मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कारगिल विजय दिवसाचे निमिताने

मित्रहो · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नुकताच २६ जुलैला कारगिल विजय दिवस भारतभर साजरा झाला. तशी कारगिलच्या युद्धाविषयी बरीच माहिती असते. कारिगलचे युद्ध म्हणजे भारतीय सैन्याच्या अतुलनीय शौर्याचे, पराक्रमाचे, संयमाचे, बलिदानाचे उत्तम उदाहरण आहे. मे १९९९ साली कारगिलमधे मुश्कोह, द्रास, काक्सर, टुरटुक, बटालिक या भागातून मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी घुसखोर सैनिक LOC पार करुन भारतात घुसले. NH1A या श्रीनगर आणि लेह यांना जोडणाऱ्या मार्गाच्या समांतर शिखरांवर ताबा मिळवायचा आणि भारताचा सियाचीन कडे जाणारा मार्ग रोखायचा असा पाकिस्तानचा डाव होता. यापैकी एका जरी ठिकाणी पाकचा ताबा राहिला असता तर ती भारतासाठी कायमस्वरुपी डोकेदुखी ठरली असती. माझ्या पिढितल्या मंडळींसाठी हे युद्ध चांगलेच लक्षात राहिले कारण त्याआधी टिव्हिमिडियामधे कोणत्याही युद्धाचे या प्रमाणात प्रसारण झाले नव्हते. हे प्रसारण योग्य कि अयोग्य हा मुद्दा निराळा आहे पण त्या प्रसारणामुळे माझ्यासारख्यांच्या मनात युद्धाच्या चित्रस्मृती (Visual Memory)जाग्या आहेत. जनरल मलिक, कमांडर पुरी, कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन हनीफ, कॅप्टन बत्रा, सुभेदार योगेंद्र यादव अशी नावे सामान्य जनतेपर्यतं पोहचली. मे महिन्यापासून घुसखोरीच्या बातम्या येत होत्या. साधारण २५ मेच्या आसपास भारताने ऑपरेशन विजयची सुरवात केली आणि २६ जुलै रोजी भारताने या युद्धात पूर्ण विजय मिळविला. ९ ते १० जुलैच्या आसपास टोलोलिंग आणि टायगर हिल्सचा पूर्ण पट्टा भारतीय सैन्याच्या ताब्यात आल्यानंतर युद्ध भारताच्या बाजूने झुकले होते. ऑपरेशन विजयमधील विजय सोपा नव्हता, ५०० च्यावर सैनिकांना प्राण गमवावा लागला. या युद्धाच्या निमित्ताने दोन प्रश्न नेहमीच उपस्थित होतात १. येवढ्या मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली तर याची भारताच्या गुप्तहेर खात्याला कल्पना नव्हती का? २. भारतीय सैन्याला या युद्धासाठी मोठी किंमत का मोजावी लागली. ? पहिल्या मुद्द्यावर खूप चर्चा झाली आहे. जनरल व्ही. पी मलिक असे म्हणतात की अशी कोणतीही माहिती सैन्यापर्यंत आली नव्हती. (Discovery: Tale of Valor)गुप्तहेर खात्याचे म्हणणे वेगळे असेल. या विषयावर नक्की भाष्य करणे कठीण आहे पण मी जे वाचले त्यावरुन एक लक्षात आले की घुसखोरी झाली अशी काही माहिती असली तरी त्यातून धोक्याची कल्पना येत नव्हती. किती सैनिक आहेत, त्यांच्या नक्की जागा कोणत्या, त्यांच्याकडे असणारी शस्रास्त्रे या सर्वांची पूर्ण कल्पना नव्हती. या घुसखोरीच्या स्वरुपाचा पूर्ण अंदाज हाती असलेल्या माहितीवरुन येत नव्हता असा निष्कर्ष कदाचित काढता येईल. तसेच जी माहिती होती त्याची खातरी करुन घेता आली नव्हती. यामागे सर्वात महत्वाचे कारण होते संसाधनांचा अभाव. सर्वेक्षणासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे उपलब्ध नव्हती. आतासारखे सॅटेलाइट तंत्रज्ञान तेंव्हा विकसित व्हायचे होते. सर्वेक्षणाचा सारा भर हा मानवी सर्वेक्षणावर होता. तसेच भारतीय सैनिक त्याकाळी काश्मिर खोऱ्यात अतिरेक्यांविरुद्धाच्या विविध कारवायांमधे गुंतले असल्याने सीमेवरील काही सैन्य तिकडे हलवण्यात आले होते. या साऱ्याचा फायदा घुसखोरांनी घेतला. दुसरा मु्द्याच्या बाबतीत साधारणतः तीन कारणे सांगितली जातात. १. टायगिर हिल, टोलोलिंग, ५१४० , ४८७५, ५१९० टॉपही सारी उंच शिखरांची ठिकाण होती आणि भारतीय सैनिक त्याच्या तळाशी होते. शत्रू उंच डोंगरावर बसला असेल आणि तुम्ही खाली असाल तर त्यात तुमच्या सैन्याची हानी अधिक होते. शत्रू किती आहेत, त्यांच्याकडे शस्त्रांस्त्रांचा साठा किती आणि कशा प्रकारचा आहे याची कल्पना नसल्याने सुरवातीला इंनफँट्री युनीटचा वापर करुन भारतीय सैन्याने काही जोखीम असलेले हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात अपयश आले. २. कारगिलच्या युद्धात भारतीय वायुसेनेने देखील हल्ले केले. भारतीय वायुसेनेला सुरवातीच्या काळात तितकेसे यश मिळाले नाही. घुसखोरांचा आकडा, त्यांच्या नक्की जागा आणि त्यांच्या जवळ असणारी आयुधे याची पूर्ण कल्पना नसल्याने असे घडले. सुरवातीला बाँम्ब हल्ला करण्यासाठी विमानं बरीच खाली उडायाची त्यामुळे ती स्टिंगरच्या माऱ्याच्या अंतरात यायची. याचा फटका काही विमानांना बसला. एका विमानाचे इंजिन बिघडल्यामुळे पायलट नचिकेत राव यांनी POK च्या भागात उडी मारली आणि ते पाकच्या ताब्यात सापडले. अशाच एका उड्डाणाच्या वेळी पायलट आहुजा शत्रूंच्या हातात सापडले त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हळूहळू गोष्टी स्पष्ट होत गेल्या आणि भारतीय वायुसेनेने नंतर टारगेट हेरुन हल्ले केले. बटालिकच्या भागात वायुसेनेने केलेल्या हल्ल्यामुळे घुसखोरांचे मोठे नुकसान झाले. ३. जेंव्हा शत्रू शिखरावर आणि तुम्ही खाली अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळेला शत्रुची रसद तोडणे, वर असलेल्या शत्रूपर्यंत कोणतीही कुमक पोहचू न देणे त्यातून शत्रूला नामोहरम करणे अशी युद्धनीती असते. समस्या अशी होती शत्रूला मिळणाऱ्या मदतीचे मार्ग POK च्या भागातून जात होते. भारतीय सैन्याला LOC पार करु नये असे आदेश होते. तसेच काही मार्ग हे भौगोलिक दृष्टया भारतीय भागातून पोहचणे अशक्य होते. या साऱ्याचा परिणाम असा झाला की पाक सैन्य आणि भारतीय सैन्य आमने सामने असले तरी पाक सैन्य वर भारतीय सैन्य खाली असा प्रकार होता. बराचसा भाग थंड वाळवंटाचा असल्याने त्यात लपायला जागा नव्हत्या. त्यामुळे खालून वर चढणाऱ्या भारतीय सैन्यावर हल्ला करणे पाक सैन्याला तुलनेत खूप सोपे होते. या साऱ्याचा विचार केला तर भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आणि शौर्याची पूर्ण कल्पना येईल. तरुण ऑफिसर आणि JCO यांनी या युद्धात फार महत्वाची भूमिका बजावली. जसजसे घसुखोरांची संख्या, त्यांच्याकडे असलेला शस्त्रास्त्र साठा याचा अंदाज यायला लागला तसे मग भारतीय सैन्य आणि वायुसेना यांनी मिळून योजनाबद्ध रितीने हल्ले करायला सुरवात केली. आर्टिलरी बोलाविण्यात आली. कारगीलच्या युद्धाला कलाटणी देण्यात बोफोर्स तोफांनी मोठी भूमिका बजावली . असे म्हणतात भारतीय सैन्य कुठली आयुधे वापरु शकतो याचा अभ्यास करुन पाकिस्तानने जी तयारी केली होती त्यात बोफोर्स तोफा नव्हत्या. १० ते ३५ किमीवर मारा करु शकणाऱ्या या तोफांमुळे उंचावर असलेल्या शत्रूवर मारा करता आला. तोफांचा मारा, वरुन होणारे हवाई हल्ले याने घुसखोरांना नामोहरम करता आले. मग सैन्य खालच्या बाजूने वर जात घुसखोरांना हुसकावून लावण्यात भारतीय सैनिकांना यश आले. एकेक करीत सर्व शिखरे ताब्यात घेतली. कारगिलच्या युद्धाचे आंतरराष्ट्रिय राजकारणावर देखील दूरगामी परिणाम झाले. कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने एक मुद्दा मांडावसा वाटतो. आपण जेंव्हा सैन्याविषयी वाचतो, कविता वाचतो किंवा युद्धकथा वाचतो त्यात सैनिकांची हिंमत, शौर्य, पराक्रम आणि बलिदान या मुद्दयांवर अधिक भर असतो. सैन्याच्या शौर्य आणि पराक्रमाशिवाय कोणतीच लढाई जिंकता येत नाही हे निर्विवाद सत्य आहे. युद्ध जिंकायला त्यापलीकडे जाऊन योजना, निती आणि Operational Logistics (मराठी शब्द यंत्रणा?) ची गरज असते. याविषयी हवे तेवढे बोलले जात नाही. ते समजून घेतले जात नाही. यात सैन्य, शस्त्रात्र, त्यांच्या खान्यापिण्याची सोय या व्यतिरीक्त मेडिकलची सोय, युद्धाच्या ठिकाणी वापरायचे कपडे , सैन्याचे Acclimatization, भौगोलिक परिस्थिती, हवामान या आणि अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करुन विचार करुन योजना करावी लागते. १९७१ मधे जनरल माणेकशा यांनी त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितले होते मी युद्धाला तयार नाही मला तयारीला वेळ द्या. सामान्यांना या साऱ्याची, त्यात येणाऱ्या असंख्य अडचणींची कल्पना नसते. सैन्याच्या रचनेची माहिती नसते. मला कित्येक वर्षे Infantry Unit आणि Artillery Unit मधला फरक माहिती नव्हता. ही माहिती गुप्ततेच्या अटी सांभाळून सामान्यापर्यंत पोहचायला हवी जेणेकरुन सामान्य नागरींकांची याविषयीची समज वाढेल . आपणा सर्वांसाठीच इतिहास १९४७ साली भारत स्वतंत्र झाला इथेच संपतो. त्यापलीकडे भारताचा राजकीय आणि सैनिकी इतिहास फारसा लिहिला जात नाही वाचला जात नाही. सैनिकी शिक्षणासाठी, किंवा तज्ञ मंडळी तसा अभ्यास करीत असतात पण सामान्य माणसाला त्याची तितकी कल्पना नसते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४७, १९६२, १९६५, १९७१ आणि १९९९ साली पाच महत्वाची युद्धे झाली. भारताच्या भूमीवर घडले नसले तरी भारतीय सैन्याने १९८९ मधे श्रीलंकेत जाऊन लढाई केली. या मोठ्या लढायांव्यतिरीक्त १९६७ साली सिक्किम मधे नथूला आणि चोला ला ची लढाई, १९८४ सालचे सियाचीन वर ताबा मिळविण्यासाठी केलेले ऑपरेशन मेघदूत, १९८७ सालातील अरुणाचल प्रदेशातील ऑपरेशन फाल्कन, ऑपरेशन पराक्रम, डोकलाम, उरी, बालाकोट आणि गलवान अशा छोट्या लढाया किंवा युद्धसदृष परिस्थिती निर्माण झाली होती. नागालँड, काश्मिर या भागात सुद्धा ज्या देशविरोधी कारवाया घडल्या त्या मोडून काढण्यासाठी सुद्धा सैन्याचा वापर झाला. थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे. या सैनिकी कारवाया, लढाया, तत्कालीन आतंरराष्ट्रिय राजकिय परिस्थिती आणि राजकीय नेतृत्व या साऱ्याचा एकत्र विचार करुन निरपेक्ष विश्लेषण गरजेचे आहे. असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल. कदाचित ते या विजय दिवसाचे फार मोठे यश होईल असे वाटते. संबंधित काही पुस्तके India's War: A military History (1947 to 1971), आणि Full Spectrum (1972 to 2020) by Arjun Subrmaniam 1962 the war that wasn't आणि 1965 A WESTERN SUNRISE by Shiv Kunal Verma Ours is not reason to why by Brig R R Palsokar (श्रीलंकेतील शांतीसेनेचा अनुभव. मी वाचले नाही अजून) Kargil from Surprise to Victory by General VP Malik Himalayan Blunder by Brig Jon Dalvi (नामकाचू मधे ब्रिगेडियर दळवी आणि त्यांचे सैन्य लढले. हे पुस्तक मी वाचले नाही. या पुस्तकावर पूर्वी बंदी होती तेंव्हा हे उपलब्ध आहे की नाही ते माहिती नाही. ) डिस्कव्हरी चॅनेलवरील काही प्रोग्राम Tale of Valor Special force Operation तसेच StratnewsGlobal या युट्युब चॅनेलवर देखील याविषयावर उत्तम चर्चा होत असते. [लेखातील बरीच माहिती ही Full Spectrum या पुस्तकातून घेतली आहे. ]

वाचने 14322 वाचनखूण प्रतिक्रिया 65

श्रीगणेशा Tue, 08/02/2022 - 14:50
लेख आवडला! तेव्हासुद्धा दृकश्राव्य प्रसारमाध्यमातून खूप कमी प्रमाणात (आताच्या तुलनेत) युद्ध सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं. किंवा कदाचित त्यावेळी वयाने लहान असल्यामुळे खूप बारकावे वगैरे पाहिल्याचे आता आठवत नाही.

कर्नलतपस्वी Tue, 08/02/2022 - 18:10
सैन्याच्या रचनेची माहिती नसते. मला कित्येक वर्षे Infantry Unit आणि Artillery Unit मधला फरक माहिती नव्हता. गोपनीयता हा प्रमुख मुद्दा आसल्यामुळे ,Need to know या तत्त्वावर माहीती देण्यात येते. दुसरा मुद्दा हा आहे की ह्या माहितीचा सामान्य जनतेला तसा काहीच फायदा नसतो. सैनिकी कारवाया, लढाया, तत्कालीन आतंरराष्ट्रिय राजकिय परिस्थिती आणि राजकीय नेतृत्व या साऱ्याचा एकत्र विचार करुन निरपेक्ष विश्लेषण गरजेचे आहे. असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. अशी अनेक पुस्तके सेवानिवृत्तीनंतर बर्‍याच प्रमाणात लिहीली आहेत व प्रकाशीतही झाली आहेत. आमच्या वेळेस मिलिट्री सायन्स नावाचा एक ऐच्छिक विषय होता. एन सी सी ची मुले तो घेत ,आताचे माहीती नाही. सैनिकी इतिहास फारसा लिहिला जात नाही वाचला जात नाही. सन सतराशे पासुन ते आतापर्यंत अनेक पुस्तके लिहीली आहेत. अंतरजालावर सुद्धा उपलब्ध आहेत. ज्यांना रूची आहे ते जरूर वाचतात. सरकार सुद्धा बरेच पेपर्स प्रकाशीत करते. बाकी लेख चांगला आहे.

मित्रहो Wed, 08/03/2022 - 14:13
धन्यवाद श्रीगणेशा आणि कर्नलतपस्वी @ कर्नलतपस्वी गोपनीयता पाळून जी माहिती इंटरनेटवर सर्रास उपलब्ध आहे तिच सांगावी. शालेय शिक्षणात नागरीक शास्त्राबरोबर सैन्याच्या रचेनेविषयी माहिती द्यावी असे माझे मत होते अर्थात गोपनीयता पाळून.

क्लिंटन Wed, 08/03/2022 - 15:47
लेख आवडला. या निमित्ताने काही गोष्टी लिहितो. १. पाकिस्तानचा कारगीलवर डोळा आहे हे भारत सरकारला अजिबात माहित नव्हते का? इथे भारत सरकार लिहित आहे कोणत्या पक्षाचे सरकार याचा संबंध नाही. २००३ मध्ये बेनझीर भुत्तोंनी म्हटले होते की परवेझ मुशर्रफ पाकिस्तानी सैन्याचा DGMO असताना त्याने पंतप्रधान बेनझीरकडे कारगील सारखे ऑपरेशन करायचा प्रस्ताव आणला होता. पण तो प्रस्ताव बेनझीरने नाकारला. https://www.rediff.com/news/2003/jun/25pak5.htm आता मुशर्रफ नक्की कोणत्या काळात DGMO होता हे आंतरजालावर तपासले तर तो काळ १९९३ ते १९९५ असा होता. बेनझीर १९९३-१९९६ या काळात पंतप्रधान होती. म्हणजे कालावधीचा मेळ बसत आहे. विकीपीडियावरील कारगील युध्दावरील लेखात अगदी झिया उल हक अध्यक्ष असतानाही असे प्रस्ताव दिले गेले होते असे काही पुस्तकात म्हटले आहे असा उल्लेख आहे. ती पुस्तके अर्थातच मी वाचलेली नाहीत पण झियाचा भारतद्वेष आणि काश्मीर मिळविण्यासाठी टोपॅक म्हणून योजना त्याने सुरू केली होती ते पाहता अगदी झियाच्या काळात म्हणजे १९८८ पूर्वी अशी कोणती तयारी पाकिस्तानने केली असेल हे अगदी असंभवनीय नसावे. आता एक गोष्ट माझ्या आठवणीतून लिहितो. कारगीलमध्ये पाकिस्तान घुसखोरी करायचा प्रयत्न करेल असे आमच्याकडे इनपुट्स आहेत हे १९९१ मध्ये हे सरकारच्या बाजूने कोणीतरी (बहुदा गृहमंत्री शंकरराव चव्हाण) संसदेत म्हणाले होते अशी बातमी आल्याचे पक्के आठवते. कारण त्यानंतरच कारगील हे ठिकाण कुठे आहे हे अ‍ॅटलासमध्ये बघितले होते हे पण आठवते. आणि १९९९ मध्ये जेव्हा खरोखरच कारगीलमध्ये घुसखोरी झाली तेव्हा कारगील हे नाव मला तरी त्या कारणाने अपरिचित नव्हते. याविषयीचा पुरावा विचाराल तर तो माझ्याकडे नाही. आंतरजालावर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हींच्या चर्चांचे पी.डी.एफ उपलब्ध आहेत पण त्यातून ही माहिती काढणे जिकरीचे काम आहे, विशेषतः नक्की तारीख आणि हे उल्लेख लोकसभेत होते की राज्यसभेत हे माहिती नसेल तर. शंकरराव चव्हाणांचे ते स्टेटमेंट शोधायला मी अगदी जंग जंग पछाडले आहे असे म्हटले तरी चालेल पण तसे काही उल्लेख मिळाले नाहीत. तसे काही उल्लेख मिळत नाहीत तोपर्यंत त्याविषयी कोणतेही ठोस विधान करता येणार नाही. तरीही १९९१ सोडा- बेनझीर भुत्तोच्या दुसर्‍या कार्यकाळात म्हणजे १९९३-१९९६ या काळात असे काही डाव शिजत असतील तर त्याचा पत्ता भारत सरकारला नव्हता आणि खरोखरच घुसखोरी झाल्यावरच आपल्याला जाग आली? (अवांतरः ९/११ व्हायची शक्यता आहे हे अमेरिकन सरकारला २००१ पूर्वीच माहित होते याविषयीचे सगळे आंतरजालीय पुरावे अमेरिकन सरकारने मिटवले आहेत ना? तसे काही भारतातही झाले असेल का? त्यातही १९९१ मध्ये आंतरजालावर फार काही असायची शक्यता थोडी. तरीही लोकसभा-राज्यसभेच्या मिनिट्समधून पण ते उल्लेख गुपचूप हटविले असतील का? पूर्वीच्या काळी युजनेट म्हणून ग्रुप असायचे. भारताबाहेर, विशेषतः अमेरिकेत असलेल्या भारतीयांचा वावर त्यावर असायचा. त्यावेळचे जुने ग्रुप आंतरजालावर कुठेतरी मिळाले आणि त्यात हा उल्लेख सापडला तर बरे होईल.) २. कारगील युध्दाच्या वेळेस संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी काही बेजबाबदार वक्तव्ये केली होती. कारगील आणि द्रास-तोलोलिंग वगैरे भागात पाकिस्तानी घुसखोर शिरले आहेत हे तोपर्यंत अगदी मिडियालाही १५ मे च्या सुमारासच माहित झाले होते. प्रत्यक्ष हवाई हल्ल्यांना सुरवात झाली २६ मे रोजी. त्याच्या ९ दिवस आधी म्हणजे १७ मे रोजी जॉर्ज फर्नांडिसांचे वक्तव्य होते की पाकिस्तानी घुसखोरांना ४८ तासात हाकलून देता येईल. https://www.rediff.com/news/1999/may/17kash.htm . ४८ तास म्हणजे २ दिवस. प्रत्यक्षात युध्द २ महिने चालू होते. ४८ तासात घुसखोरांना हाकलू वगैरे गोष्टी जॉर्ज फर्नांडिस नक्की कोणत्या आधारावर बोलले होते? त्यांनाही परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना नव्हती असे म्हणायचे का? हे संरक्षणमंत्र्यांसारख्या मोठ्या माणसाला शोभले का? जॉर्ज फर्नांडिसांचे दुसरे वक्तव्य म्हणजे युध्द सुरू झाल्यानंतरचे- जून १९९९ मधील. तेव्हा ते म्हणाले होते की कारगील घुसखोरीची पाकिस्तानच्या पंतप्रधान आणि आय.एस.आय ला कल्पना असेलच असे नाही. त्यातून चित्र काय उभे राहिले? तर आपले सैनिक प्राण पणाला लाऊन लढत आहेत आणि आपलेच संरक्षणमंत्री पाकिस्तानच्या पंतप्रधानांना क्लीन चीट देत आहेत. नवाझ शरीफना समजा कारगील घुसखोरीविषयी कल्पना नव्हती हे गृहित धरले तरी हे युध्द सुरू असताना जाहीरपणे बोलायची काय गरज होती? तसेही पाकिस्तानात सैन्यच खरे सत्ताधारी असते हे जगजाहीर आहे तेव्हा हे वाक्य जाहीरपणे बोलून पाकिस्तानात फार काही फूट वगैरे पडायचा संबंधच नव्हता कारण तिथे पंतप्रधानाला फार किंमतच नाही. बाकी कारगील आणि आजूबाजूच्या भागात घुसखोरी होत आहे याविषयी फेब्रुवारी-मार्चमध्येच दिल्लीला लष्करी अधिकार्‍यांची पत्रे गेली होती हे त्यावेळेसही आले होते. तरीही त्याविषयी काहीही न करणे ही वाजपेयींच्या सरकारची अक्षम्य चूक होती. वाजपेयी अनेकदा झोपून राहिले आणि जोरदार धक्का बसल्यावर मग खडबडून जागे झाले हे नंतरही झाले होते. त्यातील एक सौम्य उदाहरण म्हणजे आग्रा परिषदेच्या वेळेस मुशर्रफ भारतात आलेला असताना त्याच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण पाकिस्तानात चालू होते आणि त्याचा आपल्या सरकारला पत्ता नव्हता. दुसरे कितीतरी जास्त गंभीर उदाहरण म्हणजे १ ऑक्टोबर २००१ रोजी काश्मीर विधानसभेच्या बाहेर मोठा बॉम्बस्फोट झाला होता आणि तो काश्मीर विधानसभेवरचाच हल्ला होता. तेव्हा हेच दिल्लीत संसदेवर झाले तर काय होईल हा प्रश्न अनेक सामान्यांनाही पडला असेल. तरीही वाजपेयी सरकार झोपून राहिले आणि त्यानंतर दोनच महिन्यांनंतर संसदेवर हल्ला झालाच. केवळ नशीब बलवत्तर म्हणून आपण त्या महाभयानक प्रसंगातून सुटलो. खरं तर फिजीत झाले त्याप्रमाणे अख्खे मंत्रीमंडळ ओलीस ठेऊन वाटेल त्या मागण्या मान्य करून घेणे वगैरे काहीतरी प्रकारच व्हायचा त्या दिवशी. असो. कारगीलमध्ये सुरवातीला झोपून राहिल्यानंतर झालेल्या युध्दात झालेला विजय (?) म्हणजे वाजपेयींचे खंबीर नेतृत्व वगैरे प्रचार करून १९९९ च्या निवडणुकीत विजय मात्र त्यांनी मिळवला.

कर्नलतपस्वी Wed, 08/03/2022 - 16:41
Himalayan Blunder by Brig Jon Dalvi अमेझोनवर उपलब्ध आहे. @क्लिंटन पाकिस्तानचा कारगीलवर डोळा आहे हे भारत सरकारला अजिबात माहित नव्हते का? काश्मीर वर पाकिस्तान चा डोळा आहे हे सुर्य प्रकाशात इतकेच स्वच्छ आहे. देशाच्या विभाजन पासुन त्याने अनेक प्रयत्न केले व इथून पुढे करतच रहाणार यात मला तरी शंका नाही. बाकी राजकारणात मला शिरायचे नाही.

श्रीगुरुजी Wed, 08/03/2022 - 18:11
कारगिल, द्रास इ. ठिकाणे सुमारे १४०००-१८००० फूट उंचीवर आहेत जी बहुतांशी वर्षातील बहुसंख्य काळ बर्फाच्छादित असतात. विशेषतः हिवाळ्यात तापमान खूप अंश शून्य अंशाखाली असते. बर्फाळ वाऱ्यामुळे तेथे वास्तव करणे जवळपास अशक्य असते. मुख्य म्हणजे जवळपास सर्व रस्ते बर्फाखाली असल्याने कोणत्याही प्रकारची वाहतूक, कोणत्याही वस्तूंचा किंवा औषधांचा किंवा अन्नाचा पुरवठा करण्यासाठी फक्त हेलिकॉप्टर वापरता येते व ते सुद्धा हवामान अनुकूल असेल तर. त्यामुळे १९८५ नंतर केव्हा तरी भारतीय व पाकिस्तानी लष्करात एक अलिखित स्वरूपाचा करार झाला होता. हिवाळ्यात दोन्ही बाजूंचे सैन्य शिखरे रिकामी करून आपापल्या भागात कमी उंचीवर परत जायचे व हिवाळा संपला की परत शिखरांवर जाऊन आपापल्या भागांचे संरक्षण करायचे. हा प्रघात अनेक वर्षे सुरू होता. प्रतिकूल हवामानामुळे आपल्या सैन्याची जीवितहानी टाळणे हा दोन्ही देशांचा उद्देश होता. परंतु १९९९ च्या हिवाळ्यात सुरूवातीला दोन्ही बाजूंचे सैन्य कमी उंचीवर आल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने गुपचूप अत्यंत कडक उन्हाळ्यात आपले सैन्य परत शिखरांवर पाठवून भारतीय हद्दीतील काही शिखरांवर कब्जा केला व त्यातून पुढे कारगिल युद्ध घडले. एकदा युद्ध सुरू झाले की १९४८ प्रमाणे संयुक्त राष्ट्रसंघ, अमेरिका अशांकरवी भारतावर दबाव आणून दोन्ही बाजूच्या सैन्याला आहे तेथेच थांबायला लावायचे जेणेकरून आपण बळकावलेली शिखरे आपल्याच ताब्यात राहतील अशी योजना होती. यासंदर्भात खालील परिच्छेद पहा. Indian posts along the LoC at the mountain peaks were vacated before winter. The Pakistanis did likewise on their side of the Line of Control (LoC). This was an understanding between the two sides due to the inhospitable living conditions at posts 14,000 to 18,000 feet high, with heavy winter snowfall cutting them off from the rest of the world. Most of the roads to these posts were either not motorable or non-existent. Artillery guns - crucial for destroying enemy bunkers high up in the mountains or for accurately firing on enemy troops hiding behind boulders - were inadequate. Surveillance by high-technology equipment such as Unmanned Aerial Vehicles were not there. The Pakistan Army took advantage of these shortcomings, especially the lack of Indian troops during winters, and intruded into Mushkoh, Dras, Kargil, Batalik and Turtuk sub-sectors, between Zojila and Leh. They crossed the LoC and intruded 4-10 km into Indian territory and occupied 130 winter-vacated Indian posts. Pakistan wanted to cut off the highway connecting Srinagar with Leh, thereby cutting off Ladakh and Siachen –– a move India didn’t expect. https://m.economictimes.com/news/defence/kargil-war-what-happened-20-years-ago-and-why-it-may-not-happen-again/articleshow/70371791.cms हे सर्व झाले कारण वाजपेयी झोपलेले होते, भारतीय सैन्य सावध नव्हते वगैरे आरोप माझ्या मते पूर्ण चुकीचे आहेत. १९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन Wed, 08/03/2022 - 21:46
या सगळ्या गोष्टी मलाही माहित आहेत. त्यावेळी आणि नंतरही भाजपविरोधक जेव्हा जेव्हा कारगील वर प्रश्न उभे करायचे तेव्हा तेव्हा मी पण अशाप्रकारेच बचाव करायचो. तरीही
१९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.
पाकिस्तानने केलेले कोणते करार प्रामाणिकपणे पाळले आहेत? म्हणजे कोणताही करार पाकिस्तान सध्या पाळत असेल तो कधीतरी मोडून विश्वासघात करायच्या उद्देशानेच. हे जनसंघ आणि रा.स्व.संघाची पार्श्वभूमी असलेल्या वाजपेयींना अधिक चांगल्या प्रकारे माहित असल्याने ते अधिक सावध असतील अशी अपेक्षा नक्कीच होती. त्यावेळेस नक्की काय झाले हे आपल्यासारख्याला बाहेर बसून सांगता येणार नाही. कारगीलमध्ये घुसखोरी होत आहे याविषयी अ‍ॅक्शनेबल इनपुट्स लष्कराकडून गेले होते की नाही याविषयी दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जातात तेव्हा त्याविषयी काही बोलत नाही. पण वाजपेयी कमालीचे सौम्य होते हे त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेच होते. फारूख अब्दुल्लासारख्या हरामखोराला त्यांना उपराष्ट्रपती बनवायचे होते हे वाजपेयींच्या पी.एम.ओ मध्ये असलेल्या अमरजितसिंग दुलातच्या (ज्याने भविष्यात आय.एस.आय च्या माजी प्रमुखाबरोबर संयुक्तपणे पुस्तक लिहिले) Kashmir: The Vajpayee years या पुस्तकात लिहिले आहे. ते कितपत खरे होते याची कल्पना नाही पण मुळात ए.एस.दुलातसारखा माणूस मुद्दामून पी.एम.ओ मध्ये नियुक्त करणे, हुर्रियत कॉन्फरन्सबरोबर बोलणी सुरू करणे वगैरे गोष्टी पाहता वाजपेयींना कारगील युध्दाच्या बाबतीतही benefit of the doubt देता येईल असे वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

निनाद Wed, 08/10/2022 - 10:59
वाजपेयी कमालीचे सौम्य होते हे त्यानंतर घडलेल्या अनेक घटनांमधून दिसून आलेच होते.
वाजपेयी कमालीचे नेभळट आणि पाणचट होते. त्या वेळीच कारगिल वर हल्ल केला म्हणून त्याची शिक्षा पाक ला करायला पहिजे होती. तसेच या युद्धाची किंमत पाक कडून पैशातही वसूल करायला हवी होती. खरं तर ही अजूनही करता येईल.

In reply to by निनाद

सुबोध खरे Wed, 08/10/2022 - 12:08
वाजपेयी कमालीचे नेभळट आणि पाणचट होते तसे असते तर त्यांनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता अणुस्फोट केले नसते. प्रत्येक वेळेची परिस्थिती काय असते हे आपल्याला सहजासहजी कळत नाही. शिक्षा म्हणजे नक्की काय करायला हवे होते? कारगिल युद्धात पाकिस्तानचे ४०००-५००० सैनिक मृत्युमुखी पडले आणि त्यांना साधे सन्मानाने अंत्यसंस्कार उपलब्ध केले गेले नाहीत. यापेक्षा वाईट म्हणजे भारतीय हुतात्मा सैनिकांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी, थोडा फार पैसा आणि मोठ्या प्रमाणावर सन्मान मिळाला. तुलनेत हे पाकिस्तानी सैनिकांना जास्त डाचत राहिले. कारण दोन्ही कडे सैनिक स्वतः च्या देशासाठीच लढत होते. मग त्याचा पाया विश्वासघाताचा आहे कि नाही हा प्रश्न सैनिकांचा नसतो तर राजकारण्यांचा असतो. (उदा श्रीलंकेत सैन्य पाठवणे चूक कि बरोबर हा प्रश्न / लष्कराचा /सैनिकाचा नसून सरकारचा होता ) पाकिस्तानची जगभरात नाचक्की झाली. याशिवाय त्यांच्या लष्कराचे नाक कापले गेले.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी Wed, 08/10/2022 - 14:00
भारताने हवाई हल्ले सुरू केल्यानंतर युद्ध थांबविण्यासाठी भारतावर दबाव टाकावा ही मागणी करण्यासाठी नवाज शरीफ आधी चीनला व नंतर अमेरिकेला गेले होते. चीनने तटस्थ भूमिका घेतल्याने शरीफ अमेरिकेला जाऊन क्लिंटनना भेटले. परंतु क्लिंटननी अनेकदा वाजपेयींना भेटायला बोलविल्यानंतर, पाकिस्तानने कोणत्याही अटींशिवाय आपले सैनिक मागे घेतल्यानंतरच मी भेटीस येईन असे सांगून अमेरिकेत जाण्यास नकार दिला. Clinton had invited Vajpayee to Washington for a face-to-face meeting with Sharif but the Indian Prime Minister had declined to undertake the visit in view of the then security situation. Clinton had informed Vajpayee after intensive parleys with Sharif in Washington in early July 1999 that he was "holding firm on demanding the withdrawal of Pakistani troops to the Line of Control." Interestingly, according to Riedel''s account, Sharif briefed an angry Clinton on his frantic efforts during that period to engage Vajpayee and get a deal that would allow Pakistan to withdraw with some face saving. म्हणे वाजपेयी नेभळट होते. https://www.google.com/amp/s/www.oneindia.com/amphtml/india/kargil-when-vajpayee-stood-firm-and-got-nawaz-sharif-to-buckle-2757797.html

In reply to by श्रीगुरुजी

अर्जुन Wed, 08/10/2022 - 21:32
कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा या घाणेरड्या योजनेमागे कोण आहे हे अस्पष्ट होते, पण NH-1D वर जोरदार गोळीबार झाल्यामुळे हे स्पष्ट झाले. मुजाहिदांकडे असा दारुगोळा असणे अशक्य होते आणि हे स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्य होते जे या मुजाहिदांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होते (काही वर्षांनंतर अनेक वरिष्ठ पाक लष्करी नेत्यांनी याची पुष्टी केली की तेथे कोणताही मुजाहिद नव्हता. संपूर्ण घुसखोरी NLI फोर्स द्वारा पाकनेच केली होती. ). मे १९९९ च्या उत्तरार्धात जेव्हा घुसखोरांचा खरा चेहरा उघड झाला व भारताने एका महिन्याच्या आत आपल्या ३ पायदळ तुकड्या हलवल्या आणि टेकडीच्या माथ्यावर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर सुरू केला. विभागीय स्तरावरील या सैन्याच्या हालचालीमुळे आणि वायूद्लाच्या वापरामुळे पाकिस्तानचे लष्करी नियोजक घाबरले कारण त्यांना छोट्या प्रमाणातील घुसखोरीला इतक्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. भारताने केलेल्या मोठ्या प्रतिहल्ल्याचा बचाव करण्यासाठी पाकीस्तानला आपले हवाई दल आणि पायदळ आणावे लागले पण आता पाकिस्तानसाठी समस्या अशी होती की ते मुजाहिदांच्या बूरख्या मागून लढत होते आणि पायदळ आणि हवाईदल आणल्याने कारगिल घुसखोरीमध्ये पाकची भूमिका जाहीर होईल. या प्रकरणात, भारताने एलओसी ओलांडून हल्ला करत आहे का? याची पाकिस्तान वाट पाहत होता, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे युद्धात सामील होण्याची आणि पुरवठा लाइनचे रक्षण करण्याची आणि कारगिल एचटीएसवर केवळ त्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाच्या नावाखाली आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच LOC ओलांडू नये असे नवी दिल्लीतील उच्च कमांडने स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच तेव्हा पाकिस्तानने आपली पूर्ण युध्याची तयारी ठेवली होती. पाकिस्तान पंजाब किंवा राजस्थानमध्ये इतर आघाड्या उघडण्याची तयारी केली होती तर भारताच्या सैन्याकडे मोठ्या पायदलाला तात्काळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा अभाव होता. जरी भारत संख्यात्मक सर्व आघाड्यांवर वरचढ होता तरी त्यांची काही लष्करी उपकरणे सेवायोग्य स्थितीत नव्हती. या घुसखोरीमुळे जे 524 भारतीय जवान शहीद झाले आणि 1,363 जखमी झाले त्याची संख्या बर्याच प्रमाणात वाढु शकली असती. जून 1999 च्या सुरुवातीस हे अगदी स्पष्ट झाले होते की, या घुसखोरीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा थेट सहभाग होता, बीजिंगमधून मुशर्रफचा फोन कॉल टॅप करून भारताने जगासमोर ठेवला होता.{ https://newsmobile.in/articles/2018/07/26/the-kargil-tape-that-nailed-pakistan/} यामुळे भारताला अमेरिकेने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी दिली कारण हे तथाकथित मुजाहिद हे नियमित पाक सैनिकच असूनही आम्ही बॉर्डर ओंलाडत नाही आहोत या तथ्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे भारताला काही आखाती देशांनी देशांसह जागतीक मत आपल्या बाजूला वळवण्यास करण्यास मदत झाली. वाजपेयीचे वरील योगदान मान्य करुनही सांगावेसे वाटते की, त्यांनी मिडिआला [ उदा. बरखा दत्ता]जे कारगील घूसखोरीच्या वेळेला दिलेल्या अमरर्यादीत मोकळीकचे सैन्याला प्राणाहूतीचे मोल द्यावे लागले.

In reply to by अर्जुन

मित्रहो गुरुवार, 08/11/2022 - 10:37
जर का भारत पाकच्या हद्दीत गेला असता तर पाकिस्तानला भारत आमच्या हद्दीत घुसला असा कांगावा करुन मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवता आले असते. सध्या Surprise to Victory वाचायला सुरवात केली आहे. बघू त्यात या अनुषंगाने काही येते का? धन्यवाद अर्जुन

In reply to by मित्रहो

सुबोध खरे गुरुवार, 08/11/2022 - 12:03
जर का भारत पाकच्या हद्दीत गेला असता तर पाकिस्तानला भारत आमच्या हद्दीत घुसला असा कांगावा करुन मोठ्या प्रमाणात सैन्य उतरवता आले असते. नाही. असं झालं असतं तर सर्वंकष युद्ध झालं असतं. पण तेवढी पातळी वर न्यायची आहे कि नाही याची मानसिक तयारी सरकारची होती का ते माहिती नाही. अर्थात असे युद्ध झाले असते तर ते पाकिस्तानला दुप्पट महाग पडले असते हि वस्तुस्थिती आहे. माझ्या वाचनाप्रमाणे अमेरिकेने श्री वाजपेयी याना सांगितले होते कि तुम्ही वाद वाढवू नका. आम्ही पाकिस्तानला वेसण घालतो. पाकिस्तानने त्यांच्या एफ १६ साठी लांब पल्ल्याच्या ५०० क्षेपणास्त्रांची (AMRAAM) मागणी केली होती ती मागणी अमेरिकेने पूर्ण केली नाही. हि मागणी पुढे अमेरिकेने २००७ मध्ये पूर्ण केली. याच क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या एफ १६ विमानांनी विंग कमांडर अभिनंदन वर्तमानचे मिग २१ पाडले होते. https://www.researchgate.net/publication/293743162_Pakistan_makes_biggest_ever_AMRAAM_buy यामुळे हे युद्ध कारगिल पुरते मर्यादित राहिले. भारताची जी काही हानी झाली ती सुरुवातीला ( या वेळेपर्यंत) झाली होती. एकदा भारताने वायुदल आणून बॉम्ब वर्षाव सुरु केला त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याला हवेतून आणि जमिनी वरून होणाऱ्या माऱ्यापुढे टिकाव धरणे अशक्य झाले आणि त्यांच्या सैन्याची बरीच हानी झाली.

In reply to by श्रीगुरुजी

अर्जुन Wed, 08/10/2022 - 21:32
कारगिल युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरीचा जेव्हा तपास केला गेला तेव्हा या घाणेरड्या योजनेमागे कोण आहे हे अस्पष्ट होते, पण NH-1D वर जोरदार गोळीबार झाल्यामुळे हे स्पष्ट झाले. मुजाहिदांकडे असा दारुगोळा असणे अशक्य होते आणि हे स्पष्टपणे पाकिस्तानी सैन्य होते जे या मुजाहिदांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत होते (काही वर्षांनंतर अनेक वरिष्ठ पाक लष्करी नेत्यांनी याची पुष्टी केली की तेथे कोणताही मुजाहिद नव्हता. संपूर्ण घुसखोरी NLI फोर्स द्वारा पाकनेच केली होती. ). मे १९९९ च्या उत्तरार्धात जेव्हा घुसखोरांचा खरा चेहरा उघड झाला व भारताने एका महिन्याच्या आत आपल्या ३ पायदळ तुकड्या हलवल्या आणि टेकडीच्या माथ्यावर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर सुरू केला. विभागीय स्तरावरील या सैन्याच्या हालचालीमुळे आणि वायूद्लाच्या वापरामुळे पाकिस्तानचे लष्करी नियोजक घाबरले कारण त्यांना छोट्या प्रमाणातील घुसखोरीला इतक्या मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. भारताने केलेल्या मोठ्या प्रतिहल्ल्याचा बचाव करण्यासाठी पाकीस्तानला आपले हवाई दल आणि पायदळ आणावे लागले पण आता पाकिस्तानसाठी समस्या अशी होती की ते मुजाहिदांच्या बूरख्या मागून लढत होते आणि पायदळ आणि हवाईदल आणल्याने कारगिल घुसखोरीमध्ये पाकची भूमिका जाहीर होईल. या प्रकरणात, भारताने एलओसी ओलांडून हल्ला करत आहे का? याची पाकिस्तान वाट पाहत होता, त्यामुळे त्यांना अधिकृतपणे युद्धात सामील होण्याची आणि पुरवठा लाइनचे रक्षण करण्याची आणि कारगिल एचटीएसवर केवळ त्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाच्या नावाखाली आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळाली असती आणि त्यामुळेच LOC ओलांडू नये असे नवी दिल्लीतील उच्च कमांडने स्पष्टपणे नमूद केले होते. तसेच तेव्हा पाकिस्तानने आपली पूर्ण युध्याची तयारी ठेवली होती. पाकिस्तान पंजाब किंवा राजस्थानमध्ये इतर आघाड्या उघडण्याची तयारी केली होती तर भारताच्या सैन्याकडे मोठ्या पायदलाला तात्काळ समर्थन देण्यासाठी लॉजिस्टिक पायाभूत सुविधांचा अभाव होता. जरी भारत संख्यात्मक सर्व आघाड्यांवर वरचढ होता तरी त्यांची काही लष्करी उपकरणे सेवायोग्य स्थितीत नव्हती. या घुसखोरीमुळे जे 524 भारतीय जवान शहीद झाले आणि 1,363 जखमी झाले त्याची संख्या बर्याच प्रमाणात वाढु शकली असती. जून 1999 च्या सुरुवातीस हे अगदी स्पष्ट झाले होते की, या घुसखोरीमध्ये पाकिस्तानच्या सैन्याचा थेट सहभाग होता, बीजिंगमधून मुशर्रफचा फोन कॉल टॅप करून भारताने जगासमोर ठेवला होता.{ https://newsmobile.in/articles/2018/07/26/the-kargil-tape-that-nailed-pakistan/} यामुळे भारताला अमेरिकेने पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढवण्याची संधी दिली कारण हे तथाकथित मुजाहिद हे नियमित पाक सैनिकच असूनही आम्ही बॉर्डर ओंलाडत नाही आहोत या तथ्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे भारताला काही आखाती देशांनी देशांसह जागतीक मत आपल्या बाजूला वळवण्यास करण्यास मदत झाली. वाजपेयीचे वरील योगदान मान्य करुनही सांगावेसे वाटते की, त्यांनी मिडिआला [ उदा. बरखा दत्ता]जे कारगील घूसखोरीच्या वेळेला दिलेल्या अमरर्यादीत मोकळीकचे सैन्याला प्राणाहूतीचे मोल द्यावे लागले.

मित्रहो Wed, 08/03/2022 - 18:57
धन्यवाद श्रीगुरुजी, क्लिंटन @ कर्नलतपस्वी पुस्तकाच्या माहितीबद्दल धन्यवाद उत्तम चर्चेबद्दल धन्यवाद मला वाटते कुठलीही मोठी घटना घडली की पहिला प्रश्न हाच उपस्थित होतो की गुप्तहेर खात्याला याची माहिती नव्हती का. त्यांनी माहिती पुरवली नाही का. माहिती दिली तर सरकारने काय केले, सैन्यापर्यंत ही माहीती पुरविली का वगैरे. जनरल मलिक नेहमीच त्याचा इन्कार करतात. त्यांच्या पुस्तकाचे नांव सुद्धा Surprise to Victory असे आहे. असे प्रश्न येतात त्याचा खूप ऊहापोह होतो. सरकार दरबारी त्याने काही फरक पडत असेलही तरीही या चर्चातून सामान्यांना फार काही हाती लागत नाही. सर्व एकमेकांना दोष देत असतात. पाकिसत्तानचा काश्मिर डोळा आहे हे कोणीही सांगू शकतो. पाकसैन्य, घुसखोर कारगिल भागातून येऊ शकतात याची कल्पना १९४७ पासून होती. तेंव्हाही त्याभागातून घुसखोरी झाली होती. मुळात काश्मिरच्या भागात घुसखोरी सतत होत असते. सतत घुसखोरांना हुसकावून लावण्यात येते. त्यामुळे घुसखोरी होणार आहे इतकेच इनपुट असेल तर त्यावर किती गांभीर्याने घेतले जाईल ही शंका आहे. एक योजनाबद्ध प्रकारे घुसखोरी होणार आहे. अगदी द्रासपासून टुरटुक पर्यंत एकाच वेळेस घुसखोरी होणार आहे. असे खातरीचे इनपुट होते अशी माहिती मिळत नाही. कदाचित तसे इनपुट असेल किंवा नसेलही. काहींच्या मते ऑक्टोबर १९९८ पासून घुसखोर येत होते. बेनझीर भुट्टो यांनी त्यांना मुशरफ यांनी अशा प्लॅनबद्दल सांगितले होेते आणि भुट्टो यांनी तो प्लॅन नाकारला हे कारगील झाल्यानंतर सांगितले. त्यावर किती विश्वास ठेवावा असा प्रश्न आहे. जर खरच तसे झाले असेल तर मात्र भारत सरकारला याची कल्पना असायला हवी होती. तशी कल्पना नसने एक मोठे अपयश आहे. अलिखित करार वगैरे मला नंतर केलेला प्रपोगंडा वाटतो. लिखित कराराचे उल्लंघन झाले असते तर विषय वेगळा असता. आंतरराष्ट्रिय राजकारणात लिखित करार सुद्धा बरोबर पाळल्या जात नाही तिथे अलिखित कराराचे उल्लंघन.

In reply to by मित्रहो

क्लिंटन Wed, 08/03/2022 - 22:48
आंतरराष्ट्रिय राजकारणात लिखित करार सुद्धा बरोबर पाळल्या जात नाही तिथे अलिखित कराराचे उल्लंघन.
आणि त्यातही पाकिस्तानसारखा देश केलेले करार (समजा असा करार केला असलाच तर) प्रामाणिकपणे पाळेल ही अपेक्षा करणेच मुळात भाबडेपणाचे नाही का?

In reply to by क्लिंटन

श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2022 - 00:02
हा तसा लिखित करार वगैरे नव्हता. हिवाळ्यात अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे युद्ध न करताही दोन्ही बाजूने जीवितहानी होत होती. जरी काही सैनिक जगले तरी ३-४ महिने -३० किंवा त्यापेक्षा कमी तापमानात तेथे राहणे, वेगवान बर्फाळ वारा सहन करणे, अन्न किंवा इतर वस्तू केव्हा मिळतील याची कोणतीही शाश्वती नसणे यामुळे सैनिकांच्या मनोधैर्यावर वाईट परीणाम होत होता. हे टाळण्यासाठी दोन्ही देश आपापसात ठरवून आपले सैन्य कमी उंचीवर आणत असत. ही व्यवस्था १० वर्षांहून अधिक काळ विनाव्यत्यय सुरू होती. त्यामुळे १९९९ मध्ये पाकिस्तान इतक्या प्रतिकूल वातावरणात वेगळीच चाल खेळेल असे लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा वाटले नसावे. आधीच्याच वर्षी वाजपेयी बसने पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे ते सुद्धा निर्धास्त असावे.

In reply to by श्रीगुरुजी

क्लिंटन गुरुवार, 08/04/2022 - 09:31
मुळे १९९९ मध्ये पाकिस्तान इतक्या प्रतिकूल वातावरणात वेगळीच चाल खेळेल असे लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा वाटले नसावे. आधीच्याच वर्षी वाजपेयी बसने पाकिस्तानात गेले होते. त्यामुळे ते सुद्धा निर्धास्त असावे.
असे निर्धास्त राहायलाच मी वाजपेयी झोपून राहिले असे म्हणतो. पाकिस्तानचा एकूण स्वभाव बघता एकीकडे मैत्रीच्या मोठ्या मोठ्या गप्पा करणार आणि दुसरीकडे विश्वासघात करणार हे वेगळे सांगायला हवे का? जनसंघ हिंदुत्वाचे राजकारण करत आला आहे. मग हिंदू समाजातला दोष - शत्रूच्या गोड बोलण्याला फसून गाफिल राहणे हा मुळच्या जनसंघाच्या नेत्यांना माहित नव्हता? या दोषाचा अभ्यास असल्याने ते त्याला बळी पडायला नको होते पण तरीही तेही त्याला बळी पडलेच. ३-४ महिने आधी लाहोर घोषणापत्रावर सही झाली आणि स्वतः वाजपेयी तिथे गेले होते असे वातावरण असेल तर त्यावेळेस अधिक सावध राहायला पाहिजे कारण नेमक्या अशाच वेळी पाकिस्तान विश्वासघात करायची शक्यता जास्त हे पृथ्वीराज चौहानपासून अनेकांचा इतिहास अभ्यासलेल्याला माहित नव्हते का? दक्षिण कोरियाच्या पंतप्रधान्/अध्यक्षांना १९९८ चे शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले तसे आपल्याला मिळावे असे वाजपेयींना वाटत होते की काय अशी त्यांची पंतप्रधानपदाची कारकिर्द बघता मला तरी वाटते. २००३-०४ मध्ये तर त्यांना अगदी पीस प्रोसेसने झपाटून टाकले होते. पण हे सगळे करताना किती भारतीय नागरीकांचे बळी गेले आणि भारतीय हितसंबंधांना किती धक्का पोचला याचा कोणीतरी हिशेब मांडायलाच हवा.

सुबोध खरे Wed, 08/03/2022 - 19:51
माझे दोन शब्द- १) गुप्तहेर खात्याचे अपयश-- प्रत्येक गोष्ट गुप्तहेर खात्याला माहिती असलीच पाहिजे हा नियम १०० % मान्य केला तर हे वाक्य स्वीकृत करायला लागेल. परंतु भारताने दोन्ही अणुस्फोट केले तेंव्हा स्वतःला सर्वशक्तिमान समजणाऱ्या अमेरिकेच्या सी आय ए ला हि माहिती का समजू शकली नाही? याचा विचार केल्यास असे लक्षात येईल कि एखाद्या देशाने काळजीपूर्वक तयारी केल्यास दुसऱ्या देशाच्या गुप्तहेरखात्याला सर्वच माहिती असेल च असे नाही. तेंव्हा लष्करी किंवा नागरी गुप्तहेरखाते काय झोपले होते का असे नाक्यावर गप्पात विचारणारे अनेक असतात. २) जनरल मुशर्र्फ हे लष्करी कार्यवाही खात्याचे महानिदेशक( DGMO) असताना त्यांनी आपले डावपेच बेनझीर भुट्टो यांच्या गळ्यात उतरवायचा प्रयत्न केला परंतु तेंव्हा ते असफल झाले. परंतु आपला हा बेत जेंव्हा ते लष्करप्रमुख झाले तेंव्हा त्यांनी पंतप्रधान श्री नवाझ शरीफ याना न सांगता सिद्धीस नेला. यावर श्री नवाझ शरीफ यांचे उद्गार "मुहाजिर ने ( मुशर्रफ) फंसा दिया" असेच होते. अर्थात पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी केली आणि नंतर सरकारला सांगितले त्यावर नवाझ शरीफ काहीही करू शकले नसते हि वस्तुस्थिती आहे. ३) जॉर्ज फर्नांडिस यांनी ४८ तासात आम्ही हे युद्ध जिंकू शकतो हे केलेले विधान दर्पोक्ती नव्हती तर त्याच्या मागे लष्कर प्रमुखांकडून घेतलेली माहिती होती. आता प्रत्यक्ष ४८ तासात आंपण युद्ध जिंकले असते का हा प्रश्न होता. परंतु युद्धात स्फुरण येण्यासाठी जसे रणशिंग फुंकले जाते तसे अशी विधाने लष्कराला स्फुरण देण्यासाठी जगभर केली जातात हि वस्तुस्थिती आहे. ४) वाजपेयी यांचे धोरण कचखाऊ होते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय समुदायांची भीती वाटत होती. यामुळे त्यांनी भारतीय लष्कराला आणि वायुसेनेला नियंत्रण रेषा ओलांडण्यास मनाई केली होती. कदाचित १९९८ मध्ये अणुस्फोट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायांनी टाकलेल्या निर्बंधांनंतर परत असे करण्याची त्यांची तयारी नव्हती का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. यामुळे हे युद्ध लष्कर सुरुवातीला एक हात मागे बांधून लढल्यासारखे लढावे लागत होते. खरं तर वायुसेनेला प्रत्यक्ष पाकिस्तानी हद्दीत घुसण्याची परवानगी सुरुवातीलाच दिली गेली असती तर हे युद्ध नक्कीच निम्म्या वेळात संपले असते. त्या काळात पाकिस्तानकडे दृष्टीच्या टप्प्याबाहेर मारा करणारी क्षेपणास्त्रे (beyond-visual-range) नव्हतीच तर भारताच्या मिग २९ वर Vympel NPO R-77 missile (NATO reporting name: AA-12 Adder) हे ८० ते १०० किमी टप्प्याचे क्षेपणास्त्र होते ज्याची पाकिस्तानी वायुदलाला भयंकर भीति वाटत होती त्यामुळे त्यांच्याकडे असलेली F १६ त्यांनी युद्धात उतरवलीच नव्हती. भारतीय लष्कर एक हात पाठीमागे बांधून लढत होते म्हणून एवढे सैनिक सुरुवातील हुतात्मा झाले. एकदा इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर सुरु झाला तेंव्हा भारतीय वायुसेनेने पाकिस्तानी लष्कराला भाजून काढले आणि युद्ध संपले. याच इस्रायली बॉम्ब आणि मिराज २००० चा वापर करून हवाईदलाच्या बालाकोट या पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तेंव्हा नियंत्रणरेषेची लक्ष्मणरेषा ओलांडण्याची हिम्मत श्री मोदी यांनी दाखवली याबद्दल भारतीय लष्करी तज्ज्ञांना त्यांचे कौतुक वाटते. कारण पाकिस्तान आम्ही अणुबॉम्ब टाकू चा खुळखुळा वाजवत होते त्यांना सज्जड शब्दात तुम्ही अणुबॉम्ब टाकाच आम्ही पाकिस्तान बेचिराख करून टाकू हे ठणकाऊन सांगितले गेले. आणि त्याचे प्रत्यंतर चार दिवसातच दिसूनआले. विंग कमांडर अभिनंदन वर्तमान याना सोडले नाही तर श्री मोदी पाकिस्तान वर हल्ला करतील हे संरक्षण मंत्रांना सांगताना पाकिस्तानी लष्करप्रमुख राहील शरीफ थरथर कापत होते असे खुद्द संरक्षण मंत्र्यांनीच संसदेत सांगितले. ५) भारतीय संसदेवर हल्ला करून केवळ पाच दहशतवादी आपल्या खासदारांना, मंत्र्यांना ओलीस ठेवतील हि भीती फारच अतिशयोक्त आहे. कारण संसदेची सुरक्षा करणारे कर्मचारी हे संसदेत येणाऱ्या प्रत्येक माणसावर लक्ष ठेवू असतात आणि अक्षरशः हजारो लोक ज्यात पत्रकार, खासदार, त्यांचे स्वीय सहाय्यक, संसदेचे कर्मचारी पासून असंख्य भेट देणारे सामान्य नागरिक हे असतात. या सर्वांवर २४ तास पाळत ठेवण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा, विशेष सुरक्षा कमांडो शिवाय इतर सशस्त्र केंद्रीय पोलिसांचे अनेक जवान तैनात असतात (SPG and NSG to the Central armed police forces like CRPF and ITBP). पाकिस्तान मध्ये प्रशिक्षित फ़िदायिन दहशतवाद्यांनी केवळ गोंधळ आणि दहशत निर्माण करण्यासाठी केलेला हल्ला होता. लिहिण्यासारखे बरेच आहे. पण असो

In reply to by सुबोध खरे

क्लिंटन Wed, 08/03/2022 - 22:12
माझा लष्कराशी कसलाही कधीही संबंध नव्हता आणि मी एक सामान्य नागरीक आहे. इथे लिहित आहे ते त्याच दृष्टीकोनातून लिहित आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ४८ तासात आम्ही हे युद्ध जिंकू शकतो हे केलेले विधान दर्पोक्ती नव्हती तर त्याच्या मागे लष्कर प्रमुखांकडून घेतलेली माहिती होती. आता प्रत्यक्ष ४८ तासात आंपण युद्ध जिंकले असते का हा प्रश्न होता. परंतु युद्धात स्फुरण येण्यासाठी जसे रणशिंग फुंकले जाते तसे अशी विधाने लष्कराला स्फुरण देण्यासाठी जगभर केली जातात हि वस्तुस्थिती आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांनी ते विधान प्रत्यक्ष युध्द सुरू व्हायच्या आधी केले होते. आणि ते सुध्दा मिडियाशी बोलताना. सैनिकांसमोर बोलताना नाही. अंतिम विजय आपलाच आहे अशाप्रकारची विधाने स्फुरण चढायला केली जातात हे समजू शकतो. पण ४८ तासात घुसखोरांना हाकलू इतकी स्पेसिफिक टाईमलाईन? २ दिवसांचे ८-१५ दिवस झाले तरी समजू शकतो पण त्याहूनही उशीर व्हायला लागला तर आधी वाटली होती त्यापेक्षा परिस्थिती खूप जास्त कठीण आहे असे चित्र उभे राहून त्याचा उलटा परिणाम होत नसेल?
भारतीय संसदेवर हल्ला करून केवळ पाच दहशतवादी आपल्या खासदारांना, मंत्र्यांना ओलीस ठेवतील हि भीती फारच अतिशयोक्त आहे.
निदान त्यावेळी आलेल्या बातम्यांमध्ये म्हटले होते की कमलेश कुमारी म्हणून सुरक्षारक्षकाने हातात शस्त्र नसतानाही ओरडून सगळ्यांना हल्ला होत आहे म्हणून सावध केले आणि संसदेत आत शिरायची दारे बंद करून घेण्यात आली म्हणून दहशतवादी आत घुसू शकले नाहीत आणि अनर्थ टळला. तो हल्ला इतका गंभीर नसता तर मग भारतीय सैन्य त्यानंतर एल.ओ.सी आणि सीमेवर जवळपास ८-९ महिने eyeball to eyeball confrontation मध्ये का उभे ठाकले होते? त्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांचा आकडा त्यामानाने कमी होता तरीही मग अगदी अमेरिकेच्या अध्यक्षांपासून सगळ्यांची युध्द टाळण्यासाठी धावपळ का चालू होती?

In reply to by क्लिंटन

सुबोध खरे गुरुवार, 08/04/2022 - 11:14
कमलेश कुमारी म्हणून सुरक्षारक्षकाने हातात शस्त्र नसतानाही ओरडून सगळ्यांना हल्ला होत आहे म्हणून सावध केले आणि संसदेत आत शिरायची दारे बंद करून घेण्यात आली म्हणून दहशतवादी आत घुसू शकले नाहीत आणि अनर्थ टळला. कमलेश कुमारी यांचे काम स्पृहणीय आहे परंतु इतक्या सर्व राजकारण्यांना झेड वर्गाची सुरक्षा पुरवलेली असते तितके सशस्त्र सैनिक तिथे प्रत्यक्ष तैनात असतातच आणि हे सैनिक काही बुणगे नसतात तर कमांडो असतात त्यामुळे पाच दहशतवादी पूर्ण संसदेचा ताबा घेतील असे कोणी पत्रकार लिहीत असेल तर तो वातानुकूलित खोलीत रामखुर्चीत बसून ज्ञान पाजळणारा पत्रकार आहे एवढेच मी म्हणेन. तो हल्ला इतका गंभीर नसता तर मग भारतीय सैन्य त्यानंतर एल.ओ.सी आणि सीमेवर जवळपास ८-९ महिने eyeball to eyeball confrontation मध्ये का उभे ठाकले होते? हा मुळात भारताच्या अस्मितेचा प्रश्न होता. लोकशाहीच्या सर्वोच्च इमारतीवर हल्ला हे काही गल्लीतील गुंडगिरीची केस नव्हती किंवा सशस्त्र दरोडा नव्हता. मुळात दहशतवादी हे संसद लष्करी ठाणे अशा घातक लक्ष्यावर कशासाठी हल्ला करतात जेथे त्यांना जीव गमवावा लागेल याची खात्री असते? लष्करी ठाणे किंवा संसद सुरक्षित नाही तर आपली सुरक्षा कोण पाहणार हि भीती जनमानसात पसरवण्यासाठी. तसं पाहायला गेलात तर तिरंगा हा सुद्धा एक कापडच आहे पण त्यासाठी प्राणत्याग करण्यासाठी लोक का तयार होतात? त्यामुळे भारताने आपले लष्कर युदधासाठी तयार केले होते हे याच कारणासाठी.

In reply to by सुबोध खरे

क्लिंटन गुरुवार, 08/04/2022 - 14:03
१. अफजलगुरू आणि इतरांवर दाखल केलेल्या आरोपपत्रात पुढील उल्लेख आहे- ... along with Mohd. Masood Azhar, Ghazi Baba @ Abu Jehadi @ Abu Saqlain and Tariq Ahmed - all Pak Nationals and proclaimed offenders (P.Os) and along with Mohammad, Haider, Hamja, Raja and Rana (all Pak nationals and deceased terrorists in attack on Parliament of India) and some other unknown persons, hatched up a conspiracy to procure arms and ammunitions and to attack Indian Parliament at New Delhi, when the Parliament was in session and in the process to make hostages or kill Prime Minister and other Central ministers and members of Parliament, Vice President and other VIPs., security personnels, in and around the Parliament House and thereby to wage a war against India and to kill the persons and to commit terrorist attack.... हे अफजलगुरूची केस अपीलात दिल्ली उच्च न्यायालयापुढे गेली त्याच्या निकालपत्रात बघायला मिळेल. https://indiankanoon.org/doc/1031426/ त्यावेळेस हे आरोपपत्र दाखल झाले होते त्यात महत्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवायचा उल्लेख होता हे पक्के बातम्यांमध्ये बघितल्याचे आणि पेपरात वाचल्याचे आठवत होते म्हणून आंतरजालावर शोधाशोध केली तेव्हा हा उल्लेख सापडला. समजा महत्वाच्या व्यक्तींना ओलीस ठेवायची शक्यताच नसती तर सरकारने अफजलगुरू आणि इतरांवर दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचा उल्लेख का होता हे समजत नाही. २. संसदेला सुरक्षा असते वगैरे सगळे मान्य. पण दहशतवाद्यांच्या पांढर्‍या अ‍ॅम्बॅसॅडरला गृहमंत्रालयाचा स्टीकर बघून आत सोडलेच ना? म्हणजे त्या सुरक्षायंत्रणेत काहीतरी गंभीर त्रुटी असली पाहिजे. त्या गाडीत ३० किलो आर.डी.एक्स होते. https://frontline.thehindu.com/cover-story/article30247100.ece . त्याचा स्फोट का झाला नाही याविषयी अफजलगुरूने आश्चर्य व्यक्त केले होते असे तिहार तुरूंगाचा अधिकारी मनोज द्विवेदी म्हणाला होता. https://www.financialexpress.com/archive/parliament-attack-why-didnt-the-bomb-explode-afzal-guru-wonders/848307/ आता ३० किलो आर.डी.एक्स ने किती मोठा स्फोट होऊ शकेल याची कल्पना नाही. ३. त्या दिवशी उपराष्ट्रपती कृष्णकांत थोडक्यात बचावले असेही न्यूज चॅनेलवर आले होते. तसेच त्या हल्ल्याविषयी बोलताना स्वतः पंतप्रधान वाजपेयींनी दहशतवादी संसदेत घुसण्यात यशस्वी झाले असते तर 'कत्लेआम झाला असता' असे म्हटल्याचेही आठवते. त्याचा व्हिडिओही कुठेतरी मिळेल/ मिळायला हवा. तेव्हा ५-६ दहशतवाद्यांनी नुसता गोंधळ उडवून द्यायला हा हल्ला केला होता असे वाटत नाही. त्यापेक्षा बराच मोठा घातक प्लॅन होता असे मला तरी एक सामान्य नागरीक म्हणून वाटते.

In reply to by क्लिंटन

क्लिंटन Mon, 08/15/2022 - 09:38
५-६ दहशतवाद्यांनी नुसता गोंधळ उडवून द्यायला हा हल्ला केला होता असे वाटत नाही. त्यापेक्षा बराच मोठा घातक प्लॅन होता असे मला तरी एक सामान्य नागरीक म्हणून वाटते
. संसदभवनावरील हल्ल्याच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १४ डिसेंबर २००१ च्या टाईम्स ऑफ इंडियात आलेली बातमी---Vajpayee may have been the target या बातमीत स्पष्टपणे म्हटले आहे की दहशतवादी संसदेच्या इमारतीच्या १२ क्रमांकाच्या गेटमधून आत घुसायचा प्रयत्न करत होते. त्या गेटमधून फारच थोडे लोक आत जातात त्यामुळे तिथे तितक्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था नव्हती. तसेच १२ क्रमांकाच्या गेटमधून राज्यसभेत जाता येते. आणि कार्यक्रमाप्रमाणे १३ डिसेंबरला गुरूवार असल्याने पंतप्रधान त्या दिवशी राज्यसभेत असणार होते. या सगळ्या गोष्टींची माहिती दहशतवाद्यांना होती.

अमर विश्वास Wed, 08/03/2022 - 21:22
डोमेल ते कारगिल हे कर्नल शशिकांत पित्रे यांचे पुस्तक जरूर वाचा .. नुसते कारगिल युद्धच नाही तर भारत - पाक यांच्या सामरिक संबंधांचा पूर्ण लेखाजोखा मिळेल

अर्जुन Wed, 08/03/2022 - 22:42
गुप्तहेर खात्याने मिळवलेल्या माहीतीचा उपयोग करुन जर कोणतीही कारवाई होणार नसेल, तर अशी माहीती मिळवण्यास काय अर्थ राहील? आणि कोण अशी माहीती मिळवण्यासाठी जिवावर उदार होईल? http://www.indiandefencereview.com/news/raw-operations-in-pakistan/ चे अंशत भाषांतर... हा संदर्भ उघडपणे माजी पंतप्रधान इंदर गुजराल यांचा आहे. गुजराल यांनी पाकिस्तानातील संशोधन आणि एडब्ल्यू ऑपरेशन्स सोडून देण्याचे आदेश दिले असे म्हणणे बरोबर नाही. पाकिस्तानात R&AWची दोन कामे होते - गुप्त माहिती गोळा करणं आणि गुप्त कारवाई करणं. तथाकथित गुजराल सिद्धान्तानुसार पाकिस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांना अशा प्रकारच्या कृतीमूळे मदत होऊ शकते, म्हणून त्यांनी केवळ गुप्त कारवाईसाठीच्या कारवाया बंद करण्याचे आदेश दिले. त्याने गुप्त माहिती गोळा करणं, या बाबत कोणताही आदेश दिला नाही. आपल्या आधी आणि नंतरच्या सर्व पंतप्रधानांप्रमाणे त्यांनाही पाकिस्तानमध्ये गुप्तचर माहिती गोळा करण्याच्या चांगल्या क्षमतेचे महत्त्व समजले. त्याने जे बंद करण्याचे आदेश दिले ते पाकिस्तानमधील R&AW च्या केवळ 15 टक्के ऑपरेशन्ससाठी होते. उर्वरित 85 टक्क्यांना त्यांनी पुढे जाण्यास प्रोत्साहित केले. गुप्त कारवाईच्या कारवाया बंद करण्याच्या त्याच्या आदेशाच्या विवेकबुद्धीबद्दल गुप्तचर समुदायात वादविवाद झाला. अनेक वरिष्ठ अधिकारी त्यांना भेटले आणि त्यांना समजावून सांगितले की गुप्त कृती क्षमता तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो. जर एखाद्या दिवशी सरकारला गुप्त कारवाया पुन्हा सुरू करण्याची गरज भासली, तर जमिनीवर प्रशिक्षित आणि अनुभवी अधिकारी नसतील,. त्यांना असेही सुचवण्यात आले की जर त्यांना या खरोखरच काही करावेसे वाटत असेल तर सध्या गुप्त कारवाई स्थगित करावी, परंतु बंद करू नयेत. पण गूजराल यांना ते मान्य झाले नाही. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर आले तेव्हा गुप्तचर समुदायाला आशा होती की ते गुजराल यांचा निर्णय रद्द करतील आणि पाकिस्तानमध्ये गुप्त कारवाई पुन्हा सुरू करण्याचे आदेश देतील.पण त्यांना आश्चर्य वाटले की, वाजपेयींनीही गुजराल यांच्याप्रमाणेच R&AW ने पाकिस्तानमधील गुप्तचर माहिती गोळा करण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि गुप्त कारवाया टाळाव्यात अशीच इच्छा व्यक्त केली. गुप्त कारवाया पुन्हा सुरू करण्यास वाजपेयींच्या अनिच्छेने निराश झालेल्या काही सेवा अधिकाऱ्यांनी तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांच्याशी माझी[[ बी. रमण, कॅबिनेट सचिव] भेट घडवून आणली. मी त्यांची नवी दिल्लीतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना पाकिस्तानमध्ये आमच्या गुप्त कारवाईचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी माझे [ बी. रमण, कॅबिनेट सचिव] म्हणणे ऐकले आणि ते म्हणाले: “मला आधीच खात्री पटली आहे. तुम्ही मला पटवून देण्याची गरज नाही. पण पंतप्रधान (वाजपेयी) वेगळा विचार करतात. त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे". आणि तो विषय संपला.

In reply to by अर्जुन

शाम भागवत Fri, 08/05/2022 - 12:45
मला वाटते भारतीय गुप्तहेरांची खूप मोठी हानी मोरारजी देसाई यांनी केली. त्यावेळेस आपले खूप चांगले डीप अ‍ॅसेटस नष्ट झाले. ते खूप मोठे खच्चीकरण होते. त्यानंतर गुजराल यांनी त्यावर आणखी एक मुलामा चढवला. असो.

Bhakti Wed, 08/03/2022 - 23:05
असा अभ्यास करुन १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल. कदाचित ते या विजय दिवसाचे फार मोठे यश होईल असे वाटते
. होय युद्ध म्हणजे काय हे कारगिल पासूनच समजले. खुपचं चांगले मुद्दे मांडले आहेत.

कर्नलतपस्वी गुरुवार, 08/04/2022 - 08:34
Nehru's 97 Major Blunders,written by Rajanikant Puranik. It covers failures,neglect,wrong policies and bad decisions ect. हे पुस्तक गुगल पिडीएफ ड्राइव्ह वर उपलब्ध आहे. लेखकाने खुप अभ्यास करून आपली मते मांडली आहेत. माझे मत.इतरांचे वेगळे असु शकते. हे पुस्तक तत्कालीन नेतृत्व आणी परीस्थीती बदूदलची कल्पना देते. वाचल्यास सर्व परीस्थीती समजुन घेण्यासाठी मदत होईल. कॉपीराईट निर्बंधामुळे जास्त उहापोह करत नाही. इच्छुकांनी वाचावे व आपले मत बनवावे. १९४७,१९६२ या पाठीमागची कारणे लक्षात येतील. कारगिल हे भारत पाकिस्तान मधील अनेक युद्धा मधील एक आहे. त्याचे मुळ कारण सुद्धा समजुन येईल. मी एवढेच म्हणेन, सेना,गुप्तचर व अन्य सरकारी यंत्रणा आपले कार्य पुर्ण क्षमतेनुसार करतच आसतात,परंतू नेतृत्व त्याचा कसा उपयोग करते यावर खुप काही निर्भर असते. तत्त्कालीन नेतृत्व व त्याची विचारधारा याचा पगडा, पकड या यंत्रणावर असते व त्यानुसार देशाचा कारभार चालतो. यात दुमत नसावे. इथे नेहरूंसारख्या सक्षम नेतृत्वाबद्दल न बोलता जर इतिहासाचा आढावा घेतला तर वादविवाद टाळता येईल. The Himalyan Blunder ,हे पुस्तक सुद्धा गुगल वर उपलब्ध आहे. @भक्ती बरोबर मी सहमत आहे. पण हा वादाचा मुद्दा आहे कारण राजकीय हितसंबंध,अहित यात दडलेले आहे. काही इतिहासकारांनी,अभ्यासकांनी परखड मते मांडली आहेत ती शोधून काढून वाचावी लागतात हा दैवदुर्विलास मला तरी वाटतो. शेवटी इतीहास जेते लिहीतात. इतिहासातील चुका मान्य कराव्यात पण कुणा व्यक्ती विषेशला दोष देण्यात अर्थ नाही कारण तत्कालीन परीस्थीतीत घेतलेले निर्णय चुक की बरोबर हे इतीहासच ठरवतो.

जेम्स वांड गुरुवार, 08/04/2022 - 09:34
१९७१ नंतर १९९९ पर्यंत भारत-पाकिस्तान युद्ध झाले नव्हते, दोन्ही सैन्यात हिवाळ्यापुरता करार झाला होता जो दोन्ही देश पाळत होते. अश्या परिस्थितीत पाकिस्तानी लष्कर गुपचूप करार मोडेल असा संशय घ्यायचे कारण नव्हते.
इथं मित्रदेश एकमेकांची गुप्तहेर संस्था एक्सपोज करायला अन् मित्रदेशाच्या अंतर्गत रहस्यांचा गौफ्यस्फोट करायला वापरतात हे जगजाहीर असताना संशयाचे कारण नव्हते, ते पण पाकिस्तान बाबतीत म्हणणे म्हणजे धैर्याची कमालच झाली

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे गुरुवार, 08/04/2022 - 09:52
१९६७ १९६७ नंतर भारत चीन सीमेवर गोळीबार करायचा नाही असा करार दोन्ही देशात झालेला आहे कारण भावनेच्या भरात येऊन निष्कारण प्राणहानी टाळता यावी असा हेतू आहे. हा करार किंवा समझौता आजतागायत पाळला गेला आहे यामुळेच गाल्वान खोऱ्यात झालेल्या चकमकी या हातघाईच्या आणि समोरासमोर होत्या. युद्ध सुरु झाले तरीही एकमेकांचे राजदूत आणि वकिलातीत कर्मचारी यांवर हल्ला करायचा नाही असे संकेत आहेत हेही पाळले जातात मग जो करार पाकिस्तान आणि भारतात १० वर्षापेक्षा जास्त पाळला गेला त्याबद्दल संशय घेण्याचे सकृतदर्शनी तरी कारण नव्हते. जनरल मुशर्रफ यांनी सरळ सरळ विश्वासघात केला आणि हे संकेत पाळले नाहीत हि गोष्ट वेगळी आहे.

In reply to by सुबोध खरे

जेम्स वांड गुरुवार, 08/04/2022 - 10:13
१९६७ १९६७ नंतर भारत चीन सीमेवर गोळीबार करायचा नाही असा करार दोन्ही देशात झालेला आहे
xxxxx
युद्ध सुरु झाले तरीही एकमेकांचे राजदूत आणि वकिलातीत कर्मचारी यांवर हल्ला करायचा नाही असे संकेत आहेत हेही पाळले जातात
ह्याकरता Geneva Convention नावाचा एक अख्खा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, एखाद वकीलातीच्या कर्मचाऱ्याला अटक होण्यापासून अभय (diplomatic immunity) पण त्याच अंतर्गत येते. इतकेच काय युद्ध काळात जरी एखाद वकीलातीचा कर्मचारी हेरगिरी करताना पकडला गेला तरी त्याला युद्धबंदी म्हणून वागवले जाऊ शकत नाही, तर त्याला पर्सना नॉन ग्राटा म्हणून २४ ते ४८ तासात देश सोडून जायला सांगतात थंडीच्या मोसमात वर बसायचे नाही हा अलिखित करार होता त्यामुळे मुहाजिर ने फांसा दिया, नवाज मुशर्रफ बेनझीर वगैरे त्यांचे अंतर्गत काहीही असो अन् असेल तरीही भारतीय गुप्तचर संस्थांनी किंवा लष्कराने त्या अलिखित नियमामुळे पाकिस्तानवर संशय घेण्याचे कारण नाही हे विधान मुळातच हास्यास्पद आहे माझ्यासाठी.

In reply to by जेम्स वांड

क्लिंटन गुरुवार, 08/04/2022 - 10:57
ह्याकरता Geneva Convention नावाचा एक अख्खा आंतरराष्ट्रीय कायदा आहे, एखाद वकीलातीच्या कर्मचाऱ्याला अटक होण्यापासून अभय (diplomatic immunity) पण त्याच अंतर्गत येते.
तरीही मे १९९२ मध्ये राजेश मित्तल म्हणून कराचीतील भारतीय दुतावासातील अधिकार्‍याला मारहाण झाली होती. या राजेश मित्तलना पाकिस्तानने हेरगिरीत सामील असल्याच्या आरोपावरून देश सोडायला सांगितले होते पण त्यापूर्वी त्यांना मारहाण केली होती आणि इलेक्ट्रीक शॉक वगैरे दिले होते. तेव्हाही नेहमीप्रमाणे पाकिस्तानने हात वर केले होते आणि आमच्या कोणत्याही सरकारी यंत्रणेने ते केले नाही (म्हणजेच ते 'नॉन स्टेट अ‍ॅक्टर्स' नी केले) असे म्हटले होते. हे नॉन स्टेट अ‍ॅक्टर्सचं खटलं अगदी १९४७ मधील काश्मीरवरच्या पहिल्या हल्ल्यापासून कसाबपर्यंत अव्याहत चालू आहे. राजेश मित्तल दिल्लीत आल्यानंतर थेट एम्समध्ये दाखल झाले होते. त्यावेळी पेपरात आलेला एक फोटो होता तो मला अजूनही आठवतो. राजेश मित्तल या नावाचा गुगल सर्च केल्यावर त्यावेळी पेपरात बघितलेला तो फोटो मिळालाही. * https://www.timescontent.com/syndication-photos/reprint/news/489483/rajesh-mittal-diplomat-indian-hospi.html बाकी जिनीव्हा की अन्य कोणत्या आंतरराष्ट्रीय कराराप्रमाणे युध्दबंद्यांनाही कशी वर्तणुक द्यावी याचे नियम ठरवलेले आहेत. आपल्या सौरभ कालिया आणि त्याच्याबरोबरच्या इतर ५ सैनिकांना पाकिस्तानने त्या कायद्याप्रमाणे वागवले होते का? असे कोणतेही कायदे आणि करार पाकिस्तान मानेल आणि त्यांचे प्रामाणिकपणे पालन करेल ही अपेक्षा ठेवणेच भाबडेपणाचे आणि चुकीचे आहे. * : राजेश मित्तलचा हा फोटो मिळाला त्याप्रमाणे कधीतरी १९९१ मध्ये शंकरराव चव्हाणांनी केलेले स्टेटमेंटही आंतरजालावर मिळावे म्हणून मी गेली कित्येक वर्षे प्रयत्न करत आहे. ते स्टेटमेंट मला का हवे आहे? कारण जर १९९१ मध्ये कारगीलमध्ये काही गडबड व्हायची शक्यता आहे असे इनपुट्स सरकारकडे असतील तर त्यानंतरच्या सगळ्या सरकारांनी कारगीलचे स्थान लक्षात घेता त्या ठिकाणच्या संरक्षणासाठी काहीतरी करणे गरजेचे होते. कारगील गेले तर श्रीनगर-लेह महामार्ग गेला. म्हणजे लडाख आणि सियाचीनची सुरक्षा धोक्यात येईल त्यामुळे कारगील हे खूप महत्वाचे ठिकाण आहे.जशी अणुभट्टीची सुरक्षा ठेवणे गरजेचे आहे आणि तो कॉमन सेन्स आहे तसेच कारगील या ठिकाणाविषयीही म्हणता येईल- जर सरकारला ते १९९१ मध्येच माहित असेल तर. अणुभट्टीवर हल्ला करणार असे स्पेसिफिक गुप्तचर इनपुट आले तरच तिथे सुरक्षा ठेऊ हे म्हणणे जसे चुकीचे ठरेल तसेच कारगील प्रकरणी 'आम्हाला माहितच नव्हते' हा बचावही त्या केसमध्ये कुचकामी ठरेल.

In reply to by सुबोध खरे

श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2022 - 10:19
१९७१ नंतर भारत-पाकिस्तान यांच्यात सैनिकी चकमक झाली नव्हती. हिवाळ्यात अत्यंत प्रतिकूल हवामान असल्याने दोन्ही देशांनी ठरवून हिवाळ्यात शिखरांवरून सैन्य मागे घेण्याचे ठरविले होते व दोन्ही देश १३-१४ वर्षे त्याचे पालन करीत होते. अश्या परिस्थितीत सावध राहणे म्हणजे हिवाळ्यात सुद्धा शिखरांवर सैन्य ठेवणे किंवा सातत्याने शिखरांवर लक्ष ठेवणे (हे अर्थातच सैनिक शिखरांवर पाठवून). जर वाजपेयी झोपले असतील तर लष्कर सुद्धा झोपेत होते असे म्हणता येईल का? पाकिस्तान विश्वासघात करून गुपचूप शिखरे काबीज करू शकतो व त्यामुळे हिवाळ्यात सैन्य मागे आणू नये असे लष्कराने वाजपेयी किंवा आधीच्या पंतप्रधानांना सांगितल्याचे वाचनात नाही. हिवाळ्यात शिखरांवरून सैन्य मागे घेण्यास लष्कराचा विरोध असल्याचेही वाचनात नाही. हिवाळ्यात सैन्य मागे घेणे हा पंतप्रधान पातळीचा निर्णय असू शकतो, परंतु सीमेवर कशी गस्त घालायची हा निर्णय लष्कराचाच असतो. त्यात पंतप्रधानांचा हस्तक्षेप नसतो. जर शिखरांवर अधूनमधून लक्ष ठेवणे आवश्यक आहे असे लष्कराला वाटले असेल, तर लष्कर पंतप्रधानांच्या परवानगीविना काही सैनिक अधूनमधून शिखरांवर पाठवून लक्ष ठेवू शकत होते. परंतु लष्कराला सुद्धा ते करण्याची गरज वाटली नसावी. निदान मी तरी वाजपेयी झोपले होते असा ठाम निष्कर्ष न काढता संशयाचा फायदा वाजपेयींना देईन.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड गुरुवार, 08/04/2022 - 10:30
माझ्या वाचनात नाही ! अहो गुप्तचर खात्याच्या reports बद्दल बोलतोय न आपण ? ते कसे कोणाच्या वाचनात येणार ? अन् आले नाहीत म्हणून आगाऊ चेतावणी नव्हती म्हणायला स्कोप आहे असे म्हणत असाल तर कायच बोला, पंतप्रधानाला रोज कित्येक confidential reporting होतं त्यामुळे ते तुमच्या वाचनात नाही म्हणून तुम्ही पंतप्रधानाला संशयाचा फायदा द्या म्हणलं तर अजबच म्हणावं लागेल ते !

In reply to by जेम्स वांड

श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2022 - 13:29
तेच म्हणतोय. गुप्तचर खात्याने असा अहवाल दिला होता की नाही, हेच सर्वसामान्यांना माहिती नाही. अश्या परिस्थितीत, गुप्तचर खात्याने अहवाल देऊनही वाजपेयी झोपले होते या ठाम निष्कर्षाला आधार काय? त्यामुळे जोपर्यंत काहीतरी ठाम माहिती बाहेर येत नाही, तोपर्यंत, निदान मी तरी, वाजपेयी झोपले होत असा अंतिम निष्कर्ष काढणार नाही. ज्यांना असा निष्कर्ष काढायचा आहे त्यांनी तसा तो काढावा.

जेम्स वांड गुरुवार, 08/04/2022 - 10:03
आयुष्यात कधीही एखाद्या intelligence अधिकाऱ्याला भेटले नसेल किंवा गप्पा चर्चा वगैरे तर त्याहून केल्या नसतील, त्यामुळे आपण for that matter, गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, जनरल मलिक, लेफ्टनंट जनरल पित्रे वगैरे अधिकाऱ्यांना निवृत्त झाल्यावर पुस्तके लिहायला मनाई नसते अगदी सेन्सॉर किंवा सैन्य मुख्यालयाची परवानगी घेऊन पुस्तके लिहिली जातात, त्यांच्यावर परिसंवाद होतात, रायसीना डायलॉग सारखे posh सोहळे सुद्धा होतात, पॅनल डिस्कस होतात टीव्ही वर, इंटेलचे काय आहे तसे ?? ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे गुरुवार, 08/04/2022 - 12:18
आयुष्यात कधीही एखाद्या intelligence अधिकाऱ्याला भेटले नसेल किंवा गप्पा चर्चा वगैरे तर त्याहून केल्या नसतील, त्यामुळे आपण for that matter, गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, लष्करी गुप्तहेर खात्याच्या अनेक सैनिक आणि अधिकाऱ्यांना मी भेटलेलो आहे किंवा ते माझे रुग्ण होते. त्यामुळे अशा अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा मी त्यांच्या कडून ऐकलेल्या आहेत त्यामुळे कदाचित या लोकांच्या कार्यपद्धतीची थोडीशी तोंडओळख मला झालेली आहे असे मला वाटते. विक्रांतवर मी वैद्यकीय विभागाचा प्रमुख अधिकारी होतो त्यामुळे रोज येणारे बिनतारी संदेशांची फाईल (अत्यंत गुप्त सोडले तर) माझ्या माहिती साठी माझ्याकडे येत असे. विक्रांत वरील एक नौदल अधिकारी काश्मिरी होता तेंव्हा तो सुटीवर गेला कि त्याच्यावर लष्करी गुप्तहेर खात्याची पाळत ठेवली असे काही विचित्र संदेश पाहून माझ्या लक्षात आले हते पण त्याचा अर्थ मला समजला नव्हता. शीख सैनिक सुटीवर गेल्यावर ते दहशतवादी संघटनेशी संलग्न आहेत का याचाही तपास लष्करी गुप्तहेर संघटने कडून तेंव्हा होत असे. अनेक रुग्ण या खात्यात काम करणारे माझ्या संपर्कात आलेले होते उदा. एकाला मूल होत नसल्यामुळे तो आपल्या पत्नीसह माझ्याकडे दर महिना follicular monitoring साठी येत असे. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करत असताना दारूचे व्यसन लागलेला नौसैनिक माझा रुग्ण होता. याचे काम सध्या कपड्यात राहून चेम्बूर, देवनार, गोवंडीच्या जवळ असणाऱ्या टिनपाट बार मध्ये बसून खबरी काढणे अशी होती. तेथे त्यांना हिशेबाच्या बाहेर( unaccounted) पैसे दिले जात असत. ज्यात आपण वडिलोपार्जित श्रीमंत असून दिलदार आहोत असा बनाव करून संशयास्पद लोकांना फुकट दारू पाजून त्यांच्याशी मैत्री करणे आणि माहिती काढणे हे त्याचे काम होते. दुर्दैवाने हे काम करत असताना त्यालाच दारूचे व्यसन लागले आणि मग नौदलाने त्याला व्यसनमुक्तीसाठी आमच्या केंद्राकडे पाठवले होते. मुंबई पोलिसांबद्दल त्याने अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या मला सांगितल्या होत्या. त्यात एक गमतीची गोष्ट म्हणजे तेथे त्याला त्याच्यासारखाच एक दिलदार दारुड्या भेटला आणि एक आठवड्याने दोघांना काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते तेंव्हा याला लक्षात आले कि हा माणूस मुंबई सी आय डी मधील एक कॉन्स्टेबल होता आणि त्याचे काम असेच खबरी काढणे होते. अर्थात यानंतर त्यांनी "एकमेकांना" दारू पाजणे बंद केले मी लष्कराविरुद्ध न्यायालयात खटला केला तेंव्हा माझ्याविरुद्ध पण एक गोपनीय फाईल गुप्तहेर खात्यात उघडलेली होती आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. मी कुठे जातो मेस मध्ये किती दारू पितो माझी बायको मला केंव्हा भेटायला येते इ सर्व गोष्टीची नोंद त्यात केली जात असे. हे लष्करी गुप्तहेर खात्यात अधिकारी असलेल्या माझ्या मित्रानेच माझ्याकडे कबुल केले होते. त्यांच्या पत्नीचा गंभीर आजाराचे मी पूर्वी निदान करून उपचाराला बहुमूल्य मदत केली होती. रक्षा लेख नियंत्रक (CDA) मध्ये मी टाकलेले क्लेम सुद्धा परत तपासले गेले होते हे तेथील एका रुग्णाने मला सांगितले होते. तेंव्हा गुप्तहेर खाते कसे काम करते याची निदान त्रोटक माहिती/ तोंडओळख तरी मला झाली होती.

In reply to by जेम्स वांड

कर्नलतपस्वी Fri, 08/05/2022 - 08:47
@जेम्सभाऊ गुप्तचर खात्याचं अपयश वगैरेत न शिरलेले उत्तम असे वाटते, सहमत आहे. असले रिपोर्ट फक्त काहीच मुख्य व्यक्तींना माहीती असल्यामुळे बाकीच्यांच्या मनात शंका निर्माण होते. अगदी त्या व्यक्तीच्या बरोबर काम करणाऱ्या सहकार्या मधे सुद्धा. भारतीय कार्यालयीन गोपनीय कायदा हा सर्वांना लागू असतो व याचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. सेन्सॉर किंवा सैन्य मुख्यालयाची परवानगी घेऊन पुस्तके लिहिली जातात, अशा विषयावर पुस्तक, लेख,भाष्य करताना संबंधित विभागाकडून परवानगी अनिवार्य असते. ते बरोबरच आहे. गुप्तचर इतके हुषार असतात की ते "त वरून ताकभात सहज ओळखतात". ऐंशीच्या दशकात किवा त्या आगोदर सिमारेषे लगत कार्यरत सैनीकांची खाजगी पत्रे randomly scrutinize व्हायची. एक छोटी पण खरी गोष्ट, तरूण धर्मशिक्षक, नवीनच लग्न झालेले व उच्चतुगंता सीमेलगत कार्यरत होते. विरहअग्नी मधे जळणाऱ्या त्याने प्रेमाने आपल्या नवविवाहित पत्नीला रोमॅन्टिक पत्र लिहीले,शब्द काही असे होते, "आकाशातून शुभ्र धवल फुले धरणीवर पडत आहेत.तुझ्या उबदार आठवणी हृदयांजवळ असतांना या शिशीराची काय हिम्मत ", and words to that effect. मुख्यालयातून सुचनावजा ताकीदपत्र आले. जे सर्वानी कळाले व बिच्चारे "धर्मशिक्षक". ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी हे काही नवीन नाही, अंधारात कुणीही नसते पण सुचना त्यांच्याच जवळ आसतात ज्यांना त्या जरूरी आहेत. पार्लमेंटवर हल्ला करत असताना लाईट गेली व अतिरेक्यांना मिळणार्‍या सुचना बंद झाल्या त्यामुळे हडबडी मधे काही चुकीची पाऊले उचलली गेली. तेच मुबंई हल्लयामधे होटल ताज बद्दल त्यांना सर्व माहीती होती असे दूरदर्शनवर ऐकल्याचे आठवते.

In reply to by कर्नलतपस्वी

जेम्स वांड Fri, 08/05/2022 - 10:10
हे काही नवीन नाही, अंधारात कुणीही नसते पण सुचना त्यांच्याच जवळ आसतात ज्यांना त्या जरूरी आहेत.
ते अंधारात असतात ह्याचा अर्थ गुप्तचर हे कायम गुप्ततेच्या वेष्टनात काम करत असतात, न त्यांचे काम एखाद ॲक्टअन्वये गवर्न होते न त्यांचे स्पेशल चार्टर असते, त्यांचं नेमकं काम मला नाही वाटत त्यांच्या कुटुंबियांना पण ठाऊक असते, अश्या प्रकारे अंधारात म्हणत होतो मी सर.

In reply to by जेम्स वांड

मित्रहो Fri, 08/05/2022 - 11:56
ते लोक कायम अंधारात असतात, किंबहुना त्यांच्या अंधकाराची खोली लक्षात घेण्यास हल्लीची ही एकच बातमी पुरेशी उद्बोधक ठरावी
अति गोपनीयता कितपत योग्य आहे हा प्रश्न आहेच. त्यामुळे खूप गैरसमज पसरलेले असतात. काही काळानंतर क्लासिफाईड फाईल डिक्लासिफाइड करण्याची पद्धत योग्य वाटते.

In reply to by मित्रहो

जेम्स वांड Fri, 08/05/2022 - 13:37
पण त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ह्यांना एक चार्टर देऊन लोकसभेच्या चर्चांच्या परिघात आणावं लागेल, त्यांची बजेट्स, खर्च, जमा, काम, मिळालेले रीजल्ट इत्यादींची सदनात चर्चा व्हावी लागेल मुख्य म्हणजे जसे आयटीबीपी , बीएसएफ इत्यादींना त्यांच्या ॲक्ट आहेत तश्या आणाव्या लागतील आयबी अन् रॉ साठी. हे कुठल्याच सत्ताधारी पक्षाला नकोय.

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे Fri, 08/05/2022 - 19:45
पण त्यासाठी भारतीय गुप्तचर संस्था ह्यांना एक चार्टर देऊन लोकसभेच्या चर्चांच्या परिघात आणावं लागेल. लोकसभा किंवा राज्यसभेचे सगळेच खासदार खरोखरच या लायकीचे आहेत का असा एक फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. रॉ संघटनेने काहूताच्या अणुकेंद्रात भगीरथ प्रयत्नाने उभी केलेली हेरांची साखळी श्री मोरारजी देसाई यांच्या आगाऊ वाचाळतेने नष्ट झाली. यात भारताचे ८-१० हेर नाही चिरा नाही पणती स्थितीत धारातीर्थी पडले आणि त्यांचा कोणताही मागमूस कुणाला लागला नाही. ( कारण असे आमचे हेर आहेत/होते हे भारत सरकार किंवा रॉ मान्य करु शकत नाही आणि मान्य केले तरी पाकिस्तानात त्यांना देहदंडच मिळाला असता ) आणि श्री मोरारजी देसाई यांच्या केसालाही धक्का लागला नाही. श्री गुजराल यांच्या नीतीमुळे काय झाले तेही आपण वाचले आहे. MAN POWER IS EXPENDABLE हे वाक्य मी संरक्षण खात्याच्या उपसचिवाकडून चक्षुर्वैसत्यं ऐकलेले आहे. तेंव्हा दिल्लीत बसून फाईली फिरवणाऱ्या माणसांची अशा जीवावर उदार होणाऱ्या माणसांबद्दल काय विचारसरणी आहे ते आपण समजून घ्या. श्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षण मंत्रालयातील दोन वरिष्ठ बाबूंना सियाचेन येथे प्रत्यक्ष जाऊन वस्तुस्थिती बघून या असा हुकूम काढला होता हे आपल्याला आठवत असेल. https://www.dnaindia.com/india/report-livid-over-procurement-delay-fernandes-once-sent-two-def-ministry-babus-to-siachen-2713482 तेंव्हा काही गोष्टी या गुलदस्त्यात असलेल्याच उत्तम. माओइस्ट चळवळींना आपल्याकडचे वाममार्गी उघडपणे किंवा छुप्या रीतीने पाठिंबा देतात त्यासाठी त्यांना चीनकडून मदत मिळते हे उघड असूनही आपण काही करू शकत नाही. चीनने डोकलाम किंवा गाल्वान खोऱ्यात घुसखोरीचा प्रयत्न केला त्या बद्दल साधे निषेधाचे उद्गार या लोकांनी काढले नाहीत. https://thewire.in/diplomacy/india-china-doklam-cpim https://www.freepressjournal.in/india/chinas-chairman-is-our-chairman-why-china-will-forever-hau तर असे लोक या संघटनांचे काम शत्रूला पुरवणार नाहीत याची कोणती खात्री देता येईल. (किंबहुना हे लोक हि माहिती १०० % शत्रूला पुरवतात हे सरकारला आणि लष्कराला माहिती आहे). साधी गोष्ट लक्षात घ्या एखादा हेर ( पोलीस किंवा लष्करी) दाऊदच्या माणसाबरोबर संपर्क किंवा मैत्री ठेवून आहे हि माहिती आपण कायद्याच्या कक्षेत कशी बसवणार? उलट ते उघड झाले तर प्रचलित कायद्यानुसार त्याच्या वर टाडा/ यु ए पी ए कायद्यानुसार खटला भरावा लागेल. तेंव्हा अशा असमतोल युद्धाचे नियम सामान्य कायदे/ नियमात बसवता येत नाहीत आणि तसे न बसावे हेच राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने शहाणपणाचे ठरेल.

In reply to by मित्रहो

श्रीगुरुजी Fri, 08/05/2022 - 20:07
काही काळानंतर क्लासिफाईड फाईल डिक्लासिफाइड करण्याची पद्धत योग्य वाटते. ३० वर्षांनतर सीआयए किंवा इतर गोपनीय अहवाल सार्वजनिक करण्याचा अमेरिकेत कायदा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

जेम्स वांड Sat, 08/06/2022 - 02:06
तसा कायदा आहे पण त्यातही बहुतेक रिपोर्ट हे फुल्या फुल्यांच्या नक्षिने सजलेले किंवा मध्ये मध्ये परिच्छेदचे परिच्छेद काळे करूनच प्रकाशित होतात.

मित्रहो गुरुवार, 08/04/2022 - 14:58
वाह खूप सुंदर चर्चा सुरु आहे. बरीच नवीन माहिती येत आहे. सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद डॉ. सुबोध खरे, जेम्स वांड भाऊ, Bhakti, अर्जुन, अमर विश्वास, मुवि लेख वाचण्यापेक्षा सरळ प्रतिसाद वाचावे इतकी छान चर्चा सुरु आहे. खूप माहितीपूर्ण, अभ्यासक प्रतिसाद आहे. या उत्तम चर्चेसाठी श्रीगुरुजी, डॉ. सुबोध खरे, कर्नल तपस्वी आणि क्लिंटन यांचे मनापासून आभार. तुमच्या प्रतिक्रियांमुळे ज्ञानात भर पडत आहे. नवीन पुस्तकाची नावे डोमेल ते कारगील - शशीकांत पित्रे (धन्यवाद अमर विश्वास) Nehru's 97 Major Blunders,written by Rajanikant Puranik (धन्यवाद कर्नल तपस्वी) @अर्जुन - इंद्रकुमार गुजराल यांनी गुप्तहेर संस्थेच्या बाबतीत केलेला बदल माहित नव्हता. आज तुमच्या प्रतिसादामुळे त्याची माहीती मिळाली. खूप धन्यवाद @सुबोध खरे - लष्कराला आणि वायुसेनेला नियंत्रण रेषा पार करण्याची मनाई केली होती. त्याला आतंरराष्ट्रीय दबाव हे कारण असू शकते. ९/११ नंतर बदलले जग, सुधारलेली भारताची आर्थिक स्थिती यामुळे परिस्थिती बदलली. पूर्वी भारतात होणाऱ्या अतिरेकी कारवायांचा निषेध सुद्धा पश्चिमी देश करत नव्हते. विरोधात बोलायला नेहमी तयार होते. MIG29 आणि F16 मधला हा फरक माहित नव्हता. मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते म्हणून त्यांनी वायुदल वापरुन मदत केली नाही. गुप्तहेर संस्थेनी काय माहिती दिली आणि काय नाही याविषयी कधीच ठोस काही हाती लागणार नाही. मुळात लेख लिहण्यामागे तसा उद्देषही नव्हता. लेख लिहिण्यामागे दोन ट्रिगर होते. मे महिन्यात घरचे सिक्किमला गेले होते. नथूला पास जवळील बाबा मंदिरात जाऊन आल्यावर माझ्या मुलाने मला फोन करुन विचारले बाबा तुला माहिती आहे १९६७ मधे भारत चीन वॉर झाले होते. मला खरच माहिती नव्हते. त्यानंतर मी नथूला आणि चोला मधे झालेल्या लढाई विषयी वाचले. गेल्या काही वर्षात युट्युब वगैरे मुळे सियाचीनविषयी माहिती मिळायला लागली आधी कल्पना नव्हती. सैन्याचा हा पराक्रम शिकवला जावा असे मला वाटते. दुसरा ट्रिगर म्हणजे विदेश मंत्री जयशंकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. We have large force standing at LAC. To make it happen was huge logistical challenge but even our MLAs don't appreciate it. असे काहीतरी होते. काही शब्द इकडे तिकडे असेल. मुळात याची कल्पनाच नसल्याने हे काम इतके सोपे नाही हे समजत नाही. लोकांसमोर सिनेमामधून उभ्या झालेल्या प्रतिमा राहते.

In reply to by मित्रहो

श्रीगुरुजी गुरुवार, 08/04/2022 - 15:44
काही वर्षांपूर्वी ६ दिवस सिक्कीमला सहलीसाठी गेलो होतो. गाडीचा चालक स्थानिक सिक्कीमी होता. त्याचा भाऊ भारतीय सैन्यात होता. त्याने सांगितले की मागील काही वर्षांत भारताने सिक्कीममध्ये हजारो बंकर्स बांधले आहेत. ते पर्वतात आहेत. स्थानिक मःडळी त्यांना अन्नपाणी पुरवितात. काही वेळा कडाक्याची थंडी, बर्फ, पाऊस वगैरेमुळे स्थानिकांना बंकरपर्यंत जाता येत नाही. अशावेळी सैनिक बुटात पाणी जमवून ते पितात. चीनचा भविष्यातील हल्ला सिक्कीममधून होणार असल्याचा लष्कराचा अंदाज असल्याने लष्कराने पूर्वतयारी केली आहे. डोकलाममध्ये २०१७ मध्ये अनेक महिने भारत व चीनचे सैन्य कैवळ २०० मीटर अंतरावर एकमेकांसमोर ४-५ महिने उभे होते. डोकलाम हा भूतानचा भाग आहे. येथे कोंबडीच्या डोक्यासारख्या अरूंद भागात ३ देशांच्या सीमा मिळतात. या भागाला चिकन्स नेक असे म्हणतात. भारतात सहज घुसण्यासाठी चीनला डोकलाम हवे आहे. त्यासाठी चीनने डोकलामच्या बदल्यात वेगळा प्रदेश भूतानला देऊ केला होता. परंतु भारताच्या सल्ल्याने हा प्रस्ताव भूतानने मान्य केला नाही. भूतानच्या संरक्षणाची जबाबदारी भारतावर आहे. भूतानने डोकलाम देण्यास नकार दिल्याने चीनने तातडीने सैन्य पाठवून डोकलाम बळकावण्याची योजना आखली. परंतु भारताने तातडीने डोकलाममध्ये आपले सैन्य पाठवून चीनचे डावपेच उधळून लावले. त्यामुळे चीन संतप्त झाला व युद्धसमान स्थिती निर्माण झाली. भूतान व चीनमधील वादात भारताने पडू नये अशी चीनने धमकी दिली. परंतु भूतानचे संरक्षण भारत करतो व एकदा डोकलाम आणि चिकन्स नेक हे भाग चीनच्या ताब्यात गेले की चीन सिक्कीम, अरूणाचल प्रदेश या भागात अगदी सज घुसू शकेल हे ओळखून भारताने डोकलाममध्ये युद्धाची तयारी केली. चीनच्या धमक्या सुरूच होत्या. चीनने भूतानबरोबर साम, दाम, दंड, भेद हे सर्व प्रकार वापरले. परंतु भारत बधला नाही. चीनचा ताठरपणा कमी होत नाही हे पाहून भारताने आपले प्रशिक्षित कमांडो पाठवून गलवानप्रमाणे चिनी सैन्यावर बंदुका न वापरता हल्ला करून १५० चिनी सैनिक मारले. भारताचा एकही सैनिक गेला नाही. त्यामुळे ही बातमी बाहेर आली नाही. ही माहिती अर्थातच त्या चालकाने दिली. यातील सत्यता माहिती नाही.

In reply to by श्रीगुरुजी

मित्रहो Fri, 08/05/2022 - 13:17
धन्यवाद श्रीगुरुजी ही वेगळी माहीती आहे आजपर्यंत तरी डोकलाममधे जिवित हानी झाल्याचे वाचले/ऐकले नव्हते. चीनच्या रस्ता बांधण्यावरुन वाद होता हेच वाचले होते. चुंबी (चंबी) व्हॅली ही भौगोलिक दृष्ट्या डोकेदुखी आहे. येथील शिखरावर भारतीय सैन्य आहे. ट्रायजंक्शनच्या खाली सिलगुडी कॉरीडॉर हा फक्त शंभर किमी आहे. काही ठिकाणी अधिक अरुंद होतो. त्यामुळेच उत्तरपूर्व राज्ये भारताला जोडले गेलेले आहेत. बांगलादेश, भूतान देश भारतासाठी त्याचकारणाने महत्वाचे आहेत.

In reply to by मित्रहो

सुबोध खरे गुरुवार, 08/04/2022 - 20:08
मी कुठेतरी वाचले होते की पाकिस्तानला हे आमचे सैनिक नाही असे दाखवायचे होते पाकिस्तानला सुरुवातीला असे दाखवायचे होते कि हे आमचे सैनिक नसून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे मुजाहिदीन आहेत. आमचा त्यांना फक्त पाठिंबा आहे. परंतु जसे जसे भारतीय हुतात्म्यांना मिळणार मानसन्मान भारताच्या टीव्ही वर दिसू लागला तसा सन्मान त्यांच्या हुतात्मा होणाऱ्या सैनिकांना मिळत नव्हता एवढेच नव्हे तर हे आमचे सैनिक नव्हेतच असा पवित्रा सैन्याने घेतल्याने त्यांना सन्मानाने अंतिम संस्कार आणि हुतात्म्यांना मिळणारे मानधनाचे पैसे सुद्धा मिळाले नाहीत यामुळे पाकिस्तानी लष्कराच्या नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री या रेजिमेंट मध्ये प्रचंड असंतोष पसरला होता. या युद्धाचे वेळेस आंतरराष्ट्रीय समुदायापैकी युरोप आणि अमेरिकेने आपली कोणतीही मदत केलेली नव्हती. अमेरिकेने तर आपले जी पी एस देण्यास नकार दिला होता त्यामुळे आपल्याला क्षेपणास्त्रे डागण्यास फार त्रास झाला होता शेवटी रशियाने आपले ग्लोनास हे तंत्रज्ञान दिले होते. यावेळेस जवळ जवळ निवृत्त होत आलेल्या मिग २५ या विमानांनी परत एकदा ताबारेषेवर उड्डाणे करून पाकिस्तानच्या बंकर्स आणि ठाण्यांची प्रत्यक्ष छायाचित्रे घेतली आणी मग त्याचा वापर करून फ्रेंच मिराज विमाने आणि इस्त्रायली स्मार्ट बॉम्ब यांनी पाकिस्तानच्या तोफा आणि बंकर्स ला भाजून काढले आणि युद्ध लवकर समाप्त झाले. https://www.rediff.com/news/special/kargil-how-mig-25-played-a-special-role/20220606.htm#:~:text=While%20researching%20features%20on%20the,strategic%20icy%20heights%20of%20Kargil. आज २० -२२ वर्षांनी भारत आर्थिक दृष्ट्या समृद्ध झाला आहे त्यामुळे बालाकोट किंवा उडी येथे भारताने नियंत्रण रेषा ओलांडून हल्ले केले त्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने कोणताही गडबड केली नाही. किंवा रशियाने केलेली मदत लक्षात ठेवून युक्रेनच्या युद्धाबद्दल रशियाविरुद्ध भारताने पवित्र घ्यावा अम्हणून प्रचंड दबाव आणला गेला तरी भारत झुकला नाही याबद्दल ते काहीही करू शकत नाहीत. वनानी दहते वन्हे, सखा भवती मारूत: स एवं दीप नाशाय कृशे कस्यास्ती सौहृदं अर्थात वनाला आग लागली असता ती पसरवण्यासाठी वायू सहाय्य्यभुत होतो परंतु हीच आग दिव्यात छोटी असते तेंव्हा हाच दीप विझवण्याचे काम वायू करतो. जगात अशक्त माणसाचा कोणीही मित्र नसतो

In reply to by सुबोध खरे

शाम भागवत Fri, 08/05/2022 - 13:08
तरी भारत झुकला नाही
यामधे मला वाटते आणखी दोन महत्वाची कारणे असावीत. १. आघाडी सरकारे जाऊन भारतात स्थिर सरकार आले. त्यामुळे आतल्या गोटातल्या बातम्या मिळवणे पूर्वीपेक्षा आता सोपे झालेले नाही. २. चीनला आटोक्यात ठेवायचे असेल तर ते भारताच्या सहभागाशिवाय शक्यच नाही याची खात्रीच युरोप व अमेरिकेला झालेली आहे. त्यामुळे भारत पूर्वीपेक्षा खूपच कणखर भूमिका घेऊ शकत आहे. मुख्य म्हणजे ह्याचे भान मोदींना आहे व ते त्याचा योग्यरितीने लाभ उठवत आहेत. मग काहीजणं त्याला एन आय आर पंतप्रधान म्हणोत.

विवेकपटाईत Fri, 08/05/2022 - 09:14
घुसखोरीची माहित निश्चित असेल. पण युद्धासाठी लागणारे साहित्याची कमतरता होती. बोफोर्स होती पण दारू गोळे नव्हते. रस्त्यां अभावी सैनिक साजोसामान पोहचायला ही वेळ लागणार होता. बाकी याकाळात हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.

In reply to by विवेकपटाईत

जेम्स वांड Fri, 08/05/2022 - 10:14
हजारच्या वर घुसखोर थंडी मुळे दगावले. त्यांचे मानसिक खाच्चीकरण ही झाले होते.
भारतीय लष्कराच्या मेहनतीला आपण कमी करून मांडता आहात काय ?

In reply to by जेम्स वांड

सुबोध खरे Fri, 08/05/2022 - 12:12
नाही हि वस्तुस्थिती आहे. आकडा वर खाली होऊ शकतो. परंतु NLI (नॉर्दर्न लाईट इन्फन्ट्री) च्या सैनिकांना पाकिस्तान सरकारने वाऱ्यावर सोडून दिले होते याचे कारण तेथे आमचे सैनिक नाहीतच असा पवित्रा पाकिस्तानी लष्कराने घेतला होता. पाकिस्तानी लष्कराने आमचे ४५३ सैनिक शहिद झाले असा दावा केला होता परंतु नवाझ शरीफ यांच्या पक्षाने श्वेतपत्रिका काढली होती त्याप्रमाणे किमान ३ हजार आणि इतर विश्लेषकांच्या मते ४००० पर्यंत सैनिक यात मारले गेले. The former Pakistan Prime Minister, Nawaz Sharif, claimed that more than 4,000 Pakistani troops and officials were killed in the Kargil conflict. The Pakistan Government had consistently denied charges of its involvement in the Kargil War and claimed it to be an operation conducted entirely by the Mujahideen (holy warriors). Several months later it indirectly acknowledged its participation by decorating some of its soldiers who died in the conflict. http://www.hindu.com/thehindu/2003/08/17/stories/2003081702900800.htm

In reply to by जेम्स वांड

विवेकपटाईत Sun, 08/07/2022 - 09:18
ही प्रत्यक्ष युद्ध सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी झालेली हानी आहे, त्या बाबत लिहले आहे . तसेही कारगिल मध्ये जीवंत राहणे ही एक प्रकारचे युद्धच आहे. आपल्या सैनिकांना ते रोज लढावे लागते.

मदनबाण Sat, 08/06/2022 - 20:35
कारगिल युद्ध या विषयावर एक्स रॉ एजंट एन के सुद यांनी बरेच माहितीपर भाष्य केलेले आहे. ज्यांना या विषयात अधिकचा रस असेल त्यांनी ISRG - Indian Security Research Groupइथे जाऊन ते व्हिडियो शोधुन पहावेत. कारगिल म्हंटलेच की मला प्रचंड दु:ख आणि त्याहुन अधिकचा राग येतो, कॅप्टन कालिया आणि त्याच्या सहकार्‍यांना ज्या यातनामय पद्धतीने ठार केले त्याचा आपण बदला घेतला नाही ! मी त्या दिवशाची वाट पाहत राहणार जेव्हा हा बदला पूर्णत्वास आणला जाईल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tiranga

वामन देशमुख Sun, 08/07/2022 - 14:10
थोडक्यात काय हा सैनिकी इतिहास बराच मोठा आहे.... १९४७ नंतरचा इतिहास लिहिला जावा, वाचला जावा, शाळा कॉलेजात शिकविला जावा. त्यामुळे अशा घटनांकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोण मिळेल.
प्रभू श्रीरामचंद्रांच्या रघुवंशातील राजे- सेनापती यांपासून ते आधुनिक काळातील नेते - लष्कर प्रमुख या इतिहासाचा सैनिकी दृष्टिकोनातून अभ्यास व्हायला हवा, शालेय शिक्षणाद्वारे तो नागरिकांपर्यंत पोहोचायला हवा. --- आधुनिक भारतीय सैन्यास बहुदा दीड-दोनशे वर्षांचा युद्धानुभव आहे. त्यावर योग्य ती ग्रंथसंपदा निर्माण व्हायला हवी. --- अवांतर: ब्रिटिश इंडियाच्या फाळणीनंतर भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सैन्याचे विभाजन कसे झाले असावे यावर कोणी लेख लिहिल्यास वाचायला आवडेल. (५५ कोटी बद्दल भरपूर वाचण्यात आला आहे पण बाकी मुलकी प्रशासन, लष्करी मनुष्यबळ, इतर संसाधने यांचे विभाजन कसे कसे झाले असावे याची काही रिसोर्सेस आहेत का?)

In reply to by वामन देशमुख

जेम्स वांड Mon, 08/08/2022 - 09:02
तुमच्या प्रश्नाला अनुसरून सर्च करता करता खालील फोटो सापडला . हा फोटो कैक दिवस इंटरनेटवर, फाळणी दरम्यान नॅशनल लायब्ररी कोलकाता मधील पुस्तकांची फाळणी ह्या नावाने फिरत होता पण ते खरे नाही हा मूळ फोटो डग्लस डंकन नावाच्या फोटो जर्नलिस्टने १९४७ साली काढलेला असून तो नॅशनल लायब्ररी कोलकाता इथला नसून तत्कालीन इम्पेरियल सेक्रेटरीयाट लायब्ररी (आता सेंट्रल सेक्रेटरीयाट लायब्ररी) नवी दिल्ली इथला आहे, पुस्तकांचे विभाजन करून गेलेली व्यक्ती म्हणजे तत्कालीन ग्रंथपाल कर्मचारी श्री बी एस केशवन हे आहेत.

मित्रहो Mon, 08/15/2022 - 15:26
इंटेलिजन्स फेलीव्हर बाबतीत नुकतीच विक्रम सूद (रॉ चे पूर्वीचे प्रमुख) यांची जुनी मुलाखत बघितली https://www.youtube.com/watch?v=hPSSbfsLgio त्यांच्या मते अशा काही घटना झाल्या की गुप्तहेर खात्यावर दोष येतोच. ते चालायचेच. त्यांना आवडले नाही की प्रोफेशनल व्यक्तीने दुसऱ्याबद्दल लिहिणे. त्यांनी नांव घेतले नाही पण रोष जनरल मलिक यांच्या पुस्तकाविषयी असावा. सूद यांच्या मते हिवाळ्यात भारताचे सैनिक उंचावरील जागा सोडून खाली येतात हे पाक सैन्याला माहिती होतेच तर त्याचा फायदा ते घेणार नाही कशावरुन. सैन्याच्या चौक्या दूर दूर होत्या असेही एक कारण घुसखोरीमागे दिले जाते. एक मला पडलेला प्रश्न सर्वेक्षण किंवा पेट्रोलिंगचे काम कोणाचे असते BSF/ITBPचे कि सैन्याचे.