दैव जाणिले कुणी (आमच्या बोटीवर झालेल्या हल्ल्याची हकीकत)
१२ डिसेंबर १९८८. आमची बोट ‘जग विवेक’ हजारो टन गहू घेऊन व्हॅन्कूव्हर (कॅनडा) हून सिंगापूरमार्गे भारताकडे येत होती. जगांतल्या सगळ्यात मोठ्या, पॅसिफिक महासागराच्या मधोमध होतो. अमेरिकेच्या ‘हवाई’ बेटांपासून दोनशे मैल दूर. शांत समुद्र, निरभ्र आकाश. बोट बंदरात असताना कितीही महाकाय दिसली तरी समुद्रात ती एखाद्या छोट्याश्या खेळण्यासारखीच असते. बोटीवरच्या आयुष्याची मजा काही औरच. जेव्हां वातावरण शांत असतं तेव्हां अंधार पडल्यावर डेकवर आरामखुर्ची टाकून आकाशाकडे पाहात पहुडणं म्हणजे पर्वणीच ! राजा-महाराजांच्या देखील नशिबात नाही अशी स्वच्छ हवा अन् नीरव शांतता.