Skip to main content

चाळीतील आठवणी .....

लेखक भिंगरी यांनी सोमवार, 13/07/2015 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीतील आठवणी ..... भाग १ला मुंबईपासून दूर ठाणे जिल्ह्यात डोंगराच्या कुशीत घनदाट जंगलात बी एम सी ची एक वसाहत होती. छोटेसे आटपाटनगरच होते ते, जेथे शाळा, मैदान,कल्याण केंद्र,वाचनालय ,शाळेची गाडी सगळ्या सोयी होत्या. कल्याणकेंद्रात कॅरम,बुद्धिबळ,टे.टेनिस,व्हॉलिबॉल,क्रिकेट,रिंग,उडीच्या दोऱ्या इ खेळ खेळायला मिळत. महिलांना शिवणकाम,भरतकाम,हस्तकला शिकवले जायचे. या वसाहतीत एक भली मोठी आंबराई होती ज्यात नारंगी,केशरी,खोबरी,आमटी (आंबट),साखरी,ढेकणी,बिट्टी,काळा, बाटली,. अशी नावाप्रमाणे चव ,वास,रंग व आकार असलेली अनेक आंब्याची झाडे होती.पेरू जांभळे,काजू केळी यांची झाडेही होती . वसाहतीच्या बाहेर जंगलात बोर करवंद अस्वंद,धामणे,भोकरे इ रानमेवाही मुबलक मिळत असे. १०० एक कुटुंबे ह्या वसाहतीत होती. आंब्यांच्या जातीप्रमाणे येथे विविध प्रकारच्या जातीचे, धर्माचे लोक रहात होते. एक छोटा भारतच होता तो. अशा चाळीत माझे बालपण गेले.अगदी साधे जीवन होते ते. कोणत्याही प्रकारची जीवघेणी स्पर्धा नव्हती, आपलेपणा होता. घराचे दरवाजे खिडक्या सताड उघडे असायचे,खुल्या मनाचे प्रतिकच होते जणू,प्रायवसीचे नखरे नव्हते. संभाषणाची भाषा फक्त मराठी होती भले तो कोणत्याही जातीचा धर्माचा का असेना. तेव्हा मला त्यात विशेष असे वाटत नव्हते. परंतु आता विचार केला तर आश्चर्य वाटते कि गौडर,जोस ,शेख,वासवानी ,शहा हे चुकनही आमच्याशी हिंदीत बोलत नसत, आता हे शक्य आहे का? असे विचार माझ्या मनात खरे तर यायला नको ,परंतु चाळ सोडली आणि शहरातल्या संस्कृतीने हळूहळू माझ्यातील चाळ संस्कृतीचे संस्कार पुसायला सुरुवात केली. परंतु चाळीतल्या आठवणी अजूनही शाबूत आहे क्रमश:
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7535
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

वैतरणा ( मोडकसागर )वसाहत ? १ -३ एप्रिल ७८ साली तिथे तीन दिवस राहिलो होतो १५रु देऊन .वैतरणाचं आख्ख रान फिरलो.मी आणि माझा मित्र दोघंच होतो सर्व गेस्ट हाऊस रिकामंच होतं

In reply to by कंजूस

नाही.वैतरणा नाही भिवंडी आणि पडघा याच्या मध्यॆ आहे ही वसाहत या वसाहतीला पाईप लाइन, आग्रारोड अशा नावाने ओळखले जाते. मात्र वैतरणा येथे माझा जन्म झाला आहे.आणि पुढील लेखमालेत तानसा,वैतरणा यांचा उल्लेख होणारच आहे.

सुरुवात.. थोडे मोठे भाग येऊद्यात. सलग ८ वर्षे चाळ अनुभवलेला चाळकरी नाखुस

आता विचार केला तर आश्चर्य वाटते कि गौडर,जोस ,शेख,वासवानी ,शहा हे चुकनही आमच्याशी हिंदीत बोलत नसत, आता हे शक्य आहे का
हे मात्र खरे. यापैकी बरेच जणांना मराठी येत असते. पण बोलायची इच्छा नसते. आजकाल तर फारच झालाय हा प्रकार. जो दुकान चालवतो त्याल पण केवढी घमेंड! मराठी अजिबात न समजल्यासारखी करतात. मी मुद्दाम मराठी बोलत राहतो. मग त्याला समजून ग्यावंच लागतं.

पुभाप्र!!
गौडर,जोस ,शेख,वासवानी ,शहा हे चुकनही आमच्याशी हिंदीत बोलत नसत, आता हे शक्य आहे का?
आता हे शक्य नाही कारण आडनांव बघून आपणच हिंदीत सुरु होतो. सिक्वेरा, पठाण, बागवान आडनावं असलेले आपल्या इतकंच शुद्ध मराठी बोलताना ऐकले आहेत. आपणच वेगळ्या भाषेत सुरु झाल्यावर समोरचा मराठीत बोलेल अशी अपेक्षा का करावी बरं?

धन्यवाद सगळ्यांच्या शुभेच्छा पाहून लिहिण्याचा उत्साह वाढला आहे. पुढील भाग नक्कीच मोठे असतील.

वसाहतींचे विश्व हे एक वेगळेच विश्व असते. वसाहतीलगतच्या परिसराशी त्याचा संबंध असतोही आणि नसतोही. बालपणीचा एक मोठा कालखंड अशा एका मोठ्या वसाहतीत काढला आहे. त्यामुळे वाचायला मजा येतेय. पण हा भाग खूपच त्रोटक वाटला. पुभाप्र.

चाळींच्या आठवणी कितीही रम्य असल्या तरी १० बाय १५ च्या खोलीत आईबाप, भावंडे बाहेर हॉलमधे झोपणार आणि नवीन लग्न झालेले जोडपे केवळ मधे एक पडदा टाकून किचनच्या खोलीमधे अंधारात घाईघाईने शरीरधर्म उरकणार. अशी अनेक दांपत्ये होरपळली आहे आणि म्हणुन दादर, गिरगाव सोडून लांब उपनगरात पळाली आहेत हे वास्तव कटू असले तरी पचवायलाच पाहिजे. त्यामुळे प्रायव्हसी हवी हा नखरा नाही तर एक गरज आहे एवढेच. बाकी चाळीतच वयाची सुरुवातीची २५ वर्षे काढल्यामुळे इतर भावनांशी सहमत.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराज मुटके इथे प्रायव्हसी हा शब्द 'त्या' अर्थाने नाही तर कोणीही कोणाच्याही घरी कधीही जाऊ शकत असे या अर्थाने आहे. आता परिस्थिती बदलली आहे. आता कोणाकडेही जाताना फोन करूनच जावे लागते. अगदी जवळ राहत असले तरी.अर्थात त्याला हल्लीचे धावपळीचे जीवनमान कारणीभूत आहे.याबद्दल शंका नाही .पण त्यामुळेच आधीच्या त्या सुंदर जीवनाची आठवण येते.

In reply to by धर्मराजमुटके

नवीन लग्न झालेल्या मामामामीला असेच एका पडद्याआड झोपावे लागलेले नाईलाजाने पाहिले आहे. तुमचे म्हणणे अगदी खरे आहे.

In reply to by धर्मराजमुटके

आपण यांचे प्रश्न सोडवू शकत नाही त्यामुळे काही अगत्याचे नसलेले विषय टाळून गंमतीदार भाग पांढयरावर काळे करावा या मताचा मी आहे.पुलंनी हेच केले.

धर्मराजमुटके +++१ मला चाळ हि संकल्पनाच सहन होत नाही … नशिबाने बालपण गोरेगाव मध्ये फळात मध्ये गेल्याने आणि त्यात पण भावाबरोबर स्वताची छोटी का होई ना खोली असल्याने चाळीतील व्यक्ती स्वान्त्नत्र्याचा संकोच - मी कल्पना करू शकत नहि. काही इतिहासातील घोष्टी संपल्या तेच बरे

छान लिहिताय, पुभाप्र पण थोडे मोठे भाग येऊ द्यात. (एकदम टाइप करणं जमत नसेल वेळेअभावी किवा इतर कारणांअभावी तर लिहिलेलं मॅटर तुम्ही स्वतःला व्य नि करुन ठेवा किवा जीमेल ला मेल करून ठेवा आणि पुरेसा मोठा लेख झाला की प्रकाशित करा..) स्वाती

छान लिहिताय, पुढील लेखनास शुभेच्छा , भिवंडी आणी पडघाच्या मधला भाग म्हणजे तुम्ही सेंट्रल लाईनच्या वैतरणा बद्द्ल बोलत आहात. मला वेस्टर्न लाईन ला असलेली वैतरणा माहीतीये.

नाही जांबिवली डिवीजन,बी एम सी पाणी पुरवठा विभाग.

वैतरणा नदी त्र्यंबकेश्वर ते कसारा डोंगर रांगेतून वाहत येते आणि वेस्टर्नलाइन वरच्या वैतरणा स्टेशनजवळून ती पुढे आठ किमीवर समुद्राला मिळते.याच नदीवर तीन धरणे आहेत.खाली पडघ्याजवळही कॅालनी आहे.मोडकसागर(वैतरणा)धरण ठाणे जिल्ह्यात असले तरी मालकी मुंबई महापालिकेची आहे.

येऊ द्या अजून! चाळीतल्या अडचणी वगैरे खरेच आहे, पण तुमच्या बालपणच्या आठवणी आहेत. तुमच्यासाठी ठेवा आहे तो. लिहा तब्बेतीत. शिवाय मिपाचे बहुसंख्य वाचक त्यानंतर बर्‍याच वर्षांनी जन्मलेले असल्याने थोडा आधीचा काळही त्यांना अनुभवता येईल.

लिहा.

मस्त लिहिलंय पुढील भागाच्या प्रतीक्षेत