मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माझी सैराटी समीक्षा

विवेकपटाईत · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र मला म्हणाला, पटाईत, बर्‍याच महिन्यांपासून तू काही लिहले नाही. मी म्हणालो आजकाल मूड होत नाही. तो म्हणाला, अस कर, काहीतरी नवीन लिह. एखाद्या सिनेमाची समीक्षा तुझ्या शैलीत कर. मी त्याला म्हणालो, मी सिनेमे फारच कमी बघतो. उभ्या आयुष्यात थिएटरमध्ये जाऊन जास्तीसजास्त डझन भर बघितले असतील. तो म्हणाला, अरे सिनेमांची समीक्षा करायला, जास्त डोक्स लागत नाही. आपल्या सुपर डूपर मराठी सिनेमा सैराटची कर. आता मित्राचा आदेश टाळणे शक्य नव्हते. आपल्या बॉलीवूड सिनेमांची एक विशेषता असते. विषय कुठलाही का असेना, कथेचा मूळगाभा एकच असतो. हीरो बहुतेक गरीब मजदूर, मागासलेला, सुंदर हिरोईन, खलनायक श्रीमंत प्राण आणि शशिकले सारखी हिरोईनची आई, जिला पैश्यांसाठी हिरोईनला तिच्या इच्छे विरुद्ध प्राणच्या गळ्यात बांधायचे असते. प्राणला ही सुंदर हिरोईन पाहिजे. सुंदर हिरोईन गरीब हीरो वर प्रेम करते. त्याच्या घरची मीठ भाकर तिला आवडते. हीरो तिच्या सोबत झिंगाट डान्स करतो, गाणी म्हणतो. साहजिकच आहे ,प्राणला हे आवडत नाही. तो हीरोला जाळ्यात अटकविण्यासाठी षड्यंत्र रचत रहातो. हिरोचे मित्र प्राण पणाला लाऊन हिरोची मदत करतात. प्राणचे षडयंत्र विफल होते. बहुधा तो जेल मध्ये जातो. हीरो हिरोईनचा सुखीचा संसार सुरू होतो आणि चित्रपट संपतो. "बुडत्या जहाजावरच्या प्रेम कथा" या हॉलीवूड सिनेमावर ही बॉलीवूडचा परिणाम दिसला. प्राण, शशिकला, सुंदर हिरोईन आणि गरीब हीरो. सर्वच तिथे दिसले. फरक एवढाच हिरोईनला वाचविताना हीरो शहीद होतो. प्राणला काही हिरोईन मिळत नाही. काळानुसार बॉलीवूडच्या चित्रपटांत थोडा फार बदल होत राहिला. पूर्वी हीरो मिल मॅनेजर किंवा मजदूर इत्यादि राहायचा. नंतर कॉलेजमध्ये शिकणारे प्रेमवीर आले. सैराटच्या निर्मात्याने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी, ज्यांना प्रेम कशाशी खातात माहीत नाही, प्रेम प्रकरण दाखविले. बहुतेक "मुलांनो शाळेत शिकू नका प्रेम करा, पोरीला घेऊन घरातून पळा" असा संदेश निर्मात्याला द्यायचा असेल. गावाची पृष्ठभूमी होती, साहजिक मुलगी पाटलाची पोर आणि मुलगा दलित घराण्याचा दाखविला. हीरो हा डशिंग असावा लागतो. आज क्रिकेट खेळाडूंना सुंदर हिरोईन भेटतात. तर आमचा हीरो ही क्रिकेट उत्तम खेळणारा होता. प्रेमाची जागा, पनघट जागी, विहीर आली. हिरोईन आपल्या मैत्रिणींसोबत विहीरीत जलविहार करत होती, तेंव्हाच हीरो ने विहीरीत उडी मारली. काय हा डशिंग पणा, अहाहा! पाहून डोळे तृप्त झाले. हिरोईनला पटावायला हीरोला असले नानाविध प्रकार करावेच लागतात. बाकी गावात असे घडले तर संपूर्ण गावात चर्चा होते. तेंव्हाच या कहाणीचा दी एंड झाला असता. पण हिरोईनच्या मैत्रिणींनी याची चर्चा कुठेच केली नाही. तिची प्रेम कहाणी सहज पोटात पचविली. पूर्वीपार चालत आलेल्या बॉलीवूडी परंपरेनुसार झिंगाट डान्स हा झालाच. हिरोईन आणि हिरोचे प्रेम आता जगा समोर उघड झाले. आपला शाळेकरी नाबालिग हीरो, नाबालिग मुलीला घेऊन पळाला. भरपूर मार खाऊन हिरोच्या मित्रांनी त्याला हिरोईनलासोबत घेऊन पळण्यास मदत केली. (हिरोचे मित्र मार खाण्यासाठीच असतात). दोघांचा सुखी संसार एका महानगरात सुरू झाला.(आता नाबालिग पोरांना राहण्यासाठी जागा, नौकरी कशी मिळाली असले फालतू प्रश्न विचारू नये). प्रेम झाले, झिंगाट डान्स झाला, मस्त गाणे झाले, सुखी संसार सुरू झाला. सर्वसाधारण सिनेमा असता तर इथेच संपला असता. पण निर्मात्याला लक्षात आले की त्याला ऑनर किलिंग ही दाखवायची आहे. सिनेमात 99 टक्के मनोरंजन असल्याने सिनेमा खूप चालला. झिंगाट गाण्यावर खूप शिट्ट्या ही वाजल्या. बॉलीवूडी सिने सिद्धांताचे पालन करत गावातील दाहक वास्तव दाखविण्याचे श्रेय ही निर्मात्याला मिळाले. सिनेमा पाहताना मनात अनेक प्रश्न आले, प्रेम कथेत वयस्क स्त्री-पुरुष ही दाखविता आले असते. तसे असते तर दाहक वास्तव अजून उठून दिसले असते. पण मग झिंगाट डान्स आणि गाणी दाखविता आली नसती. शाळा आणि कालेजात शिकणार्‍या पोरांना हा सिनेमा अत्यंत आवडला. दिल्लीत आज ही लग्नाच्या रिसेप्शन मध्ये डीजे झिंगाट गाणे वाजवितात आणि कोवळे मुले आणि मुली या गाण्याच्या तलवार झिंगाट डान्स ही करतात. अश्या सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल. शहरात येणार्‍या अल्पवयीन जोडप्यांचे शहरातील गिधाडे काय हाल करतात, हे कोवळ्या मुलांना माहीत असण्याची शक्यता नाही. पण निर्माता तर शिकलेला होता? मला वाटते कोवळ्या मुलांवर अश्या सिनेमांचे काय परिणाम होतात, याच्याशी निर्मात्याला काही ही घेणे देणे नव्हते. निर्मात्याचा मुख्य उद्देश्य फक्त गल्ला भरणे होता. त्यात तो सफल ही झाला. बाकी ऑनर किलिंग मुद्दा म्हणजे हत्तीचे दात दाखविण्याचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे (हे माझे मत आहे, कुणाला सहमत होण्याची आवश्यकता नाही).

वाचने 9642 वाचनखूण प्रतिक्रिया 39

In reply to by प्रसाद गोडबोले

बर्याच लोकांना सैराटचं हे कमर्शीअल सक्सेस सहन झालेलं नाहीये. पांचट कथा घेऊन मिळमीळीत हिरो घेऊन कसेबसे १० कोटी कमावनार्यांना १०० कोटींच्या वर कमावनारा सैराट कसा सहण होनार?? मग लगेच समाजाची चिंता वाहणे सुरू होते. सिनेमे पाहून लोक जगतात का??

Bhakti Mon, 05/30/2022 - 18:40
या सिनेमाची युसबी आधी अजय अतुल संगीत ज्याने प्रेक्षकांना आकर्षित केले मग रिंकूचा जबरदस्त परफारमन्स आणि मग कथानक,कथा साधीच (खरीही)होती पण कोणीतरी सांगायला पाहिजेच ती.

In reply to by Bhakti

चौकस२१२ Wed, 06/01/2022 - 14:33
सैराट मध्ये अशी गाणी नसती तर तो येवडः चालला असता का? (जरी त्यातील गाणी हि बरीचशी कथेला अनुरूप आहेत तरी सुद्धा ) सैराट मुळे "याड लागलेल्यांनि" याचे उत्तर दयावे !

In reply to by चौकस२१२

Bhakti Wed, 06/01/2022 - 14:57
एवढा चालला नसता पण रिंकूच आणखिन कौतुक ऐकून लोक पहायला गेले असते,तिला यासाठी राष्ट्रीय पारितोषिक मिळालं होतं.गाण्यांचा वाटा हा मोठा भाग असतो.पण नेहमीच त्याच्या बळावर सिनेमे चालतील असं नाही, खुप समीकरणे जुळावे लागतात.शेवटी डेडीकेशन काही सांगण्याची उर्मीपण एक अनमोल गोष्ट आहे.

सौंदाळा Mon, 05/30/2022 - 19:08
सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल
१९८२ च्या सुमारास कमल हसनचा 'एक दुजे के लिये' रिलिज झाल्यावर पण बरीच प्रेमी युगुले घर सोडून लग्न करण्यासाठी पळून गेली होती असे वडील म्हणाले होते.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मुक्त विहारि Mon, 05/30/2022 - 19:16
आणि काही युगल-आत्महत्या पण झाल्या होत्या... असे सिनेमे बघून, युगल आत्महत्या होण्याचे, एक उदाहरण माझ्या मित्राचे पण आहे. नंतर दोन्ही कडच्या घरच्यांना खूप त्रास झाला. कृपया, मित्राचे नांव किंवा इतर गोष्टी विचारू नका. त्या त्यांच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. जुन्या खपल्या काढण्यात काही अर्थ नाही ...

In reply to by मुक्त विहारि

Bhakti Mon, 05/30/2022 - 19:53
असे सिनेमे बघून, सिनेमे जर एवढा फरक आणू शकतात तर "तारे जमीन पर " सिनेमा पाहून पालक सुधारले तर सुदिनच म्हणावा लागेल. सिनेमा समाजाचाच आरसा असतो.काही आरसे आपल्याला माहीत असतात तर काही नाही.

In reply to by Bhakti

मुक्त विहारि Mon, 06/06/2022 - 20:49
किमान 2-3 पिढ्या गेल्या की, अंदाज येईल.... तारे जमीन पर , ह्या सिनेमा पेक्षा, खालील पुस्तक जरूर वाचा https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5375819083601082225

मुक्त विहारि Mon, 05/30/2022 - 19:10
जसा, कर्मा आणि शोले.... एक दूजे के लिए आणि बाॅबी बघीतल्या मुळे, अशा प्रेम कहाण्या बघायला, मी माझा वेळ वाया घालवत नाही आणि अशा प्रेम कहाण्या परत परत येत असतातच उदा, कयामत से कयामत तक आणि कबूतर का बदला (उर्फ मैंने प्यार किया)

तर्कवादी Mon, 05/30/2022 - 20:14
अश्या सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल.
याउलट मी म्हणेन की सैराट पाहून पळून जाण्यापुर्वी मुलं मुली दोन वेळा विचार करतील , कारण पळून जाऊन पुढचं आयुष्य अगदी छान ,रोमँटिक गुलाबी नसतं हे या चित्रपटात दाखवलंय... मला तरी या चित्रपटातील सुरुवातीच्या प्रेमकथेपेक्षा पुढचा वास्तववादी संघर्ष अधिक भावला. असाच एक भावूक प्रेमपट "प्रेमवारी" हा नक्कीच एकदा बघण्यासारखा आहे (प्राईम वर होता - आता माहित नाही). इथे नायक-नायिका पळून जात नाही .. त्याउलट आपले प्रेम विसरुन नायिकेने आपल्या वडीलांच्या मनाप्रमाणे ते म्हणतील तिथे लग्न करावे हे नायक नायिकेला समजावतो.. ती सुद्धा वास्तवाचा स्वीकार करते.. पण तरीही..... चित्रपटात नायकाचे नायिकेला समजावणे केवळ अप्रतिम व नायिकेने पित्याला लिहिलेले शेवटचे पत्रही .. या दोन गोष्टींसाठी तरी हा प्रेमवारी नक्कीच बघावा..

sunil kachure Mon, 05/30/2022 - 21:03
Ek duje ke लिये सारखे प्रेम पट, बंटी बबली सारखे गुन्हेगारी पट.. किंवा दयावान सारखे गुन्हेगारीचे उदात्तीकरण. शिवा सारखे गुंडागर्दी वरचे सिनेमा. ह्या बघून लोकांनी प्रेरणा घेतली आणि त्या मार्गावर पण गेले. कारण हे सर्व चुकीचे मार्ग होते पण चांगला विषय असणारे सिनेमा बघून लोक तो मार्ग स्वीकारत नाहीत... चांगल्या मार्गावर चालत राहणे खूप कठीण आहे. लाच घेणारे लाखो मिळतील पण लाच न घेणारा एक मिळणे मुश्किल होईल. व्यसनी लोक किती तरी मिळतील पण निर्व्यसनी मोह मोजकेच मिळतील.

कर्नलतपस्वी Mon, 05/30/2022 - 22:34
शहाण्यांना गुळाची चव म्हणून १०० कोटी कमावता आले. गाढवांना गुळाची चव नसल्यामुळेच त्यांचे पैसे वाचले.

चलत मुसाफिर Tue, 05/31/2022 - 07:30
चरफड आवडली. सिनेमे पैसे कमावण्यासाठी बनवले जातात, समाजसेवा किंवा समाजप्रबोधन हा असलाच तर केवळ साईड उद्देश असतो. ज्या युगुलांना पळून जायचे असेल ती 'सैराट' पहात बसणार नाहीत. दाऊद इब्राहिम 'जंजीर' किंवा 'कालीचरण'मधला अजित पाहून डॉन बनला असे नाही. 'समाजावर परिणाम' ह सर्वस्वी गैरलागू मुद्दा वगळून समीक्षा केलेली चांगली असते.

In reply to by भागो

सुबोध खरे Wed, 06/08/2022 - 12:21
मास्तर तमाशा बघून समाज बिघडला नाही कि कीर्तन ऐकून समाज सुधारला नाही हे जरी पूर्ण समाजाच्या बाबतीत सत्य असले तरि वैयक्तिक बाबतीत सिनेमाचा प्रभाव तरुण संवेदनशील मनांवर खूप जास्त पडतो हे सत्य आहे. याचं सिनेमात (पिंजरा) मास्तर तमासगिर मुलीच्या नादाला लागुन त्यांची वाताहत होते हेही दाखवले आहेच की . एक दुजे के लिये या चित्रपटा नंतर काही डझन जोडप्यांनी आत्महत्या केली होती हे सत्य आहे. हा सिनेमा मी पण पाहिला होता आणि शेवटी नायक नायिका आत्महत्या करतात ते पाहून सुन्न व्हायला होते हेही सत्य आहे. कारण त्यावेळेस माझे वय १६ वर्षे होते. अर्थात जो प्यार मे हार जाते है वो शादी करते है और जो प्यारमे जीत जाते है वो खुदकुशी करते है या वाक्याशी मी अजिबात सहमत झालो नव्हतो हा भाग अलाहिदा. सिनेमात स्मग्लर किंवा दुर्जन माणसे पटकन श्रीमंत होतात हे पाहून माझा स्वतःचा नातेवाईक अशा मार्गाला लागला होता आणि शेवटी गर्दच्या व्यसनात अडकून त्याच्या आयुष्याची वाताहत झाली हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. माझ्या मैत्रिणीच्या वर्गातील डॉक्टर मुलगी एका पानवाल्याच्या नादाला लागून त्याच्याशी लग्न करून आयुष्यभर पस्तावलेली पण पाहिलेली आहे. (पानवाल्याशी लग्न करण्यात काही गैर आहे असे नव्हे पंरंतु केवळ त्याच्या बुरसटलेल्या विचारसरणी मुळे तिचे करियर पुढे जाऊ शकले नाही आणि गृहकलह आणि बाहेर नोकरी या चक्रात ती पार पिचुन गेली आहे. एमबी बी एस झाले बास झाले अधिक शिकून काय करायचे आहे? पुरुष रुग्णांशी संपर्क ठेवायचा नाही सारखी विचारसरणी असल्यास काय होईल?) याच वयात मुले लष्कराबद्दल आकर्षण बाळगून लष्करात भरती होऊन सन्मार्गाला लागतात किंवा अनेक तरुण दहशतवादाबद्दल किंवा बंदुकीच्या आकर्षणामुळे गुंड किंवा दहशतवादी झालेले पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहे. बाकी मी सैराट पाहिलेला नाही त्यामुळे त्याबद्दल थेट कोणता प्रतिसाद देणे शक्य नाही.

In reply to by विजुभाऊ

कपिलमुनी Tue, 05/31/2022 - 12:00
3 इडियट च्या कित्येक पिढ्या अगोदर पासून ओल्ड मंक हे इंजिनियरिंग चे राष्ट्रीय पेय आहे.. पिणारा पितोच. त्याला पिक्चर ची गरज नाही

भागो Tue, 05/31/2022 - 09:39
अठराव्या वर्षी जो बिघडत नाही म्हणजे त्याच्यात नक्की काहीतरी गडबड आहे, आणि लग्न झाल्यावर जो सुधरत नाही त्याच्या बायकोत काहीतरी गडबड आहे! बिघडणे आणि सुधरणे हा निसर्ग नियम आहे. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना,

जेम्स वांड Tue, 05/31/2022 - 10:00
मी जाऊन लेखाची प्रकाशन तारीख बघून आलो. ३० मे , २०२२, पटाईत थोडे लेटच झालात नई का ? जाऊ द्या, तुमच्या दिल्लीकर हिंदी टोंड मराठीत काहीतरी वाचायला मिळाले ह्याचाच आनंद, कारण ते (शैली) सोडून तुमच्या लेखनात काही खास वाचनेबल असते असे वाटले नाही कधीच. परत तुमच्याशी चर्चेत पॉईंट नसतो, कारण तुम्ही भारत सरकारच्या अमुक कार्यालयात काम केले, पीएमओ मध्ये स्टाफ होतो वगैरेंच्या हवाल्याने "मी असे ऐकले होते" "मला असे कळले होते" "एका आई ए एस अफसर सोबत काम करताना समजले" वगैरे यशस्वी पालुपद लावलेत की चर्चा रेटली जाण्याची शक्यता शून्य असते. कारण आमच्या ७ डुया (डुया - ग्रामीण पश्चिम महाराष्ट्रीयन बोलीत पिढी ह्या शब्दाला समानार्थी शब्द) दिल्ली काय पुणे धड न बघितलेल्या. पुढच्या ७ पिढ्यातपण तसला काही चान्स नाही. त्यामुळे तुम्ही काहीही फॅक्ट सांगा किंवा ठोकून द्या वाटेल ती लोणकढी, विदा मागणे अन पुराव्यांचा प्रश्नच नसतो आम्ही आपलं त्याला मम म्हणून होकार द्यायचा असतो. असो, एकंदरीत पटाईत तुम्ही "मिपा काका" होण्याच्या वाटेवर यशस्वी घोडदौड करता आहात, लवकर तुम्हाला काका पद प्राप्त होवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. *काका पद म्हणजे काय ते फिर कभी.

स्वधर्म Tue, 05/31/2022 - 16:54
पटाईत काका, तुमची ‘समिक्षा’ वाचली. सैराटबद्दल तुमचा दृष्टीकोन इतक तुच्छतेचा का आहे हे सहज समजू शकतो. प्रस्थापित (आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे) लोकांना हा चित्रपट आवडत नाहीच. तुमच्या आवडत्या विचारधारेच्या अनेकांना तो पसंत पडलेला नाही, यात काहीच नवल नाही. ते असो. असे म्हणतात की जगातले सर्व चित्रपट फक्त आठच प्लॉट्सवर बेतलेले असतात. त्याअर्थाने कोणत्याही चित्रपटात नवीन काही नसते. तसेही महाभारत ही भाऊबंदकी आणि युध्दाची गोष्टच तर आहे, पण सगळेजण व्यासांना श्रेष्ठ मानतात. खरी मेख जे सांगायचे, ते कसे सांगितले यात आहे. या चित्रपटातली सहज भाषा, पात्रांच्या अभिनयातला सहजपणा, धमाल गाणी आणि खरं असं घडण्याची दाट शक्यता, यामुळे तो पहिल्यापासून खिळवून ठेवतो. उगीच तुमच्या विशिष्ट मूल्यव्यवस्थेत जात वर्णापलिकडचं प्रेम स्विकारता येत नाही, यामुळे चित्रपट कसा टुकार आहे, हे सांगण्याची गरज नाही. मागे पुण्यातल्या एक स्वयंघोषित भाजप प्रवक्त्या यांनीही असेच कुजकट ट्वीट केले होते. सगळीकडे जेंव्हा ‘झुंड’चे स्वागत होत होते, तेंव्हा या बाईंनी असे लिहिले होते की ‘एवढा राग आहे, तर मग अमिताभलाच का घेतलं?’. तुमचा आवडता चित्रपट कोणता, तेही एकदा सांगून टाका ना.

In reply to by स्वधर्म

विवेकपटाईत गुरुवार, 06/02/2022 - 12:06
माझी विचारधारा काय याचा समीक्षेशी काही घेणे देणे नाही. मी चित्रपट वाईट आहे हे कुठेच म्हंटले नाही. चित्रपटात बॉलीवूड मसाला व्यवस्थित टाकलेला आहे. पाहणार्‍यांना आवडण्यासारखे सर्वच आहे, त्या मुळे अश्या चित्रपटाचा परिणाम ही जास्त होणार. बाकी वास्तवादी सिनेमे युवा बघतच नाही. त्यामुळे त्या सिनेमांचा प्रभाव समाजावर होतच नाही.

In reply to by स्वधर्म

जनरलायझेशन आवडले नाही
प्रस्थापित (आर्थिक, सामाजिक, राजकीय वगैरे) लोकांना हा चित्रपट आवडत नाहीच.
आम्ही स्वतः सामाजिक दृष्ट्या हुच्च , अतिहुच्च, महाप्रस्थापित आहोत , पण आम्हाला हा चित्रपट मनापासुन आवडलेला ! तुम्हाला कदाचित असे म्हणायचे असेल की - स्वत:ला सामाजिक दृष्ट्या प्रस्थापित समजणार्‍या पण वस्तुस्थितीत तसे नसणार्‍या लोकांना हा चित्रपट आवडला नव्हता ! ;)

तर्कवादी Wed, 06/08/2022 - 17:30
अश्या सिंनेमानपासून प्रेरणा घेऊन प्रेमी सोबत गाव सोडून मुली पळतील तर काय होईल
सिनेमापासून प्रेरणा घेवून मुल-मुली पळून जातील अशीच भिती का वाटत असावी ? सिनेमापासून प्रेरणा घेवून ऑनर किलिंग वाढेल अशी पण भिती आहे ... की मुला मुलींनी पळून जाण्यापेक्षा (ते पळून गेलेच तर) ऑनर किलिंगच्या घटना अधिक योग्य असं काही आहे का ?

In reply to by तर्कवादी

तर्कवादी Wed, 06/08/2022 - 17:36
किंवा एकुणातच सैराटमधल्या नायक नायिकेने पळून जाण्याबद्दल टीका करणारे त्याच कथेतल्या ऑनर किलिंगवर मात्र अजिबात टीका करत नाहीत. म्हणजे अशा लोकांना ऑनर किलिंग मान्यच आहे असं दिसतंय.