मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स

सोत्रि · · लेखमाला

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स


chawadee

चिंतामणी"सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल का काय म्हणतात तो झालाय, त्यात तंत्रज्ञानाच्या नव्या धडकेने हजारो-लाखो नोकर्‍यांवर गदा येणार अस म्हटलंय!" चिंतोपंत गणपतीच्या मखराच्या तयारीसाठी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत.
नारुतात्या"नातवाने दिलेला आयपॅड वापरता येऊ लागला म्हणा की, तेही एकदम सोशल मीडिया-बीडिया. हम्म, जोरात आहे गाडी!" नारुतात्या चेहऱ्यावर हसू आणत.
"नारुतात्या, हे शिंचे पुचाट विनोद बंद करा हो!" घारुअण्णा तिरिमिरीत. "अहो चिंतोपंत, कसला व्हिडिओ आणि काय आहे काय त्या व्हिडिओत एवढं व्हायरल होण्यासारखं?" बारामतीकर. "व्हायरल झालाय म्हणजे त्या ढिंचॅक पूजाच्या व्हिडियोसारखं आहे का त्यात काही?" नारुतात्या वेड पांघरत. "नारुतात्या, सीरियसली बोलतोय हो मी! आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ह्या तंत्रज्ञानाच्या घडकेने सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये उलथापालथ होणार आहे. मशीन्स सगळी काम करू शकणार आहेत म्हणे." चिंतोपंत. "म्हणजे माणसांची सगळीच कामं मशीन करणार?" बारामतीकर मोठा आ करत. भुजबळकाका"बारामतीकर, सगळी कामं नाही हो. जी कामं रूटीन आहेत ती, म्हणजे पाट्या टाकण्यासारखी सगळी कामं. एकसुरी आणि साचेबद्ध कामं करण्यासाठी मशीन उपयुक्त आहेत असं मीही वाचलंय आणि त्यावरच्या होणाऱ्या चर्चाही वाचतोय हल्ली" भुजबळकाका चर्चेच्या मैदानात येत. "म्हणजे पाट्या टाकणारांची कंबक्ती आहे म्हणा की! बरंच आहे की मग ते!" नारुतात्या बारामतीकरांकडे बघत, काडी सारण्याचा प्रयत्न करीत. "तितकं सोपं नाहीये ते नारुतात्या. एकंदरीतच नोकऱ्यांवर गदा येणार आहे. कॉस्ट-कटिंगच्या नावाखाली मनुष्यबळाचा वापर कमी करत, नफ्याची गणितं करत खिसे फुगवत ठेवायची भांडवलशाहीची चाल आहे ही." चिंतोपंत. "विश्वेश्वरा, हे अक्रीतच म्हणायचं. माणसांना देशोधडीला लावून कसली प्रगती करणार आहोत आपण?" घारुअण्णा घारुअण्णागरगरा डोळे फिरवत. "घारुअण्णा, अहो हा ह्या तंत्रज्ञानाचा बागुलबुवा आहे झालं." इति भुजबळकाका. "अहो बहुजनहृदयसम्राट, असं कसं? चिंतोपंत म्हणताहेत त्या व्हिडिओत काही तथ्य असेलच ना." घारुअण्णा प्रश्नांकित चेहरा करत. चिंतोपंत"होय भुजबळकाका, अलीबाबाचा जॅक मा ही तेच म्हणतो आहे. उत्तरोत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अधिकाधिक स्मार्ट होत जाऊन, मशीन्स निर्णयात्मक कामं करण्यात तरबेज होत राहणार. सध्या सगळ्या टेक जायण्ट कंपन्यांमध्ये हीच चढाओढ चालू आहे, की ह्या तंत्रज्ञानात कोण बाजी मारणार! गूगल तर ईमेल लिहिताना पुढची वाक्य काय असावीत हेसुद्धा सांगतंय, आता बोला!" चिंतोपंत. "हे राम! विश्वेश्वरा, काय रे हे तुझे खेळ, कसली परीक्षा बघणार आहेस रे बाबा?" घारुअण्णा चिंताग्रस्त होत. "काय हो भुजबळकाका, खरंच जर असं झालं तर मग काही खरं नाही!" इति बारामतीकर. "अहो बारामतीकर आणि घारुअण्णा, एवढं टेन्शन घेऊ नका. जितका बाऊ केला जातोय तितकं काही सीरियस आहे असं मला तरी वाटत नाही. बिग डेटामुळे प्रचंड प्रमाणावर विदा (माहिती) तयार होतेय आणि त्या माहितीचा वापर निरनिराळ्या अल्गोरिदम्सना ट्रेनिंग देण्यासाठी तसंच टेस्ट करण्यासाठी केला जातोय." इति बहुजनहृयदयसम्राट भुजबळकाका. "काय ही अगम्य भाषा आणि तंत्रज्ञानं, काही समजेल असं बोला की!" घारुअण्णा बावचळून जात. "अहो, ह्या सोशल मीडियावर आपणच आपली माहिती देतो आहोत ह्या टेक जायण्ट कंपन्यांना. हगल्यापादल्याचे फोटो अपलोड करतो ना आपण, लाइक्सवर लाइक्स मिळवायला. त्या सगळ्या अगणित फोटोंचा वापर करून, वेगवेगळी अल्गोरिदम्स तयार करून फोटोविश्वात क्रांती घडवून आणली आहे. वेगवेगळी फेसअ‍ॅप्स - म्हणजे फोटो प्रोसेस करणारी अ‍ॅप्स ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचीच बाळं आहेत. गूगलचा 'इमेज कॅप्चा' हाही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाच वापर करून वापरकर्ता हा रोबोटिक यूजर नाही, हे ठरवत असतो." भुजबळकाका समजावून सांगत...भुजबळकाका "आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी आधी समस्याक्षेत्र ठरवावं लागतं आणि त्यानंतर मशीन लर्निंगचं ध्येय. हे एकदा ठरलं की मग खूप सारा विदा (डेटा) - अक्षरशः टेराबाइट्समध्ये - पुरवावा लागतो अल्गोरिदम्सच्या लर्निंगसाठी, हेच मशीन लर्निंग. त्या विदेबरोबरच अल्गोरिदम्सच्या निर्णक्षमतेच्या अचूकतेची परिमाणंही आधीच ठरवावी लागतात, त्यावरून अल्गोरिदम्सच्या लर्निंगची पात्रता ठरली जाते. त्यामुळे जर निकृष्ट दर्जाचा विदा शिकण्यासाठी वापरला गेला, तर निर्णयक्षमताही निकृष्ट दर्जाचीच होणार." इति भुजबळकाका. "अरे बापरे, बरीच गुंतागुंतीची दिसतेय ही भानगड!" नारुतात्या 'आजी म्या ब्रह्म पाहिले' असा चेहरा करत. "हे सगळं रोजच्या जीवनात अंतर्भूत व्ह्यायला अजून लैच वर्ष लागतील की मग!" बारामतीकर सुस्कारा सोडत. "अहो, तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मघापासून. हा सगळा बागुलबुवा आहे." भुजबळकाका शांतपणे. चिंतोपंत"अहो, पण अमेरिकेत तर चालकविरहित गाड्या वापरायला सुरुवात झालीय की. अ‍ॅमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात. आपण जायचं आणि फक्त हव्या त्या वस्तू सिलेक्ट करून मोबाइलवरून स्कॅन करायच्या. पैसे आपोआप इलेक्ट्रॉनिक पाकिटातून वजा होणार आणि वस्तू घरपोच. परत आपल्या निवडी लक्षात ठेवून आपल्या फायद्याच्या नवनवीन वस्तू दाखवून आपल्याला काय हवं आहे ह्याची आठवणही करून देणार. ह्यात कुठेही मानवी संपर्क आणि सेवा नाही. हे सगळं ऐकलं की धडकीच भरते हो!" चिंतामणी चिंताग्रस्त होत. "साचेबद्ध (repetitive) कामं माणसाऐवजी मशीन करणार, हे तर मी आधीच म्हणालोय. पण त्याने समस्त मनुष्यवर्गाच्या नोकर्‍यांवर गदा येणार, हा जो बाऊ केला जातोय तो बागुलबुवा आहे असं म्हणायचंय मला." भुजबळकाका. "म्हणजे जो कोणी ह्या तंत्रज्ञानाला शरण जात ते आत्मसात करून घेईल, तो तरून बारामतीकर जाईल हा अवघड काळ, काय बरोबर ना?" बारामतीकर विचार करत. "बारामतीकर, ते खरंच हो. पण तरीही यंत्रमानवी युगाची ही सुरुवात आहे असंच राहूनराहून वाटतंय!" साशंक चिंतोपंत. "म्हणजे त्या इंग्लिश सिनेमात दाखवतात तसं मनुष्यप्राणी यंत्रमानवाचा गुलाम होऊन पुढे मनुष्य अस्तंगत होणार की त्या मॅट्रिक्स सिनेमातल्या माणसासारखा कृत्रिम विश्वात राहणार हो भुजबळकाका?" घारूअण्णा घाबरून जात आणि कपाळावरचा घाम पुसत. "अहो घारुअण्णा, शांत व्हा बरं. काय घामाघूम होताय, काही होत नाही इतक्यातच!" भुजबळकाका घारुअण्णांच्या खांद्यावर थोपटत. "आता लगेच नाही म्हणजे पुढे होणारच नाही असं नाही ना! सोकाजीनाना, तुमचं काय म्हणणं आहे बुवा?" नारुतात्या सोकाजीनानांना शरण जात. सोकाजीनाना "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ही काळाच्या ओघात होणार्‍या तंत्रज्ञानच्या प्रगतीची, पुढची अटळ पावलं आहेत. त्या पावलांशी आपली पावलं जुळवून घेत, ते तंत्रज्ञान आत्मसात करत काळाशी अनुरूप होण्यातच शहाणपणा आहे. अहो, ही तर नुकतीच सुरुवात आहे. हे तंत्रज्ञान सध्या बाळबोध अवस्थेतच आहे. त्याचा खरा आवाका आणि व्याप्ती समजायला आणखी बराच अवकाश आहे. पण म्हणून स्वस्थही बसता येणार नाही किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचं आणि नोकर्‍यांचं नेमकं काय होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणं उचित ठरणार नाही. त्याची कास धरून पुढे जावंच लागेल. औद्योगिक क्रांतीला, मशीन्सना आणि अलीकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगीकारावंच लागेल. पणह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंगमुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही, ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल. निसर्गदत्त प्राप्त झालेल्या 'जाणिवेत' न राहता आधिभौतिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीने येणार्‍या नेणिवेत गुरफटून गेलोच आहोत आपण. माणसातलं माणूसपण लोप पावत चाललं आहे. नफा आणि पैसा हेच फक्त साध्य झाल्यामुळे निसर्गाचा ऱ्हास आणि नैसर्गिक जाणिवेचं अज्ञान (नेणीव) ह्या अवस्थेला आपण पोहोचलो आहोतच. त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही, ह्याची काळजी घेतली की झालं!" सोकाजीनाना मंद हसत. "पटतंय का? चला तर मग. आज चहा नको. बायकोने उकडीचे मोदक करून दिले आहेत सर्वांसाठी, ते घ्या आणि तोंड गोड करा!" सोकाजीनाना मिश्किलीने. सर्वांनी हसत दुजोरा दिला आणि नारुतात्या मोदकाचं ताट फिरवू लागले.


चित्रे श्रेयनिर्देश: अभ्या..

वाचने 76229 वाचनखूण प्रतिक्रिया 58

यशोधरा गुरुवार, 09/05/2019 - 08:18
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या व्याप्तीने मनुष्यजमातीचं आणि नोकर्‍यांचं नेमकं काय होणार ह्याची व्यर्थ चिंताही करत बसणं उचित ठरणार नाही. त्याची कास धरून पुढे जावंच लागेल. औद्योगिक क्रांतीला, मशीन्सना आणि अलीकडच्या संगणकीय वापरालाही विरोध झालाच होता. पण त्याचा वापर टाळणं शक्य झालं नाही, तसंच ह्या तंत्रज्ञानाचंही होणार आहे, ते अंगीकारावंच लागेल.
खरं आहे. तंत्रज्ञानाच्या सद्य स्थितीचा चपखल आढावा.

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 09/05/2019 - 08:31
पणह्या प्रगतीच्या घोडदौडीत, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समुळे आपली ‘नैसर्गिक बुद्धिमत्ता’ आणि मशीन लर्निंगमुळे आपलं ‘नैसर्गिक शिकणं’ ह्यावर गदा येणार नाही, ह्याकडे प्रकर्षाने लक्ष द्यावे लागेल.
येणार्‍या काळात ही काळजी घेणे अतिशय महत्वाचे आहे. नुकतीच याच विषयाशी निगडीत "विदाभान" नावाची एक रोचक लेखमाला लोकसत्ता मधे वाचली होती. त्यात या विषया बद्दल जास्त विस्ताराने चर्चा केली होती. त्याची लिंक मिळाली की पेस्टवतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

mayu4u गुरुवार, 09/05/2019 - 09:51
"आपल्या" विक्षिप्त काकू लिहितायत... सगळ्या लेखान्चे दुवे इथं मिळतीलः http://aisiakshare.com/node/7035?page=1

सुधीर कांदळकर गुरुवार, 09/05/2019 - 09:58
विषयाची निवड प्रचंड आवडली. नवाकोरा तसा कठीणच विषय छान मांडला आहे. रॉसन ऱोबॉट्स लिमिटेड नावाच्या एका झेक पुस्तकाचा माधव साखरदांडे यांनी केलेला अनुवाद मी जवळजवळ वीस वर्षांपूर्वी वाचला होता. ते पुस्तक आणि आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह यांची रोबॉट्स मालिका देखील आठवली. संवादरूपाने विषय मांडणे आवडले. ही पद्धत प्रथम श्रीमती अबला जगदीशचंद्र बोस हिने जवळजवळ १०० वर्षांपूर्वी वापरली होती. आता तर आपली पात्रे जिवंत होऊन टीव्हीवर दिसताहेत असे वाटले. एका छान अनुभवाबद्दल धन्यवाद.

जॉनविक्क गुरुवार, 09/05/2019 - 12:18
अ‍ॅमेझॉनच्या स्टोअर्समध्ये तर म्हणे फक्त रोबोट्स काम करतात.
होय हे सत्य आहे. त्याचे फायदे असे झाले की, रोबोट्सना त्यांचे सेन्सर असतात त्यामुळे गोदामात विजेवर दिवे लावावे लागत नाहीत. पैशाची बचत. रिबोट्स दिवस पाळी, रात्र पाळी बघत नाहीत म्हणजे 24 तास काम. कोणताही संप नाही, आरोग्यविमा, फ़ंड वगैरे प्रकार नाहीत. मानवी स्वभावाच्या कटकटी नाहीत, आणि दिवसाला मैलोनमैल हे रोबो विनातक्रार चालतात. कंपनीला फायदाच फायदा. AI ची चिंता वाटतेच.

In reply to by जॉनविक्क

अमीबा Fri, 09/06/2019 - 02:25
याविषयी आणखी थोडीशी भर -- अमेझॉनच्या गोदामांमध्ये रोबॉट्स वापरले जात आहेत, ते त्या भल्या मोठ्या गोदामांच्या कानाकोपऱ्यातून वस्तू आणून एका बाजूला असलेल्या कामगारांपर्यंत पोहोचवण्याकरिता. पाहिजे त्या वस्तू उचलून पुढे पॅकिंग आणि शिपिंगसाठी पाठवण्याचे काम तेवढं माणसं करतात. पुढे पॅकिंगमध्येसुद्धा कोणता बॉक्स वापरायचा, त्यावर किती चिकटपट्टी वापरायची, हे सगळं पुन्हा रोबॉट्स ठरवतात. पॅकेज जिथे पाठवायचं आहे तो पत्ता प्रिंट करून बॉक्सवर चिकटवण्याचे काम परत रोबॉट्सचं. आणि मग त्या पत्त्यांनुसार वेगवेगळ्या ठिकाणी पॅकेजेस जमा केले, की ते उचलून ट्रकमध्ये टाकून वाहून न्यायला परत कामगार. अर्थात ज्या थोड्याफार कामांसाठी मानवी कामगार आहेत, ते सुद्धा कमी करण्याचे प्रयत्न चालू आहेतच. याविषयी अधिक माहिती इथे पाहू शकता - https://www.youtube.com/watch?v=HSA5Bq-1fU4 . (मी हे रोबॉट्स बनवणाऱ्या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर विभागात कामाला आहे :) ) पण ह्या रोबॉट्सच्याही काही गरजा आहेत. तुम्ही म्हणता तसं विजेचे दिवे न लावता ते काम करू शकत नाहीत, उलट त्यांना मानवेल इतकाच प्रकाश देणारे दिवे लावावे लागतात. कमी प्रकाशात रोबॉट्सचे कॅमेरा सेन्सर्स व्यवस्थित काम करू शकत नाहीत, आणि जास्त प्रकाशात ते फरशीवर पडलेल्या प्रतिबिंबालाही एखादी पडलेली वस्तू समजून जागेवर थांबून राहू शकतात. कुठल्याही अडथळ्याला धक्का लागू नये अशा प्रकारे त्यांचं अल्गोरिथम रचलं गेलेलं आहे. शिवाय रोबॉट्सना रस्ता दाखवायला म्हणून जमिनीवर ठिकठिकाणी बारकोड लावावे लागतात. अमेझॉनच्या गोदामांमध्ये तरी असे रस्ता 'वाचत' जाणारे रोबॉट्स आहेत. बारकोडशिवाय चालू शकणाऱ्या रोबोट्सची एवढाले वजन वाहून नेतानाची सुरक्षितता तपासण्याचे प्रयत्न चालू आहेत. आणखी एका ठिकाणी अमेझॉनने रोबॉट्स वापरण्याचा प्रयोग केला आहे तो म्हणजे ग्रोसरी स्टोअर्समध्ये. त्याबद्दलचा व्हिडिओ इथे - https://www.youtube.com/watch?v=zdbumR6Bhd8 . (कदाचित धागालेखक ह्या स्टोर्सबद्दल बोलत आहेत.) हे मात्र खरं, की बरीचशी मानवी पाटीटाकू कामं रोबॉट्स करायला लागले आहेत. पण जसा त्यांचा वापर वाढत जाईल, तसे अजून उपयोगी रोबॉट्स बनवण्यासाठी मानवी बुद्धी लागेलच की. मला वाटतं हुशार रोबॉट्स बनवण्यासाठी मानवी हुशारी सुद्धा वाढती ठेवण्याची गरज आहे, त्यातून नवीन अल्गोरिथम्स तयार होतील, ते वापरायला पुन्हा माणसं लागतील. म्हणजेच माणसांच्या कामाचं स्वरूप बदलेल, पण नव्यानव्या संधी येतंच राहतील.

In reply to by अमीबा

जॉनविक्क Sat, 09/07/2019 - 05:46
बाकी सावलीला रोबोट अडथळा समजतील ? म्हणजे ? फक्त रंगज्ञानावर ते अडथळा ठरवतात ? मला वाटत होते एखाद्या प्रकारचे रेकास्टिंगचा वापर होत असावा अडथळा समजून घेण्यासाठी. मला थोडे हे पटायला अवघड वाटत आहे पण तुम्ही स्वतः असे रोबोट बनवणाऱ्या समूहाचा भाग आहात म्हणजे अर्थातच आपल्याला जास्त माहिती आहे. व आपलं म्हणणे नाकारता येणार नाही. व्हिडीओ जरा फुरसतीत अवश्य बघेन, माहितीसाठी अतिशय धन्यवाद.

खिलजि गुरुवार, 09/05/2019 - 14:23
हायला हे नवीनच वाचायला मिळालं .. मस्तय आणि तसं बघायला गेलं तर गंभीरही आहे प्रकरण .. याचा जे देश दहशतवादी हल्ल्यामुळे त्रस्त आहेत त्यांना फायदाही होऊ शकतो .. सर्व एंट्रीपॉईंटवर रोबोट ठेवून द्यायचे आणि त्याबरोबरच सुरक्षा यंत्रणाही .. रोबोट ना थकता त्यांचे काम अहोरात्र करत राहतील आणि त्यामुळे ओघाने सुरक्षा दलांवरही कमी ताण पडेल ..

In reply to by खिलजि

जॉनविक्क गुरुवार, 09/05/2019 - 15:34
रोबोट चा तिसरा नियम असे सांगतो की जर त्याने पहिले दोन नियम मोडले तर त्याने सेल्फ डिस्ट्रक्ट व्हायलाच हवे. दुसरा नियम हे बोलतो की त्याने कोणत्याही परिस्थितीत मानवावर हल्ला करायचाच नाही. आणि पहिला नियम हा आहे की त्याने मानवाने दिलेल्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत. हे नियम मोडीत काढणारा रोबोट आज ना उद्या मानव जातीसच धोका असेल, म्हणून ते बनवणे म्हणजे भस्मासुर तयार करणे होय. म्हणूनच संरक्षण क्षेत्र मशीन मधे बुद्धी टाकण्याबाबत साशंकच आहे.

In reply to by जॉनविक्क

खिलजि गुरुवार, 09/05/2019 - 15:40
कुठलेही नियम विक्रम हे मोडण्यासाठीच जन्माला येतात रे .. अरे कुणास ठाऊक अतिरेक्यांनी हे तंत्रज्ञान अवगातही केलं असेल आणि त्यावर सूत्रे सुद्धा हलत असतील ..

सर्वसाक्षी गुरुवार, 09/05/2019 - 16:52
काळ मोठा ताकदवान! ज्याने काळाची पावले ओळखली तो शहाणा, जो काळानुरूप बदलला तो तरला. सतत बदल हाच स्थायिभाव! चांगला संवाद

तुषार काळभोर गुरुवार, 09/05/2019 - 17:47
प्रचंड मोठा आवाका आहे या विषयाचा. माझं वैयक्तिक मत - समजा सगळ्या गोष्टींचं उत्पादन रोबोट्स वा तत्सम यंत्रांद्वारे व्हायला लागलं आणि कामगारांची गरज नाही, तर मग त्या गोष्टी विकत कोण घेणार? कारण नोकर्‍याच न राहिल्याने, उत्पन्न नसेल आणि उत्पादने घ्यायला पैसे नसतील. मग या ऑटोमाय्झेशनने जे उत्पादन होईल ते पडून राहील. त्यामुळे आपोआप एक इक्विलिब्रियम परिस्थिती निर्माण होईल. जिथं यंत्रांद्वारे केल्या जाणार्‍या कामाचं प्रमाण आणि लोकांकडे त्या वस्तू घेण्यासाठी असलेला पैसा - पर्यायने त्यांच्या नोकर्‍या- यात आपोआप संतुलन निर्माण होईल.

In reply to by तुषार काळभोर

जॉनविक्क गुरुवार, 09/05/2019 - 19:27
मुळातच अर्थव्यवस्थेचा जन्म कोणी कोणते रिसॉरसेस किती उपभोगावेत याचे नियमन म्हणूनच असतो आणि त्याचा पाया मानवीक्रयक्षमताच आहे. आणि उद्या नेमकी यंत्रच माणसाची कामे करू लागली तर हा पायाच नाहीसा होतो :) पैसा फिरलाच नाही एकाकडेच साठत राहिला तर अर्थव्यवस्था झोपणारच

दुर्गविहारी गुरुवार, 09/05/2019 - 18:12
मराठीमधे तंत्रविषयक लिखाण आवश्यक आहे, त्यामुळे तुमच्या धाग्याचे आणि विषयाच्या मांडणीचे स्वागत ! धाग्याचे फॉर्मॅट आवडले आहे आणि चित्रे देखील.

सुधीर कांदळकर गुरुवार, 09/05/2019 - 18:30
रोबो शेवटी यंत्रच. यंत्रांची देखभाल राखायला माणूस हवाच. सॉफ्टवेअर हॅक होईल. मग हॅकिंग टाळायला सुरक्षा आणि सॉफ्टवेअरचे अपग्रेडेशन. फक्त कामे जास्त वेगाने होतील. तरीही माणसे लागतीलच. एक किस्सा लक्षणीय आहे. अमेरिकेतल्या एका प्रचंड इमारतीत स्वयंचलित टेलिफोन यंत्रणा होती. त्यातली दोन कनेक्शन्स सतत एन्गेज्ड असत. एका सुरक्षा अधिकार्‍याच्या लक्षात आले. एक कनेक्श्न दुसर्‍या कनेक्षनला सवयंचलित फोन करी. दुसरे उत्तर देई की हा नंबर बदलला आहे अमुक अमुक नंबरला फोन करा. पुन्हा पहिला फोन त्याच नंबरला फोन करी. कारण नवा नंबर फिरवला जात नव्हता आणि त्याला तेच उत्तर सतत मिळत होते. हे किती काळ चालू होते याचा पत्ताच लागला नाही. कदाचित महिनोन महिने पण असेल. गाईडेड मिझाईल्स ही रोबॉट्सच म्हणता येतील. रॉबॉट्सला माणसाचेच रूप असावे असे काही नाही. लिफ्टची पीएलसी हे अगदी प्राथमिक एआय म्हणता येईल. मी नोकरी करीत होतो ती कंपनी यंत्र बनविते. कोक वगैरे पेये बाटलीत भरणे, लेबले लावणे, बाटल्या क्रेटमध्ये भरणे इ.इ. आता एआयच्या मदतीने हीच यंत्र जास्त अचूकतेने जास्त कार्यक्षमतेने, जास्त वेगाने काम करतात. पेय फुकट जात नाही, कुठेही एरर आला की संपूर्ण प्रणाली थांबते आणि एरर असेल तिथे दिवा लागतो. माणसे तेवढीच लागतात. रोबॉटकडून हल्ला मात्र कठीण आहे. ते पकडणारे रोबॉट बनवतील आणि पकडून आणलेले रोबॉट पुन्हा त्यांच्याचविरुद्ध वापरले जातील.

In reply to by सुधीर कांदळकर

जॉनविक्क गुरुवार, 09/05/2019 - 23:20
रोबॉटकडून हल्ला मात्र कठीण आहे.
आत्मघातकी रोबोट किती नरसंहार करेल ? रोबोट 1.0 बघितला असेलच :)

Rajesh188 गुरुवार, 09/05/2019 - 22:47
रोबोट माणसाची बरोबरी कधी करू शकतील असे मला वाटत .एक तर माणूस सहज नैसर्गिक क्रियेने जन्म घेतो आणि वाढतो. रोबोट हा बनवावा लागतो . मानवी वय कमीत कमी 50 वर्ष असते . रोबोट जास्तीत जास्त न बिघडत एक दोन वर्ष च चालेल . मानवी शरीर स्वतःची झीज स्वतः भरून काढत . रोबोट तसे करू शकणार नाही झीज झालेलं परत नवीन टाकावे लागतील. मानवी मेंदू एकच वेळी अनेक गोष्टी स्वतः आत्मसात करतो आणि खूप वर्षा पर्यंत ती माहिती साठवून ठेवतो . रोबोट ल बाहेरून माहिती पुरवावी लागते आणि तो अनेक प्रकारची कामे करू शकणार नाही शेवटी रोबोट बनवणे त्यात सुधारणा करणे हे पैसे कमविण्यासाठी च केले जाते आणि त्याचा वापर सुधा पैसे कमविण्यासाठी च केला जातो . पैसा हा मानवाच्या कामाचा आहे रोबोट ला paisyachi गरज नाही . पण रोबोट जे उत्पादन करेल ते मानव साठी च असेल ते खरेदी माणसालाच करावे लागेल पैसे देवून आणि लोकांकडे येत नसतील तर उत्पादन कोण घेणार .जे काम माणूस करू शकणार नाही तिथेच रोबोट चा वापर करणे योग्य ठरेल जे काम माणूस सहज करू शकतो तिथे रोबोट ची गरजच काय . हे सर्व त्या वेळच्या परिस्थिती मानवाला शिकवेल. स्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही त्या म्हणी प्रमाणे . आता सर्वात महत्वाचे प्रश्न हे पर्यावरण वाचवणे,निसर्गाचा जो विनाश होत आहे तो थांबवणे, असंख्य रोग जे कमी वयात माणसाला यमसदनी पाठवत आहेत त्यांचा नायनाट करणे हा आहे . नाही इथे पृथ्वी वरच मंगळावर राहण्याचा अनुभव नक्की माणसाला मिळेल . पाठीवर ऑक्सिजन चा सिलिंडर,आद्रतेपासून तयार केलेलं पाणी,पृथ्वी वातावरण गरम झाल्यामुळे ac सुधा डोक्यावर घेवून फिरावे लागेल. आणि आपण मंगळावर जाणार नाहीच पण इथे तिथले सर्व अनुभव मिळतील हे नक्की

जेम्स वांड Fri, 09/06/2019 - 15:11
क्षेत्रात इतकं भारी लेखन होऊ शकतं ह्यावरच विश्वास बसत नाही! पण चावडी झक्कास जमली आहे, एआय-एमएल हा घाबरायचा विषय नसून आत्मसात करायचा विषय आहे ही थीम लेख उत्तम कॅरी करतोय. वरतून अभ्यानं आमच्या असला जीव लावून पात्रं रंगवलीत का 2 डी लेखाला एकदम 3डी रेंडरिंग मिळाले. अभ्या भाडू तुझ्या कुंचल्यात मज्जा आहे भावा.

सुधीर कांदळकर Fri, 09/06/2019 - 16:20
खरेच सुंदर आहे. माणसे चित्रकाराच्या स्वतःच्या अस्सल शैलीतली आहेत. @जॉनविक्क: रोबॉट सिनेमावर जाऊ नका. रोबॉटिक विध्वंसकता ही अणूविध्वंसकतेसारखी दबावतंत्र म्हणूनच वापरली जाईल. अ राष्ट्राने ब राष्ट्रात विध्वंस घडवला तर दुप्पट विध्वंस ब राष्ट्र अ राष्ट्राचा करू शकेल. त्यामुळे कोणतेही राष्ट्र तसे करणार नाही. रोबॉट्स रचनात्मक कार्यासाठी आणि हेरगिरीसाठीच वापरले जातील असे माझे वैयक्तिक मत आहे. सेनेतील अधिकारी यावर जास्त अधिकाराने बोलू शकतील.

In reply to by सुधीर कांदळकर

जॉनविक्क Tue, 09/10/2019 - 16:00
रोबॉट्स रचनात्मक कार्यासाठी आणि हेरगिरीसाठीच वापरले जातील असे माझे वैयक्तिक मत आहे.
स्टिंग ऑपरेशन साठी आता रोबोटीक माशी हे फक्त जेम्स बॉण्डमधेच असणार नाही. एखादी महत्वाची गुप्त मिटिंग चालू आहे आणि समोर गुणगूण करत घोंगावणारी माशी ही नॅनो स्पाय रोबोट असणे हे ही वास्तव नक्कीच असू शकते :)

मदनबाण Fri, 09/06/2019 - 20:11
चावडी शैलीतील महत्वाच्या विषयावर सुंदर लिखाण ! त्यामुळे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या, मशीन लर्निंगच्या ओघाने येऊ घातलेल्या यंत्रमानवी युगात आपण आपलं ‘नैसर्गिक अस्तित्व’ किंवा ‘जाणीव (कॉन्शसनेस)’ गहाण ठेवलं जाणार नाही, ह्याची काळजी घेतली की झालं!" सोकाजीनाना मंद हसत. अगदी ! हल्लीच एलॉन मस्क आणि जॅक मा यांची या विषयावर चर्चा झाली आहे. बाकी २०१७ मध्ये फेसबुकच्या चॅट बॉट बद्धलच्या बातमीने माझे लक्ष वेधले गेले होते... त्याच्या बद्धल जालावरील कॉपी पेस्ट खालील प्रमाणे :- Facebook deployed various AI enabled chatbots to automate the various process. These AI system was working on the fundamentals of machine learning. They were self-learning system which understands the situation, check the records, converse with another system, solve the problem and learn from mistakes. A complete human independent system. Initially, these AI agents nicknamed Bob and Alice, were originally communicating in English, when they swapped to what initially appeared to be gibberish but later (in June) Facebook AI Research Lab (FAIR) found that while they were busy trying to improve chatbots, the "dialogue agents" were creating their own language. They were still doing conversation with other systems, still solving the issues but that gone completely out of the context from the human being. Objectives were still being served but for researchers, it was a complete black box for researchers. They were not able to get any idea about the complete workflow. This led Facebook researchers to shut down the AI systems and then force them to speak to each other only in English. Soon, the chatbots began to deviate from the scripted norms and started communicating in an entirely new language which they created without human input. Using machine learning algorithms, the "dialogue agents" were left to converse freely in an attempt to strengthen their conversational skills. यावर तुम्ही जालावर आणि तूनळीवर अधिक शोध घेउ शकता... बाकी एआय वर मी दोन चित्रपट पाहिले आहेत ते या विषयात रस असणार्‍यांनी आवार्जुन पहावेत असे आहेत, त्यांचे ट्रेलर इथे देउन ठेवतो. =========================================================

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माझा बाप्पा नाचु लागला... :- (Sanket wadekar)

मित्रहो Sat, 09/07/2019 - 08:58
एका गुंतागुंतीच्या विषयाला सोपे करुन मांडले. चावडी पद्धतीतील लिखाण खूप आवडले. एका कठीण विषयाला वाचा फोडली. मुळात तंत्रज्ञान हे विध्वंसकच असतं, त्याने मानवजातीचा नाशच होतो वगैरे अशी मानसिकता आपल्याकडे जास्त आहे. आपण लोक नवीन तंत्रज्ञान स्विकारायला तयार नसतो. तंत्रज्ञानाची प्रगती होतच जाणार तुम्ही जर तंत्रज्ञान अवगत केले नाही तर तुमचीच प्रगती होणार नाही. ८५ ते ९५ च्या काळात भारतात संगणकाला कडाडून विरोध झाला होता. नोकऱ्या जातील वगैरे तीच नेहमीची भाषा. त्याकाळात कुणी विचारही केला नव्हता की एक काळ असा येईल कि तुम्ही विमान प्रवास, रेल्वे प्रवास कागदी टिकटाशिवाय करु शकनार नाही. आजही या तंत्रज्ञानाची व्याप्ती कितपत आहे हे सांगणे कठीण आहे. एक शक्यता दोघेही नवरा बायको कामाला आहे. सकाळी घाई घाईत ऑफिसला निघून गेले. मग रोबो ओटा साफ करुन ठेवणार, कपडे वॉशिंग मशीनमधे धुणार, भांडे डिशवॉशरमधे धुणार, घर झाडून पुसुन स्वच्छ करनार, कपड्यांच्या घड्या करुन ठेवणार, फ्रिझमधील ग्रोसरी संपली तर अॅमेझॉनवर ऑर्डर करणार, तुम्हाला यायला उशीर झाला तर सात वाजता देवाजवळ दिवा लावणार. या साऱ्यांच्या अपडेटस् तुमच्या पर्यंत पोहचणार. आज यातल्या काही गोष्टी करायला स्वतंत्र मशीन उपलब्ध आहेत. मानवी मेंदूप्रमाणे या साऱ्याचा कसा वापर करायचा असे काहीतरी हवे. सध्यातरी फोटो याच प्रकारात हे तंत्रज्ञान वापरात येत आहेत. मागे शेअर मार्केटमधील गुंतवणुक यात सुद्धा वापरता येते असे वाचले होते. जसजसे तंत्रज्ञान प्रगत होईल तेंव्हा त्याचा वापर वाढत जाईल.

Rajesh188 Sat, 09/07/2019 - 10:32
दोन पायावर चालणारा माणसा सारखा रोबोट कोण्ही प्रत्येक्षात पहिला आहे का . इंटरनेट वर असणाऱ्या व्हिडिओ मध्ये नाही . मला अजुन विश्वास बसत नाही की माणसा सारखा दोन पायावर सहज चालणारा रोबोट माणूस बनवू शकला आहे . इंटरनेट वर नाही म्हटलं तरी अतिशोक्ती असते . साक्षात कोण्ही रोबोट चे दर्शन घेतले असेल तर अनुभव share करावा

In reply to by Rajesh188

जेम्स वांड Sat, 09/07/2019 - 14:54
तांत्रिक भाषेत ह्युमनोईड असे म्हणतात तो बराच आधीपासून बऱ्यापैकी यशस्वीरीत्या बनवला गेलाय. जपानच्या होंडा कंपनीने "असीमो" हा आपला ह्युमनोईड रोबोट २००० सालीच बनवला होता, आता ह्युमनोईड रोबोट्स डबे उचलणे, जड सामान वाहतूक, किरणोत्सार वगैरे असलेल्या वातावरणात काम करायला असे स्पेशालिस्ट पद्धतीने बनवण्यावर भर आहे. प्रत्यक्ष रोबोट मी सुद्धा बघितलेला नाही , फक्त मुद्दा इतकाच की ह्युमनोईड रोबोट्स वगैरेत अविश्वसनीय वगैरे काहीच नाही इतकेच म्हणणे. आर्टिफिशिल इंटेलिजन्स म्हणजे फक्त रोबोज संबंधी नाही तर ते "स्मार्ट ऑटोमेशन" ह्या ब्रॉड बेस वर आधारित असेल, घरात घरगडी म्हणून एकच मानवाकृती रोबोट ठेवण्यापेक्षा घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू स्मार्ट करून एकमेकांना जोडल्या तर जीवन खूप सुलभ होईल ही मुख्य संकल्पना (आयओटी - इंटरनेट ऑफ थिंग्ज) , उदाहरणार्थ तुम्ही रोज नाश्त्यात अंडी खाता आणि तुम्ही तुमच्या स्मार्ट फ्रीजच्या इन्व्हेंटरी मध्ये अंडी २ किंवा कमी असली तर ऑर्डर कर हे प्रि प्रोग्रॅम करून ठेवलं तर बरोबर दोन अंडी उरतील तेव्हा नेटला जोडलेला फ्रिजच ग्रोसरीवर ऑर्डर टाकेल बारा अंड्यांची किंवा प्रि रेकॉर्ड केलेला आयव्हीआर वापरून स्थानिक मुलाण्याला घरी अंडी देऊन जाण्याबद्दल सांगेल, हा फ्रीज, तुमचे बँक खाते तुमचा मोबाईल जोडलेले असतील त्यामुळे पैसे बरोबर वजा होऊन अंडीवाल्याच्या खात्यात जातील, पुढे जाऊन फेस रेकग्निशन वापरून अंडी घेऊन आलेल्या मुलाण्याला स्मार्ट डोर आपोआप उघडून एन्ट्री देईल घरात तो फ्रीज मध्ये अंडी ठेऊन जाईल, त्याही पुढे अंडीवाला आपला डिलिव्हरी बॉट, ड्रोन वापरून स्वतः न येता अंडी डिलिव्हरी करेल. एआय वापरून ह्युमनोईडच बनवले जातील असे नाही तर उपलब्ध मशीन पण स्मार्ट करून कामे करवून घेण्यावर जास्त भर असेल

Rajesh188 Sat, 09/07/2019 - 17:16
साधे चालक रहित गाडीचा विचार केला तरी डोकं सुन्न होते. साधं काहीच शाळा न शिकलेल्या ड्रायव्हर ला पर्याय देण्यासाठी किती मोठी तयारी करावी लागत आहे . चालक विरहित गाडीला पुढचा रस्ता माहीत पाडण्यासाठी कॅमेरे हवेत .बाकी गाड्या पासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी सेन्सॉर हवेत .सिग्नल ची माहीत गाडीला द्यावी लागणार . रस्त्यावरचे विविध प्रकारचे अडधले तिला शिकवावे लागणार . माणूस,जनावर,दगड,खट्टा, असल्या बऱ्याच गोष्टींची माहिती द्यावी लागणार . बाजूला ,पाठी काय आहे ह्याची माहिती द्यावी लागणार मग तो रोबोट गाडी चालवणं र . ही माहिती निरंतर कसलीच अडचण न येता मिळत राहिली पाहिजे . अचानक आपत्ती आली आणि ती ओळखण्याची कुवत गाडी मध्ये नसेल जे घडेल त्याचा फक्त विचार करावा . किती तरी मोठा डाटा वापरला जाईल. पॉवर फुल इंटरनेट कनेक्शन नेहमी असायलाच हेवे . Wifi chya रेडिएशन चे मानवी शरीरावर घातक परिणाम होतात त्याची परत भीती . हा सर्व खटाटोप फक्त अडाणी माणसाला पर्याय उपलब्ध करण्यासाठी करावा लागतो . मग विचार करा बुध्दीमान माणसाला पर्याय देण्यासाठी काय काय करावे लागेल

In reply to by Rajesh188

जॉनविक्क Sat, 09/07/2019 - 22:13
तेंव्हा अपघात प्रचंड कमी होतील. कारण ते माणसाप्रमाणे रेकलेस वागणार नाहीत. Ai म्हणजे डीप डाउन फक्त सांखिकी असल्याने त्याच्यात परिपूर्णता कमालिची म्हणजे मानवीबुध्दी साठी इंफायनाइट असु शकते. अवांतर:- वर जॅक मा व व एलोन मस्क चर्चेतिल मस्कचे एक विधान फार रोचक आहे. तो म्हणतो की आपली बैंडविड्थ ही मशीनच्या बैंडविड्थ पुढे काहीच नाही. म्हणून जर मशीन आपल्याशि इंटरैक्शन करत असतील तर त्यांचा अनुभव आणि आपण झाडाचे म्हणणे ऐकायचा अनुभव यात काहीच फरक नाही. आणि आपल्या या मंदपणाची परिणिती म्हणूनच हळू हळू मशीन मानवी हस्तक्षेप बायपास करायला शिकेल. फेसबुक ने ai बाबत हेच निरीक्षण नोंदवले होते.

In reply to by जॉनविक्क

Rajesh188 Sat, 09/07/2019 - 22:46
सर्व नेटवर्क हॅक करण्याची कुवत मानवी मेंदू मध्ये आहे आणि ह्याची असंख्य उदाहरण रोज मिळतात . मानवी मेंदू ची बरोबरी कृत्रिम बुद्धिमत्ता कधीच करू शकणार नाही . मानवी मेंदू खूप दुरची गोष्ट आहे . मानवी डोळ्यांची बरोबरी करणारा कॅमेरा सुधा अस्तित्वात नाही

Rajesh188 Sat, 09/07/2019 - 22:57
संशोधन जे होत त्याच मूल्य मापन न करता त्याची जाहिरात का केली जाते . जसे कोलगेट सांगते आमचे उत्पादन वापरा आणि दात हिरड्या मजबुत करा . पण लोकांनी कोलगेट वापरायला survat केली आणि ३२ वर्षा वयाच्या व्यक्ती मध्ये २२ दातच शिल्लक राहिले . प्रत्येक शोधाची दुसरी बाजू असते ,निगेटिव्ह बाजू असते ते न सांगता उदो उदो करणे ह्याचा अर्थ आपण आपली बुध्दी गहाण ठेवली आहे हा होती fb ही व्यावसायिक कंपनी आहे तिचे मत स्वार्थी व्यावसायिक बुध्दी मधून येवू शकत. चालक विरहित गाडी अपघात करणार नाही ही जाहिरात आहे . उलट चालक विरहित गाडी सर्व प्रकारच्या रस्त्यावर चालू शकणार नाही आणि काही तांत्रिक कमतरता तिच्यात राहणारच . प्रायोगिक तत्त्वावर जी चालक विरहित गाडी चालली म्हणजे सर्व यशस्वी झाले हे मत अयोग्य आहे .

Rajesh188 Sat, 09/07/2019 - 23:08
माणसा सारखा दोन पायावर टोल सांभाळत चालणारा रोबोट जगातील कोणत्याच देशाच्या रस्त्यावर लोकांनी बघितलं नाही फक्त जाहिरात type माहिती ऐकली आहे . खाच खळगे, चढ उतार ,शिड्या चढणे,झाडावर चढणे ,एका पायावर उड्या मारत धावणे . हे सर्व प्रकार करणारा रोबोट माणूस कधीच बनवू शकणार नाही . फक्त प्रसार मध्यम मधून जाहिरात टाइप माहिती फक्त प्रसारित केली जाईल

आदिजोशी Mon, 09/09/2019 - 15:59
आज AI बाल्यावस्थेत आहे, पूर्णपणे चालणारा - धावणारा रोबो नाही, इत्यादि गोष्टी ठीक आहेत. आज चालताना आपला मेंदू जागा, आपले वजन, पायावर द्यायचा जोर, पायाचा अँगल, जिथे पाय ठेवतोय तिथे असलेली/नसलेली ग्रिप, इत्यादि हजारो गणितं सतत एकाचवेळी करत असतो. ते आज रोबोना जमत नाहीये कारण ते प्रोग्रामींग करणार्‍या माणसाला कोड जमत नाहीये. पण हे केव्हा न केव्हा होणारच आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे AI एखादी गोष्ट शिकवली की जगभरातल्या हजारो लाखो रोबोना ते त्याक्षणी येईल. प्रत्येक माणलासा जसे लिहिणे, वाचणे, चालणे, गाणे, इत्यादि मुळापासून शिकायला लागतं तसं AI चं नाही. एकदा डेटाबेसमधे ती स्किल्स बसली की ती सगळ्याच रोबो मधे येणार. वडिल डॉक्टर असले तरी ते स्किल मुलांत आपसून येते नाही, सगळं नव्याने शिकावं लागत. AI ला ही मर्यादा नाही. AI चा मूळ धोका हा ते AI पूर्णपणे sentient होण्यात आहे. ज्या क्षणी ते होईल त्याक्षणी AI मानवाच्या ताब्यातून बाहेर पडेल.

In reply to by आदिजोशी

जॉनविक्क Mon, 09/09/2019 - 16:12
मला हा प्रकारच समजत नाही. AI sentient का होईल ? Ai ही एक निर्जीव गणितीय प्रक्रिया आहे, आणखी काही नाही, जिचे उद्दिष्ट विशेष कार्ये पार पाडणे इतकेच आहे. त्यांना sentient असायचे कारणच निर्माण होत नाही नाहीतर मनुष्य देव ठरणार नाही का ज्याने हे सजीव निर्माण केले ?

In reply to by जॉनविक्क

आदिजोशी Wed, 09/11/2019 - 19:35
एकपेशीय अमिबापासून सुरु झालेला प्रवास मानवापर्यंत झालाच की नाही. तो कसा झाला आणि कशामुळे झाला हे कुणाला माहिती नाही. पण झाला हे नक्की. इथे सुद्धा ही शक्यता नाकारता येत नाही. जेव्हा तुम्ही AI ला नव्या गोष्टी शिकण्याची परवानगी देता तेव्हा तो काय शिकेल ह्यावर आत्ता जरी कंट्रोल असला तरी तो कायम तसा असेलच असं नाही. एखाद्या छोट्याशा कोडींगमधल्या बग मुळेही ते होऊ शकतं.

In reply to by आदिजोशी

जॉनविक्क Wed, 09/11/2019 - 20:34
एकपेशीय अमिबामधे इंटेलिजन्स कमी होता असे मानणे हीच तर गम्मत आहे. ते तसे खरेच असते तर इतका तो उत्क्रांत झालाच नसता. पृथ्वीवर खरा चिरंजीव एकच तो म्हणजे तो एकपेशीय अमिबा :) असो, आपण जे म्हणता त्याला प्रोग्रामिंगमधे जेनेटिक अल्गोरिथम आणि सेल्युलर ऑटोमाटा असे म्हणतात. अजून बरेच काही आहेच. जसे डिसीजन ट्री, वगैरे वगैरे वगैरे... तसेच एखादा बग मशीनमधे भावनेचा आभास तयार करेलही परंतू ती सुद्धा एक गणितीय प्रक्रिया असेल जिला एक पॅटर्न असेल. मूलभूत जाणीव निर्माण करणे ही मुळात मानवी क्षमताच नाही आणि न झेपणारा गणितीय किचकटपणा कमी करायला आपल्याकडे मशिन्स तशीही उपलब्ध असतील. थोडक्यात प्रोग्रामिंग करून जसे व्हायरस तयार करता येतात तसेच पॅटर्न ओळखणारे अँटीव्हायरस, फायवॉल वगैरे सुरक्षा साधनेही तयार करता येतात म्हणूनच एखादा AI कमालीचा परफॉर्मन्स ऑप्टिमयझेशन सोडून कायमची हाताबाहेर गेलेली सेल्फ इव्हॉलविंग वेगळी स्पिसी बनेल हा विचार तितकासा प्रॅक्टिकल मला वाटत नाही. -(AI प्रोग्रामिंग केलेला) जॉनविक्क.

Rajesh188 Mon, 09/09/2019 - 19:56
Ai वर आधारित रोबोट थोडे फार माणसाचे काम करेल पण तो माणसाची जागा घेईल हे पटत नाही . एक जे प्रोग्राम फीट केला जाईल तसाच तो वागेल . रोबोट हा फॅक्टरी मध्ये तयार करावाच लागेल तो काही पुनरुत्पादन करणार नाही शेवटी ते एक निर्जीव मशीन आहे . मानवी मेंदूची अफाट क्षमते विषयी अजुन संशोधकांना च पूर्ण माहीत नाही . मानवी मेंदू चा अभ्यास करणे एवढे अवघड आहे तर त्याची प्रतिकृती निर्माण करणे जवळ जवळ अशक्य आहे . ठरवून दिलेले ठराविक काम तो उत्तम रित्या करेल ह्या बाबत शंका नाही . जेव्हा माणसाला तो वरचढ झाला असे वाटेल तेव्हा उत्पादन बंद केले जाईल .

In reply to by Rajesh188

जॉनविक्क Mon, 09/09/2019 - 21:04
मानवी मेंदूची अफाट क्षमते विषयी अजुन संशोधकांना च पूर्ण माहीत नाही .
अहो संशोधक सोडा, आपल्या मेंदूची माहिती तुम्हा आम्हास नाही, पण जो आहे त्याचा वापर करून आला दिवस ढकलतोय ना आपण ? रोबोटचेही तेच आहे. त्यांची थोडीफार अक्कल व सातत्य मानवास आकार्यक्षम ठरवायला पुरेसे आहे म्हणजे सगळे मानव बेरोजगार वा कुचकामी ठरतील असे नाही पण फार मोठी कुऱ्हाड नक्कीच कोसळेल.

Rajesh188 Mon, 09/09/2019 - 21:27
माणूस कुचकामी की ठरला रोबोट मुळे तर मंदी नटूनथटून बसली आहे ती मोठ्या झोकात . न घाबरता बिंदस्त येईल . आपण काळजी करायची गरज नाही रोबोट चे मालकच जीव तोडून पळतील रणांगण सोडून . आपण चटणी भाकरी खावून दिवस काढू

Rajesh188 Tue, 09/10/2019 - 01:24
पहिल्या गाड्या नव्हत्या पण गाड्यांचा शोध लागला आणि गाड्या निर्मितीचे कारखाने निघाले म्हणजे ज्या नोकऱ्या पहिल्या अस्तित्वातच नव्हत्या त्या अस्तित्वात आल्या . जसे जसे नवीन शोध लागले तसतसे नवीन रोजगार तयार झाले .जे पाहिले अस्तित्वातच नव्हते . ऑटोमेशन मुळे सुधा रोजगाराच्या नवीन संध्या तयार होतील त्या मुळे ऑटोमेशन फक्त नोकऱ्या जातील असे नाही तर नवीन नोकऱ्या तयार सुद्धा होतील . फक्त त्या नोकऱ्या करण्याची कुवत आपल्यात असायला हवी . चालक विरहित गाडी जरी बाजारात आली तरी सर्वानाच ती विकत घेणे परवडणारे नाही म्हणजे अगदी 100% ड्रायव्हर च्या नोकऱ्या जाणार नाहीत . असेच प्रत्येक क्षेत्रात होईल . ऑटोमेशन च्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होतील ज्या आता अस्तित्वात नाहीत . ऑटोमेशन मुळे नोकऱ्या कमी होणार नाहीत उलट वाढतील असे सुद्धा घडेल ना?

In reply to by Rajesh188

जॉनविक्क Tue, 09/10/2019 - 11:55
तो पर्यंत ऑटोमेशन हे परफॉर्मन्स उंचावण्यासाठी वापरले गेले परिणामी उत्पादन रोजगार व क्रयक्षमता वाढत गेल्या. आता ऑटोमेशन जे वापरले जाईल ते फक्त परफॉर्मन्स अपग्रेड म्हणून न्हवे तर मानवाचा हस्तक्षेप कमीत कमी व्हावा (ज्यातून अचूकता व उत्पादन कमालीचे वाढेल) हा देखील विचार केला जातो. त्यामुळे इथे प्रत्यक्ष उत्पादन निर्मितीस मानवाच्या आवश्यकतेवरच प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. परिणामी कोणास किती अर्थप्राप्ती व्हावी यासाठी एक तर नवी अर्थ रचना उदयाला येईल अथवा बेरोजगारी कमालीची वाढेल

गामा पैलवान Tue, 09/10/2019 - 17:32
Rajesh188,
Ai वर आधारित रोबोट थोडे फार माणसाचे काम करेल पण तो माणसाची जागा घेईल हे पटत नाही .
तुमचं हे विधान पटलं. यंत्रमानव काही माणसाच्या पातळीस येऊ शकंत नाही. पण माणूसच जर यंत्राच्या पातळीवर उतरला तर? तर मग यंत्रमानव माणसाची जागा घेऊ शकेल. तसं बघायला गेलं तर मानवी शरीर हेही एक यंत्रंच आहे. किंवा एकमेकांशी सौहार्द राखंत चालू असलेला यंत्रसमूह आहे. या यंत्रामागील कर्ताकरविता जो आहे त्याचा म्हणजे भगवंतांचा विसर पडला तर माणूस आपोआप यंत्रमानव होईल. सांगायचा मुद्दा काये की आपण आपली भक्ती साधून असावं. ती माणसास पतनापासून वाचवते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

जॉनविक्क Tue, 09/10/2019 - 18:28
माणूसच जर यंत्राच्या पातळीवर उतरला तर?
तर तो वेगळ्या धाग्याचा विषय ठरत नाही काय ?
या यंत्रामागील कर्ताकरविता जो आहे त्याचा म्हणजे भगवंतांचा विसर पडला तर
तर अर्थातच हे भगवंत साहेब कुचकामी इंजिनिअर गणले जातील व नोकरी गमावूनही बसतील. मग कंपनी पोलिटिक्स कितीही भगवंतरावांच्या बाजूचे असो. अथवा त्यांचे प्रॉडक्ट मार्केटिंग कसेही असो, परफॉर्मन्स इशू फेल प्रॉडक्ट दीर्घकाळ वाचवू शकत नाही.
सांगायचा मुद्दा काये की आपण आपली भक्ती साधून असावं. ती माणसास पतनापासून वाचवते.
भक्तीच का अगदी श्रद्धा, पूजा, अर्चना, आरती यांचेही अजिबात वावडे नाही. पण ते सांभाळायची जबाबदारी तेव्हडी नको बगा ;)