
तो विशाल अनंत सागरासारखा.. धीर गंभीर, अनेक वादळे आत सामावून घेणारा,
ती अवखळ मुग्ध कलिका, कधी ह्या कधी त्या भ्रमराला झुलवणारी,
तो गड किल्ले, डोंगर लेणी पालथे घालणारा, रान वाटा धुंडाळणारा भटका प्रवासी,
ती कोमल, खट्याळ चंचला, क्षणभरासाठीही एका ठिकाणी न रमणारी,
एकमेकांत काहीही साम्य नसलेले, दोन टोकांना असलेले दोघेजण.
दोघांचीही आयुष्यं आपाआपल्या मार्गाने सुरळीत चालली होती, जवळ सारं काही.. तरी काहीतरी कमी होतं,
एक अपूर्णत्व दोघांनाही सतत जाणवत, छळत होतं.
'
वाट होते जरी तुझी माझी वेगळी,
सोबतीची तरी आस सांग का लागली,
जीव तुटतो का असा रे.. सांग ना
तुझ्याविना, तुझ्याविना..'
आग आणि पाण्याचा संगम कसा व्हावा, विरूध्द स्वभावी अशा दोघांची भेट तरी का आणि कशी व्हावी...
मात्र विधीलिखित असलेले टळते थोडीच, त्याप्रमाणे त्या आभासी जगात त्यांची अप्रत्यक्ष का होईना गाठ पडली,
मनाची मनाला खूण पटली.. जीव जीवा फसला.
तिला प्रत्यक्ष न पाहताही, केवळ तिच्या अनुभूतीने तो तिच्या प्रेमात पडला..
'
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले,
ना कळे, कधी कुठे मन वेडे गुंतले..'
जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला तीच ती दिसू लागली होती. जिथे जिथे ती, तिथे तो असणार हे जणू ठरून गेलं होतं,
काही ना काही बोलून तिच्या खोड्या काढण्यात त्याला मोठा आनंद वाटायचा..
तिच्यावाचून अगदीच कुठेही जीव लागेनासा झाला होता त्याचा.
'
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू ..'
आधीचा रांगडा, कणखर गडी आता हळूवार, हळवा बनत चालला होता, त्याच्यात होत असलेले अलवार बदल त्याच्या सख्या सोबत्यांनाही जाणवू लागले होते. त्यावरून चिडवचिडवी सुरू झाली होती, थट्टा-मस्करीला उधाण आलं होतं.
'
कोण होतास तू,
काय झालास तू
अरे वेड्या कसा
वाया गेलास तू..'
तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती.
इतर कोणी जरा काही बोललं, वाकड्यात गेलं तर जशास तसे करणारी ती, त्याच्यासमोर मात्र निरूत्तर व्हायची.
त्याचे ते पिच्छा पुरवणे कुठे ना कुठे तिलाही आवडत होते, त्याच्या बोलण्याने, चिडवण्याने तीही अंतर्बाह्य मोहरून जात होती.
'
गडी अंगानं उभा नि आडवा,
त्याच्या रूपात गावरान गोडवा,
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा,
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामंदी ठसला..'
आधी बळेबळे त्यास विरोध करणारी, लटका राग दाखवणारी ती हळूहळू आतून विरघळू लागली होती. तो दिसला नाही तर हिरमुसून जात होती, त्याच्यावाचून जराही करमेनासे व्हायचे तिला, एक एक क्षण जणू युगासारखा वाटायचा.
'
अंगात माझिया भिनलाय ढोलिया,
मी भिंगरभिवरी त्याची गो माल्हन झाली,
मी बाजिंदी, मनमानी, बाई फुलांत न्हाली..'
त्याच्या प्रेमासमोर तिनेही हार मानली होती, आपण त्याच्याशिवाय अजिबातच राहू शकत नाही हे आता तिला कळून चुकले होते. सारी लाज काज बाजूस ठेऊन त्याच्या प्रेमास प्रतिसाद देण्याचे तिने ठरवून टाकले होते, लोक काय म्हणतील, कुणाला काय वाटेल याची आता तिला जराही पर्वा राहिली नव्हती,
'
बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती ग,
बाई जडली आता दोन जिवांची प्रीती ग..'
अखेर अशाच एका हळव्या कातर क्षणी, त्याच्या आठवणीने तिचे मन सैरभैर झाले, जीवाला चैन पडेनासे झाले.
मनातील काहूर अनावर झाले अन तिने अंतःकरणापासून त्याला साद घातली,
'प्रचू डार्लिंग !!'
अन चिरंतनापासून आसावल्या जीवाची शिवाशी भेट घडण्याची.. एकमेकांसाठीच बनलेले दोन जीव एकत्र येण्याची वेळ झाली..
क्षणात आभाळ भरून आलं.. भर ग्रीष्मातही ढग दाटून आले.. जणू सृष्टीचा कायापालट झाला.. झिम्माड पाऊस पडू लागला.. रानात मोर थुईथुई नाचू लागले.. सारं कसं हिरवं हिरवं गार होऊन गेलं.. लांब कुठेतरी डोंगरावर राऊळात घंटानाद सुरू झाला.. त्यांच्या या उत्कट प्रेमाविष्काराचा आनंद साजरा करण्यासाठी धरणी, आकाश सारे एकत्र आले.
'
बदलुन गेलया सारं,
पिरतीचं सुटलया वारं,
अल्लड भांबावयाला,
बिल्लोरी पाखरू न्यारं,
आलं मनातलं ह्या व्हटामंदी,
अन मनासंगं मन जुळलं जी..'
.............................................................................................

.............................................................................................
क्रमश:
* कथेस आधीचे संदर्भ, पार्श्वभूमी आहे. अधिक माहिती हवी असल्यास लोकांनी ती खोदकाम करून मिळवावी ही विनंती.
** प्रेमकहाणीस आता कुठे सुरूवात झाली आहे, पुढे यात अनेक वळणे येऊ शकतील, काहीही घडू शकेल,
कथेचा शेवट गोड होईल की दोन प्रेमींच्या मिलनात पुढे अडचणी येतील.. काहीच सांगता येत नाही.
मात्र या पुढील कहाणीचा वाचक आपआपल्या परिने, इच्छेने, आवडीने अंदाज लावू शकतात.
अद्यापि अपूर्ण कथेत आपल्या कल्पनेने विविध रंग भरून हे प्रेमचित्र पूर्ण करू शकतात.
.............................................................................................