मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजी -' छा '-लिया

विअर्ड विक्स · · जनातलं, मनातलं
हेर पट म्हटला कि आपल्यासमोर बॉण्ड पट वा टायगर पट डोळ्यासमोर उभे राहतात. मुख्यतः हेर पट हे नायक प्रधान चित्रपट असतात, या अंगाने राझी चे वेगळेपण उठून दिसते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या " सेहमत कॉलिंग " या कथेवर आधारित आहे. या चित्रपटातील कथा १९७१ च्या युद्ध काळातील आहे. हिदायत खान ( रजत कपूर ) व बायको तेजी खान ( सोनी राझदान - आलियाची खरी आई ) ( तेजीच्या कपाळावर सिंदूर दाखवला आहे याचे कारण कळले नाही ) काश्मिरात वास्तव्य असते व पाकिस्तान काश्मिरात त्यांचे व्यापारानिमित्त येणेजाणे होत असते . हिदायत खान हे भारतासाठी डबल एजन्ट ( मराठी शब्द ? ) ची कामगिरी निभावत असतात. हिदायत खान यांना पुप्फुसाच्या कर्करोगाची लागण होते. त्यांना शंका असते कि शत्रू राष्ट्र मोठा कट रचत आहे , नि त्या कटाची माहिती काढणे अत्यंत निकडीचे आहे , अशा वेळेस ते आपल्या दिल्लीत शिकत असलेल्या मुलीला - सेहमतला ( आलिया भट ) पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेतात. यासाठी तिला भारतीय अधिकारी १ महिन्याचे विशेष प्रशिक्षण देतात.हिदायत खान यांच्या ओळखीतील लष्करी अधिकाऱ्याच्या मुलाशी तीचे लग्न लावून दिले जाते . शत्रू राष्ट्रात जाऊन सेहमत काय , कशी नी कुठे कामगिरी पार पाडते यासाठी आपणास राझी चित्रपट पाहावा लागेल. नाम शबाना हा जरी महिला गुप्तहेरीवरील चित्रपट सध्याच येऊन गेलेला असला तरी या चित्रपटाची धाटणी पूर्णतः वेगळी आहे. या चित्रपटात अनेक चरित्र अभिनेते असले तरी सर्वांना मोजून मापून रोल दिले गेले आहेत, या चित्रपटाचा श्वास " आलियाच " आहे. विकी कौशल ( मसान चित्रपटातील हिरो ) याने सेहमतच्या शौहरचा रोल चांगल्या रित्या निभावला आहे.नवऱ्याशी नि त्याच्या राहत्या देशाशी तीने गद्दारी केली असली तरी "अपने वतन से परस्त हैं " हे तो जाणून असतो. अमृता खानविलकर या चित्रपटात आलियाची भावजय दाखवण्यात आली आहे, ती या रोल मध्ये तोलून मापून वावरली आहे. लक्षणीय रोल आहे तो " खालिद मीर या पात्राचा !" ( जयदीप अहलावत) ट्रैनिंग दरम्यान आलिया व या पात्रातील दृश्ये पाहण्यासारखी आहेत. कंवलजीत सिंग यांची छोटी भूमिका आहे परंतु त्यांना मिळालेले संवाद लक्ष्यवेधी आहेत. या चित्रपटातील अनेक दृश्ये हि त्यातील हळुवारपणामुळे लक्षात राहतात ( साधारणतः हेरपटात मारझोड , बंदुकीच्या गोळ्यांचा खच असतो ) उदा . - सेहमत नि तिचे वडील यांच्यातील तिला हेर बनवण्यावेळचा संवाद, आपली कामगिरी पार पडून परत आपल्या देशात येतेवेळचा संवाद , विक्रांत वरील संवाद ..... चित्रपटाचे संवाद , संगीत नि छायाचित्रण हे अनुक्रमे मुख ,कान व डॊळे आहेत. हे तिन्ही विभाग सर्वोत्तम नसले तरी उत्तम नक्कीच आहेत. देशभक्तीपर चित्रपट जरी असला तरी कुठेही गदरची (भडकतेची ) झलक नाही. पूर्वार्ध जरी थोडा रटाळ असला तरी उत्तरार्ध चांगलाच वेग पकडतो. सामान्यतः हेरपटात असामान्य व्यक्तिरेखा असामान्य कामगिरी करून दाखवतात परंतु या चित्रपटात सामान्य व्यक्तिरेखा सुद्धा असामान्य कामगिरी करून दाखवू शकतात हे आहे हेच चित्रपटाचे यश आहे. विशेष नोंद - वयाच्या २५व्या वर्षी आलियाने इतकी विविधता दिलीये , अजून १० वर्षे जरी इंडस्ट्रीत काढली तर नक्कीच लेडी अमिताभ होईल. आलियासाठी तालिया जरूर द्या .

वाचने 18461 वाचनखूण प्रतिक्रिया 38

In reply to by मराठी कथालेखक

विअर्ड विक्स गुरुवार, 05/31/2018 - 20:20
बरोबर ..... मेघना गुलझार चा उल्लेख राहिला, लेख घाई घाईने टंकण्यात ..... तिचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला, तर तलवार चित्रपटाने व्यावसायिक यश थोडेसे चाखले , पण व्यक्तिशः मला तो चित्रपट विशेष आवडला नाही .

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 05/31/2018 - 20:36
थोडक्यात पण सुंदर समिक्षण ! चित्रपट पाहिला आणि आवडलाही. हेरकथेत बहुदा दिसणारा भडक स्टंट टाळून, अनपेक्षितरित्या हेरगिरीत ओढल्या गेलेल्या एका "खर्‍या" हेराच्या कामाचे आणि मनःस्थितीचे प्रदर्शन करणारा हा चित्रपट आहे. सत्यकथेवर, आणि त्यातही भारतिय सत्यकथेवर, आधारीत असल्याने अधिकच जवळचा वाटला. आलिया भट एक उत्तम अभिनेत्री म्हणून आपले स्थान पक्के करत आहे असे दिसते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील रुळलेले हिरॉइनचे रोल्स सोडून वेगळ्या वाटेवरचे रोल स्विकारायला ती घाबरत नाही व ते पेलण्याची ताकद आपल्यात आहे हे ती तिच्या कामाने सिद्ध करत आहे. ('उडता पंजाब'मधला नॉन-ग्लॅमरस रोलही तिने ताकदीने पेलला होता).

सुबोध खरे गुरुवार, 05/31/2018 - 20:43

विक्रांत

वरील संवाद छिद्रान्वेष -- दाखवलेली युद्धनौका

"विराट"

आहे. बाकी असे गुप्तहेर कोणत्या मातीचे बनलेले असतात हे मला अजून कुतूहल आहे? पकडले गेलो तर मृत्यू किंवा आयुष्यभर होणारा छळ हे नक्की माहिती असूनही जाज्वल्य देशभक्ती साठी हि माणसे एवढा प्रचंड धोका कसा पत्करू शकतात याचे मला अत्यंत आश्चर्य वाटत आले आहे. या निमित्ताने श्री कुलभूषण जाधव यांची होणारी छळवणूक परत आठवली. आणि श्री मोरारजी देसाई यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्यामुळे कहूता या अणू प्रकल्पात हेरगिरीची तयार झालेली साखळी अक्षरशः तोफेच्या तोंडी दिली गेली याची आठवण होऊन अंगाची लाही होते. http://www.indiandefencereview.com/how-we-killed-the-kaoboys/

In reply to by सुबोध खरे

यशोधरा Fri, 06/01/2018 - 10:58
लिंक वाचली. फार वाईट वाटले. :( मूर्ख आणि स्वतःचे रागलोभ देशासाठी सुद्धा न विसरू शकणारे राज्यकर्ते लाभणे हे दुर्दैव आहे..

जेम्स वांड Fri, 06/01/2018 - 10:35
खूप आवडले. स्टुडंट ऑफ द इयर मध्ये ग्लॅमरस रोल करणारी हीच का असा प्रश्न पडून तोंडात बोट घातले जाते. उडता पंजाब पाहिला, राझी अजून पाहिला नाहीये पण नक्की पाहणार अन थेटरात जाऊनच पाहणार.
डबल एजन्ट ( मराठी शब्द ? )
श्री. गामा पैलवान ह्यांना संपर्क करा, त्यांची इंग्रजी शब्दांना मराठी-संस्कृत-संस्कृतोद्भव मराठी प्रतिशब्द तयार करायची हातोटी विलक्षण आहे खरे सरांचा प्रतिसादही खूप आवडला. खरंच हेर कुठल्या मातीचे बनलेले असतात ह्याचं कुतूहल वाटतं.

विअर्ड विक्स Fri, 06/01/2018 - 12:23
हा चित्रपट लागला त्या १ ल्या आठवड्यातच पाहिला होता , परीक्षण लिहिण्यात थॊडी कुचराई करत होतो. आपल्या मिपावर अनेक जण समीक्षा करणारे असल्याने कोणी दुसरे लिहील म्हणून अजून आळस करत होतो. काल अखेर निर्धाराने १ बैठकीत लिहिले. जाणीवपूर्वक हेरगिरीच्या प्रसंगाबाबत लिहिणे टाळले कारण " छत टपक रहा है , छत्री भेजो" वा "तुम्हे जरासा शक भी हो ...." , वो आसमान देखते .... " असे अनेक अविस्मरणीय संवाद या चित्रपटात आहेत , पण त्यांची मजा चित्रपटगृहातच जास्ती येते.

गामा पैलवान Sat, 06/02/2018 - 02:27
संज्ञामालिन्य ( = cognitive dissonance) चं हे मासलेवाईक उदाहरण आहे. गंमत बघा महेश भट चा मोठा मुलगा राहुल भट प्रत्यक्षात एक अतिरेकी आहे. २६/११ चा सूत्रधार डेव्हिड कोलमन हेडली रेकीच्या वेळेस राहुल भटाच्या घरी राहायला होता. राहुल भट दहशतवादी आहे. त्याचा बाप महेश भट नावापुरती काश्मिरी हिंदूंची जाहीर बाजू घेतो. याच राहुल भटाची धाकटी सावत्र बहीण आलिया भट सिनेमांत देशप्रेमी भूमिका रंगवते. लोकांना हे बघून कळंत नाही की भट कुटुंब विश्वासार्ह आहे की देशद्रोही? देशप्रेम आणि देशद्रोह या दोन विरोधी भावना व विरोधी संज्ञा आहेत. प्रेक्षकांच्या भावनांना हात घालून परस्परविरोधी चित्रं प्रकट करायचं व त्याच्या आधारे संज्ञांचा गोंधळ उडवून द्यायचा. अशी ही संज्ञामालिन्याची योजना आहे. यासाठी भट कुटुंब फार काळजीपूर्वक निवडलं आहे. -गामा पैलवान

In reply to by गामा पैलवान

मदनबाण Sun, 06/10/2018 - 09:41
गा पै तुमच्या मताशी सहमत आहे ! आलिया ने अभिनय केलेला उडता पंजबा आणि आत्ता राजी पाहिला आहे, पुढील चित्रपट नीट निवडल्यास तिची अभिनय क्षमता अजुन कळावी ! बादवे... नावात भट नसते तर तिला कोणीही विचारले नसते... इथे कोणीही अभिनेता आणि अभिनेत्री होउ शकतो ! तैमुर तर बॉलिवूड मधला पहिला लंगोट हिरो आहे ! :)))

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बादरवा बरसनको आये... :- Irish Malhar

पिलीयन रायडर Tue, 06/05/2018 - 11:49
कालच बघितला. अत्यन्त सुंदर चित्रपट आहे. प्रत्येक व्यक्तीने गरज आहे अगदी तेवढाच अभिनय केलाय. कुठेही भडकपणा नाही. संवाद सुद्धा अगदी मोजके आणि नेमके. युट्युब वर मेकिंग चे व्हिडीओ बघा. 1971 सालंचे पाकिस्तान कसे उभे केले आहे हे कळल्यावर तर फार कौतुक वाटलं. मेघना गुलजार ही प्रचंड टॅलेंटेड बाई आहे. आणि चक्क आलिया सुद्धा! आलीया तिच्या आजोबा बद्दल बोलत असताना म्हणते की "मै ही तो मुल्क हूं. मै ही हिंदुस्थान हूं" तेव्हा फार गलबलून येतं. आपल्या सारख्या करोडो फालतू माणसांच्या समूहाला सुरक्षित ठेवायला हे लोक जीव देतात. आपण साधा कचरा नाही उचलत घराजवळचा. विचारात पाडणारा चित्रपट. (खुसपट - अमृता तिची जाऊ आहे, भावजय नाही!)

In reply to by पिलीयन रायडर

रातराणी Tue, 06/05/2018 - 12:23
आणि चक्क आलिया सुद्धा!
आलियाने तिचं टॅलेंट केव्हाच सिद्ध केलंय ग, उडता पंजाब करून! टॅलेंटला मेहनतीची जोड आहे आणि तिची चित्रपट निवड उत्तम आहे काही अपवाद सोडले तर.. :)

विअर्ड विक्स Tue, 06/05/2018 - 23:00
हा चित्रपट एका महिला दिग्दर्शकाने लिहिला आहे तसेच खऱ्या कथानकात असे घडले हि असेल , परंतु चित्रपटाचा शेवट सकारात्मक आहे , याच ठिकाणी अनुराग कश्यप असता तर नक्कीच त्याने सैराट टाईप शेवट केला असता.

In reply to by एमी

पिलीयन रायडर Fri, 06/08/2018 - 16:03
हा रिव्ह्यू फारच आवडला. आलियाचा तो शेवटचा सीन फार महत्वाचा आहे. आणि आपल्यालाही अगदी तसंच वाटतं. पाकिस्तानी असले तरी त्यांचा कुठेही राग येत नाही, मुळात कुणाचाच राग येत नाही. सगळे आपापल्या जागी बरोबरच आहेत असं वाटत राहतं. लिंक साठी धन्यवाद!

हर्मायनी Wed, 06/06/2018 - 09:37
आलियाने इन्स्टा वर तिचा आणि विकी कौशलचा फोटो शेअर केल्यापासूनच राझी ला फॉलो करत होते . काही कौटुंबिक कारणांमुळे पहिल्या आठवड्यात पाहता आला नाही. पण नंतर लगेच पाहून आले. आलिया आणि टीमने कमाल केली आहे संपूर्ण चित्रपटात! आलिया भट ची हायवे पासूनच खूप मोठी फॅन आहे. खरंतर परीक्षण लिहिण्याची इच्छा होती, पण वेळेअभावी जमले नाही. संपूर्ण चित्रपट किंचितही अँड कुठेही वाहवत गेला नाही. नितांत सुंदर अभिनयाने नटलेला असा हा चित्रपट. आलियाच्या प्रत्येक री-ऍक्शन/ब्रेक-डाउन मोमेंट्स प्रचंड खऱ्या आणि जमून आल्या आहेत. तसेच पूर्ण चित्रपटभर एक महिना प्रशिक्षण घेऊन आलेल्या हेरासारखीच वागली आहे. कुठेही तिने अचाट ऍक्शन सिक्वेन्स दाखवले नाहीयेत. विकी कौशल त्याच्या डोळ्यातून बोलतो.(*my new crush *) संपूर्ण चित्रपटात त्याने अतिशय संयत असा अभिनय केलाय. त्यामुळेच शेवटच्या सिक्वेन्समध्ये त्याच्या होणार अंत चटका लावून जातो. जयदीप अहलावतला विशेष मेंशन! आणि मेघना गुलजारचे डिरेकशन अमेझिंग ! :) पूर्ण चित्रपटाचे संवाद, म्युझिक उत्तम. कुठेही ऑफ द ट्रॅक जात नाही. PS : चित्रपटाचा अंमल अजूनही उतरला नाहीये !

चौथा कोनाडा Fri, 06/08/2018 - 18:52
सुंदर लिहिलंय, लेख आवडला ! राजी हा खरोखरच हिंदीतील एक महत्वाचा चित्रपट ठरावा ! प्रदर्शित झाल्यावर लगेच पहायचा होता, अजुन योग आलेले नाहीत. आज पिंपळ प्रदर्शित झालाय, तो ही खुणावतोय ! देवा मला असे सुंदर सिनेमा पहायला वेळ आणि पैसा दे रे !

रुपी Sat, 06/09/2018 - 04:41
चित्रपट अतिशय सुंदर आहे! आलिया तर आत्तापर्यंत सगळ्यांच भूमिकांमध्ये आवडली. या चित्रपटातही उत्तमच काम केले आहे तिने. विकी कौशल हाही अतिशय आवडला. खास करुन मागच्याच आठवड्यात त्याचा 'लव पर स्क्वेअर फूट' पाहिला होता. त्यातला आणि राजी मधला कलाकार एकच आहे यावर विश्वास बसत नाही! त्याचा फक्त लूकच नाही तर देहबोली, ढब वगैरे सगळेच खूप वेगळे आहेत दोन्ही सिनेमांमध्ये. बाकीही कलाकार अगदी लहानसहान भूमिकांमध्येही लक्ष्यात राहतात. चित्रपटात खरंच तुम्ही लिहिलंय तसं - भडकपणा कुठेच नाही. 'ऐ वतन' गाणं अजूनही गुणगुणावसं वाटतं असं आहे. तेजीच्या कपाळावर सिंदूर दाखवण्याचे कारण हे की ती हिंदू आहे (इथे पहिली ओळ).

In reply to by रुपी

जेम्स वांड Tue, 06/12/2018 - 12:29
हा नेक्स्ट

राजकुमार राव

ठरावा!. (होय आमच्यालेखी राजकुमार राव तितक्या उंचीवर पोचलेला अन 'अभिनय जाणणारा' कलावंत आहेच) रावचं टॅलेंट दाखवणारा हा एक मजेशीर विडिओ, एकच ओळ कित्येक वेगवेगळ्या भावनांत गुंफून पेश-ए-खिदमत करणारा हा कलाकार बॉलीवूड मधील टॅलेंटचा एक महत्वपूर्ण दीपस्तंभ आहे असे वाटते.