मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझे काय चुकले? २.०

अमरेंद्र बाहुबली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
• घरी सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला आलेल्या शेजारच्या काकूंना मी सांगितले, “सत्यपीर ही बंगालातील मुसलमानांची पूजा आपण कॉपी केली आहे.” घरचे भडकले आणि पूजा संपेपर्यंत मला घराबाहेर काढले. सांगा, माझे काय चुकले? • “बाळा, लवकर ये. आम्ही तुझी वाट पाहतोय,” असे प्रिवेडिंग बेबीशूटचे फोटो त्याने फेसबुकवर टाकले. “त्याचे तो ९ महिने घेईलच ना, लवकर कसा येईल?” मी कमेंट मधे विचारल्यावर त्याने फोन करुन घाण घाण शिव्या देऊन पुन्हा असे करू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? • शिक्षकदिनी, व्हॉट्सअप समूहात गुरुजींच्या आठवणी सुरू होत्या. “आमचे गुरुजी कडक होते, मारायचे, आमची शाळा अशी होती,” वगैरे वगैरे चर्चा सुरू होती. “काय दिवे लावले?” त्यांनी मला स्वतः समुह सोडून जा नाहीतर रिमूव्ह करू म्हणून सांगितले. सांगा, माझे काय चुकले? • “हिंदुत्वरक्षणासाठी आनंद साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा, अभी नही तो कभी नहीं.” असा आनंद साहेब युवा मंच ह्या व्हॉट्सअप समूहात मॅसेज आला. “साहेबांचा मुलगा हिंदुत्व रक्षणासाठी टोरांटोहून कुठल्या फ्लाइटने येतोय?” मी विचारले. दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? • निवडणुकीत अमुक साहेबांना विजयी करा, असं व्हॉट्सअप समुहात सांगन्यात आले. , “सध्या आपल्या शहराचा मानवी विकास निर्देशांक काय? आणि साहेब तो कुठे नेणार?” मी विचारले. “मत दिले नाहीस तरी चालेल, पण तू समूहात नको,” म्हणून मला समूहातून बाहेर काढन्यात आले. सांगा, माझे काय चुकले? • शाळेत असताना “व्यायाम केल्याने शरीर तंदुरुस्त राहते,” असे मास्तरांनी सांगितले. “मग तुमचं पोट कसं सुटलंय?” मी विचारले. मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले. सांगा, माझे काय चुकले? • जयंतीच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले, “आपण ह्या विचारांचा प्रसार करतो.” “पण अमलात किती आणतो?” मी विचारले. पुढच्या कार्यक्रमात दिसू नकोस, अशी सक्त ताकीद देऊन मुख्याध्यापकांनी मला सोडले. सांगा, माझे काय चुकले? • प्रात: संघशाखेत स्वयंसेवक दंडप्रहार शिकवत होते. “अशा प्रकारे दंड डोक्यात हाणावा.” “ पण दंड हाणायला “मोहल्ल्यात” कधी जायचे?” मी विचारले. “ह्याला पुन्हा शाखेत कुणी आणले रे?” ते ओरडले. सांगा, माझे काय चुकले? • खोटे मित्र कसे ओळखावे ह्याचे तंत्र मला वडिलांनी सांगितले. “तरीही तुमच्या सख्या भावानेच तुम्हाला कसे फसवले?” मी विचारले. ते काठी शोधे पर्यंत मी धावत पळत काकांचे घर गाठले. सांगा माझे काय चुकले? • दोन वर्षांचा भाचा मोबाईल चार्जरसोबत खेळत असताना मी त्याला समजावले, “आईला मारू नकोस.” त्याने डोक्यात हाणलेला चार्जर वडिलाना दाखवत तिने सांगितले “ह्यानेच त्याला शिकवले,” . वडील मला रागावले. सांगा, माझे काय चुकले? • कंपनीत मुलींच्या ग्रुपमध्ये चर्चा चालूअसताना मी ऐकले. “आपल्या देशातल्या मुली सर्वात लाजाळू असतात,” “मग तरीही देशाची लोकसंख्या जगात अव्वल कशी?” मी विचारले. दोन मुलीनी तोंडावर हात ठेऊन पलायन केले. उरलेल्यांनी मला ये आता म्हणून सांगितले. सांगा, माझे काय चुकले? • मंदिरात दर्शनाला आलेल्या वहिनींना मी विचारले, “आपण दर्शन घ्यायला येतो की देवाला दाखवायला?”, “तुमचे नी कल्याणीचे प्रकरण आईना सांगते!” वहिनीनी धमकावले. त्या दिवशी निघालेले भांडे घासून मी प्रकरण मिटवले. पण सांगा, माझे काय चुकले? • मटण आणायला गेलेल्या काकांना मी मटण दुकानदारासमोर श्रावण महिन्याची आठवण करून दिली. काका मटण न घेताच परतले. खाटकाने सुऱ्याला धार लावत माझ्याकडे संतापाने पाहिले. सांगा, माझे काय चुकले? सांगा सांगा माझे काय चुकले?

वाचने 6582 वाचनखूण प्रतिक्रिया 24

कंजूस Sun, 11/24/2024 - 23:21
काय चुकलं? चुका दाखवणे चुकलं. तुमचा धाड पॅटर्न लोकांना आवडत नाही . वरवर बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं हे कधी शिकणार? माझंही हेच होतं. मित्र आणि शेजारी दूर जातात.

सुबोध खरे Mon, 11/25/2024 - 12:13
आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस मास्तरांनी मला मैदानात झाडू मारायला पाठवले हे समोर दिसूनही माझे काय चुकले विचारताय? आश्चर्य आहे. असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा

In reply to by अमरेंद्र बाहुबली

गवि Tue, 11/26/2024 - 06:32
तुमचे काहीच चुकले नाही. असेच खरे बोलत रहा. पण सातत्य असणे महत्वाचे. प्रत्येक वाक्य सत्य असावे. त्यात अपवाद नसावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सुबोध खरे Tue, 11/26/2024 - 10:11
पण मी चुकीचे काय बोललो होतो? खरं तेच बोललो होतो ना? असमयोचित बोलण्याचा मूर्खपणा. सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. मुलाखतीला गेल्यावर मुलाखतकाराच्या दिसण्यावर टिप्पणी करून एकदा पहाच. "सत्य असले तरी"

In reply to by सुबोध खरे

सत्य असले तरी बोललेच पाहिजे असे नसते. अच्छा. असे होय. शाळेत भिंतीवर “नेहमीखरे बोलावे असे साने गुरुजींच्या फोटोसह लिहिलेले होते ते का म्हणून? :(

चांगलं लिहिलय बाहुबली. मी ही एक add करतो. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. आणि एकमुखाने EVM वर खापर फोडले. मी भीत भीतच विचारले "खरंच घोटाळा झालाय का आपण हरलो म्हणून म्हणायचंय?". मावळ्यांनी मला नामर्द म्हणून तुडव तूडव तुडवला. सांगा, माझे काय चुकले?

In reply to by रात्रीचे चांदणे

ह्यावर आणखी एक. निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. जिंकल्याबद्दल सर्व एकमेकांचे अभिनंदन करत होते. “कुठलीही लाट नसताना, मराठा समाज, दलित विरोधात असताना, सभा फ्लॉप जात असताना आपण जिंकलो कसे?” मी विचारले. त्यांनी माझ्या खिशात नोटांचे बंडल कोंबून चुप बस म्हणून सांगितले. :)

निवडणुकीनंतर पक्ष प्रमुखांनी बैठक बोलावली. हरल्याबद्दल काहीजण डोळे पुसत होते ,काही एकमेकांना धीर देत होते. "ई.व्हि.एममध्ये १००% घोटाळा आहे आणि पैसा पण खूप वाटलाय" सगळे एकसुरात म्हणाले. "मग कर्नाटकात त्याचवेळी तीन ठिकाणी झालेल्या पोटनिवड्णुकीत आपण निवडुन आलो. तेथे पण ई.व्ही.एम घोटाळा होता का ? आपण पैसे वाटले का? मी आपले सहज विचारले. 'हाता'ला धरून त्यांनी मला बाहेर काढले. सांगा माझे काय चुकले?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

“संशय येऊ नये म्हणून तसे करावे लागते, गरीब राज्ये काँग्रेसला तर श्रीमंत राज्य आपल्याला “सेट” करावे लागते. घरी आल्यावर माईना त्यांच्या ह्यानी सांगितले. :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हा हा हा. ते ह्यांनी १९६० साली सांगितले होते. सध्या कर्नाटक देशातील तिसरे श्रीमंत राज्य आहे असे ह्यांनी हल्लीच सांगितले होते. "महाराष्ट्रात काँग्रेसची जी वाताहत झाली त्याबद्दल मी ई.व्ही.एम ला दोष देणार नाही" असे पक्षाच्या बैठकीत ज्येष्ठ काँग्रेस नेते आणी मंत्री मुनियप्पा म्हणाले होते, ते लिहायचे राहुन गेले. https://www.deccanherald.com/india/karnataka/dont-want-to-blame-evms-for-defeat-of-congress-in-maharashtra-k-h-muniyappa-3291413

संजय खांडेकर Tue, 12/03/2024 - 16:27
दहा मिनिटांनी मला हिंदूद्रोही ठरवून समूहातून रिमूव्ह केले नी आजच्या मटण पार्टीला दिसू नकोस म्हणून बजावले. सांगा, माझे काय चुकले? बाकी काही चुको व ना चुको तुमची मटण पार्टी चुकली हेच खरं

चावटमेला Wed, 12/04/2024 - 14:41
एका मराठी वॉट्सअ‍ॅप ग्रुप मध्ये एकाने विक्रम संवत नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, मी म्हणालो की, महाराष्ट्रात शक संवत नव वर्ष साजरं करतात, विक्रम संवत उत्तर भारतीय भय्यांमध्ये प्रचलित आहे, तेव्हापासून सदर सदस्याने माझ्याशी बोलणे सोडले, सांगा माझे काय चुकले?