मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाग २ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

मन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मागील अंकाचा दुवा:- http://www.misalpav.com/node/25982 तिथून पुढची कथा आता देतोय. हा भाग २ आहे नोटः- जवळपास निम्म्या जगात मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सध्याच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.) . इस ६५० पर्यंत आपण मागच्या वेळेस पाहिलं. त्यानंतर दीडेक्शे वर्षे हळूहळू अरबी सत्तेने आपली पकड सर्वत्र घट्ट करत नेली. जिथे तिथे अरबी संस्कृतीचा प्रसार प्रचार सुरु झाला. आधीच्या गोष्टी जम्तील तितक्या पुसून टाकण्याचा प्रयत्न सुरु झाला. दूरदूरच्या गावांत आता सत्तेचे मजबूत जाळे पोचले होते. आधीची लिपी नष्ट होत आली होती. भाषा बदलत चालली होती. वर्णसंकर वाढत होता. तशातच उमय्याद खिलाफत जाउन अब्बसिद खिलाफत सत्तेवर आली होती.पण एकूण पगडा अजूनही बराचसा अरबीच होता. पारशी साम्राज्य नष्ट झाल्यावर अनेक पारशी सामंत, पारशी मांडलिक व तुर्क अ‍ॅलिज् ह्यांनी अरबी सत्ता मान्य केली होती. ह्यांच्याच आश्रयाने अरबपूर्व संस्कृती थोडाफार श्वास टिकवून होती.पण एकएक करुन त्यांची ती दुबळी संस्थाने संपवत उरला सुरला पारशी प्रभाव संपवला जात होता. . . बाबक ची राणा प्रतापाशी तुलना इतक्याचसाठी की आसपासच्या सर्वच सत्ता एकापाठोपाठ एक मोथ्या साम्राज्याच्या छायेत जात असताना राणा प्रतापानं इवलसं राज्य स्वतंत्र ठेवलं होतं. त्याची जबरदस्त किंमतही दिली. भलेही त्याच्यानंतर हे राज्य स्वतंत्र म्हणून टिकलं नसेल. तर हा बाबक खुर्रामुद्दिन; हा पारशी लोकांचा राणा प्रताप म्हणता यावा. . . अझरबैजान ह्या देशातला. हा देश म्हणजे विसाव्या शतकात ussr चा भाग होता. इराणी पठारालगतचा हा देश. इराणी पठार आणि प्रत्यक्ष इराण देश ह्यात गल्लत करु नये. इराण हा देश इराणी पठाराचा केवळ एक भाग आहे. इराणच्या आसपासचे कैक देश इराणी पठारात मोडतात. त्सिसिफोन ह्या गतवैभवी , एकेकाळच्या साम्राज्याची राजधानी असलेल्या शहरातील तेलाचे एक मोठे व्यापारी म्हणजे बाबकचे वडील. हे शहर आजच्या बगदादपासून तीस्-चाळिस किमीवर असावं. ते वायव्य (उत्तर्-पश्चिम ) इराणच्या मयमध जिल्ह्याच्या ठिकाणी येउन राहिले. तिथेच त्यांनी विवाह केला. त्यांना तीन मुले झाली.बाबक सर्वात ज्येष्ठ. तो पुरता अठरा वर्षांचा होइपर्यंतच वडीलांचे निधन झाले. व घरची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावर आली. परंपरेने त्याला व्यापराचा अनुभव होताच. आता त्याने शस्त्र व्यापारही सुरु केला. ह्या निमित्तानं त्याचं अरब जगतात, मध्य पूर्व आशियात फिरणं झालं. रशियाच्या आसपासचा कॉकेशस पर्वताचा भाग नि एकेकाळचं बलाढ्य पण आता जडत्व येउ लागलेलं बायझेंटिअन साम्राज्यही त्यानं पाहिलं. हे बायझेंटिअन साम्राज्य म्हणजे रोमन साम्राज्याचीच एक शाखा. पश्चिम आशिया नि पूर्व युरोप ह्यातील रोमन भागावर सत्ता ह्यांची होती. इस ७५५ मध्ये अबु मुस्लिम ह्याचा खून झाला. ह्या अबु मुस्लिम ह्यानं खरं तर उमय्याद खलिफांना हटवून अब्बासिद सत्ता आणण्यास मदत केली होती. पण राजाज्ञेवरून त्याला मारण्यात आलं. हा काळ लक्षात घ्या. इराणचे अरबीकरण आणि पर्यायाने इस्लामीकरण झपाट्याने सुरु होते. पूर्वीच्या इराणी साम्राज्यावर सर्वत्र अरबी साम्राज्यानं विजय मिळवला होता. सत्ता अधिकृत मानलेला धर्म आपोआप झपाट्याने पसरतो, कधी सत्तेच्या लोभाने काही स्थानिक स्वतःहून तो धर्म स्वीकारत सत्तेच्या पायर्‍या चढायचा प्रयत्न करतात; तर कधी बळजबरीही होते. ह्याच इतरत्र आलेल्या अनुभवाम्नुसार तिथेही सुरु होते. पारशी लोक खुद्द पर्शियन साम्राज्याच्या भूमीवर अल्पसंख्य बनले होते. शिल्लक राहिलेल्यांतीलही कित्येक झपाट्याने धर्म बदलत होते.खुद्द राजसत्ता निरंकुश म्हणता यावी अशी होती. अशावेळी मुख्य शब्द चाले तो अरब मंडळिंचा . त्यानंतर अरब हीन समजत असले तरी त्यातल्या त्यात गैर्-अरब मुस्लिमांना प्रशासनात स्थान देत.गैर मुस्लिम मंडळिंची पंचाइतच असे. पण तरीही कित्येक गैर मुस्लिम घराणी शिल्लक होती. त्यातली कित्येक अजूनही प्रभावशाली होती. कुणी व्यापारामुळे आपली ताकद राखून होते.कुणी उत्तम संपर्क राखून होते सत्ताधार्‍अयंशी आणि इतर परकियांशीही आणि कुणी विद्वान होते. इस्लाम पूर्व कालातील नासधूस होण्यापूर्वीचे काही अंशाने का असेना शिल्लक राहिलेले ज्ञान, कला ह्यांच्याकडे होती. तर अशा गैर मुस्लिमांबद्दल अबु मुस्लिम ह्या राजमंडळातील प्रभावशाली व्यक्तिची भूमिका मवाळ होती.(पाकिस्तानमध्ये आता हिंदू म्हटल्यावर "चलाख बनिया" अशीच इमेज आहे. कारण सरळ आहे. व्यापारी वर्गाने फार कुणाला न दुखावता स्वतःपुरता स्वतःचा धर्म टिकवला. तो टिकवण्याइतपत पैसा असलेला वर्गच हिंदु म्हणून टिकला. इतरांना धर्मांतर करणे भाग पडले/पाडले गेले किंवा संपवण्यात आले. कधी हाकलून दिले गेले तर कधी जिवे मारले गेले. एकुणात काय, मूळ धर्मातील शिल्लक राहणारे लोक हे सहसा पैसेवाले आणि उत्तम संपर्क मेन्टेन करु शकणारे चतुर वृत्तीचे लोकच असतात. असो. ) तो त्यांच्यात लोकप्रिय होता. पण बहुदा हेच काहींच्या डोळ्यात सलत असल्याने त्याचा काटा काढण्यात आला. आपला हितचिंतक मारला गेलाय, परिस्थिती प्रतिकूल होत चाललेली बघून साम्राज्यातील कित्येक भागात उठाव सुरु झाले. बंडे झाली. कित्येक दशके ती सुरु राहिली.ह्या घडामोडींकडे अर्थातच शस्त्रांच्या व्यापार्‍याचे, बाबक चे लक्ष जाणार. ते तसे गेलेच.व खुर्रामी चळवळीत तो सामील झाला. जविदान शहराक हा त्याचा गुरु.त्याच्याच तालमीत बाबक इतिहास, युद्धनीती, शस्त्रकौशल्य आदी शिकला.इस ८१६ ला जविदान मृत्यू पावल्यावर चळवलीची सूत्रे बाबककडे आली. आता त्याने खलिफाविरुद्ध उघड संघर्ष करायचे ठरवले. फौजफाटा उभारुन झटपट मोक्याच्या जागा काबीज केल्या. वायव्य इराण मधील उम्चावरील कित्येक किल्ले घेणे स्थानिकांना सोपे होते(शिवकाळातील तोरणा- पुरंदर ह्यांची आठवण होते. ) ते त्यांनी घेतले. आपण धडाक्यानं उघडलेल्या मोहिमेत लोकांना सामील होण्याचे आवाहन तो करु लागला. ह्यापूर्वीही असे उठाव झाले होते. मोठे साम्राज्य एका झटक्यात जिंकले, तरी त्याच्या गौरवशाली स्मृती लागलिच जात नाहित. त्यामुळे ह्यापूर्वीही उठाव झाले होतेच. पण त्यातला कुठलाच बाबकच्या उठावाइतका यशस्वी नव्हता; वीस्स पंचवीस वर्षे यशस्वी, स्वतंत्र सत्ता ह्यापूर्वी उमय्याद किंवा अब्बासिद खलिफांसमोर कुणी उभी करु शकले नव्हते. ८१६ मध्ये त्यानं स्वतःचं स्वतंत्र शासन सुरु केलं. याह्या इब्न मुआध ह्यास खलिफानं बाबकला चिरडण्यास पाठवलं. पण तो अपेशी ठरला. दोनच वर्षांनी इसा इब्न मुहम्मद इब्न अबु खालिद ह्याचाही सडकून पराभव ह्या न्वजात राज्यानं केला.आता मात्र खलिफाला ह्या प्रकरणाचं गांभीर्य जाणवलं असावं. इस ८२४ मध्ये बरीच फौज देउन त्यानं अहमद इब्न अल जुनैद ह्या मातब्बर सेनापतीस रवाना केलं. तोही पराभूत झला. कैद झाला. मुहम्म्द इब्न हुमेद तुस्सी ह्याला ८२७ ला बाबकविरुद्ध पाठवण्यात आलं. त्यानं प्रथमच मर्यादित प्रमाणात यश मिळवलं. चकमकी जिंकला. पण बाबक त्याच्या हाताला लागला नाही. त्यानं मोहिम सुरुच ठेवली. ही मोहिम दोनेक वर्षे चालली. इस८२९ मध्ये बाबकनं एका लढाईत त्याचा निर्णायक पराभव केला. तो मारला गेला. त्याच्या सैन्याची धूळधाण उडाली.अब्बासिद साम्राज्य ह्याच वेळी इतर राज्याशींही युद्धमान होतं. तशात ह्या आघाडीवर सपाटून मार खावा लागल्यानं पुढील सहा सात वर्ष त्यांनी काहिच हालचाल केली नाही. इस ८३६ ला अफशिन ह्या दिग्गज, मुत्सद्दी सरदाराची अजून एक प्रयत्न म्हणून रवानगी करण्यात आली. त्यानं काळजीपूर्वक रसद पुरवठा व संपर्क यंत्रणा मजबूत करण्यावर प्रथम भर दिला. त्याचा रसद पुरवठा तोडण्याचा बाबक ने वारंवार प्रयत्न केला. क्वचित यशही मिळवले. पुढील वर्षी अफशिनच्या सहकारी बुघा अल कबिर ह्यास परास्त केले. खलिफा अल मुतासिम ह्याने तहाची तयारी असल्याचे कळवण्यास अफशिनला सांगितले. बाबकला अभयदानही देण्याचे आश्वासन दिले. पण उपयोग झाला नाही. त्याने लढा सुरुच ठेवला. सातत्याने लधत राहून त्याच्या राज्यकोशावरही ताण पडला असावा. त्यातच त्याचे महत्वाचे शहर बद्द हे ही अफशानच्या हाती लागले. तिथे बाबकचा पराभव झाला. तो साहेल इब्न सुन्बात ह्या लगतच्या राजाच्या नियंत्रणाखालील प्रदेशात निघून गेला. हा साहेल इब्न सुन्बात तोच आर्मेनियन राजा होय ज्याने सुरुवातीस बाबकचे साह्य घेउन स्वतःचा आसपासच्या टापूवरील प्रभाव वाढता ठेवला व खलिफाविरुद्ध उपद्व्याप केले होते. पण इथेच गणित चुकले. बाबक ला एकेकाळच्या सहकार्‍याने, साहेल इब्न सुन्बातने बंदी बनवले. मोठी रक्कम घेउन अफशान ह्या सरदराच्या ताब्यात दिले."तुला काहीही होउ देणार नाही. फक्त शांती तह करुयात."असे आश्वासन देणार्‍या अफशानने आपल्या मालकाच्या, खलिफाच्या ताब्यात बाबक ला दिले. बाबकचे हातपाय तोडून हाल हाल करुन मारण्यात आले. त्याची वीसेक वर्षांची कारकीर्द अशी संपुष्टात आली. तो एक दंतकथा बनला. --मनोबा

वाचन 9810 प्रतिक्रिया 37