मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दुनियादारी - माझ्या नजरेने !

दशानन · · जनातलं, मनातलं
दुनियादारी ह्या पुस्तकाबद्दल मी सर्व प्रथम मिपावर वाचले व मनात आले हे पुस्तक तर हवेच हवे आपल्याकडे, शोकेससाठी नाही वाचण्यासाठी. सागर ह्यांच्याशी संपर्क झाला व लगेच काही दिवसामध्ये ते पुस्तक हातात मिळाले, माझ्या चपराशीने जरा गोंधळ घातला त्याला ते पुस्तक नावावरुन हिंदी वाटले व संध्याकाळी आलेले कुरियर सरळ घरी घेऊन गेला, पण दुस-या दिवशी क्या साब म्हणत मला परत ही केले. माझी एक वाईट सवय आहे कुठलेली पुस्तक हातात आले की लगेच मी सर्वात प्रथम व सर्वात शेवटचे पानं वाचतो, पण दुनियादारी बद्दल एवढे वाचले होते (प्रतिसाद व खरडी) की हिंमत झाली नाही शेवटचे पान वाचण्याची ना पाहण्याची, सुरवातीपासून वाचण्यास सुरवात केली व सरळ शेवट करुन पुस्तक बंद केले. व विचार केला हे पुस्तक आपण का व कश्यामुळे पुर्ण एका बैठकीत ते पण ऒफिसमध्ये ज्याकाळात जेवायला फुरसत नाही तेव्हा वाचले, का ? कारण सरळ होते एक तर मिपावर जरुर वाचावे असे पुस्तक असा शेरा मिळाला होता व मनात एक हुरहुर होती जे पुस्तक १९८२ मध्ये प्रकाशीत झाले ते आजच्या जगाबद्दल कसे व्यक्तव्य करु शकते ? पण मिपावरील लेखामध्ये आलेले प्रतिसाद व लेख वाचून मनात होते की हे पुस्तक व्यवस्थीत वाचायचे व मगच विचार करायचा, एकदा वाचले एका बैठकीत, परत वाचले दुस-या बैठकीत एकाच दिवशी आधी न घेता व नंतर घेतल्यानंतर. फक्त मनात एकच विचार आला हे मिस्टर सुहास शिरवळकर कुठे भेटतील व त्यांचे कसे आभार मानावेत एवढे सुंदर चित्रण लिहल्या बद्दल ? ते जेव्हा भेटतील तेव्हा भेटतील पण मनातील हुरहुर मिटवणे गरजेचे त्यासाठी हा लेखन प्रचंच. ************************************** दुनियादारी कुठून सुरु व कुठून समाप्त हे कळतच नाही हे वास्तव आहे, कुठल्याही पात्राच्या जागी तुम्ही स्वत:ला पहाणे हे यश आहे ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे. भन्नाट वेग व एकापेक्षा एक सरस व्यक्ती हेच ह्या कादंबरीचे / पुस्तकाचे यशाचे कारण. कोण कुठले श्रेयस , डिएसपी, अशोक, एम के, श्री, नितीन, साईनाथ, सुरेखा, मिनू, शिरिन , मिस्टर व मिसेस तळवळकर, कोण अशोकची आई व कोण दिन्याची फॆमेली, कोण जाणे कुठले एसपी कॊलेज पण आपण वाचनाता अचानक गुरफटले जातो व वाटते अरे आम्ही तर ह्यांना ओळखतो जर जवळून नसेल तर दुरुन सही पण आम्ही ओळखतो सर्वांना, पुस्तक वाचण्याआधी व वाचल्यानंतर आपले भावविश्व एकदम वेगळे होऊन जाते, आपण का जाणे अचानक एका वेगळ्याच विश्वामध्ये रमतो, जो आपल्याला नेहमी खटकत असतो जिवनामध्ये तो पण आपलासा वाटू लागतो त्याचा चुकीचा दृष्टीकोन देखील आपण जरा तपासून पाहू लागतो., मित्र, कॊलेज, मारामा-या व तो संतोष बार पाहिला नाही असे नाही कुठे ही जा कोल्हापुरात, पुण्यात अथवा अस्सल दिल्ली मध्ये नाहीतर कानपुरमध्ये सर्वत्र हेच मग ह्या पुस्तकात असे काय आहे ज्याने मला वेड लावले तर ते आहे प्रत्येक व्यक्तीरेखेचे भावविश्व. अरे वाचताना हदयावर खड्डे पडतात यार हेच यश. चार पानं हसण्याची तर चार पानं निरंतर अश्रु ढाळण्याची, माझ्या मित्रांनी मला कधी एवढे इमोशनल पाहिले नव्हते ते जरा चरकलेच पण हा एक पुस्तक इफेक्ट आहे हे कळाल्यावर चार शिव्या देऊन गप्प झाले पण मी गप्प होऊ शकलो नाही, डोक्यात कुणाला दोष द्यावा हाच विचार चालू होता व आहे. *************************************** शेयस तळवळकर, हा तुम्हाला कुठे ही भेटेल अगदी तुमच्या जवळपास वावरत असेल, नाव दुसरे असेल पण व्यक्ती तीच, घरात प्रॊब्लेम म्हणून हॊस्टेलवर / रुम वर पडिक, मित्रांमध्ये रमलेला, हुषार, हजरजबाबी, स्पष्ट व मनमोकळा, मनाने सच्चा पण काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला. मीनू एक नजर काफी, आपल्या प्रियकरावर जिवापाड प्रेम करणारी, प्रियकराच्या मैत्रीणीवर जळणारी व आई वडिलांचा दबाव म्हणुन अचानक प्रियकराच्या जिवनातून जाणारी अशी मिनू तुम्ही देखील कधी ना कधी पाहिलेली, अंगात रग असलेला पण रस्ता माहीत नसलेला, मित्रांसाठी जिव देणारा व घेणारा पण स्वत:चे काय ह्याची फिकिर नसलेला डि एस पी देखील तुम्हाला कोप-या कोप-यावर भेटेल, मित्रांना नेहमी हसवणारे / प्रत्येक वेळी साथ देणारे नितीन, मध्या व श्री देखील भेटतील, तसेच मित्रांना दगा देणारा अशोक व साईनाथ नावाचे प्राणी देखील आपल्या आसपास भेटतीलच. कुठल्याही बार वर जा तुम्हाला एम के जरुर भेटेल जरा स्वभाव निराळा असेल पण बाकी सगळे सेम. नातेगोती कधी अश्या क्षणाला पोहचली की जेथे तोंड दाखवायला जागा राहिली नाही की मनमोकळेपणा अशी अनेक जोडपी आपलाला आसपास दिसतील. ह्या पुस्तकात आहे तरी काय ? ह्या २७२ पानी पुस्तकात एक कॊलेज आहे, एक कट्टा आहे, काही मित्र आहेत काही मैत्रीणी आहेत, आई-वडील आहेत एक एमके आहे व एक त्याची कोणीच नसलेली पण सर्व काही असलेली स्त्री आहे, प्रेमाच्या अथांग सागराला कसा वळसा देणे आहे हे माहीत असलेली शिरिन आहे तर नात्यांना किती किंमत द्यावी हे माहीत असलेला तीचा भाऊ आहे, प्रेम म्हणजे एक दरी आहे व दरीच्या काठावर उभे असलेले सुर्यास्त व सुर्योदय निहारत असलेले जोडपे आहे तर प्रेम म्हणजे काय माहीत नसलेली व एका मुर्खाशी लग्न करायला एका पायावर तयार असलेली प्रियसी देखील आपल्याला भेटते. प्रत्येक जण वेगळा पण एकमेकाशी जुडलेला ह्या ना त्या कारणाने. लहानपणापासून आई-वडिलांच्यापासून दुरावलेला एक मुलगा, वडिलांच्या इच्छे खातिर लग्न केलेली व प्रेमाचा बळी देलेली आई, बायको दुस-यावर प्रेम करते हे माहीत असून देखील लग्न केले व लग्न टिकवण्याचा व नाते जपण्याचा निरंतर प्रयत्न करणारा पती, पतीने धोका दिला म्हणून विचित्र अवस्थेत प्रियेसी, स्वत:ला प्रियतमे ने सोडला म्हणुन निराशेच्या गर्तेत डुबक्या मारणारा एम के, एक गावगुंड पण मनात दोस्तीचा दर्या असलेला व मनाने हळवा डिएसपी व त्यांचा अफाट मित्रसंग्रह. *************************************************** क्रमश :

वाचने 15362 वाचनखूण प्रतिक्रिया 23

देवदत्त Fri, 05/01/2009 - 23:37
फक्त मनात एकच विचार आला हे मिस्टर सुहास शिरवळकर कुठे भेटतील व त्यांचे कसे आभार मानावेत एवढे सुंदर चित्रण लिहल्या बद्दल ? राजे, मिस्टर सुहास शिरवळकर आता आपल्यात नाहीत. २००३ मध्ये त्यांचे निधन झाले.

In reply to by देवदत्त

दशानन Sat, 05/02/2009 - 00:09
अरे रे :( त्यांना माझी हीच श्रध्दांजली ! ज्या मानवाच्या लेखणीमध्ये दोन दशके हलवण्याची ताकत असेल त्याला माझा ही लेखणीद्वारे हा दंडवत. थोडेसं नवीन !

सागर Sat, 05/02/2009 - 00:12
धन्यवाद राजे, माझ्या विनंतीला मान देऊन दुनियादारीवर लिहिलेत त्याबद्दल. खरेतर मी काही सांगायची गरजच नव्हती.... दुनियादारी वाचल्यावर तुमच्या मनातील विचार आपोआपच मि.पा. वर उमटणार होते याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती... छान भाव व्यक्त केले आहेत दुनियादारी वाचून झाल्यावर ... :) देवदत्ता खरे आहे बाबा... एवढा चांगला लेखक आपल्यातून तसा बराच लवकर गेला.... अगदी पन्नाशीत रहस्यकथां.... सामाजिक कथा.... भयकथा .... अत्भुतकथा... विनोदी कथा....अशा अनेक विषयांवर शिरवळकरांची पकड होती.... अनुभव, वेशीपलिकडे, गुणगुण या रहस्यकादंबर्‍या अप्रतिमच आहेत.... बॅरिस्टर अमर विश्वासाच्या कथा वाचताना आपण प्रत्यक्ष कोर्टात बसल्याचा अनुभव मिळतो. तर कधी दारा बुलंदच्या साहसकथा वाचताना राजस्थानाच्या जैसलमेरच्या वाळवंटी वातावरणाचा फील येतो... मंदार पटवर्धन आणि फिरोज इराणीच्या कथा मुंबईतील वास्तव जीवनाचे दर्शन घडवतात..... तर कधी पाळं-मुळं सारखी देशभक्तीपर कादंबरी ... विनोदी कादंबरी देखील या लेखकाने अतिशय उत्तम लिहिल्या आहेत. जाता - येता आणि बरसात चांदण्यांची ह्या २ कादंबर्‍या याची उत्तम उदाहरणे आहेत.... तरीही हा अप्रतिम आणि समाजमनाची उत्तम जाण असलेला हा लेखक चाकोरीबाहेर लिहिणारा म्हणून जास्त प्रसिद्ध होता... कोवळीक, दास्तान, कोसळ, मधुचंद्र ह्या पुस्तकांतून याची प्रचिती येते... एवढा हरहुन्नरी आणि विलक्षण ताकदीचा लेखक त्याच्या हयातीत फारसा चर्चिला गेला नाही ही खरेच दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेन. तरी त्यांच्या विपुल लेखनाने मराठी मनांवर कायमची पकड मिळविली आहे आणि यापुढेही त्यांची सर्व पुस्तके अतिशय आवडीने आजची व यापुढील पिढ्या आत्मियतेने वाचतील यांत तीळमात्र शंका नाही.... अर्थात यात आपली आवडती दुनियादारी आहेच... आपल्या आवडत्या सुशिंना आदराचा मुजरा व भावपूर्ण श्रद्धांजली... (सुशी प्रेमी) सागर

In reply to by सागर

दशानन Sat, 05/02/2009 - 00:24
दुनियादारीचे हिंदी मध्ये भाषांतर झालेले आहे काय ? माझ्या काही मित्रांना आज कट्टावर ह्या पुस्तकाबद्दल सांगितल्यावर वाचण्याची इच्छा आहे त्यांना, एक तर हिंदी मध्ये भाषांतरीत पुस्तक असेल तर माझे काम सोपे होईल नाही तर त्यांना मी कशी काय दुनियादारी समजवून देऊ शकेन हे आई भवानीलाच माहीत ! थोडेसं नवीन !

In reply to by सागर

अभिज्ञ Sat, 05/02/2009 - 03:11
मला वाटत सुशि वगैरे वाचणारा एक विशिष्ट वयोगट असतो. साधारण तरूण वयात हे वाङमय भुरळ पाडते. सुशि,श्रीकांत सिनकर..वगैरे ह्यांचे साहित्य मी साधारण १८ ते २२ या वयात असताना वाचले असेन. तेंव्हा डोक्यात ह्या पुस्तकांची धुंदी होती. मला तेंव्हा पुल,वपु ह्यांचे लिखाण जास्त आकर्षित वाटत नव्हते.परंतु पुढे पुढे जस जसे इतर साहित्य वाचत गेलो तेंव्हा सुशि,सिनकर ...ह्यांचे साहित्य वाचणे पार मागे पडले. हे असे का झाले हे मलाहि ठाउक नाही.परंतु नंतर हि पुस्तके वाचावीत असे कधीच उत्स्फुर्तपणे वाटले नाही. सुशिं नी इतरहि कादंब-या (विनोदी) लिहिल्या आहेत हे माहित नव्हते. नक्कीच मिळवून वाचल्या पाहिजेत. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

In reply to by अभिज्ञ

सागर Sat, 05/02/2009 - 13:08
मला वाटत सुशि वगैरे वाचणारा एक विशिष्ट वयोगट असतो. साधारण तरूण वयात हे वाङमय भुरळ पाडते. अभिज्ञ, मी काहीसा असहमत आहे या विधानाशी... माझ्यामते प्रत्येक लेखकाची एक विशिष्ट शैली असते आणि ती तुम्हाला एकदा भावली की मग आपण त्या लेखकाचे पुस्तक कधी वाचतो आहोत याने फारसा फरक नाही पडत. मुख्य गोष्ट असते ती पुस्तकातील कथानकाशी तुम्ही किती समरस होता याची... एकदा समरस झालात की वय हे बंधन उरत नाही... मी पुल,वपु , गोनीदा, ह. ना. आपटे, गो ना दातार, नाथमाधव, विश्वास पाटील, रणजीत देसाई, बाबासाहेब पुरंदरे, वि.ग. कानिटकर ,इ... इ.... बरीच पुस्तके सु.शींची पुस्तके वाचत असण्याच्याच वयात तेवढ्याच तन्मयतेने वाचली आहेत ... आजही वाचत आहे. अर्थात मी यावर अधिकाराने भाष्य नाही करु शकणार कारण मी आत्ता ३२-३३ वर्षांचा आहे, आणि आजही सु.शी. मी तेवढ्याच तल्लीनतेने वाचतो... त्यामुळे सध्यातरी माझ्या बाबतीत ही गोष्ट लागू होत नाही... पुढचे माहित नाही ;) येथील ज्येष्ठ सदस्य यावर अधिक प्रकाश टाकू शकतील... सु.शींची जाता येता आणि बरसात चांदण्यांची ही पुस्तके अवश्य वाचा... खूप छान मनोरंजन होईन... :) धन्यवाद, सागर

टारझन Sat, 05/02/2009 - 00:32
राजे .. दुनियादारी वाचून पाणवले का डॉळे ? मी बी रडलो व्हतो राव ... दुनियादारी लेखकाला आमची पण श्रद्धांजली

In reply to by टारझन

दशानन Sat, 05/02/2009 - 00:46
दुनियादारीमुळे मला मीच सापडलो ! हे कर्ज आहे सुशिचे माझ्यावर ! मी पण असाच आहे फाटका एमके माझ्यामध्ये देखील वेगळा कधी डिएसपी माझा मित्र होता वेगळा तर कधी मिनू, शिरिन मध्ये मी गुरफटलेला कधी प्रेमामुळे रक्तबंबाळ तर कधी दारुमुळे झालेली अबाळ मी असाच एक श्रेयस दुस-याला दुनियादारी शिकवता शिकवता अचानक दुनियादारी शिकलेला हरवलेल्या मित्रांमध्ये कधी श्री तर कधी नितीन शोधत असलेला संतोष बार च्या अंधा-या टेबलवर दुनियादारीचा हिशोब मांडलेला मीच तो एम के कधी श्रेयस असलेला ! क्रमशः लिहायची जराही इच्छा नव्हती पण जेथे शब्दच आटले तेथे मी काय लिहणार, त्यामुळे क्रमशः उद्याच दुसरा भाग पुर्ण टाकतो. थोडेसं नवीन !

संदीप चित्रे Sat, 05/02/2009 - 00:38
मित्रा, तुझा लेख वाचून किती आणि किती आनंद झालाय ते सांगताच येत नाहीये !! मी दुनियादारीवरचा लेख लिहिला आणि मला अजून काही मित्र मिळाले.... सगळेच जण दुनियादारीवेडे :) आपल्या दुर्दैवाने सुहास शिरवळकरांचं अकाली निधन झालं पण ते तुला त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून भेटतील. शिरवळकरांचा मुलगा माझा चांगला मित्र आहे आणि या लेखाची लिंक मी त्याला नक्की देईन. ---------------------- सागरने चांगली पुस्तकं सांगितली आहेतच शिवाय या पुस्तकांपैकी बघ कुठली वाचता येतायत -- १) कल्पांत २) ओ ! गॉड ३) अखेर ४) समांतर ५) क्षणोक्षणी ६) सॉरी सर ७) जुगार (फिरोज इराणी या पात्राचे पहिले पुस्तक) ८) झूम ९) क्षितीज १०) प्रयास आणि जी कुठली मिळतील ती !!!!! पण एक मात्र नक्की -- दुनियादारी या सगळ्यांचा मास्टर पीस आहे.

In reply to by संदीप चित्रे

दशानन Sat, 05/02/2009 - 01:07
तुमच्या लेखामुळेच तर दुनियादारीच्यामागे पडलो व सागर मुळे मला लवकरात लवकर वाचावयास मिळाली :) हे तुमचे अनंत उपकार माझ्यावर ! थोडेसं नवीन !

In reply to by संदीप चित्रे

सागर Sat, 05/02/2009 - 12:59
संदीप, खूप नशीबवान आहेस रे बाबा.. एवढ्या प्रतिभावान लेखकाच्या मुलाशी तुझी दोस्ती आहे... नक्की सांग रे त्याला ... म्हणाव त्याच्या बाबांनी संपूर्ण समाजमन हलवून सोडलं होतं.... लोक मृत्यूंजय साठी शिवाजी सावंतांना.... पानिपतासाठी विश्वास पाटीलांना ... ओळखतात. असे अनेक लेखक आहेत की ज्यांना लोक त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकासाठी ओळखतात.... पण खास लेखकासाठी पुस्तके वाचक घेतात अशा अगदी मोजक्या लेखकांमध्ये सुहास शिरवळकर होते यातच या प्रतिभावान लेखकाचे यश आहे... सुशिंची कोणतेही पुस्तक घ्यावे आणि वाचावे... अगदी निर्भेळ दिलखुलास आनंद मिळण्याची गॅरंटीच होती... एवढे सातत्याने आणि लोकांना आवडणारे लेखन करणे म्हणजे खूप मोठी तपश्चर्याच म्हणावी लागेल... अर्थात सचिन तेंडुलकरही कधीतरी शून्यवर आउट होतो तसे अगदी मोजकी १-२ पुस्तके सुशींची त्यांच्या नेहमीच्या वकूबाप्रमाणे झाली नाहीत हे ही खरे.. पण जवळपास ९९ % सुशींची पुस्तके अगदी सुंदर या कॅटेगरीत मोडतात... (सुशी प्रेमी) सागर

बेसनलाडू Sat, 05/02/2009 - 02:29
या पुस्तकावर दुसर्‍यांना इतका चांगला अभिप्राय आल्यावर आता वाचणे भागच आहे. लवकरच वाचायला मिळो ही सदिच्छा! (वाचक)बेसनलाडू

In reply to by शितल

सागर Sat, 05/02/2009 - 12:49
भारतात असाल तर http://www.erasik.com/ येथून खरेदी करु शकाल नेमकी लिंक हवी असेन तर http://www.erasik.com/books/by/Shiravalakar%20Suhas/page2/ या पानावर दुनियादारी मिळेल आणि विदेशात राहणार्‍या मित्रांसाठी http://www.rasik.com/ आहेच :) मराठी अनुवादीत व इतर अनेक चांगली पुस्तके http://www.mehtapublishinghouse.com/ येथूनही खरेदी करता येतात बर्‍याच जणांना हे माहीत असेन. पण नसेन त्यांच्यासाठी पर्वणी :) (मराठी पुस्तकप्रेमी) सागर

अवलिया Sat, 05/02/2009 - 06:54
राजे ! छान लेख ! साल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलास बघ !! (काय करावे हेच माहीत नसलेला व अनुभवाच्या जोरावर दुनियादारी शिकलेला) अवलिया

हम्म्म्म राजे नेमके शनीवारीच असले हळवे विषय तुम्ही का काढता बॉ ? दुनियादारीने एक वाचक म्हणुन खुप संपन्न केले. जेव्हडे लिहावे तेव्हडे कमीच. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

स्वाती दिनेश Sat, 05/02/2009 - 12:41
कॉलेजात असताना दुनियादारी अवचित मिळाली वाचायला. झालं काय की माझ्याऐवजी बाबा गेले लायब्ररीतलं पुस्तक बदलायला आणि त्यांना हे अगदी नवे पुस्तक आलेले दिसले. नवेकोरे म्हणजे अजून स्टँप मारुन पण झालेला नव्हता म्हणून त्यांनी उत्सुकतेने तेच पुस्तक स्टँप लवकर मारवून घेऊन घरी आणले , चाळले आणि पूर्णच वाचले . लग्गेचच मला आणि बहिणीला रेकमेंड केले.. बिल्डिंगमधल्या जवळजवळ सगळ्या पोराटोरांना जी कॉलेजात होती आणि जाऊ घातली होती अशा सगळ्यांना त्यांनी हे पुस्तक वाचायला सांगितले,:)नंतर अर्थातच पुस्तकाची पारायणे केली. विकतही घेतले होते पण ते असेच कोणाला तरी वाचायला दिले ते परतच नाही आले.. आणि कोणी नेले आहे ते आठवत नाहीये,:( आत्ताच्या आत्ता दोनदोनदा दुनियादारीवर चर्चा झालेली वाचून आठवणी ताज्या झाल्या, परत एकदा वाचायला पाहिजे आता..(आधी मिळायला हवे.) स्वाती

ठकू Sat, 05/02/2009 - 12:52
'दुनियादारी'ला जास्त प्रसिद्धी मिळाली, ती त्या कथेवर बनवलेल्या मालिकेमुळे. पण पुस्तकातला 'इफेक्ट' मालिकेमध्ये नाही आला. : सु.शिं. ची खासियत म्हणजे त्यांनी 'तेव्हा' लिहिलेल्या कथाही 'आजच्या' वाटतात. त्यांच्या 'मंदार कथा', 'अमर कथा', 'फिरोज कथा' तर प्रसिद्ध आहेतच. पण त्यांच्या 'क्लासिक' (हा शब्द सु.शि. फॅन अजिंक्यचा बरं का!) म्हणवता येतील, अशा 'रुपमती', 'जमीन आसमान' ह्या कादंब-या अवश्य वाचा. स्थळ-काळाचं बंधन तोडून या माणसाने जे काही लिहिलंय, ते 'भन्नाट' या शब्दाव्यतिरिक्त मला व्यक्त करताच येत नाही. ज्या व्यक्तिने 'राजस्थान' कधी पाहिलंच नाही, त्या व्यक्तिने 'दारा बुलंद' कथा कशा लिहिल्या असतील? त्यांच्या 'कल्पांत' या कादंबरीवरही त्याच नावाची मालिका बनवण्यात आली होती. ज्यात मिलिंद गुणाजी आणि चिन्मयी सुर्वे राघवन यांच्या मध्यवर्ती भूमिका होत्या. 'देवकी' नावाच चित्रपटही सु.शि.दांच्या कादंबरीवर आधारीत होता. ज्यासाठी त्यांना पटकथा लेखनाचा पुरस्कारही मिळाला. आपल्याला जर खरंच सु.शि.दांची पुस्तकं वाचायची असतील किंवा कलेक्शन करायचं असेल, तर प्रकाशन कंपनीचं आणि पुस्तकाचं नाव याची यादी सोबत दिली आहे. यादी इंग्रजीमध्ये असल्याबद्दल क्षमस्व. कारण मी ती ऑर्कुट वरून कॉपी पेस्ट केलेली आहे. ज्यांचे ऑर्कुट खाते आहे, ते या दुव्यावर टिचकी देऊन 'सुहास शिरवळकर कम्युनिटीची' वाटचाल पाहू शकतात.' List of Books with Publication Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 1. Marmabandh 2. Moods 3. Wonder Twelve 4. Not Guilty 5. Maranottar 6. Kshan kshan Ayushaya 7. Hi-way murder 8. Binshart 9. Mhanoon (He ek faar majeshir pustak aahe.) 10. Terific 11. Matam 12. Mutkti 13. Padadhyaad 14. Gungun 15. Sorry sir 16. Silence please 17. Madhyam 18. Sansanati 19. Sanshay 20. Tukada tukada chandra 21. Aseem 22. Veshipalikade 23. Nidan 24. Kshitij 25. Asahya 26. Nyay-anyay 27. Janiv 28. Jivghena 29. Dastan 30. Hello hello 31. Stupid 32. Barsat chandanyachi 33. Yogayog 34. Master plan 35. Saalam 36. Kill crazy 36. Dukadhuak 37. Ethun thithun 38. Kanakanane ************************************** Shashideep Prakashan Mr. Shashideep Khopkar 44, Mukundnagar, Siddharth Chamber, Pune Phone: 24220154 / Mobile: 9850150225 1. Duniyadari 2. Nimittamatra 3. Thararak 4. Kramasha 5. Operation bullet 6. Star hunters 7. Izzat 8. Gold heaven 9. Aakrosh 10. Tharrat 11. Challange 12. Safai 13. Hirvi nazar 14. Bhayanak 15. Kale yug 16. Trailor girl 17. Sannata 18. Last bullet 19. To..! 20. Sahaj 21. Dead shot 22. Panchali 23. Havyas 24. Gafil 25. Black cobra 26. Avadhavya 27. Poladi 28. Baladhya 29. Pahadi 30. Prayas सु.शिंच्या पुस्तकातील अर्पणपत्रिका पाहायच्या असतील, तर येथे टिचकी देऊन पाहता येतील. अतिशय सुंदर अर्पणपत्रिका आहेत. आणखी काही माहिती हवी असेल, तर याच धाग्यात प्रतिसाद द्या. वैधानिक इशारा: सुहास शिरवळकरांच्या 'अमर कथा' वाचून शिवाजी पार्क परिसरातील 'अमर मंझिल' नावाची आठ माळ्याची इमारत शोधून काढण्याचा मोह होतो. सर्व 'अमर कथा' कथा काल्पनिक आहेत, याची जाणीव असावी. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

ठकू Sat, 05/02/2009 - 12:55
अवांतर (पण सु.शि. फॅन्ससाठी महत्वाचे): Dilipraj Prakashan 251 C, Shanivar Peth, Pune - 411030 सु.शिंचं घर याच इमारतीत आहे, बरं का! -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

सुशिंच्या एका नितांतसुंदर पुस्तकाचा उल्लेख इथे राहुन गेला आहेसं वाटतं.. हृदयस्पर्श .... (किडनीच्या आजाराने त्रस्त एक मनस्वी कवी "लौकीक" आणि एक मैफीलीतुन गाणारी गायिका "मैत्राली" यांच्या जगावेगळ्या नात्याची कथा सांगणारी ही कादंबरी खुप सुंदर आहे.) जरुर वाचा. सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

In reply to by विशाल कुलकर्णी

सागर Fri, 05/22/2009 - 16:54
हृदयस्पर्शच नाही तर अनेक पुस्तके या यादीत राहिली आहेत :) तलखी हे त्यातील एक आजच ई-रसिक्.कॉम वरची माझी सुहास शिरवळकरांची ११ पुस्तकांची ऑर्डर पूर्ण झाली आहे. २-३ दिवसांत मला ही पुस्तके मिळतील. तेव्हा माझा अनुभव सांगेन तुम्हा सर्वांना.... ई-रसिक्.कॉम वर छान पुस्तकांचा साठा उपलब्ध आहे धन्यवाद सागर

In reply to by सागर

सागर Fri, 05/29/2009 - 22:42
मित्रांनो, आजच मला सु.शिंची मी ऑर्डर केलेली ११ पुस्तके स्पीड पोस्ट ने मिळाली. ई-रसिक.कॉम अजून पूर्ण तयार नसेन. पण सध्या संकेतस्थळावर दिलेल्या ई-मेलवर तुमची मागणी नोंदवली की पुढचा संपर्क खूप चांगल्या पद्धतीने होतो. तुमची ऑर्डर पूर्ण करायला वेळ लागत असेन तर तसेही ते सांगतात व ऑर्डर पाठवल्याचे डिटेल्स देखील तुम्हाला ईमेल केले जातात. माझा पहिला अनुभव तर नक्कीच छान आहे. आता सु.शिंच्या पुस्तकाचा आस्वाद घेतो २ दिवस सुट्टी आहे तर :) धन्यवाद सागर

अगदी त्यात कथापोर्णिमा, पांचाली, शॅली शॅली ही नावे पण महत्वाची ! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)