मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

किल्लेदार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा. स्टीफन किंग किंवा रस्किन बॉंड यांच्या भयकथा , रत्नाकर मतकरी आणि हिचकॉकच्या शेवटी "पंच" असलेल्या भयकथापण घाबरवून टाकणाऱ्या असल्या तरी धारपांची भुतावळ ही पोटात गोळा आणणारी होती. तर आज ही सत्य-नारायणाची आरती का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल :) तर ते म्हणजे कुठे ही पुस्तके ऑनलाइन वाचता येतील का हे इथे विचारायचे आहे. मिपावर बरेच भयकथाकार आहेत आणि त्यांना कदाचित याबद्दल माहिती असावी.

वाचने 71387 वाचनखूण प्रतिक्रिया 99

स्पा Tue, 01/20/2015 - 12:10
माझ्या माहितीत तरी धारपांची ओंलीन पुस्तके उपलब्ध नाहीत, विकत किंवा लायब्ररी लावून वाचा अजुनहि धारपांची पत्नी त्यांचे अप्रकाशित झालेले लिखाण प्रकाशित करत असतात धारपांची एकूण एक पुस्तके वाचून झालेला (इस्पा)

In reply to by स्पा

सौंदाळा Tue, 01/20/2015 - 14:02
जरा तुम्हाला आवडलेली पुस्तके सांगा की वाचनालयातुन मिळवुन वाचेन अनोळखी दिशा दोन खंड, प्रा. वाईकरांची कथा, चेटकीण, ४४० चंदनवाडी, दस्त, माटी कहे कुम्हारको, संसर्ग, देवाज्ञा आणि धारपांची सुप्रसिध्द समर्थ सिरिज वाचली आहे. धारपांचा पंखा - सौंदाळा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सस्नेह Tue, 01/20/2015 - 16:10
नारायण धारप यांची कल्पनाशक्ती विलक्षण तर होतीच, पण त्या कल्पना प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित असत. शब्दांचे पाल्हाळ, वर्णनाची अतिशयोक्ती कधीच नसे. साधेच शब्द पण जबरदस्त परिणामकारक. वाचल्यानंतर कित्येक दिवस (काहीवेळा तर महिनेसुद्धा !) मनावर त्यांच्या कथांची विलक्षण पकड राहते. पुष्कळ जणांना त्यांच्या कथा दुर्बोधही वाटतात. मराठीत तरी अशा विषयांवरचा असा लेखक दुसरा सध्या नाही. त्यांच्या काही विज्ञानकथा/कादंबऱ्या नेनचिम युगपुरुष कंताचा मनोरा ऐसी रत्ने मेळवीन पारंब्यांचे जग अंधारयात्रा आकाशाशी जडले नाते स्वप्नमोहिनी विधाता ? ग्रोग्रॅमचा चितार सुवर्णाचे विश्व बहुमनी काही भयकथा/ कादंबऱ्या पाठलाग दस्त अघटित सावधान ग्रास भुकेली रात्र दरवाजे अंधारयात्रा व्दैत माणकाचे डोळे समर्थ समर्थांचे प्रयाण समर्थांचे पुनरागमन काळ्या कपारी आनंदमहल नवी माणस इक्माई कृष्णचंद्र ...माझ्या मिपावरील लेखनातील ‘एका नव्या इतिहासाची सुरुवात’ या कथेवर नारायण धारपांच्या शैलीची प्रचंड छाप आहे, हे इथे कबूल केले पाहिजे.

In reply to by सस्नेह

सौंदाळा Tue, 01/20/2015 - 16:16
धन्यवाद साठे फायकस नावाची अजुन एक कादंबरी वाचली होती त्यांची झाडांच्या भावना मनोव्यापाराबद्दल खुपच जबरदस्त होती. द. पां. खांबेट्यांची पण एक दोन पुस्तके वाचली होती पुर्वी, थरारक. परत नविन पुस्तके मिळाली नाहीत :(

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सस्नेह Tue, 01/20/2015 - 16:21
फायकस म्हणजेच 'पारंब्यांचे जग'. खांबेट्यांच्या पण चांगल्या आहेत, पण धारपांच्या कथांना जी तर्कसंगती आणि शास्त्रीय बैठक असायची ती खांबेट्यांच्या नाही.

In reply to by असंका

सस्नेह Tue, 01/20/2015 - 17:18
ही नाही माझ्याकडे. लायब्ररीत मिळते. 'पारंब्यांचे जग' याचाच उत्तरार्ध 'फायकसची अखेर' नावाचा आहे. तोही वाचनीय.

In reply to by सस्नेह

असंका Tue, 01/20/2015 - 17:25
हो. फार पूर्वी पुण्याला लायब्ररीत मिळाली होती. तीन भाग होते. लोकांनी तर आता ह्या कादंबरीचं नावही ऐकलं नसतं.

In reply to by सस्नेह

असंका Tue, 01/20/2015 - 17:28
कोल्हापूरात नगर वाचनालयात आहे पण वाचायला देत नाहीत. खराब झालंय म्हणून देत नाहीत म्हणतात.... :-(

In reply to by काळा पहाड

साठे फायकस हे पुस्तक दिलीप प्रकाशनाने प्रकाशित केले असून पुण्यात शुभम साहित्य किंवा रसिक साहित्य समोर सिद्धार्थ चेंबर्स आहे, तेथील पाटील बुक सेलर्सकडे मिळू शकेल. ३ रा मजला

सस्नेह Tue, 01/20/2015 - 12:15
फेवरिट ! त्यांची बरीच पुस्तके माझ्या संग्रही आहेत. पण भयकथांपेक्षा मला त्यांच्या विज्ञानकथा आवडतात. त्यांनी लिहिलेली अखेरची विज्ञानकथा, 'विधाता' आत्ता हातात आहे..

In reply to by सस्नेह

विधाता ही त्यांची शेवटची विज्ञानकथा नाहीये. ती पूर्वी १९९० च्या सुमारास स्वतंत्र प्रकाशित झाली होती. रू १० किंमत होती. आता त्यांनी महावीर आर्य ची कथा अपूर्ण ठेवल्यामुळे महावीर आर्य़ आणि विधाता ह्या एकत्र प्रकाशित कराव्या लागल्या.

In reply to by आदूबाळ

असंका Wed, 05/04/2016 - 07:11
अनेक धन्यवाद. अजब चं प्रदर्शन असणार ते पण. इथे कोल्हापूरात पण मिळतील या अंदाजाने काल गेलेलो. पाच सहा पुस्तकं आहेत. त्यातलं एक काल घेतलं. फक्त पन्नास रुपयाला! लैच भारी. आठवड्याभरात सगळी घरी येतील!

कलंत्री Tue, 01/20/2015 - 12:59
धारप साहेब पुण्यातच असतात. कोणे काळी मराठी -> भयकथा यांच्या विश्वात साहेबांचे मोठे नाव होते. आजच्या काळात मराठीमध्ये असे प्रयोग होतात की नाही हे मला ठाऊक नाही. अश्या व्यक्तिंना प्रत्यक्ष भेटुन त्यांच्या कडुन प्रत्येक कथेची पार्श्वभूमी ऐकणे खूपच मनोरंजक आणि अविस्मरणीय असेल.

In reply to by सस्नेह

कलंत्री Tue, 01/20/2015 - 17:39
माझ्या स्मरणशक्तीने बरीच गफलत केली हे खरेच. मी चुकून रत्नाकर मतकरी यांचा संदर्भ दिला. त्यांनी सुद्धा बर्‍याच भयकथा लिहिल्या आहे.

In reply to by कलंत्री

आदूबाळ Tue, 01/20/2015 - 13:32
आजच्या काळात मराठीमध्ये असे प्रयोग होतात की नाही हे मला ठाऊक नाही.
नव्या लेखकांपैकी हृषिकेश गुप्ते यांचा "अंधारवारी" हा भयकथासंग्रह अतिशय आवडला.

विटेकर Tue, 01/20/2015 - 15:16
आठवीत असताना आमचे पी टी चे मास्तर धारपांची " लुचाई " ही कथा वर्गात जाहीर वाचून दाखवत होते .... आणि ती ते अन्य वर्गात / अन्य तुकड्यांमध्ये पण वाचून दाखवत होते .. त्यांची वाचनाची शैली देखील उत्तम होती ... जाम टरकलो होतो...म्हणजे सगळी शाळाच टरकली होती. त्यानंतर धारपांच्या वाटेला गेलो नाही !!

बॅटमॅन Tue, 01/20/2015 - 18:00
रोचक धागा! आम्ही धारप वाचले नाहीत. पण स्पारायण गाळपांच्या कथा वाचून थोडा काही अंदाज येतो त्यांचा. ;)

चौकटराजा Tue, 01/20/2015 - 19:50
मी स्वत: एकदा नारायण धारप यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या दुकानात गेलो होतो. होय त्यांचा मुख्य व्यवसाय फनिचर भाड्याने देण्याचा होता. माझ्या लहानपणीच ( सुमारे १४ वर्षाचा असताना ) समर्थाचिया सेवका ही पहिली कथा वाचली. नारायण धारप हे गोरटेले मध्यम बांध्याचे मिस्कील गृहस्थ. बोलण्यात आपल्या काही कंथांची बीजे परकीय पुस्तकातील आहेत हे त्यानीच स्वतः सांगितले होते. त्याला ते बाज मात्र आपल्याकडचा मस्त द्यायचे. त्यांच्या दुकानात अशा पुस्तकानी भरलेले एक कपाटच होते. अर्थात मला नारायण धारप यांच्या पेक्षा भयकथाकार म्हणून रत्नाकर मतकरी अधिक आवडले. मानवी मन , त्यातील अनिवार भीति , सल हा मतकरींच्या कथेचा पाया असे तर नारायण धारप हे घातकी, किळसवाणी मानवेतर ताकद अस्तित्वात आहे असे मूळ धरून कथा लिहित असत. पण अशा शक्तींच्या अस्तिवावर आपला विश्वास नाही असे त्यानी गप्पांच्या ओघात सांगितल्याचे स्मरतेय. आता त्या ठिकाणी त्यांच्या मुलाची पॅथोलॉजीकल लॅब आहे.

सौन्दर्य Tue, 01/20/2015 - 20:09
नारायण धारपांच्या खूप कथा वाचल्या, प्रत्येक कथेनंतर कितीतरी दिवस मनावर एक गडद सावट पडलेलं असायचं. जाम भीती वाटत राहायची पण त्याच बरोबर नवीन कथा वाचायची उत्सुकता मात्र गप्प बसू द्यायची नाही. 'लुचाई'वाचल्यावर वाटलेली भीती नुसते 'लुचाई'ची आठवण जरी आली तरी पुन्हा जाणवते. रत्नाकर मतकरींच्या देखील भयकथा, गूढकथा खूप वाचल्या. लायब्ररीत ह्या दोन्ही लेखकांच्या हाताला लागतील तितक्या कथा कादंबर्या वाचून संपवल्या. ह्या सर्व कथा वाचल्याला बराच काळ लोटला, आता पुन्हा एकदा त्यांचे पारायण करायची इच्छा आहे. मी ह्युस्टन (टेक्सास स्टेट)येथे असतो त्यामुळे ही पुस्तके ऑनलाईन (विकत) बुक गंगेवर शोधतो. सर्वच साद-प्रतिसाद उत्तम.

भाते Tue, 01/20/2015 - 20:27
सहावीत असताना हे पुस्तक (पहिल्यांदा) वाचनालयातुन आणुन रात्री ७ ते १० या वेळात सलग वाचले होते. त्यानंतर या पुस्तकाची अनेकदा पारायणे झाली. पण पुढे त्यांचे लेखन वाचायची हिंमत झाली नाही.

प्रचेतस Tue, 01/20/2015 - 23:04
धारपांची जवळपास सर्वच पुस्तके वाचली आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक आवडीचे म्हणाजे 'चंद्राची सावली'. धारपांचे बहुधा हे सर्वोत्तम पुस्तक असावे. धारपांच्या कथांमध्ये मात्र तोचतोचपणा कायम जाणवत असतो मात्र तसे असूनही त्यांच्या कथा कायम खिळवून ठेवतात आणि वाचकाला पुढे काय होईल हे अपेक्षित असूनही पुस्तक हातातून सोडवत नाही. वर काही जणांनी धारपांची तुलना मतकरींबरोबर केली जे काहीसे चुकीचे असे वाटते. दोन्ही लेखकांची शैली बर्‍यापैकी भिन्न आहे. धारप हे भयकथाकार म्हणून तर मतकरी हे गूढकथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. धारपांची कथा ही नेहमीच सरधोपट मार्गाने जाते उदा. दुष्टांवर सुष्टांचा विजय तर मतकरी कथेला कायम अनपेक्षित कलाटणी देतात. ह्या दोघांव्यतिरिक्तही मराठीत सुहास शिरवळकरांनी मोजक्याच पण चांगल्या भयकथा लिहिल्या आहेत. सुभाष देशपांडे यांनी 'शाझामचा पंजा' नावाने एक चांगली भयकथा लिहिलेली आहे जी एकेकाळी खूप गाजलेली होती. याखेरीज गजानन क्षीरसागर, यशवंत रांजणकर ह्यांनी देखील काही भयकथा लिहिलेल्या आहेत.

In reply to by प्रचेतस

सुभाष देशपांडे ह्यांची अजून पुस्तके वाचायला मिळाली नाही ह्या बद्दल खंत वाटते. बाकी धारप व मतकरी तुलना अयोग्य धारपांच्या कथेत वाड्याचे किंवा एखाद्या परिसराचे किंवा व्यक्तीचे त्याच्या सामाजिक व इतर बाबीचे तपशिलावर वर्णन वाचता वाचता आपण कथेत डुबून जायचो , थरार अंगात भिनायला लागतो. अशी पुस्तके रात्री वाचवण्यात खरी गंमत आहे.

In reply to by प्रचेतस

चंद्राची सावली मला तितकेसे आवडले नाही. त्यापेक्षा चेटकीण किती तरी सरस आहे. पण शेवटी पसंद अपनी अपनी :) मला धारपांची ओळख समर्थ सिरीज पासून झाली, त्यातली खास करून "यो अस्माकं द्वेष्टी" आणी "समर्थाचिया सेवका" या दोन गोष्टी वाचून तर अंगावर सरसरून काटा आला होता. लुचाई हे अजून एक जबरदस्त पुस्तक. नारायण धारपांच्या कथाना तितक्या जबरदस्तपणे पडद्यावर फक्त राहिल अनिल बर्वेच प्रस्तुत करू शकतात हे त्यांचा तुंबाड सिनेमा बघून वाटलं. बाकी लोकांनी त्या वाटेला जाऊच नये. तसाही कथा वाचण्यात जी मजा आहे ती चित्रपट बघण्यात नाही.

In reply to by सोन्या बागलाणकर

किल्लेदार Fri, 04/03/2020 - 17:27
मलाही चेटकीण जास्त आवडलं. प्राध्यापक वाईकरांची कथासुद्धा अंगावर सरसरून काटा आणते. समर्थकथा तर उत्तमच. लहानपणी समर्थांची "मृत्यूजाल" ही कथा वाचली आणि भर दुपारीसुद्धा कापरं भरलं. कितीतरी दिवस एक गडद छाया मनावर होती.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा Fri, 04/03/2020 - 22:58
'देवाज्ञा' पण एक माणूस जे लोक मरणाच्या दारातून परत आले आहेत अशा लोकांना हेरून, संमोहित करून परत त्याच अवस्थेत नेत असतो आणि जीवन आणि मृत्यूच्या मधेच अडकवून स्वतः च्या गैरकृत्यांसाठी वापरत असतो. अशी काहीशी कादंबरी होती.

धारपांच्या कथा वाचल्या आहेत. आत्ताच मला कुठल्या तरी पुस्तक प्रदर्शनात समन्वय प्रकाशन कोल्हापूर यांनी त्यांची बरीच पुस्तके नव्याने प्रकाशित केलेली दिसली आहेत. माझ्याकडे आता नारायण धारपांचं फक्त 'फरिस्ता' शिल्लक आहे, वाचायला घेऊन गेलेली पुस्तके अजून परतली नाहीत. धारपांच्या कथा वाचकांना खिळवून ठेवतात एवढं मात्र नक्की. वर्णनं मला आवडतात. बाकी, ऑनलाइन वाचण्यापेक्षा पुस्तक संग्रही असलं पाहिजे, कधीही वाटलं की वाचायला कोणत्याही पानावरुन सुरुवात करायची आणि पुस्तकात हरवून जायचं. -दिलीप बिरुटे

किल्लेदार Wed, 01/21/2015 - 12:46
त्यांचे सगळ्यात गाजलेले पुस्तक "लुचाई" होते का? ते वाचायची फार इच्छा आहे. एकदा दुकानात ४०० ला मिळत होते. गोष्ट वाचण्या-आधीच घाबरलो :). नंतर हिंमत करून गेलो पण पुस्तक मिळाले नाही.

In reply to by किल्लेदार

प्रचेतस Wed, 01/21/2015 - 12:49
लुचाई भन्नाट होतं. ह्याशिवाय धारपांच्या कादंबर्‍यांची मुखपृष्ठं अतिशय कल्पक असत. वाचकाला घाबरवण्याची सुरुवात त्यापासूनच झालेली असे.

जेपी Wed, 01/21/2015 - 13:43
वाखु साठवतो. रत्नाकर मतकरी यांची पुस्तके वाचलीत पण नारायण धारप यांची नाही. आता शोध घेतो.

धारपांचे प्रत्येक पुस्तक वाचनालयातून शोधून शोधून काढून वाचले आहे , पण त्यांच्या पुस्तकांचा संग्रह असावा अशी मनात इच्छा आली नि दर भारतभेटीत मी त्यांची व मतकरी ह्यांची पुस्तके विकत घेऊन येतो. बुकगंगा वर सवलतीत बहुतेक त्यांची पुस्तके मिळतील. मागे एकदा पुण्यात शुक्रवार पेठेत आभासी जगतातील मित्र मैत्रिणींचे स्नेह संमेलन भरले होते तेव्हा धारपांचा मी चाहता आहे हे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या घराच्या समोरील प्रशस्त वाड्याकडे बोट दाखवत हे धारपांचे घर असे सांगताच मी क्षणभर थरारलो. परकीय कथा आपल्या मातीत कश्या रुजावायःच्या ह्याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे स्टीफन किंग च्या गाजलेल्या दोन जगप्रसिद्ध टेली मालिका इट व ग्रंडमा मूळ कथा धारपांच्या पुस्तकात वाचल्या असल्याने त्या प्रत्यक्ष पडद्यावर पाहण्यात मजा आली अवांतर महेश कोठारे ह्यांनी धारपांच्या कथा अनोळखी दिशा नावाच्या कार्यक्रमातून छोट्या पडद्यावर आणल्या , ते पाहून धारपांचे कट्टर चाहते हळहळले , डोक्याचे पार ......

सवंगडी Tue, 01/27/2015 - 13:13
हा 'किल्ल्या' मला कायम किल्ल्या मारत असतो की, "नारायण धारप वाच." मी म्हंटल ,"दे एखादं पुस्तक, तर म्हणतो कसा घे कि विकत…"! मुळात मला रत्नाकर मतकरी यांच्या भयकथा वाचायची सवय "किल्ल्या" मुळेच लागली. पण नारायण धारप यांची एक एक कथा अख्खं एक पुस्तक बेतवते. शिवाय पुस्तकाची किंमत फक्त किल्लेदार लोकांनाच परवडेल अशी असल्याने माझ्या सारखे सवंग गडी तिकडे फिरकत नाहीत. ( उदाहरणा दाखल सांगतो कि मी अच्युत गोडबोले यांचे 'अर्थात' पुस्तक ३ महिने पैसे जमवून घेतलं होतं.)

In reply to by सवंगडी

काळा पहाड Tue, 01/27/2015 - 13:31
अहो ते वर एकानं लिहिलंय ना तसं टीळक स्मारक मंदीर समोर प्रदर्शनात ५० रुपयात एक अशी धारपांची पुस्तकं मिळतात. मी जवळ जवळ सर्व घेतली आहेत.

In reply to by सवंगडी

चौकटराजा Tue, 01/27/2015 - 15:00
पांढर्‍या रंगाने एक पंचकोनी चांदणीचे जमीनीवर रेखन करा. येती अमावस्येची रात्र निवडा. शिजवलेला भात, गुलाल ई पाची त्रिकोणात टाका. पंच महाभुते त्यामूळे तुमचे संरक्षण करतील. मध्यावरील पंचकोनात आसनस्थ व्हा.बरोबर बाराच्या ठोक्याला एक थंडगार वार्‍याचा उदगम खिडकीतून होईल. झाडाची पाने सळसळू लागतील. मग स्वस्त पुस्तके ....स्वस्त पुस्तके ,,,असा मंत्र म्हणायला सुरूवात करा. एकदम खोलीत काहीतरी हिरवे, ओंगळ , हिडीस दरवाजात उभे असलेले दिसेल. तो प्रकाशक असोशीशन अध्यक्ष बरं का? तुम्हाला केवळ त्रास देण्यासाठी आलाय वेळ साधून ... मंत्र चालूच ठेवा,,,,, विश्वाला तिरका छेद गेल्याचे कळून येईल. तो पाचव्याया मितीत शिरून तमच्याकडे चाल करून येईल . चांदणी भोवती पुस्तकांचा अक्राळ विक्राळ फेर तमच्या भोवती धरला जाईल.... त्यावर मराठी साहित्याची सखोल समीक्षा.... साहित्य आणि समाज एक चिकित्सक अभ्यास... काव्य आणि पर्यावरण यांचा परस्पर संबध - एक मागोवा असले काही कव्हस्र वर दिसेल.कुठेही न खपणारे ते जटील ग्रंथ तुमचा ग्रास घेण्यासाठी पुङे सरसावतील. शेवटी खिशातले नोटांचे पुडके त्या अभद्र प्रकाशकावर फेका......सारे काही शांत.....तुमच्या नोटा गायब.. समोर नारायण धारपांची सर्व पुस्तके रचलेली आढळतील.

In reply to by किल्लेदार

काळा पहाड गुरुवार, 01/29/2015 - 20:45
तुम्ही जीवनाची मूल्यं मृत्यूनंतरच्या आस्तित्वाला चिकटवताय. हे असंच असतं का हा प्रश्न आहे. जीवनाबरोबर आठवणी आणि (पापपुण्याची) जाणीव सुद्धा संपत असावी. तसं असेल तर आत्मा हा एक शुद्ध उर्जेचा प्रकार असावा आणि मानवी जीवनाची मूल्यं त्याला कितपत लागू पडतील?

In reply to by सवंगडी

सूड Tue, 01/27/2015 - 20:11
>>हा 'किल्ल्या' मला कायम किल्ल्या मारत असतो की, "नारायण धारप वाच. मी म्हंटल ,"दे एखादं पुस्तक, तर म्हणतो कसा घे कि विकत…"!
असं करतात? आपण त्यांचं घर उन्हात बांधू हां!!

palambar Mon, 04/25/2016 - 23:44
आमच्याकडे धारपांचि सर्व पुस्तके आहेत. बाजिराव रोड वर एक जण जुनि पुस्तके विकत असतात. सरस्वति मन्दिर पाशि, पण आता असतात कि नाहि ठाउक नाहि. भयकथा वाचायच्या अस्तिल तर चंद्रकांत आणि धनंजय सुद्धा चांगलि मासिके आहेत.

सुमीत भातखंडे Tue, 04/26/2016 - 18:59
डेलीहंट वर धारपांची बरीच पुस्तकं आहेत. काही काही अगदी ५ रुपयापासून उपलब्ध आहेत. माझी आवडती पुस्तकं: १) चेटकीण २) चंद्राची सावली ३) आनंद महल ४) दस्त ५) ४४० चंदनवाडी (नारायण धारपांचा पंखा) सुमीत भातखंडे

धारप माझे आवडते लेखक आहेत. शिरवळकरांनंतर मी धारपांचा फॅन आहे. मला धारपांना भेटायचे भाग्य देखील मिळाले आहे. आणि त्यांची स्वाक्षरी देखील! धारपांच्या ९०% कथा ह्या परकीय साहित्यावर आधारीत होत्या. विशेषत: त्यांच्या गाजलेल्या कादंबर्‍या. स्टीफन किंग आणि बरेच लेखक त्यांचा आधार होते. आणि ते ह्या गोष्टी प्रांजळपणे सांगत देखील. त्यांची खासियत म्हणजे ते मराठीकरण करताना मूळ कथा धरून त्याभोवती भारतीय साज खूप छान चढवायचे. बखळ, बळद, माजघर, ह्या गोष्टी त्यांच्या लिखाणातून सहज यायच्या. १०-१५ वर्षापूर्वीच्या पुणेकरांने हे शब्द माहित होते. आमच्या वाड्याच्या मागे बखळ होती, आणि मी लहान असताना सर्रास लाईटस्‌ गेले की धारपांच्या गोष्टी आठवून पाचावर धारण बसायची. धारपांनी उचललेल्या काही कथा-कादंबर्‍या: लुचाई- सलेमस्‌ लॉट - स्टीफन किंग आनंदमहल- शायनिंग- स्टीफन किंग शपथ- इट‌‌- स्टीफन किंग ( ह्यावर हिंदीमध्ये लिलीपूट, आशुतोष गोवारीकर आणि धारा तेलाच्या जाहितातीतला ’जलेबी’ म्हणणारा मुलगा ह्यांची ’वोह’ नावाची सिरीयल देखील आली होती. त्याचा इंग्लीश टी.व्ही. मूव्ही पण आहे १९९२-९३ बहुतेक. आणि २०१७ मध्ये तो मोठ्या पडद्यावर नवीन पद्धतीत बनत आहे. नंतर रूम नं. १४०८ ( १४०८ नावाचा सिनेमा आहे) ह्यावर त्यांनी स्टोरी पण लिहिली आहे. लवकरच समग्र धारप यादी जाहिर करेन. त्यात विज्ञानकथा, भय/गूढ कथा-कादंबरी, लहान मुलांसाठीच्या कथा, अनुवाद, साहस कथा, सामाजिक कादंबरी ह्या सगळ्यांची माहिती देण्याचा प्रयत्न असेन.

In reply to by अजिंक्य विश्वास

चौकटराजा Wed, 04/27/2016 - 07:11
अरे वा तुम्ही ही माझ्यासारखेच त्याना भेटलेले दिसताय. परकीय मूळ हे त्यानी आपल्याकडेही कबूल केलेले होते हे वाचून त्यांच्या दिसखुलास पणा विषयी आनंद वाटला. ते मिस्कील स्वभावाचे गृहस्थ वाटले असा उल्लेख मी इथेच एका प्रतिसादात केला होता. वरील एका टेरर फोटोत आरशातील " ते" हिरवट रंगाचे दिसावयास हवे तरच धारपाना न्याय मिळेल त्या फोटोत!

सुशिल कोकाटे Tue, 08/14/2018 - 13:54
मराठी साहित्य online क्वचितच मिळते. आजकाल बरेचजन विकत घेऊन laptop/mobile वर वाचायला तयार आहेत. पण प्रकाशक उदासीन असतात मराठी साहित्य बदल. Google Books वर इतर भाषेचे भरपूर साहित्य मिळते पण मराठीचे फार कमी.

SHASHANKPARAB Tue, 08/14/2018 - 17:53
तुमच्या वाचनाचा वेग चांगला असेल तर फक्त 169 रुपयांत Amazon Kindle unlimited ची मेम्बरशिप घेऊन नारायण धारपांची बहुतेक सगळी पुस्तक एका महिन्यात वाचू शकता.