http://beftiac.blogspot.com/2010/12/behind-every-crime-there-is-injustic...
काही काळापूर्वी मी शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होतो तेव्हाची गोष्ट. माझ्याकडे येणार्या विद्यार्थ्यांमध्ये सातवीत शिकणारा वरद नावाचा एक चुणचुणीत मुलगा होता. तो अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू असल्याचे माझे निरीक्षण होते. एकदा मात्र इतिहासाचा विषय निघाला असता तो अचानक काही कारणाने उत्तेजित झाला. इंग्रजांनी आपल्यावर अनन्वित अन्याय अत्याचार केले असून तिथे जाऊन आपणही त्यांचा तशाच प्रकारे बदला घेतला पाहिजे. इंग्लंडमध्ये जाळपोळ करून तो देशच नष्ट केला पाहिजे वगैरे, वगैरे. त्याला आधी मी शांत होण्यास सांगितले. नंतर थोड्या वेळाने मी त्याला त्याचे विचार ऐकून मला कुठलाही धक्का बसला नसल्याचे सांगितले. बर्याच वर्षांपूर्वी माझेही असेच काहीसे विचार होते परंतू ते कालांतराने पूर्णत: बदलले असल्याचेही सांगितले. माझ्या विचारांमध्ये असे परिवर्तन नेमके कशामुळे घडून आले हे जाणण्यास वरद उत्सुक होता. त्याला मी हा सारा घटनाक्रम थोडक्यात समजावून सांगितला तो अशा प्रकारे -
मी तिसरीला असताना आम्हाला शालेय अभ्यासक्रमात थोरांची ओळख हे पुस्तक इतिहास या विषयाकरिता होते. या पुस्तकात दादाभाई नौरोजी, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले, जोतिबा फुले, बाळ गंगाधर टिळक, मोहनदास करमचंद गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, चित्तरंजन बोस इत्यादी स्वातंत्र्यपूर्व काळातील नेत्यांची सचित्र माहिती नमूद केलेली होती. बहुतेक पाठांमध्ये इंग्रजांनी भारतीयांवर केलेल्या जुलूम, अत्याचारांचे अंगावर शहारे आणणारे वर्णन होते. विशेषत: लाला लजपतराय यांनी सायमन कमिशनचा काळे ध्वज दाखवून आणि सायमन गो बॅक अशा घोषणा देऊन निषेध केला होता तेव्हा त्यांना इंग्रजांनी छातीवर दंडुक्यांनी मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा अंत झाला वगैरे वाचून तर मी फारच अस्वस्थ झालो. तेव्हा रात्र रात्र मला झोप येत नसे. इंग्लंड अतिशय क्रूर, दुष्ट लोकांचा देश आहे. कुठल्याही प्रकारे त्या देशात घुसून तेथील वीजवाहक तारांना आगी लावून तो देश नष्ट केला पाहिजे (वीजवाहक तारांना आग लागल्यास ती आग जिथे जिथे तारा पोचल्या आहेत अशा सर्व ठिकाणी फार वेगाने पसरते इतपत सामान्य ज्ञान मला त्या वयात होते) वगैरे विचारांनी मी अतिशय तळमळत असे. एकतर असे काही करणे मला तेव्हा (आणि आजदेखील) अजिबात शक्य नव्हते. शिवाय हे असे स्फोटक (?) विचार कुणाला बोलून दाखवायची देखील सोय नव्हती. त्यामुळे दिवसेंदिवस माझी बेचैनी वाढतच होती.
तशातच माझ्या एका मित्राची बहीण जी जळगावला राहत होती, काही कारणास्तव पुण्याला राहायला आली. तीदेखील जळगावात तिसर्या इयत्तेतच शिकत होती. अर्धे शैक्षणिक वर्ष जळगावच्या शाळेत व्यतीत केल्यावर तिने पुण्यातल्या शाळेत जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा आमच्या वर्गशिक्षिकेने (तेव्हा आम्हाला सर्व विषय शिकवायला एकच शिक्षिका होत्या) तिची इतर सर्व विषयांची पुस्तके बरोबर आहेत परंतू भूगोलाचे पुस्तक मात्र नव्याने विकत घ्यावे लागेल असे तिला सांगितले. तिच्याजवळ असलेले भूगोलाचे पुस्तक न चालण्याचे नेमके कारण काय असावे या कुतूहलापोटी मी ते पुस्तक पाहू लागलो आणि आपल्याच जगात वावरणार्या त्या वयातल्या मला धक्काच बसला. तिच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहिले होते आपला जळगाव जिल्हा. आम्हा सर्वांच्या भूगोलाच्या पुस्तकावर लिहीले होते आपला पुणे जिल्हा.
विचारांचा धक्का विजेच्या धक्क्यापेक्षाही तीव्र असतो असे म्हणतात. मलादेखील ह्या वैचारीक धक्क्याचा मोठा परिणाम जाणवला. यानंतर माझी विचार करण्याची दिशाच बदलून गेली. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन अमूलाग्र बदलला. म्हणजे कसे ते पाहा - जळगाव पुण्यापासून साधारण चारशे किमी लांब आहे. पुण्यातले विद्यार्थी तिसरीच्या भूगोलात पुणे जिल्ह्याचा अभ्यास करतात तर जळगावचे विद्यार्थी जळगावचा. चौथीत दोघांचा भूगोल समान असणार कदाचित कारण चौथीत महाराष्ट्राचा अभ्यास आहे पण तेव्हा दुसर्या राज्यात पुन्हा वेगळाच भूगोल असणार. पाचवीत तोदेखील समान असेल कारण संपूर्ण भारताचा तेव्हा भूगोलाच्या अभ्यासात समावेश आहे पण दुसर्या देशाचे विद्यार्थी त्यांच्याच देशाचा अभ्यास करतील. पुढे जेव्हा वरच्या इयत्तेत जगाचा भूगोल शिकविला जाईल तेव्हा कदाचित सर्व जगातल्या विद्यार्थ्यांचा भूगोल समान असूही शकेल पण मग इतिहासाचे काय?
प्रत्येक देश / प्रांत / राज्य विद्यार्थ्यांना स्वत:चा इतिहास शिकवतील पण आंतरराष्ट्रीय इतिहास शिकवायची वेळ येईल तेव्हा ते सार्या गोष्टी स्पष्टपणे मांडू शकतील काय? शंकाच आहे. इंग्लंडच्या विद्यार्थ्यांना इतिहासात असे शिकविले जाईल का की आपण भारतावर राज्य केले, त्या देशाला गुलामगिरीत जखडले, तेथील जनतेवर अन्याय, अत्याचार, जुलूम जोर जबरदस्ती केली वगैरे, वगैरे. अर्थातच अशी कोणतीही शक्यता नाही. उलट तिथल्या विद्यार्थ्यांना अशी माहिती पुरविली जात असणार की भारत हा एक अति मागासलेला देश होता. त्यास इंग्लंडच्या राज्यकर्त्यांनी नवीन तंत्रज्ञान, लोकशाही वगैरे बाबी शिकवून एक विकसनशील देश म्हणून उभे केले व त्या बदल्यात भारताच्या जनतेने कृतघ्नपणे इंग्रज अधिकार्यांना हाकलून लावले इत्यादी, इत्यादी. म्हणजेच आपण म्हणणार की ते चूकीचा इतिहास शिकवित आहेत. मग कशावरून आज आपण आपल्या विद्यार्थ्यांना जो इतिहास शिकवित आहोत तो खरा आहे? शंभर टक्के प्रामाणिक आहे?
त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीकडे फारसे उत्तेजित न होता पाह्यचे ठरविले. ह्याचे कारण आपणांस जी माहिती प्रथम पुरविली जाते, कालांतराने त्याच्या अगदी उलट माहिती तितक्याच ठामपणे आपल्या समोर येते. उदाहरणार्थ, मोहनदास करमचंद गांधींविषयी शालेय जीवनात अगदी पाचवीपर्यंत मला अतिशय छान, आदर वाटावा अशी माहिती अभ्यासातून, इतर व्याख्यानातून मिळत होती पण पाचवीत मी गोपाळ गोडसेंचे पंचावन्न कोटींचे बळी हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकात गांधींविषयी माझ्या पूर्वीच्या माहितीला छेद देणारी अतिशय वेगळीच माहिती वाचनात आली. यानंतर पुढे अनेक ठिकाणी गांधींविषयी उलट सुलट लिहिलेले आढळले. नेमका कशावर विश्वास ठेवायचा?
पुढे मी सातवीत असताना बाळासाहेब भारदे यांचे व्याख्यान ऐकले. ते म्हणाले, "तुम्ही भारताचे नागरीक आहात काय? भारताचा नागरीक असणे म्हणजे पाकिस्तानचा द्वेष करणे असे जर तुम्हाला वाटत असेल तर माझे तुम्हाला कळकळीचे सांगणे आहे की तुम्ही भारताचे नागरीक होऊ नका. विश्वाचे नागरीक व्हा. तुम्हाला तुमच्या पूर्वजांनी शिकविलेला सर्वच इतिहास खरा असेलच असे नाही. शेजारी राहणार्या दोन कुटुंबांमध्ये भांडणे असतील तर प्रत्येक कुटुंबातले आईवडील त्यांच्या मुलांना आपण कसे बरोबर आहोत आणि आपल्या शेजारचे कसे चूक आहेत हेच शिकवित राहणार. आता यात खरे काय आणि खोटे काय? वस्तुस्थिती माहित नसणारी त्या कुटुंबातली मुले तेच वैर पुढे वाढवित राहणार. शेजारी असणार्या दोन राष्ट्रांबाबतही अशीच परिस्थिती आहे. तुम्ही नव्या पिढीचे प्रतिनिधी आहात. पुर्वग्रहदूषित विचारसरणी बाळगून शत्रूभाव जपण्यापेक्षा खुल्या मनाने विचार करा. भूतकाळात कोणाची चूक होती हे शोधण्याचा प्रयत्न करू नका. कदाचित खरे काय ते तुम्हाला कधीच कळणार नाही. दोन्ही बाजूचे आपापल्या परीने आपण सांगतोय तेच सत्य असे भासवायचा प्रयत्न करतील. तेव्हा भूतकाळात कदाचित आपल्याही पूर्वजांकडून काही चूका झाल्या असण्याची शक्यता आहे हे समजून घ्या. नव्याने संबंध प्रस्थापित करा तरच भविष्यात शांततेने जगणे शक्य होईल." भारदेंच्या भाषणाने माझा ह्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिकच व्यापक झाला.
याच दरम्यान हिंदू व मुस्लीम यांच्यात वैर कसे सुरू झाले ह्याविषयीची एक कथा माझ्या वाचनात आली ज्यामुळे आक्रमक धार्मिक युद्धांच्या मागची कारणे काय असू शकतील हे मला उमजले. ती कथा थोडक्यात अशी -
तर ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा हिंदु व मुस्लिम धर्मात वैर नव्हते. हिंदुंच्या राज्यात मुस्लिम व मुस्लिमांच्या राज्यात हिंदु राहत होते. असाच एक हिंदु मनुष्य मुस्लिम राजवटीच्या प्रदेशात राहत होता. कष्ट करून पोट भरणारा तो एक अतिसामान्य तरूण होता.
तो त्याच्या कामानिमित्त राजवाड्यासमोरील रस्त्यावरून जात असताना राजकन्या त्याला सज्जातून पाहत असे. असे पाहणे अनेकदा झाल्यावर तिला असे जाणवले की तिला तो आवडू लागला आहे. तिने आपल्या वडिलांना म्हणजेच त्या प्रदेशाच्या राजाला आपण त्या तरूणाशी विवाह करण्याची इच्छा बाळगून असल्याचे सांगितले.
राजाने अर्थातच या गोष्टीला संमती दिली नाही कारण हा तरूण एक सामान्य नागरीक होता. (धर्माचा मुद्दा राजाने मांडला नाही कारण राजाला त्याचा धर्मच माहित नव्हता. परंतू रस्त्यावरून पायी चालत जाणारा म्हणजे सामान्य व आपल्या तोलामोलाचा नक्कीच नाही हे त्याला सहज कळले)
परंतू काही दिवसातच राजाच्या लक्षात आले की राजकन्येने त्या तरूणाचा ध्यास घेतला आहे व तिचे सदर तरूणाशी लग्न लावले नाही तर ती सदैव दु:ख करीत राहील. शेवटी राजा एकदाचा तयार झाला. नाहीतरी त्याला ती एकुलती एक कन्या होती. तिच्या सुखाकरिता एवढी तडजोड करायला तो तयार झाला. त्याने सेवकांना सांगून त्या तरूणास बोलावून घेतले.
त्या तरूणाला राजाने राजकन्येची इच्छा बोलून दाखविली व तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याशी विवाह करण्यास सांगितले.
त्या तरूणाला एवढे ठाऊक होते की या राजाचा आणि आपला धर्म एक नाही. त्याने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. राजाला हा सरळ सरळ स्वत:चा अपमान वाटला. त्याचप्रमाणे राजकन्या कष्टी होईल याचीही कल्पना आली.
राजाने त्या तरूणाला ’राजकन्येशी विवाह कर’ असा हुकूम दिला अन्यथा सेवकांकरवी त्याचे प्राण घेण्याची धमकी दिली.
ही धमकी ऐकताच इतका वेळ आतल्या दालनात असलेली राजकन्या धावत दरबारात आली व तिने राजाला सांगितले की या तरूणावर कोणतीही जबरद्स्ती करू नये तो स्वेच्छेने तयार असेल तरच हा विवाह आयोजित करावा.
राजकन्येने दरबारात प्रवेश केला तसे एकदम चित्रच पालटले. मुख्य म्हणजे त्या तरूणाने तोपर्यंत कधी राजकन्येला पाहिलेच नव्हते. त्यामुळे राजकन्येचे प्रेम तसे पाहता एकतर्फीच होते. परंतु राजकन्येला त्याने दरबारात त्यावेळी पाहिले आणि तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून तो ही तिच्या प्रेमातच पडला. आता काहीही करून हिच्याशी आपले लग्न झालेच पाहिजे असे त्यालाही वाटून गेले.
मग त्याने आपला लग्नासाठी आधी व्यक्त केलेला ठाम नकार रद्द करीत ’राजकन्या जर हिंदु धर्मात यायला तयार असेल तर मी लग्न करीन’ असा सशर्त होकार दिला.
राजाने ह्या अटीला संमती दिली. मग तो तरूण त्या राजकन्येला घेऊन स्थानिक हिंदु पंडिताकडे गेला. त्या पंडिताने राजकन्या म्लेंच्छ असल्याने तिला शुद्ध करून घ्यावे लागेल असे सांगितले. सदर शुद्धीकरण करण्यासाठी यज्ञाचे आयोजन व त्याकरिता आहुती / दक्षिणा आदींची मोठी मागणी केली. ती अर्थातच पुरविण्यात आली. त्यानंतर अनेक धार्मिक विधी / पुजा अर्चा करण्यात आल्या. या सगळ्या नंतर ही पुन्हा मोठे ग्रंथ / पोथ्या चाळून संदर्भ शोधण्यात आले आणि स्थानिक पातळीवर त्या राजकन्येचे शुद्धीकरण शक्य नसून तिला यापेक्षा मोठ्या धर्मपीठा समोर जाण्यास सांगण्यात आले.
पुन्हा एक पातळी वर च्या धर्मपीठात ही याच गोष्टींची पुनरावृत्ती घडली. फक्त यावेळी आहुती / दक्षिणा यांच्या मागणीत वाढ झाली. शिवाय धर्मग्रंथ / पोथ्या यांच्या वाचनाकरिता पंडितांची संख्या जास्त होती त्यामुळे अर्थातच वेळही जास्त खर्च झाला. पण निष्कर्ष शेवटी तोच. राजकन्या शुद्ध होऊ शकत नाही
(जरा आठवून पाहिल्यास आपल्या असे लक्षात येईल - ज्ञानेश्वरादी भावंडे - संन्याशाची मुले म्हणून अशुद्ध घोषित करण्यात आली व पुढे त्यांना शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत अशाच काही गोष्टी घडल्या होत्या. असो.)
असे करता करता शेवटी सर्वोच्च अशा काशीक्षेत्री तो तरूण त्या राजकन्येला घेऊन पोचला. सदर वाटचाली दरम्यान ती राजकन्या त्या तरूणाची मनोभावे सेवा करीत होती या सर्व काळात त्याला तिच्यातील सौंदर्याशिवाय असण्यार्या इतर गुणांमुळेही ती अतिशय आवडू लागली. तिच्याशिवायआपण जगू शकणार नाही याची ही त्याला खात्री झालीच. काशीक्षेत्री काय फैसला होणार याचा अंदाज त्या तरूणाला आलाच होता. अर्थात अपेक्षेप्रमाणे तिथे देखील नकार घंटाच वाजली.
त्यानंतर ती राजकन्या व तो तरूण पुन्हा राज्यात आले व राजाला सर्व वृत्तांत कथन केला. राजा व राजकन्या या दोघांनी ही परिस्थिती पुढे नमते घेत विवाहाचा नाद सोडून दिला व त्या तरूणास निरोप देण्याची तयारी केली.
स्त्रिच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरूषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते.
इथे ही असेच घडले. तो तरूण च आता राजकन्येच्या प्रेमात पडला होता. रिकाम्या हातांनी परतणे त्याला शक्यच नव्हते. त्याने सरळ राजाला विचारले, " ही हिंदु होऊ शकत नसली तरी काय झाले? मी मुसलमान व्हायला तयार आहे. तुम्ही मला तुमच्या धर्मात घेऊ शकाल काय?"
राजाने ह्या गोष्टीला अत्यंत आनंदाने होकार दिला. मुस्लीम धर्मात प्रवेश करणे अतिशय सुलभ असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मग तो तरूण मुस्लीम बनला आणि त्याने राजकन्येशी विवाह केला. त्यांचा संसार अतिशय सुखाचा झाला.
कालांतराने राजाने त्याचे राज्य आपल्या जावयाच्या सुपूर्त केले. आता हा नवीन राजा म्हणजे आपला कथानायक पुर्वाश्रमीचा हिंदु तरूण.. आणि याच्या प्रेमकहाणीतील त्यावेळचे खलनायक कोण तर हिंदुच्या धर्मपीठातील धर्म मार्तंड व तथाकथित आधिकारी व्यक्ति ... ज्यांनी आहुती / दक्षिणा वसूल करण्याखेरीज कुठलीही सश्रध्द क्रिया न करता आपल्या अधिकारात एका परधर्मीय निष्पाप तरूणीला हिंदू धर्मात येण्यास विनाकारण रोखून धरले होते.
तेव्हा या नवीन राजाने राज्यावर येताच आपल्या सैनिकांना हुकुम सोडला ....
"हिंदूंची देवळे तोडा.. लुटा... तेथील धर्मरक्षकांची कत्तल करा..."
त्यांनतर त्याने त्याच्या वारसांनाही हीच शिकवण दिली. आणि यानंतरच हिंद आणि मुसलमान या दोन धर्मात वैर सुरू झाले.
बाटगा जास्त कडवा असतो ही म्हण ही या घटनेनंतरच उदयास आली.
(कथा समाप्त)
सदर कथा मी रचलेली / लिहिलेली नाही. कोणाच्या भावना यामुळे दुखावल्यास मी जबाबदार नाही. त्याचप्रमाणे ही कथा कुठल्याही मुसलमान अथवा अन्य धर्मीय व्यक्तिने सांगितली नसून स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांनीच त्यांच्या एका भाषणात सांगितली होती.
सदर भाषणाचा वृत्तांत व ही कथा ’शतपैलू सावरकर’ (लेखक - ह. त्र्यं. देसाई) या पुस्तकात वाचण्यास मिळेल. ही कथा ज्या काळात घडली त्या काळात मी जन्मलो नसल्याने तिच्या सत्य / असत्यते विषयी मी काहीच भाष्य करू शकत नाही परंतू ती कथा त्या पुस्तकात असल्याचे व मी शाळेत असताना ती वाचल्याचे मला आठवते.
(हेच ते पुस्तक :- http://2.bp.blogspot.com/_nYJSmnbR6JY/TRtDddkhCtI/AAAAAAAABdM/NFOT8_4nku...
आणि ती कथा आपण इथे वाचू शकता:-
http://3.bp.blogspot.com/_nYJSmnbR6JY/TRtDn-4yFnI/AAAAAAAABdQ/VWmZmv2KgE...
http://2.bp.blogspot.com/_nYJSmnbR6JY/TRtHnZNBNQI/AAAAAAAABdU/t9AHsASS7_...)
हे सर्व स्पष्टीकरण ऐकल्यावर वरदच्या विचारांमध्ये बराच फरक पडला.
http://beftiac.blogspot.com/2010/12/behind-every-crime-there-is-injustic...
प्रतिक्रिया
28 Sep 2011 - 6:19 pm | विनायक प्रभू
पुंडलिक वरदा हरी विट्ठल
28 Sep 2011 - 6:35 pm | परिकथेतील राजकुमार
अतिशय ओघवती लेखनशैली.
काय लिहिलय बॉस ! शब्दाशब्दात विचारांची ताकद दिसते आहे.
क्लासच !
'दोन ओळीत जिवानचे सार' म्हणावे का ह्याला ?
गुगळे सर, तुम्ही खरंच आत्ममचरित्र लिहा. ह्या इंटरनेट आणि मराठीच्या कक्षा ओलांडून तुमचे विचार, तुमचे ज्ञान सर्वत्र पोचू दे. तुमच्या विचारांना ह्यापेक्षा मोठ्या अवकाशाची गरज आहे.
28 Sep 2011 - 6:48 pm | विनायक प्रभू
यू मीन बिगर कॅनव्हास.
28 Sep 2011 - 7:15 pm | रेवती
लेखन आवडले.
हिंदू मुसलमान दंग्याची सुरुवात अशी झाली हे नवीनच ऐकले.
28 Sep 2011 - 8:54 pm | रामदास
हिंदू मुसलमान दंग्याचं काही माहीती नाही पण या धाग्यावर दंगल कधी सुरु होईल ते सांगता येत नाही.
28 Sep 2011 - 11:50 pm | सुहास झेले
:D
28 Sep 2011 - 7:21 pm | आत्मशून्य
हे आधी कोणी म्हटलय ? एव्हड सांगता काय ?
बाकी टायटल मस्त लिहलयं....
28 Sep 2011 - 7:35 pm | शाहिर
या आधी कोणी म्हणला असता तर श्रीयुत गुगळे यांनी तसा उल्लेख नक्कीच केला असता.
हे विचार (किंवा अनुभव )श्रीयुत गुगळे यांचे आहेत असे सकृत दर्शनी तरी वाटते .
बाकी स्पष्टीकरण लेखक करतीलच.
28 Sep 2011 - 7:43 pm | स्मिता.
हे विचार (किंवा अनुभव )श्रीयुत गुगळे यांचे आहेत असे सकृत दर्शनी तरी वाटते .
तसे वाटत नाही. कारण ते विचार कथा सुरू झाल्यानंतर आणि 'कथा समाप्त'च्या आधी आलेले आहेत. त्यामुळे ते कथाकाराचेही असण्याची शक्यता आहेच.
28 Sep 2011 - 11:10 pm | चेतन सुभाष गुगळे
<< स्त्रिच्या प्रेमात मूलत:च एक त्यागाची भावना असते. त्यामुळे आपणाला आपले प्रेम मिळत नसल्यास त्या ते वास्तव चटकन स्वीकारतात. याउलट पुरूषांची लालसा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांचे प्रेम हे ’हक्कप्रधान’ असते. ते मागणी करीत राहते. >>
<< हे आधी कोणी म्हटलय ? एव्हड सांगता काय ? >>
अनुभव व निरीक्षणांती बनलेलं ते माझं स्वत:चं मत आहे.
28 Sep 2011 - 7:23 pm | आनंद
छान लिहल आहे!
28 Sep 2011 - 7:29 pm | शाहिर
तुमच्या विचारांची उंची खुप उत्तुंग आहे ..
आणि तुम्ही शरदला देखील समजावले ते नवीन पिढी साठी उदबोधक आहे..
बाकी प.रा. यानी लिहिले आहेच
माझे अनुमोदन.
28 Sep 2011 - 7:31 pm | मृत्युन्जय
शरद नाही हो वरद.
28 Sep 2011 - 10:16 pm | अनामिक
नै तर काय... मी शरद म्हंटल्यानंतर मिपासदस्य शरद यांना चेतन सुभाष गुगळे ह्यांनी कधी व काय समजावले हे पाहण्यासाठी खरडी आणि धागे उचकपाचक करत बसलो!
शाहीरचा जाहीर निशेढ!
28 Sep 2011 - 7:29 pm | मृत्युन्जय
हिंदु मुस्लिमांच्या वैराला हिंदुच जबाबदार असावेत अशी शंका होतीच. घ्या म्हणाव आता तुमचे सावरकर पण तसेच म्हणताहेत. म्हणजे प्रमाण मानावेच लागेल की नाही आता. कुठे गेले ते धर्मांध हिंदु जे इतर धाग्यांवर चवताळुन उठतात. आता सावरकर म्हटले की कशी दातखीळ बसली की नाही? अता बोला म्हणाव.
28 Sep 2011 - 7:36 pm | रेवती
कृपया वाद सुरु होईल असे अवांतर लिहू नये.
28 Sep 2011 - 7:47 pm | स्मिता.
कथा वगळता बाकीचा लेख आवडला. एखाद्या गोष्टीकडे केवळ एकाच बाजूने न बघता दोन्ही बाजूंनी बघण्याचा प्रयत्न करावा हे विचार पटले.
28 Sep 2011 - 8:21 pm | गणपा
+१
मागेही त्या अंगठीच्या धाग्यात असच झाल होतं.
गोष्टीच्या नादात बरेच जणांच मुळ मुद्द्या कडे दुर्लक्ष होत.
28 Sep 2011 - 8:00 pm | वेताळ
बाकी चेतन साहेबांचा मी ओर्कुट पासुअन फ्यान आहे.
28 Sep 2011 - 8:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
इंग्लिशमधला justice (किंवा injustice) हा शब्द मोजता येण्यातला आहे का? माझ्या माहितीत नाही. तेव्हा "An Injustice" हे व्याकरणदृष्ट्या चूक आहे.
28 Sep 2011 - 8:32 pm | मिसळपाव
आकार/घनता असलेला एखादा पदार्थ अशा द्रुष्टिने justice (किंवा injustice) याकडे न बघता याकडे (म्हणजे justice (किंवा injustice) कडे) घटनात्मक द्रुष्टिकोनातून बघितलं किंवा हा काहि आकार/घनता असलेला एखादा पदार्थ नसल्यामुळे 'घटनात्मक द्रुष्टिकोनातून अनुभवलं' असं म्हणूया हवं तर, तर मला वाटतं याला (म्ह j (किं i) ला) 'a' कींवा 'an' असा प्रत्यय लावणं चूक ठरणार नाही - व्याकरणदृष्ट्या म्हणा किंवा सामाजिक जाणीवांच्या अनुभूतीच्या अनुभवाच्या द्रुष्टितून म्हणा - असं म्हणायला काही प्रत्यवाय नसावा, नाही का????
28 Sep 2011 - 9:10 pm | मन१
----/\-------
29 Sep 2011 - 4:01 am | Nile
>>घटनात्मक द्रुष्टिकोनातून
जोजोकाकू ओरडायच्या आत सावध करतोय फक्त. 'घटनात्मक दृष्टिकोनातून'. ;-)
(पळा आता..)
28 Sep 2011 - 11:03 pm | चेतन सुभाष गुगळे
Behind Every Crime There Is An Injustice हे वाक्य मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये टंकलं असता स्पेलचेक टूलकडून ते व्याकरण दृष्ट्या चूक असल्याचा इशारा केला जात नाहीय.
29 Sep 2011 - 1:47 am | Nile
Do you ever learning grammar in school?
29 Sep 2011 - 1:56 am | सिद्धार्थ ४
29 Sep 2011 - 2:11 am | मुक्तसुनीत
Do you ever learning grammar in school?
तुम्हाला "Did you ever learn grammar in school ?" असं म्हणायचं होतं काय ?
29 Sep 2011 - 2:26 am | Nile
Do you not make of joke him?
29 Sep 2011 - 2:58 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
Behind Every Crime There Is An Injustice यातल्या अति कॅपिटलायजेशनलाही वर्डने काही आक्षेप घेतलेला नाही तर त्यांच्या व्याकरणावर काय विश्वास ठेवणार?
मिसळपाव, तुमच्या तर्कावर विचार करते आहे, पटत नाहीये, पण नीट मांडताही येत नाहीये.
29 Sep 2011 - 12:58 pm | श्रावण मोडक
Behind Every Crime There Is An Injustice
Behind Every Crime There Is An Injustice
29 Sep 2011 - 2:29 pm | विनायक प्रभू
म्हणजे अजुन शाळेतच काय?
28 Sep 2011 - 10:38 pm | अर्धवटराव
राजु हिरानीचं नाव देऊन राम गोपाल वर्माने सिनेमा दिग्दर्शन करायला घ्यावा आणि सुभाष घई स्टाईलने संपवावा असं काहिसं वाटलं लेख वाचताना.
थोडक्यात, मझा नाहि आला.
बाकि सावरकरांबद्दल काय बोलावं? दुसर्याचं ते कार्ट म्हणताना आपला तो बाब्या असा हेका त्यांनी कधीच धरला नाहि. सावरकरांचे हिंदुत्व जर स्विकारले असते तर देश सद्ध्या आहे त्यापेक्षा कितितरी जास्त आणि स्वच्छ सेक्युलर झाला असता. खैर... चालायचच.
(शोले कॉईन) अर्धवटराव
29 Sep 2011 - 2:27 am | रामपुरी
इयत्ता तिसरी तुकडी ... मध्ये असताना तुमचे विचार एवढे प्रगल्भ होते कि तुम्ही एवढी मोठी संगती लावून तुमची मते ("त्यानंतर मी कुठल्याही गोष्टीकडे फारसे उत्तेजित न होता पाह्यचे ठरविले") वगैरे तयार केलीत???? लै भारी आहात तुम्ही.... :) :) :)
29 Sep 2011 - 10:55 am | वपाडाव
ओह्ह, रामपुरी---- वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत चांदोबा अन तिथुन पुढे डेबॉनेयर वाचणारे लोक तुम्ही.....
"प्रगल्भ" म्हंजे काय अन कशाशी खातात हे तरी माहिती आहे का?
गुगळे साहेब आहेतच मुळी हेवा वाटावा या क्याटेगिरितले....
काय समजलात काय त्यांना....
29 Sep 2011 - 9:01 pm | रामपुरी
हेच तर म्हणतोय गुगळे साहेब लै भारी आहेत. आम्ही तर अजूनपण चांदोबा वाचतो (आणि नववी/दहावीपासून त्यासोबत डेबॉनेयर सुद्धा ;)). आमाला काय ठावं "प्रगल्भ" म्हंजे काय अन कशाशी खातात....
30 Sep 2011 - 7:47 pm | मी-सौरभ
माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो...
आधी मोठे व्हा (गुगळे गुरुजींसारखे)...
मग 'उपक्रम' चे सदस्य व्हा...
मगच गुगळे गुरुजींचे धागे वाचा ...
त्या धाग्यांवर प्रतिक्रिया देणे हे मोठ्ठ्या माणसांचे लक्षण आहे....
तो पर्यंत बाकी धागे वाचून मजा करा :)
एक अजाण बालक,
1 Oct 2011 - 5:39 pm | नितिन थत्ते
काय म्हणता डेबोनेअर वाचायचात? ते इंग्लिशमध्ये असतं ना?
आम्ही तर डेबोनेअर फक्त पहायचो.
1 Oct 2011 - 6:09 pm | विनायक प्रभू
पाहुन उत्तेजित व्हायचो; हे लिहायला विसरलात का नि.थ.चा(तुम्हाला शॉर्ट फॉर्म आवडतो का नाही हे विचारणार नाही)
29 Sep 2011 - 11:07 am | सविता
हेच म्हणायला आले होते. आम्ही अजून ही प्रगल्भ झालो नाहीये अगदी १७वी शिकून युगे लोटली तरी!
अवांतर : तसा विचार छान आहे.
29 Sep 2011 - 11:18 am | वेताळ
अहो हे काहीच नाही परवा एका धाग्यात दुसरीतील मुलीला तिच्याच वर्गातील मुलाने लग्नाबद्दल विचारल्यावर ती इतकी उत्तेजित झाली कि तिने त्याला चक्क बदडुन काढले.त्यामुळे तिसरीत चवथीत हे असे होते ह्यावर विश्वास बसायला हरकत नाही.
तरी तो मुलगा गुगळे साहेबाच्या क्लासमध्ये होता त्यामुळे त्याची उत्तेजना त्यानी दाबुन टाकली अन्यथा अनर्थ घडला असता.
29 Sep 2011 - 8:52 am | सिद्धार्थ ४
चेतन सुभाष गुगळे ह्यांचा धागा आणि अजून अर्धशतकी पण नाही? ये अच्छी बात नाही ही.
29 Sep 2011 - 9:25 am | मराठी_माणूस
अजुन एक छान विचारप्रवर्तक लेख
29 Sep 2011 - 9:40 am | प्रचेतस
लेखनशैली उत्तम पण मते चुकीच्या गृहितकांवर आधारलेली आहेत.
कथा वाचण्याऐवजी थोडा इतिहास वाचला असतात तर वरदच्या विचारांमध्ये अजूनही बराच फरक पडला असता.
http://en.wikipedia.org/wiki/Jihad
29 Sep 2011 - 10:19 am | सोत्रि
वल्ली, अगदी मनापासुन सहमत!
लेखाचा विषय आणि आशयपण छान, फक्त कथेतले उदाहरण समर्पक वाटले नाही आणि लेखाची दिशा भरकटली. (असे मला वाटते)
अर्धवट ह्यांनी म्हटल्याप्रमाणे लेख 50-50 :)
- (इतिहासात रमणारा) सोकाजी
29 Sep 2011 - 11:26 am | परिकथेतील राजकुमार
इतिहास घडवण्याची ज्या माणसाची ताकद आहे, त्या माणसाला इतिहास वाचण्याचे सल्ले देणार्या अप्रगल्भ लोकांचा निषेध !
गुगळे साहेब, आज मिपाकरांचे शिव्या-शाप मिळाले तरी चालतील, पण तुम्हाला एक विनंती करतो आहे, की ह्या अप्रगल्भ, सतत विचारवंतांची खिल्ली उडवणार्या मिपाकरांसाठी लेखणी झिजवणे बंद करा. आज हेच लेखन तुम्ही उपक्रमा सारख्या ठिकाणी केले असतेत तर खरच भरभरुन दाद मिळाली असती. अक्षरशः डोक्यावर घेतले असते तुम्हाला. तुमच्या ज्ञानाचे खरे चिज झाले असते.
29 Sep 2011 - 12:05 pm | सोत्रि
दहा लक्ष वेळा सहमत.
चेतन,
माझ्यामते तु उपक्रमावर लिहायचे मनावर घेच!
- (उपक्रमी नसलेला 'परा'क्रमी) सोकाजी
29 Sep 2011 - 12:28 pm | Nile
ह्या प्रतिगामी आणि मागसलेल्या पर्या आणि सोकाजींचा निषेध करतो. चेसुगुंसारख्या जगाच्या पाच पन्नास वर्षं पुढे असणार्या लोकांना सद्ध्या अस्तित्वात असणार्या कोणत्याही संस्थळावर लिहण्याचा सल्ला देणार्या मूढांचा निषेध!!
मी तर म्हणतो पर्यानेच एक पेश्शल नविन संस्थळ उघडावे आणि मिपावरील चेसुगुंसारख्या थोर लेखकांना प्रगल्भ असे व्यासपीठ उघडून द्यावे. हे करण्याकरता पराला रोज दोन चार माड्या जास्त चढाव्या लागल्या तरी बेहत्तर! खारीचा वाटा म्हणून पर्याला चपला आम्ही देऊ, म्हणजे माड्या चढून चढून चपला झिजल्या तर त्यांची सोय आम्ही करू.
29 Sep 2011 - 12:44 pm | विनायक प्रभू
नाइल च्या प्रतिसादाला दुसरी बाजु आहे का?
29 Sep 2011 - 12:48 pm | Nile
दुसरी बाजु म्हणून तुम्हाला संपादक कर अशी शिफारस करतोय पर्याकडे! ;-)
29 Sep 2011 - 1:20 pm | विनायक प्रभू
ते संपादक पद राहु दे.
इयत्ता ३ री त तु चंद्रकांत काकोडकरांच्या कादंबर्या वाचुन तु उत्तेजित व्ह्यायचास असे मला एका अनिवासी सदस्याने कळवले आहे.
खरे की काय?
29 Sep 2011 - 2:14 pm | सोत्रि
हात तुझी निळ्या!
काकोडकर वाचुन तु उत्तेजित व्ह्यायचास? अरेरे काय तुझी...... :(
सौ. आशु रावजी दिनु कानडे तु वाचल्याच नाहीस ?
मग, हाय रे कंबख्त तुने तो उत्तेजित होने जैसा कुछ वाच्याच नही ;)
- (सौ. आशु रावजी दिनु कानडेंचा फुल स्पीड पंखा) सोकाजी
29 Sep 2011 - 6:52 pm | Nile
सोकांजींच समजु शकतो, पण मास्तर तुम्ही सुद्धा इतका मागासलेला विचार करता?
मी पहिलीत असताना मराठी संतसाहित्य वाचून उत्तेजित होत असे. (आपले धनाजीराव त्यावर लवकरच लिहणार आहेत) दुसरीत गेल्यावर मी देशभरातील उत्तेजित संतांचे साहित्य वाचून काढले. तिसरीत गेल्यावर अपघातानाचे प्रत्यक्ष प्रमाण शेजारी अनुभवले.. तेव्हा पासून वाचून उत्तेजणे जे सुटले ते सुटलेच.
29 Sep 2011 - 7:24 pm | अनामिक
...तेव्हा पासून वाचून उत्तेजणे जे सुटले ते सुटलेच.
म्हणजे तुझे तुझ्या कर्मविपाकातून अधःपतन की काय ते झाले असे म्हणावे लागेल.
29 Sep 2011 - 3:10 pm | प्रियाली
परा, तुलाही चेतनजी सुभाष गुगळेंपासून काहीतरी शिकून घेणे आवश्यक आहे. उगीच निषेध वगैरे करत फिरत असतोस त्यापेक्षा या लेखावरून योग्य तो बोध घे आणि प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते हे जाणून घे. जसे, विचारवंत-विचारजंत.
29 Sep 2011 - 3:15 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. आत्ताच आम्हाला दुसरी बाजू समजली आहे.
मी काही सन्माननीय सदस्यांच्या पाठीमागे लागलो आहे आणी लिहीणार्यांना लिहू देत नाही म्हणे.
असो..
ह्यापुढे इथे यावे का नाही हेच आता ठरवायचे आहे :) उगाच सन्माननीय सदस्यांना आणि व्यास, वाल्मिकीं, कालिदासांना त्रास नको.
29 Sep 2011 - 3:30 pm | श्रावण मोडक
परिकथेतील राजकुमार यांच्याशी सहमत आहे. चेतन सुभाष गुगळे यांनी खरोखरच उपक्रमावर लेखन करावे. तिथं अधिक सकस चर्चा होईल. त्यांनाही त्यात हिरीरीने भाग घेता येईल. आम्ही तिथं ती वाचूच.
29 Sep 2011 - 3:34 pm | प्रियाली
मोडक आणि परा काही बोलले की मला असहमत होताच येत नाही. :(
चेतन सुभाष गुगळेंनी लवकरात लवकर उपक्रमाचे सदस्यत्व घ्यावे आणि उपक्रमींना उपकृत करावे.
1 Oct 2011 - 3:27 pm | शैलेन्द्र
"पण तुम्हाला एक विनंती करतो आहे, की ह्या अप्रगल्भ, सतत विचारवंतांची खिल्ली उडवणार्या मिपाकरांसाठी लेखणी झिजवणे बंद करा."
श्री. प. रा. कुमार यांनी येवुन येथील प्रथीत्यश व दांडग्या लेखकांना डीस करेज करु नये. मिपावर लेखन करताना श्री चे सु गुळवे यांना समाधान लाभते, तसेच समाधान अनेकांना त्यांच्या अभ्यासु लेखनाला प्रतिक्रीया देताना लाभते. या रुनानुबंधाला संपवण्याचे पातक श्री प रा कुमार यांनी करु नये अशी विनंती
29 Sep 2011 - 11:42 am | विनायक प्रभू
नेहेमी प्रमाणे पराशी सहमत.
29 Sep 2011 - 11:52 am | जागु
लेखन शैली छानच आहे.
29 Sep 2011 - 3:13 pm | प्रभाकर पेठकर
विषय चांगला आहे. पण लेख भरकटला आहे. एवढा मोठा पाल्हाळीक लेख लिहिण्यापेक्षा मोजक्या शब्दात आपले विचार मांडण्याची सवय करणे अत्यंत गरजेचे आहे. क्षीण कथासूत्र समजण्यासाठी शंभर सव्वाशे ओळी वाचाव्या लागणे ही खरच एक शिक्षा वाटते.
सर्वसामान्य जनांत तीसरीत असणारी मुले एकमेकात दंगामस्ती करण्यात, खेळण्यात दंग असतात. त्यांचे पाठ्यक्रमही त्यांच्या बुद्धीला झेपतील असेच असतात. त्यामुळे लेखातील काही भाग मनाला पटत नाही. ह्यावरही लेखकाने विचार करावा.
1 Oct 2011 - 3:32 pm | शैलेन्द्र
श्री प्र. पेठकर यांनी या लेखनमौक्तीकास पाल्हाळ म्हटल्याबद्दल निषेध..
1 Oct 2011 - 5:02 pm | अभिज्ञ
लेख छान.
लेखनशैली छानच.
शाळेतल्या मुलांना शिकवण्याची तुमची पध्दत आवडलि.
बादवे, आता बरा आहे ना.. वरद?
अभिज्ञ.