण आली.>> कंटाळवाणा प्रतिसाद. (|:

पुर्वीच्या आणि आत्ताच्या उत्तरात काही फरक असतील असे वाटत नाही. स्मृतीरंजन हा भाग कधी उघड तर कधी सुप्तावस्थेत असतोच. स्मृतीऱंजन करणारा हा अंमळ मागासलेला व काळाच्या प्रवाहात रहाणारा किंवा वाहत पाणी वगैरे म्हणजे अंमळ पुढारलेला अशा द्विमितीत वर्गिकरण करता येणार नाही. लोकांच्या पुढे जे कायम येत राहत ते स्मरणात राहत. काळाच्या ओघात उत्तुंग व्यक्तिमत्व देखील विसरुन जातात. अस्मितांच्या राजकारणातुन ती स्मृतीच्या पट्टीवर ठेवली जातात. जे प्रतिभावंत आपल्या प्रतिभेच्या नशेत रसिकांना गुंगवुन ठेउ शकतात ते स्मरणात राहतात. लोकांच्या स्मरणातुन आपण निघुन जाउ या भयंगडापोटी सतत वृत्तपत्रात किंवा जालजगतात लेखन/वृत्त /फोटो वगैरे कालबद्ध पद्धतीने आले पाहिजे यासाठी अनेकांना प्रसिद्धीचे नियोजन करावे लागतेच. आमचे कार्य थोर आहे म्हणुन लोक आपल्याला विसरणार नाहीत हा भ्रम बाळगणार्‍यांना नंतर नैराश्य अथवा वैराग्य येते.प्रसिद्धीच्या नशेत काही माणसे काम करतात. त्यातुन काही प्रसिद्धीदांडगेही तयार होतात.प्रसिद्धीमाफियांशी हातमिळवणी करुन इव्हेंट मॅनेजमेंट करणारे माध्यमांना आता नवीन नाहीत स्मृतीरंजनातुन स्मृतीविव्हलता हा प्रवास अधिक त्रासदायक असतो. गुरुदत्त छाप चित्रपट याचे उत्तम उदाहरण आहे. स्मृतीरंजनात अडकायचे भय वाटते म्हणुन स्मृतीभंजनाकडे वाटचाल करणे हा अस्तित्वाचा लढा आहे तो attack is best defence या तत्वावर. असो कल क्या होगा किस को पता अभी जिंदगीका लेलो मजा! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विजुभाऊ Sun, 02/07/2010 - 12:05
सहमत आहे रावसाहेब. या आयडीने लिहिणारी व्यक्ती पूर्वी कधीतरी सकस आणि सुरस लिहीत होती या स्मृतीत रममाण होऊन वाचक तुमचे हल्लीचे सपक आणि विरस करणारे लेख वाचतात. खरेच भूतकाळाचा हाअ तुंबलेला बोळा काढूनच टाकला पाहिजे

विकास Sun, 02/07/2010 - 21:40
मराठी माणूस स्मृतीत रमणारा 'रम्य भूतकाल' या वृत्तीचा आणि अव्यवहारिक नोस्टाल्जिक आहे का हा प्रश्न मी पूर्वी विचारला होता. पहील्याच वाक्यात 'स्मृतीरममाणता" दिसली. ;) -------------------------------- मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

In reply to by विकास

शुचि Mon, 02/08/2010 - 05:50
नीरीक्षण अगदी बरोब्बर आहे आपलं. संजोप्राव स्वतः भूतकाळातला धागा उसवत असता त्यांना काहीच हक्क नाही इतरांना "अव्यवहारी" म्हणण्याची. हे म्हणजे - पॉट कॉलींग द केट्ल बॅक ....... तसं झालं. :B ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

ऋषिकेश Sun, 02/07/2010 - 23:52
आपल्या प्रश्नांमधे दोन प्रश्न आहेत. १. आपण स्मॄतीशील / स्मृतीरममाण होतो का? २. असल्यास त्यामुळे सामाजिक प्रगती थांबली(तुंबली) आहे का? यात स्मृतीशीलता हा प्रत्येक समाजाचा गुणधर्म दिसतो. कुणी पुलं/जीए आठवतात, कुणाला आजीच्या हातच्या भाजीची आठवण येते तर कुणी मोकळ्या मुंबईस आठवून हळहळतो. एखाद्या पोतडीमधे पुडकी साठवत जावीत तशा आठवणी असतात. नवं पुडकं बांधताना एखाद तसलंच पुडकं सोडून बघितलं जातं काहि काळ मागे बघितलं जातं. कधी चुका आठवतात, तर कधी स्मृतीरंजनात मन आनंदून जाते. तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर माझ्यामते होय असे आहे. प्रश्न २ चं उत्तर देण्याआधी "आपली प्रगती त्यामुळे थांबली आहे का?" हे बघावसं वाटतं. हे बघण्यासाठी माझ्या मते उत्तम चाचणी म्हणजे सकस नवनिर्मितीचा वेग. (आता यात "सकस" ही संज्ञा व्यक्तीसापेक्ष असल्याने या प्रश्नांचे उत्तरही व्यक्तीसापेक्ष असेल) माझ्यामते दुर्दैवाने मराठीतील सकस नवनिर्मितीचा वेग मंदावला आहे. मराठीत एकाच दिशेने साचेबद्ध लिखाण होत आहे. नवी शैली, नवे विषय, नवे विचार, नव्या दिशा पुढे येणं कमी झाले आहे. बंडखोर लिखाण , बंडखोर विचार तर नामषेश झाल्यासारखे वाटतात. नव्या धाटणीचे पत्रकार, नव्या विचारांचे नेते, नव्या कार्यक्रमाने प्रेरित उद्योजक वगैरे प्रत्येक प्रकारात नवनिर्मिती मंदावली आहे. प्रगतीला "आर्थिक" हा एकच निकष लागू लागला आहे. तेव्हा आपली प्रगती थांबली नसली तरी मंदावली आहे असे मला वाटते. आता प्रश्न उरतो प्रगती मंदावण्याचा आणि स्मृतीरंजनाचा कितपत संबंध आहे? माझ्यामते नवनिर्मिती नाहि म्हणून नवे आदर्श नाहित. नवे आदर्श नाहित- नवनिर्मिती नाहि पर्यायाने प्रगती नाहि म्हणून लोक स्मृतीरंजनात गुंतले आहेत. तेव्हा स्मृतीरंजनामुळे प्रगती तुंबली आहे असे मला न वाटाता, प्रगती तुंबल्याचा साईड इफेक्ट जनता स्मृतीरंजनात गुंतण्यात दिसतो आहे (सविस्तर) ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

चिंतातुर जंतू Mon, 02/08/2010 - 10:51
मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे.
भीमण्णा जोशी, मन्सूरअण्णा आणि आमिर खांसाहेब हे अभिजात शास्त्रीय संगीतातील हिरे आहेत. त्यांना या संस्थळाच्या मुखपृष्ठावर आणणार्‍या भल्या गृहस्थास आमचा कुर्निसात. ज्या समाजास अशा प्रतिभावान माणसांची कदर वरील शब्दांत करावीशी वाटते, त्यांपुढे मात्र आमची वाणी खुंटते. स्मरणरंजन नको असल्यास खुशाल नवनिर्मिती करावी, पण आपल्या वडिलोपर्जित खजिन्याची किंमतच जर विसरून जाल, तर रस्त्यात गवसलेला खडा गारगोटी की हिरा याचे मूल्यमापनही धड करता येणार नाही. - चिंतातुर जंतू :S "तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या | उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" ||

चतुरंग Mon, 02/08/2010 - 20:41
जीएंच्या लिखाणाबद्दल बोलणे हे सुद्धा स्मृतिरममाणतेत बसतं का हो? का ती रक्त गाभुळलेली वटवाघुळं ही आठ्याळ राखुंड्या चेहेर्‍यानं दुर्लक्षित करावीत? (चक्रनेमिक्रमेण)चतुरंग

विसोबा खेचर Mon, 02/08/2010 - 20:55
मिसळपावचे मुखपृष्ठही पुलं, लता, गदिमा, राजाभाऊ आणि हादग्याच्या खिरापतीच्या धर्तीवरचे कसलेकसले आण्णा, कसलेकसले बापू, कसलेकसले दादा आणि अगदी कडेलोट म्हणजे कसलेकसले खांसाहेब यांनाच पट्टराणी करुन राहिले आहे.
आहे हे असं आहे साहेब! आता त्याला आमचादेखील काही इलाज नाही.. आम्हाला बहुतांशी करून वरील जुन्याजाणत्या मंडळींतच काही शोधावेसे वाटते आणि ते इतरांना सांगावेसे वाटते. आम्हाला नव्याचे वावडे नाही. क्वचित प्रसंगी आम्ही नव्या, हल्लीच्या पिढीतल्या काही गुणी मंडळींवरही (उदा शंकर महादेवन, अजय-अतुल) मिपा मुखपृष्ठावर लिहिले आहे. परंतु आम्ही बहुत करून जुन्या लोकांच्या कलेतच अधिक रमतो. ती मंडळी जे आभाळाइतकं मोठं काम करून गेली आहेत त्याकडेच आम्ही पुन्हा पुन्हा आकर्षित होतो.. असो, आपला, (जुन्यात रमणारा) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Mon, 02/08/2010 - 21:02
बाय द वे, डाव्या रकान्यात दिलेल्या आमिरखासाहेबांच्या यमनच्या विलंबित दुव्यावर घटकाभर जाऊन गाणे ऐकलेत का? यमनची ज्याला 'Rich!' म्हणता येईल, चैनदार म्हणता येईल अशी काय सुरेख सरगम चालली आहे पाहा! नीरेगमधनीसां हेच स्वर आहेत आलटून पालटून! पण आमिरखासाहेबांच्या प्रतिभेने ते स्वर किती खुलले आहेत पाहा! त्यातला संवाद ऐकण्याचा यत्न करा.. खूप छान स्वरानुभव यावा! आपला, (यमनप्रेमी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

राजेश घासकडवी Sat, 02/13/2010 - 12:37
तात्या, तुमच्या 'नव्यातल्या रमण्या' विषयीही आम्ही थोडंफार ऐकून आहोत, बरका... असो, मिपावरचा हा माझा पहिला व्यवहार... नवं असो की जुनं, चांगलं दिसल्याशी (जीभ चावून...) आपलं ... चांगलं असल्याशी कारण... राजेश

In reply to by राजेश घासकडवी

विसोबा खेचर Sat, 02/13/2010 - 12:48
तुमच्या 'नव्यातल्या रमण्या' विषयीही आम्ही थोडंफार ऐकून आहोत, बरका...
माझ्या गुगलवरच्या 'बझ' वाचता वाटतं? ;) असो.. तात्या.