पा कृ बनवण्याची पद्धत चकली ब्लॉग वर दिल्या प्रमाणेच केली आहे ..ती पुन्हा इथे कॉपी करून दिली आहे.
फक्त ह्या मिसळ मधे मी बटाटे घातले नाहीत..व सगळे खडे मसाले तेलात परतल्यावर त्यात कांदे,खोबरे व टोमॅटो परतून नंतर बारीक पेस्ट करून तेलावर पुन्हा परतली आहे.
ही आहे लिंक
http://chakali.blogspot.com/2008/01/kolhapuri-misal.html
१ वाटी मटकी
१ बटाटा
तळण्यासाठी तेल
१ कांदा
१ टोमॅटो
गरम मसाला
फरसाण
पोहे कुरमुर्याचा चिवडा
कोथिंबीर
लिंबू
ब्रेडचे स्लाईस
कट बनवण्यासाठी साहित्य :
३-४ लसूण पाकळ्या
१ इंच आले
२-३ मिरी
१ लहान काडी दालचिनी
२-३ लवंगा
१ तमालपत्र
१ चमचा जिरेपूड
१ चमचा धनेपूड
अर्धी वाटी खवलेला ओला नारळ
१ मध्यम कांदा
२ मध्यम टोमॅटो
४-५ लहान चमचे लाल तिखट
फोडणीसाठी तेल
आमसुल किंवा चिंच
मीठ
कृती:
१) मटकी १०-१२ तास कोमट पाण्यात भिजत घालावे. त्यात जर कडक मटकी आणि खडे असतील तर ते काढून टाकावे. सुती कपड्यात बांधून मोड काढावेत.
२) मटकीला मोड आले कि कट बनवून घ्यावा. त्याचवेळी मटकी कूकरमध्ये २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.
३) कट बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, आले, मिर्या, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड,धनेपूड मिक्सरवर जेवढे बारीक होईल तेवढे बारीक करून घ्यावे.
४) कढईत ४-५ चमचे तेल गरम करावे. त्यात मिक्सरमधून काढलेला मसाला घालून खमंग परतावा. मसाल्याचा छान गंध सुटला कि त्यात १ कांद्याच्या आणि २ टोमॅटोच्या मोठ्या फोडी घालून परतत रहावे. सर्वात शेवटी खवलेला नारळ घालून परतावा. मिश्रणाला तेल सुटले आणि कांदा शिजला कि गॅस बंद करून बाजूला काढून थंड करावे. मिश्रण थंड झाले कि त्यात १ भांडे पाणी घालून मिक्सरवर पातळ पेस्ट करून घ्यावी.
५) नंतर मटकीची उसळ बनवून घ्यावी. पातेल्यात २-३ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद घालून शिजवलेली मटकी घालावी. थोडे पाणी घालावे, १-२ चमचा गरम मसाला घालावा. बारीक गॅसवर उसळ उकळत असताना दुसर्या गॅसवर लहान कढईत अगदी थोडे बटाट्याचे तुकडे तळण्यापुरते तेल गरम करावे (साधारण अर्धी वाटी). (बटाटे तळल्यावर ७-८ चमचे तेल उरले कि त्यातच कट बनवता येतो.)
६) १ बटाटा सोलून त्याचे लहान चौकोनी तुकडे करावे, आणि मध्यम आचेवर बटाटे व्यवस्थित तळून घ्यावे, कच्चे राहू देऊ नये. तळलेले बटाट्याचे तुकडे उसळीत टाकावेत. चवीपुरते मिठ घालावे.
७) लहान कढई खालचा गॅस बारीक करून उरलेल्या तेलात हळद, हिंग, ४-५ चमचे लाल तिखट घालून तयार केलेली मसाल्याची पातळ पेस्ट घालावी. मीठ घालावे. आंबटपणासाठी २-३ आमसुल किंवा थोडा चिंचेचा कोळ घालावा. आवश्यकतेनुसार पाणी घालून १ उकळी काढावी.
८) उसळ आणि कट तयार झाला कि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.
९) नंतर डिशमध्ये १ डाव उसळ घालावी. त्यावर १ पळी कट घालावा. त्यावर चिवडा, फरसाण, कांदा, टोमॅटो घालावे. लिंबू पिळून तयार मिसळ स्लाईस ब्रेडबरोबर खावी.
टीप:
१) ओला नारळ उपलब्ध नसेल किसलेला सुका नारळसुद्धा वापरू शकतो.
२) ज्यांना तळलेले बटाटे नको असतील त्यांनी शिजवलेले बटाटे घातले तरी चालते. तळलेले बटाटे उसळीत फुटत नाहीत, शिजलेले बटाटे मिसळीत फुटून मिसळ घट्ट होऊ शकते.
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 2:20 pm | किसन शिंदे
या कोल्हापुरी मिसळीचे अनेकोनेक धन्यवाद ज्यामुळे मला मिसळ्पाव सारखं सुरेख संस्थळ मिळालं.
अवांतर : कोल्हापुरी मिसळीवर स्वाती राजेश यांची एक पाकक्रुती आधीच आलेली आहे.
13 Jun 2011 - 2:21 pm | स्वैर परी
लईच झाक झालीये! :)
अवांतर : मिसळपाव बनवण्याची पाकृ शोधता शोधता आम्ही भरकटत या संकेतस्थळावर आलो आणि इथलेच होउन गेलो! :)
13 Jun 2011 - 2:26 pm | मालोजीराव
+१
आम्हीपण !
13 Jun 2011 - 8:34 pm | स्वरालि
मी पण....भरकटत आले आणी इकडचीच झालेय.....
13 Jun 2011 - 10:36 pm | निवेदिता-ताई
मी ही........
बाकी मिसळ झकास झालेली दिसतिये...एक घास खाल्ला की ठसकाच लागला पाहिजे!!!!
13 Jun 2011 - 2:23 pm | मृत्युन्जय
तर्री कातिल आहे.
13 Jun 2011 - 2:34 pm | वाहीदा
आता नाव सार्थक झाले !
मिसळ ही कोल्हापुरी ची असावी, तिखट , झणझणीत ! तोंडातून जाळ आला पाहीजे.
असो..फोटो पाहून लोकांच्या तोंडातून लाळ येईल हे नक्की
13 Jun 2011 - 2:35 pm | टारझन
पावसाळ्यात मिसळ खाऊ नये शक्यतो . अन्यथा वारंवार पाककृती करावी लागते.
- कापुश
13 Jun 2011 - 5:39 pm | अत्रुप्त आत्मा
कोल्हापुरी ग्रेटच...पण खास तर्रीचा मजा अनुभवायचा असेल तर,पुण्यात मंगला थेटर बाहेर २ गाड्या लागतात...त्यातल्या टोपीवाल्याकाका कडची लई कडक असती...आमी जशे हित,तशेच तिथ बी असतो...
13 Jun 2011 - 9:16 pm | सानिकास्वप्निल
एकदम झण्झणीत दिसतेय...मस्तच :)
ठाण्याच्या मामलेदार मिसळीची आठवण झाली बघा :)
13 Jun 2011 - 10:18 pm | स्वाती२
तर्री एकदम मस्त!
6 Dec 2012 - 5:17 pm | कोल्हापुरवाले
तर्री नहि ओ !!
मिसळ आणि त्याचा "कट" म्हणत्यात कोल्हापुरात
13 Jun 2011 - 10:35 pm | आत्मशून्य
.
14 Jun 2011 - 12:07 am | ५० फक्त
कर्वे रोडला सीड इन्फोटेकच्या हापिसाबाहेर हेमंतकडे जाम भारी असते मिसळ, कधी आणि कोण कोण येताय बोला.
@ पराग, कधि जायचं मंगला समोर बोला.
कॉलिंग चिंतामणी काका, तुम्ही वैद्यांकडं घेउन जाणार होता आम्हाला. काय झालं ओ त्याचं ?
14 Jun 2011 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा
तुम्ही म्हणाल तेंव्हा...फक्त सकाळी ९च्या आत जाण्यात खरी मजा असते...
14 Jun 2011 - 2:31 am | अभिज्ञ
मिसळ खावी ती ठाण्यात मामलेदाराकडेच.
बाकी सगळ्या मिसळ बकवास असतात.
अभिज्ञ.
14 Jun 2011 - 7:43 pm | अतुल पाटील
आयला सहिच... कोल्हापुरातल दिस आटिवल की हो. फडतरे, चोरगे, राजा भाउ, सोलन्कि, रात्री ११ वाजेचे शिवाजी चौकातले म्हशी वाले सगळ सगळ आटिवल. लय भारी राव.
6 Dec 2012 - 4:50 pm | ह भ प
मला ही रेसिपी कशी मिळेल बरं..
मिपाकरहो.. मय मदद माँग रहां हुं..
लिंका डकवा ना पलीज..
6 Dec 2012 - 5:14 pm | कोल्हापुरवाले
तोडाल पानी सुट्ल!! :
6 Dec 2012 - 6:21 pm | शिद
आजचं ठाण्यात मामलेदार मध्ये मिसळ चापून आलोय...त्यावर मस्त थंडगार २ पेले ताक...आहाहाहा...!!!
7 Dec 2012 - 10:07 am | ह भ प
मी आज सकाळी सकाळी माझ्यासारख्या आणखी चार जणांना घेउन 'काटा किर्र'ला मिसळ चेपुन आलोय.. सोबत मठ्ठा.. वॉऊ..
7 Dec 2012 - 11:17 am | अविनाशकुलकर्णी
मिसळ खाल्ली कि तमोगुण वाढतो का?
असे वाचनात आले
8 Dec 2012 - 1:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
रिकामा वेळ बराच आहे तुमच्या कडे, असले काहीतरी वाचायला आणि मग इथे येऊन काड्या सारायला.
8 Dec 2012 - 1:45 pm | सस्नेह
ज्यांचा तमोगुण वाढतो त्यांनी 'मिसळपाव' च्या वाटेला न गेलेले बरे !