मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवअस्पृश्य!

ऋषिकेश · · काथ्याकूट
काहि प्रसंग: १. स्वाईन फ्लूमुळे शाळेला सुट्ट्या. घराजवळच्या मंदीराच्या आवारात ७-८ मुलींचा घोळका काहितरी खेळत बसला होता. एक चिमुरडी मात्र एवढंस्स तोंड करून बाजुला बसलेली. मला बघवलं नाही म्हणून त्या खेळणार्‍या मुलींपैकी एकीला विचारावं म्हणून संवाद सुरु केला "काय गं शाळेला सुट्टी?" "होऽऽऽ" (एकीला प्रश्न घाऊक उत्तरे :) ) "ती 'क्ष' का तिथे बसलीए? लिंबु टिंबु आहे? का तिला येतच नाहि हा खेळ?" "श्शुऽ!! बसुदे तिला तिथे.. ती आली तर आई ओरडेल मला" "का बॉ? भांडलात की काय?" "नाऽहीऽ!!! ती आहे ना तिच्या चुलत बहिणीला ताप आलाय" "मग?" "म्हणून आई म्हणालिए तिच्यापासून दूर रहा.. 'स्पाईनचा ताप' नको व्हायला" मी क्ष कडे पाहिलं.. ती तोंड फिरवून बिचारी घरी निघून गेली २. काल उसाच्या रसाच्या दुकानातही हाच विषय... फक्त एका १२-१५ वर्षाच्या मुलाला त्याची आई ओरडत होती "गधड्या.. कोणी सांगितलं होतं काकुंना सांगायला की बेबीला ताप आलाय" "अग पण तीला आलाय ना ताप?!" त्या काकु ओळखीच्या असल्याने मी चौकशी केली. मलाही कळलेलं बघुन त्या अजून हवालदिल झाल्या "अरे बोलु नकोस रे कुणाजवळ प्लिज. माहिती आहे ना लोक कसे वागतात मग!. त्या 'य' ना ताप आला. नंतर तो उतरला तरी ऑफीस कामावर घेईना. त्यांना तर स्वाईन फ्लु पण नव्हता. डॉ. सर्टीफिकेटनंतर ते ऑफिसला जाऊ शकतात तर ऑफीसात त्यांच्या क्युबमधे आता कोणी बसायलाही तयार नाहि.. जाम वैतागले आहेत ते" ३. स्वाईन फ्लूमुळे गाड्यांना कमी गर्दी. या कमी गर्दीच्या समाधानात असतानाच समोरच्या मित्रद्वयीमधील पुढील संवाद कानावर पडला "अरे दोन दिवस स्टेशनवर आपल्या(!) आयटमला बघितलं नाय!" "कुठल्या? ९:३२च्या?" "हो" "अरे तिला सर्दी-खोकला-ताप आलाय" "तुला काय माहित? " "आरे तिची ती मैत्रिण आहे ना.." "कोणती?" "तीच रे ती डब्बल ब्याटरी.. आपल्या राजावर लाईन मारते.. हा त्तीऽऽ.. तर ती राजाला सांगत होती....(एक पॉज)..... .... आणि म्हायतीए.. तिचा साखरपुडा मोडला!!!!" "अरेच्या (चेहेर्‍यावर अरे वा! चे भाव)..? कसा? का?" "म्हणे तिला स्वाईन फ्लु झालाय" "च्यामारी!..... तरीच ती त्यादिवशी रडत होती.. मला वाटलच काहितरी लफरा असणार"................... =========== ही उदाहरणे ऐकल्यासारखी वाटताहेत का? तुमच्या ओळखीत कुणाला ताप आला तर त्याच्याशी तुम्ही असेच वागाल/वागता का? हा काथ्याकुट फक्त स्वाईन फ्लू मुळे निर्माण झालेल्या नवअस्पृश्यांबद्दल न रहाता एकुणच अनेक रोग आहेत ज्यांच्या पेशंटना हे अनुभव येतात. तर ह्या वैद्यकीय नवअस्पृश्यतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? अश्या रोगांपासून वैद्यकीय सुरक्षा/काळजी आणि ही अपृश्यता यांचा ताळमेळ कसा बसवावा/बसवाल/बसवता?

वाचने 2519 वाचनखूण प्रतिक्रिया 7

परवा वेदशास्त्रोत्तेजक सभागृहात आनंद घैसास यांच्या खगोलावरील पुस्तकाचे प्रकाशन होते म्हणुन गेलो होतो. तिथे गेल्यावर कार्यक्रम स्वाईन फ्लु मुळे रद्द झाल्याचे केवळ शुकशुकाटामुळ समजले. जवळ पास सगळे मास्क धारी होते. सगळे मास्कधारी हे माझ्याकडे विचित्र नजरेने पाहाताहेत असे वाटत होते. आजुबाजुला पाहिले तर मास्क वा रुमाल न लावलेल्या मोजक्या मंडळींपैकी मी होतो. मग मला लईच ऑड वाटायला लागले. मंग मी बी रुमाल लावुन त्येंच्यातला झालो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

दत्ता काळे Sat, 08/15/2009 - 10:41
१. आईला कामावर निघण्याच्या तयारीत. मुलाच्या शाळेला सुट्टी, त्यामुळे त्याच्यापुढे प्रश्न 'घरात बसून काय करायचं' मुलगा : आई, ऋत्विक आणि पुष्पलला आपल्या घरी बोलावू ? आई : नको ! मुलगा : मग मी त्यांच्याघरी जावू ? आई : नको ! मुलगा : मग तू घरी थांब. आई : :/ २. पुणे महानगरपालिकेच्या जीपमधली अनांऊंसमेंट . . आणि जीपमधला संवाद : शहरातील नागरीकांनो स्वाईन फ्लू ने घाबरून जाऊ नका. स्वाईन फ्लू बरा होतो. ए .. ए . . मारत्या ! आरं फडकं कशाला काडतोएस तुज्या तोंडावरचं. येड्या बांगड्या, स्वाईन फ्लू झाला मंग ?

विसोबा खेचर Sun, 08/16/2009 - 00:51
हा काथ्याकुट फक्त स्वाईन फ्लू मुळे निर्माण झालेल्या नवअस्पृश्यांबद्दल न रहाता एकुणच अनेक रोग आहेत ज्यांच्या पेशंटना हे अनुभव येतात.
हम्म, खरं आहे! तात्या.

खडूस Mon, 08/17/2009 - 10:32
मला ३ आठवड्यापासून खोकला आहे (मला cronic खोकला problem आहे आणि dust allergy आहे). पण मागच्या आठवड्यात अचानकच आजूबाजूच्या लोकांना साक्षात्कार झाला की मी खोकत आहे. अगदी माझ्या HR ने फोन करून सांगीतले की घरी जाउन आराम कर आणि सुट्टीचा problem असेल तर he will speak to my manager. अजबच आहे मागे माझ्या भावाच्या engagement साठी सुट्टी हवी होती तर फक्त अर्धा दिवस सुट्टी दिली होती. आता मात्र खोकला पूर्ण बरा होईपर्यंत ऑफिसला compulsory दांडी - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

प्रसन्न केसकर Mon, 08/17/2009 - 12:02
समाजात सगळ्याच नात्यांबाबत प्रचंड असुरक्षितता निर्माण झालेली दिसते. आज पुणे लोकसत्तामधे याच विषयावर सविस्तर वृत्तान्त आहे. पण अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया येणे साहजिकच आहे. जेव्हा जीवनाला धोका निर्माण झाला आहे असे वाटण्याएव्हढी असुरक्षितता निर्माण होते तेव्हा अश्या प्रतिक्रिया येतात हे सत्यच आहे - अगदी बिरबलाची माकडिण आणि तिच्या पिल्लाची गोष्ट्सुद्धा हेच दाखवते. अन गेले काही दिवस तर लोकांमधे एव्हढा गोंधळ उडालाय की त्यांनाच समजत नाहीये काय करावे ते. सगळ्यांचाच सामान्य जीवन जगण्याचा अधिकार हिरावुन घेतल्यासारखे झालेय. चांगला विषय आणि त्याची सुंदर हाताळणी याबाबत माझी दाद. -- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr

ऋषिकेश Mon, 08/17/2009 - 13:52
मला काहि व्यनी आले त्यावरून मला जे म्हणायचंय ते तितक्या योग्य शब्दांत मांडले गेले नसावे असे वाटले म्हणून हे स्पष्टीकरण माझा विरोध एखादा आजारी असताना त्याला काहि काळापर्यंत इतरांपेक्षा दूर ठेवणे (व त्या द्वारे साथीस आटोक्यात ठेवणे) यास नाहि आहे. तर माझा विरोध ती व्यक्ती बरी झाल्यानंतरही / तिला ठराविक संसर्गजन्य आजार (हल्ली स्वाईन फ्लू) झालेला नाहि हे कळूनही दिल्या जाणार्‍या संशयास्पद खरंतर अस्पृश्यतेच्या वागणूकीवर आहे. असा अनुभव आजारी व्यक्तीस ठराविक व्यक्तीकडून येत असेल तर त्या व्यक्तीची बैद्धिक/मानसिक कुवत म्हणून सोडून देता येईल. मात्र अश्या व्यक्तीस जेव्हा समाज तसे वागवू लागतो तेव्हा ती अस्पृश्यता बनते. दूसरी गोष्ट ही बाब केवळा स्वाईन फ्लू संबंधी सत्य नाहि तर असे अनेक रोग आहेत. ज्याच्या एकेकाळच्या रुग्णांनाही समाजाकडून दूरत्त्वाची वागणूक मिळते. किंबहुना त्यालाच नाहि तर प्रसंगी त्याच्या कुटुंबियांना अशी वागणूक मिळताना सर्रास दिसते. नुकतेच एक घडलेले उदाहरण जे बर्‍याच जणांनी पेपरात वाचले असेल. एका शाळेने एचायव्ही पॉसिटीव्ह विद्यार्थ्यांना शाळेतून काढले कारण बाकी पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवत नव्हते. "एच आय व्ही पॉसिटीव्ह म्हणजे एडस नव्हे. केवळ एच आय व्ही पॉसिटीव्ह वर औषधे आहेत व तो आता बरा होऊ शकतो" किंवा "ये छुने से नही फैलता है..." वगैरे कितीही जाहिराती केल्या तरी समाज त्या बालमनावर अपृश्यतेची वागणूक देऊन असंतोषाची बीजेच पेरतो आहे नाही का? काही साथी/रोग हा त्याच्या शारीरीक इजेपेक्षा अश्या मानसिक इजेमुळे समाजासाठी जास्त घातक होत चालल्या आहेत. आणि अश्या अस्पृश्यतेला खतपाणीच मिळते आहे. :( ऋषिकेश ------------------ दूपारचे १ वाजून ५० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत " खुन्नस खुन्नस ऽ तुझी नी माझी खुन्नस...."

ऋषिकेश चांगलं लिहीलं आहेस. दुर्दैवाने बुद्धीजीवी म्हणवणार्‍या वर्गातही अशी वागणूक सर्रास नाही तरी अधूनमधून पहायला मिळते. अदिती