✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?

क
कानडाऊ योगेशु यांनी
गुरुवार, 06/04/2020 - 22:50  ·  लेख
लेख
साधारणपणे दहा-बारा वर्षापूर्वी बेंगलोरमध्येच भाड्याच्या घरात राहत होतो. घराची मालकणी शगुफ्ता नामक (नाव मुद्दामुन लिहिले आहे.वस्सकन अंगावर येऊ नये.)एक स्त्री होती. घराचे डिल होण्याअगोदर तोंडात साखर ठेवुन बोलायची.माझे नुकतेच लग्न ठरले होते.गोड तर इतकी बोलत होती कि मी माझ्या होणार्या बायकोचा व तिचाही लग्नाअगोदर फोनवर संवाद घडवुन आणला. उदा. भाईसाब आप फिकर मत किजिए. आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस.वगैरे. (हेच वाक्य लक्षात राहण्याचे कारण पुढे येईलच.) पण जेव्हा घरात राहायला सुरवात केली व अ‍ॅग्रीमेंट वगैरे सोपस्कार..त्यापेक्षा बेंगलोरच्या रितिनुसार साधारण आठ-दहा महिन्यांचे आगाऊ भाडे अनामत म्हणुन तिला दिले त्यानंतर तिने खरे रंग दाखवायला सुरवात केली. म्हणजे एकदम विलन न बनता काही छोटी मोठी कामे घरात निघाली तर वो आप ही देख लो हेच पालुपद. ( आय विल बी अ‍ॅट युअर सर्विस ची ऐशीतैशी )ह्यात ड्रेनेज लॉक होणे, पाण्याचे मीटर खराब होणे असे काही गंभीर समस्या होत्या. मालकीणीचा चार फ्लॅट असलेला इंडिपेंडंट बंगला होता त्यामुळे बाकिच्या भाडेकरुंशी संवाद साधुन ही कामे करावी लागत आणि भाडेकरुही तिने केवळ अर्थप्राप्ती हा निकष ध्यानात घेऊन ठेवले होते. (बॅचलर्स वगैरे).त्यांना मॅनेज करणे अजुन एक दिव्य होते. ती स्वतः दुसरीकडे राह्त होती मालकीणीचा नवरा चांगल्या कंपनीत कामाला होता व एकदा ती उपलब्ध नसल्याने पाणी न येण्याची एक समस्या त्याच्या कानावर घालुन कृपया हीच निराकरण करा अशी विनंती केली असता घर खाली करण्याची धमकी दिली होती त्यामूळे जपूनच बोलणी करावी लागत. ते असो. पुढे त्या घरातुन दुसरीकडे शिफ्ट झालो तेव्हाही तिने पत्नीचा अप्रत्यक्ष पाणउतारा केला. पत्नी ह्याबद्दल तारतम्य बाळगुन विचार करणारी असल्याने तिने ह्याकडे कानाडोळा केला. पण आज बारा वर्ष होत आली आणि ही गोष्ट अधेमधे आठवत असायची.पण सध्या लॉकडाऊनच्या काळात का कुणास ठाऊक माहीती नाही पण सकाळी उठल्या उठल्या प्रातर्विधी उरकतानाच एकदा तरी आठवत राहते(त्या दृष्टीने प्रातःस्मरणीयच) आणि मनस्थिती लगेच बदलते. थोडक्यात प्रेमभंग झालेल्या प्रेमीसारखी मनस्थिती होते.(!) थोडा बारीक विचार केला असता लक्षात आले कि माझा जो काही पाणउतारा केला तो एकवेळ मी विसरलो असतो पण पत्नीचा केलेला पाणउतारा विसरणे अवघड वाटतेय. ह्याबाबतीत खुद्द पत्नीलाच विचारले असता तिने सांगितले कि अश्या गोष्टींचा ती जास्त विचार करत नाही. ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत.ते ही असो पण ह्या गोष्टीनंतर गोड बोलणार्या कुठल्याही व्यक्तीवर पटकन विश्वास बसत नाही. लगेच अँटीना चालु होतो कि काहीतरी उद्देश अस्णार. पण अश्या मनस्वास्थ्य बिघडवणार्या आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
99392 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

ह्म्म्म

योगी९००
गुरुवार, 06/04/2020 - 23:26 नवीन
मी पण योगेशच व सध्या बंगलोरला आहे. पण हॉस्टेलवर रहातोय त्यामुळे असा अनुभव नाही. सरळ एकदा तिला फोन करा. तिची विचारपुस करा. गोड भाषेत बोला. बोलता बोलता सांगा की तुम्ही जो आमचा पाणउतारा केला तो आम्ही अजूनही विसरलो नाही. पुढे असेही सांगा की असे बोलणारे सुदैवाने या आधी व नंतर कोणीच आम्हाला भेटले नाही. आम्ही लकी आहोत की त्यानंतर कोणीच आम्हाला असे भेटले नाही. हे सगळे हसत हसत आणि आनंदी मुडने सांगा. ती जरी भांडली तरी काही बोलू नका व शांतपणे फोन कट करा. कदाचित ती सॉरी पण म्हणेल... पण यानंतर तिचे मनस्वास्थ्य बिघडलेले राहील... कायमचे..!!
  • Log in or register to post comments

मी पण योगेशच व सध्या बंगलोरला

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/04/2020 - 23:44 नवीन
मी पण योगेशच व सध्या बंगलोरला आहे.
बाबौ ह्यासाठीच त्या घरमालकीणीचे नाव लिहिले होते. त्यानावाची व्यक्ती घरमालक म्हणुन समोर आली तर सावध राहा. बाकी माझ्यापध्दतीने मी निषेध नोंदवला होता पण अनामत म्हणुन दिलेली बरीच मोठी रक्कम तिच्याकडुन परत येणे बाकी असल्याने जास्त काही करु शकलो नाही. पण तिचे मन:स्वास्थ बिघडवणे हा उपाय नसुन आपण अश्या आठवणींपासुन स्वतःची कशी सुटका करुन घ्यायची ह्याचा उपाय शोधतो आहे. (तसे पाहायला गेले तर लेखात लिहिल्याप्रमाणे आता गोड बोलणार्या कुणाही व्यक्तीवर विश्वास टाकु शकत नाही. हा एक फायदाच झालाय.)
  • Log in or register to post comments

ती स्वतः दिल्लीत राहीली आहे

ऋतुराज चित्रे
गुरुवार, 06/04/2020 - 23:45 नवीन
ती स्वतः दिल्लीत राहीली आहे आणि अश्या गोष्टी आधीही अनुभवल्या आहेत. हे खरय. तुम्ही दिल्लीचा अनुभव घ्या,किंवा कधीतरी तिकडचा भाडेकरू ठेवून बघा.
  • Log in or register to post comments

होय. पत्नीने सांगितल्यानुसार

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/04/2020 - 23:58 नवीन
होय. पत्नीने सांगितल्यानुसार दिल्लीतील पंजाबी स्त्रिया जीभेवर साखर पेरुन बोलतात. तिला शिक्षणानिमित्त काही दिवस दिल्लीला राहावे लागणार होते तेव्हा पी.जी साठी चौकशी करताना तिने हे अनुभवले. ह्या शगुफ्ता नामक स्त्रीचे मूळ हे जम्मू काश्मीर मधले होते आणि एकुण बोलण्याची पध्दत वगैरे पाहता पत्नीला तिची व्यावहारिकता लवकरच समजुन चुकली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

तो अपमान तुम्ही अजून का धरून ठेवला आहे?

शेर भाई
गुरुवार, 06/04/2020 - 23:46 नवीन
तुमची अवस्था दोन साधूंच्या गोष्टीतल्या साधू सारखी झाली आहे. ती गोष्ट थोडक्यात अशी, दोन संसार त्यागलेले साधू एका अरूंद नाल्याजवळ उभे असतात. त्यांना तो नाला पार करायचा असतो. तेव्हढ्यात तिथे एक सुंदर कमनीय बांध्याची तरुणी येते. तिला पण नाला पार करायचा असतो. ती त्यातल्या एका साधूला विनंती करते कि मला उचलून पलीकडे नेऊन ठेवाल का? त्या दोघांपैकी एक साधू लगेच त्या तरुणीला सहज उचलून पलीकडे नेऊन सोडतो. आणि ती तरुणी आपल्या रस्त्याने निघून जाते. दुसरा साधुसुद्धा पहिल्याच्या मागोमाग येतो आणि दोघे चालू लागतात. पण थोड्या वेळाने पहिल्या साधूला आपल्या सहकाऱ्याची चल-बिचल जाणवते, आणि तो त्याला सांगतो कि बाबारे, मी त्या तरुणीला त्या नाल्याजवळच सोडलं आहे, आणि तू तिच ओझ अजून का बर उचलून ठेवल आहेस? तुमच्या पत्नीने जर तो विषय सोडला आहे, तर तो अपमान तुम्ही पण सोडलाच पाहिजे (तुमची ती मालकीण पण या गोष्टीतल्या तरुणीसारखी सुंदर कमनीय बांध्याची होती का? आणि असली तरीही तिला तिच्या घराजवळच सोडून तुम्ही तुमच्या बायाकोसोबतच वर्तमानात रहा) आणि एंटेना चालू असण हि चांगली गोष्ट असते, पण सिग्नल मात्र योग्यच पकडा. Tin Tin मध्ये एक वाक्य आहे “People always have the habit of catching wrong signals!!” ते तुम्ही तुमच्या बाबतीत टाळालच अशी आशा करून माझे किर्तन संपवितो
  • Log in or register to post comments

राणेसाहेब तुमचे विश्लेषण

कानडाऊ योगेशु
गुरुवार, 06/04/2020 - 23:52 नवीन
राणेसाहेब तुमचे विश्लेषण बरोबरआहे. कधी कधी वाटते मनालाच अश्या गोष्टीत गुंतुन चर्विताचर्वण करायला आवडते. पण सोडुन द्या म्हणुन सुटले जात नाही ही खरी समस्या आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

योग्या, मला तर चांगलाच ओळखतो

गणेशा
Fri, 06/05/2020 - 00:14 नवीन
योग्या, मला तर चांगलाच ओळखतो तू.. सरळ फोन कर त्या शेंगउपटिला, दोन साजूक शिव्या हासड.. मग मनाची शांती होईल.. मग तू या आठवणीत रमशील कि काय भारी शिव्या दिल्या शेंगउपटिला...
  • Log in or register to post comments

नाय रे गण्या. आता बारा

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 00:32 नवीन
नाय रे गण्या. आता बारा वर्षांनंतर फोन करुन बोललो कि तुझ्यामुळे यंव झाले अन त्यंव झाले तर तिला आसुरी आनंद मिळु शकतो. ती ह्याबाबतीत निर्ढावलेली आहे. कारण तिथुन गेलेला जवळपास प्रत्येक भाडेकरु तणतणतच गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

योग्या,

गणेशा
Fri, 06/05/2020 - 00:44 नवीन
योग्या, मग माझ्यासारखे जुणे, पन तिथं राहिलेले एक दोन तरी गोळा कर.. अन त्यांच्यात बसल्यावर दे शिव्या... शिव्या हा मनशांती मिळवण्याचा एकमेव मार्ग असतो अश्या वेळेस.. नाही तर बस आठवत त्या म्हाताऱ्या शेंगउपटिला.. -- अवांतर : मिपा वर गण्या म्हणणारा तू पहिलाच.. बरं वाटलं.. आपल्या सारखं.. सायकलचा धागा घेतलाय लिहायला त्यात हे असले नावाचे सांगितले आहे.. बरं वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

सिग्नलच चुकीचा पकडला

शेर भाई
Fri, 06/05/2020 - 00:15 नवीन
मनाला अश्याच गोष्टीत गुंतुन चर्विताचर्वण करायला आवडत असल्यास तुमचा सगळ्यात आधी एंटेना बदला, कारण सिग्नलच चुकीचा पकडला जात असेल तर कार्यक्रम चुकीचेच लागणार. सगळ्याच गोष्टी स्वतःसाठी नसतात करायच्या हे आधी लक्षात घ्या. तुम्ही जर मनापासून ठरवलेत तर तुम्ही नक्कीच ते सोडून द्याल.
  • Log in or register to post comments

जास्त विचार नका करू. व्यक्ती

पाषाणभेद
Fri, 06/05/2020 - 00:57 नवीन
जास्त विचार नका करू. व्यक्ती तितक्या प्रकृती. ती तुमचा विचार अजूनही करत असेल काय?
  • Log in or register to post comments

ती तुमचा विचार अजूनही करत

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 09:08 नवीन
ती तुमचा विचार अजूनही करत असेल काय?
नसावी. खाली भुजंगरावांनी म्हटल्याप्रमाणे मी तिच्या खिजगणतीतही नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

थोडक्यात..

भुजंग पाटील
Fri, 06/05/2020 - 02:21 नवीन
थोडक्यात म्हणजे ती शगुफ्ता बारा गावचे पाणी प्यायलेली स्ट्रीट स्मार्ट बाई असून कमी खर्चात आणि कमी त्रासात प्रॉपर्टी मॅनेज अन फायदेखोरी करणे तिला चांगलेच माहिती होते. तिच्यासाठी असले वागणे पर्सनल नसेलही. त्या मानाने तुम्ही तेव्हा जरा नवखे (आणि खूप संवेदनशील) होता. एक रिमोट शक्यता ही कि ती बाई टोकाची नार्सिसिस्ट / सोशियोपॅथ (मराठी शब्द माहिती इल्ले) असावी, आणि अगदी ठरवून विचार करून असे वागत असावी. (विचीत्र वाटतेय, पण असले लोक असतात.) काहिही असले तरी तुम्ही तिच्या आता खिजगणतीतही नसाल. त्यामुळे तुम्ही पण ते चॅप्टर पुर्ण क्लोज करा. मी तेव्हा असे बोलायला हवे होते, आणि तसे वागायला हवे होते हा विचार आत्ता करूना फक्त फ्रस्ट्रेशन वाढते. आणि इतक्या लहानसहान गोष्टींची चिंता करताहात, म्हणजे त्रास करून घ्येण्यासारखे इतर दुसरे काही प्रॉब्लेम तुम्हाला नसावेत अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना करतो. :) हे नक्कीच करावे: तो विषय डोक्यातून पुर्ण काढून टाका. ती तुमची कोणीही लागत नाही, आणि तिचा तुमचा परत संबंधही येणार नाही. १० वर्षापुर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल आता चरफडत बसणे - इज नॉट हेल्दी. तिला माफ करा - स्वतःला सांगा की तुम्ही तिच्यापेक्षा चांगली व्यक्ती आहात, आणि तिचा विचार करून ह्यापुढे तिला महत्व देणार नाही. हॉबी असेलच तुम्हाला. त्यात वेळ घालवा. हा एक छोटेखानी पण रिलेटेबल लेखः https://www.entrepreneur.com/article/272275 हे शक्य असेल तर करावे: बंगळुरातील मित्र, सहकारी व नातेवाईकांना तसल्या लोकांपासून दूर राहण्यास सांगणे. ती रेंटल प्रॉपर्टी ऑनलाईन असेल तर जमल्यास निगेटीव्ह रिव्ह्यू देणे हे मुळीच करू नये: त्या व्यक्ती बद्दल खूप विचार करून स्वतःचा तिळपापड करत बसणे. बदल्याच्या भावनेतून त्या व्यक्तीला ऑनलाईन स्टॉकींग करणे रात्री अपरात्री निनावी कॉल्स देणे.
  • Log in or register to post comments

भुजंगराव तुमच्या

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 09:34 नवीन
भुजंगराव तुमच्या प्रतिसादातल्या वाक्यावाक्याशी सहमत. हे मुळीच करु नये मध्ये जे लिहिले आहे तसे विचार मनात आले होते खरे. (मान्य करायला हरकत नसावी.)
थोडक्यात म्हणजे ती शगुफ्ता बारा गावचे पाणी प्यायलेली स्ट्रीट स्मार्ट बाई असून कमी खर्चात आणि कमी त्रासात प्रॉपर्टी मॅनेज अन फायदेखोरी करणे तिला चांगलेच माहिती होते.
येस. तिच्यासाठी भाडेकरु ठेवणे हा एक व्यव्साय होता व सुरवातीला गोड वगैरे बोलुन वैयक्तीक संबंध चांगले करतेय असे दाखवुन भाडेकरु मिळवण्याची स्ट्रॅटेजी होती. कारण घर सोडुन जाताना नव्या भाडेकरु सोबत केलेला करारनामा मी पाहिला तेव्हा ज्या ज्या समस्यांचे मी तिने निराकरण करावे अशी अपेक्षा केली होती त्या व तत्सम समस्यांचे निराकरण करणे ही भाडेकरुची जबाबदारी असेल असा नवा मुद्दा तिने करारनाम्यात घातला होता. नव्या भाडेकरुची परिस्थिती काय होणारे हे वाचुन खरेतर हसुच आले होते तेव्हा.(अती झाले आणि हसु आले टाईप). तश्या छोट्य मोठ्या समस्या आयुष्यात असतातच आणि ही घटनाही कधीमधी मनात चमकुन जात असेल पण लॉकडाऊन मध्ये तसाही वेळ पुष्कळ आहे आणि त्यामुळे मागे सारली गेलेली ही घटना पुढ्यात आली असावी. पण ह्या विचाराच्या दुष्टचक्रातुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो आहे. सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुजंग पाटील

हे नक्की आहे काय?

शेर भाई
Fri, 06/05/2020 - 10:00 नवीन
एकंदर अस दिसते आहे कि, ज्या व्यक्तिने तुम्हाला त्रास दिला / फायदा घेतला ती व्यक्ती एक स्त्री होती, त्याचा तुमच्याही नकळत तुमच्यातल्या सुप्त पुरुषी अहंकाराला (Male EGO) त्रास होतो आहे. जमल्यास त्याला मलमपट्टी करून एका कोपर्‍यात बसायला पाठवा. नाहीतर त्याला चांगल खायला प्यायला देऊन मोठ्ठ करून स्वतःच्या वर्तमानाला, भूतकाळाच्या जुन्या भुताला चुरगळायला देत रहा.
  • Log in or register to post comments

तुमच्यातल्या सुप्त पुरुषी

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 10:49 नवीन
तुमच्यातल्या सुप्त पुरुषी अहंकाराला (Male EGO) त्रास होतो आहे
नाही हो.तसे नसावे. ती घरमालक होती आणि तशीही एकुण फॅमिली श्रीमंत होती त्यामुळे तो मोठेपणा मान्य केला होता. बहुदा खरा त्रास हा परिस्थितीनुसार स्वतःचा फायदा पाहुन भूमिका बदलण्याच्या तिच्या वृत्तीमुळे झाला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेर भाई

मला अस वाटत तुम्ही उगाचच

बाप्पू
Fri, 06/05/2020 - 16:50 नवीन
मला अस वाटत तुम्ही उगाचच इतक्या लहान गोष्टीचा बाऊ करत आहात. अश्या कितीतरी गोष्टी सगळ्याच्या आयुष्यात घडतच असतात. आम्ही कितीतरी ठिकाणी भडकेरू म्हणून राहिलोय आणि अश्याच प्रकारचे अनुभव खूप वेळा आलेत. जास्त विचार न करता विसरून जाणेच सोयीस्कर..
  • Log in or register to post comments

अठवणी किंवा विचारांपसून सुटका

राजाभाउ
Fri, 06/05/2020 - 17:52 नवीन
अठवणी किंवा विचारांपसून सुटका म्हणजे त्या आठवणी पुन्हा येउ नयेत किंवा ते विचार मनात निर्माण होउ नये अशी इच्छा पण हे शक्य नसत, आपण विचार थांबवू शकत नाही कुणी किती सांगितले कि सोडून द्या किंवा आपल्याला जरी वाटले तरी विचार येतातच , उलटपक्षी थांबवायचा प्रयत्न केला तर ते जास्त येतात त्यामुळे विशिष्ट विचारांपासून सुटका हा विचार काढून टाका. आता घटना तुमच्या बरोबर आणि तुमच्या बायकोबरोबर घडली पण आता तुमच्या आणि तीच्या त्याबद्दलच्या भावना वेगळ्या आहेत म्हणजे तुम्हाला जो त्रास होतो आहे तो घटनेचा नसून त्या बद्दल तुमच्या मनात असलेल्या भावनांचा आहे आता घटना आणि भावना वेगळ्या केल्या कि लक्षत येईल कि घटना विसरण्या पेक्षा त्या बद्दलच्या भावनांची तीव्रता कशी कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि घटना जरी कुणीही घडवली असली तरी, या भावना तुमच्या आहेत त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे आता या भावनांची तीव्रता कशी कमी करता येईल हे सांगण्या एव्हडा मी काही तद्न्य नाही पण मानशास्त्रात याला बहुदा unfinished emotional business असे म्हणतात त्या अनुशंगाने शोधत येईल
  • Log in or register to post comments

योग्य लिहिले आहे राजाभाऊ.

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 20:36 नवीन
योग्य लिहिले आहे राजाभाऊ. प्रश्न फक्त ह्या घटनेबाबतच्या विचारांचा नाही आहे. पण अश्या एकुण घडुन गेलेल्या अप्रिय घटना व तत्संबंधी विचारांपासुन सुटका करुन घेण्याचा होता. मनातील ही विचारांची लढाई विचारांनीच जिंकता येईल असे मला वाटते. हे लढाई बाहेर लढुन उपयोगाचे नाही. फार मागे नाटककार अशोक पाटोळेंची मुलाखत वाचली होती.त्यांनाही अश्या परिस्थितीबाबत प्रशन विचारला गेल्यावर त्यांनी अश्या लोकांना मी माझ्या नाटकातील पात्रे बनवुन त्यांचा सूड घेतो असे काहीसे उत्तर दिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

आणि घटना जरी कुणीही घडवली

शाम भागवत
Mon, 06/29/2020 - 14:22 नवीन
आणि घटना जरी कुणीही घडवली असली तरी, या भावना तुमच्या आहेत त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे
राजाभाऊ, पूर्पणे सहमत. त्यामुळे त्यातून सुटका करून घेणे आपल्याच हातात आहे व ते शक्यही असते. तुम्हाला प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. पण. तुमच्या आजच्या हजरजबाबीपणामुळे आठवलं. :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

आणि घटना जरी कुणीही घडवली

प्रकाश घाटपांडे
Mon, 06/29/2020 - 19:49 नवीन
आणि घटना जरी कुणीही घडवली असली तरी, या भावना तुमच्या आहेत त्यामुळे त्याची जबाबदारी तुम्ही स्वीकारली पाहिजे >>> जरी नाही स्वीकारली तरी परिणाम तुम्हालाच भोगावे लागणार आहेत हा भागही आहेच. त्रासाच्या भागामधे अनुत्तरीत प्रश्न व अपेक्षाभंग या दोन्हीचा समावेश होतो. अनुत्तरीत प्रश्नामधे उत्तर आपल्याकडे नसते ते समोरच्याकडे असते. आपणाला ते जाणून घेण्याची उत्सुकता व इच्छा असते ती पुर्ण होत नाही म्हणूनही तुम्ही अस्वस्थ झाले असता. अपेक्षाच ठेवायच्या नाहीत असे प्रत्यक्शात होत नाही त्यामुळे अपेक्षाभंगाच्या दु:खद स्मृती लाही सामोर जाव लागत. काळ हा त्यावर तीव्रता कमी करणारा इलाज आहे काही निमित्ताने कटुस्मृती पुन्हा ट्रिगर होतात पुन्हा काळ हा इलाज. अशा संकटाना सामोरे जाणे व लढत राहणे. काही मानसोपचाराच्या रिलॆक्सेश्न मेथड मन शांत करतात. त्यामुळे त्यातून सुटका करून घेणे आपल्याच हातात आहे व ते शक्यही असते.>>> हे कळत पण वळत नाही असा भाग आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

त्रासदायक आठवणींपासुन सुटका

प्रसाद गोडबोले
Fri, 06/05/2020 - 19:29 नवीन
त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? >>> गांजा !
  • Log in or register to post comments

म्हन्जे

नाखु
Sat, 06/06/2020 - 16:24 नवीन
तुम्हि समस्या बदलायला सान्गत आहात !!! तुका म्हने उगि रहावे! चित्ति असो द्यावे समाधान !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

त्रासदायक

स्मिता.
Fri, 06/05/2020 - 20:28 नवीन
तुम्ही जेवढं लिहिलंय त्यावरून जरी तुमचा अनुभव त्रासदायक असला तरी आम्ही एका घरमालकाकडून घेतलेल्या अनुभवाच्या तुलनेत फारच सौम्य आहे असे दिसते. आमच्या अनुभवाचा सुरुवातीचे काही दिवस फार मानसिक त्रास झाला पण काळासोबत तीव्रता कमी झाली. 'झाले-गेले गंगेला मिळाले' असे म्हणून स्वतःच्या मनावरचे ओझे हलके केले आणि पुढच्या वेळेकरताचा धडा घेतला. हा मानसिक त्रास त्या व्यक्तिच्या चुकिच्या वागण्यापेक्षा आपल्या असहय्यतेचा असतो. १०-१२ वर्षं होवूनही जर आठवणी त्रासदायक वाटणं सहाजीक आहे पण 'सोडून देणे' हे आपल्या मानसीक स्वास्थ्याकरता गरजेचे असते.
  • Log in or register to post comments

हा मानसिक त्रास त्या

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 20:39 नवीन
हा मानसिक त्रास त्या व्यक्तिच्या चुकिच्या वागण्यापेक्षा आपल्या असहय्यतेचा असतो.
बुल्स आय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

रोज लक्षात ठेवून एक वेळ ठरवून

गवि
Fri, 06/05/2020 - 20:41 नवीन
रोज लक्षात ठेवून एक वेळ ठरवून नियमित किमान दहा मिनिटे अत्यंत अप्रिय, त्रासदायक आठवणी पुन्हा पुन्हा आठवाव्यात. त्यातल्या काही वेळेवर आठवत नसतील तर त्या नोंदवून ठेवाव्यात आणि लिस्ट वाचून आठवाव्यात. मनाला रोज त्या घटनेवर किमान दोन दोन मिनिटे एकाग्र करावे. कालच्यापेक्षा आज मनस्तापाची पातळी घटली तर प्रयत्न कमी पडताहेत किंवा आपल्यात सातत्य नाही असे स्वतःला सांगून पुन्हा प्रयत्न करावे. मनस्ताप समाधानकारक झाला की मग लिस्टपुढे तारीख टाकून टिकमार्क करावेत. यामुळे काही दिवसांनी (उदा नियमित व्यायामाप्रमाणे) या रूटीनचा अत्यंत कंटाळा येऊन हळूहळू आपण त्या सोडून देतो. कृ ह घे.
  • Log in or register to post comments

२००७ साली मी माझ्यावर

शाम भागवत
Fri, 06/05/2020 - 21:40 नवीन
२००७ साली मी माझ्यावर याबाबतीत प्रयोग केला होता. यश मिळालं होतं. ते यश आजपर्यंत टिकलंय! जमल्यास मी तुम्हाला व्यनि करेन.
  • Log in or register to post comments

हा प्रतिसाद धागाकर्त्यासाठी

शाम भागवत
Fri, 06/05/2020 - 21:42 नवीन
हा प्रतिसाद धागाकर्त्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

@ शाम भागवत: जमल्यास मी तुम्हाला व्यनि करेन.

संजय क्षीरसागर
Fri, 06/05/2020 - 22:33 नवीन
त्यापेक्षा इथे प्रतिसाद का देत नाही ? त्यांचा प्रॉब्लम व्यक्तिगत वाटला तरी जनरल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

भागवत सर व्यनि नक्की करा.

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 23:17 नवीन
भागवत सर व्यनि नक्की करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

विस्तृत लिहायला वेळ लागेल.

शाम भागवत
Fri, 06/05/2020 - 23:57 नवीन
विस्तृत लिहायला वेळ लागेल. लिहिले तर नक्की पाठवीन. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

व्यनि पाठवला आहे.

शाम भागवत
Mon, 06/08/2020 - 10:28 नवीन
व्यनि पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

माझं पूर्वी असं माझ्या

वीणा३
Fri, 06/05/2020 - 21:40 नवीन
माझं पूर्वी असं माझ्या जवळच्या नात्यातल्या लोकांबद्दलच झालंय. माझ्या नात्यातल्या लोकांनीच माझ्या भिडस्त स्वभावाचा गैरफायदा घेतलाय, आर्थिक नुकसान पण केलंय. वरती म्हटल्या प्रमाणे आपल्या असहाय्य्यतेचा जास्ती त्रास होतो. आधी खूप त्रास करून घ्यायची. आता म्हणते कि कदाचित मी त्यांना गेल्या जन्मी त्रास दिला असेल , त्यांनी त्याची परतफेड केली. तेव्हापासून त्रास कमी होतो मला या जुन्या गोष्टींचा. कोण कोणाशी वाईट का वागतं, चांगलं का वागतं, कोणी लोक आपल्याला बघितल्यावर फारसे आवडत नाहीत, पण काही लोकांबरोबर २ मिनटात आयुष्यभराची मैत्री कशी होते, एकाच वेळी २ जन्माला आलेली मुलं - एक खूप चांगल्या घरात, एक कुठल्या तरी दारुडा बाप सतत आजारी आई अशा घरात. हे सगळं असं का होत यावर माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही.
  • Log in or register to post comments

पुनर्जन्म?

शाम भागवत
Fri, 06/05/2020 - 21:44 नवीन
पुनर्जन्म? बापरे!! या धाग्याचं आता काही खरे नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

@ वीणा३ : माझ्याकडे पुनर्जन्म या व्यतिरिक्त उत्तर नाही

संजय क्षीरसागर
Fri, 06/05/2020 - 22:49 नवीन
हा संत मंडळींनी सांगितलेला पलायनवाद आहे. त्याचा मनाची तात्कालिक समजूत घालायला उपयोग होऊ शकेल. पण त्या भानगडीत कुठलाही त्रास पूर्वजन्मातल्या आपल्या दुष्कृत्यांशी जोडायचा नाद लागतो ते पूर्णपणे निराधार आणि अशास्त्रिय आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ दृष्टीकोन हरवतो आणि आपली चूक नसतांना सुद्धा, काय वाट्टेल ते सहन करायची सवय लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

पलायनवाद तर पलायनवाद. मला जर

कानडाऊ योगेशु
Fri, 06/05/2020 - 23:23 नवीन
पलायनवाद तर पलायनवाद. मला जर एखादा विचार करुन मनःशांती मिळणार असेल तर माझी हरकत नाही. आणि तसेही शास्त्रीय विचार,वस्तुनिष्ठ विचार करुनही मी काही फार दिवे लावेन असे वाटत नाही. अवांतरः मध्यंतरी एका प्रथितयश लेखकाने एका विशिष्ठ राज्यात विशिष्ठ घटनेनंतर झालेल्या दंगलीला एका विशिष्ठ नेत्याला जबाबदार धरुन जर माझ्याकडे अमुक हत्यार असते तर मी तमुक केले असते असे उघडरित्या बोलुन आपला मनक्षोभ शांत केला होता. मी तर अगदी पामर माणुस आहे इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ कानडाऊ योगेशु : पलायनवाद तर पलायनवाद !

संजय क्षीरसागर
Fri, 06/05/2020 - 23:46 नवीन
करुन पाहा. अशी प्रत्येक नकोशी वाटणारी गोष्ट पूर्वजन्माशी रिलेट केल्यावर, आपण पूर्व जन्मी इतके पापी होतो का ? या नव्या विचारानं, आता त्या विचारापासून कशी सोडवणूक करू ? म्हणून नवा धागा काढावा लागेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

पुनर्जन्मच असे नाही पण आपणही

कानडाऊ योगेशु
Sat, 06/06/2020 - 00:06 नवीन
पुनर्जन्मच असे नाही पण आपणही कोणावर जाणतेपणी अजाणतेपणी अन्याय केला असेल व तो इथे बॅलन्स होतो आहे असे जरी समजले तरी फरक पडतो. बाकी काही दिवसभर असे विचार येत नाहीत. पण वरच्या एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे लॉकडाऊनमध्ये अचानक मोकळा वेळ मिळाल्यामुळे एरवी अडगळीत पडलेला हा विचार वर आला. इथे लिहुन मदत मागायचे कारण नात्यातल्या एका जवळच्या व्यक्तीची जवळपास सर्व सांसरिक जबाबदारीतुन मुक्त झाल्यानंतर आलेल्या पोकळीत असे जुनेपुराणे विचार मनात घोळवुन विचार करत बसल्याने झालेली हालत जवळुन पाहीली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ कानडाऊ योगेशु: आपणही कोणावर जाणतेपणी..

संजय क्षीरसागर
Sat, 06/06/2020 - 00:54 नवीन
> अजाणतेपणी अन्याय केला असेल व तो इथे बॅलन्स होतो. एकतर अस्तित्व हा कॅश सौदा आहे ज्या क्षणी चूक त्याच क्षणी शिक्षा कारण इथे मागचा हिशेब ठेवायची कोणतीही व्यवस्था नाही. जो काय मागचा हिशेब आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या मेंदूपालिकडे कुठेही स्टोअर होत नाही. लेखात वर्णन केलेला प्रसंग ओढवण्याचं खरं कारण माणूस ओळखण्यात झालेली चूक आहे देखणी काश्मिरी स्त्री आणि मोहक बोलणं यामुळे जजमंट चुकलं असा साधा विषय आहे. पण आपलं जजमंट चुकलं यापेक्षा त्या स्त्रीनं कसा गैरफायदा घेतला असा विचार करत बसलं तर, कितीही सल्लामसलत केली तरी विचारातून विचार निर्माण होऊन, त्यातून सुटका होणार नाही. त्याऐवजी पुढच्या वेळी सावध राहू पुन्हा अशी चूक होऊ द्यायची नाही, इतका साधा विचार केला तर सगळा विषय संपतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

देखणी काश्मिरी स्त्री आणि

कानडाऊ योगेशु
Sat, 06/06/2020 - 01:20 नवीन
देखणी काश्मिरी स्त्री आणि मोहक बोलणं
ह्या वाक्याने सगळा संदर्भच बदलतोय हो. ही स्त्री माझी विचारक्षमता कुंठीत करण्याइतकी देखणी तर अजिबातच नव्हती. बोलणे मोहक म्हणता येणार नाही पण व्यक्ती चांगली आहे हा विश्वास समोरच्यावर बिंबवण्याइतपत फसवे होते. ज्याचाच आता त्रास होतो. (फसले गेलो वगैरे.) पण ते जाऊ दे. झाले गेले गंगेला मिळाले,अक्कल्खाती टाकले असे समजुन पुढे चालायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ कानडाऊ योगेशु :बोलणे मोहक म्हणता येणार नाही

संजय क्षीरसागर
Sat, 06/06/2020 - 02:09 नवीन
> पण व्यक्ती चांगली आहे हा विश्वास समोरच्यावर बिंबवण्याइतपत फसवे होते. मोहाशिवाय फसवणूक करणारी दुसरी गोष्ट या जगात नाही फसवणाऱ्याबद्दल तिटकारा निर्माण झाल्यामुळे आपला मोह नडला हे मान्य होत नाही, आणि दुसऱ्यानी फसवलं असा स्टँड घेतला जातो. मग सल्लामसलतीला अंत नाही. आपण आपल्या मोहाची किंमत चुकवली असा विचार, आपल्याला अनुभवसमृद्ध करतो, मग पुन्हा तशी चूक होत नाही ! > झाले गेले गंगेला मिळाले,अक्कल्खाती टाकले असे समजुन पुढे चालायचे. करेक्ट ! तुमचा प्रश्न सोडवला आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

माझ्याकडे माझी कामवाली बाई

वीणा३
Sat, 06/06/2020 - 03:06 नवीन
माझ्याकडे माझी कामवाली बाई एका बाई ला घेऊन येते. तिला फिट्स येतात. तिचा नवरा दारुडा/नशेडी आहे. तिला मी काही जास्तीची कामं (जी माझी कामवाली करत नाही) ती देते, आणि पैसे देते. ही बाई (तिला क्ष म्हणू) जेव्हा गरोदर होती तेव्हा माझी एक मैत्रीण पण गरोदर होती. दोघीना एकाच दिवशी बाळ झालं (जे मला नंतर कळलं). मैत्रिणीचं बाळ बरेचदा भेटत असल्यामुळे मला बरेचदा बघायला मिळतं. क्षच २-३ महिन्यांनी बघायला मिळतं. दोन्ही बाळ खूपच गोड आहेत. मला नेहमी त्यांना बघिल्यावर प्रश्न पडतो, कि एकाच दिवशी एकाच शहरात जन्माला आलेली बाळं, एकाला अगदी फुलासारखं जपलं जातं. दुसऱ्याला अंघोळ तरी घालतात का, जेवायला तरी धड देतात का देव जाणे. क्षच्या बाळाच्या नशिबी त्याचं घर आणि मैत्रिणीच्या बाळाच्या नशिबी उत्तम घर असं का? "क्षच्या बाळाने (वय वर्ष १.५) अशी नक्की काय चूक केली असेल कि त्याला त्याच घर मिळालं? त्यालासुद्धा एखाद छान घर का नाही मिळालं?जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो?" मला तरी या प्रश्नाचं पुनर्जम्नशिवाय कुठलाही पटेल असं उत्तर मिळालेलं नाहीये. तुम्हाला मिळालं तर नक्की ऐकायला आवडेल. काथ्याकुटाचा विषय मला तरी असा वाटतो कि, १. त्यांना घर आवडलं असावं + सोईचे असावं. २. नुकताच लग्न ठरलंय म्हणजे आयुष्यात अजून सेटल व्हायचे असावेत, वयाने पण लहान असावेत. ३. ८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत. ४. दिल्लीकडचे लोक खरंच खूप गोड बोलतात. आपल्याला खरंच सवय नसते. नंतर कळतं कि एकूणच वागायला कसे पण असले तरी बोलायला मिठ्ठास, अदबशीर असतात एकदम. ५. मालकीण नीट वागत नाहीये म्हणून लगेच ८-१० महिन्याच्या आगाऊ पैशावर पाणी सोडावं आणि दुसरं घर बघावं अशी परिस्थिती नसावी. ६. आणि अजूनही त्रास होतो त्याच मूळ कारण, नवीन लग्न झालेलं, पत्नीला सुद्धा यातून जायला लागलं, हे असावं. स्वतःला झालेला त्रास विसरणं जास्त सोपं असतं, आपल्या माणसाला झालेला त्रास विसरणं अजून कठीण असतं. काय वाट्टेल ते सहन करायची सवय लागते - माझ्या परिस्थितीत आर्थिक नुकसान किंवा नातं तुटणं असे दोन पर्याय होते. मी आर्थिक नुकसान निवडला. मला दिसत होत कि समोरची व्यक्ती स्वार्थीपणा करत्ये. पण त्या वेळेपर्यंत त्या व्यक्तीने माझं लहानपानपासून बरंच काही केलं होतं, काही अवघड प्रसंगातून जात असताना मानसिक आधार पण दिला होता. जर सरळ पैसे मागितले असते तर काढून दिले असते आणि परत पण मागितले नसते. तसं न करता विचित्र परिस्थितीत (आर्थिक नुकसान किंवा नातं तुटणं ) टाकलं आणि पैसे घेतले. याचा त्रास जास्त होत होता. अजून कोणाचाही असं ऐकून घेतलं नसतं. ज्या क्षणी चूक त्याच क्षणी शिक्षा - म्हणजे मी आत्ता १०० रुपयांचा भ्र्ष्टाचार केला कि लगेच माझ्या घरातले १०० रुपये चोरीला जाणार. किंवा मी आत्ता कोणाचातरी खून केला तर लगेच माझा पण कोणीतरी खून करणार? मला कल्पना एकदम आवडली. असं असत तर खरंच किती छान झालं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ वीणा३:८-१० महिन्याचे पैसे आगाऊ दिलेत

संजय क्षीरसागर
Sat, 06/06/2020 - 08:38 नवीन
ही रक्कम काही लाखात असावी. इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती ! पण मोह अशी काही स्वप्र रंगवतो की समोरचं प्रपोजल सगळ्यात बेस्ट वाटायला लागतं ! मोहाची ही किमयाच प्रत्येक फसवणूकीचं कारण असते. मग तो विवाह असो,आर्थिक प्रश्न असो की इतर व्यावहार ! त्या वेळी ते प्रपोजल जगातलं एकमेव वाटायला लागतं आणि व्यक्ति निर्णय घेते. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नंतर देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वीणा३

इतकी रक्कम देण्यापूर्वी

गणेशा
Sat, 06/06/2020 - 08:43 नवीन
इतकी रक्कम देण्यापूर्वी तिथल्या भाडेकऱ्यांना त्यांचा अनुभव विचारला असता तर एका झटक्यात मालकीणीची महती कळली असती !
एकदम बरोबर.. अवांतर - योग्या ज्या पद्धतीने सर्व उत्तरांना असे नाहीच म्हणत.आहे त्या पेक्षा मीच आधी लिहितो आता या साठी तेंव्हा लग्न झाले नसताना हि वेळ नव्हता असे धागाकर्त्याला म्हणायचे असेल तर आता हि तो प्रश्न विचारात आहे.. असा प्रश्न तेंव्हाच विचारले पाहिजे होते.. एकदम बरोबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

गणेशा..

मोदक
Sat, 06/06/2020 - 08:55 नवीन
गणेशा.. आधी तू "शगुफ्ता" हे नांव १० वेळा कागदावर लिहून काढ. शेगुप्ता काय आहे राव.. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मोहातून सुटका न होण्याचं कारण सुद्धा

संजय क्षीरसागर
Sat, 06/06/2020 - 08:54 नवीन
मजेशीर आहे. फसलेली व्यक्ती स्वतःचा मोह बघण्याऐवजी, फसवणाऱ्याची स्टोरी लावते मग आप्त-स्वकीय तिला दुजोरा देतात असा सूड घे, तशी हॉर्सपॉवर लाव..... त्या भानगडीत पुन्हा फोकस, आपला मोह नडला याऐवजी, फसवणाऱ्यावर जातो ! नीट बघितलंत तर प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पुनर्जन्म... असफल विवाह..

मोदक
Sat, 06/06/2020 - 08:58 नवीन
पुनर्जन्म... असफल विवाह.. आता हळूहळू मुंबई विरूद्ध पुणे, व्हेज विरूद्ध नॉन व्हेज असे मुद्दे पण येऊदेत. मग धाग्याचा चहूअंगानं खरडफळा होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ मोदक : पुनर्जन्म... असफल विवाह..?

संजय क्षीरसागर
Sun, 06/07/2020 - 12:09 नवीन
पुनर्जन्माचा विषय एका सदस्येनं दिलेल्या प्रतिसादाला अनुसरुन आला आहे प्रतिसाद नीट वाचले असते तर अशी असंबद्ध कमेंट केली नसती. पण काल इथे दिलेल्या प्रतिसादात, तुम्ही स्वतःच्या मानसशात्राच्या अभ्यासाविषयी डिंग मारुन "काही प्रष्ण असतील तर विचारा" असं म्हटलं होतं आता तुमचा मानसशास्त्राचा व्यासंग आणि अभ्यास काय आहे त्याची शहानीशा इथेच होऊ दे. ती व्यनि करा वगैरे शेपूटगिरी सोडा, कारण सदस्येनं विषयाला धरुन लेखावर प्रष्ण केला आहे : " जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? " याचं इथे उत्तर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्रत्येक असफल विवाहामागे मोहच

मोदक
Sun, 06/07/2020 - 22:35 नवीन
प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल ! या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..? माझा मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो आहे की, तुम्ही कोणताही विषयाला बादरायण संबंध लावून फाटे फोडता आणि अकारण विषयांतर करून समोरच्याला निरूत्तर करण्याचा प्रयत्न करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

@ मोदक: या कमेंटचा धाग्याशी काय संबंध आहे..?

संजय क्षीरसागर
Sun, 06/07/2020 - 23:25 नवीन
> प्रत्येक असफल विवाहामागे मोहच दडलेला दिसेल ! अर्थात ! सगळा लेखच निर्णयाच्या प्रक्रियेचा उलगडा होण्यासाठी आहे. व्यावहारात जशी माणूस न ओळखता आल्यानं फसगत होते, तद्वत, विवाहातही तीच चूक होते. मोह याचा अर्थ स्वप्नरंजन असा होतो, निर्णय घेणारी व्यक्ती इतकी मोहून जाते की तिची सारासार करण्याची क्षमता मालवते. लेखकाला तिथे राहणार्‍या लोकांचा उपहास समजला नाही आणि त्यानी जागा सोडणार्‍या भाडेकर्‍यावर विश्वास टाकला मोहाचं दुसरी बाजू अशी की तो व्यक्तीला स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी दुसर्‍यानी कसं फसवलं याची कहाणी ऐकवतो आणि प्रत्येक असफल विवाहाची हीच कथा असते. _______________________________________________ थोडक्यात, माझे प्रतिसाद कधीही मुद्दासोडून नसतात. ते कुणाला कळत नसतील तर त्यानं असंबद्ध कमेंट करण्याऐवजी आणखी खोलात जाऊन विचार केला, तर कळू शकतील. असो, लेखकाचा प्रॉब्लम सुटला आहे. _______________________________________ आता तुम्ही जो मानशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यावरनं " जगातल्या कुठल्याही बाळाला त्याची कुठलीही चूक नसताना वाईट घरात का जन्म मिळतो ? " याचं उत्तर इथे उत्तर द्या. म्हणजे तुमचा काय अभ्यास आहे ते सर्वांना कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा