मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वैशाखाची ऊन्हं ..

प्राची अश्विनी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
वैशाखाची ऊन्हं जेव्हा नको नको झाली, वळीवाची आठवण उमलून आली. बहाव्याने केली रिती फुलांची पखाल, पंगा-याच्या अंगावर खुळावली लाली.. सावरीच्या म्हातारीला पंख पंख फुटे, वयासंगे उडुनिया गेले तिचे काटे. चाफ्याचा बहर जणू बैराग्याची झोळी, धरू धरू म्हणताना काहीतरी सुटे. सुकलेले पात्र, मधे खोल खोल डोह, सुटता सुटेना कसा जीवनाचा मोह. काठावर कुणी वेडा सूर तोलणारा, कंठी त्याच्या मल्हाराचा ओला अवरोह. ऐकुनिया बकुळी ती लाजली जराशी, चित्त तिचे उडुनिया गेले कुणापाशी? नादावले मन तिचे उतू उतू जाई पायापाशी म्हणूनच नव्हाळीची राशी. वैशाखाची उन्हं मग गंधमय झाली वळीवाची आठवण दूरदूर गेली...

वाचने 5019 वाचनखूण प्रतिक्रिया 17

माहितगार Fri, 04/29/2022 - 22:42
चित्रात तरंगावे तल्लीन काव्य बिंदू तैसी कवियत्री प्राची अश्विनींच्या अभिजात काव्याची प्रचिती खास

नितांतसुंदर आणि चित्रदर्शी, फार आवडली कविता.... होरपळून टाकणर्‍या वैशाख वणव्यामधे अचानक वळीव आल्यावर जो अनुभव येतो तोच अनुभव ही कविता वाचताना आला. उन्हाळ्यावरची सुखद कविता बर्याच दिवसांनी वाचायला मिळाली. मिपावरच्या सर्वोत्तम कवितांची यादी बनवायची झाली तर त्या यादित ही कविता नक्की आली पाहिजे. पैजारबुवा,

In reply to by प्राची अश्विनी

कर्नलतपस्वी Sun, 05/01/2022 - 12:19
उत्तर भारतात उन्हाळ्यात उन बाधू नये म्हणून पिकलेल्या बेलफळाचे सरबत पितात.जागोजागी सरबताच्या हातगाड्या उभ्या दिसतात.