मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गूढ अंधारातील जग -९

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गूढ अंधारातील जग -९ पाण्याखालचे वैद्यकशास्त्र आता पर्यंत आपण पाणबुडीतील व्यवहार कायकाय आहेत ते पाहिले. आता पाणबुडीतील सैनिकांना आणि डॉक्टरांना कोणत्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते ते पाहणार आहोत. याचे दोन प्रकार आहेत

१) बंदिस्त जागेत राहण्यामुळे होणारे त्रास २) अतिखोल वातावरणात राहण्यामुळे होणारे त्रास

बंदिस्त जागेत राहण्यामुळे होणारे त्रास-- पाणबुडी हि एका धातूच्या नळकांड्यासारखी असते आणि त्यात दिवस रात्र याच काहीच संबंध नसतो.याचा जवळचा अनुभव आपण घेतला असेल ते म्हणजे रात्री रेल्वेच्या स्लीपर डब्यातून प्रवास करताना अपरात्री उठल्यावर जसे निळसर दिवे अपुरा प्रकाश आणि चारी बाजूनी आवाज असतो तीच स्थिती. पण रेल्वेतील या अंधाऱ्या रात्रीला उद्या उजळणाऱ्या सूर्याची उबदार किनार असते. हि स्थिती पाणबुडीत नसतेच. मग सूर्य उदय किंवा अस्त नाहीच तर २४ तासाचा दिवस असायचे कारणच नाही म्हणून तेथे १८ तासाचा दिवस असतो याचे कारण अभ्यास केल्यावर असे आढळले कि माणूस अशा वातावरणात जास्तीत जास्त सहा तासापर्यंत आपला उत्साह ठेवू शकतो यानंतर त्याची कार्यक्षमता झपाट्याने खाली जाते. म्हणून तेथे सहा तासाचीच शिफ्ट असते. म्हणजे रात्री १२ ते सहा काम (ड्युटी) केले कि परत संध्याकाळी सहा ते बारा मग दुसऱ्या दिवशी दुपारी बारा ते सहा. पाणबुडीत जास्तीत जास्त जागा हि यंत्रे, अस्त्रे आणि शस्त्रांना दिली असल्याने माणसे कमीत कमी असतात. त्यामुळे कित्येक वेळेस सैनिकांना २४ ते ३६ तास झोपताच येत नाही. याचा एक फायदा म्हणजे पाणबुडीतील सैनिक केंव्हाही आणि कुठेही झोपू शकतात. पण याचा त्रास माणूस जेंव्हा आपली गस्त संपवून घरी येतो तेंव्ह होतो.. रात्री १० वाजता झोपला कि चक्रात सापडल्यासारखा पहाटे ४ वाजता उठून बसतो या निशाच भूतानां तस्मात जागर्ति संयमी. पहाटे ४ वाजता जाग अली कि परत चार पाच तास झोप येत नाही आणि परत सकाळी १० ला झोप यायला लागते. दुसरा प्रश्न येतो ते माणसाचे खोली मापण्याचे (DEPTH PERCEPTION) मेंदूतील केंद्र बिघडून जाते. कारण दिवसेंदिवस २० २५ फुटाच्या पलीकडे पाह्ण्याची सवय गेल्यामुले अंतराचा अंदाजच येत नाही. किनाऱ्यावर आल्यावर दुचाकी किंवा चार चाकी चालवताना माणसाची फे फे उडते यामुळे बरेच लोक वाहन ३० -- ३५ फूट मागे लावतात (पार्क करतात). बंद नळकांड्याचे आपले वेगळे प्रश्न असतात. ते म्हणजे सुरुवातीला असणारे ताजे अन्न संपून जाते. मग डबाबंद अन्न खायला लागते ज्याची चव वेगळीच असते. त्यातून सर्व गोष्टींना कपड्याना डिझेलच्या वाफेचा, रंगाचा, वंगणच्या तेलाचा वास लागतो. काही काळाने या वासाची सवय लागते. परंतु जेंव्हा माणूस परत किनाऱ्यावर येतो तेंव्हा त्याच्या अंगाला कपड्याना आणि त्याच्या इतर वस्तुंना हा वास लागून राहतो. पाणबुडीतील हवा शुद्ध ठेवली जाते परंतु त्यात मुख्यत्वे ऑक्सिजन, कार्बन डायॉकसाईड/ मोनॉ क्साईड, हैड्रोजन( हा पाणबुडीच्या बॅटरीतून निघतो) याचे प्रमाण अचूकतेने ठेवले जाते. परंतु वातविकार असलेल्या लोकांच्या (गंधर्व) वाताचे विविध उमासे आणणारे वास याचा त्रास संपत संपत नाही. विशेषतः सुरुवातीच्या दिवसात जेंव्हा माणसे गस्तीवर जाण्याच्या अगोदर जीवाची मुंबई ( किंवा विशाखा पट्टणम) करून आलेले असतात. त्यातून जर काही कारणाने सैनिकाला टॉर्पेडो/ क्षेपणास्त्राच्या नळकांड्यात झोपायला लागले तर आपुलाची वास आपणासी अशी गंभीर स्थिती होते. महिनोन महिने स्त्रीसुखापासून वंचित राहिल्यामुळे लैंगिक भावनांचा निचरा होत नाही. त्यातून जागाच इतकी अपूरी असते कि हस्तमैथुन करणे सुद्धा कठीण होते. सारखे कोणी तरी आजूबाजूला असते किंवा आवाज येत राहतात. त्यातून एकंदर पाण्याचा सुद्धा सतत तुटवडा असल्याने अंघोळीच्या जागी(शॉवर) सुकलेल्या वीर्याचे ओघळ दिसत राहतात. यामुळे पुरुषाची कामेच्छा मेल्यासारखी होऊ शकते. यामुळे परत किनाऱ्यावर गेल्यावर लिंग शैथिल्य( ERECTILE DYSFUNCTION) आणि शीघ्र पतन (PREMATURE EJACULATION) याचा त्रास बऱ्याच सैनिकांना होतो. याबद्दल अजूनही आपल्याकडे खुले पण पाहण्याची / बोलण्याची सवय झालेली नाही. त्यातून अशा ठिकाणी समलिंगी संबंध खूप जास्त असतात हे गैरसमज लोकातच काय पण लष्कराच्या इतर शाखातही असलेले आढळतात. प्रत्यक्ष समलिंगी संबंध हे सामान्य लोकात आढळतात तितकेच पाणबुडी शाखेत असतात. उलट तेथे संभोग करायला जागाच नसते त्यामुळे असे संबंध प्रत्यक्ष कमीच असावेत. या गोष्टी बऱ्याच लोकांना किळसवाण्या वाटतील परंतु डॉक्टरांना हि वस्तुस्थिती अशी झटकून टाकता येत नाही. claustrophobia किंवा बंदिस्त जागेत राहण्याची भीती हि साधारणपणे फारशी होत नाही कारण मुळात नौदलात काम केलेला माणूस जहाजात या वातावरणाला थोडा फार सरावलेला असतो. त्यातून पाणबुडीचा अभ्यासक्रम १ वर्षाचा असतो त्यात त्याला या सर्व सरावातून जावेच लागते. परंतु एकटेपणा आणि नैराश्य याचा थोडा फार त्रास होतोच. मी येथे नक्की काय करतो आहे असा प्रश्न जवळ जवळ १०० टक्के सैनिकांना पडतोच ( लष्कर नौदल वायुदल सर्वत्र) यासाठी त्यांना स्फूर्ती देण्याचे काम आणि तशी सोय सर्व लष्करी आणि निमलष्करी दलात असतेच.यामुळे आत्महत्येचे प्रमाण सैनिकात पाणबुडी शाखेत सर्वात जास्त आहे. अपुरी झोप(SLEEP DEPRIVATION) आणि दिवसेंदिवस असणारा कामाचा तणाव( CHRONIC STRESS यामुळे पाणबुडी सैनिकांमध्ये हायपर कॉर्टीसॉलीझम (HYPERCORTISOLISM) आणि त्याचे परिणाम ( मधुमेह रक्तदाब वजन वाढणे इ जास्त प्रमाणात आढळून येतात). जागेच्या अभावामुळे तेथे व्यायाम करण्यास वाव फारच कमी असतो. कुठल्यातरी कोपऱ्यात ठेवलेली सायकल किंवा ट्रेंड मिल वर व्यायाम करताना डोके आपटते नाही तर हात किंवा पाय लागतात अशा स्थितीत व्यायामाचा उत्साह राहत नाही त्यामुळे वजन वाढण्याची बरीच शक्यता असते. अर्थात भारतीय नौदलात सहसा पाणबुडी सैनिक अतिरिक्त वजनाची शिकार झालेले मी पाहिलेले नाहीत. याचे कारण पाणबुडी शाखेतीळ वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर अशा गोष्टींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवताना मी पाहिले आहे. क्रमशः

वाचने 10138 वाचनखूण प्रतिक्रिया 26

In reply to by एस

नाखु Fri, 06/15/2018 - 09:35
खरं तर आम्हीच अंधारात बसलो होतो तुम्ही आम्हांला आम्ही किती पाण्यात आहोत हेच दाखवून दिले आहे. किरकोळ अडचणीं चा बाऊ करून घेणार्या कर्मचारी वर्ग यांनी हे वाचायलाच हवे सुरक्षित चाकरमानी नाखु पांढरपेशा

दुर्गविहारी Wed, 06/13/2018 - 22:44
धक्कादायक माहिती देताय तुम्ही. असे आयुष्य कंठणार्या सैनिकांना माझा सलाम. असे काही जग असू शकते याचा विचार ही केला नव्हता. पु.भा.ल.टा.

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/14/2018 - 02:39
बेक्कार ! एवढे सारे सहन करुन हे लोकं जी देश सेवा करत आहेत त्याला तोड नाही __________/\__________ ही एक अप्रतिम लेखमलिका आहे डॉक्टर साहेब !

पिवळा डांबिस Fri, 06/15/2018 - 03:29
नेव्ही/ सबमरीन मधील जवान म्हंटले की शूर हिरोंची सार्थ प्रतिमा डोळ्यासमोर उभी रहाते. पण एक माणूस म्हणून त्यांना सामोर्‍या येणार्‍या समस्यांची माहिती नसते. ते वास्तव नजरेस आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

अर्धवटराव Fri, 06/15/2018 - 08:09
USS Pennsylvania या अमेरीकेच्या सर्वात मोठ्या पाणबुडीवर एक चित्रफीत बघितली होती. ति पाणबुडी अणूउर्जेवर चालते म्हणे. एकंदर प्रकरण प्रशस्त वाटलं. त्याच्या तुलनेत हे वर्णन म्हणजे शिक्षाच म्हणायला लागेल. आपल्याकडे कधि येतील अशा प्रशस्त पाणबुड्या.

In reply to by अर्धवटराव

सुबोध खरे Fri, 06/15/2018 - 10:13
USS Pennsylvania हि १७-१८ हजार टन वजनाची अणु पाणबुडी आहे (यात साधारण २० वर्षांनी एकदा अणुइंधन भरावे लागते) आणि त्या तुलनेत आपली अरिहंत ६००० टन आहे. परंतु त्यात २४ ट्रायडेंट आंतरखंडीय अणू क्षेपणास्त्रे (ज्यात अणू बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब डागण्यासाठी तयार स्थितीत ठेवलेले असतात) आणि इतर अस्त्रे असल्याने सैनिकांना जागा त्यामानाने अपुरीच असते. सिनेमात दाखवतात त्यात कॅमेरा वाईड अँगल असल्याने जागा बरीच जास्त असल्यासाखी वाटते. जसे आपण १० X १० च्या खोलीत (घरात) सेल्फी काढतो तेंव्हा मागची खोली महालासारखी वाटते. अर्थात अमेरिकन पाणबुड्या रशियन पाणबुड्यांच्या मानाने थोड्या जास्त प्रशस्त असतात हि पण वस्तुस्थिती आहे.

मदनबाण Fri, 06/15/2018 - 21:30
खडतर परिस्थीतीत राहुन सुद्धा देशसेवा करणार्‍या या पाणबुडीतील सैनिकांना सलाम !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय एम ए स्ट्रीट डान्सर... :- इल्जाम (1986)

गामा पैलवान Sun, 06/17/2018 - 00:26
खरे डॉक्टर, आयशप्पत, हे तर तुरुंगापेक्षाही भयंकर आयुष्य आहे. तिथं निदान दररोज मोकळ्या हवेत व्यायामासाठी तरी नेतात. इथं तर तेही नाही. या लोकांची धन्य आहे. आ.न., -गा.पै.

गवि Mon, 06/18/2018 - 09:40
यातील अनेक प्रकारच्या समस्या स्पेस स्टेशनमध्ये दीर्घकाळ राहणाऱ्या अंतरिक्षयात्री गटांच्या समस्यांशी समरूप आहेत. भविष्यात दीर्घकाळ प्रवास करून दूरवर अंतराळात जाण्याच्या (मानवसहित) मोहिमा ठरवताना अशा मानसिक, शारीरिक आणि परस्परसंबंधातील समस्या विचारात घेतल्या जातात असं ऐकलं. अत्यंत कमी जागेत, दीर्घकाळ एकत्र कोंडलेल्या अवस्थेत मानवी संबंध एकदम विचित्र बनू शकतात.

In reply to by गवि

गामा पैलवान Mon, 06/18/2018 - 12:36
गवि, अगदी अचूक निरीक्षण आहे. माझ्या मते दोहोंमधला फरक स्पष्ट करतो. १. अंतराळवीरांना कठोर चाचण्या करून नंतर साजेसं प्रशिक्षण देऊन मोहिमेवर रवाना केलं जातं. याउलट पाणबुडीवरचा सैनिक तुलनेनं कमी कठोर चाचण्यांतून उत्तीर्ण झालेला असतो. २. अंतराळवीरांकडे कामगिरीचं ठोस लक्ष्य असतं. याउलट पाणबुडीचं लक्ष्य फक्त उच्चपदस्थांनाच माहित असतं. सर्वसाधारण सैनिकासाठी तोच तो रटाळ दिनक्रमच असतो. ३. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे अंतराळवीरांच्या शरीराची हानी होते. तशी पाणबुडी सैनिकांची होत नाही. ४. शून्य गुरुत्वाकर्षणामुळे वेड्यावाकड्या अवस्थेतही अंतराळवीरांना गाढ झोप येते. ही सुविधा (?) पाणबुडीवर उपलब्ध नाही. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गवि Mon, 06/18/2018 - 12:49
बरोबर. पण नमुना अभ्यास म्हणून पाणबुडीचा अभ्यास होत असू शकतो नासाकडून. मधे एका बातमीत एका अंतराळवीर स्त्रीने स्पेस स्टेशनमध्ये "शी" करतानाच्या समस्या सांगितलेल्या वाचल्या. ते वाचायला अनेकांना विनोदी वाटेल पण खरेच गंभीर आणि किळसवाणे ऑर्डीयल आहे. अत्यंत लहान भोकयुक्त पात्रात मल नेमका नेम धरून सोडणे, तो अनेकदा तरंगून बाहेर येणे, इकडे तिकडे जाणे, तो पकडून परत पुढची क्रिया असं भयंकर आहे तिथे.

In reply to by गवि

सुबोध खरे Mon, 06/18/2018 - 13:50
यातील अनेक प्रकारच्या समस्या स्पेस स्टेशनमध्ये दीर्घकाळ राहणाऱ्या अंतरिक्षयात्री गटांच्या समस्यांशी समरूप आहेत. अवकाशयात्रींच्या शारीरिक आणि मानसिक समस्या या पाणबुडी शाखेतील बऱ्याच समस्यांसारख्या असल्या तरी त्यांच्या काही समस्या अगदीच वेगळ्या आहेत. ज्यात वजनरहित अवस्था( गुरुत्वाकर्षणाचा अभाव) हि एक अतिशय विचित्र समस्या असते. ज्यात साध्या साध्या गोष्टी म्हणजे स्ट्रॉने पाणी पिणे शक्य नसते इतकेच काय ग्लास वाकडा केला तरी पाणी येतच नाही कारण वर किंवा खाली हि स्थिती नाहीच. त्यामुळे द्रव पदार्थ हे दाबून पिण्याच्या वॉटर बॅग मधूनच प्यावे लागतात. तसेच शौचास बसले तरी मैल शरीराच्या बाहेर येतो पण तो "खाली" जात नाही. त्यामुळे शौचालय (किंवा मुत्रालय) हे शोषल्या जाणाऱ्या नळकांड्यासारखे (SUCTION) असते. अवकाश यात्री याना एक अज्ञात अशी अंतराळाची भीती वाटत असते. कारण पृथ्वीवर जसे पाय जमिनीवर असतात दिशाज्ञान असते तशी स्थिती अवकाशात नाही त्यामुळे येथे जर आपला मृत्यू झाला तर आपले शव (पार्थिव म्हणावे का हा प्रश्न आहे) अंतराळात अनंतकाळापर्यंत भटकत राहील अशी विचित्र भीती वाटत राहते. बंगलोर च्या वायुसेनेच्या INSTITUTE OF AEROSPACE MEDICINE येथे या विषयात पूर्ण तीन वर्षाचे M D आहे.

गवि Mon, 06/18/2018 - 14:10
एकंदरीत एका बंद जागेत ठराविक काळ बंदिस्त आणि एकत्र राहण्याची सक्ती यातून येणाऱ्या समस्या हा एक रोचक विषय आहे. याचा उपयोग मनोरंजनापासून (बिग बॉस, बिग ब्रदर वगैरे रियालिटी शोज) ते अंतरिक्षयानात अनेक महिने छोट्या बंदिस्त जागेत राहणे इथपर्यंत आहे. चिलीमध्ये खोल खाणीत अडकलेल्या एका कामगार टीमने सुटका होईपर्यंत अत्यंत अपुऱ्या जागेत एकमेकांचे जीव न घेता (फ्रस्ट्रेट न होता) घालवलेले माहिनोन महिने हा टीमवर्क आणि लीडरशीपचा उत्तम नमुना होता. मोदकाने पूर्वी इथे या चिली खाण दुर्घटनेविषयी सविस्तर लेख लिहिला आहे.

In reply to by खटपट्या

सुबोध खरे Mon, 06/18/2018 - 18:44
Indian Air Force had 8.5%, Indian Army 3% and Indian Navy 2.8% women (c. 2014). स्रोत --विकी यातील बहुसंख्य स्त्रिया या (service) सेवा शाखांत आहेत. म्हणजे वैद्यकीय, नर्सिंग, रसद (logistics). अल्प प्रमाणात स्त्रियांना लढाऊ विमानात वैमानिक म्हणून नौदल आणि वायुदलात आता प्रवेश दिला आहे. परंतू थलसेनेत अजून तरी लढाऊ (arms) पलटणीत त्यांना प्रवेश दिलेला नाही. पाणबुडी शाखेत स्त्रियांना अजून तरी प्रवेश दिलेला नाही. लहान जहाजांवर किंवा पाणबुडीत जेथे स्त्रियांना वेगळी खोली किंवा न्हाणीघर/ शौचालय देणे शक्य नाही अशा ठिकाणी प्रवेश दिलेला नाही.