गुरुंजींचे भावं विश्व! भाग-३
लेखनप्रकार
गुरुंजींचे भावविश्व! भाग २-http://www.misalpav.com/node/25318 ... पुढे ...
हा सवाल-जबाब टाकलेला आमचा कोल्हापुरी मित्र वाणीनी तिखट असला,तरी मनानी अगदी लोण्यासारखा मऊ आहे.एकदा बाहेरगावी एका "अठवडी" कामाला गेलो असतांना,रात्रीचं जेवण झाल्यावर सोबतीनं तंबाखू मळता मळता मला एक मजेशीर प्रश्न विचारून गेला , "आत्म्या.. हा आपला धंदा आणी ह्यातली ही आपल्यासारखी मानसं..कोणच्या पन क्षेत्रात गेली,तरी अशीच हिट'ला जातील का रं !? " तेंव्हा मला ख्या...क्कन हसू आलं.आणी त्यानंतर आमच्यात "जे" काहि गुफ्त्गू झालं ते इथे पेश करतो....
पौरोहित्य ही एक अशी कला आहे,की या क्षेत्रात पारंगत झालेला माणूस कोणताही व्यवसाय उत्तमरित्या करू शकतो.
कसे ते पहा...!१) हजामतः- गुरुजी लोकांना आपल्या सहकारी गुरुजी लोकांची करावी लागते,व तेच सहकारी पुढे मोठ्ठे झाल्यावर त्यांच्याकडून आपलीही करवून घेण्याचे मानसीक सहकार्य करावे लागते. गुरुजी लोकांच्यातला हा एक अत्यंत लाडका खेळ आहे. (बा आत्म्या तुझे व्यवसायबंधू हा लेख एक दिवस वाचणार,आणी वस्तर्यापेक्षाही धारधार,अशी जीभ घेऊन तुझ्यामागे लागणार... तेंव्हा तयारीत रहा! ) २)बांधकाम क्षेत्रः-एखाद्या यजमानाच्या घरी प्रत्येक पौर्णिमेला एक सत्यनारायण, या मानानी वर्षभरात १२मजली इमारत (गच्ची व तळमजल्यासह) बांधून देणे,तिथूनच अश्या अनेक इमारतींचं कंत्राट सांधून घेणे. व जो जास्तीत जास्त कंत्राटं कमीतकमी वेळात सांधून घेत असेल,तो गुरूजी मुळचा MH-01 ते MH-04 या विभागातला आहे,हे अंदाजाने ओळखणे! व या बाबतीत आपाण MH-12'चेच आहोत हे सिद्ध करणे! पुण्याचा भामटा व मुंबईचा मवाली ही म्हण साफ खोटी आहे.आणी केवळ खोटी नसून चक्क उलट रचलेली आहे.भामटे हे ठकविण्यासाठीच असतात.आणी मुंबई हे जगत् ,संपूर्ण जगताला ठकविण्यासाठी समर्थ आहे! (आत्मू..आत्मू..जल्ला-मेला तू येमेच झिरो सहात'ला ना? .. मग तुजा ताशा वाजन्याआंधी,गुंडाळ गाशा आणी पळ बगू तिकडे! =)) ) ३)नाट्यक्षेत्र:- हे तर गुरुजी लोकांचं तीर्थक्षेत्रच आहे.संगीत नाटकं,काहि नुसती,काही अभिनयासहीत..काही रहित,काही विनोदी नाटकं,तर काहिंच्या बाबतीत पाहिल्यानंतर, ते नाटक हाच एक मोठ्ठा विनोद! अशी या क्षेत्रातली अनेक तीर्थ गुरुजीलोक परंपरेनी घेत आलेली आहेत.त्यातल्या त्यात संगीत नाटकांना,कुठल्याही प्रकारची नाटकं न करता,दिवसभर होते त्याच धोतरछाप वेशात किंवा आवेशात आलेले दिसतील. . . . . . . . इथेच अभिनयाचं दृक-श्राव्य शिक्षण घेऊन त्याचे पडसाद यजमान गृही उमटवले जातात! आणी बरोबरच आहे हो. अहो शेवटी कला म्हटली की नाट्य आलच.फक्त नाटक नाटकासारखं करावं,,,नाटकं करत करू नये! हे पथ्य सांभाळावं,म्हणजे झालं. ४) कल्हई:- ही काही यजमान गुरुजींच्या डोक्याला लावतात.आणी चकाकी भासमान झाली..की,गुरुजींन्नाही डोकं असतं का??? या विचारानी ते अंतर्मुख होतात.त्यांचं ते मुखं पाहून,प्रसंग ओढवलेल्या गुरुजींना हा व्यवसाय सोडून तो व्यवसाय उप योगाचा वाटू लागतो.परंतू त्यांना लागलेली कल्हई त्यांन्नाच समजते,लावणार्याला नाही.. हे पाहून ते गुर्जी स्वतःच अंतर्मुख होतात.आणी व्यवसाय निवडीच्या बाबतीत आपण चुकलो नाही,या आनंदात घरी जातात. (व्यवसाय कुठलाही म्हटला की अडचणी यायच्याच. पण आमच्याही व्यवसायातल्या अडचणी चांगल्या मोठ्ठ्या चणी'च्या असतात,हे कळावं म्हणून हा उपद्व्याप!) ५) उपहारगृहः- शब्द पुणेरी असला,तरी त्यातली मध्यवर्ती द्वय्याक्षरं किंवा अक्षरद्वयी ही अस्सल मराठी असल्यानी कोणत्याही मराठी पुरोहितास हा व्यवसाय उत्तमरित्या करता येऊ शकतो. तुंम्ही म्हणाल,"कश्यावरून?" मग एका हुशार पुरोहितानी तयार केलेलं हे आधुनिक रेट-कार्ड पहा.- धर्मखाद्याचे नाव----आणी त्याचा एकंदर-भाव! १)श्रावण स्पेश्शल-लघुरुद्र(विथ-अष्ट्टोत्तरशत बेल फ्री)---- Rs- ज्या..त्या पुरोहिताच्या मनातले!-(हा मनी'चा-भाव पुढे प्रत्येक पदार्थानंतर कायम समजावा.) २)सत्यनारायण कम मंगळागौर (इन टु डेज स्पेशल)---- ३)वास्तुशांत *साधी (सत्यनारायण-अलग चार्ज!) *पेश्शल (सत्य नारायण फ्री!) *व्हेरी व्हेरी स्पेस्शल ( फ्री विथ सत्य नारायण!) ४)लगीन राइसप्लेट/लगीन थाळी मर्यादीत (इथे त्यांनी अमर्यादीत लगीन थाळीपण ठेवली होती,पण त्यात त्यांचा वेळ,इतका अमर्याद जायला लागला,की शेवट-शेवट त्यांना ,आपण एक दिवस ही थाळी "लावता..लावता" असेच पुरोहितांच्या अमर-यादीत जाऊ असे भय वाटले,व त्यांनी ही थाळी बंद केली.) ५)ज्योतिष-जनित जननशांती मिनी मिल- (यात आपल्याला कोणते नक्षत्र/तिथि/योग/करण "हवे" आहे,ते आधी कळविणे,म्हणजे त्या/त्या मसाल्याची घट्ट अथवा पात्तळ ग्रेव्ही, "गरजेनुसार" बनवता येइल.) ६)(आवर स्पेशालिटी)-श्राद्ध-पक्ष प्लेट/इन टू टाइप्स- अॅट युअर होम-ऑर-ऑन दी घाट ============================ आंम्ही एकमेकाला सांगितलेली ही वरील उदाहरणं ऐकुन आमची कामाला आलेली बाकिची भट ग्यांग त्या दिवशी बेजान हसत हसत निद्राधीन झाली. आणी एका कोपर्यात आमच्या त्याच मित्र मंडळीत आलेले एक जन्मजात तथाकथित गंभीरतावादी इद्वान आमच्याकडे चिडक्या नजरेनी पहात "ह्हूं..." करुन उठले, आणी पुन्हा "काहि अर्थ नाही यांच्यात!" असं काहिसं बोलून परत पहुडले! ही विद्वान नावाची जमात इथेही आहेच! यांच्या जातीला विनोदाचं एव्हढं वावडं का असावं? हा एखाद्या बृहद्ग्रंथाचा विषय व्हावा. आणी हेच लोकं सत्यनारायण तेराव्याच्या गांभीर्यानी आणी तेरावा सत्यनारायणाच्या गांभीर्यानी करताना अढळतात! यांच्या तथाकथित "गंभीर" वृत्तीचा यजमानांच्यावरही परिणाम झालेला अढळून येतो. काहि काहि घरात कामाला गेल्यावर, ते गंभीर वातावरण निवळायला म्हणून..कित्तीही टायमिंग साधून.. (जनरेशन) गॅप मधून(जरी) फटका मारला, तरी आऊटफिल्ड इतकं स्लो झालेलं असतं की शेवट पर्यंत बाऊंड्री जातच नाही.सिक्सही खर्या अर्थानी यांच्या डोक्यावरून जाते. मागे उल्लेखिलेल्या जानवं-अजोबा संवादातले यांच्यापेक्षा बरे वाटू लागतात.तिथे निदान हार-जितिचं तरी वातावरण असतं.आंम्ही हरलो तरी आंम्हाला तिथे आनंदच होइल,पण यांच्याकडे हार-जीत काहिही झालं तरी एकंदर आनंद'च! कार्यक्रमात विनोद असावा,विनोदाचाच कार्यक्रम होऊ नये हे भान राहिलं की झालं! पण ते यांच्या बाबतीत होणे नाही. यांच्या आमच्या कुंडल्याही वेगळ्या आणी ग्रहही! असो..... आणखि एक गमतीदार,चवदार,व लज्जतदार विषय.संपूर्ण विषय ऐकल्यावर ,यातल्या गमती कोणत्या?चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही............. ============================= क्रमशः
वाचन
13679
प्रतिक्रिया
23